महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे च्या नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाकरिता श्रीनिधी संकलनासाठी आयोजित करण्यात आलेल्या “मिले सुर मेरा तुम्हारा” या सुरेल कार्यक्रमात शाळेला सढळ हस्ते मदत करणा-या उद्योजक व प्रायोजकांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्त्रबुद्धे, संस्थेचे चिटणीस मा. डॉ. संतोष देशपांडे, विद्यालयाच्या शाला समितीचे अध्यक्ष ॲड. जयंत म्हाळगी, विद्यालयाचे महामात्र डॉ. आनंद लेले, मुख्याध्यापिका सौ. मानसी वैशंपायन, प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मा. निशा देवरे, पर्यवेक्षिका सौ. सोमण (मराठी माध्यम), सौ. सुषमा सप्रे (इंग्रजी माध्यमिक), सौ. तन्वी परुळेकर (इंग्रजी प्राथमिक) आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पनवेलमधील प्रसिद्ध सिनेनाट्य निर्मात्या मा. कल्पना कोठारी, इतिहास अभ्यासक मा. विश्वनाथ गोखले, योगाचार्य मा.पु. ल. भारद्वाज व जेष्ठ समाजसेविका मा. नीलाताई पटवर्धन यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेलचे आमदार मा. प्रशांत ठाकूर यांनाही यावेळी गौरविण्यात आले. हा कार्यक्रम पनवेलच्या फडके नाट्यगृहात पार पडला. यात सुवर्णा माटेगावकर, वैभव वशिष्ठ, सोनाली कर्णिक, संदीप शाह, निलेश निरगुडकर यांनी हिंदी गाणी सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. निवेदन संदीप कोकिळ यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयातील विद्यार्थिनींनी “मिले सूर मेरा तुम्हारा” या गीतावर नृत्य सादरीकरणही केले. अतिशय रंगलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.

 

“जीवनात दिशा निश्चित असेल तर कृतिशील व्यक्ती आपले ध्येय निश्चित गाठू शकतात पण त्यासाठी चांगले आणि सम्यक विचार असण्याची गरज असते. चांगले विचार, चांगले कार्य आणि चांगली माणसे आहेत म्हणूनच हे जग टिकून आहे. विचार कधीही नष्ट होत नाहीत. आपल्या ऋषिमुनींनी दिलेले विचार घेऊनच आज आपण पुढे जात आहोत. चांगला विचार मुळाशी नसेल तर चांगली कामे उभी राहात नाहीत. कार्य हे विचारांचे प्रकट रुप आहे. जेव्हा कार्य चांगले असते तेव्हाच समाजाची प्रगती होते. चांगले कार्य, चांगले विचार आणि चांगली माणसेच आपल्या संस्कृतिवरील आक्रमण रोखू शकतात. त्यासाठी समर्पणभाव खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आणि कार्य परिपूर्ण आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांच्याच स्मृती आपण जपत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन ज्यांनी समाजासाठी समर्पित केले होते अशा स्व. दामुअण्णा दाते यांचे नांव रेणावीकर प्रशालेतील या सभागृहाला देणे हे चांगले काम आहे. स्व. दामुअण्णा कर्मठ, त्यागी होते. त्यांचे नांव असलेल्या या सभागृहात लहान मुलांना चांगले विचार मिळतील आणि त्यातून त्यांच्या जीवनाला आकार मिळेल त्याबद्दल संस्थाचालकांचे मी अभिनंदन करतो,” असे प्रतिपादन पू. आदर्शऋषिजी महाराज यांनी येथे केले.
नगरमधील सावेडी येथे असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणावीकर माध्यमिक विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या वाढीव बांधकामाचे उद्घाटन आणि नूतन सभागृहाचे ‘कै. दामोदर माधव तथा दामुअण्णा दाते सभागृह’ असे नामकरण पू. आदर्शऋषिजी महाराज यांच्या हस्ते रामनवमी, मंगळवार, दि. ४ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विमुक्त भटके जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी तथा दादा इदाते, नगरमधील उद्योजक दौलतराव शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक सुरेश तथा नाना जाधव, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’चे सचिव डॉ. संतोष देशपांडे, शाला समितीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, महामात्र प्रा. सुधीर भोसले, रेणावीकर शाळेतील पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रमुख मंजुषा कुलकर्णी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाऊ बडधे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजना गायकवाड तसेच मधुकर रेणावीकर आदी मान्यवर उपस्थित होते. नगर शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विमुक्त भटके जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी तथा दादा इदाते आपल्या भाषणात म्हणाले की, “कै. दामुअण्णा दाते हे राष्ट्रवादाची परिभाषा करणारे समाजशिक्षक होते. आपल्या समाज जीवनाचे नियोजन करणारे ते आधुनिक राष्ट्रऋषि होते. आपल्या वाटचालीतील विविध टप्पे आणि पुढील मार्ग त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होता. अशा एका संन्यासाचे वर्णन आज एका ऋषिंनी आपल्यासमोर केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक या नात्याने कै. दामुअण्णांचा नगर जिल्ह्याशी दीर्घकाळ संबंध होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात अनेक विचारधारांचा संघर्ष चालू होता. साम्यवाद आणि समाजवादाचा पगडा असलेले नेतृत्व देशात होते. अशा परिस्थितीत हिंदुत्वाचा विचार मांडणे अतिशय कठीण होते. त्यातून सर्व विचारधारांना कार्यकर्ते पुरवणारा, विविध विचारधारांचा प्रयोग करणारा जिल्हा अशी नगर जिल्ह्याची ओळख होती. अशा या जिल्ह्यात संघविचारांचे सिंचन दामुअण्णांनी केले. समाजाबद्दल चिंतन, चिंता आणि कळकळ म्हणजे कै. दामुअण्णा! ते राष्ट्रीय चिंतन आणि माणूस याबाबतीत अतिशय संवेदनशील होते, या दोन्ही गोष्टी ते जिवापाड जपायचे. त्यामुळेच कार्यकर्ते उभे राहीले. त्यांच्यासारख्या समर्पित जीवनाचे, व्यक्तीचे नांव शाळेतील सभागृहाला देण्याने त्यांचा नाही तर शाळेचा आणि संस्थेचाच सन्मान झाला आहे. ज्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी हे शिक्षक परायण असतात, शिक्षक शिक्षण परायण असते, शिक्षण ज्ञान परायण आणि ज्ञान हे कर्मपरायण असते, तिथे सर्व नव्या कल्पना राबवता येतील हे राज्याचे माजी शिक्षण संचालक वि.वि. चिपळूणकर यांचे सांगणे आपण लक्षात ठेवले पाहिजे.”
नगरमधील उद्योजक आणि शेती संशोधक दौलतराव शिंदे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. ते आपल्या भाषणात म्हणाले की, “ विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या शहरात स्थापन झालेल्या आणि १५० वर्षांचा इतिहास असलेल्या शिक्षण संस्थेचा परिसस्पर्श नगरच्या शिक्षण क्षेत्राला झाला आहे. हा परिसस्पर्श नगरच्या शैक्षणिक क्षेत्राला उंचीवर घेऊन जाईल याची खात्री वाटते. पुण्याशी संबंध असलेली रेणावीकर माध्यमिक विद्यालय ही नगरमधील एकमेव शाळा आहे. त्याचा फायदा शाळेला होणार आहे, त्यासाठी शाळेचे अभिनंदन आणि संस्थेची भरभराट होऊन नगरच्या शैक्षणिक उत्कर्षात हातभार लागावा यासाठी शुभेच्छा! ”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश तथा नाना जाधव प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी कै. दामुअण्णा दाते यांच्या कार्यशैलीची माहिती दिली. “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींच्या हत्येचा ठपका ठेवून १९४८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. संघाला संपविण्याचा हेतू त्यामागे होता. त्यामुळे संघाचे काम करणे धारिष्ट्याचे होते. अशा परिस्थितीत ते नगरमध्ये प्रचारक म्हणून आले. संघाचे पूर्णवेळ काम करणे हे वेगळ्या पद्धतीने आव्हानात्मक होते कारण संघबंदीच्या पूर्वी संबंधात असलेली अनेक घरे संघासाठी बंद झाली होती. अशा घरांची दारे संघासाठी पुन्हा उघडण्याचे काम कै. दामुअण्णांनी केले. प्रत्येकाला ते आपले, आपल्या घरातीलच वाटायचे. त्यामुळे वेळप्रसंगी कार्यकर्त्यांच्या एखाद्या घरगुती प्रश्नांबाबतचा अंतिम निर्णय दामुअण्णांचाच असायचा. व्यक्तीतील गुण हेरून त्याला त्यादृष्टीने प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा अनेक विषयांचा अभ्यास होता. ते अभ्यासू वक्ते होते. सामाजिक समरसतेच्या विचारांचे प्रकटीकरण कसे करायचे यामागील चिंतन दामुअण्णांचेच होते. कै. दामुअण्णांच्या नगर जिल्ह्यातील योगदानाचे स्मरण ठेवून संस्थेने शाळेतील सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दामुअण्णा कोण होते? काय होते? हे सतत सर्वांसमोर येत राहील.”
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात म्हणाले की, “आज आपण स्वतंत्र असलो तरी १९४७ सालापर्यंत कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा लागला असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. १५० वर्षांपूर्वी दूरदृष्टीने सुरू केलेल्या आपल्या शिक्षण संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आज थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभले आहेत. यापुढे आता आपल्या संस्थेला कौशल्य विकासासाठी काम केले पाहिजे.”
“शाळेतील सभागृहाला कै. दामुअण्णा दाते यांच्यासारख्या कुशल संघटकाचे नांव आपण दिले आहे याचा सार्थ अभिमान वाटत आहे तर याप्रसंगी पू. आदर्शऋषिजी महाराज यांचे आशीर्वचन लाभले हे आपले भाग्य आहे,” अशा शद्बात शाला समितीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी केले. शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.

(छायाचित्रात डावीकडून) – राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, नाशिकच्या महापौर रंजनाताई भानसी, राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे उप-प्राचार्य अनंत कुलकर्णी, प्राचार्या पूजा जोग आणि शाळेच्या महामात्रा सौ. चित्रा नगरकर.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘आदिवासी सेवा संस्था’ पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेला मिळाला आहे. रु. 50,001/- चा धनादेश, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आदिवासी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ सन 2015-16 आणि सन 2016-17 या वर्षांसाठी शाळेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नाशिक येथील कालिदास कलामंदिरात सोमवार, दि.27 मार्च 2017 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री. विष्णु सवरा यांच्या हस्ते हा पुरस्कार शाळेला प्रदान करण्यात आला. शाळेच्या वतीने शाळेच्या महामात्रा सौ. चित्रा नगरकर, प्राचार्या पूजा जोग आणि उप-प्राचार्य श्री.अनंत कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री.विष्णु सवरा हे होते. राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री मा. श्री.दादाजी भुसे, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मा. मनिषा वर्मा तसेच नाशिकच्या महापौर मा. रंजनाताई भानसी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील 16 व्यक्ती आणि 7 संस्थाना ‘आदिवासी सेवक’ आणि ‘आदिवासी सेवा संस्था’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे, दि. २६ – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाच्या विकास आणि विस्तारासाठी कोलकाता येथील उद्योजक कै. अण्णासाहेब कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कुलकर्णी परिवाराने भरघोस अर्थसहाय्य केले आहे. त्यामुळे या विभागाचे ‘अण्णासाहेब कुलकर्णी (कोलकाता) जैवविविधता विभाग’ असे नामकरण करण्यात येणार आहे. तसेच कै. अण्णासाहेब कुलकर्णी यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. सतीश कुलकर्णी महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाचे मानद वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करणार आहेत. ‘यमाई फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘ट्रायोट्रेंड एक्स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांनी सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून हा निधी दिला आहे. उद्योगांनी अशाप्रकारे घेतलेल्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना विविधांगी संशोधन करता येणार असून संशोधनाच्या कार्याला चालना मिळणार आहे. आज सकाळी, रविवार, दि.२६ मार्च रोजी संस्थेच्या गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी डॉ. सतीश कुलकर्णी आणि श्री. मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून या निधीचा धनादेश स्वीकारला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधव भट तसेच कुलकर्णी परिवारातील सदस्य, आप्त-स्नेही, डॉ. मदन फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते. पाणी, पर्यावरण, हवामान बदल, देशीज वनस्पती आणि प्राणी यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे, विकास कामांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि पश्चिम घाटाचे मूळ स्वरूप अबाधित राखण्यासमोरील आव्हाने यासंदर्भात मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाची ध्येय, उद्दीष्टे आणि प्रत्यक्ष काम अत्यंत सुसंगत आहेत. त्यामुळेच या विभागाला हे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. डॉ. सतीश कुलकर्णी हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी अमेरिकेतील व्हर्जिनिया टेक विद्यापीठातून पी.एच.डी. प्राप्त केली आहे. कॅलिफोर्निया येथील लॉरेन्स लिव्हरमोर लॅबोरेटरीच्या न्यूक्लिअर टेस्ट इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख म्हणून २८ वर्षे, नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासात विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आरोग्य विषयक काऊन्सिलर म्हणून ३ वर्षे ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर निरपेक्ष वृत्तीने विविध संस्थासाठी ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. श्री. मुकुंद कुलकर्णी यांनी खरगपूर येथील आय.आय.टी. मधून केमिकल इंजिनीअरींगमध्ये बी. टेक. केल्यानंतर कै. अण्णासाहेब कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या कातडी वस्तूंची निर्मिती आणि निर्यातीच्या व्यवसायात कार्यरत झाले. युरोप आणि अमेरिकेतील रॅडली, पिकागो यासारख्या जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडबरोबर त्यांचा व्यावसायिक संबंध आहे. कै. अण्णासाहेब कुलकर्णी हे कातडी वस्तूंच्या निर्यात व्यवसायाचे जनक मानले जातात. या क्षेत्रात त्यांच्या उद्योगाचे नाव अग्रेसर आहे.

आपल्या परिसरात झालेल्या सुधारणा आणि विकासामुळे परिसर बदलतो, त्यात सरकारचे योगदान असते पण माणसात बदल घडविण्यात शैक्षणिक संस्थांचे योगदान असते आणि अशा शैक्षणिक संस्थामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नांव महत्वाचे आहे, अशा शद्बात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पवार हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती येथील शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांना ‘पद्मविभूषण’ हा मानाचा नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. या वेळी ‘मएसो’च्या बारामती येथील शाळेचे माजी विद्यार्थी आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांचादेखील मानपत्र देऊन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साबळे यांनी आपल्या खासदार निधीतून मएसोच्या बारामतीतील शाळेसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी केली.

याप्रसंगी व्यासपीठावर ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, खा. अमर साबळे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, ‘मएसो’चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि ‘मएसो’चे सचिव डॉ. संतोष देशपांडे उपस्थित होते.या कार्यक्रमाला भारती साबळे, प्रतापराव पवार, बारामती शहरातील अनेक मान्यवर, स्नेही, मित्रमंडळी आणि बारामती येथील शाळेचे माजी मुख्याध्यापक डॉ. एस.बी. गोगटे तसेच शाळेशी संबंधित अनेक व्यक्ती आवर्जून उपस्थित होत्या.

आपल्या भाषणात पवार यांनी सत्कार केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. “एकेकाळी बारामती ही ‘केकावली’ आणि ‘आर्या’ यांची रचना करणाऱ्या कविवर्य मोरोपंतांमुळे ओळखली जात असे. पेशव्यांचे सावकार असलेल्या बाबूजी नाईक यांच्यामुळेही पेशवेकाळात ती ओळखली जायची. साखर कारखानदारीत महत्त्वाची कामगिरी करणारा भाग म्हणून बारामतीची ओळख झाली. आता बारामतीत सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असून शेती, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अशा सगळ्याचीच निर्मिती बारामतीच्या परिसरात होते. अशा पद्धतीने परिसर बदलण्यात सरकारचे योगदान असू शकते, मात्र माणूस बदलण्यात शैक्षणिक संस्थांचे योगदान असते आणि त्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नांव महत्वाचे आहे. अनेक शिक्षण संस्थांशी माझा संबंध असल्याने तिथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणात गुणात्मक बदल करण्याचा विचार जेव्हा मी करतो तेव्हा डोळ्यासमोर जी काही ४ ते ५ नावे येतात, ती सर्व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील शिक्षकांचीच आहेत. शाळेचे मुख्याध्यापक एम.व्ही. भावे, बी.जी. घारे, एस.बी. गोगटे यांच्यासारख्या उत्तम शिक्षकांची ‘मएसो’ ला परंपरा आहे. आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले पाहिजेत याची खबरदारी या शाळेतील शिक्षकांनी घेतली. शाळेतल्या शिक्षकांच्या कृतीतूनच संधी येईल तेव्हा साहस दाखवलेच पाहिजे हा संस्कार झाला. आपली मातृभाषा असलेल्या मराठीबद्दलची आस्था शाळेमुळेच निर्माण झाली.

अशा शाळेच्या तीन माजी विद्यार्थ्यांना आणि तेदेखील एकाच घरातल्या तिघांना पद्म पुरस्कार मिळणे ही अभिमानास्पद घटना आहे आणि मला त्याचा आनंद आहे. माझे थोरले बंधू अप्पासाहेब पवार यांनी देशांत पहिल्यांदा ठिबक सिंचनाचे तंत्र आणले. शेतीच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे होते, त्यामुळे त्यांना आणि माझे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांना उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्यबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सार्वजनिक आणि व्यक्तीगत जीवनातही अनेक आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून लातूरमध्ये झालेला विनाशकारी भूकंप आणि मुंबईत झालेले बॉम्बस्फोट अशा आव्हानांला तोंड द्यावे लागले. आठ हजार जणांचा बळी घेणाऱ्या भूकंपानंतर लातूर परिसराचे दोन वर्षात पुनर्वसन करण्यात आणि बॉम्बस्फोटांनंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील जनजीवन अल्पावधीत पूर्वपदावर आणण्यात यशस्वी ठरलो. समाजात चर्चा होईल असा निर्णय काही वेळा राजकीय जीवनात घ्यावा लागतो. आपल्या देशाच्या सैन्यदलात महिलांना प्रवेश नव्हता. संरक्षण मंत्री असताना त्यासंदर्भात संबंधितांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर सोपस्कार दूर सारत एक जनप्रतिनिधी म्हणून मी तो निर्णय घेतला. या वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व एका महिला लष्करी अधिकाऱ्याने केले याचा मला खूप आनंद आहे. हवाई दलात महिलांना प्रवेश दिल्यानंतर होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची नियुक्ती करण्याची शिफारस देखील संरक्षण मंत्री असताना मीच केली होती. अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेला, देशातल्या तरुणांबद्दल प्रचंड असणारा, आपल्या वेतनापैकी ९० टक्के रक्कम आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणारा माणूस मला भेटला. अशा अनेक जणांशी माझा संबंध आला. कामाविषयीची तळमळ, बांधिलकी, कष्ट करण्याची तयारी असे सर्व संस्कार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेताना, संस्कारक्षम वयातच ‘मएसो’च्या शाळेत झाले. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अजूनही खूप काम करण्याची गरज आहे. लोकशाहीचा संस्कार रुजवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ‘मएसो’च्या संस्कारातूनच हे शक्य होईल. आज शाळेने, संस्थेने केलेल्या सत्काराचे महत्व आगळे-वेगळे आहे. हा घरातील सत्कार आहे, जिथे शिकलो त्या शाळेने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.” असे पवार आपल्या भाषणात म्हणाले.

खा. अमर साबळे आपल्या भाषणात म्हणाले की, “ संस्थेने माझा आणि पवार साहेबांचा सत्कार केल्याबद्ल मी आभारी आहे. आपण जग जिंकल्यावर जितका आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपल्या विजयाचा असतो. जगभरचे आदर-सत्कार स्वीकारून जेव्हा गावच्या वेशीवर येतो आणि गावातले जेव्हा स्वागताला येतात तेव्हाचा आनंद जास्त असतो, तसाच आनंद आझ मला होतो आहे. पवार साहेबांपेक्षा दुप्पट आनंद आझ मला होतो आहे कारण त्यांच्याबरोबर माझा सत्कार होत आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. बारामतीत शंभर वर्षापूर्वी जेव्हा शाळा सुरू झाली, त्याने बारामतीतील शिक्षणाचा पोत, गुणवत्ता आणि पिढी सुधारली. मएसोची शाळा म्हणजे ब्राह्मणांची शाळा असाच समज बारामतीत होता. हा समज चुकीचा होता हे मी अनुभवाने सांगतो. संस्थेतील शिक्षक ब्राह्मण होते पण शिक्षणात आणि संस्कारात ब्राह्मण्यवाद कधीच दिसून आला नाही. आजच्या नवीन वातावरणात नवी शिक्षण निती देता येते का? याचा संस्थेने विचार करावा. चांगले, दर्जेदार, मूल्यशिक्षण, कौशल्य आणि संशोधनावर आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. पुढील शंभर वर्षांचे शिक्षण कसे असावे ही जबाबदारी आपली आहे.”

या कार्यक्रमात संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाचे म्हणजेच ‘MAA’ चे सन्माननीय सदस्यत्व शरद पवार, खा. अमर साबळे,  प्रतापराव पवार यांना देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते या मान्यवरांना त्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

पवार आणि खा. साबळे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. श्यामा घोणसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी केले. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले तर सूत्रसंचालन डॉ. केतकी मोडक यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील विविध शाखांमधील गुणवंत शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ आणि आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दि. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची दै. सकाळने दखल घेतली.

 

 प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांच्या ‘म.ए.सो. क्रीडा करंडक २०१६-१७’ चे उद्धाटन आद अतिशय उत्साहाच्या वातावरणात झाले. अर्जुन पुरस्कार विजेते क्रीडापटू मा. हेमंत टाकळकर हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष मा. विवेकजी शिंदे, मएसोचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. भालचंद्र पुरंदरे, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक मा. शैलेश आपटे, नियामक मंडळाचे सदस्य मा. आनंदराव कुलकर्णी, मा. जयंतराव म्हाळगी तसेच मा. राजीव देशपांडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मएसो प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा जांगळे, मएसो इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. ज्योति क्षिरसागर, मएसो कै. ग.भि. देशपांडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भ.ए. चव्हाण आणि मएसो सौ. नि.ह. देशपांडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल खिलारे हे देखील यावेळी उपस्थित होते. ‘म.ए.सो. क्रीडा करंडक २०१६-१७’ निमित्त आज सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती.

महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १९ डिसेंबर २०१६ रोजी संध्याकाळी ७.०० वा. पुण्यात कर्वे रस्त्याच्या प्रारंभी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळीस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी मा. मुख्यमंत्री फडणवीस यांना मानवंदना दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले! शिवास्पदे शुभदे…’ ही रचना शाळेच्या घोष पथकाने सादर करून मुख्यमंत्र्याबरोबरच उपस्थितांची मने जिंकली. मानवंदना देताना जाणवणारा विद्यार्थिनींचा आत्मविश्वास आणि शिस्त पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी त्यांनी विद्यार्थिनींकडून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सैनिकी शाळेची माहिती घेतली आणि या कॅडेट्सबरोबर फोटोही काढला. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ मुळशी तालुक्यात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थिनी आणि शिक्षकांबरोबर झालेल्या संवादात मुख्यमंत्र्यांनी “सैनिकी शाळेत नक्की येऊ!” असे आश्वासन दिले. शाळेच्या विद्यार्थिनींसाठी एकूणच हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी व रोमांचकारी ठरला. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. गिरीश बापट, सामाजिक न्याय मंत्री मा. दिलीप कांबळे, पुण्याचे मा. महापौर प्रशांत जगताप, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, आमदार सौ. मेधा कुलकर्णी, आमदार विजय काळे, आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक गणेश बिडकर, नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या मानवंदनेचे नियोजन म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.राजीव सहस्रबुद्धे, शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवीताई मेहेंदळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, उप-प्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, कॅप्टन बनसोडे, श्री. गुंड व श्री. जगधने सर यांनी विशेष प्रयत्न केले.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी सोमवार, दि. १२ डिसेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आणि संस्थेच्या कार्याबद्दल माहिती घेतली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे आणि नियामक मंडळाच्या सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे यावेळी उपस्थित होते

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे परशुराम रूग्णालय आणि संशोधन केंद्र तसेच आयुर्वेद महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालय रत्नागिरी जिह्यातील घाणेखुंट-लोटे येथे कार्यरत आहे. संस्थेच्या या शाखांना जोडून वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आणि केंद्र सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाच्या ‘सार्वजनिक आरोग्य पुढाकार’ (‘Public Health Initiative’) या योजनेचे उद्घाटन मा. श्री. श्रीपादजी नाईक, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय यांच्या शुभहस्ते शनिवार, दि. ३ डिसेंबर २०१६ रोजी दुपारी ४.०० वा. आयुर्वेद महाविद्यालयाच्या आवारात झाले. या कार्यक्रमाची दै. लोकमत, दै. सकाळ, दै. रत्नागिरी टाईम्स या वृत्तपत्रांनी दखल घेतली.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल या शाळेला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवार, दि. १९ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी ४.०० वाजता कला – क्रीडा संगम आयोजित करण्यात आला होता. दैनिक सकाळ व दैनिक लोकमत या वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाची दखल घेतली आणि छायाचित्रासह वृत्तांकन केले. …

देशाची मान उंचावण्यासाठी प्रयत्न
पुणे : दक्षिण आशियाई स्पर्धांसाठी २००४ मध्ये पाकिस्तानात गेले असताना भारतीय खेळाडूंना अतिशय तुच्छतेची वागणूक मिळाली. पण नेमबाजीतले सुवर्णपदक स्वीकारायच्या प्रसंगी राष्ट्रगीत चालू होताच आपल्या देशाच्या तिरंग्यासमोर पाकिस्तानातले सर्व खेळाडू आणि उपस्थित नागरिक शांतपणे उभे होते. त्याक्षणी मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. आपल्यामुळे देशाची मान उंचावली गेली पाहिजे, हीच जिद्द मनात होती. जेव्हा प्रयत्न कमी पडतात तेव्हा असे क्षण आठवण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर यांनी आज येथे दिला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल या शाळेला ८0 वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कला, क्रीडासंगम या कार्यक्रमाप्रसंगी सावंत यांनी विद्यार्थिनींना हा संदेश दिला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (नवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, राजीव सहस्रबुद्धे, डॉ. संतोष देशपांडे, मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, शाला समितीच्या डॉ. केतकी मोडक, अध्यक्ष डॉ. माधव भट उपस्थित होते.
तेजस्विनी म्हणाली, ”घरापासून नेमबाजी शिकण्यासाठी जाताना बसचे भाडेदेखील कसेबसे जमवावे लागत होते. अशा परिस्थितीत माझ्या आईने दिलेला पाठिंबा आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळेच मी यश मिळवू शकले. शाळेत असताना एनसीसीमध्ये होते. त्यामुळे शूटिंगशी संबंध आला आणि शूटिंग हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.”
शूटिंग हा प्रकार दिसतो तितका सोपा नाही, त्यात कमालीची एकाग्रता लागते. तेजस्विनी सावंत आज रोल मॉडेल बनल्या असल्याचे एअर मार्शल भूषण गोखले (नवृत्त) यांनी सांगितले.
कला, क्रीडासंगम या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या विविध प्रात्यक्षिकांमध्ये शाळेतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सूर्यनमस्कार आणि योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. सामूहिक नृत्य, साधन कवायत, कराटे, ८0 विद्यार्थिनींच्या घोषपथकाच्या विविध रचना सादर केल्या.

पुणे – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘सीएसआयआर इनोव्हेशन अॅवार्ड फॉर स्कूल चिल्ड्रेन’हा पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसासटीच्या सासवड येथील मएसो वाघीरे विद्यालयातील रोहित अनिल दीक्षित, वैष्णव सुखदेव बारावकर, प्रथमेश दिलीप कोल्हाळे आणि श्रेयस गजानन यादव या चार विद्यार्थ्यांना काल (सोमवार, दि. २६ सप्टेंबर २०१६) नवी दिल्लीत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते हे प्रदान करण्यात आला.

म. ए. सो. व्यक्तिमत्त्व विकास केंद्राच्या पुढाकाराने पुण्यातील विविध संस्थांमधील सुमारे शंभर समुपदेशकांचे पथक गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले होते. साम वाहिनीने त्याचे थेट प्रक्षेपण केले.

Saam Marathi – Presence of different organizations of counsellors in Ganesh immersion at Pune

 

पुणे – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालय दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्रातील रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह’ या ऑडिओ-व्हिज्युअल हॉलचे उद्धाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते बुधवार दि. १४ सप्टेंबर २०१६ रोजी करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे मा. संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या रेकॉर्डिंग स्टुडिओमधील अत्याधुनिक उपकरणांची माहिती डॉ. गावडे आणि उपस्थित मान्यवरांनी उत्सुकतेने जाणून घेतली.
मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या इमारतीत तळ मजल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह नव्याने तयार करण्यात आले आहे. सभागृहात लावण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करून या सभागृहाचे उद्धाटन प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते आणि रा. स्व. संघाचे पुणे महानगराचे मा. संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गायलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला …’ या ध्वनिचित्रमुद्रित गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रम सुरू झाला. मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष मा. संजय इनामदार आणि उपाध्यक्ष मा. विवेक शिंदे, चिटणीस मा. डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य मा. अभयराव क्षीरसागर, साहाय्यक चिटणीस व गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी, संस्थेच्या नियामक मंडळाचे साहाय्यक चिटणीस डॉ. भरत व्हनकटे, नियामक मंडळ आणि आजीव सदस्य आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. गावडे म्हणाले, “पूर्वी ज्या गरवारे महाविद्यालयात प्राध्यापक होतो त्याच महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाच्या सभागृहाचे उद्घाटन करण्याचे भाग्य संस्थेमुळे मला मिळाले याबद्दल मी आभारी आहे. याच महाविद्यालयात सावरकरांवर व्याख्यान देण्याची संधी आपल्याला मिळेल असेही कधी वाटले नव्हते. सावरकर या विषयावर ३३ वर्ष व्याख्यानमाला चालली ही पुण्यात गौरव वाटावी अशी गोष्ट होती. या सभागृहात तशीच किंवा अन्य कोणती व्याख्यानमाला सुरू करता आली तर चांगली गोष्ट होईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटण्याची संधी १९६४ साली मला मिळाली. सावरकरांच्या साहित्यावरील प्रबंधाचे माझे काम सुरू होते. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी केसरीवाड्यात गेलो होतो. सावरकरांची शारिरीक स्थिती अतिशय कृश झालेली होती आणि ते पलंगाला खिळले होते. अशा स्थितीतही रँग्लर र.पु. परांजपे येताच सावरकरांनी वाकून त्यांच्या पायावर डोके ठेवले. असा शिष्य आणि असा गुरू पाहाण्याचे भाग्य तेव्हा मला मिळाले. त्याच भेटीत तात्यारावांनी महाराष्ट्रीय मंडळाचे शिवरामपंत दामले यांना पारंपारिक आणि जुन्या शस्त्रांपेक्षा नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी अणुबाँबचे भित्तीचित्र कोरण्याची सूचना केली होती. तात्या विज्ञाननिष्ठ होते. त्यांच्या साहित्यातला अभ्यासण्यासारखा विषय कोणता असेल तर तो त्यांची विज्ञाननिष्ठा! ‘यज्ञात भवति पर्यन्या:’ ऐवजी ‘विज्ञानात भवति पर्जन्या:’ हा मंत्र त्यांनी दिला. अभ्यासक्रमात विज्ञानकथा असल्या पाहिजेत असा त्यांचा विचार होता. त्याचप्रमाणे कोणती व्रते केली पाहिजेत याबाबतही त्यांची मते होती. मृत्यूनंतर आपला अंतिम संस्कार विद्युतदाहिनीत करायला सांगून त्यांनी आपली विज्ञाननिष्ठा आचरणात आणली होती. तत्कालिन परिस्थितीमुळे स्वा. सावरकरांच्या साहित्यावर पी. एचडी. करण्यासारखा प्रयत्न तडीला जाईल का याची शंका होती. मात्र, आपण नेटाने काम करीत गेलो की यश मिळते हे अनुभवातून मी सांगू शकतो.”
मा. वंजारवाडकर यांनी आपल्या भाषणात, स्वा. सावरकरांच्या चित्राचे अनावरण, त्यांचे नाव असलेल्या सभागृहाचे उद्धाटन आणि त्यांनीच लिहिलेल्या अजरामर गीताच्या शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींनी केलेल्या गायनाचा साक्षीदार होण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. ते म्हणाले, “मएसोचा अध्यक्ष असताना पाहिलेली स्वप्ने साकार होत असल्याचे बघायला मिळणे हा आनंद आणि अभिमानाचा भाग आहे. संस्थेचे व्हीजन डॉक्युमेंट आहे आणि ते केवळ कागदावर नाही तर इथल्या नेतृत्त्वाच्या मनात आहे म्हणूनच ‘नॅक’ च्या अपेक्षेप्रमाणे सर्व सुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळे ‘नॅक’ चा अपेक्षेपेक्षा अधिक चांगला दर्जा मिळेल. महाविद्यालयातल्या कोणत्याही सुविधेसाठी विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहावे लागणार नाही अशा प्रकारची येथील कार्यालयाची रचना करण्यात आली आहे कारण ही संस्था विद्यार्थीकेंद्रीत आहे. ज्या स्वा. सावरकरांचे नाव या सभागृहाला देण्यात आले आहे, त्या स्वा. सावरकरांचा आणि संस्थेचा संबंध आला होता. संस्था चालवत असलेल्या ‘महाराष्ट्र कॉलेज’चे प्राचार्य आणि ‘काळ’कर्ते शि.म. परांजपे यांनी वंगभंगाच्या आंदोलनात पुण्यात परदेशी कापडांच्या होळीच्या प्रसंगी भाषण केले होते. त्याचा परिणाम म्हणजे ब्रिटीश सरकारने ‘महाराष्ट्र कॉलेज’ बंद पाडले. पण कॉलेजच्या नावातील महाराष्ट्र हे नांव टिकवून ठेवण्यासाठी संस्थेचे ‘पूना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन असोसिएशन’ हे तत्कालिन नांव बदलून ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ असे करण्यात आले, त्यामागे स्वा. सावरकरांची प्रेरणा होती.”
डॉ. उमराणी यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात, ‘नॅक’च्या निमित्ताने महाविद्यालयात सुरू असलेल्या आधुनिकीकरणाच्या अनेक कामांचा आढावा घेताना शासन व्यवस्था, विद्यापीठ, संस्थेचे मान्यवर माजी विद्यार्थी, सभासद, हितचिंतकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “संस्थेनं ‘नॅक’ ला अपेक्षित असलेल्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत याचा खूप आनंद वाटतो कारण त्याचा सकारात्मक परिणाम प्रेरणेवर होतो. हे सभागृह हा देखील त्याचाच भाग आहे. पूर्वी दुसऱ्या मजल्यावर असलेले हे सभागृह आता तळ मजल्यावर आणण्यात आले असून त्याचे स्वरूप अत्याधुनिक आणि अत्यंत दर्जेदार असे आहे. त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले असल्याने विद्यार्थ्यांच्यात देशभक्ती आणि विज्ञानभाव विकसित व्हावा अशी अपेक्षा आहे.”
प्रा. डॉ. आनंद लेले यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा परिचय करून दिला. या वेळी मा. राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रा. डॉ. प्र. ल. गावडे आणि मा. रवींद्र वंजारवाडकर यांना ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मा. वंजारवाडकर, डॉ. गावडे आणि मा. राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या सभागृहाच्या बांधकामात सहयोग दिलेल्या व्यावसायिकांचा तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सहकारी कर्मचाऱ्यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
मा. अभयराव क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले.
मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गायलेल्या ध्वनिचित्रमुद्रित ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वेदांत कुलकर्णी यांनी केले.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील वाढीव बांधकामाचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शनिवार, दि. २० ऑगस्ट २०१६ रोजी करण्यात आले. या प्रसंगी बोलताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर. ((डावीकडून, बसलेले) संजय इनामदार, राजीव सहस्रबुद्धे, डॉ. प्र. ल. गावडे , एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), डॉ. यशवंत वाघमारे, डॉ. संतोष देशपांडे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय (भावे स्कूल) या शाळेच्या वतीने “सामाजिक रक्षाबंधन – संदेश पर्यावरणाचा” या उपक्रमाअंतर्गत “ई कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर” या अभियानाची सुरवात रविवार, दि. २१ ऑगस्ट २०१६ रोजी टिळक चौकात (अलका टॉकीज चौक) झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला जाहीर झाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवार, दि. १८ ऑगस्ट २०१६ रोजी देण्यात आला.
२०१५-१६ वर्षासाठीचा हा पुरस्कार असून शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तो देण्यात येतो.

“शाळेने दिलेले संस्कार भावनांच्या कोलाहलात विसरू नका” – डॉ. अनिरुद्ध देशपांडे
“आपल्या हेतूबद्दल स्वच्छ असलं पाहिजे त्यामुळे जीवनाचा उद्देश कळतो, योग्य-अयोग्य काय हे कळलं पाहिजे त्यामुळे शरीर सुदृढ राखता येतं, जीवनात प्रमाणबद्धता असली पाहिजे त्यामुळे काय बोलावं, कोणाकडे किती वेळ जावे आदी गोष्टी कळतात, विनोदबुद्धी जागृत असली पाहिजे त्यामुळे निर्व्याज्यपणे हसता येतं आणि आपल्या जीवनाचा अर्थ कळला पाहिजे ही चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकल्याची लक्षणे आहेत. तुम्ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या फार मोठी परंपरा असलेल्या संस्थेचे विद्यार्थी आहात ही भाग्याची गोष्ट आहे. शाळेने दिलेले संस्कार भावनांच्या कोलाहलात विसरू नका,” असा आपुलकीचा सल्ला ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिला.
मार्च-एप्रिल २०१६ मध्ये माध्यमिक शालांत (इयत्ता १० वी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १२ शाळांमधील ४४ विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ बुधवार, दि. ३ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी ४ वाजता पुण्यातील म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात (असेंब्ली हॉल) आयोजित करण्यात आला होता. डॉ. अनिरूद्ध देशपांडे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला.
या कार्यक्रमाला मा. दिनकर टेमकर शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे – १ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, सचिव डॉ. संजय देशपांडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ बारामती येथील कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या ईशस्तवनाने झाली.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मान्यवरांचा परिचय, स्वागत तसेच प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
संस्थेने आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके निबंध स्पर्धा आयोजित करण्यास सुरूवात केली आहे. २०१५-१६ हे त्याचे पहिलेच वर्ष. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आणि तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रत्येक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मा. टेमकर यांच्या हस्ते प्रातिनिधक स्वरूपात पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. या मराठी भाषेतील निबंधासाठी कु. अनघा योगेश उबाळे, कु. प्रथमेश दिलीप कोल्हाळे आणि कु. श्रुतिका महेंद्र कुंडा या तिघांना तर कु. साक्षी सचिन घोलप, कु. सानिका गणेश मोरे आणि कु. सृष्टी तुषार करमळकर या तिघांना इंग्रजी भाषेतील निबंधासाठी पुरस्कार देणात आले. श्री. अजिंक्य देशपांडे यांनी यावेळी या स्पर्धेविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीची जोपासना करण्यासाठी आणि त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी भारत सरकारच्या वतीने सी.आय.ए.एस.सी. स्पर्धा घेण्यात येते. वाघीरे हायस्कूलचे महामात्र डॉ. अंकुर पटवर्धन यांनी ही स्पर्धा आणि स्पर्धेत शाळेला मिळालेल्या यशाबाबत यावेळी माहिती दिली. दोन स्तरावर घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत आपल्या संस्थेच्या सासवड येथील वाघीरे हायस्कूलची पहिल्या स्तरावर निवड झाली होती. २०१६-१७ वर्षासाठी देशभरातून निवडण्यात आलेल्या केवळ ३३ शाळांमध्ये वाघीरे हायस्कूलचा समावेश होता. “बौद्धिक स्वामित्त्व हक्क” या विषयावर दिल्ली येथे कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यानंतर शाळेने सादर केलेल्या सुधारित प्रकल्पाला दुसऱ्या स्तरावर देशभरातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या वैष्णव सुखदेव बारवकर, प्रथमेश दिलीप कोल्हाळे, श्रेयस गजानन यादव आणि रोहित अनिल दीक्षित या चार विद्यार्थ्यांचा सत्कार मा. टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला. हे सर्व विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी दिल्ली येथे जाणार आहेत.
या विशेष पुरस्कार वितरणानंतर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेची उंची वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून ते म्हणाले, “आईवडिल आणि गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. आपली प्रतिमा आपल्यालाच निर्माण करावी लागते. विमान जसं वरती जातं तसंच ते परत खालीही येतं. त्यामुळे पाय जमिनीवर राहातील याचे भान ठेवा. आपल्या जीवनात समाजाचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामुळे समाजाला परत द्यायला शिका. जसे मोठे व्हाल तसे अमिषांपासून, व्यसनांपासून दूर राहा. शाळेबाहेरच्या टपऱ्यांवर जिथे अमली पदार्थ विकले जात असतील तिथे प्रयत्नपूर्वक ही विक्री रोखली पाहिजे, त्यासाठी एक कार्यक्रमच राबवण्याची गरज आहे. तुमचे वय स्वप्न बघण्याचे आहे, पण अशीच स्वप्न बघा जी झोपू देत नाहीत. आपले आरोग्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे तब्ब्येत कमवा. ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा. आम्हाला तुमचा अभिमान आहेच, पण आयुष्यात असे काही करा की आईवडिलांना आणि गुरुजनांनाही तुमचा अभिमान वाटेल.“
या नंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते १० वी आणि १२ वी च्या परिक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. मृण्मयी अभिजित चितळे, अथर्व विनय पारसवार, आशा लहू कानतोडे या पारितोषिक प्राप्त गुणवंतांनी या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण उपसंचालक मा. टेमकर म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे, भरपूर खेळलं पाहिजे. व्यसनांपासून दूर राहा. ज्ञान आणि व्यवहार ज्ञान यांची सांगड घालायला शिका. समाज आणि देशाला आपला काय उपयोग होईल याचा विचार करा. देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले? याचा विचार करा. चांगले नागरिक व्हा.”
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिरूद्ध देशपांडे विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना म्हणाले, “संपूर्ण आयुष्य तुमच्यासमोर आहे. ते कसे व्यतित करायचे, कोणकोणत्या गोष्टींचे भान राखायचे हे आता तुम्हालाच ठरवायचे आहे, तुमच्यासमोर संधींचे आकाश खुले आहे. जीवनात स्पर्धा महत्त्वाची आहे पण स्पर्धा हे जीवनाचे तत्वज्ञान बनता कामा नये. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही, तंत्रज्ञान हे माहिती जमा करण्याचे साधन आहे. माहिती म्हणजे ज्ञान नाही, तसे असते तर सर्वच ग्रंथालये महान ठरली असती आणि त्यातील ग्रंथ हे ऋषी झाले असते. ज्ञानाचे स्वरूप विस्तृत आहे. निसर्गात जाऊन आनंद लुटला पाहिजे तो आनंद कॉम्प्युटर देऊ शकणार नाही. कोणताच हुशार विद्यार्थी आता पुढे जाऊन शिक्षक व्हायचे आहे असे म्हणत नाही. कोणीच शिक्षक होण्यास तयार नसेल तर भविष्यात विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? शिक्षक होणे म्हणजे पिढी घडवणे आणि त्या महत्त्वाकांक्षेसारखा आनंद दुसऱ्या कशातच नाही. जीवनात तळमळ ही फार महत्त्वाची असते. कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका अंगी उद्दामपणा येऊ देऊ नका. कृतघ्नता हा सर्वात मोठा दुर्गुण आहे, कृतज्ञता बाळगता आली पाहिजे. नव्या संस्कारांना सामोरे जाताना कसोटी लागते पण पर्यावरणाचे रक्षण करणे, प्लॅस्टिकचा वापर टाळणे, पाण्याची आणि अन्नाची नासाडी होऊ न देणे यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टीतून जीवनाला दिशा मिळते. आपल्याकडे कौशल्य असणे आवश्यकच आहे पण दुसऱ्याकडे असलेल्या कौशल्याचा आदर करायला शिकले पाहिजे. समुहात राहिले म्हणजे अहंकार कमी होतो, निखळ आनंद घेता येतो. मूल्यसंपन्न जीवन जगणे ही आपण शाळेला दिलेली खरी भेट असते. श्रमाशिवाय एकही पैसा मिळवण्याची इच्छा करू नका आणि आपला देश, आपला समाज यांच्याबद्दल मनात कधीही तुच्छतेचा भाव निर्माण होऊ देऊ नका. आपला देश आणि समाज जसा आहे तसा स्वीकाराला पाहिजे आणि अपेक्षित आहे तसा घडवला पाहिजे,”
संस्थेचे सचिव डॉ. संजय देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
बारामती येथील कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी गायलेल्या पसायदानाने या आनंद सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील शिक्षिका श्रीमती प्रिती धोपाटे यांनी केले.

MES Higher Secondary School, Pune (Self Finance)

(MES Vanijya Va Shastra Uchaa Madhyamik Vidyalay)
131, Mayur Colony, Kothrud, Pune - 411 038
Established in 2016

Balshikshan Mandir English Medium School is known for its development oriented outlook. The School aims at high quality education, developing scientific temperament, and creating a supportive environment for it, developing team spirit as also sensitiveness to lead a meaningful life. The School which has received an ISO ranking has been continuously reviewing its quality management system.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या विद्यार्थीनींनी संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रिकर यांना शनिवार,दि. ३० जुलै २०१६ रोजी मानवंदना दिली. श्री. पर्रिकर एका कार्यक्रमासाठी संस्थेच्या मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात आले होते. त्यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल(निवृत्त) श्री.भूषण गोखले, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश मालखरे, नियामक मंडळ सदस्या आणि शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवीताई मेहेंदळे आदी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं या वेळी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन सैनिकी शाळेतील विद्यार्थीनींच्या भवितव्याच्या दृष्टीने मागण्यांचे एक निवेदन त्यांना दिले. सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी लष्कराच्या चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत (OTA – Officer’s Training Academy) काही जागा राखीव ठेवण्याबाबत आपण विचार करू असं पर्रिकर यांनी या वेळी सांगितलं.
म.ए.सो. ची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही निवासी शाळा असून राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. सध्या या शाळेत ६५० विद्यार्थीनी इ. ५ वी ते इ. १२ वीचे शिक्षण घेत आहेत. शाळेच्या सध्याच्या मंजूर शुल्क रचनेत बदल करण्याची तसेच या विद्यार्थीनींना संरक्षण दलात प्रवेश मिळावा यासाठी संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. शाळेत कठोर लष्करी प्रशिक्षण घेऊनही या विद्यार्थीनींना संरक्षण दलात थेट प्रवेश मिळण्याची कोणतीही योग्य संधी उपलब्ध नाही. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी त्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागत आहे. परिणामी शाळेचा मूळ उद्देशच बाजूला पडत आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती संस्थेनं दिलेल्या निवेदनात संरक्षण मंत्र्यांना केली आहे.
लष्करी प्रशिक्षणाबरोबरच यथोचित शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने इयत्ता १२ वी नंतर या विद्यार्थीनींच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सातत्य राहात नाही. केंद्र आणि राज्य सरकारनं सहकार्य आणि मार्गदर्शन केल्यास या विद्यार्थ्यीनींना संरक्षण दलात प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक असलेल्या पुढील अभ्यासक्रमांसाठी नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे आव्हान स्वीकारण्यास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तयार आहे, असं संरक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. याशिवाय मुलांच्या सैनिकी शाळेप्रमाणेच मुलींच्या सैनिकी शाळेलाही केंद्र सरकारने विविध योजनांमधून वेतनेतर अनुदान द्यावे, विशेष बाब म्हणून शाऴेमधे एन.सी.सी. युनिटला मान्यता द्यावी, क्रीडा विषयक सोयी-सुविधांसाठी केंद्र सरकारनं आर्थिक सहाय्य द्यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

“शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, खोड्या, मारामाऱ्या मला आज आठवत आहेत. आज मला जे प्रेम, जिव्हाळा मिळाला तो अनमोल आहे, त्याबद्दल मी आभार मानणार नाही, तो मी ह्रदयात जपून ठेवत आहे. पुनर्जन्म मिळाला तर मी पुण्यातच जन्माला येईन आणि भावे हायस्कूलचाच विद्यार्थी होईन,” अशा शद्वात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
निमित्त होतं बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95 व्या वाढदिवसाचं. 29 जुलै 1922 हा बाबासाहेबांचा जन्मदिवस. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचं शिक्षण झालं. ते ज्या वर्गात शिकले त्याच वर्गात शाळेनं आपल्या या माजी विद्यार्थ्याचा आगळावेगळा सत्कार समारंभ आयोजित केला होता. शाळेतील यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, शाळेचे मुख्याध्यापक प्रा. के. एन. अरनाळे आणि सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश मालखरे उपस्थित होते.
शाळेतील राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी (एन.सी.सी.) मानवंदना देऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं शाळेच्या आवारात स्वागत केलं. त्यानंतर शाळेतील शिक्षिकांनी बाबासाहेबांचे औक्षण केले. शाळेच्या प्रवेशद्वारापासून बाबासाहेब ज्या वर्गात शिकले त्या वर्गापर्यंत पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापकांच्या खोलीच्या शेजारच्याच खोलीत बाबासाहेबांचा वर्ग होता. तिथे वेदमंत्रांच्या उच्चारांनी बाबासाहेबांने अभिष्टचिंतन करण्यात आले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील जिवंत देखावा साकारून बाबासाहेबांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या राष्ट्रपुरूषांच्या प्रसिद्ध घोषवाक्यांचा जयजयकार या विद्यार्थ्यांनी या वेळी केला. “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीति …” हे स्फूर्तिगीत यावेळी या विद्यार्थ्यांनी सादर केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बाबासाहेबांनीच लिहीलेल्या ‘हिरकणी’ या कथेची समिक्षा सौ. रमा लोहोकरे यांनी सादर केली आणि त्यानंतर या कथेचे अभिवाचन शाळा समितीचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पुरंदरे, सौ. गौरी पुरंदरे, सौ. प्रमिला सातपुते, अतुल दळवी आणि सौ. सुनीता खरात यांनी केले. हा सर्व कार्यक्रम बाबासाहेब अत्यंत तन्मयतेने अनुभवत होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधताना ते म्हणाले की, “ही कथा ऐकत असताना मी मनाने रायगडावरच होतो. आजपर्यंत मी जे काही केलं आहे ते शाळेनं केलेल्या संस्कारामुळेच करू शकलो आहे. मी 95 वर्षांचा झालो असलो तरी शाळेनं आज दिलेलं प्रेम, जिव्हाळा पाहून मला लहानच राहावं असं वाटतं आहे. आजचा हा आगळावेगळा सोहळा पाहून मी थक्क झालो आहे. आज इतक्या वर्षांनी मी शाळेच्या या वेगळ्याच जगात आलो आहे. देवानं मला विचारलं तर मला पुन्हा या पुण्यातच जन्माला यायचं आहे आणि भावे हायस्कूलमध्येच शिकायचं आहे. शाळेतल्या अनेक घटना अजूनही मला आठवत आहेत. शाळेतल्या लेले सरांनी भूगोल शिकवताना हे विश्व किती मोठं आहे आणि आपण त्यात किती कणभर आहोत हे सांगतानाच आपल्यातही आकाशाएवढं होण्याची क्षमता आहे हे लक्षात आणून दिलं होतं. त्यामुळे खूप शिका, खूप दंगा करा, खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि आज माझ्यावर केलंत तसंच शिवचरित्रावर प्रेम करा.”
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रा. के.एन. अरनाळे यांच्या हस्ते मानपत्र अर्पण करण्यात आलं. तसंच मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी शिक्षकांच्या वतीने श्री. पी. के. कुलकर्णी यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीनं सासवड येथे वाघीरे विद्यालयाच्या आवारात स्थापन केलेल्या इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड या इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि. १५ जुलै २०१६ रोजी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी या शाळेत प्रवेश घेतलेल्या छोट्या दोस्तांच्या समवेत केले.
सासवडमधील पालकांचा संस्थेशी दीर्घकाळापासून परिचय असल्याने संस्थेची ही शाळा, इंग्रजी माध्यमाची असली तरी या शाळेत भारतीय परंपरेनुसारच संस्कार होतील असा विश्वास पालकांनी या वेळी व्यक्त केला.
या आनंद सोहळ्याला संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष मा. विवेक शिंदे, संस्थेचे सचिव मा. डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य मा. भालचंद्र पुरंदरे, मा. शामाताई घोणसे, संस्थेच्या आजीव मंडळाचे सदस्य आणि म.ए.सो. वाघीरे प्रशालेचे महामात्र मा. अंकुर पटवर्धन, मा. श्रीमती सविता काजरेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जगदीश मालखरे, माजी आजीव सदस्य मा. वि. ना. शुक्ल, मा. आर. व्ही. कुलकर्णी, आणि वाघीरे शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन इमारतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेला शुभेच्छा दिल्या आणि शाळेची सूत्रे समन्वयक श्रीमती शलाका गोळे यांच्याकडे सुपूर्द केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रमुख श्रीमती मेघा जांभळे यांनी केले.

सोमवार दि.27/03/17 रोजी कालीदास कलामंदिर, नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार वर्ष 2015-16 व 2016-17 साठी एकत्रित देण्यात आले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची 156 वर्षांची उज्वल परम्परा  व आदिवासी मुली- मुलांसाठी संस्थेने दिलेले योगदान,त्याच बरोबर देशातील पहिल्या मुलींच्या सैनिकी प्रशालेमध्ये गिरिकन्याना मिळत असणारे सैन्य प्रशिक्षण  व त्यांचे सक्षमीकरण या सर्वाचा विचार करुन शासनाने सदर पुरस्कार सैनिकि प्रशालेस दिला.
सदर पुरस्कारामध्ये 50,001/- रु. धनादेश, प्रमाणपत्र व शाल श्रीफळ इत्यादीचा सामावेष होता.
सदर पुरस्कार देण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना.श्री.विष्णु सवरा तसेच ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे, मा.मनिषा वर्मा सचिव ,आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन तसेच नाशिकच्या प्रथम नागरिक व महिला महापौर मा.रंजनाताई भानसी  आदि मान्यवार उपस्थित होते.महराष्ट्रातील 16 व्यक्तीना व 7 संस्थाना आदिवासी सेवक व सेवा  संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आदिवासी सेवक संस्था कार्यकर्ते उपस्थित होते. म ए सोसायटी तर्फे श्रीमती चित्रा नगरकर तसेच सैनिकि प्रशालेतर्फे प्राचार्या पूजा जोग, उप-प्राचार्य श्री.अनंत कुलकर्णी यानी सदर पुरस्कार स्विकारला. या देखण्या व भव्य-दिव्य कार्यक्रमाचे नियोजन व कार्यवाही आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक श्री.राजीव जाधव यानी केली. सदर पुरस्कार सैनिकी प्रशालेस मिळाल्याने संस्था पदधिकारी व समाजातून प्रशालेच्या कामाचे कौतुक होत आहे.

MES Night College of Arts and Commerce, Pune

(MES Kala Va Vanijya Ratra Mahavidyalay, Pune)
MES Garware College Campus, Karve Road, Pune - 411 004
Established in 2012

MES established Arts and Commerce Night College which is affiliated to Savitribai Phule Pune University, in 2012. The Night College is convenient to fulltime employees, those appearing for competitive examinations, and those doing business and who wish to pursue higher education. One division of Arts Stream and two divisions of the Commerce Stream have been recognized.
MES-College-Of-Optometry-Pune

MES Community College, Pune

1214-1215, Sadashiv Peth, Pune 411 030
Established in 2010

Set up in 2011, the Community College aims at introducing the several new subjects which have emerged with the changing world, and offers guidance to the new courses. Helping to develop soft skills, empowering people from all walks of the society to earn livelihood, developing skilled manpower are other objectives. The Community College conducts diploma in social work and also courses such as marriage counselling.
MES Krida Vardhini, Pune

MES Krida Vardhini, Pune

MES Bhawan, 1214-1215, Sadashiv Peth, Pune 411 030
Established in 2008

Online Registration Link: kridavardhini.onlinemes.com

In this age of competition, students are engaged continuously throughout the day in the school, tutions and studies. They can hardly devote time for physical exercises. Kreedavardhini primarily aims in creating interest of sports and physical exercises in the students. Kreedavardhini attempts to systematically develop energy, stamina, balance, suppleness and breathing techniques which are essential to be a good sportsman. This institution attempts to develop sportsmen of national level
MES-Saraswati-Niwas-Pune

MES Saraswati Niwas Girls Hostel, Pune

Saraswati Bhawan, S.No.46/1. Erandwane, Paud Road Pune 411038
Established in 2007

This girls' hostel of MES is the second home for those students who come from different parts of India and study in different colleges of various institutions. Saraswati Niwas, the girls' hostel, which houses 35 rooms was constructed in 2007. The hostel at present accommodates 141 girl students, and the demand for admission has been on an increase every year. The hostel provides modern facilities such as a study room, a recreation centre for indoor games, internet etc. Feasts and festivals such as Diwali, Ganapati, Navratra, and Christmas are celebrated.
MES Shooting Range, Pune

MES Shooting Range, Pune

Renuka Swaroop High School Campus, 1453-1454 Sadashiv Peth, Pune, 411030
Established in 2007

MES set up a shooting range in the premises of MES Renuka Swaroop Memorial Girls' High School to develop interest in shooting as a sport and to nurture players of international standards. The shooting range is modern and well-equipped and has 11 lanes of which 5 are computerized. Participants who have had training in this shooting range have made their mark in various shooting competitions at the national level.
MES Vyaktimatva Vikas Kendra, Pune

MES Vyaktimatva Vikas Kendra, Pune

(Personality Development Center)
Saraswati Bhavan, S. No.46/1, Paud Road, Kothrud, Pune 411038
Established in 2007

MES set up a Personality Development Centre (व्यक्तिमत्व विकास केंद्र) realizing the need to resolve mental and psychological problems in the modern world. The centre guides students, parents and teachers to tackle problems such as stress, worries. The centre also imparts study skills. It also provides career guidance.
This was the 1st and only institution in Maharashtra, started such cell. The institute is currently undertaking various activities related to Psychology and few of them are mentioned as below:-

  • Activities for Students
  • Psychological Testing and counselling
  • Activities for Parent’s
  • Activities for teacher’s

सध्या च्या नवीन युगा मधील वाढत्या मानसिक समस्यांची गरज लक्षात घेऊन म. ए. सो. ने व्यक्तिमत्व विकास केंद्राची स्थापना केली. हे केंद्र विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना ताण तणाव, चिंता, भावनिक, वर्तनात्मक समस्या या सारख्या समस्यांना सामोरे कसे जाता येईल या विषयीचे सामुपदेशांनाचे काम करते. तसेच करिअर समुपदेशन ही करते.
ही महाराष्ट्रातील अशा प्रकारचे काम करणारी पहिली आणि एकमेव अशी संस्था आहे कि जेथे गेल्या १२ वर्षापासून संस्थेच्या प्रत्येक शाळा व महाविद्यालय मध्ये पूर्ण वेळ समुपदेशक काम करत आहेत. संस्था सध्या विविध प्रकारचे मानसशास्त्राशी संबंदित उपक्रम करत आहे. त्या पैकी काही खालीलप्रमाणे आहेत:-

• विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
• मानसशास्त्रीय चाचण्या व समुपदेशन
• पालकांसाठी उपक्रम
• शिक्षकांसाठी उपक्रम

blank

MES Shikshan Prabodhini, Pune

Saraswati Bhavan, S. No.46/1, Paud Road, Kothrud, Pune 411038
Established in 2000

In view of the fact that the field of education undergoes constant change, it is necessary that teachers too need to change techniques of teaching, and assessment. Shikshan Prabodhini was set up in the year 2000 to satisfy this need. Various workshops are held for teachers from pre-primary to higher secondary levels.
MES Shakti Gymnasium, Pune

MES Shakti Gymnasium, Pune

MES Garware College Campus, Karve Road, Pune - 411 004
Established in 1996

Physical fitness is as important as mental development. With keeping this in mind, the Shakti Gymnasium was started on the premises of MES Garware College in 1996. Students are systematically trained in physical exercises in the gymnasium which is equipped with state-of-the-art facilities.
MES-Renuka-Swaroop-Institute-Of-Career-Courses-Pune

MES Renuka Swaroop Institute Of Career Courses, Pune

1453-1454 Sadashiv Peth, Pune, 411030
Established in 1989

It has become absolutely necessary to enable girls and women in the modern world to become independent. This institution established in 1989 extends useful training to girls and women who have had to give up their education half-way. Training useful for self-employment is extended here and courses such as food-craft, tailoring, conversation development, and beautician are also held. A Government recognized course for pre-primary teachers is also conducted here.
MES-Institute-Of-Management-and-Career-Courses-Pune

MES Institute Of Management and Career Courses, Pune

131, Mayur Colony, Kothrud, Pune 411 038
Established in 1983

National-Board-of-Accreditation

MCA Programme accrediated by National Board of Accrediation (NBA)

The IMCC set up in 1983 focuses on training in the management science. The IMCC conducts courses such as MCA, PGDBM, and DLT all affiliated to Savitribai Phule Pune University. The IMCC also runs a guidance centre to those appearing for NET/SET examination in Library and Information Science. An autonomous course, namely Postgraduate Diploma in Digital Library, Automation and Networking is conducted here. The institution also houses a research centre in Management Science. The institution enjoys in the list of its past students many who have made their mark in the merit list of the University, or have come into limelight at national and international level.
MES-Balshikshan-Mandir-English-Medium-School-Primary

MES Balshikshan Mandir English Medium School (Pre-Primary School)

131, Chatrapati Rajaram Maharaj Path, Mayur Colony, Kothrud, Pune - 411038
Established in 1979

Medium - English

Balshikshan Mandir English Medium School is known for its development oriented outlook. The School aims at high quality education, developing scientific temperament, and creating a supportive environment for it, developing team spirit as also sensitiveness to lead a meaningful life. The School which has received an ISO ranking has been continuously reviewing its quality management system.

MES Poorva-Prathamik Shala, Pune

1453-1454 Sadashiv Peth, Pune, 411030
Established in 1979

Medium - Marathi

This Pre-Primary School aims to develop interest in studying among the students. The education imparted here is activity based learning or constructivism. There is a secured playground and educational equipment which develops observation skills.

MES Shishu Mandir, Pune

Bhandarkar Road, Deccan Gymkhana, Pune 411004
Established in 1979

Medium - Marathi

Located in the Deccan Gymkhana area established in 1979, this Pre-Primary School has Marathi medium. The School has a group of experienced teachers and educational resources. The children can avail of the library, nutritious food, and extensive playground. CCTV facility is provided for the safety of the students. They can seek help from an experienced counselor, if required. The institution provides training and guidance in various subjects to the teachers to keep them abreast of changing syllabus.
MES-Bal-Shikshan-Mandir-English-Medium-School-Pune

MES Bal Shikshan Mandir English Medium School (High School), Pune

131, Mayur Colony, Kothrud, Pune 411 038
Established in 1979

Medium – English

ATAL Tinkering Lab

 

 

Balshikshan Mandir English Medium School is known for its development oriented outlook. The School aims at high quality education, developing scientific temperament, and creating a supportive environment for it, developing team spirit as also sensitiveness to lead a meaningful life. The School which has received an ISO ranking has been continuously reviewing its quality management system.
MES-Balshikshan-Mandir-English-Medium-School-Primary

MES Bal Shikshan Mandir English Medium School (Primary), Pune

131, Chatrapati Rajaram Maharaj Path, Mayur Colony, Kothrud, Pune - 411038
Established in 1979

Medium - English

Balshikshan Mandir English Medium School is known for its development oriented outlook. The School aims at high quality education, developing scientific temperament, and creating a supportive environment for it, developing team spirit as also sensitiveness to lead a meaningful life. The School which has received an ISO ranking has been continuously reviewing its quality management system.
MES-Renuka-Swaroop-Memorial-Girls-High-School

MES Renuka Swaroop Memorial Girls Junior College, Pune

(Formerly known as Girls Bhave School)
1453-1454 Sadashiv Peth, Pune, 411030
Established in 1935

This girls' School established in 1935 is an important landmark in the golden history of MES. Besides imparting quality education, the School is also distinguished by extracurricular activities such as school level competitions, educational exhibitions, training classes, excursions etc. The School has projects such as NCC, girl guides' corps, Savitribai Phule Dattak Palak Yojana, personality development centre etc. A well-equipped laboratory and a rich library in the School have helped to extend quality education to girls.
Scroll to Top
Skip to content