अवघ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, अभिजात कलांची खाण आणि विद्येचे माहेरघर असलेल्या आपल्या पुण्यनगरीमध्ये, तिचा विशेषपणा जपण्यात आणि तो वाढविण्यात गेली, दीडशे वर्षांहूनही अधिक कालावधी शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था म्हणजेच महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी येत्या १९ नोव्हेंबरला १६० वर्षे पूर्ण करीत आहे. मी स्वतः इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, मराठी माध्यम शाळेतून तर इयत्ता पाचवी ते दहावीचे शिक्षण महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्याच सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतून पूर्ण केले आहे. इ. दहावीची दुसरी सहामाही खूपच भावनाशील होती. इ. ११ वी व १२ वी चे शिक्षण मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घेतले. आयुष्यातले ते फुलपंखी दिवस आजही जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात आणि आपण जे काही आहोत त्याची मुळे किती खोलवर आपल्याला शाळेतून मिळालेल्या संस्कारांमध्ये आहेत याची जाणीव होते.

मला आठवतंय, मी १९७५ साली सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये प्रवेश घ्यायला आले त्या वेळेस हॉलमध्ये असलेल्या १९६१ च्या पूररेषेच्या पातळीची आठवण करून देणाऱ्या खुण-रेषेने माझं लक्ष वेधलं आणि त्यानंतरही शाळा सुस्थितीत असल्याचं आश्चर्य आणि अशा शाळेमध्ये प्रवेश घेत आहोत याचा आत्मीय अभिमान माझ्या बालमनाला त्यावेळी कमालीचा जाणवत होता. शाळेचं ग्रंथालय उत्तमोत्तम ग्रंथ संपदेने नटलेलं होतंच, शिवाय सुसज्ज प्रयोगशाळेमध्ये मुक्त विहार करावयाची मुभाही होती. एकत्र शिक्षण असल्यामुळे आम्हा मुला-मुलींमध्ये मार्क्स मिळविण्यासाठी कायम निकोप स्पर्धा असायची.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले आहे …

“विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी

न दिसे एकही वस्तू विद्येने असाध्य आहे जी” 

शाळेमध्ये अशी विद्या आणि संस्कार रुजविण्यासाठी ज्या ऋषितुल्य शिक्षक वृन्दाचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि अनमोल सहवास लाभला तो आम्हा विद्यार्थ्यांसाठी अतुलनीय ठेवाच आहे. आमचे अत्रे सर सुंदर अक्षरात संपूर्ण फळ्याचा वापर करायचे. त्यांच्या स्पष्ट आणि करारी आवाजात ज्या पद्धतीने ते इतिहास शिकवायचे त्यातील प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे रहायचे. संस्कृत भाषेची आणि विषयाची अवीट गोडी मेधा ओक बाईंकडून मिळाली, तर विज्ञानाचे केळकर सर दैनंदिन जीवनातले सोपे प्रयोग करायला शिकवायचे. त्यामुळे विज्ञान विषयही आवडायचा. शाळेमध्ये खेळालाही तितकेच महत्व होते. एके वर्षी तर काही अपरिहार्य कारणामुळे शाळेचा वार्षिक स्नेहसमारंभ अचानक रद्द झाला, त्यावेळी गुरुवर्य प्र. ल. गावडे सरांनी अतिशय संयमाने ज्या पद्धतीने आणि कौशल्याने ती परिस्थिती हाताळली त्यावरून अशा कठीण परिस्थितीमध्ये कशाप्रकारे निर्णय घ्यावेत याचा परिपाठच आम्हा विद्यार्थ्यांना मिळाला. मी आठवीत असताना शिक्षकांचा दीर्घकाळ संप सुरु होता, परंतू  संपानंतर जेव्हा शाळा सुरु झाली तेव्हा सर्व शिक्षकांनी शाळेव्यतिरिक्त थांबून संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होवू दिले नाही. त्यावेळेस मात्र माझा अत्यंत आवडता विषय ‘बागकाम’ मात्र करता आले नाही. अशा अनेक आठवणी आहेत त्या मंतरलेल्या दिवसांच्या ज्याने उर भरून येतो, मन भूतकाळात रमून जाते.

मी पुण्याची महापौर झाल्यानंतर शाळेतल्या माझ्या १९८० च्या बॅचने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने माझं कौतुक केलं. त्या समारंभाला माझे सर्व मित्र-मैत्रिणी आणि मला शिकविणारे जवळपास सर्वच शिक्षकवृंद उपस्थित होते. आम्हा सर्वाना अत्यंत आदरणीय असणाऱ्या गुरुवर्य गावडे सरांनी त्या वेळेच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या मित्र-मैत्रिणींनी, माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या शाळेने दिलेल्या या कौतुकाच्या थापेमुळे आणि माझ्यावर व्यक्त केलेल्या विश्वासामुळे मी अधिक उत्साहाने व जोमाने काम सुरु केले. माझ्या आयुष्यातला तो अतिशय आनंदाचा आणि महत्वपूर्ण दिवस होता. जेव्हा-जेव्हा मला निराश झाल्यासारखं वाटतं त्या वेळेस ज्यांच्या पुस्तकांचा मला आधार असतो त्यांनी, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे,

“It is a shame to dream small, even when we have  the potential to do something great and noteworthy.”

खऱ्या अर्थाने माझ्या शाळेने व ‘मएसो’च्या प्रत्येक एककाने माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्षमता आणि सुप्त गुण ओळखून फक्त मोठी स्वप्नेच पहायला शिकवली नाहीत तर ती स्वप्ने पूर्ण करायला, उंच भरारी घ्यायला आमच्या पंखातही  बळ दिले. त्यामुळेच मानसशास्त्रातून एम. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता मी जर्मन भाषेचे शिक्षण घेतले, पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला आणि एम.बी. ए. ची पदवीही मिळवली. “हाती घ्याल ते तडीस न्या” हा माझ्या गुरुजनांनी दिलेला वसा जपताना आणि जगताना राजकारणात प्रवेश केला आणि अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावली याचं समाधान वाटतं. खास महिला सक्षमीकरणासाठी ११२ कोटी रुपयांचं बजेट उपलब्ध करून दिलं.

आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विस्तारलेल्या ज्ञानवृक्षाच्या छायेत हजारो विद्यार्थी ‘केजी टू पीजी’ शिक्षण घेत आहेत आणि विश्वसंचारी झेप घेत आहेत. खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी, सुसंस्कृत, समाजाभिमुख, सुजाण नागरिक निर्माण करणाऱ्या आणि आपले ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणाऱ्या महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीला दैदिप्यमान अशा निरंतर वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

“शिक्षण हा समाजाचा कणा आहे, त्यामुळे भारतकेंद्रीत शिक्षण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे देशातील भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होईल. हे धोरण आत्मनिर्भर भारताचा पाया रचणारे आहे. देशाने एकमुखाने या धोरणाचे स्वागत केले आणि त्यातील वैशिष्ट्यांमुळे  जगातील अनेक देशांनी त्यांचे शिक्षण धोरण ठरविण्यासाठी भारताकडे सहकार्य मागितले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर २०२०) डॉ. पोखरियाल यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.

डॉ. पोखरियाल आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील. १६० वर्षापूर्वी स्वदेशी शिक्षणाचे महत्व ओळखून देशप्रेम आणि समर्पण भावनेतून शिक्षण संस्था सुरू करणे ही घटनाच विलक्षण आहे. राष्ट्रीय शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या या संस्थेत तयार झालेले विद्यार्थी ज्या-ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले.

पाश्चिमात्य विचारसरणी जगाकडे बाजार म्हणून बघते आपण मात्र संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानतो. त्यामुळे आपली भावना जगाच्या कल्याणाची असते. या आपल्या शिकवणुकीमुळे आज जग अचंबित झाले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे मुल्याधिष्ठीत शिक्षणावर भर देणारे व्यापक आणि संपूर्ण परिवर्त घडवून आणणारे धोरण आहे. ते तयार करत असताना समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करण्यात आला. सर्वांची मते विचारात घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षण धोरण सरकारने नाही तर समाजाने तयार केलेले आहे. व्यक्ती आपल्या मातृभाषेतूनच अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे या धोरणात

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यावर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील २२ प्रादेशिक भाषांपैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्याने शिकावी असा आग्रह आहे. त्यामुळे भाषांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. हे करत असताना इंग्रजी भाषेला कोणत्याही प्रकारे विरोध करण्यात आलेला नाही. जपान, जर्मनी, इस्राईल या देशांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते, परिणामी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात या देशांनी विकास साधला आहे.

दीर्घ कालावधीनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण तयार झाल्याची चर्चा होते. प्रत्यक्षात लॉर्ड मॅकॉलेने देशातील समृद्ध शिक्षण परंपरा, भाषा आणि संस्कृति उद्धवस्त करण्यासाठी १५० वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जीवनमूल्यांवर आधारलेले हे पहिलेच शैक्षणिक धोरण आहे. ते सर्वसमावेशक आणि प्रभावी आहे.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची शिकवण माणूस घडवणारी आहे, माणसाचे मशिन बनवणारी नाही. लॉर्ड मॅकॉले नव्या शिक्षण पद्धतीच्या आधारे जेव्हा देशाच्या संस्कृतीवर आघात करत होता, त्याच कालखंडात राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यक्त झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच सहयोग देईल.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आभारप्रदर्शन तर डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

                 डॉ. श्यामा घोणसे

१९ नोव्हेंबर २०२० ला ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षपूर्ती साजरी करत आहे. साध्या सोप्या भाषेत बोलायचे तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे ने महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला अखंडपणे १६० वर्षे आपले अमूल्य योगदान दिलेले आहे. संस्था म्हणून विचार करता हा कालखंड तेजस्वी हिऱ्याला बावन्नकशी सोन्याचे कोंदण लाभावे असा लखलखित, देदीप्यमान असला तरी, कसल्याही सत्ता-संपत्ती-धनदांडगेपणा यांचा वरदहस्त नसल्यामुळे, कसोटी पाहणारा होता.

वामन प्रभाकर भावे, लक्ष्‍मण नरहर इंदापूरकर यांच्यासारखे शिक्षणातून राष्ट्रीय वृत्तीचा जागर करणारे शिक्षक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतीला शिक्षणाची जोड देणारे द्रष्टे सचिव, खजिनदार आणि वैयक्तिक विकासाच्या ध्यासाला समाजहिताची, राष्ट्रीय अस्मितेची जोड देणारा सुजाण पालकवर्ग या त्रिसूत्रीतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची गंगोत्री उगम पावली. त्यामुळेच परकीय सत्तेच्या रोषाचा, लाभालाभाचा विचार न करता ‘मएसो’च्या या ज्ञानगंगोत्रीने आज “केजी टू पीजी” आणि सेवाभावी वैद्यकीय शिक्षणाबरोबरच पत्रकारिता, व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करीत नवीन पिढीला आत्मनिर्भर बनविणारे विविध  अभ्यासक्रम शिकविणाऱ्या ७७ शाखांइतका पल्ला गाठलेला आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या विविध क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या रूपाने योगदान देत   विशाल रूप धारण केले.                                            .

विविध शाखा विस्तारलेल्या ‘मएसो’चे “क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे” हे बोधवाक्य!

‘मएसो’चा इतिहास खूप मोठा आहे. या प्रवासात चढ-उतार, वाटा, वळणे खूप आहेत. प्राध्यापक म्हणून, आजीव सदस्य, नियामक मंडळ सदस्य आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० वर्षांच्या इतिहासातील आजीव सदस्य मंडळाची पहिली महिला अध्यक्ष म्हणून माझ्या संस्थेबद्दल भरभरून बोलण्यासारखेही खूप आहे. माझा आणि संस्थेचा ऋणानुबंध जवळपास तीन तपांहून अधिक आहे.

शिक्षणाचे होणारे बाजारीकरण, या क्षेत्रात होणारे काही स्तुत्य तर काही काळजीमग्न करणारे बदल, ज्ञानाची विस्तारलेली क्षेत्रे आणि विद्यार्थी-शिक्षकांचे तुटत चाललेले नाते, पालकांचा अनाठाई हस्तक्षेप, बदलती शैक्षणिक धोरणे या सगळ्यांची गेली किमान चाळीस वर्षे मी साक्षी आहे, त्याची घटक आहे. या पार्श्वभूमीवर गेली १६० वर्षे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अक्षुण्ण प्रवास करु शकली; त्याची कारणमीमांसा करीत असताना काही गोष्टी नमूद करायलाच हव्यात. आपापल्या क्षेत्रात नामांकित असूनही संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने, निरलसपणे योगदान देणारे संचालक मंडळ, प्रयोगशील शिक्षक आणि या प्रयोगातही त्यांचे विद्यार्थ्यांशी असणारे आत्मीय नाते, समर्पण वृत्तीचे शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि स्वागतशील, सहकार्य करणारे पालक यांची प्रदीर्घ परंपरा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला लाभलेली आहे. “शिक्षण विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही”, सामाजिक समरसतेचा प्रयोग करीत असताना शिक्षण हे प्रभावी साधन आहे याचे भान आणि जाण असलेले द्रष्टे क्रियावंत मएसोला आरंभापासूनच लाभले. त्यामुळेच त्यावेळची सासवड, बारामतीसारखी छोटी गावे असतील,वैद्यकीय शिक्षणाच्यादृष्ट्या, वैद्यकीय सुविधेच्यादृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या लोटे घाणेखुंटसारख्या दुर्लक्षित भागात, महानगरातल्या माथाडी कामगारबहुल आव्हानात्मक उपनगरात, ‘मएसो’ पोहोचली. स्त्री शिक्षण हा आरंभापासूनच ‘मएसो’च्या ध्येयधोरणातील भाग असल्यामुळे इथे मुलींची संख्याही अधिक आहे. शिक्षणाला आत्मसामर्थ्य-संपन्नतेची जोड देणारी महाराष्ट्रातील मुलींची पहिली सैनिकी शाळा काढण्याचा प्रयोगही इथेच रुजला, बहरला आहे.

हे सारे, यासारखे सारे जे आहे ते, नोंद घेण्यासारखे आहेच. पण यापेक्षाही अधिक महत्त्वाचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने अनेक पिढ्यांशी नाते जोडलेले आहे. म्हणूनच, आजोबा-आजी ते नातवंडे ‘मएसो’चेच विद्यार्थी असल्याचे पिढीजात चित्र दिसते. आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वसंपन्न, मुद्रांकित असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच आपले दररोजचे साधे परंतु सदाचारसंपन्न जीवन जगणारे, प्रतिकूलतेतही आपल्या घासातला घास समाजासाठी  देणारे, चारित्र्यसंपन्न  विद्यार्थी/नागरिक घडविण्याचे कार्यही ‘मएसो’ने केलेले आहे. त्यामुळेच एअरपोर्टवर भेटणारा एखादा रुबाबदार अधिकारी मी ‘मएसो’चा आहे, हे ज्या आत्मीयतेने सांगतो; त्याच आत्मीयतेने,अभिमानाने सांगणारे रिक्षावाले काका सहजपणे भेटतात. कडक सॅल्यूट ठोकत मी ‘मएसो’ची आहे सांगणारी महिला अधिकारी असेल किंवा एखाद्या प्रदर्शनात जिच्या कलाकुसरीचे कौतुक करावे ती व्यावसायिक भगिनी ‘मएसो’ची असते आणि भाजीचा हिशेब चोखपणे देणारी,आत्मियतेने भाजीची पिशवी गाडीत ठेवणारी मैत्रिणी “मी ‘मएसो’ची” असे सांगते तेव्हा कळते मित्रमैत्रीणींनो की, माझी मएसो कशी, कुठे-कुठे, किती प्रभावीपणे रूजली आहे. जेव्हा ‘मएसो’च्या एखाद्या शाखेचे म्हणजे शाळेचे किंवा काॕलेजचे नाव घेतले जाते, तेव्हा मूळ प्रवाह किंवा प्रभाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचाच असतो.

…तर मग आपण आज एकमेकांना शुभेच्छा देऊयात…

आपण एकशे साठ वर्षांचे झालो…१६१ व्या वर्षात प्रवेश केला आहे…

मनःपूर्वक शुभेच्छा आणि

“हो ‘मएसो’… तू आमच्या श्वासात, ध्यासात आणि स्वप्नातही आहेस…

तुझ्यामुळेच आम्ही आहोत, तुझ्यामुळेच आम्ही आहोत, सदैव तुझ्याबरोबरच राहण्याचा आशीर्वाद तू आम्हांला दे!”

  • डॉ. श्यामा घोणसे

“महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे योगदान फार मोठे आहे, महाराष्ट्र आणि देश ते कधीही विसरू शकणार नाही. आपला देश स्वावलंबी, समृद्ध, सामर्थ्यसंपन्न, शक्तीशाली व्हावा आणि जगातील आर्थिक महासत्ता व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी नेमका जीवन दृष्टीकोन बाळगून काम करण्याची गरज आहे. भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी आज केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२०) मा. गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.

मयूर कॉलनीत असलेल्या मएसो ऑडियोरिअममध्ये कोविड -१९ महामारीच्या संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

मा. गडकरी आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर याद्रष्ट्या व्यक्तींनी देश पारतंत्र्यात असताना स्वदेशी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन देशातील भावी पिढीवर संस्कार करून स्वावलंबी, संपन्न, समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे या भावनेतून या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेचा १६० वर्षांचा इतिहास हा पिढी घडवण्याचा इतिहास आहे.

लहान विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे आणि त्याला एक आदर्श माणूस बनवणे हे समाजासाठी आवश्यक असते. ज्ञान ही अतिशय प्रभावी शक्ती आहे. ज्ञानाच्या आधारे संपत्तीची निर्मिती करणे आवश्यक असल्याने आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. या ज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे ज्ञान मिळवून आपल्या देशाला जगात नाव मिळवून दिले आहे. पुणे हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेरघर आहे. पुण्यातील लाखो विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, याचे कारण पुण्यातील शिक्षणसंस्था. पुण्यातील शिक्षण संस्थांनी सुसंस्कारित आणि चांगल्या पिढ्या घडविल्या आहेत. पुण्यात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती राहातात. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची गुणवत्तादेखील वाढली आहे.  समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हे महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण मिळणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, सृजन, उद्योजकता, शास्त्र, तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वच क्षेत्रात ज्ञान मिळविण्याची गरज आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने हे ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. एक मोठी शक्ती एवढ्याच दृष्टिकोनातून ज्ञानाचा विचार करून चालणार नाही. त्याच्याबरोबर मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, कुटुंब पद्धती, शिक्षण पद्धती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्याला ज्ञान आणि संपत्ती दोन्ही मिळवायचे आहे. संपत्तीबरोबरच मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विश्वकल्याणाचा विचार देणारी भारतीय संस्कृती आणि इतिहास, परंपरा यांचे हेच वैशिष्ट्य आहे की, आपल्या संस्कार पद्धतीमुळे आदर्श नागरिक देखील घडतात. यामध्ये ‘मएसो’ सारख्या शिक्षण संस्थांचा फार मोठा वारसा आहे.

आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, त्याचप्रमाणे फार मोठ्या संख्येने शिक्षणासाठी परदेशांमध्ये जात असलेल्या आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे ही क्षमता आहे, मात्र तशी महत्त्वाकांक्षा आपण बाळगली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवित्र विचाराने, निस्पृह, निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची गती कमी आहे, ही खेदाची बाब आहे. चांगल्या माणसाचा चांगुलपणा समाजात जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हाच समाज बदलेल. त्यामुळे निस्पृह भावनेने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण करणे, त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे आणि एका चांगल्या समाजातून एक चांगले राष्ट्र निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जीवननिष्ठा आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणेच अनेक महापुरुषांच्या स्वप्नातील सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी त्यांच्या विचारांच्या आधारावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत ज्ञानयोगी तयार करताना, त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करताना, संस्काराद्वारे त्यांच्यातील माणूसपण जोपासून चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राष्ट्रीय पुनर्निमाणात योगदान देत राहील याचा मला विश्वास आहे.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ज्ञानातून मिळणारी शक्ती विकसित करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्यविकास इ. माध्यमातून अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी येत्या १९ नोव्हेंबर २०२० रोजी १६० वर्ष पूर्ण करत आहे. संस्थेच्या या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी यांचे व्याख्यान मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री मा. श्री. रमेश जी पोखरियाल ‘निशंक’ यांचे व्याख्यान बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ४.४५ वाजता होणार आहे.

सध्या कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ही दोन्ही व्याख्याने ऑनलाईन माध्यमातून होणार आहेत.

कोथरूडमध्ये मयूर कॉलनीत असलेल्या एमईएस ऑडिटोरीअम येथे मान्यवर निमंत्रितांच्या मर्यादित उपस्थितीत व सरकारी नियमांचे पालन करून ही ऑनलाईन व्याख्याने होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या ‘ध्यासपंथे चालता …’ या ग्रंथाचे प्रकाशन शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात आज (दि. १२ नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी ही माहिती दिली.

यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव सुधीर गाडे उपस्थित होते.

या ऑनलाईन व्याख्यानांमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक आहेत …  https://www.facebook.com/mespune  किंवा  https://www.youtube.com/c/MaharashtraEducationSocietyPuneofficial

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे विख्यात उद्योजक डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना आज सोमवार, दि.२ नोव्हेंबर २०२० रोजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते डॉ. आबासाहेब गरवारे आणि सौ. विमलाबाई गरवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी म.ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य आणि गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी मा. श्री. सुनील सुतावणे, शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, म.ए.सो. चे साहाय्यक सचिव व शालेचे महामात्र श्री. सुधीर गाडे, म.ए.सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रामदास अभंग, पर्यवेक्षक श्री.किसन यादव, माजी मुख्याध्यापक श्री.अविनाश वाघमारे आणि प्रशालेचे शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.
मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे तसेच म.ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य व गरवारे ट्रस्टचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. सुनील सुतावणे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
तसेच महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे साहाय्यक सचिव मा. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे, म.ए.सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर, वरिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा आगाशे व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षिका श्रीमती स्मिता कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘करिअर वेबिनार’चे आयोजन
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवानिमित्त आबासाहेब गरवारे महाविद्यालय, गरवारे काॅलेज ऑफ काॅमर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  अँड करिअर कोर्सेस या ‘मएसो’च्या घटकसंस्थांच्यावतीने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर वेबिनार’चे आयोजन करण्यात आले आहे. बारावीचा हा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर विविध क्षेत्रे विद्यार्थ्यांना खुणावत असतात, त्यापैकी नेमके काय निवडावे, हा प्रश्नही असतो. ‘स्कोप’ कशात असेल, याचीही पडताळणी सुरू असते. अशा वेळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन कामी येते आणि हे मार्गदर्शन घरबसल्या मिळणार आहे. दि. २३ जुलै ते ३१ जुलै दरम्यान होणाऱ्या या वेबिनारमध्ये…नक्की नोंदणी करा.
डॉ भरत व्हनकटे

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र.ल. गावडे यांनी गुरुवार, दि. २० जून २०१९ रोजी ९६ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी डॉ. गावडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले आणि संस्थेच्या नव्याने सुरु होत असलेल्या तीन महाविद्यालयांची माहिती दिली. संस्थेच्या वाटचालीबद्दल यावेळी गावडे सरांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी संस्थेचे साहाय्यक सचिव सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे प्रबंधक नीलकंठ मांडके उपस्थित होते.

gawade-sir-birthday

ssc-result-news-2019

Dr-PB-Buchadeमएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. (डॉ.) पी.बी. बुचडे यांची निवड करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवड समितीमार्फत ही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आज (दि.२७) त्यांनी नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.

डॉ. बुचडे यांना शिक्षण, संशोधन व प्रशासन क्षेत्रातील ३२ वर्षांचा अनुभव असून त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. पी.एचडी. साठी ते मार्गदर्शकही आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स अभ्यास मंडळाचे प्रमुख म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले आहे.

डॉ. बुचडे सन १९८६ पासून मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कार्यरत असून २००० सालापासून ते इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख आहेत. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून सध्या ते जबाबदारी सांभाळत होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री. अभय क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. मा. अभय क्षीरसागर हे व्यवसायाने सनदी लेखापाल आहेत. ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे ते गेली १० वर्षे सदस्य असून संस्थेच्या विविध समित्यांमध्ये कार्यरत आहेत. तसेच संस्थेला व संस्थेच्या विविध शाखांना त्यांचे अर्थविषयक मार्गदर्शन लाभत आहे.

संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.

GB-VC-Kshirsagar

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील ‘सर्क्युलर बिल्डिंग’च्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमीपूजन व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मंगळवार, दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. यशवंत वाघमारे, श्री. प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य श्री. प्रल्हाद राठी, ॲड. धनंजय खुर्जेकर, डाॅ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आनंद लेले, सदस्य व आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. बी. बुचडे,डाॅ. अतुल कुलकर्णी, प्रा. सुधीर भोसले, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. विनय चाटी, प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन अंबर्डेकर, प्रबंधक नीलकंठ मांडके, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे उपप्राचार्या डाॅ. सुनिता भागवत, डाॅ. सोनावणे, प्रबंधक किसन साबळे उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सुधारित बोधचिन्हाचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मंगळवार, दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. यशवंत वाघमारे, श्री. प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य श्री. प्रल्हाद राठी, ॲड. धनंजय खुर्जेकर, डाॅ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आनंद लेले, सदस्य व आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. बी. बुचडे,डाॅ. अतुल कुलकर्णी, प्रा. सुधीर भोसले, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. विनय चाटी, ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अंबर्डेकर, प्रबंधक नीलकंठ मांडके उपस्थित होते.

गरवारे वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे यांनी केले. ‘बोधचिन्हांना संस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्व असते. त्यावरुनच संस्थेची ओळख ठरते. उद्दीष्ट्ये समजतात. सशस्त्र सेनांमध्येही बोधचिन्ह अतिशय मानाने सांगितले जाते,’ असे विचार एअरमार्शल गोखले यांनी व्यक्त केले. नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळाच्या सदस्य, तसेच गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डाॅ. केतकी मोडक यांनी संस्थेच्या बोधचिन्हाचा इतिहास आणि नव्या बोधचिन्हाची संकल्पना या विषयी माहिती दिली.

newlogo-inauguration

मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता, पुणे ४ या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय खर्चासाठीच्या निधी संकलनासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दि. १९ एप्रिल २०१९ रोजी मयूर कॉलनीतील मएसो सभागृहात ‘कलासंयुज’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) उपस्थित होते. यावेळी शाला समितीच्या अध्यक्ष मा. आनंदीताई पाटील, महामात्र प्रा. सुधीर भोसले, मुख्याध्यापक भाऊ बडदे व सर्व शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. माधुरी आपटे (नृत्य), सुरमणि सानिया पाटणकर (गायन), मृणाल भोंगले (चित्रकला) आणि नितीन महाबळेश्वरकर (गायन) या कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

19th-Apr-2019

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यावर क्रीडा संस्कार व्हावा या उद्देशाने म.ए.सो. क्रीडावर्धिनीतर्फे शनिवार, दि. १३ एप्रिल २०१९ ते मंगळवार, दि. ३० एप्रिल २०१९ या कालावधीत संस्थेच्या पुण्यातील शाळांबरोबरच शिरवळ, बारामती, सासवड, अहमदनगर, कळंबोली येथील शाळांमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये लंगडी, कबड्डी, मल्लखांब, खो-खो, नेमबाजी, थ्रो-बॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल. स्केटींग इत्यादी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारच्या शिबिराचे हे सलग दहावे वर्ष आहे. संस्थेच्या विविध शाखांमधील १२४९ विद्यार्थी या उन्हाळी शिबिरात सहभागी झाले आहेत.

10th-Apr-2019

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामतीमधील मएसो कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अहमदनगरमधील मएसो रेणावीकर माध्यमिक शाळा या दोन शाळांना केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून ‘अटल टिंकरींग लॅब’ मंजूर झाल्या आहेत. 

विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा आणि त्यांच्यात विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, जेणे करून देशामध्ये तंत्रज्ञानात्मक सर्जनशीलतेचे वातावरण आणि संस्कृती विकसित व्हावी, हा ‘अटल टिंकरींग लॅब’चा प्रमुख उद्देश आहे. 

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आणि सासवडमधील मएसो वाघीरे विद्यालय या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या तीन शाळांमध्ये यापूर्वीच ‘अटल टिंकरींग लॅब’ कार्यरत आहेत.

“भारताला गुडघे टेकायला लावणे हेच पाकिस्तानचे ध्येय आहे, त्यामुळे सातत्याने अतिरेकी हल्ले घडवून भारताला रक्तबंबाळ करण्याचे त्यांचे धोरण आहे. या अतिरेकी कारवाया पाकिस्तान पुरस्कृत आहेत. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून आपण कारवाई करू शकतो हे दाखवून देण्यासाठीच भारताने हवाईहल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत भारतातील नागरिकांनी एकजूटीने आणि खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. प्रसार माध्यमांनी आपली लक्ष्मणरेषा सांभाळली पाहिजे आणि त्याचबरोबर नागरिकांनी जनमानस अस्वस्थ होईल अशी कोणतीही कृती आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे, आपल्या आसपास काही आक्षेपार्ह घटना घडत असतील तर पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे,” असे प्रतिपादन भारतीय हवाईदलाले माजी उपप्रमुख आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन मंच यांनी ‘पाकिस्तानवरील नियंत्रित हवाईहल्ला आणि भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावर अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये हे व्याख्यान झाले. त्यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते. “भारताने शांततेसाठी सर्व प्रयत्न केले परंतु पाकिस्तानने कोणताच प्रतिसाद दिला नाही, कारण पाकिस्तानच्या लष्कराला संवाद साधण्यात कोणताच रस नाही. स्वतंत्र झाल्यानंतर ७० वर्षांपैकी ५० वर्षे पाकिस्तानात लष्कराची सत्ता आहे. जनरल मुहम्मद झिया उल हक यांच्या कार्यकाळापासून पाकिस्तानी दहशतवाद बोकाळला आहे. ५७ इस्लामी देशांचा समावेश असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन या संघटनेच्या बैठकांमध्ये वारंवार काश्मीर प्रश्नाचे रडगाणे गात आला आहे. या संघटनेच्या दि. १ व २ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत भारताला सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर पाकिस्तानाने या बैठकीवरच बहिष्कार घालण्याची धमकी दिली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडले आहे. त्यामुळे तो आता असे उद्योग करत आहे. भारताने पाकिस्तानला दिलेला व्यापारी कारणांसाठी दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा आता काढून घेतला आहे. याशिवाय भारतातून पाकिस्तानात वाहून जाणारे नद्यांचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत आपण पाकिस्तानमधील जनतेला त्रास होऊ नये असाच विचार करत आलो आहोत. पाकिस्तान मात्र कायमच दहशतवादाला प्रोत्साहन देत आला आहे. भारताच्या सीमेजवळ त्याने अतिरेक्यांचे प्रशिक्षण तळ उभारले. भारतीय हवाईदलाने नुकत्याच केलेल्या हल्ल्यात हे तळ उद्ध्वस्त केले आहेत, कोणत्याही नागरी वस्तीवर किंवा पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर हल्ला केलेला नाही.” “भारत आता देशहितासाठी बचावात्मक नाही तर आग्रही पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. भारतीय सैन्याला संरक्षण दले असे न म्हणता सशस्त्र दले असे म्हटले पाहिजे. त्यातून देशाची मानसिकता घडत असते. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचे महत्त्व खूप मोठे आहे. लढाऊ विमाने हवेत असतानाच त्यांच्यात इंधन भरता येते, त्यामुळे या विमानांची कार्यक्षमता वाढते. ५ हजार किलोमीटर अंतर मारक क्षमता असणारे अग्नीसारखे क्षेपणास्त्र आता भारताकडे आहे. याशिवाय इ.स. २०२० पर्यंत भारत हा सरासरी वय २९ असणारा जगातील सर्वात तरुण देश झालेला असेल. ही युवाशक्ती आपल्या देशाची फार मोठी ताकद आहे,” असेही ते यावेळी म्हणाले. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर विविध युद्धांच्या काळात भारताने घेतलेल्या अनेक निर्णयांचा उपापोह एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या व्याख्यानात केला. प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले. मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

“कला ही माणसाला निसर्गातील इतर प्रणिमात्रांपासून वेगळी बनवते, कलेमुळेच माणसाचा प्रवास बाह्यरुपाकडून अंतरंगाकडे होतो. आज सर्वत्र मूल्यशिक्षणाबाबत बोलले जात आहे. कला हेच सौंदर्याचे प्रमुख मूल्य आहे. आज व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघितले जाते. पण कलेमुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य बघायला आपण शिकतो. कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यामुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य ओळखायची क्षमता निर्माण होते आणि ती जाणीव आपल्या आचरणात येते, ” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम नृत्यांगना व ज्येष्ठ गुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज (दि. १७ जानेवारी २०१९) झाले. त्यावेळी डॉ. सुचेता भिडे-चापेकर बोलत होत्या. 

मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरीयममध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाच्या सदस्य व मएसो कलावर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे तसेच ‘मएसो कलावर्धिनी’तील कला मार्गदर्शक व आघाडीच्या शास्त्रीय गायिका आरती ठाकूर-कुंडलकर, ज्येष्ठ संवादिनी वादक सुयोग कुंडलकर, ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण व रश्मी देव याप्रसंगी उपस्थित होते. 

‘मएसो कलावर्धिनी’त सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी शास्त्रीय संगीत, संवादिनी (हार्मोनियम), तबला यांचे तसेच सर्व शाळांमधील इ. ६ वी ते इ. ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

संगीत, अभिनय आदी ललित कलांच्या शिक्षणामुळे व्यक्तिमत्वावर अतिशय सकारात्मक आणि दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे कोणत्याही कलेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘मएसो कलावर्धिनी’ची स्थापना केली असल्याचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 

‘मएसो कलावर्धिनी’त तीन महिन्यांच्या अभिनय प्रशिक्षण वर्गात आठवड्यातून दोन दिवस दोन-दोन तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून कलेची आवड जोपासायला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच मदत होईल असे योगेश सोमण यांनी यावेळी सांगितले. 

आरती ठाकूर-कुंडलकर कलेच्या प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगताना म्हणाल्या की, संगीत हे स्वतःच्या आनंदासाठी शिकले पाहिजे. अल्प कालावधीत कलेची तोंडओळख होते आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू होतो. कलेचे रसग्रहण शिकल्यामुळे कलाकाराबरोबरच उत्तम रसिकही घडतात. 

मएसो कलावर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी, ‘मएसो कलावर्धिनी’त कालांतराने नृत्य, शिल्प, चित्र आदी कलांचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार असल्याची माहिती आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात दिली. 

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील शिक्षिका सौ. श्रुती जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आरती ठाकूर-कुंडलकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी तर संजय देशपांडे यांनी तबल्यावर साथ केली.

“ स्वामी विवेकानंद म्हणायचे त्याप्रमाणे आज चारित्र्य घडविणारे शिक्षण हवे आहे, त्यासाठी नैतिक, आध्यात्मिक व मानवी मूल्यांचा समावेश शिक्षणात असण्याची आवश्यकता आहे आणि ही मूल्य आचरणात आणली तर आपला देश निश्चित महान होईल,” असा विश्वास पुण्याच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ आयोजित करण्यात येतो. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (दि. १२ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या वेळी आयर्नमॅन खेळाडू अनिरुद्ध तोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, म.ए.सो. क्रीडा वर्धिनीचे अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, म.ए.सो. क्रीडा वर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले उपस्थित होते. 

स्वामी श्रीकांतानंद पुढे म्हणाले की, “महान होण्यासाठी आत्मविश्वास, सेवेचा भाव आणि सत्याचे पालन करण्याची वृत्ती यांची आवश्यकता असते. स्वतःवर आणि देवावर विश्वास असेल तर आपण कोणतेही महान कार्य करू शकतो. जे इतरांसाठी जगतात ते खरे जिवंत असतात असे स्वामी विवेकानंद म्हणत. त्यांचे विचार ऐकून भगिनी निवेदितांनी आपले जीवन भारतासाठी समर्पित केले. दुर्दैवाने परकीयांना जे कळते ते आजही आपल्या लक्षात येत नाही. आज आपल्या देशामध्ये खूप जणांना सेवेची गरज आहे. सत्य कोणापुढेही मान तुकवायला तयार नसते, जो समाज सत्याचे पालन करत नाही तो समाज नष्ट होतो. स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर सत्याचीच कास धरली आणि त्याच सत्याने त्यांना महान बनवले. त्यांनी वाणीच्या आधारेच जग जिंकले. आपल्या जीभेवर सरस्वतीचा वास असतो, त्यामुळे आपण बोलण्यातून लोकांची मने जिंकायची असतात, दुखवायची नसतात. त्यासाठी चांगले साहित्य वाचले पाहिजे व चांगला विचार केला पाहिजे. तुमच्यामध्ये सर्व शक्ती विद्यमान आहेत, त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य करू शकता, स्वतःला दुबळे समजू नका असे स्वामी विवेकानंद म्हणत असत आणि हेच यशाचे खरे सूत्र आहे.” 

प्रमुख पाहुणे अनिरुद्ध तोडकर आपल्या भाषणात म्हणाले, “मलेशियात झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत मला मिळालेले यश मी भारतीय सेनादलांना समर्पित करतो कारण त्यांनी केलेला त्याग फार मोठा आहे आणि आपण त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही यश मिळवण्यासाठी मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे असते. पालक व शिक्षकांकडून लहानपणापासून होणारे संस्कार आणि शिकवण यातूनच कोणतीही व्यक्ती मानसिकदृष्ट्या सुदृढ होते. माझ्यावर झालेल्या संस्कारातूनच मी कायम काही मूल्य जोपासत आलो आहे, त्यातून माझे विचार तयार झाले आहेत. आपल्या भोवती जेव्हा सकारात्मक व्यक्ती असतात तेव्हा सकारात्मक वृत्ती वाढते. स्पर्धेदरम्यान मनातले सकारात्मक विचार जेव्हा नकारात्मक होऊ लागत तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांच्या आधारे त्यावर मात करता आली. आयर्नमॅन स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या शारिरीक सरावाबरोबरच मनातील सकारात्मक विचारांच्या आधारे मला यश मिळू शकले.” 

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात युवा चेतना दिन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शिरवळ, सासवड, बारामती आणि नगर येथील शाळांमधील ५६८ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यावेळी क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये योगासने, ढोलपथक, मल्लखांब, अरोबिक्स, लेझिम, मनोरे, वारी, गोफ विणणे, मर्दानी खेळ आदी प्रात्यक्षिकांचा समावेश होता. शालेय विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांमधून उपस्थितांना सांघिक वृत्ती, समन्वय आणि खिलाडूवृत्ती यांचे दर्शन घडले.

आपल्या विद्यालयाचा २० वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा गुरुवार, दि.२७ डिसेंबर २०१८ रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘जागर जाणिवांचा ‘ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या वातानुकूलित सभागृहात सादर करण्यात आला. 

भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. 

या वेळी शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ. सौ. अर्चना कुडतरकर आणि शाळेचे महामात्र डॉ.अतुल कुलकर्णी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते. हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले. 

र्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांनी केले.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या पाच छात्रांची यावर्षी राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी निवड झाली आहे. ऐश्वर्या खैरनार, आसावरी तानवडे, रितीका जाधव, मंगेश गोळे आणि आकाश थोपटे हे ते छात्र आहेत. एन.सी.सी. च्या पुणेस्थित २ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.पी.एस. मौर्य तसेच कर्नल एस. नारायनील आणि कॅप्टन संदीप नवले यांचे या छात्रांना विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. गेल्या सलग सात वर्षांपासून या महाविद्यालयातील छात्रांची राजधानीतील संचलनासाठी निवड होत असून २०१३ पासून १६ छात्रांनी राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
या वर्षी निवड झालेली ऐश्वर्या खैरनार ही छात्रा मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची माजी विद्यार्थिनी आहे.

 

पद्मभूषण आबासाहेब गरवारे यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मएसो आबासाहेब गरवारे कॉलेज आणि मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या दोन्ही महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार, दि. २१ डिसेंबर २०१८ रोजी मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास यशस्वी मराठी उद्योगिनी व ‘पूर्णब्रह्म’ या सर्वात मोठ्या मराठमोळ्या हॉटेल शृंखलेच्या संचालिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर ‘पूर्णब्रह्म’ च्या जागतिक प्रमुख वृषाली शिरसाव या देखील उपस्थित होत्या. याप्रसंगी दोन्ही महाविद्यालयातील वर्ष २०१७-२०१८ मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा सौ. कठाळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. “कशालाही न घाबरता सचोटीने आणि आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने सुनिश्चित वाटचाल” हा यशाचा मूलमंत्र सौ. कठाळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी अतिशय रंजक शैलीत, प्रभावीपणे केलेले अनुभवकथनाने सर्व श्रोते भारावून गेले. 

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे दरवर्षी कै. आबासाहेब गरवारे यांचा जयंतीदिन ‘उद्योजकता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यानिमित्त दोन दिवसीय राज्यस्तरीय बिझनेस फेयर (उद्योग मेळावा) आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन सौ. कठाळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात, महाविद्यालयांत गेल्या १६ वर्षांपासून उद्योजकता विकासाचा ध्यास घेतलेल्या डॉ. गीता आचार्य यांच्या प्रयत्नांचा गौरव केला तसेच मूल्याधिष्ठित शिक्षणातून सकस समाज निर्मितीसाठी म.ए. सो. सारख्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.बी. बुचडे यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थचे सचिव व मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे उपप्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी तसेच गरवारे ट्रस्टतर्फे मा. श्री. सुनील सुतावणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजकता विकास केंद्रप्रमुख डॉ. अर्चना जोशी यांनी तर आभार प्रदर्शन कॉमर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. भूषण राठोड यांनी केले.


 

Scroll to Top
Skip to content