महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांनी इ. १२ वी च्या परीक्षेत मिळवलेल्या यशाची एकत्रित तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांची स्वतंत्र माहिती खालीलप्रमाणे …
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐!!!
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांनी इ. १२ वी च्या परीक्षेत मिळवलेल्या यशाची एकत्रित तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांची स्वतंत्र माहिती खालीलप्रमाणे …
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐!!!
म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली व एम.ई.एस. पब्लिक स्कूल, कळंबोली या शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि म.ए.सो. ज्ञानमंदिर प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आज (शनिवार, दि. २९ एप्रिल २०२३) रोजी सकाळी १०.३० वाजता शाळेच्या प्रांगणात पार पडला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांची विशेष उपस्थिती होती.
शाला समितीचे मा. अध्यक्ष व म. ए. सो.च्या नियामक मंडळाचे सदस्य श्री. देवदत्त भिशीकर, शाला समितीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेचे माजी महामात्र प्रा. वि. ना. शुक्ल, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ. सविता काजरेकर, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक प्रतिनिधी , विद्यार्थी प्रतिनिधी तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक, हितचिंतक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. डॉ. गोविंद कुलकर्णी व त्यांच्या सौभाग्यवती माया कुलकर्णी यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच देवी सरस्वती व संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
मा. श्री. देवदत्त भिशीकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. ते म्हणाले की, भविष्यातील विद्यार्थी संख्येचा अंदाज घेऊन शाळेसाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करण्यासाठी संस्थेने वेळीच पाऊल उचलले आहे आणि संस्था या पुढे देखील अशीच मदत करत राहील.
शाळेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. ‘देखणी ती पाऊले ध्यासपंथी चालतात’ या उक्तीनुसार शाळेमध्ये सन्माननीय पदाधिकाऱ्यांची पावले पडल्यामुळे शाळा विकासाकडे वाटचाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१९९७ साली शाळा सुरू झाली आणि तेव्हापासून शाळेचा आलेख वाढताच आहे. शाळेच्या या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणाऱ्या ‘रौप्यधारा’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आर्कि. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छां दिल्या.
मा. प्रदीप नाईक यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अवलंब करत शाळा आणखी प्रगती करेल अशी आशा व्यक्त केली.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या प्रसंगी बोलताना म्हणाले की, नवीन विद्यार्थी भरती करणे हा शाळेचा उद्देश नाही तर नवीन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व शिस्त रुजवणे हा उद्देश आहे आणि ही मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे.
आभार प्रदर्शन सौ. प्रियांका फडके यांनी तर सूत्रसंचालन सहा. शिक्षक श्री. दत्तात्रय म्हात्रे यांनी केले.
म.ए.सो. ज्ञानमंदिर शाळेतील गायक वृंदाने सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरमने या कार्यक्रमाची सांगता झाली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे
सादर करत आहे
कथामाला
सादरकर्ते : म. ए.सो.भावे प्राथमिक शाळा, पुणे
🪔🪔🪔🪔🪔🪔
📣कथा- नवनिर्मिती विज्ञानक्षेत्रातील डॉ.महेंद्रलाल सरकार यांचे योगदान
🖌️लेखन-जयंत सहस्त्रबुद्धे
🎤वाचक स्वर- रेणुका महाजन
ज्ञानाची निर्मिती, त्याची जपणूक, हस्तांतर आणि संपत्तीची निर्मिती ही उच्च शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी या ज्ञानप्रकियेत योगदान देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समाजातील जीवनमूल्ये देखील महत्वाची ठरतात, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू मा. डॉ. संजीव सोनावणे यांनी आज (सोमवार, दि. २० मार्च २०२३) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला समृद्ध शैक्षणिक परंपरा आहे. संस्थेने भविष्यात विद्यापीठ स्थापन केले तर ही संस्था शिक्षणाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांतील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि पीएच.डी. व एम.फिल. प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनावणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक होते.
संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष श्रीमती आनंदीताई पाटील आणि श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ७० गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
डॉ. सोनावणे पुढे म्हणाले की, “जास्तीत जास्त शिक्षण घेणे आणि पदवी प्राप्त करणे ही व्यक्तिमत्व विकासाची साधने आहेत. उच्च शिक्षणातून ज्ञाननिर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्ञानाची निर्मिती होत नसलेल्या शिक्षण संस्थांना उच्च शिक्षण संस्था म्हणायचे का? असा विचार करावा लागतो. ज्ञान जपून ठेवण्याची, त्याची साठवणूक करण्याची साधने काळाप्रमाणे ठरतात. प्राचीन काळी मौखिक स्वरुपात ज्ञान साठवले जात होते, नंतरच्या काळात ते मुद्रित स्वरुपात साठवले जाऊ लागले. तंत्र बदलत गेली परंतू ज्ञानाची साठवणूक होत राहिली आणि ते पुढील पिढीला उपलब्ध होत राहिले. शिकवण्याची प्रक्रिया देखील तितकीच महत्वाची आहे. सध्याच्या काळात अनेक साधने आणि माध्यमे उपलब्ध आहेत, त्यामुळे महाविद्यालयातील वर्ग हाच फक्त शिकण्याचे केंद्र राहिलेला नाही. विविध माध्यमातून मिळालेल्या या ज्ञानातून संपत्तीची निर्मिती झाली पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो, त्यामुळे उच्च शिक्षणात गुणवत्ता प्राप्त केलेल्या आपल्या विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत नेमके कोणते योगदान दिले हे उच्च शिक्षण संस्थांनी जाणून घेतले पाहिजे. ज्ञान मिळवणे जितके महत्वाचे आहे तितकेच आपले वर्तनदेखील महत्वाचे असते, आपली जीवनमूल्ये काय आहेत यावर आपले वर्तन अवलंबून असते. त्याकडे देखील सजगपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.”
संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांनी जे कष्ट घेतले, ते सार्थकी लागल्याने आजचा हा क्षण अनुभवाला येत आहे. राष्ट्रीय स्तरावर आणि सामाजिक क्षेत्रात सर्वत्र महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आजचे गुणवंत हेच संस्थेच्या भविष्यातील विद्यापीठाचे आधार ठरणार आहेत. आपला देश प्रगती करतो आहे, आत्मनिर्भरतेकडे देशाची वाटचाल सुरू आहे. त्यात संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचे योगदान अपेक्षित आहे.
डॉ. सुनीता भागवत यांनी गुणवंतांचा परिचय करून दिला.
गौरवप्राप्त गुणवंतांच्या वतीने डॉ. अजिंक्य देशपांडे, मनिषा तगारे आणि डॉ. शुभंकर पाल यांनी मनोगत व्यक्त केले.
संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलेल्या प्रस्ताविकात संस्थेच्या १६२ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच संस्थेचे विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. वर्षा तोडमल यांनी केले.
डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन केले.
मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता शाळेच्या शताद्बी पूर्तीनिमित्त आयोजन
चावडीवर दोघा भावांचा तंटा सोडवणारे पंच, गावाला जागे करणारे ‘वासुदेव’, विहीर व हातपंपावर पाणी भरणाऱ्या महिला, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, बारा बलुतेदार, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा अन् बैलगाडी हे सारे अवतरले ‘बाशिम’ गावात!
ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारे हे ‘बाशिम’ गाव डेक्कन जिमखाना परिसरात भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिरच्या प्रांगणात साकारण्यात आले आहे. शिशुनिकेतन व चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे.
मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेच्या शताब्दी पूर्ती वर्षानिमित्त हे गाव साकारण्यात आले असून दि. २७ आणि २८ फेब्रुवारी २०२३ असे दोन सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन बघता येणार आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, प्रसिद्ध गायिका आसावरी गाडगीळ यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या ‘बाशिम’ गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, पाटलांचा वाडा, कौलारू घरे, मंदिरे, चावडी, शेती व त्यासाठी अवजारे, बाजारहाट, जत्रा, बैलगाडी, गोठा, न्हावी-सुतार-कुंभार-लोहार यासारखे बारा बलुतेदारी करणारे ग्राम व्यवसाय, विविध प्रकारचा रानमेवा आहे. गावातील भजन-कीर्तन, पालखी सोहळा, लोककला व संस्कृती यांचे सादरीकरण लक्षवेधी आहे. बैलगाडीची मनसोक्त रपेट मारून झाल्यावर लहानग्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य आणि त्यांना होणारा आनंद आपल्या ग्रामीण संस्कृतीचे महत्व अधोरेखित करणारे होते.
‘बाशिम’ गाव या उपक्रमाबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता चव्हाण म्हणाल्या, “शाळेने १०१ व्या वर्षात पदार्पण केले असून, त्यानिमित्ताने वर्षभर मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्याचे एकत्रित सादरीकरण या दोन दिवसात झाले आहे. दुरून दिसणारे आणि गावाच्या अंतरंगात काय काय सामावले आहे, याचे दर्शन यातून घडते. मुलांना गाव, तेथील संस्कृती, रचना, विविध घटक यासह रानमेव्याची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमात इ. १ ली ते ४ थी या वर्गातील सर्व मुले, त्यांचे शिक्षक व पालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.”
श्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि पुण्यातील अन्य शिक्षण संस्था तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ, राष्ट्रीय मनुष्यबळ विकास नेटवर्क (पुणे) व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यात ‘एड्यू यूथ मीट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोथरूडमधील सूर्यकांत काकडे मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या छात्रांनी आणि लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या विशेष घोष पथकाने गुरूदेव श्री श्री रविशंकर यांना मानवंदना दिली. श्री श्री रविशंकर यांनी या मुलींचे कौतुक केले.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष मा. डॉ. विनय सहस्रबुद्धे, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद अर्थात ‘नॅक’चे अध्यक्ष मा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे तसेच विविध शिक्षण संस्थांच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची उंची वाढवली.
गुरूदेव श्री श्री रविशंकर यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १ लाख ५० हजार युवक, शिक्षक आणि शिक्षण संस्थांचे चालक यांना मानवी मूल्यांची जोपासना आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीचा संकल्प करण्याची शपथ दिली.
एवढ्या प्रचंड संख्येने झालेला देशाच्या इतिहासातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने लंडन, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली.
नवीन शैक्षणिक धोरणाबरोबरच आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध कोर्सेस सुरू करण्यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि अन्य शिक्षण संस्थांशी या वेळी सहमतीचा करार करण्यात आला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्वयंसेवकांसह एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थी प्रतिनिधी आणि त्यांच्या गटातील शेकडो सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे यश उंचावण्यासाठी अथक परिश्रम केले.
‘एड्यू यूथ मीट’ या कार्यक्रमातील गुरूदेव श्री श्री रविशंकर यांची उपस्थिती आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सकारात्मकतेचा अनुभव आला व मानवी मूल्यांची जोपासना आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणा मिळाली अशी प्रतिक्रिया शेकडो विद्यार्थी आणि सहभागी झालेल्या मान्यवरांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचा विकास आणि प्रगती या दिशेने टाकलेले हे एक लहानसे पाऊल असून देशभरातील शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन ‘एड्यू यूथ मीट’चे आयोजन करावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.
पुणे, दि. १७ : “ शिक्षण संस्थांनी क्रमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना भारतीय जीवनमूल्ये शिकवण्याची आवश्यकता आहे, भारत म्हणजे काय? हे विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे. भारताकडून जगाला अपेक्षा असताना जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीयतेबाबत विचार केला जात नाही ही परिस्थिती चिंताजनक आहे,” असे प्रतिपादन चेन्नईस्थित ज्येष्ठ विचारवंत, अर्थतज्ञ व सीए एस. गुरूमूर्ती यांनी आज येथे केले.
‘मएसो’चे उपाध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली
पुणे, दि. ३१ : हाडाचे शिक्षक असलेल्या, शिक्षण आणि विद्यार्थ्यांबद्दल प्रचंड आत्मीयता असलेल्या, आपल्या मार्गदर्शनाने अनेकांना यशाचा मार्ग दाखवणाऱ्या एका ज्ञान तपस्व्याला आपण मुकलो आहोत अशी भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज (मंगळवार, दि. ३१ जानेवारी २०२३) डॉ. यशवंत वाघमारे यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे यांचे शुक्रवार, दि. २७ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंड अँड करियर कोर्सेस (आयएमसीसी) मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत), उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, डॉ. वाघमारे यांची पत्नी श्रीमती अंजली व कन्या श्रीमती ऋता वाघमारे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. वाघमारे यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी तसेच शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, मएसोचे आजी-माजी पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत) या प्रसंगी म्हणाले की, डॉ. वाघमारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परिवारातील एक महत्वाचा दुवा निखळला आहे. प्रत्येकाला प्रोत्साहित करणारे, बहुआयामी, मनमिळावू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. डॉ. वाघमारे यांनी असंख्य विद्यार्थी घडवले. त्यामुळेच संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञान विषयक विविध परिषदांसाठी अनेक तज्ञांना निमंत्रित करता आले. क्वांटम फिजिक्स सारख्या विषयातील तत्वज्ञान ते सांगत असत. त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मकता होती आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांना रुची होती.
श्रीमती ऋता वाघमारे आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाल्या की, ते अतिशय सहृदयी आणि सहनशील होते. त्यांच्याबरोबर फिरायला जाणे, खरेदी करणे, बॅडमिंटन-पत्ते खेळणे, बाहेर खाणे हे सर्व काही आनंददायी असे. शिक्षण, ज्ञान हा त्यांचा ध्यास होता त्यांनी कोणतीच गोष्ट आर्थिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केली नाही. ते कायमच सकारात्मक होते. अंधाराला दोष न देता प्रकाश निर्माण केला पाहिजे अशी त्यांची शिकवण होती.
श्रीमती ऋता वाघमारे यांनी आपली कन्या उमा हिने आजोबांना वाहिलेली श्रद्धांजली यावेळी वाचून दाखवली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर याप्रसंगी बोलताना म्हणाले की, ‘मएसो’च्या निमित्ताने १२-१३ वर्षांच्या सहप्रवासात डॉ. वाघमारे संस्थेच्या वाटचालीबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करत आणि त्याचे श्रेय ते आम्हा सहकार्यांना देत असत. ते कायमच मुक्त कंठाने स्तुती करत. संस्थेच्या विविध शाखांमध्ये जात असत आणि तिथल्या शिक्षक व विद्यार्थ्यांशी त्यांचे आत्मीयतेचे संबंध असत. ते उच्चविद्याविभूषित होते, आय.आय.टी. कानपूर सारख्या प्रतिष्ठित, थोर शिक्षक व शास्त्रज्ञ घडवणाऱ्या संस्थेत काम करूनही त्यांच्यात साधेपणा होता, जगातील नामवंत व महत्वाच्या शिक्षण संस्थांमध्ये शिकवणारे डॉ. वाघमारे नेहमीच प्रेमाने व आत्मीयतेने वागत असत. अतिशय क्लिष्ट विषय साधेपणा शिकवणारे ते ज्ञानयोगी होते. आपल्यावरील प्रत्येक जबाबदारी त्यांनी तन-मन-धनपूर्वक पार पाडली त्यामुळे ते कर्मयोगी होते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियासारख्या ख्यातनाम विद्यापीठात काम करण्याची सुवर्णसंधी असताना त्यांनी देशात परत येऊन अनेक उच्चविद्याविभूषित विद्यार्थी घडवले, त्यातून त्यांची देशाबद्दलची भक्ती दिसून येते, त्यामुळे ते भक्तीयोगी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात हा एक त्रिवेणी संगमच होता. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे हीच डॉ. वाघमारे यांना श्रद्धांजली ठरेल.
आय.आय.टी. कानपूरचे माजी डायरेक्टर डॉ. संजय धांडे यांनी डॉ. वाघमारे यांना आय.आय.टी. कानपूरच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञ दिवंगत मारिया जी. मायर यांच्या समवेत असिस्टंट रिसर्च फिजिसिस्ट म्हणून १९६३ ते १९६५ या काळात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात डॉ. वाघमारे यांनी काम केले. त्यानंतर १९६६ मध्ये ते आय.आय.टी. कानपूरमध्ये रुजू झाले. डॉ. वाघमारे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. एम.एस्सी. आणि पीएच.डी. प्रमाणेच ‘जेईई’च्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. उत्तम शिक्षक म्हणून ख्यातनाम असलेले प्रो. हरिश्चंद्र वर्मा हे त्यांचेच विद्यार्थी. आय.आय.टी. कानपूरमध्ये प्रा. रमेश सिंगरू आणि प्रा. गिरीजेश मेहता हे डॉ. वाघमारे यांचे अतिशय निकटचे साहाय्यक सहकारी होते. डॉ. वाघमारे सगळ्यांबरोबर मिळूनमिसळून रहात आणि अनेकांना वेळोवेळी मदत करत. आपल्या घरी आलेल्या व्यक्तींचे ते अतिशय आपुलकीने आणि आनंदाने आदरातिथ्य करत असत. आपल्या सहकाऱ्यांशी त्यांचे वर्तन मित्रत्वाचे असायचे. विशेष म्हणजे डॉ. वाघमारे क्रिकेट अतिशय उत्तम खेळायचे.
हाडाच्या शिक्षकाला जरी आपण पारखे झालो असलो तरी त्यांची शिकवण त्यांनी मागे ठेवली आहे, त्यांच्यासारख्या ज्ञान तपस्व्याला जरी आपण मुकलो असलो तरी त्यांचे तप सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे, अशा शद्बात ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय इनामदार यांनी डॉ. वाघमारे यांना आदरांजली वाहिली.
डॉ. यशवंत वाघमारे यांचे बंधू प्रकाश वाघमारे व मेहुणे कुमार भोगले, मएसो चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक व इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्सचे जे. पी. गद्रे, मएसो चे माजी सचिव प्रा. र.वि. कुलकर्णी, सुनीलराव खेडकर, डॉ. गोविंद कुलकर्णी आदींनी डॉ. वाघमारे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
इंजि. सुधीर गाडे यांनी सूत्रसंचालन केले.
म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्वप्राथमिक विभागाच्या नवीन इमारतीचे आणि सध्याच्या माध्यमिक शाळेच्या इमारतीवरील तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाचे भूमीपूजन श्री गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर आज (बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३) संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे पूर्वप्राथमिक विभागाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मा. भूषणजी गोखले यांच्या समवेत शाळेत सिनीअर केजीमध्ये शिकणाऱ्या अनघा दुसाने, शुभम अवचिते आणि सान्वी शिरोडे या विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांची सन्मननीय उपस्थिती होती.
या प्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे सदस्य देवदत्त भिशीकर, शाला समितीचे अध्यक्ष आ.वा. कुलकर्णी, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य सुधीर भोसले, डॉ. गोविंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
सासवड, दि. २० – लंगडीच्या सामन्यात एकाच दमात जास्तीत जास्त प्रतिस्पर्ध्यांना बाद करण्याची जिद्द आणि नजरेतली भेदकता, हातात न मावणारा बॉल सांभाळत नेमका वेध घेताना लावलेला जोर, पाठलाग करणाऱ्या खेळाडूला चपळाईने चकवा देत दिलेला खोs आणि क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्सुकता अशा चैतन्यमयी वातावरणात लहानग्यांनी मएसो क्रीडा करंडक स्पर्धेतील मैदाने दणाणून गेली. लहानग्या खेळाडूंच्या आवेशपूर्ण चढायांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सत्रातील सामने आज रंगले. निमित्त होते, म.ए.सो. क्रीडा करंडक स्पर्धेच्या उद्घाटनाचे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून इ. १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी म.ए.सो. क्रीडा करंडक ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो, सूर्यनमस्कार या खेळांचा समावेश असतो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष असून या वर्षी ही स्पर्धा सासवड येथील म.ए.सो. वाघीरे विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. आज (शुक्रवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी) या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरवातीला यशराज लांडगे या राष्ट्रीय खेळाडूच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या पथकाने धावत आणलेली क्रीडा ज्योत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्य हस्ते क्रीडांगणावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेच्या ध्वजाचे अवतरण करण्यात आले. तसेच तन्मयी कोकरे या विद्यार्थिनीने उपस्थितांना क्रीडा शपथ दिली.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील व नियामक मंडळाचे उपाध्यक्ष व शाला समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, म.ए.सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, म.ए.सो. बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर, म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, लंगडी, खो-खो, डॉजबॉल या सारख्या सांघिक खेळांमधून संघभावना वाढीस लागते, त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची वृत्ती विकसित होत असल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. खेळांमुळे शारीरिक क्षमता विकसित होत असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मैदानाचा जास्तीतजास्त उपयोग करून घेतला पाहिजे. देश-विदेशातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.
बाबासाहेब शिंदे यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म.ए.सो. च्या १६२ वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा घेताना म.ए.सो. क्रीडा करंडक ही स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
दि. २२ जानेवारी २०२३ पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
विजय भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला आहेरकर यांनी केले.
.
प्रकाशझोतात पार पडणार स्पर्धा
सासवड, दि. १८ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी म. ए. सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा सासवड येथील म. ए. सो. वाघीरे हायस्कूलच्या मैदानावर शुक्रवार, दि. २० जानेवारी ते रविवार, दि. २२ जानेवारी २०२३ या काळात होणार आहे. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो, सूर्यनमस्कार या खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रकाशझोतात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष आहे.
ही माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव यांनी आज (बुधवार, दि. १८ जानेवारी २०२३ रोजी) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, म.ए.सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, म.ए.सो. बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर, म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महादेव कसगावडे यांच्या हस्ते होणार असून के. जे. इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष श्री. कल्याण जाधव हे या याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सायली केरीपले यांच्या हस्ते होणार असून बांधकाम व्यवसायिक शिरीष जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
या स्पर्धेचे यजमानपद सासवड येथील म. ए. सो. बाल विकास मंदिर या शाळेकडे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आली आहे.
शासन स्तरावर १४ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र, प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कोणतीच स्पर्धा आयोजित केली जात नाही हे लक्षात घेऊन संस्थेने सन २०११ पासून म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली.
“नरेंद्र जन्माला येतो, स्वामी विवेकानंद घडवावे लागतात. स्वामी विवेकानंदांचे जीवन निर्भयतेचे स्मरण करून देते. कुशाग्र बुद्धी, बुद्धिप्रामाण्यवाद, जगाच्या कल्याणाचा विचार, सहसंवेदना, अमोघ वक्तृत्व अशा अनेक गुणांमुळे नरेंद्र पुढे जाऊन स्वामी विवेकानंद झाले,” असे प्रतिपादन मुंबईतील सोमय्या कॉलेजचे प्राध्यापक मा. सागर म्हात्रे यांनी आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी२०२३) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कबड्डीपटू मा. शक्तीसिंग यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. देवदत्त भिशीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ, संतोष देशपांडे, ॲड. सागर नेवसे, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र श्री. सुधीर भोसले, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.
नवी मुंबईतील म.ए.सो.चे हितचिंतक, निमंत्रित, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी यावेळी मैदानी खेळ व शारिरीक प्रात्यक्षिके सादर करतात.या वर्षी पहिल्यांदाच पुणे येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमाबरोबरच नवीन पनवेल येथील मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन पनवेल येथील मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, मएसो पब्लिक स्कूल, कळंबोली मएसो ज्ञान मंदिर आणि मएसो विद्या मंदिर बेलापूर या शाखांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी
लेझीम, लाठीकाठी, ढोल पथक, ध्वज पथक, डंबेल्स, बटरफ्लाय ड्रील, फ्लॉवर ड्रील, रिंग ड्रील, ॲरोबिक्स असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
स्वामीजींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगून प्रा. म्हात्रे यांनी स्वामीजींचे तेजस्वी जीवन उलगडले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, “स्वामीजींमधील गुण आत्मसात केले तर भविष्यातील स्वामी विवेकानंद घडतील. महान विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करा. त्यांच्या विचारांतूनच तुमचाही सामान्यापासून असामान्यत्वाकडे प्रवास सुरू होईल.”
मा. शक्तीसिंग यादव यावेळी बोलताना म्हणाले, “स्वतःच्या स्वप्नांचा ध्यास घ्या. ती पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करा. खेळ, अभ्यास किंवा जे काही कराल त्यात एकाग्रता वाढवा. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठे व्हा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा आजचा हा दिवस युवा चेतना दिन तुम्हा सर्वांबरोबर साजरा करताना मला विशेष आनंद होत आहे.”
मा. देवदत्त भिशीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “स्वामी विवेकानंदांच्या विचारात व्यक्ती नव्हे तर समष्टीचा विचार होता. ते एक योद्धा संन्यासी, युगनायक होते.” स्वामीजींचे विचार आजच्या युवांपर्यंत
पोहोचण्यासाठी सर्व शाळांनी वर्षभरात स्वामीजींचे एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा असे आवाहनही मा. भिशीकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीचा आढावा घेतला व युवा चेतना दिन साजरा करण्यामागील म. ए. सो. ची भूमिका विषद केली. आपल्या देशातील विविध क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी क्रीडा प्रात्यक्षिके व शारीरिक कवायती दरवर्षी सादर केली जातात. त्यात मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे विद्यार्थ्यांमधील चेतना जागृत ठेवण्याचा हेतू पूर्ण होत आहे, असे त्यांनी सांगितले.
रायफल शूटिंग क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या फडके विद्यालयातील चि. वेदांत पाटील याने उपस्थित युवांना प्रतिज्ञा दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभाग-मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती निशा देवरे यांनी केले.
डॉ. संतोष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
म. ए. सो. पब्लिक स्कूल कळंबोली या शाळेतील विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् सादर केले.
पद्मभूषण डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना ११९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आज (बुधवार, दि. २१ डिसेंबर २०२२) आदरांजली अर्पण करण्यात आली. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन.एस उमराणी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. गौतमी पवार, उपप्राचार्या डॉ. सुनीता भागवत, मएसो कला व वाणिज्य रात्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल कुलकर्णी आणि मएसोचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तत्पूर्वी मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील सौ. विमलाबाई गरवारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. विजय भालेराव, मएसोचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानिमित्ताने मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कॉमर्स असोसिएशन, इकॉनॉमिक्स असोसिएशन, बिझनेस लॅब आणि इआयएस सेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध अभ्यासशाखांच्या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि मएसो कॉलेज ऑफ कॉमर्समधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गरवारे ट्रस्टच्या वतीने पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी आर्कि. मा. राजीव सहस्रबुद्धे, गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, महाविद्यालय सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन.एस उमराणी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. गौतमी पवार, मएसोचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशनच्या प्रोग्रॅम डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख व सल्लागार मा. संजीव मेहता या कार्यक्रमात आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.
सृष्टी जगताप (टी.वाय.बी.ए.), प्रज्ञा फडतरे (टी.वाय.बी.एस्ससी.- स्टॅटिस्टीक्स), स्वराली गोगटे (टी.वाय.बी.एस्ससी. – झूलॉजी), सुरभी भावे (बी.कॉम.), सोहम करंदीकर (इ. १२ वी – सायन्स), प्राजक्ता मुजुमदार (इ. १२ वी – आर्ट्स) आणि भैरवी आपटे (इ. १२ वी – कॉमर्स) या विद्यार्थ्यांचा मा. रामदास भगत, आर्कि. मा. राजीव सहस्रबुद्धे आणि मा. देवदत्त भिशीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मभूषण डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर प्रा. डॉ. आशा खिलारे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयात चालवण्यात येणारे विविध उपक्रम, स्पर्धा आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रोत्साहन याबाबत माहिती दिली. त्यानंतर मा. रामदास भगत यांच्या हस्ते ‘इआयएस सेल’ च्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी ईशा बारगजे हीने या लोगोमागील संकल्पना विशद केली.
मा. संजीव मेहता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उद्योजकता आणि त्याचे महत्व समजावून सांगितले. ते म्हणाले, उद्योजक होण्याचा कोणतेही गुप्त सूत्र नाही, उद्योजक होण्यासाठी कोणतीच वेळी लवकरची नसते किंवा कधीच उशीर झालेला नसतो. उद्योगातील अपयशाची भीति कधीच बाळगू नये कारण त्यातूनच शिकायला मिळते, अकार्यक्षम व्यवस्था किंवा रचनेबद्दल मनात अस्वस्थता आणि प्रचलीत गोष्टींना आव्हान यातूनच उद्योजकता घडते. आपल्या व्यवसायाच्या क्षेत्रात आधीपासूनच असंख्य कंपन्या असल्याने आपल्याला यश मिळेल का? असा विचार कधीच करू नये. कारण नव्या संकल्पना घेऊन आलेल्या कंपन्या यशस्वी होत असल्याचे दिसते. अमेझॉनसारख्या कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसलेली कंपनी यशस्वी ठरल्याचे आपण बघतो. अस्वस्थतेतून नव्याचा शोध, कौशल्य अशा गुणांच्या आधारे यश मिळवता येते. २१ वे शतक भारताचे शतक असल्याचे जगभर मानले जाते. देशांतर्गत प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अर्थपुरवठा हा स्टार्टअपसमोरचा अतिशय लहानसा प्रश्न आहे. खरे आव्हान आहे ते कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे. प्रत्येक विद्यापीठात स्टार्टअपसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जात आहे. फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे.
मा. रामदास भगत यांनी आपल्या भाषणात पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. ते म्हणाले, घरातील परिस्थिती बेताची असलेल्या आबासाहेब गरवारे यांनी आपल्या अफाट कष्टातून सुरू केलेले उद्योग-व्यवसाय यशस्वी करून दाखवले. महाराष्ट्रातील अग्रगण्य उद्योगपती असा नावलौकिक मिळवला. आपल्या उद्योगातून त्यांनी जगाला प्लॅस्टिक उत्पादन उपलब्ध करून दिले. या सर्व प्रवासात त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या सहकार्यांना दिले. महात्मा गांधीजींच्या विचारातील विश्वस्ताची कल्पना वास्तवात आणली. आबासाहेब गरवारे यांनी ७५ धर्मादाय संस्थांच्या स्थापनेत पुढाकार घेतला. शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील संस्थांना भरघोस आर्थिक पाठबळ दिले. त्यांचे चिरंजीव डॉ. शशिकांत गरवारे आणि त्यांच्या कन्या मोनिका, सरिता आणि सोनिया हे डॉ. आबासाहेब गरवारे यांचा वारसा अतिशय समर्थपणे पुढे चालवत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री पवार यांनी तर आभार प्रदर्शन सायली ढमढेरे यांनी केले.
सासवड, दि. १० : “ प्रदीर्घ परंपरा आणि इतिहास असलेल्या सासवडमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने वाघीरे विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचा पाया रचला. शिक्षणासाठी आजदेखील अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना ८ ते १० किलोमीटर लांब जावे लागते, १९०६ मध्ये वाघीरे विद्यालय सुरू करताना संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी घेतलेले कष्ट खूप मोलाचे आहेत. या शाळेने दर्जेदार शिक्षणाद्वारे उज्जवल व्यक्तिमत्वाचे असंख्य नामवंत विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थीदशेत असताना अशा या शाळेत शिकणाऱ्या मित्रांचा हेवा वाटायचा”, अशा शद्बात पुरंदर-हवेली मतदार संघाचे आमदार मा. संजय जगताप यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा गौरव केला.
म.ए.सो. वाघीरे विद्यालयातील सभागृहाचे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे सभागृह असे नामकरण आमदार जगताप यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. १० डिसेंबर २०२२) करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष मा. विजय कोलते यांच्या पुढाकारातून शाळेतील सभागृहाचे नामकरण करण्यात आले आहे. मा. विजय कोलते आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब भोसले, शाळेचे महामात्र श्री. सुधीर भोसले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आणि शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ व्यासपीठावर उपस्थित होते.
“वाघीरे विद्यालयाचा परिसर आता व्यापारी भाग झाला आहे. त्याचा विचार करून सासवडचा विकास करण्यात येत आहे. विकास आराखड्यात वाघीरे विद्यालयासाठीच्या विस्तारित जागेची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अपेक्षा आम्ही सासवडकर म्हणून पूर्ण करू, संस्थेने त्यादृष्टीने नगरपालिकेला प्रस्ताव द्यावा,” असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.
मा. विजय कोलते यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आचार्य अत्रे यांचे कर्तृत्व जगभरात पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती आपल्या भाषणात दिली. ते म्हणाले की, ब्रिटीश कवि, नाटककार, अभिनेता विल्यम शेक्सपिअर यांच्या स्ट्रॅटफोर्ड या जन्मगावी त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक ठिकाणे हेच त्यांचे स्मारक आहे. शेक्सपिअरच्या स्मारकासारखेच आचार्य अत्रे यांचे भव्यस्मारक उभारण्याचे आम्ही ठरवले आहे. ब्रिटीश असल्याने शेक्सपिअर याचे नांव जगभर झाले. मात्र, चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आचार्य अत्रे मराठी असल्याने ते जगाला माहीत झाले नाहीत. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, ग्रंथालय यांना त्यांचे नांव देण्यात आले आहे, त्यांच्या नावाने प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कार देखील दिले जाता. मुंबईत वरळी येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी शासनाने मुख्यमंत्री निधीतून केलेले अर्थसहाय्य आणि प्रत्येक शिक्षकांने दिलेला प्रत्येकी पाच रुपये निधी अशा माध्यमातून प्रतिष्ठानकडे मोठा निधी जमा झाला आहे. पण आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे शिक्षण ज्या शाळेत झाले त्या वाघीरे विद्यालयात त्यांच्या नावाचे एक सभागृह असणे ही खूप महत्वाची आणि आनंदाची बाब आहे. त्याबद्दल मी प्रतिष्ठानतर्फे शाळेला आणि संस्थेला धन्यवाद देतो.
एअर मार्शल भूषण गोखले यावेळी बोलताना म्हणाले की, शक्ती आणि भक्तीचा संगम असल्याने पुरंदरचे नाव मोठे आहे. अशा गावात असलेल्या आमच्या संस्थेच्या वाघीरे विद्यालयाचा आम्हाला अभिमान आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचा त्यांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. अटल टिंकरींग लॅब सारखे जिज्ञासूवृत्ती जोपासणारे विविध उपक्रम वाढविले पाहिजेत. पुढील पिढीला जिज्ञासू बनवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांना सक्षम बनविण्यात आपले आणि देशाचे हित आहे. मा. विजय कोलते यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतार्य अत्रे यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशी विनोदी विषयांवरील निबंध स्पर्धा आयोजित करावी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी त्यासाठी निश्चितच सहकार्य करेल. सर्वांचे लाडके आमदार असलेले मा. संजय जगताप पाय जमीनीवर असलेले नेते आहेत. पुरंदर परिसराचा विकास करण्याची त्यांची तळमळ पुरंदर विमानतळासाठी ते घेत असलेल्या पुढाकारातून दिसून येते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला आपल्या प्रास्ताविकात वाघीरे विद्यालय आणि सासवड यांच्यातील ऋणानुबंध उलगडले. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने १६२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने पुण्याबाहेर आपल्या कार्याचा विस्तार करताना १९०६ साली सासवडमध्ये शाळा सुरू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हाच हेतू त्यामागे होता. तेव्हापासून शाळेने दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. त्यामध्ये संस्थेप्रमाणेच सासवडमधील नागरीकांचादेखील मोठा सहभाग आहे. संस्थेने अतिशय परिश्रमपूर्वक ही शाळा सुरू केली. नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली. ही शाळा सुरू व्हावी, तिचा विस्तार व्हावा यासाठी सासवडमधील विविध लोकांनी मदत केली. निधीसंकलन आणि लोकाश्रयातून शाळा उभी राहिली. शिक्षण संस्थेला अर्थसहाय्य देण्याचा प्रघात नसताना नगरपालिकेने शाळेला वार्षिक १५० रुपये अनुदान सुरू केले. पुढील काळात त्यात वाढ करून वार्षिक ७०० रुपये अनुदान मिळू लागले. परिणामी शाळेला चांगले मुख्याध्यापक मिळत गेले, शाळेतील संस्कारांमधून चांगले विद्यार्थी घडत गेले. या शाळेने देशाला वि. म. तारकुंडे यांच्या रुपाने सरन्यायाधीश, डॉ. राम ताकवले यांच्यासारखे तीन कुलगुरू अशी अनेक नररत्ने दिली आहेत. चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तीमत्वाचे आचार्य अत्रे हे याच शाळेचे माजी विद्यार्थी होते. त्यांची आठवण राहावी यासाठी शाळेतील सभागृहाला त्यांचे नाव देण्यात येत आहे. वाघीरे विद्यालयाच्या परिसरातील प्राथमिक शाळेचे नूतनीकरण करून त्या जागेत आचार्य अत्रे यांच्या नावाने एक भव्य सभागृह उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी नगरपालिकेने सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे.
ऐश्वर्या कामठे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातील ईशस्तवन आणि शेवटी वंदेमातरम सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक प्रमोद ठुबे यांनी तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांनी केले.
म.ए.सो.‘स्वरवेध’ गायन स्पर्धा : विद्यार्थ्यांना मान्यवर कलाकारांचा सल्ला
“अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची कास धरा, एकदा पाया पक्का झाला की कोणत्याही प्रकारचे संगीत आत्मसात करता येईल. स्पर्धेमुळे संगीतात आपली प्रगती होते आणि संगीतामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असल्याने एक चांगला माणूस घडतो, म्हणूनच सूरांचा ध्यास घ्या. त्याचबरोबरच शिक्षण देखील तितकेच महत्वाचे आहे,” असा सल्ला शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी आज (बुधवार, दि. ३० नोव्हेंबर २०२२) विद्यार्थी स्पर्धकांना दिला. निमित्त होते, म.ए.सो.च्या ‘स्वरवेध’ या गायन स्पर्धेचे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे म.ए.सो. कलावर्धिनी आणि म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये संस्थेच्या सहा जिल्ह्यातील विविध शाळांमधून निवड झालेल्या इ. ५ वी ते १२ वी मधील ७२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तीन गटात प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिके विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कोथरूडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरीअममध्ये आज (बुधवार, दि. ३० नोव्हेंबर २०२२) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी तर संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सानिया पाटणकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी संगीतातील गुरुंचे महत्व, पालकांचा पाठिंबा, तंत्रज्ञानाचा समर्पक वापर, संगीताबरोबरच शिक्षणाचे महत्व आणि वैयक्तिक आरोग्य याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून महावीर बागवडे, शुभांगी मांडे आणि गौरी जोशी यांनी काम पाहिले.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सानिया पाटणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळ सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे, म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य सुधीर भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.
दरम्यान, आज सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे हे होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील, नियामक मंडळ सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे, म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.
स्पर्धकांना मार्गदर्शन करताना प्रियदर्शिनी कुलकर्णी म्हणाल्या की, स्पर्धा म्हटले की इर्षा, जिद्द अशा दृष्टीने विचार केला जातो. परंतु, संगीत क्षेत्रात सादरीकरण हा सांगितीक जडणघडणीचा भाग असतो. श्रोत्यांसमोर आपली कला सादर करण्यासाठीचा धिटपणा कलाकाराच्या मेहनतीमधूनच येतो. कलाकार आपल्या सादरीकरणातून श्रोत्यांपर्यंत आपली कला पोहोचवतो आणि श्रोते ती ग्रहण करतात. ही समजून घेण्याची प्रक्रिया आहे. कलाकार आणि श्रोते यांच्यात एक संवाद स्थापित होतो. हा संवाद जो कलाकार प्रभावीपणे साधू शकतो तो स्पर्धा जिंकतो. स्पर्धेत यश न मिळालेल्या कलाकारांना अधिक मेहनतीची गरज लक्षात येते.
डॉ. माधवी मेहेंदळे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ‘स्वरवेध’स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.
आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या प्रसंगी संस्थेच्या वतीने नुकत्याच सादर करण्यात आलेल्या ‘वज्रमूठ’या महानाट्याच्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या युट्यूब चॅनेलवर https://youtu.be/96fZ033rPEM या लिंकद्वारे बघण्यासाठी ती सर्वांना उपलब्ध आहे. या महानाट्यामध्ये संस्थेच्या शाळा-महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी संस्थेची स्थापना करताना आरंभीच्या वर्षांमध्ये कोणत्या अडचणींना तोंड दिले, कोणत्या प्रकारे त्यांनी त्याग केला हे या महानाट्यातून मांडण्यात आले आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रीति धोपाटे यांनी केले तर आदित्य देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.
समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहल उपाध्ये यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्नाली देशपांडे यांनी केले.
स्पर्धेच्या दिवसभरातील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिक्षक अजय धुमाळ यांनी केले.
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि हाडाचे शिक्षक असलेले वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या रुपाने एकत्र आलेल्या शक्ती, बुद्धी आणि युक्तीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना. ब्रिटिश सत्तेकडून देशाची आणि देशबांधवांची होणारी अवहेलना, होणारा अपमान याच्या विरोधात एकत्र येऊन शिक्षणाबरोबरच स्वावलंबन, इंग्रजी व लॅटिन भाषेबरोबर संस्कृत, भूगोलाबरोबर आपला दैदिप्यमान इतिहास, संस्कारांद्वारे संस्कृतीचा पुरस्कार करण्याच्या निश्चयाने स्थापन झालेल्या शिक्षण संस्थेचा इतिहास आज (रविवार, दि. २० नोव्हेंबर २०२२) सर्वांसमोर भव्य-दिव्य स्वरुपात सादर झाला, वज्रमूठ या महानाट्याद्वारे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या संस्थापकांना आदरांजली वाहण्यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सादर करण्यात आलेल्या या महानाट्याला शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी साकारलेले हे महानाट्य सर्वांच्याच काळजाचा ठाव घेणारे ठरले.
ब्रिटिश सत्तेचा रोष आणि उपद्रव, आर्थिक अडचणी, समाजाकडून हेटाळणी अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा सुरू राहाव्यात म्हणून संस्थेच्या संस्थापकांनी केलेला असीम त्याग, कष्ट आणि संघर्ष यांची माहिती नव्या पिढीला या महानाट्यातून झाली. तसेच सुमारे दीडशे वर्षापूर्वीच्या काळातील घरांची रचना, माणसांचे पेहराव, तेंव्हाच्या चालीरिती, सण साजरे करायच्या पद्धती या सर्व गोष्टी माहिती झाल्या.
संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी सदस्य भालचंद्र पुरंदरे यांनी लिहिलेली या महानाट्याची संहिता मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा माजी विद्यार्थी अभिषेक शाळू याने तितक्याच ताकदीने रंगमंचावर साकारली आहे. होनराज मावळे याचे संगीत, महेश लिमये आणि तेजस देवधर यांचे ध्वनी संयोजन व प्रकाश व्यवस्था अशा सर्वच अंगाने कसदार निर्मिती असलेल्या या महानाट्यातून इतिहासातील घटना प्रेक्षकांसमोर जीवंत झाल्या.
या महानाट्याच्या कार्यक्रमाला जागतिक किर्तीच्या नृत्यांगना व संस्थेच्या माजी विद्यार्थिनी मनिषाताई साठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील व उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने परंपरा आणि नवता यांची चांगली सांगड घातली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या मूलभूत विषयांबरोबरच संस्थेने कालसुसंगत अशा विविध विषयांचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे याचा माजी विद्यार्थिनी म्हणून खूप अभिमान वाटतो. ‘मएसो’ने दिलेल्या शिकवणुकीतून प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मभान यावे अशी माझी इच्छा आहे,” अशा शद्बात मनिषाताई साठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वंशज, कै. वामन प्रभाकर भावे यांचे पणतू मंगेश भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांचे नातू दिलीप इंदापूरकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आनंदीताई पाटील यांनी या महानाट्याच्या निर्मितीमागील भूमिका आणि प्रक्रिया विषद केली.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची वाटचाल ही ध्येय, त्याग आणि बलिदानाची असून वारकऱ्यांच्या दिंडीप्रमाणेच संस्थेचे शिक्षक गेली १६२ वर्षे ‘मएसो’ची ज्ञानदिंडी वाहून नेत आहेत, असे सांगितले.
डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन तर इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना प्रयोगाद्वारे होणार सोप्या
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमधील लेफ्टनंट कर्नल कै. सुहास गोगटे विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळा श्रीमती गोगटे यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. १२ नोव्हेंबर २०२२) पार पडला.
११ नोव्हेंबर – राष्ट्रीय शिक्षण दिवस, १४ नोव्हेंबर – बाल दिन व १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन, या दिवसांचे औचित्य साधून म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने विज्ञान आठवडा आयोजित केला आहे, याची सुरुवात विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेच्या हस्तांतरण सोहळ्याने झाली. प्रयोगशाळेमधील ३-डी प्रिंटर च्या साह्याने तयार करण्यात आलेल्या समया मोबाईल ॲपद्वारे प्रज्वलित करून अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. श्रीमती गोगटे यांनी पती लेफ्टनंट कर्नल कै. सुहास गोगटे यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून ही प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे.
विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेचा फायदा सैनिकी शाळेतील छात्रांबरोबरच प्रशालेच्या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार असून विज्ञानातील संकल्पना त्यांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे समजून घेता येणार आहेत. कृतिशील सहभागातून ही प्रयोगशाळा शैक्षणिक क्षेत्रातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मैलाचा दगड ठरेल, याच्या वापरातून विद्यार्थिनींनी मूलभूत संकलनांचा अभ्यास करावा व यशाची शिखरे सर करावीत अशी अपेक्षा प्रमुख अतिथी श्रीमती गोगटे यांनी या वेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्त्रबुद्धे, शाळा समितीच्या मा. अध्यक्षा डॉ. माधवी मेहंदळे, शाळा समितीच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुळशी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल कु़भार, सचिव श्री.सतीश शिंदे, प्रशालाचे कमांडंट म. यज्ञरामण, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे व श्री. संदीप पवार तसेच शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे सदस्य श्री. सागर दळवी, तसेच कॅ. वैद्य उपस्थित होते.
या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी सैनिकी शाळेच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती मंजिरी पाटील व संपूर्ण विज्ञान विभागाने कॅम्पस डायरेक्टर श्रीमती गीतांजली बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये यावर्षी ‘सामाजिक भोंडला’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. मुलगा-मुलगी कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकत्रितपणे या भोंडल्यात सहभागी व्हावे आणि शाळेशी संबंधित सर्व घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे महत्व समजावे म्हणून भोंडल्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर करण्यात आला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून भोंडल्यासाठी हत्तीची प्रतिमा तयार केली. भोंडल्याच्या सुरवातील सर्वांना भोंडल्याची परंपरा व इतिहास सांगण्यात आला. त्यांनतर हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून सर्वांनी भोंडल्याची अनेक गाणी गायली. भोंडल्यासाठी निवडलेली ही गाणी विविध सामाजिक संदेश देणारी होती. सर्वांनी भोंडल्याचा मनसोक्त आनंद लुटून खिरापतीचा आस्वाद घेतला. भोंडल्याच्या कार्यक्रमामुळे शाळांची मैदाने फुलून गेली होती. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबरच शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी या सामाजिक भोंडल्याच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुणे, बारामती, सासवड, शिरवळ, नगर, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी असलेल्या सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम अतिशय आनंदात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक भोंडल्यामध्ये प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि विद्यमान नगरसेविका मा. माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी ‘एक झाड लावू बाई, दोन झाड लावू’ हे पर्यावरण पूरक गीत मोठ्या आनंदाने गायिले. प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व नेत्रतज्ञ डॉ. गीतांजली शर्मा या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या महाभोंडल्यात सहभागी होता आले याबद्दल प्रशालेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक भोंडल्यात माजी विद्यार्थ्यांबरोबरच सहभागी झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी देखील भोंडल्यात प्रत्यक्ष फेर धरला आणि आनंद घेतला. सामाजिक कार्य करणारे आणि शाळेला सहकार्य करणारे कर्मचारी, अधिकारी, कार्यकर्ते, यांचा यावेळी सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
म. ए. सो. रेणुका स्वरुप प्रशालेमध्ये माजी विद्यार्थिनींच्या हस्ते भोंडल्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गजराजाच्या प्रतिमेभोवती फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणत सर्वांनी भोंडला साजरा केला. सामाजिक जाणीवांचाही जागर व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रशालेतून १९८१ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या तुकडीपासून नुकत्याच बाहेर पडलेल्या विद्यार्थिनी देखील आवर्जून सहभागी झाल्या होत्या. शाळेच्या आजी-माजी शिक्षिका, कर्मचारी देखील या भोंडल्यात सहभागी झाल्या होत्या.
म. ए. सो. मुलांचे विद्यालयातील सामाजिक भोंडल्याला २५० विद्यार्थी, माजी विद्यार्थी-शिक्षक, पालक आवर्जून उपस्थित होते.
म. ए. सो. पूर्व-प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ या शाळेत माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा भोंडला आयोजित करण्यात आला होता. माजी विद्यार्थ्यांना त्यांचे बालपण परत अनुभवता यावे म्हणून शाळा विविध फुलांनी सजवण्यात आली होती. सर्वांनी गप्पा – गोष्टींमधून पूर्वस्मृतींना उजाळा दिला.
म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मा. खासदार श्री.प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन प्रा. ए. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते बुधवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आले. खासदार श्री. प्रकाश जावडेकर यांनी आपल्या खासदार निधीतून ₹ १०,००,०००/- इतक्या किंमतीचे व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या निधीतून महाविद्यालयाच्या मैदानावर १३ प्रकारची साधने बसवण्यात आली आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष श्री. देवदत्त भिशीकर, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी, म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. बी. बुचडे, म. ए. सो. चे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, प्रा. शैलेश आपटे इ. मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या साधनांचा चांगला उपयोग होईल असे मत याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये शौर्य साहसी क्रीडा व सैन्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे पैलू एकाच छताखाली घडविण्याचे ठिकाण म्हणजे शौर्य शिबिर होय. पहाटे साडेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी या शिबिराचा दिवस पूर्ण होतो. यामध्ये शारीरिक कसरती, बौद्धिक कार्यक्रम आणि कलाकौशल्य यांना वाव दिला जातो.
घोडेस्वारी, धनुर्विद्या, रोप मल्लखांब, स्केटिंग ऑबस्टॅकल्स, वॉल क्लाइंबिंग, योगा याच बरोबर रांगोळी, वारली पेंटिंग, विविध तज्ञांची व्याख्याने, किल्ल्यावर सहल यासारख्या कार्यक्रमांची योजना केलेली असते.
सुट्टीच्या कालावधीत आपल्या पाल्याच्या जीवनाला आकार देण्याच्या व व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने ‘शौर्य शिबिर’ हा एक उत्तम पर्याय आपल्याला उपलब्ध आहे.
आजच आपला प्रवेश निश्चित करून आपण या शिबिराचा अनुभव घ्या… !!!
‘शौर्य शिबिरा’त सहभागी होण्यासाठी खालील लिंकवरील फॉर्म भरावा…
https://forms.gle/5ecXCDWmWsPqZyX89
पुणे : “ सातत्याने यश मिळत गेल्यास माणसामध्ये अहंकार निर्माण होतो पण ते टाळून आपल्यात विनम्रता निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत राहा” असा सल्ला पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त मा. श्री. सु. मु. बुक्के यांनी आज (गुरुवार, दि. २५ ऑगस्ट २०२२) येथे यशस्वी विद्यार्थ्यांना दिला.
मार्च २०२२ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्चमाध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मएसो ज्ञानवर्धिनी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा श्री. बुक्के यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.
या वेळी संस्थेच्या ६ जिल्ह्यांमधील २३ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ४३ विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील आणि श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. बुक्के आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे म्हणाले की, परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांवरील जबाबदारी वाढली आहे. या यशात आता उणीव निर्माण होऊन चालणार नाही. त्यासाठी यापुढे तुम्हाला तुमच्या स्वतःशीच स्पर्धा करावी लागणार आहे. कोरोना महामारीच्या काळात जग चिंताक्रांत असताना, आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अतुलनीय आहे. या विद्यार्थ्यांकडे ‘कोविड बॅच’ म्हणून नकारात्मक दृष्टिकोनातून बघणे योग्य नाही. कोरोना आपत्तीच्या काळात अनेक समस्यांना तोंड देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. “मोठेपणी मला शिक्षक व्हायचे आहे” असा निर्धार व्यक्त करणारे विद्यार्थी शिक्षकांनी घडविले आहेत. त्याचबरोबर आपल्या पाल्याला समर्थपणे साथ देणारी, पहिली शिक्षिका, न्यायाधीश असलेल्या प्रत्येक आईचा विद्यार्थ्यांच्या यशात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन करायला हवे.
समारंभाच्या प्रारंभी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढाव घेतला. व्यक्तीच्या विकासामुळे समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होत असतो, त्यामुळे संस्था विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
संस्थेच्या नियमक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील यांनी श्री. बुक्के यांचा परिचय करून दिला.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “यशस्वी विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे असते. त्यांना मिळालेले यश दिसते मात्र, त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते दिसत नाही. त्यामुळे भविष्यात कठोर परिश्रमांची तयारी ठेवा आणि आपल्या कर्तृत्वाने जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न बघा. आपली शाळा आणि संस्था यांचे नाव उज्ज्वल होईल असे काम करा.”
संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.
समारंभाचे सूत्रसंचालन वर्षदा पांढरकर यांनी केले.
पुणे, दि. १३ : संगीतातील रागरागिण्यांनी एका सूत्रात गुंफलेल्या देशाच्या सांस्कृतिक विविधतेतील एकात्मतेचे दर्शन ‘गुंजे बनकर देश राग’ या कार्यक्रमातून आज झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि मएसो कलावर्धिनी यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक आणि ज्येष्ठ गायिका सौ. अंजली मालकर यांचे गायन, पन्नास विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम गायन आणि नृत्याविष्कारातून उत्तरोत्तर रंगत गेला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, मा. आनंद कुलकर्णी, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कोथरूडमधील मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरिअममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकावून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
राजस्थान, गुजराथ, सौराष्ट्र या भागात सौराष्ट्री या नावाने प्रचलित असलेला राग कालांतराने सोरट आणि नंतर देश या नावाने ओळखला जाऊ लागला. ‘भारती सृष्टीचे सौंदर्य दाविती सकल रुप’ हे वर्षभरातल्या ऋतूंचे वर्णन करणारे काव्य असो, प्रत्येक भारतीयाच्या मनात रुंजी घालणारे आणि विविध भाषांचा समावेश असलेले ‘गुंजे बन कर देश राग’ हे गाणे असो, संत कबीरांची रचना ‘चदरिया झिनी रे झिनी’ असो, प्रार्थना म्हणून गायले जाणारे ‘गगन सदन तेजोमय’ हे गीत असो किंवा होरीच्या नृत्यातून आणि ख्याल गायनातून देश राग विविध भावना आणि संस्कार घेऊन आपल्या भेटीला येतो. त्याचा अनुभव या कार्यक्रमात सादर झालेल्या गायन आणि नृत्याविष्कारातून मिळाला.
सौ. अंजली मालकर यांनी सादर केलेली बड्या ख्यालातील ‘रे मोरा मन हर लिनो’ ही रचना तसेच विरह आणि शृंगाराचा मिलाफ असलेली ‘घन गगन घन घुमड की नो’ ही छोटा ख्यालातील बंदिश देश रागाची चंचलता सांगणारी होती.
देश रागात संगीतबद्ध केलेला ‘चतरंग को गावे रसरंगत सो’ हा नारायणी कुलकर्णी या विद्यार्थिनीने गायलेला तराणा, ईशान मोडक या विद्यार्थ्याने सादर केलेले ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘मन मंदिरा तेजाने’ हे गीत आणि कृष्णचैतन्य सराफ याने गायलेले ‘आवोनी पधारे म्हारे देस’ हे राजस्थानी लोकगीत तसेच सौ.श्रुती जोशी आणि विद्यार्थिनीनी गायलेले बैजुबावरा चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले ‘दूर कोई गाए धून ये सुनाए’ या गाण्याला उपस्थितांची विशेष दाद मिळाली.
पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांनी होरी नृत्यासाठीच्या बांधलेल्या बंदिशीवर प्रा. सुखदा दीक्षित तसेच प्रा. अबोली थत्ते आणि विद्यार्थिनींनी केलेले सादरीकरण गायन, वादन आणि नृत्य यांचा प्रभावी अविष्कार होता.
या कार्यक्रमात प्रा. आदित्य देशमुख यांनी तबला, हेमंत पोटफोडे यांनी तालवाद्य, श्रीमती निवेदिता मेहेंदळे यांनी पखवाज, ओंकार पाटणकर यांनी सिंथेसायझर आणि देवेंद्र देशपांडे यांनी हार्मोनिअमवर साथसंगत केली.
‘वंदे मातरम्’च्या सामुहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे निवेदन प्रा. रश्मी देव आणि ऋषिकेश करदोडे यांनी केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे क्रांतीदिनानिमित्त आज (मंगळवार, दि. ९ ऑगस्ट २०२२) सकाळी हुतात्मा चौकातील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी सैनिकी वेशात हुतात्म्यांना मानवंदना दिली. इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी यावेळी हुतात्मा कर्णिक यांच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली.
या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य मा. प्रल्हाद राठी, सैनिकी शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे आणि सौ. चित्रा नगरकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कमांडंट विंग कमांडर यज्ञरमण आदी मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
या प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला अनुलक्षून संस्थेने तयार केलेल्या पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींच्या मानवंदनेने वातावरण भारावून गेले होते. वर्दळीच्या ठिकाणी आणि कामाच्या गडबडीत असतानादेखील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
इतिहास अभ्यासक मोहन शेटे यावेळी बोलताना म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्यासारख्या असंख्य क्रांतिकारकांप्रती आजच्या क्रांतीदिनी कृतज्ञता व्यक्त करतानाच या स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करण्याची प्रतिज्ञा करू या! देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात निकराचा संघर्ष करण्यासाठी महात्मा गांधीजींनी १९४२ साली मुंबईत गवालिया टँक येथील सभेत ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा केली आणि “करेंगे या मरेंगे” चा नारा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध मार्गांनी आंदोलने केल्यानंतर आता जुलमी ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकण्यासाठी जोरदार धमाका केला पाहिजे या भावनेतून भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या साथीदारांनी पुण्यातील कँप परिसरात असलेल्या कॅपिटॉल आणि वेस्ट एन्ड या दोन चित्रपटगृहात दि. २४ जानेवारी १९४३ रोजी चित्रपटाचा खेळ चालू असताना रात्री ९.३० वाजता भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या पाच साथीदारांनी ६ बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ३ ब्रिटिश अधिकारी ठार झाले तर १८ जण जखमी झाले. या घटनेने ब्रिटिश सरकारला मोठा हादरा बसला. स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब देहूरोड येथील दारुगोळा कारखान्यात तयार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि पोलीसांनी भास्कर कर्णिक व त्यांच्या काही साथीदारांना अटक करून फरासखाना पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यावेळी लघुशंकेचे निमित्त करून भास्कर कर्णिक बाजूला गेले आणि तेथे खिशातली सायनाईडची पूड खाऊन आत्मार्पण केले, तो दिवस होता ३१ जानेवारी १९४३. अशाप्रकारे कॅपिटॉल बॉम्ब खटल्यातील मुख्य दुवा नाहीसा झाल्यामुळे इतर क्रांतिकारकांची नावे पोलीसांना समजू शकली नाहीत. हुतात्मा भास्कर कर्णिक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण देशाशी प्रतारणा केली नाही.”
संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकात स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याची महती विशद केली.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘आयएमसीसी’च्या नवीन इमारतीचे उद्घाटन
पुणे, २१ जुलै : भारत हा प्राचीन काळापासून ज्ञानाचे देवालय राहिले आहे. आता युवकांनी पुन्हा शिक्षक बनून जगभरात जावे आणि संपूर्ण जगाला सुसंस्कृत बनवावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांनी बुधवार, दि. २० जुलै २०२२ रोजी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस (आएमसीसी) या शाखेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होसबाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
म. ए. सो. चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील व उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, आयएमसीसीच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड. धनंजय खुर्जेकर, आयएमसीसीचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, उपसंचालिका डॉ. मानसी भाटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहायक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच रा. स्व. संघाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
श्री. होसबाळे म्हणाले की, शिक्षण संस्थांमधून देशाला नवे नेतृत्व देणारे युवक – युवती पुढे येतात. त्यामुळे अशा शिक्षण संस्थांना भेटी देण्यामध्ये विशेष आनंद होतो. जगाच्या शैक्षणिक नकाशामध्ये पुण्याला एक वेगळे स्थान आहे. पुणे हे शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून पुढे आले आहे. पुण्याचे सांस्कृतिक वातावरण समृद्ध असून येथे युवक-युवती केवळ शिक्षण घेतात असे नाही तर त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगाने परिपूर्ण होते.
भारतातील शिक्षणाबद्दल ते म्हणाले की, भारतात शिक्षणाची प्राचीन परंपरा आहे. जगभरातून येथे लोक येत असत. भारत हा ज्ञानाचे देवालय राहिले आहे. भारतात शिक्षण हे केवळ काही लोकांपुरते मर्यादित होते, असे म्हणणे हे विकृत इतिहासाचे उदाहरण आहे. आता नवीन शिक्षण धोरणाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत ही सुवर्णसंधी आहे.
व्यवस्थापनाच्या क्षेत्राबद्दल ते म्हणाले की, भारतीय शिक्षण संस्थांमधून फक्त नोकरी मागणारे विद्यार्थी घडता कामा नयेत. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला शिक्षक होऊन जावे लागेल. त्या लोकांनाही संस्कृती शिकवावी लागेल. आपल्या देशात दरवर्षी साडेतीन लाख विद्यार्थी व्यवस्थापनाची पदवी प्राप्त करतात. दुर्दैवाने त्यातील केवळ १५ टक्के विद्यार्थ्यांकडे नोकरी मिळवण्याची पात्रता असते. व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना याचा विचार करावा लागेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच भारत हा व्यवस्थापन क्षेत्रातही विशेष स्थान मिळवू शकतो. तसे सामाजिक वातावरण व विविधता आपल्याकडे आहे. आपल्या व्यवस्थापन कौशल्याने आपण एक अद्भुत विश्व निर्माण करू शकतो.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविकपर भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ वर्षांच्या देदिप्यमान वाटचालीचा आढावा घेतला. तसेच ए. आय. सी. टी. ई. ने म. ए. सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस (आयएमसीसी) मधील एम. सी. ए. अभ्यासक्रमाच्या एका जादा तुकडीला व एम. बी. ए. अभ्यासक्रमाच्या दोन जादा तुकड्यांना मान्यता दिल्यामुळे आय. एम. सी. सी. मध्ये आता ७२० विद्यार्थी संख्या झाली असल्याची माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. हा नुसताच तरुण नाही तर आकांक्षा असलेला तरुण देश आहे. त्या तरुणांच्या स्वप्नांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सर्व ते बळ देईल.
शुभदा पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचा इ. १० वी चा एकत्रित निकाल ९४.९१ % लागला आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांमधील विद्यार्थ्यांनी इ. १२ वी च्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
म.ए.सो. रेणुका स्वरुप कौशल्य विकास केंद्र, सदाशिव पेठ, पुणे
‘शासनमान्य’ कोर्सेससाठी प्रवेश सुरु… त्वरा करा, प्रवेश मर्यादित.
1. सर्टिफिकेट कोर्स इन बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण (मराठी माध्यम)
2. सर्टिफिकेट कोर्स इन प्री स्कूल टीचर ट्रेनिंग कोर्स (इंग्रजी माध्यम)
3. सर्टिफिकेट कोर्स इन ड्रेस मेकिंग
4. सर्टिफिकेट कोर्स इन स्पेशलायझेशन इन ब्लाऊज
5. सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक ब्युटी कल्चर
6. सर्टिफिकेट कोर्स इन प्रोफेशनल ब्युटी कल्चर आणि हेअर ड्रेसिंग
7. सर्टिफिकेट कोर्स इन कम्पुटराइज्ड अकाउंटिंग युजिंग टॅली
माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क – 9011059064, 9762035828, 9850064316,
Maharashtra Education Society, Pune, is organizing a Webinar Series on Career Opportunities for 10th and 12th pass students from 6th June to 11th June 2022 to apprise them about the different career opportunities after crossing the much important milestone i.e. SSC & HSC. This Webinar Series will help the students to select the right path with better understanding of conventional and nonconventional career opportunities.
The Webinar is free and open to all the 10th and 12th passed students of any stream.
Registration is compulsory. Registration form :Click Here
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,
‘मएसो भवन’, १२१४-१२१५, सदाशिव पेठ, पुणे ३०.
: होर्डिंगविषयी निविदा :
तपशील:
अनु क्र. | होर्डिंगचे ठिकाण | होर्डिंग संख्या | आकार स्क्वे.फूट (W x H) |
१ | मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, आयुर्वेद रसशाळा चौक. | १ | २०x २० |
२ | मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, महाविद्यालयाची पॅरापीट वॉल, आयुर्वेद रसशाळा चौक. | १ | २० x २० |
३ | मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, सेन्ट्रल मॉल समोरील जागा. | १ | २०x २० |
४ | मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, दाराजवळ, नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वे रोडकडे येताना. | १ | २०x २० |
५ | मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, जुन्या इमारतीवरील पॅरापीटवॉल नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वे रोडकडे येताना. | १ | ४० x २० |
६ | मएसो सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कन जिमखाना, कर्वे रोड बाजू. | २ | २०x २० |
७ | मएसो मुलांचे विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे ३०, हत्ती गणपती बाजूकडील शाळेचे आवार. | १ | २०x २० |
आपला विश्वासू,
(सचिन आंबर्डेकर)
मुख्य कार्यकारी अधिकारी,
मएसो, पुणे ३०.
——————————————————————————
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांच्या आवारात होर्डिंग लावण्यासाठी प्रस्ताव
प्रति, दिनांक: / /२०२२
मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,
‘मएसो भवन’, १२१४ – १२१५ सदाशिव पेठ, पुणे ३०.
विषय : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांच्या आवारात होर्डिंग लावण्यासाठी प्रस्ताव
विहित अर्ज
१ | प्रस्ताव देणा-या व्यक्ती अथवा संस्थेचे नाव व पूर्ण पत्ता (अर्जासोबत पॅन कार्ड, आधार कार्ड जोडावे) | |
२ | संपर्क क्रमांक –(लँडलाईन व भ्रमणध्वनी क्रमांक द्यावेत) | |
३ | संस्था किंवा फर्म इत्यादी असल्यास नोंदणीकृत असल्याबाबतची कागदपत्रे जोडली आहेत का ? | जोडली आहेत / जोडली नाहीत |
४ | पुणे महानगरपालिकेकडे नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक, नोंदणीचा दिनांक (नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची छायाप्रत सोबत जोडावी. | नोंदणी केली आहे / नोंदणीकेलेली नाही |
५ | या क्षेत्रात आपणास किती वर्षाचा अनुभव आहे. अनुभव असल्यास आपल्याद्वारा शहरामध्ये सध्या चालू असलेल्या ३-४ साईटचे फोटो जोडावेत | जोडली आहेत / जोडली नाहीत |
होर्डिंगसाठी कंत्राटदाराकडून प्रस्तावित करण्यात येत असलेली भाडे रक्कम :
अनु क्र. | ठिकाण | होर्डिंग संख्या | आकार (Wx H) | भाड्याची प्रती स्क्वे.फू. प्रस्तावित वार्षिक रक्कम |
१ | मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, आयुर्वेद रसशाळा चौक. | १ | २० x २०
| |
२ | मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, महाविद्यालयाची पॅरापीटवॉल, आयुर्वेद रसशाळा चौक. | १ | २० x २० | |
३ | मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, सेन्ट्रल मॉल समोरील जागा. | १ | २० x २० | |
४ | मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, दाराजवळ, नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वे रोड कडे येताना. | १ | २० x २० | |
५ | मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, जुन्या इमारतीवरील पॅरापीटवॉल नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वेरोड दिशेने येताना. | १ | ४० x २० | |
६ | मएसो सौ विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कनजिमखाना, कर्वे रोड. | २ | २० x २० | |
७ | मएसो मुलांचे विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे ३०, हत्ती गणपती बाजूकडील शाळेचे आवार. | १ | २० x २० |
मी निविदा तपशील पूर्णपणे वाचला असून मला समजला आहे तसेच निविदा तपशीलामध्ये दिलेल्या सर्व अटी व शर्ती मी वाचल्या आहेत व मला मान्य आहेत.
अर्जदाराचे नाव
स्वाक्षरी व शिक्का
दिनांक: / / २०२२
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. एन.एस. उमराणी यांनी आज (गुरुवार, दि. १९ मे २०२२) पुन्हा पदभार स्वीकारला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी त्यांचे स्वागत केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून निवड झाल्यामुळे डॉ. उमराणी यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा दिला होता. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी प्र-कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. काल प्र-कुलगुरू पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉ. उमराणी यांनी आज महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून पुन्हा पदभार स्वीकारला.
यापूर्वी २ मे २००८ ते १७ नोव्हेंबर २०१७ या काळात डॉ. उमराणी यांनी मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे.
महाविद्यालयात आज त्यांच्या स्वागतावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. केतकी मोडक, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.