पुणे, दि. ३ – “आपला देश विविधतेने नटलेला असून देशात अनेकविध कलाप्रकार अस्तित्वात आहेत. या सर्व कलांचे एकात्मिक शिक्षण देण्याची गरज असून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स त्यादृष्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडेल. संस्थेने लावलेल्या या रोपट्याचा भविष्यात निश्चितच वटवृक्ष होईल आणि देशाबरोबरच जगासाठी कार्य करणारे विद्यार्थी येथे घडतील,” असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि मएसो सिनिअर कॉलेज या दोन महाविद्यालयांचे उद्धाटन कुलगुरुंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोथरुडमधील मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरिअममध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, ‘मएसो’चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष अभय क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. करमळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “पं. भीमसेन जोशी यांच्या प्रेरणेतून विद्यापीठात गुरुकुल पद्धतीने विविध कलांचे शिक्षण देणाऱ्या ललित कला केंद्राची सुरुवात झाली. आता गोव्याच्या धर्तीवर अनुभवजन्य शिक्षण देणारी कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची गरज असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी संधी उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. नव्या शैक्षणिक धोरणात स्वैच्छिक शिक्षणाचा (Liberal Education) समावेश करण्यात येणार असून त्यात ललित कलांचा (Performing Arts) अंतर्भाव करण्यात आला आहे. पुणे शहर हे विद्येबरोबरच कलांचे माहेरघर असून कलांच्या शिक्षणासाठी पुण्यातल्या प्रतिभावंतांना सहभागी करून घेतले पाहिजे. कलेच्या शिक्षणामुळे चारित्र्यसंपन्न पिढी घडण्यास मदत होते आणि त्यांचा उपयोग देश संपन्न होण्यासाठी होतो. आता केवळ नोकरी देणारे शिक्षण न देता विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशाला कला, संस्कृती, योग, आयुर्वेद याची फार मोठी परंपरा आहे. या परंपरेचे केवळ गुणगान करत न बसता त्याचा एकत्रितपणे विचार करून जगभर त्याचे मार्केटिंग केले पाहिजे. रोजगार निर्मितीबरोबरच आनंददेखील मिळेल अशा दृष्टीने या सर्व विषयाकडे बघण्याची गरज आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करत असतानाच नावीन्याचाही पुरस्कार केला पाहिजे. विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून भौतिक शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षण देण्याचीदेखील आवश्यकता आहे.”
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेल्या नव्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध कलांचे शिक्षण मिळेल आणि त्यांना नवी दिशा मिळेल. पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे, शहरात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटसारख्या संस्थांबरोबरच आय.सी.सी.आर. चे क्षेत्रीय कार्यालयदेखील आहे. अशा संस्थाबरोबर सहकार्य करण्याची शक्यता पडताळून बघितली पाहिजे. हवाई वाहतूक, पर्यटन अशा विषयांसाठी एम.बी.ए. चे अभ्यासक्रम चालविले पाहिजेत. शिक्षण व्यवस्थेत क्रेडिट सिस्टीम आणण्याचा विचार स्तुत्य आहे. आपल्याकडे आता प्रत्येक कामाकडे आदराने बघितले जाते, हा बदल खूप चांगला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला शाबासकी ही दिलीच पाहिजे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी केले तर संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.
डॉ. मानसी भाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाची सुरवात अबोली थत्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नृत्याद्वारे केलेल्या गणेश वंदनेने झाली. सुखदा दीक्षित यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या वतीने ‘संगीतातील घराणी आणि सादरीकरण’ या विषयावर ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विकास कशाळकर यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. म.ए.सो. मुलांचे विद्यालयातील (पेरुगेट भावे हायस्कूल) डॉ. प्र.ल. गावडे सभागृहात शनिवार, दि. २७ जुलै २०१९ रोजी दोन सत्रांमध्ये ही कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेपूर्वी शास्त्रीय संगीतातील घराणी, मूळपुरुष आणि गुरु-शिष्य परंपरा, वेगवेगळी वाद्ये आणि वादक, जेष्ठ नृत्यांगना, याबरोबरच जेष्ठ नाट्यकर्मी अशा वेगवेगळ्या आशयानुसार तयार केलेल्या ‘फोटो आर्ट गॅलरी’चे उद्घाटन पं. कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव श्री. सुधीर गाडे. महाविद्यालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य श्री. गोविंद कुलकर्णी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर आणि महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. दीपाली काटे उपस्थित होते.
या कार्यशाळेत शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर, आग्रा, जयपुर आणि किराणा या घराण्यांचा इतिहास, प्रत्येक घराण्यानुसार सादरीकरणातील वैविध्य, सौंदर्यमूल्यांविषयी सप्रयोग व्याख्यानातून जिज्ञासू रसिकांना घरंदाज बंदिशी, स्वरलगाव, रागबढतीतील विविध टप्पे या विषयांवर यथासांग माहिती मिळाली.
पुणे शहराबरोबरच विविध गावातील संगीत अभ्यासक या कार्यशाळेला उपस्थित होते.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अबोली थत्ते यांनी तर महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. दीपाली काटे यांनी आभारप्रदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी प्रा. सुखदा दीक्षित, प्रा. अबोली थत्ते, छाया ढेकणे व श्री. विक्रम खाटपे यांनी परिश्रम घेतले.
आज रात्री झी २४ तास वृत्तवाहिनीवर ८ वाजताचे बातमीपत्रामध्ये बघायला विसरू नका …
“धागा शौर्याचा, राखी अभिमानाची”
सैनिकांसाठी झी २४ तास या वृत्तवाहिनीने “धागा शौर्याचा, राखी अभिमानाची” हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. सैनिकांना पत्र पाठवून त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेली आपुलकी, आदराची भावना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. म.ए.सो.बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम शाळेत आज (बुधवार, दि. २४ जुलै २०१९) या उपक्रमाचा शुभारंभ झाला. शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक लाखमोलाची संधी होती. ह्या उपक्रमाचा महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. उद्याच्या भारतासाठी आणि उज्ज्वल भविष्य असणाऱ्या या मुलांना समाजाभिमुख बनविण्यासाठी असे उपक्रम फारच उपयुक्त ठरत असतात.
“जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान
तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केव्हढीशी शान”
इंदिरा संतांच्या या ओळी सैनिकांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतिशय समर्पक आहेत. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन असा दुग्धशर्करा योग जुळून आल्यामुळे यावर्षी स्वातंत्र्यदिनी सैनिकांना राखीसोबत कृतज्ञता पत्र पाठवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे, झी २४ तासचे मुख्य संपादक श्री.विजयजी कुवळेकर व संस्थेचे सचिव डॉ.भरत व्हनकटे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड देण्यात आली आणि त्यांनी त्यावर सैनिकांना उत्स्फुर्तपणे पत्र लिहिले. जमा करण्यात आलेल्या या सर्व पत्रांची पेटी सैनिकांना देण्यासाठी सुपूर्द करण्यात आली.
अतिशय प्रेरणादायी वातावरणात आणि प्रचंड उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.
आज रात्री झी २४ तास वृत्तवाहिनीवर ८ वाजताच्या बातमीपत्रामध्ये या कार्यक्रमाची सविस्तर बातमी दाखविण्यात येणार आहे.
पुणे, दि. १९ – “आजच्या विद्यार्थ्यांसमोर निश्चित ध्येय आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला बरेच काही नवीन घडते आहे. आता चाकोरीबद्ध विचार करण्याचे दिवस संपले आहेत, त्यामुळे जीवनात प्रस्थापित क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्राचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी नवीन क्षेत्र विकसित करण्याचादेखील विचार केला पाहिजे, आपल्या क्षमता आजमावून बघितल्या पाहिजेत. आपल्याला मनापासून जे आवडते तेच करा, ते करत असताना कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडू नका,” असा सल्ला कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे क्षेत्रिय आयुक्त अतुल कोतकर यांनी आज विद्यार्थ्यांना दिला.
मार्च २०१९ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्चमाध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. इ. १० वी, इ. १२ वी आणि ज्ञानवर्धिनी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या ‘मएसो’च्या ४० विद्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा समारंभ पार पडला.
यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे सदस्य ॲड. धनंजय खुर्जेकर, संस्थेचे साहाय्यक सचिव सुधीर गाडे, सचिव डॉ. भरत व्हनकटे व्यासपीठावर उपस्थित होते.
संस्थेच्या नियामक मंडळाचे तसेच आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर या समारंभाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजीव सहस्रबुद्धे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी काय शिकायचे आहे हे ठरवत असताना जीवनाचा सर्वांगीण विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनात आपल्या पालकांप्रमाणेच, शाळेचे आणि संस्थेचे नाव मोठे करावे अशी संस्थेची अपेक्षा असते, शिक्षक व प्राध्यापक त्यादृष्टीने कष्ट घेत असतात आणि संस्था आवश्यक असलेल्या विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत असते. संस्थेच्या उज्ज्वल कार्याचा परिचय सर्वांना व्हावा हादेखील हेतू गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभामागे असतो.
डॉ. भरत व्हनकटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने पायल संतोष पिसे, साक्षी संभाजी जाधव, अरबाज रियाज शेख, वैष्णवी गिरीश जोशी, जान्हवी शिरीष पानसे या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “स्वतःचे वेगळेपण सिद्ध करता येईल असा मार्ग विद्यार्थ्यांनी निवडला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय स्पष्ट आहे, त्यामुळे ते स्वप्न राहणार नाही यासाठी सर्वजण नक्कीच प्रयत्न करतील यात शंका नाही. जीवनात गुरुंचे महत्व खूप आहे कारण त्यांच्याकडून कायमच प्रेरणा आणि आशीर्वाद मिळतात. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा कारण त्यात काम केले तर प्रगतीच होते. आपल्या शारिरीक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या. स्वतःची प्रतिमा निर्माण करा आणि आपले पालक, शाळा, संस्था यांचे नाव मोठे करा, त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा! ”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीलिमा व्यवहारे यांनी तर आभार प्रदर्शन सुधीर गाडे यांनी केले.
‘शिक्षणाचा पाया पक्का करण्याची गरज’
“माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज सर्व माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध होत आहे, शिकण्यासाठी पूर्वी कष्ट घ्यावे लागत होते. आता मात्र शिकण्यासाठी कष्ट करण्याची भावना कमी होत चालली आहे, हे योग्य नाही. शालेय जीवनातच शिक्षणाचा पाया पक्का करण्याची गरज असते कारण त्याच्याच जोरावर आयुष्यात यशस्वी होता येते,” असे प्रतिपादन गरवारे पॉलिस्टर लिमिटेडच्या मनुष्यबळ आणि प्रशासन विभागाचे अध्यक्ष डॉ. विहार राखुंडे यांनी आज (रविवार, दि. 14 जुलै 2019) येथे केले. सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. 10 व इ. 12 वी च्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव आणि गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या साहाय्यातून करण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा शुभारंभ डॉ. राखुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वाघमारे, शाळेचे महामात्र आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर गाडे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते. गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी आणि मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील सुतवणे, मएसोच्या नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळातील सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. राखुंडे म्हणाले की, “परदेशांप्रमाणेच आपल्या देशातही दर्जेदार शिक्षण मिळावे अशी आबासाहेब गरवारे यांची इच्छा होती. त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविले होते. परंतु, समाजातील सर्वांना हे शक्य होणार नाही याची त्यांना जाणीव होती. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतूनच त्यांनी गरवारे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आबासाहेब गरवारे यांच्या विचारांना अनुसरून गरवारे पॉलिस्टर लिमिटेडचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर शशिकांत गरवारे मएसो आणि विविध शैक्षणिक संस्थांना गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने पाठबळ देत आहेत. त्यांच्याच पाठिंब्यामुळे ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या ‘मएसो’ सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाला आज सुरुवात होत आहे.”
इ.12 वी च्या परिक्षेत विज्ञान शाखेत 80 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावलेली मयुरी सुनील बजबळकर, इ.12 वी च्या परिक्षेत वाणिज्य शाखेत 91 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आलेला विशाल विठ्ठल ढाकणे आणि इ. 10 वी च्या परिक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आलेली साक्षी कालिदास सातव या गुणवंतांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात, सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्थापनेला लवकरच 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात, शाळा हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया असल्याने तो मजबूत व्हावा यासाठी शिक्षकांनीही कष्ट घेण्याची गरज असल्याचे सांगितले. शिक्षकांकडे असलेले सर्व ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. मातृभाषेतून शिकल्याने शिक्षणाचा पाया मजबूत होतो. मराठी शाळेत शिकत असल्याचा न्यूनगंड विद्यार्थ्यांनी अजिबात बाळगू नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आबासाहेब गरवारे व सौ. विमलाबाई गरवारे यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनी श्रेया कुलकर्णी हीने सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.
शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वाघमारे यांनी आभारप्रदर्शन तर शिक्षिका अर्चना लडकत यांनी सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने नव्याने सुरू केलेल्या ‘मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्टस’च्या कार्यालयाचे उद्घाटन ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते गुरुवार, दि. ४ जुलै २०१९ रोजी करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, बाबासाहेब शिंदे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी, सुधीर भोसले, विनय चाटी, गोविंद कुलकर्णी,संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, संस्थेच्या कार्यालयाचे प्रबंधक नीलकंठ मांडके, सहाय्यक प्रबंधक अजित बागाईतकर आदी उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नाव अग्रणी आहे. समाजात असलेली विविध कलांची आवड लक्षात घेऊन संस्थेने ‘मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्टस’ची स्थापना केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, नाट्य या पैकी कोणत्याही एका कला प्रकाराची निवड करून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.
महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा वास्तूमध्ये विदयार्थ्यांसाठी स्वतंत्र रियाज खोली, प्रात्यक्षिक वर्ग, साउण्ड लायब्ररी, प्रोजेक्टर खोली, कार्यक्रमासाठी स्वतंत्र सभागृह अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असून येत्या काही काळात संगीत, नृत्य आणि नाटयाशी निगडीत अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत.
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र.ल. गावडे यांनी गुरुवार, दि. २० जून २०१९ रोजी ९६ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी डॉ. गावडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले आणि संस्थेच्या नव्याने सुरु होत असलेल्या तीन महाविद्यालयांची माहिती दिली. संस्थेच्या वाटचालीबद्दल यावेळी गावडे सरांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी संस्थेचे साहाय्यक सचिव सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे प्रबंधक नीलकंठ मांडके उपस्थित होते.
मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. (डॉ.) पी.बी. बुचडे यांची निवड करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवड समितीमार्फत ही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आज (दि.२७) त्यांनी नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.
डॉ. बुचडे यांना शिक्षण, संशोधन व प्रशासन क्षेत्रातील ३२ वर्षांचा अनुभव असून त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. पी.एचडी. साठी ते मार्गदर्शकही आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स अभ्यास मंडळाचे प्रमुख म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले आहे.
डॉ. बुचडे सन १९८६ पासून मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कार्यरत असून २००० सालापासून ते इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख आहेत. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून सध्या ते जबाबदारी सांभाळत होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री. अभय क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. मा. अभय क्षीरसागर हे व्यवसायाने सनदी लेखापाल आहेत. ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे ते गेली १० वर्षे सदस्य असून संस्थेच्या विविध समित्यांमध्ये कार्यरत आहेत. तसेच संस्थेला व संस्थेच्या विविध शाखांना त्यांचे अर्थविषयक मार्गदर्शन लाभत आहे.
संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील ‘सर्क्युलर बिल्डिंग’च्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमीपूजन व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मंगळवार, दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. यशवंत वाघमारे, श्री. प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य श्री. प्रल्हाद राठी, ॲड. धनंजय खुर्जेकर, डाॅ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आनंद लेले, सदस्य व आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. बी. बुचडे,डाॅ. अतुल कुलकर्णी, प्रा. सुधीर भोसले, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. विनय चाटी, प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन अंबर्डेकर, प्रबंधक नीलकंठ मांडके, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे उपप्राचार्या डाॅ. सुनिता भागवत, डाॅ. सोनावणे, प्रबंधक किसन साबळे उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सुधारित बोधचिन्हाचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मंगळवार, दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. यशवंत वाघमारे, श्री. प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य श्री. प्रल्हाद राठी, ॲड. धनंजय खुर्जेकर, डाॅ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आनंद लेले, सदस्य व आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. बी. बुचडे,डाॅ. अतुल कुलकर्णी, प्रा. सुधीर भोसले, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. विनय चाटी, ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अंबर्डेकर, प्रबंधक नीलकंठ मांडके उपस्थित होते.
गरवारे वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे यांनी केले. ‘बोधचिन्हांना संस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्व असते. त्यावरुनच संस्थेची ओळख ठरते. उद्दीष्ट्ये समजतात. सशस्त्र सेनांमध्येही बोधचिन्ह अतिशय मानाने सांगितले जाते,’ असे विचार एअरमार्शल गोखले यांनी व्यक्त केले. नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळाच्या सदस्य, तसेच गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डाॅ. केतकी मोडक यांनी संस्थेच्या बोधचिन्हाचा इतिहास आणि नव्या बोधचिन्हाची संकल्पना या विषयी माहिती दिली.
मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता, पुणे ४ या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय खर्चासाठीच्या निधी संकलनासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दि. १९ एप्रिल २०१९ रोजी मयूर कॉलनीतील मएसो सभागृहात ‘कलासंयुज’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) उपस्थित होते. यावेळी शाला समितीच्या अध्यक्ष मा. आनंदीताई पाटील, महामात्र प्रा. सुधीर भोसले, मुख्याध्यापक भाऊ बडदे व सर्व शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. माधुरी आपटे (नृत्य), सुरमणि सानिया पाटणकर (गायन), मृणाल भोंगले (चित्रकला) आणि नितीन महाबळेश्वरकर (गायन) या कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यावर क्रीडा संस्कार व्हावा या उद्देशाने म.ए.सो. क्रीडावर्धिनीतर्फे शनिवार, दि. १३ एप्रिल २०१९ ते मंगळवार, दि. ३० एप्रिल २०१९ या कालावधीत संस्थेच्या पुण्यातील शाळांबरोबरच शिरवळ, बारामती, सासवड, अहमदनगर, कळंबोली येथील शाळांमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये लंगडी, कबड्डी, मल्लखांब, खो-खो, नेमबाजी, थ्रो-बॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल. स्केटींग इत्यादी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारच्या शिबिराचे हे सलग दहावे वर्ष आहे. संस्थेच्या विविध शाखांमधील १२४९ विद्यार्थी या उन्हाळी शिबिरात सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामतीमधील मएसो कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अहमदनगरमधील मएसो रेणावीकर माध्यमिक शाळा या दोन शाळांना केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून ‘अटल टिंकरींग लॅब’ मंजूर झाल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा आणि त्यांच्यात विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, जेणे करून देशामध्ये तंत्रज्ञानात्मक सर्जनशीलतेचे वातावरण आणि संस्कृती विकसित व्हावी, हा ‘अटल टिंकरींग लॅब’चा प्रमुख उद्देश आहे.
मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आणि सासवडमधील मएसो वाघीरे विद्यालय या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या तीन शाळांमध्ये यापूर्वीच ‘अटल टिंकरींग लॅब’ कार्यरत आहेत.
“भारताला गुडघे टेकायला लावणे हेच पाकिस्तानचे ध्येय आहे, त्यामुळे सातत्याने अतिरेकी हल्ले घडवून भारताला रक्तबंबाळ करण्याचे त्यांचे धोरण आहे. या अतिरेकी कारवाया पाकिस्तान पुरस्कृत आहेत. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून आपण कारवाई करू शकतो हे दाखवून देण्यासाठीच भारताने हवाईहल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत भारतातील नागरिकांनी एकजूटीने आणि खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. प्रसार माध्यमांनी आपली लक्ष्मणरेषा सांभाळली पाहिजे आणि त्याचबरोबर नागरिकांनी जनमानस अस्वस्थ होईल अशी कोणतीही कृती आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे, आपल्या आसपास काही आक्षेपार्ह घटना घडत असतील तर पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे,” असे प्रतिपादन भारतीय हवाईदलाले माजी उपप्रमुख आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन मंच यांनी ‘पाकिस्तानवरील नियंत्रित हवाईहल्ला आणि भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावर अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये हे व्याख्यान झाले. त्यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते. “भारताने शांततेसाठी सर्व प्रयत्न केले परंतु पाकिस्तानने कोणताच प्रतिसाद दिला नाही, कारण पाकिस्तानच्या लष्कराला संवाद साधण्यात कोणताच रस नाही. स्वतंत्र झाल्यानंतर ७० वर्षांपैकी ५० वर्षे पाकिस्तानात लष्कराची सत्ता आहे. जनरल मुहम्मद झिया उल हक यांच्या कार्यकाळापासून पाकिस्तानी दहशतवाद बोकाळला आहे. ५७ इस्लामी देशांचा समावेश असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन या संघटनेच्या बैठकांमध्ये वारंवार काश्मीर प्रश्नाचे रडगाणे गात आला आहे. या संघटनेच्या दि. १ व २ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत भारताला सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर पाकिस्तानाने या बैठकीवरच बहिष्कार घालण्याची धमकी दिली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडले आहे. त्यामुळे तो आता असे उद्योग करत आहे. भारताने पाकिस्तानला दिलेला व्यापारी कारणांसाठी दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा आता काढून घेतला आहे. याशिवाय भारतातून पाकिस्तानात वाहून जाणारे नद्यांचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत आपण पाकिस्तानमधील जनतेला त्रास होऊ नये असाच विचार करत आलो आहोत. पाकिस्तान मात्र कायमच दहशतवादाला प्रोत्साहन देत आला आहे. भारताच्या सीमेजवळ त्याने अतिरेक्यांचे प्रशिक्षण तळ उभारले. भारतीय हवाईदलाने नुकत्याच केलेल्या हल्ल्यात हे तळ उद्ध्वस्त केले आहेत, कोणत्याही नागरी वस्तीवर किंवा पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर हल्ला केलेला नाही.” “भारत आता देशहितासाठी बचावात्मक नाही तर आग्रही पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. भारतीय सैन्याला संरक्षण दले असे न म्हणता सशस्त्र दले असे म्हटले पाहिजे. त्यातून देशाची मानसिकता घडत असते. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचे महत्त्व खूप मोठे आहे. लढाऊ विमाने हवेत असतानाच त्यांच्यात इंधन भरता येते, त्यामुळे या विमानांची कार्यक्षमता वाढते. ५ हजार किलोमीटर अंतर मारक क्षमता असणारे अग्नीसारखे क्षेपणास्त्र आता भारताकडे आहे. याशिवाय इ.स. २०२० पर्यंत भारत हा सरासरी वय २९ असणारा जगातील सर्वात तरुण देश झालेला असेल. ही युवाशक्ती आपल्या देशाची फार मोठी ताकद आहे,” असेही ते यावेळी म्हणाले. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर विविध युद्धांच्या काळात भारताने घेतलेल्या अनेक निर्णयांचा उपापोह एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या व्याख्यानात केला. प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले. मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.
“कला ही माणसाला निसर्गातील इतर प्रणिमात्रांपासून वेगळी बनवते, कलेमुळेच माणसाचा प्रवास बाह्यरुपाकडून अंतरंगाकडे होतो. आज सर्वत्र मूल्यशिक्षणाबाबत बोलले जात आहे. कला हेच सौंदर्याचे प्रमुख मूल्य आहे. आज व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघितले जाते. पण कलेमुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य बघायला आपण शिकतो. कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यामुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य ओळखायची क्षमता निर्माण होते आणि ती जाणीव आपल्या आचरणात येते, ” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम नृत्यांगना व ज्येष्ठ गुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज (दि. १७ जानेवारी २०१९) झाले. त्यावेळी डॉ. सुचेता भिडे-चापेकर बोलत होत्या.
मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरीयममध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाच्या सदस्य व मएसो कलावर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे तसेच ‘मएसो कलावर्धिनी’तील कला मार्गदर्शक व आघाडीच्या शास्त्रीय गायिका आरती ठाकूर-कुंडलकर, ज्येष्ठ संवादिनी वादक सुयोग कुंडलकर, ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण व रश्मी देव याप्रसंगी उपस्थित होते.
‘मएसो कलावर्धिनी’त सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी शास्त्रीय संगीत, संवादिनी (हार्मोनियम), तबला यांचे तसेच सर्व शाळांमधील इ. ६ वी ते इ. ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
संगीत, अभिनय आदी ललित कलांच्या शिक्षणामुळे व्यक्तिमत्वावर अतिशय सकारात्मक आणि दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे कोणत्याही कलेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘मएसो कलावर्धिनी’ची स्थापना केली असल्याचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
‘मएसो कलावर्धिनी’त तीन महिन्यांच्या अभिनय प्रशिक्षण वर्गात आठवड्यातून दोन दिवस दोन-दोन तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून कलेची आवड जोपासायला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच मदत होईल असे योगेश सोमण यांनी यावेळी सांगितले.
आरती ठाकूर-कुंडलकर कलेच्या प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगताना म्हणाल्या की, संगीत हे स्वतःच्या आनंदासाठी शिकले पाहिजे. अल्प कालावधीत कलेची तोंडओळख होते आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू होतो. कलेचे रसग्रहण शिकल्यामुळे कलाकाराबरोबरच उत्तम रसिकही घडतात.
मएसो कलावर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी, ‘मएसो कलावर्धिनी’त कालांतराने नृत्य, शिल्प, चित्र आदी कलांचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार असल्याची माहिती आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात दिली.
मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील शिक्षिका सौ. श्रुती जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आरती ठाकूर-कुंडलकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी तर संजय देशपांडे यांनी तबल्यावर साथ केली.
“ स्वामी विवेकानंद म्हणायचे त्याप्रमाणे आज चारित्र्य घडविणारे शिक्षण हवे आहे, त्यासाठी नैतिक, आध्यात्मिक व मानवी मूल्यांचा समावेश शिक्षणात असण्याची आवश्यकता आहे आणि ही मूल्य आचरणात आणली तर आपला देश निश्चित महान होईल,” असा विश्वास पुण्याच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ आयोजित करण्यात येतो. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (दि. १२ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या वेळी आयर्नमॅन खेळाडू अनिरुद्ध तोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, म.ए.सो. क्रीडा वर्धिनीचे अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, म.ए.सो. क्रीडा वर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले उपस्थित होते.
स्वामी श्रीकांतानंद पुढे म्हणाले की, “महान होण्यासाठी आत्मविश्वास, सेवेचा भाव आणि सत्याचे पालन करण्याची वृत्ती यांची आवश्यकता असते. स्वतःवर आणि देवावर विश्वास असेल तर आपण कोणतेही महान कार्य करू शकतो. जे इतरांसाठी जगतात ते खरे जिवंत असतात असे स्वामी विवेकानंद म्हणत. त्यांचे विचार ऐकून भगिनी निवेदितांनी आपले जीवन भारतासाठी समर्पित केले. दुर्दैवाने परकीयांना जे कळते ते आजही आपल्या लक्षात येत नाही. आज आपल्या देशामध्ये खूप जणांना सेवेची गरज आहे. सत्य कोणापुढेही मान तुकवायला तयार नसते, जो समाज सत्याचे पालन करत नाही तो समाज नष्ट होतो. स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर सत्याचीच कास धरली आणि त्याच सत्याने त्यांना महान बनवले. त्यांनी वाणीच्या आधारेच जग जिंकले. आपल्या जीभेवर सरस्वतीचा वास असतो, त्यामुळे आपण बोलण्यातून लोकांची मने जिंकायची असतात, दुखवायची नसतात. त्यासाठी चांगले साहित्य वाचले पाहिजे व चांगला विचार केला पाहिजे. तुमच्यामध्ये सर्व शक्ती विद्यमान आहेत, त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य करू शकता, स्वतःला दुबळे समजू नका असे स्वामी विवेकानंद म्हणत असत आणि हेच यशाचे खरे सूत्र आहे.”
प्रमुख पाहुणे अनिरुद्ध तोडकर आपल्या भाषणात म्हणाले, “मलेशियात झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत मला मिळालेले यश मी भारतीय सेनादलांना समर्पित करतो कारण त्यांनी केलेला त्याग फार मोठा आहे आणि आपण त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही यश मिळवण्यासाठी मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे असते. पालक व शिक्षकांकडून लहानपणापासून होणारे संस्कार आणि शिकवण यातूनच कोणतीही व्यक्ती मानसिकदृष्ट्या सुदृढ होते. माझ्यावर झालेल्या संस्कारातूनच मी कायम काही मूल्य जोपासत आलो आहे, त्यातून माझे विचार तयार झाले आहेत. आपल्या भोवती जेव्हा सकारात्मक व्यक्ती असतात तेव्हा सकारात्मक वृत्ती वाढते. स्पर्धेदरम्यान मनातले सकारात्मक विचार जेव्हा नकारात्मक होऊ लागत तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांच्या आधारे त्यावर मात करता आली. आयर्नमॅन स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या शारिरीक सरावाबरोबरच मनातील सकारात्मक विचारांच्या आधारे मला यश मिळू शकले.”
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात युवा चेतना दिन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शिरवळ, सासवड, बारामती आणि नगर येथील शाळांमधील ५६८ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यावेळी क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये योगासने, ढोलपथक, मल्लखांब, अरोबिक्स, लेझिम, मनोरे, वारी, गोफ विणणे, मर्दानी खेळ आदी प्रात्यक्षिकांचा समावेश होता. शालेय विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांमधून उपस्थितांना सांघिक वृत्ती, समन्वय आणि खिलाडूवृत्ती यांचे दर्शन घडले.
आपल्या विद्यालयाचा २० वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा गुरुवार, दि.२७ डिसेंबर २०१८ रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘जागर जाणिवांचा ‘ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या वातानुकूलित सभागृहात सादर करण्यात आला.
भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले.
या वेळी शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ. सौ. अर्चना कुडतरकर आणि शाळेचे महामात्र डॉ.अतुल कुलकर्णी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते. हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले.
र्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांनी केले.