म.ए.सो.चे तीन विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी रोहन राजेंद्र पिंगळे आणि कपिल लक्ष्मण नलवडे यांनी  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तर एमईएस प्री-आएएस कॉम्पिटेटीव्ह एक्झाम ट्रेनिंग सेंटरचा विद्यार्थी रोहित विष्णू गायकवाड याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते आज त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव व डॉ. दिलीप शेठ, म. ए. सो. चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी व सहाय्यक सचिव सुधीर भोसले, म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, म. ए. सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रोहन पिंगळे हा म. ए. सो. आबासाहेब गरवारे कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र शाखेचा माजी विद्यार्थी असून त्याने ५८१ वा तर म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी असलेल्या कपिल नलवडे याने ६६२ वा क्रमांक मिळवून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२५ च्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या दोघांचीही भारतीय महसूल सेवेत निवड झाली आहे. याचबरोबर दिव्यांग असलेल्या रोहित गायकवाड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत यश मिळवले असून बृहनमुंबई महानगर पालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदावर त्याची निवड झाली आहे.

कपिल नलवडे आणि रोहित गायकवाड यांना एमईएस प्री-आएएस कॉम्पिटेटीव्ह एक्झाम ट्रेनिंग सेंटरमध्ये डॉ. शोभा कारेकर, डॉ. अपर्णा आगाशे, डॉ. विमली बसू आणि प्रा. किशन कुंबरे यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने शकुंतला खटावकर सन्मानित

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने शुभंकर खवले व प्रियेशा देशमुख गौरवान्वित

माजी राष्ट्रीय महिला कबड्डीपटू, संघटक आणि मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी शकुंतला खटावकर यांना आज २०२३-२४ या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मल्लखांबपटू आणि म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा माजी विद्यार्थी शुभंकर खवले याचा आजच्या समारंभात २०२३ -२४ या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ३ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

नेमबाज व मएसो रेणुका स्वरूप प्रशालेची माजी विद्यार्थिनी प्रियेशा देशमुख या दिव्यांग खेळाडूला पॅरा-शूटींग या क्रीडा प्रकारात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ३ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मएसो शूटींग रेंजवरील प्रशिक्षणाने प्रियेशा यांचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. तेथेच त्यांना आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांचे मार्गदर्शन लाभले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज (शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२५) झालेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभात मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार्थींना गौरविण्यात आले. या वेळी राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे दत्ता भरणे, मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शकुंतला खटावकर या ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळवणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला क्रीडापटू आहेत. १९७८ मध्ये केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९७९ ते १९८२ या कालावधीत १०६ राष्ट्रीय कबड्डी सामने खेळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ८ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत.

प्रियेशा देशमुख यांचा आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात मएसो क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष व मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव यांच्या हस्ते व अंजली भागवत यांच्या विशेष उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी मएसोचे सहाय्यक सचिव व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे क्रीडा संचालक व मएसोच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. उमेश बिबवे आणि प्रियेशा यांचे वडील श्री. शरदराव देशमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे सर्व पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

 

 

 

बारामुल्लातील महिलांना फॅशन डिझाइनिंगचे प्रशिक्षण 

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय लष्कर, असीम फाऊंडेशन आणि महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चिनार युवा केंद्रात चालवण्यात येणारा पहिला ‘फॅशन डिझाइनिंग स्कील कोर्स’ पूर्ण केलेल्या ४० विद्यार्थिनी आणि महिला प्रशिक्षणार्थींना मंगळवार, दि. ८ एप्रिल २०२५ रोजी प्रमाणपत्र देण्यात आली. वर्षभरात दोन वेळा हा कोर्स आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, ‘मएसो’च्या नियामक मंडळ सदस्य आणि मएसो आयएमसीसीच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. सौ.  मानसी भाटे आणि मएसो  रेणुका स्वरूप करियर कोर्सेच्या समन्वयक सौ. सारिका वाघ यांच्या हस्ते ही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.  या वेळी चिनार युवा केंद्राचे मार्गदर्शक मेजर अंकित शर्मा आणि असीम फाऊंडेशनच्या विश्वस्त निरूता किल्लेदार हे देखील उपस्थित होते.

सौ. आनंदीताई पाटील यांनी  प्रशिक्षणार्थिंना मार्गदर्शन केले. तसेच मेजर अंकित शर्मा यांनीही विद्यार्थिनींशी संवाद साधला.

काश्मीर खोऱ्यातील अनेक अडचणींना तोंड देत प्रशिक्षणार्थिंनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. आपल्या भावना व्यक्त करताना, फॅशन डिझाइनिंगच्या प्रशिक्षणामुळे स्वयंरोजगार मिळवणे शक्य होणार असल्याचे काही प्रशिक्षणार्थिंनी सांगितले. तर काही जणींनी या प्रशिक्षणानंतर स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.

चिनार युवा केंद्रात चालवण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण, संगीत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयक प्रशिक्षणासाठी ‘मएसो’च्या सहकार्यासंदर्भात या वेळी विचारविनिमय करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. म. ए. सो. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे होते. यावेळी म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले आणि म. ए. सो. कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुजाता आडमुठे तसेच महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ध्वजारोहणापूर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ ‌ किशोर देसरडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आणि त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले. म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या आर्मी आणि नेव्हल युनिटच्या विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली. म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यामध्ये पारितोषिक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. डॉ ‌ किशोर देसरडा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

म. ए. सो. मुलांचे विद्यालयात प्रभात फेरीने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे १९५६ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असलेले मेजर अरुण फाटक (निवृत्त) उपस्थित होते. शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळेचे महामात्र श्री. सुधीर गाडे, मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे, उपमुख्याध्यापक श्री. चंदू गवळे, पर्यवेक्षिका सौ. रसिका लिमये, आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक या वेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी ध्वजाला सलामी देऊन ध्वजप्रतिज्ञा घेतली. प्रमुख पाहुण्यांसह पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.सी.सी.) पथकांचे निरीक्षण केले. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले गेले. शासनाच्या सूचनेनुसार ‘तंबाखूमुक्त भारत अभियान’अंतर्गत तंबाखूमुक्तीसाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली. प्रशालेतील एन.सी.सी.च्या विविध वार्षिक उपक्रमांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना फिरते चषक देऊन मेजर अरुण फाटक (निवृत्त) यांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, एरोबिक्स, पिरॅमिडस, देशभक्तीपर गीतावरील नृत्य, सायलेंट ड्रिल, घोष प्रात्यक्षिक, मल्लखांब प्रात्यक्षिक, लेझीम अशी विविध प्रात्यक्षिके सादर केली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे संकुलामधील मराठी माध्यमाचे पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभाग तसेच एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल या सर्व शाखांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव आणि शाला समितीचे महामात्र सुधीर भोसले होते. म. ए. सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत, म. ए. सो. बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे, एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर आणि पालक संघाच्या उपाध्यक्षा सोनाली क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. म. ए. सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांनी ध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी घोष, सामूहिक कवायत, गट्टू मल्लखांब, देशभक्तीपर गीतावर आधारित नृत्य, मल्लखांब अशी विविध गुणवत्ता पूर्ण प्रात्यक्षिके सादर केली. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेले मल्लखांबावरील मानवी मनोरे हे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे सर्वोच्च आकर्षण ठरले.
एम.ई.एस.इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, शिरवळमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, घोषपथक, घुंगरू काठी, देशभक्तीपर नाटक व विविध स्पर्धांतील पारितोषिके यामुळे या वर्षीचा प्रजासत्ताक दिन आगळा-वेगळा ठरला. केंद्रीय राखीव दलाचे अधिकारी श्री. विलास साखरे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी म.ए.सो. च्या आजीव सदस्य मंडळाच्या सदस्य व शाला समितीच्या महामात्रा सौ. प्रणिता जोगळेकर, मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहकार्यवाह श्री. नागेश भूतकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि ध्वजारोहण करून झाली. राष्ट्रगीत व ध्वजगीतानंतर माध्यमिक विभागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी शिस्तबद्ध संचलन केले. यानंतर संस्थेच्या क्रीडाकरंडक स्पर्धेमध्ये विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यानंतर पूर्व- प्राथमिक व प्राथमिक विभागातील तीन विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यर्थिनींनी वंदेमातरम गीतावर नृत्य सादर केले.
म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कर्नल विजयकुमार (निवृत्त) यांच्या हस्ते भारतमाता पूजन व ध्वजारोहण झाले. याप्रसंगी शाला समितीच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, म.ए.सो. सिनियर कॉलेजच्या प्रा. पूनम रावत, समुपदेशक वैशाली बोबडे, रोटरी क्लब पुणे विसडमचे नीलेश धोपटे, पालक प्रतिनिधी अपर्णा धर्माधिकारी, शाळेचे कमांडंट ए.वि.एन. विंग कमांडर एम. यज्ञरामन, शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, पर्यवेक्षक शाम नांगरे व संदीप पवार हे उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर सर्व कॅडेट्सने शानदार संचलन करीत अश्वांसहित ध्वजाला व प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. महाराष्ट्र गीत, ध्वज गीत व प्रतिज्ञा झाल्यानंतर सायलेंट ड्रील, बँड, लेझीम, कराटे, मर्दानी खेळ, धनुर्विद्या, रायफल शूटिंग, योगासन, मल्लखांब आणि घोडेस्वारी अशा चित्तथरारक प्रात्यक्षिकांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एअर विंग एन.सी.सी. च्या सार्जंट राधिका हेमंत चव्हाण – Best Cadet, विधी वसंत वर्पे – Best in Turnout, कॅडेट अनया अनिकेत कदम – Best in Drill यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते ट्रॉफी देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून समन्वय आणि सांघिकतेचे उदाहरण प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन यांच्या हस्ते विविध विषयात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सौ. अर्चना दिलीप पटवर्धन, विज्ञान भारतीचे पश्चिम क्षेत्राचे संघटन मंत्री श्रीप्रसाद एम.के., केंद्रीय कर्यकारी समितीच्या सदस्य डॉ. मानसी मालगांवकर, पश्चिम महाराष्ट्राचे सचिव डॉ. कौस्तुभ साखरे, कोषाध्यक्ष प्रो. अभिषेक कुलकर्णी, श्री. चाफेकर, श्रीमती मीना मालगांवकर, शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव, ‘मएसो आयएमसीसी’चे संचालक डॉ. संतोष देशपांडे व संस्थेचे मान्यवर या वेळी उपस्थित होते. प्रत्यक्ष वापरातील व स्थिर स्वरुपाच्या वैज्ञानिक प्रतिकृती असलेले ‘स्पेस ऑन व्हील्स’ हे भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’चे फिरते प्रदर्शन हे या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. अवकाशाचा वेध या संकल्पनेवर आधारित प्रश्नमंजुषा, निबंधलेखन, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच शाखांमध्ये अशाप्रकारे विविध उपक्रमांसह देशाचा ७६ वा प्रजासत्ताक दिन अतिशय आनंद, उत्साह आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीत कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनात म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची माजी विद्यार्थिनी आणि भारतीय वायूदलातील अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख या सुपरन्युमेररी ऑफिसर (Supernumerary officer) म्हणून फ्लाईट लेफ्टनंट नेपो मोईरांगथेम व फ्लाईंग ऑफिसर अभिनव घोष यांच्यासह सहभागी झाल्या होत्या. भारतीय वायूदलातील १४४ अधिकाऱ्यांच्या या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉडर्न लीडर महेंद्र सिंह यांनी केले.
दामिनी दिलीप देशमुख यांचे इ. ५ वी चे इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत झाले आहे. इ. १२ वी च्या परीक्षेत शाळेत त्या सर्वप्रथम आल्या होत्या. शालेय जीवनात त्यांनी धनुर्विद्या आणि किक-बॉक्सिंग या खेळांमध्ये राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करून अनेक पारितोषिके पटकावली आहेत. उच्च शिक्षणासाठी त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बी.ई. (मेकॅनिकल) ही पदवी प्राप्त केली.
दामिनी देशमुख यांची डिसेंबर २०१९ मध्ये भारतीय वायूसेनेत निवड झाली. सैन्यात जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना दामिनी यांनी आपल्या यशाचे श्रेय आपली शाळा आणि शिक्षकांना दिले होते. “आज आभार नाही मानणार, तुमच्या ऋणातच राहायला आवडेल” असे त्या म्हणाल्या होत्या.
सैन्यदलांमध्ये महिलांना सेवेची संधी मिळावी, शालेय वयातच त्यादृष्टीने जडणघडण व्हावी या हेतूने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने १९९५ मध्ये केवळ मुलींना सैनिकी शिक्षण देण्यासाठी पुणे जिल्हातील कासारआंबोली येथे म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा सुरु केली. महाराष्ट्राच्या सर्व भागातून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलींमध्ये विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची संख्या अधिक असते. गेल्या तीस वर्षांच्या वाटचालीत शाळेतील विद्यार्थिनींनी शैक्षणिक तसेच गिर्यारोहण, अश्वारोहण, क्रीडा, कला अशा सर्वच शिक्षणेतर व शिक्षणपूरक क्षेत्रातील स्पर्धांमध्ये नेत्रदिपक यश प्राप्त केले आहे. शाळेतील अनेक विद्यार्थिनी सैन्याच्या पायदळ, वायूदल, नौदल, तटरक्षक दलात दाखल झाल्या आहेत. तसेच पोलीस दल, केंद्र सरकारी सेवांच्या माध्यमातून विविध आव्हानात्मक क्षेत्रात कार्यरत आहेत.
या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात झालेल्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख यांच्या निवडीने म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. केवळ मुलींसाठी स्वतंत्र सैनिकी शाळा सुरू करण्याचा संस्थेचा उद्देश सार्थ होत असल्याचे शाळेच्याच माजी विद्यार्थिनींच्या कर्तृत्वातून दिसून येत आहे.

पुणे, दि. ११ : स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करत, राजमाता जिजाऊंना अभिवादन करत माध्यमिक शाळांमधील लहानग्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या घोषपथकांनी सादर केलेल्या वीरवृत्ती आणि चेतना जागवणाऱ्या प्रांगणीय संगीत म्हणजेच मार्शल म्युझिकमधील रचनांनी युवा चेतना दिनाचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षी युवा चेतना दिन साजरा करण्यात येतो. म. ए. सो. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (शनिवार, दि. ११ जानेवारी २०२५) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते बुद्धिबळपटू जयंत गोखले आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर उप आयुक्त उज्ज्वल अरुण वैद्य या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, नियामक मंडळाचे सदस्य व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, संस्थेचे सहाय्यक सचिव व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

संस्थेच्या विविध जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या १२ घोषपथकांनी विविध रचना यावेळी सादर केल्या. घोषपथकातील विविध आकारांच्या, आवाजांच्या, सूरांच्या आणि तालांच्या वाद्यांचा एकत्र मेळ घालत विद्यार्थ्यांनी केलेल्या सुरेल वादनाने प्रांगणीय संगीताची वैशिष्ट्ये उपस्थितांना अनुभवायला मिळाली. किरण तसेच भूप, केदार, शिवरंजनी रागातील पारंपारिक रचनांबरोबरच नव्याने बांधलेली ‘अयोध्या’ ही रचना सर्वांच्या मनाचा ठाव घेणारी होती. या रचना सादर करताना काही घोषपथकांनी वर्तृळ, बाण अशा विविध आकारांच्या रचनेत उभे राहून, संचलन करत सादर केलेले वादन शिस्तीचा संस्कार सांगणारे होते. म.ए.सो. मुलांचे विद्यालयाच्या घोषपथकाने सादर केलेली ‘राम आएँगे आएँगे राम आएँगे…’ ही धून बरोबर एक वर्षापूर्वी झालेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या स्मृती जागवणारी होती.

 

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या घोषपथकाने लष्करी गणवेशात आणि अतिशय शिस्तबद्धपणे केलेले सादरीकरण उपस्थितांना प्रजासत्ताक दिनी राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या सैन्यदलांच्या संचलनाचा अनुभव देऊन गेले. या घोषपथकाने सादर केलेल्या ‘जयोस्तुते श्री महन्मंगले…’ या रचनेने वातावरण वीरश्री आणि देशप्रेमाने भारावून गेले. म.ए.सो. रेणुका स्वरुप प्रशालेच्या घोषपथकाने केलेले सादरीकरण ताल आणि सुरांच्या सुरेल संगमातून निर्माण होणाऱ्या नादाची अनुभूती देणारे होते. ‘अयोध्या’ ही नवीन रचना म्हणजे शौर्य आणि शांत रसाचे अभिनव मिश्रण होते.

 

संस्थेच्या विविध जिल्ह्यातील शाळांमधील घोषपथकातील साईड ड्रमर्सनी किरण आणि भूप रचनांवर आधारित एकत्रितरित्या सादर केलेले प्रात्यक्षिक म्हणजे तालसंगीतामुळे साधल्या जाणाऱ्या समन्वयाचे उत्तम उदाहरण होते. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या घोषपथकाने सादर केलेल्या ‘शिवगर्जने’ने या प्रात्यक्षिकांचा समारोप झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विजय भालेराव यांनी युवा चेतना दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली.

या प्रसंगी बोलताना जयंत गोखले यांनी, खेळ आणि अभ्यास यांच्यात समन्वय साधण्याची गरज असली तरी खेळांना प्राधान्य दिले पाहिजे याकडे लक्ष वेधले. अभ्यासाला वयाचे बंधन नसते मात्र खेळासाठी आवश्यक असलेले कठोर परिश्रम करायला वयामुळे मर्यादा येतात, त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या खेळाला प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर खेळाडूंनी देखील आपल्या आवडीच्या खेळासाठी निश्चयपूर्व आणि झोकून देऊन सराव केला पाहिजे. देशात क्रीडा क्षेत्राला पोषक असे व्यावसायिक वातावरण निर्माण झाले आहे, त्याचा उपयोग करून घ्यावा असे ते म्हणाले.

उज्ज्वल वैद्य यांनी आपल्या भाषणात, शिक्षणात पुस्तकी ज्ञानावर भर दिला जात असून खेळातून होणाऱ्या संस्कारांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. शालेय वय हे लक्ष्य साध्य करण्याचे वय असते, आपले लक्ष्य साधण्यासाठी विविध साधनांचा वापर करावा लागतो. मात्र आपल्या मार्गात अडथळे आणणाऱ्या स्मार्टफोनसारख्या साधनांच्या आहारी जाऊ नका, गेम खेळणे, सोशल मिडियाचा वापर करणे यासाठी तो वापरू नका. आपले आई,वडील, शिक्षक, गुरुजन यांच्याशी मनातील गोष्टी मोकळेपणाने बोला. चुकीचे भय मनात ठेवू नका कारण त्यातून अधिक चुका होतात, असा सल्ला त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. उमेश बिबवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर सुधीर भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.

“विद्यार्थीदशेतील जीवन हा आयुष्यातील सोनेरी काळ असतो. अभ्यासक्रमाला अनुसरून विद्यार्थी ज्या गोष्टी आत्मसात करतो, त्यातून त्याला जीवनभर पुरेल असे शिक्षण मिळते. त्यामुळे शिकण्यासाठी इच्छाशक्ती आवश्यक असते. कोणतेही शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करणे उपयोगी ठरत नाही. कष्टांना पर्याय नसतो, त्यामुळे मनापासून कष्ट केले पाहिजेत. आपला दृष्टिकोन केंद्रीत (Focused Approach) असला की कोणताही विषय आत्मसात करणे सोपे जाते,” अशा शद्बात राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी ‘मएसो’च्या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आज (शनिवार, दि. ७ डिसेंबर २०२४) म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. डॉ. मोहितकर यांच्या हस्ते चाळीस गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे आणि सहाय्यक सचिव सुधीर भोसले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. राज्याचे तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
डॉ. मोहितकर पुढे म्हणाले, “आज गौरवण्यात आलेला प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षणात यश मिळाल्यानंतर आपल्या निवडलेल्या क्षेत्रात कार्यरत आहे, हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयांमधील शिक्षणाच्या प्रक्रियेचे यश आहे, त्यामुळे सर्व प्राध्यापक कौतुकास पात्र आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे आपण साचेबद्ध शिक्षण व्यवस्थेकडून लवचिक शिक्षण व्यवस्थेकडे जात आहोत. विद्यार्थ्यांना विषय निवडचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. शिक्षकवर्गासाठी हे मोठे आव्हान आहे, नवनवे विषय आत्मसात करत राहणे त्यांच्यासाठी अनिवार्य झाले आहे.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाबासाहेब शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला गुणवंत विद्यार्थ्यांची मोठी परंपरा लाभली आहे. या विद्यार्थ्यांनी देशविदेशात नांवलौकिक मिळविला आहे. आजचा गौरव समारंभ हा पुढील पिढीतील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. संस्था कायमच कालानुरुप शिक्षण देताना सातत्याने नवनवे उपक्रम सुरू करीत आली आहे. लवकरच संस्थेचे लॉ कॉलेज आणि इंजिनियरींग कॉलेज सुरू होत आहे. क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.”
, “शिक्षण हा एक प्रवास आहे, त्यामुळे सातत्याने शिकत राहिले पाहिजे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी केवळ शिक्षण देत नाही तर संस्कार देते. त्यामुळे आजचे विद्यार्थी भविष्यात देशाचे नेतृत्व करणार आहेत, ” असे एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) अध्यक्षीय भाषणात म्हणाले.
सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन तर देवकी भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुणे, ९ डिसेंबर २०२४ – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (मएसो) आणि दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठ यांच्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन सहयोगासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. मएसोच्या वतीने संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी आणि मएसोच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व एमईएस सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांनी तर क्वांगवून विद्यापीठाच्या वतीने आंतरराष्ट्रीय संबंध व कोरियन भाषा संस्थेचे संचालक डॉ. बेंजामिन चो आणि विद्युत व जैविक भौतिकशास्त्र विभाग व प्लाझ्मा बायोसायन्स रिसर्च सेंटरचे प्राध्यापक प्रा. नागेंद्र कौशिक यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मएसोच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे अध्यक्ष डॉ. राजीव हजिरनीस, मएसोचे सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. तनुजा देवी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

डॉ. बेंजामिन चो या वेळी बोलताना म्हणाले, “मएसो आणि क्वांगवून विद्यापीठ यांच्यात झालेला हा करार शैक्षणिक नावीन्य व सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापकांना लाभदायक ठरतील अशा संधी आम्ही एकत्रितपणे निर्माण करू.”

प्रा. नागेंद्र कौशिक म्हणाले, “ आंतरशाखीय संशोधनासाठी हा करार महत्त्वाचा ठरेल. विद्युत व जैविक भौतिकशास्त्र तसेच प्लाझ्मा बायोसायन्समध्ये नावीन्यपूर्ण संशोधनासाठी हा करार मार्ग मोकळा करेल.”

सौ. आनंदी पाटील आपले मनोगतात व्यक्त करताना म्हणाल्या, “हा करार जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. तो विद्यार्थी व प्राध्यापकांना जागतिक पातळीवर नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या संधी प्रदान करेल, असा मला विश्वास आहे.”

या सामंजस्य कराराद्वारे प्राध्यापक व विद्यार्थी विनिमय कार्यक्रम, संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक कार्यशाळा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांसारख्या अनेक उपक्रमांना चालना दिली जाणार आहे.

या कार्यक्रमाचा समारोप मानचिन्हांचे आदान-प्रदान आणि दोन्ही संस्थांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा संकल्प व्यक्त करत करण्यात आला. हा करार मएसो व क्वांगवून विद्यापीठासाठी परिवर्तनशील संधी निर्माण करण्याचा मार्ग मोकळा करेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

“व्यंगचित्रामध्ये कमीतकमी रेषांचा वापर करून विविध भावभावना व्यक्त करता येतात, निरिक्षणातून व्यंगचित्रातील विविध व्यक्तिमत्व साकारता येतात. त्यासाठी एकाग्रता आवश्यक असते. ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनातील चित्रे बघत असताना लहान वयातील विद्यार्थ्यांची एकाग्रता लक्षात येत होती, आपल्या आवडत्या विषयात एकाग्रता साधणे सहज होते, म्हणूनच आपली आवड कोणती याचा शोध घेत राहिले पाहिजे आणि त्याची प्रेरणा या चित्रकला प्रदर्शनातून मिळत आहे. प्रत्येक व्यक्तीची सौंदर्यदृष्टी विकसित होत जाईल तसे आपला देशातील वातावरण सुधारत जाईल, त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांची कलेची आवड जोपासावी,” अशा शद्बात ख्यातनाम व्यंगचित्रकार चारुहास पंडित यांनी जीवनातील कलेचे महत्व अधोरेखित केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘म.ए.सो. कलावर्धिनी’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शन आणि स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या प्रसंगी म.ए.सो. कलावर्धिनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, म.ए.सो. कलावर्धिनीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या महामात्र सौ. प्रणिता जोगळेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य राहुल मिरासदार आणि अजय पुरोहित या वेळी आवर्जून उपस्थित होते.

या प्रसंगी आपले विचार मांडताना प्रदीप नाईक म्हणाले की, चित्रांमधून विद्यार्थ्यांचे विचार व्यक्त होतात, विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून सामाजिक समस्यांबद्दल संदेश दिला आहे. त्यामुळे प्रदर्शनातील चित्रे बघून देशाच्या भावी पिढीबद्दल आशा वाढीला लागली आहे. संस्थेच्या विविध शाखांमध्ये उत्तम चित्रकार आहेत हे दिसून आले आहे. चित्रकलेने मानवी जीवन व्यापले आहे. खाद्यपदार्थ तयार करणे, कपडे शिवणे, घराचे बांधकाम अशा सर्वच बाबतीत चित्रकला अनुभवायला मिळते. प्रमाणबद्धता, लयबद्धता, रंग हेच तर मानवी जीवन आहे. विद्यार्थ्यांनी चित्रकलेची साधना वाढवून जीवनात आनंद मिळवावा आणि एक चांगला माणूस म्हणून स्वतःला घडवावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ म्हणाले की, कलेची मांडणी करणे हा एक संस्कार आहे. प्रदर्शनातील चित्रांमधून म.ए.सो. चा संस्कार दिसून येत आहे, एकाही विद्यार्थ्याचे चित्र विचित्र नाही. मात्र, चित्रांच्या विषयामध्ये विविधता आहे. त्यातून शाळेतील कलाशिक्षकांची प्रेरणा आणि त्यांनी घेतलेले परिश्रम दिसून येत आहे. कला ही बहुआयामी असते, प्रत्येक चित्र हे प्रेरणादायी असते, ती प्रेरणा या प्रदर्शनामुळे जनमानसात पोहोचेल.

या वेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. इ. १ ली ते ४ थी च्या गटात म.ए.सो. ज्ञानमंदिर, कळंबोली या शाळेतील इ. ३ री मधील विद्यार्थिनी माही आबासाहेब लवटे हिने काढलेल्या चित्राला प्रथम क्रमांक मिळाला. इ. ५ वी ते ७ वी गटात म. ए. सो. इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ या शाळेतील इ. ७ वी तील विद्यार्थिनी आर्या अमोल नवले हिने तर इ. ८ वी ते १० वी च्या गटात म.ए.सो. वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेतील इ. ९ वी तील विद्यार्थी श्रवण मोहन अकार्शे याने प्रथम क्रमांक मिळविला. इ. ११ वी ते १२ वी या गटात म.ए.सो. आबासाहेब गरवारे ज्युनिअर कॉलेजमधील इ. ११ वी चा विद्यार्थी अभिनव संभाजी लांडे याच्या चित्राल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या चित्रांचे परीक्षण विश्वास निकम आणि संदेश पवार या कला शिक्षकांनी केले.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सौ. स्वाती जोशी यांनी तर सूत्रसंचालन कलाशिक्षक गोपाळ खंडाळे यांनी केले.

या प्रदर्शनात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील शाळांमधील इ. १ ते १२ तील विद्यार्थ्यांनी चितारलेली निवडक तीनशे चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुक्त चित्र, निसर्ग चित्र, मधुबनी, गोंद, राजपूत अशा विविध शैलीतील चित्रांचा समावेश आहे.

शिरवळ ग्रामस्थ, पालक व कला रसिकांसाठी हे प्रदर्शन शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

 

“अन्न, वस्त्र व निवारा याप्रमाणे माणसांच्या जीवनात कलेचे स्थान देखील महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार लपलेला असतो, कला आत्मसात करण्यासाठी एकाग्रता महत्वाची असते, सातत्याने प्रयत्न केले तर कला साधता येते. त्यामुळे शालेय वयातच कलेचे संस्कार होणे गरजेचे असते. कलेचा संस्कार झालेला माणूस एक चांगला नागरिक होते, त्यातूनच सभ्य समाज निर्माण होतो. म्हणूनच, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांवर म.ए.सो. कलावर्धिनीच्या माध्यमातून होत असलेला कलेचा संस्कार महत्वाचा आहे,” अशा शद्बात ख्यातनाम शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आज (बुधवार, दि. २७ नोव्हेंबर २०२४) कलेचे महत्व अधोरेखित केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ या शाळेत म.ए.सो. कलावर्धिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगवेध’ चित्रकला स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शिल्पकार कांबळे बोलत होते. त्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, म.ए.सो. कलावर्धिनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, शाळेच्या महामात्र सौ. प्रणिता जोगळेकर, म.ए.सो. कलावर्धिनीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव सुधीर भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रदर्शनात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील शाळांमधील इ. १ ते १२ तील विद्यार्थ्यांनी चितारलेली निवडक तीनशे चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मधुबनी, गोंद, राजपूत अशा विविध शैलीतील चित्रांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कला शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने मात्र यापूर्वीच कलाशिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. शाळांमध्ये कलाशिक्षक नसले तरी कलेचा संस्कार व्हावा, विद्यार्थ्यांना कला आत्मसात व्हावी यासाठी म.ए.सो. कलावर्धिनीच्या माध्यमातून गायन, वादन, नृत्य अशा विविध कलाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे प्रदर्शित करण्यासाठी संस्थेच्या प्रत्येक शाळेमध्ये एक आर्टवॉल उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रंगवेध’ या चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाप्रमाणेच ‘स्वरवेध’ आणि ‘तालवेध’ या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यामाध्यमातून केवळ शिक्षकच नाहीत तर शाळेच्या परिसरातील कलाकार देखील शाळेशी जोडले जातात. ‘रंगवेध’ चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असून यापूर्वी पुणे, बारामती व पनवेल येथील शाळांमध्ये ते आयोजित करण्यात आले होते. शिरवळमध्ये आयोजित करण्यात आलेले ग्रामीण भागातील हे पहिलेच प्रदर्शन आहे.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रणिता जोगळेकर यांनी तर पार्थ रावळ यांनी सूत्रसंचालन केले.

हे प्रदर्शन शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शिरवळ ग्रामस्थ, पालक व कला रसिकांसाठी खुले राहणार आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरवळ येथे दि. २७,२८ व २९ नोव्हेंबर २०२४ असे तीन दिवस ‘रंगवेध’ हे चित्रकला प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. ‘म.ए.सो. कलावर्धिनी’च्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमधील इ. १ ली ते इ. १२ वी तील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी चित्रे पाठवली होती. त्यातील निवडक ३५० चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. ही माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष व एम.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील आणि ‘म.ए.सो. कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी आज (सोमवार, दि. २५ नोव्हेंबर २०२४) पत्रकारांशी संवाद साधताना दिली दिली. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी, ‘रंगवेध’ प्रदर्शनाचे समन्वयक अनिल म्हस्के, कलाशिक्षक गोपाळ खंडाळे, पर्यवेक्षिका सौ. सुजाता टेकाडे उपस्थित होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिध्द शिल्पकार श्री. प्रमोद जी कांबळे यांच्या हस्ते बुधवार, दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ . ३० वाजता होणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ४.०० वाजता होणार आहे. प्रसिध्द व्यंगचित्रकार श्री. चारुहास पंडित या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री.  प्रदीप नाईक या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तसेच म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री.  बाबासाहेब शिंदे यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती राहणार आहे.

हे चित्रकला प्रदर्शन शुक्रवार, दि. २९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शिरवळ ग्रामस्थ, पालक आणि कला रसिकांसाठी खुले असेल. शिरवळ आणि परिसरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना नियोजित वेळेत हे प्रदर्शन बघता येणार आहे.

या दोन दिवसात सुंदर हस्ताक्षर, अक्षर लेखन, टाकावूतून टिकाऊ, कागदकाम, स्थिर चित्र, स्मरण चित्र अशा विविध विषयांवरील प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. मएसोच्या शाळांमधील कलाशिक्षक उमेश पवार, राजगौरी जगताप, माधुरी जगताप, नयना दिनकर हे विद्यार्थ्यांना या कला प्रकारातील विविध कौशल्ये उलगडून दाखवणार आहेत.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ कार्यरत आहे. मनातील कल्पनांना मूर्तरूप देण्याचे प्रभावी साधन म्हणजे चित्रकला! म्हणूनच ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ तर्फे दरवर्षी ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांना व्यासपीठ मिळवून देण्यात येते. या पूर्वी पुणे, बारामती, पनवेल येथे संस्थेच्या शाळांमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ‘म.ए.सो. कलावर्धिनी’ च्या माध्यमातून ‘रंगवेध’ प्रमाणेच दरवर्षी गायनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्वरवेध’ आणि विविध स्वरुपाच्या वाद्यवादनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘तालवेध’ या स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने २०२३ सालापर्यंत क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचे ध्येय निश्चित केले होते, आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये या संकल्पाचा उल्लेखदेखील करण्यात आला होते. मात्र, संस्था २०२४ मध्येच क्लस्टर युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास सिद्ध झाली आहे. त्यामुळे संस्थेने आता अधिक मोठे ध्येय बाळगले पाहिजे,” अशी अपेक्षा संस्थेचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज (मंगळवार, दि. १९ नोव्हेंबर २०२४) व्यक्त केली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६४ व्या वर्धापनदिनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य, संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, संस्थेचे माजी सचिव श्री. आर. व्ही. कुलकर्णी, संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) पुढे म्हणाले की, कार्याच्या विस्तारासाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांशी करार करणे, संस्थेच्या सर्व महाविद्यालयांनी ‘नॅक सर्टिफिकेशन’ मिळवणे, शाखांच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृती करणे, कौशल्य आणि नवसर्जनाला प्रोत्साहन देणे या दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आपल्या १६४ वर्षांच्या वाटचालीत शिक्षण आणि संस्कार यांच्या माध्यमातून सक्षम पिढ्या घडविल्या आहेत. सध्याची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे संस्थेच्या कार्याची दिशा स्पष्ट करताना म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थापकांनी संस्थेची स्थापना केली, तो वारसा आपण पुढे नेत आहोत ही आनंद आणि अभिमानाची बाब आहे. १६४ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने नेहमीच कालानुरूप बदल केले आहेत. संस्थेच्या नवीन नियामक मंडळाने वर्षाच्या सुरवातीलाच एक चिंतन बैठक घेऊन त्यामध्ये काही संकल्प केले, ते पूर्ण करण्यासाठी निश्चित योजना, उपक्रम आखण्यात आली आणि त्यादृष्टीने आज आपण समाधानकारक प्रगती केली आहे. आगामी वर्षात आपल्या संस्थेचे लॉ कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल. संस्थेने क्लस्टर युनिव्हर्सिटीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे. समाजातील सर्व घटकांना आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देताना निधीची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यादृष्टीने प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी कृतज्ञता निधी संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. राज्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या संस्थेचे कार्य आता जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील सुरू झाले आहे. संस्थेच्या कार्याचा विस्तार करत असताना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कामामुळे समाधान देखील मिळते. समाजावर शिक्षणाचा परिणाम झाली की समाजाचा शिक्षणावर परिणाम झाला याचे भान बाळगले पाहिजे आणि सभ्य, सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी अधिक कृतिशील होण्याची गरज आहे. देशाच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत, त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्ये देखील सांगितली आहेत. सभ्य आणि सुसंस्कृत विद्यार्थी म्हणजेच पर्यायाने समाज घडविण्यासाठी आपण प्रत्येकाने नागरी शिष्टाचार, पर्यावरणाचे संरक्षण, कुटुंबाचे प्रबोधन, कोणाच्या मनात न्यूनगंड, वेगळेपणाची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आणि समाजातील सर्वांना सामावून घेणे ही पंचसूत्री व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. संस्थेच्या विविध शाखांमधून शिकणाऱ्या चाळीस हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत आपण पोहोचविले पाहिजेत.
संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, संस्थेचा १६४ वा वर्धापनदिन साजरा करताना आनंद वाटतो आहे. संस्थेचे वय वाढणे म्हणजे अनुभवाचे संचित जमा होणे. संस्थेच्या कार्याचा विस्तार होत असताना सकस, बुद्धिमान नेतृत्व निर्माण होणे आवश्यक असते, त्याकडे लक्ष द्यावे लागेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होत असली तरी आपल्या समाजाची स्थिती ठीक नाही. ही परिस्थिती सुधारण्यासाठी मानवी मनाचे परिवर्तन आवश्यक आहे, त्यासाठी अध्यात्म आणि संतांची शिकवण आपल्याला सहाय्यभूत ठरते. सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आपण याचा विचार केला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले यांनी केले.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि मएसो सिनिअर कॉलेज यांच्या वतीने गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यातील संगम पुलाजवळील गुन्हे अन्वेषण विभागाच्या आवारात असलेल्या आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाच्या ठिकाणी दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता.
इ. स. १८७९ मध्ये अटक झाल्यानंतर आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना पुण्यात संगम पुलाजवळील जिल्हा न्यायालयात (सध्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रांगणात) राजद्रोहाचा खटला चालू असताना न्यायालयीन कोठडीत (सध्याचे रेकॉर्ड रूम) ठेवण्यात आले व त्यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगण्यास एडन येथील कारागृहात पाठवण्यात आले. १७ फेब्रुवारी १८८३ मध्ये अमानुष छळामुळे एडनच्या तुरुंगात त्यांना स्वर्गवास प्राप्त झाला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक असलेले आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी इ. स. १८७४ मध्ये पूना नेटीव इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. त्यांनी पुढे संस्थेची जबाबदारी श्री. वामन प्रभाकर भावे व श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्याकडे सोपवून, देशसेवेसाठी स्वतःला समर्पित केले.
स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा त्याग व अपूर्व योगदानाच्या स्मरणार्थ, त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याची संकल्पना मएसो च्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील यांनी मांडली होती. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख श्री. अविनाश पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मएसो सिनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी स्मारकाची स्वच्छता करून ते फुलांनी सजावले होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे मा. सदस्य श्री. विजय भालेराव, श्री. अजय पुरोहित, मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.
या प्रसंगी फडके स्नेहवर्धिनी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. दिगंबर गोपाळ फडके व श्री. दत्तात्रय वामन फडके, तसेच कार्यकारिणी सदस्य श्री. चंद्रकांत दत्तात्रय फडके, श्री. चंद्रकांत प्रभाकर फडके, सौ. सुलभा लिमये-फडके व श्री. लिमये आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. तुषार दोषी (भा. प्र. से.), पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे, व सौ. दीपाली आढाव, पोलीस निरीक्षक, तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागासाठीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर मोहोळ. या वेळी छायाचित्रात (डावीकडून) श्री. बाबासाहेब शिंदे, श्री. सुधीर भोसले, श्री. विजय भालेराव, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्रीमती मंजुषा दुर्वे, श्रीमती सायली देशमुख व श्री. अजय पुरोहित

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वाढीव मजल्याचे बांधकाम आणि पूर्व प्राथमिक विभागासाठीच्या नूतन वास्तूचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज (रविवार, दि. ३ ऑक्टोबर २०२४) करण्यात आले. या प्रसंगी खा. मोहोळ यांनी मूल्य आणि संस्कार यांची जपणूक करणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था अधिक सक्षम आणि विकसित होण्याची आवश्यकता बोलून दाखविली. तर, राजकीय प्रभाव आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री खा. मुरलीधर मोहोळ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला आगामी पाच वर्षात मोठ्याप्रमाणावर सहकार्य करतील अशी अपेक्षा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या वेळी मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागांच्या मुख्याध्यापिका श्रीमती आदिती कुलकर्णी, श्रीमती मंजुषा दुर्वे व श्रीमती सायली देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागासाठीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर मोहोळ. या वेळी छायाचित्रात (डावीकडून) श्री. विजय भालेराव, श्री. बाबासाहेब शिंदे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्री. प्रदीपजी नाईक, डॉ. अतुल कुलकर्णी. मागील बाजूस (डावीकडून) श्रीमती मंजुषा दुर्वे, श्रीमती आदिती कुलकर्णी, श्रीमती सायली देशमुख

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री खा. मोहोळ म्हणाले की, “देशभरात पुणे शहराचे महत्व आहे. महाराष्ट्राची  सांस्कृतिक राजधानी, आयटी हब, राहण्यासाठी सर्वोत्तम शहर अशा विविध कारणांमुळे पुण्याची वेगळी ओळख आहे. त्याचबरोबर शिक्षणाचे माहेरघर असल्याने देश -विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. शिक्षण क्षेत्रामध्ये पुणे शहराला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा मोलाचा वाटा आहे. अशा या संस्थेच्या भावे स्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. १६३ वर्षांच्या वाटचालीत संस्थेने ज्ञानदानाची अविरत परंपरा कायम ठेवली आहे. सातत्याने होणाऱ्या बदलांना प्रतिसाद देत संस्था नवीन गोष्टींचा स्वीकार करत आली आहे. अशा संस्थेशी आपण जोडले गेलेलो आहोत याचा आनंद, अभिमान वाटतो. गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या वाटचालींलदर्भात सातत्याने माहिती मिळत राहिली आहे. संस्थेच्या वाढीसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी निश्चित कृती आराखडा तयार करावा लागेल. शिक्षण क्षेत्रात मूल्य आणि संस्कार यांची जपणूक करणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था अधिक सक्षम आणि विकसित झाली पाहिजे, या संस्थेचा एक घटक म्हणून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य मी करीन.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “ मयूर कॉलनीतील मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे आवार हे आदर्श कॅम्पस आहे. संस्थेच्या प्रस्तावित इंजिनिअरिंग कॉलेजच्या कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार असून संस्थेला लॉ कॉलेजसाठीची मान्यता मिळाली आहे. पुणे शहराला शिक्षणाचे माहेरघर ही ओळख निर्माण करून देण्यात संस्था अग्रस्थानी राहिली आहे. परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांच्या पाठबळावर चालवली जाणारी संस्था आहे. त्यामुळे संस्थेच्या काही मर्यादा आहेत. सध्याच्या काळात व्यापारी दृष्टीकोनातून चालवल्या जाणाऱ्या संस्थांचे पेव फुटले आहे. त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध असतो आणि त्यांची कॅम्पस प्रचंड मोठ्या आकाराची असतात. ‘मएसो’ सारख्या संस्था या बाबतीत मागे पडतात. केंद्रीय मंत्री खा. मुरलीधर मोहोळ यांनी आपला राजकीय प्रभाव आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला आगामी पाच वर्षात मोठ्याप्रमाणावर सहकार्य करावे अशी आमची अपेक्षा आहे. त्यातूनच भविष्यातील पन्नास वर्षे संस्था सक्षमपणे काम करू शकेल.”

शाला समितीचे अध्यक्ष श्री. विजय भालेराव यांनी आपल्या भाषणात शाळेच्या कार्याची माहिती दिली. शाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून मूल्यवर्धन, उपक्रमावर आधारित शिक्षण यामाध्यमातून देशाचा सक्षम नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोपाच्या भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “संस्थेने आपल्या विस्ताराबरोबरच शिक्षण आणि संस्कार यावर कायमच भर दिला आहे. संस्थेच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटी करण्याचा उल्लेख आहे. त्यानुसार आपण आता क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या उंबरठ्यावर उभे आहोत.”

 

 

 

 

 

गरवारे कॉलेजमधील संगणक प्रयोगशाळेचे मा. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

खासदार निधीतून उभारणी

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) मधील संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. ५ ऑक्टोबर २०२४) करण्यात आले. मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. मा. श्री. जावडेकर यांनी या वेळी शिक्षणातील नवीन संधी, नवीन तंत्रज्ञान, वर्तमानकाळातील घडामोडी या विषयी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.

याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, महाविद्यालयाच्या विकास समितीचे मा. अध्यक्ष सीए राहुल मिरासदार, प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, संस्थेच्या निमायक मंडळाचे मा. सदस्य, संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, महाविद्यालयातील प्राध्यापक आदी  मान्यवर उपस्थित होते. मा. श्री. जावडेकर यांचे महाविद्यालयातील १९७१ च्या बॅचचे सहाध्यायी या वेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

या वेळी बोलताना मा. श्री. जावडेकर म्हणाले, “नाविन्याला, संशोधनाला प्रोत्साहन देणारे शिक्षण आणि अभ्यासविषयांच्या निवडीतील लवचिकता ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आवडीच्या विषयांचे शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना शक्य झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, यासंबंधात होत असलेल्या नकारात्मक चर्चेत अर्थ नाही. भारतात संगणक आले तेव्हा बहुतेकांनी त्याला विरोध केला. पण आज आपण त्या क्षेत्रात खूप प्रगती केली असून मोबाईल फोनचे उत्पादन करणारा भारत हा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांच्या किंमतीपेक्षा तंत्रज्ञानातील संशोधनाचे मूल्य अधिक असते. महाविद्यालयीन शिक्षणात आपल्या आवडीचे विषय निवडण्याची परवानगी आता विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे एकाच वेळी दोन अभ्यासशाखांची पदवी मिळवणे शक्य झाले आहे. ‘स्वयं’च्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा अधिक मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत. काही कारणाने शिक्षणात खंड पडला तरी दोन वर्षांच्या आत शिक्षण पुन्हा सुरू करता येते. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि झोकून देऊन मनासारखे शिक्षण घ्यावे.”

महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ‘बस नं. १५३२’ या पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकेतील विद्यार्थी कलाकार आणि पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘मिस पुणे’ किताब मिळालेली विद्यार्थिनी सुहानी नांदगुडे यांचा सत्कार  मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी साहित्य चर्चा मंडळ, वक्तृत्व, संगीत, कलामंडळ, हस्तलिखित पाक्षिक ‘निनाद’ अशा उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा. श्री. बाबासाहेब शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही कोणाही एका व्यक्तीच्या मालकीची संस्था नसून माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शिक्षकांनी चालवलेली संस्था आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व परवडणारे शिक्षण देण्यासाठी संस्था माजी विद्यार्थी आणि संस्थेचे हितचिंतक यांच्या माध्यमातून निधी जमा करून पायाभूत सुविधा निर्माण करते. मा. श्री. प्रकाश जावडेकर हे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी दिलेल्या निधीतून ही संगणक प्रयोगशाळा उभी राहिली आहे. भविष्यातदेखील ते संस्थेला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात, संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाशी जोडले जाण्याचे तसेच आर्थिक स्वरुपात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन माजी विद्यार्थ्यांना केले.

प्राचार्य डॉ. देसर्डा यांनी आभारप्रदर्शन केले.

af AF sq SQ am AM ar AR hy HY az AZ eu EU be BE bn BN bs BS bg BG ca CA ceb CEB ny NY zh-CN ZH-CN zh-TW ZH-TW co CO hr HR cs CS da DA nl NL en EN eo EO et ET tl TL fi FI fr FR fy FY gl GL ka KA de DE el EL gu GU ht HT ha HA haw HAW iw IW hi HI hmn HMN hu HU is IS ig IG id ID ga GA it IT ja JA jw JW kn KN kk KK km KM ko KO ku KU ky KY lo LO la LA lv LV lt LT lb LB mk MK mg MG ms MS ml ML mt MT mi MI mr MR mn MN my MY ne NE no NO ps PS fa FA pl PL pt PT pa PA ro RO ru RU sm SM gd GD sr SR st ST sn SN sd SD si SI sk SK sl SL so SO es ES su SU sw SW sv SV tg TG ta TA te TE th TH tr TR uk UK ur UR uz UZ vi VI cy CY xh XH yi YI yo YO zu ZU
Scroll to Top
Skip to content