‘रंगवेध’ चित्रकला प्रदर्शनातून विस्तारते कल्पनांचे क्षितिज : डॉ. माधवी मेहेंदळे
“कला ही सर्वांना जोडते. मनातील भाव चित्रांच्या माध्यमातून प्रकट करता येतात, कल्पना स्वातंत्र्याला वाव मिळाल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ‘रंगवेध’सारख्या चित्रकला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे क्षितिज विस्तारत असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण देखील होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी रेखाटलेली सामाजिक संदेश देणारी, पर्यावरण विषयक मांडणी असणारी चित्रे देखील या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळत आहेत. ‘मएसो’च्या शाळांमध्ये असलेली ‘मएसो कलावर्धिनी आर्ट वॉल’ चित्रकलेविषयी मोलाचे योगदान देत आहे,” असे मत ज्येष्ठ नेत्र शल्यविशारद व चित्रकार डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’ तर्फे आयोजित तीन दिवसीय ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनाचे डॉ. मेहेंदळे यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६) करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते. संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. ‘मएसो कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ व महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या महामात्र सौ. चित्रा नगरकर, कमांडंट एव्हीएन विंग कमांडर म. यज्ञरामन, पर्यवेक्षक व प्रदर्शनाचे समन्वयक संदीप पवार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
कासारआंबोली येथे म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांपैकी निवडक चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
समारंभाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला असते, एक शिल्प दडलेले असते. त्याला वाव देण्यासाठी ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून रंगवेध, स्वरवेध, तालवेध इ. उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. ‘रंगवेध’च्या भव्य कलादालनात सुमारे ३०० निवडक चित्रांचे प्रदर्शन साकारण्यात आले आहे.
सौ. आनंदी पाटील म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलांना चालना देण्यासाठी ‘मएसो कलावर्धिनी’ची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येकाने एक तरी कला जोपासली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी ‘रंगवेध’ या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, ‘मएसो कलावर्धिनी’ चित्रकला विषयक नवनवीन कल्पना राबवून विद्यार्थ्याच्या चित्रांचे एक उच्च दर्जाचे कलादालन उभारते हीच एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण कल्पना आहे. आपण पुन्हा एकदा चित्र काढायला शिकत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
‘मएसो कलावर्धिनी’चे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन तर चित्रकला शिक्षिका सौ. यशोदिनी कुलकर्णी यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.
तीन दिवसांच्या या प्रदर्शनात सुलेखन, फेस पेंटिंग, शिल्पकला इत्यादी विषयावर विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. ‘रंगवेध’ दि. २९ मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.


















प्रमुख पाहुणे मा. श्री. विनोद सहाय आपल्या भाषणात म्हणाले की, एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश परकीय आक्रमणांमुळे काही शतके गुलामगिरीत होता. आता २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दीष्ट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसोमर ठेवले आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिकांची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे. १४० कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेला देश विकसित होणे याचाच अर्थ जगाचा विकास होणे आहे. ही केवळ देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी नाही. आपण प्रत्येकाने त्याचे नेतृत्व केले पाहिजे कारण सामान्य माणसांच्या प्रयत्नानेच देश मोठा होते. त्यासाठी जीवनात प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. राष्ट्र सर्वप्रथम, त्यानंतर संघटना आणि त्यानंतर व्यक्ती हा प्राधान्यक्रम निश्चित केला तर विकसित भारताचे ध्येय साध्य होईल.
एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ए. एन. एम. जी. एन. एम. आणि बी.एससी. (नर्सिंग) च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण समारंभ सोमवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर व ज्येष्ठ उद्योगपती मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे होते.











महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्याचे क्रीडा राज्यमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांचा काल (गुरुवार, दि. २९ मे २०२५) सत्कार करण्यात आला. संस्थेचे सहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सचिन आंबर्डेकर यांनी मंत्रीमहोदयांना संस्थेचे बोधचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.





जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय लष्कर, असीम फाऊंडेशन आणि महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चिनार युवा केंद्रात चालवण्यात येणारा पहिला ‘फॅशन डिझाइनिंग स्कील कोर्स’ पूर्ण केलेल्या ४० विद्यार्थिनी आणि महिला प्रशिक्षणार्थींना मंगळवार, दि. ८ एप्रिल २०२५ रोजी प्रमाणपत्र देण्यात आली. वर्षभरात दोन वेळा हा कोर्स आयोजित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, ‘मएसो’च्या नियामक मंडळ सदस्य आणि मएसो आयएमसीसीच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. सौ. मानसी भाटे आणि मएसो रेणुका स्वरूप करियर कोर्सेच्या समन्वयक सौ. सारिका वाघ यांच्या हस्ते ही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या वेळी चिनार युवा केंद्राचे मार्गदर्शक मेजर अंकित शर्मा आणि असीम फाऊंडेशनच्या विश्वस्त निरूता किल्लेदार हे देखील उपस्थित होते.






कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे १९५६ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असलेले मेजर अरुण फाटक (निवृत्त) उपस्थित होते. शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळेचे महामात्र श्री. सुधीर गाडे, मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे, उपमुख्याध्यापक श्री. चंदू गवळे, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये, आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक या वेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी ध्वजाला सलामी देऊन ध्वजप्रतिज्ञा घेतली. प्रमुख पाहुण्यांसह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.सी.सी.) पथकांचे निरीक्षण केले. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले गेले. शासनाच्या सूचनेनुसार ‘तंबाखूमुक्त भारत अभियान’अंतर्गत तंबाखूमुक्तीसाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. प्रशालेतील एन.सी.सी.च्या विविध वार्षिक उपक्रमांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना फिरते चषक देऊन मेजर अरुण फाटक (निवृत्त) यांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, एरोबिक्स, पिरॅमिडस, देशभक्तीपर गीतावरील नृत्य, सायलेंट ड्रिल, घोष प्रात्यक्षिक, मल्लखांब प्रात्यक्षिक, लेझीम अशी विविध प्रात्यक्षिके सादर केली.
विभाग तसेच एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाखांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव आणि शाला समितीचे महामात्र सुधीर भोसले होते. म. ए. सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत, म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे, एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर आणि पालक संघाच्या उपाध्यक्षा सोनाली क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. म. ए. सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी घोष, सामूहिक कवायत, गट्टू मल्लखांब, देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य, मल्लखांब अशी विविध गुणवत्ता पूर्ण प्रात्यक्षिके सादर केली. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेले मल्लखांबावरील मानवी मनोरे हे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे सर्वोच्च आकर्षण ठरले.
प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनात म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची माजी विद्यार्थिनी आणि भारतीय वायूदलातील अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख या सुपरन्युमेररी ऑफिसर (Supernumerary officer) म्हणून फ्लाईट लेफ्टनंट नेपो मोईरांगथेम व फ्लाईंग ऑफिसर अभिनव घोष यांच्यासह सहभागी झाल्या होत्या. भारतीय वायूदलातील १४४ अधिकाऱ्यांच्या या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉडर्न लीडर महेंद्र सिंह यांनी केले.
या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात झालेल्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख यांच्या निवडीने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. केवळ मुलींसाठी स्वतंत्र सैनिकी शाळा सुरू करण्याचा संस्थेचा उद्देश सार्थ होत असल्याचे शाळेच्याच माजी विद्यार्थिनींच्या कर्तृत्वातून दिसून येत आहे.
“अन्न, वस्त्र व निवारा याप्रमाणे माणसांच्या जीवनात कलेचे स्थान देखील महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार लपलेला असतो, कला आत्मसात करण्यासाठी एकाग्रता महत्वाची असते, सातत्याने प्रयत्न केले तर कला साधता येते. त्यामुळे शालेय वयातच कलेचे संस्कार होणे गरजेचे असते. कलेचा संस्कार झालेला माणूस एक चांगला नागरिक होते, त्यातूनच सभ्य समाज निर्माण होतो. म्हणूनच, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांवर म.ए.सो. कलावर्धिनीच्या माध्यमातून होत असलेला कलेचा संस्कार महत्वाचा आहे,” अशा शद्बात ख्यातनाम शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आज (बुधवार, दि. २७ नोव्हेंबर २०२४) कलेचे महत्व अधोरेखित केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ या शाळेत म.ए.सो. कलावर्धिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगवेध’ चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शिल्पकार कांबळे बोलत होते. त्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ येथे दि. २७,२८ व २९ नोव्हेंबर २०२४ असे तीन दिवस ‘रंगवेध’ हे चित्रकला प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. ‘म.ए.सो. कलावर्धिनी’च्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमधील इ. १ ली ते इ. १२ वी तील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी चित्रे पाठवली होती. त्यातील निवडक ३५० चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ही माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष व एम.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील आणि ‘म.ए.सो. कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी आज (सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४) पत्रकारांशी संवाद साधताना दिली दिली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी, ‘रंगवेध’ प्रदर्शनाचे समन्वयक अनिल म्हस्के, कलाशिक्षक गोपाळ खंडाळे, पर्यवेक्षिका सौ. सुजाता टेकाडे उपस्थित होते.
“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने २०२३ सालापर्यंत क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचे ध्येय निश्चित केले होते, आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये या संकल्पाचा उल्लेखदेखील करण्यात आला होते. मात्र, संस्था २०२४ मध्येच क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास सिद्ध झाली आहे. त्यामुळे संस्थेने आता अधिक मोठे ध्येय बाळगले पाहिजे,” अशी अपेक्षा संस्थेचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज (मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर २०२४) व्यक्त केली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६४ व्या वर्धापनदिनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे संस्थेच्या कार्याची दिशा स्पष्ट करताना म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थापकांनी संस्थेची स्थापना केली, तो वारसा आपण पुढे नेत आहोत ही आनंद आणि अभिमानाची बाब आहे. १६४ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने नेहमीच कालानुरूप बदल केले आहेत. संस्थेच्या नवीन नियामक मंडळाने वर्षाच्या सुरवातीलाच एक चिंतन बैठक घेऊन त्यामध्ये काही संकल्प केले, ते पूर्ण करण्यासाठी निश्चित योजना, उपक्रम आखण्यात आली आणि त्यादृष्टीने आज आपण समाधानकारक प्रगती केली आहे. आगामी वर्षात आपल्या संस्थेचे लॉ कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल. संस्थेने क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. समाजातील सर्व घटकांना आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देताना निधीची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यादृष्टीने प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी कृतज्ञता निधी संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. राज्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या संस्थेचे कार्य आता जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील सुरू झाले आहे. संस्थेच्या कार्याचा विस्तार करत असताना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामामुळे समाधान देखील मिळते. समाजावर शिक्षणाचा परिणाम झाली की समाजाचा शिक्षणावर परिणाम झाला याचे भान बाळगले पाहिजे आणि सभ्य, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी अधिक कृतिशील होण्याची गरज आहे. देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत, त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्ये देखील सांगितली आहेत. सभ्य आणि सुसंस्कृत विद्यार्थी म्हणजेच पर्यायाने समाज घडविण्यासाठी आपण प्रत्येकाने नागरी शिष्टाचार, पर्यावरणाचे संरक्षण, कुटुंबाचे प्रबोधन, कोणाच्या मनात न्यूनगंड, वेगळेपणाची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आणि समाजातील सर्वांना सामावून घेणे ही पंचसूत्री व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. संस्थेच्या विविध शाखांमधून शिकणाऱ्या चाळीस हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत आपण पोहोचविले पाहिजेत.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि मएसो सिनिअर कॉलेज यांच्या वतीने गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यातील संगम पुलाजवळील गुन्हे अन्वेषण विभागाच्या आवारात असलेल्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे मा. सदस्य श्री. विजय भालेराव, श्री. अजय पुरोहित, मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.
