“देशाला स्वातंत्र्य मिळतानाच निर्माण झालेल्या पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात कधीच एकात्मभाव निर्माण झाला नाही. १६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम पाकिस्तानची संस्कृती पूर्व पाकिस्तानातील बंगाली जनतेने स्वीकारली नाही. उर्दू ही देशाची राष्ट्रभाषा म्हणून देखील बंगाली जनतेला मान्य नव्हती कारण त्यांना फक्त बंगाली भाषाच येत होती. त्यामुळे फार मोठी हिंसक निदर्शने झाली आणि अखेर बंगाली भाषेलादेखील राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा लागला. अशा अनेक घटना घडल्याने बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाची बीजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना झालेल्या फाळणीत रोवली गेली असे म्हणता येईल,” असे प्रतिपादन ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) यांनी आज (सोमवार, दि. १५ मार्च २०२१) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘विजय दिवस ७१ – एक दृष्टीक्षेप’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल बी.टी. पंडित (निवृत्त) होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ब्रिगेडिअर अजित आपटे (निवृत्त) आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

महाजन पुढे म्हणाले की, “श्रीनगरजवळील हजरतबल येथील मशिदीमधून प्रेषित महमंद यांचे पवित्र अवशेष डिसेंबर १९६३ मध्ये चोरी झाले. त्यावेळी पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान पूर्व पाकिस्तानात ढाका येथे होते. त्यांनी या घटनेसाठी भारताला दोषी ठरवले. परिणामी जानेवारी १९६४ मध्ये पूर्व पाकिस्तानात फार मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला, बंगाली हिंदूंना लक्ष्य केले गेले आणि त्यामध्ये प्रामुख्याने उच्चशिक्षित बंगाली हिंदू होते. १९६९ मध्ये पाकिस्तानातील आर्थिक, सामाजिक स्थिती कमालीची खालावली. ती परिस्थिती हाताळता न आल्यामुळे अयुब खान यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख याह्या खान यांच्याकडे सचत्ता सोपवली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मुजीब-उर-रहमान यांच्या अवामी लीग या पक्षाला प्रांतिक आणि राष्ट्रीय स्तरावर बहुमत मिळाले. मुजीब-उर-रहमान यांनी पूर्व पाकिस्तानला स्वायत्तता आणि बंगाली लोकांच्या हाती सत्ता देण्याची मागणी केली. मात्र लष्करी सत्तेने त्यांच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या. बंगाली मुस्लिमांनी मार्च १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानातील पश्चिम पाकिस्ताने समर्थक असलेल्या बिहारी मुस्लिमांचे हत्याकांड केले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल टिका खान यांनी पूर्व पाकिस्तानात कारवाई केली. मुजीब-उर-रहमान यांना अटक करण्यात आली आणि त्यांना पश्चिम पाकिस्तानात तुरूंगात डांबण्यात आले. याविरोधात तेथे मुक्तीवाहिनीची स्थापना झाली. भारताने त्याला पाठबळ दिले. दरम्यानच्या काळात पूर्व पाकिस्तानातून सुमारे 1 कोटी शरणार्थी भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये आश्रयाला आले होते. त्यामुळे या राज्यांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. या संबंधात भारत सरकारने आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हा प्रश्न उपस्थित केला मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अखेर भारताने प्रत्यक्ष युद्धाचा निर्णय घेतला. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून एक नवा देश निर्माण झाला. या युद्धामुळे पूर्व पाकिस्तानचे संरक्षण हे पश्चिम पाकिस्तानच्या हातात आहे ही समजूत खोटी ठरली. भारतीय फौजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे ९३ हजार युद्धकैदी बनले. त्यांना माणुसकीची बागणूक दिली, कारण ती आपली संस्कृती आहे. त्यांना भारताने नंतरच्या काळात मुक्त केले परंतु त्याबदल्यात भारताच्या पदरात काहीच पडले नाही. पाकिस्तानच्या ताब्यात आजदेखील भारतीय युद्धकैदी आहेत मात्र पाकिस्तान ते मान्य करत नाही. बांगलादेशच्या या स्वातंत्र्य युद्धात रशियाने भारताला पाठिंबा दिला, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आपला नकाराधिकार वापरला. रशियाच्या या भूमिकेमुळे चीनला शह बसला आणि तो पाकिस्तानच्या मदतीला आला नाही.”

ब्रिगेडिअर अजित आपटे (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात सांगितले, “ बांगला देशचे स्वातंत्र्य युद्ध १४ दिवस सुरू होते असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात ते ९० दिवस सुरू होते. १९७१ सालच्या डिसेंबर महिन्यात अधिकृतपणे ते सुरू झाले परंतु सप्टेंबर महिन्यातच खऱ्या अर्थाने त्याची सुरवात झाली होती. भारतीय लष्कराने बांगलादेश मुक्ती वाहिनीला मदत करून युद्धाची पूर्वतयारी केली होती. पाकिस्तानी लष्कराची गुप्तहेर यंत्रणा आणि मुक्ती वाहिनीतील हस्तकांकडून भारतीय लष्कराच्या ठाण्यांची माहिती मिळत होती. त्याआधारे त्यांचे हवाईदल या ठाण्यांवर हल्ला करत होते. मात्र, आमच्या तुकडीने अतिशय कौशल्याने पाकिस्तानची दोन विमाने पाडली आणि त्यांच्या वैमानिकांना ताब्यात घेतले. भारताच्या  लष्कर, हवाईदल आणि नौदल या तिन्ही अंगांचा उत्तम समन्वय या युद्धात होता. तसेच आक्रमणाची व्यूहरचना बिनचूक होती आणि त्याची अमलबजावणीदेखील तितकीच अचूक पद्धतीने झाली.”

आपल्या अध्यक्षीय भाषणात लेफ्टनंट जनरल बी.टी. पंडित (निवृत्त) म्हणाले, संपूर्ण देशाने एकत्रितपणे हे युद्ध लढाल्याचे सांगितले. राजकीय नेतृत्वाचा कणखरपणा, जगभरातून मिळवलेला पाठिंबा, सैन्यदलांना नोकरशाहीने केलेले सहकार्य हे त्याचे महत्वाचे पैलू आहेत. हे युद्ध पाकिस्तानच्या भूमीवरच लढायचे, त्यांना आपल्या सीमेच्या आत येण्याची संधी द्यायची नाही आणि जम्मू-काश्मीरशी संपर्क अखंड राहील याची पूर्णपणे खबरदारी घ्यायची ही ध्येय त्यावेळी डोळ्यासमोर होती. मुक्तीवाहिनीची फार मोठी मदत झाली, पण भारतीय जनतेने दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे सैन्यदलांचे आत्मिक बळ प्रचंड वाढले होते. पाकिस्तानला संपवण्याची भावना प्रत्येक सैनिकात निर्माण झाली होती, त्यामुळेच फार मोठा, निर्णायक आणि ऐतिहासिक विजय भारताला मिळाला.”

कार्यक्रमाच्या सुरवातील एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, युद्धात मिळालेल्या विजयातूनही शिकायला मिळते, ते कळावे म्हणून विजयी योद्ध्यांप्रमाणेच तेव्हा युद्धकैदी झालेल्यांनाही या व्याख्यानमालेसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

सौ. लीना चांदोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

 

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीदिनी आज संस्थेच्या मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. बाबासाहेब शिंदे व अॅड. सागर नेवसे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य मा. विनय चाटी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर यांनी आद्यक्रांतिवीरांच्या प्रतिमेला फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना श्रद्धांजली वाहिली.

“कागदावर आखलेली सीमारेषा, शस्त्र-सामुग्रीचा प्रचंड अभाव, चुकीची युद्धनीती, हवाई दलाचा वापर न करण्याचा निर्णय, चीनवर ठेवलेला अनाठायी विश्वास आणि अपरिपक्व राजकीय नेतृत्व यामुळे भारताला 1962 साली चीनविरुद्धच्या युद्धात पराभव स्वीकारावा लागला. सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे, युद्धातील पराभवाला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांचे पुनर्वसन आणि नोकरशाहीला मिळालेले अभय यामुळे देशातील जनमानसाचे खच्चीकरण झाले. राजकीय नेतृत्वाला संरक्षण दलांचे कळालेले महत्व, सैन्य दलांमधील भरती आणि देशाचा संरक्षण खर्च यांत झालेली वाढ ही या युद्धाची फलनिष्पती आहे,” असे प्रतिपादन मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘भारत-चीन युद्ध – 1962’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडीअर रघुनाथ जठार (निवृत्त) हे होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

1971 साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आठवण कायम ठेवण्यासाठी 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी त्याला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारतीय सैन्याच्या पराक्रमाची माहिती समाजाला व्हावी

या हेतूने वर्ष भर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यातील दुसरे व्याख्यान आज आयोजित करण्यात आले होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हे व्याख्यान झाले. ‘मएसो’चे फेसबुक पेज आणि यूट्युब चॅनलद्वारे त्याचे थेट प्रसारण करण्यात आले.

 

“1914 सालच्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या एका गुप्त बैठकीत कागदावरील नकाशावर   भारत आणि चीन यांच्यादरम्यान असलेली मॅकमोहन सीमा रेषा आखली गेली. ब्रिटीशकालीन सर्व करार चीनने नाकारले. 1954 सालपर्यंत चीन सीमेबाबत भारताची भूमिका संभ्रमित होती. पुढे तिबेट हा चीनचा भूभाग असल्याचे भारताने मान्य केले. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘पंचशील’ धोरण स्वीकारले. चीन भारतावर आक्रमण करणार नाही असा अनाठायी विश्वास भारताने बाळगला. पंडित नेहरूंनी सीमारेषेसंदर्भातील एक चूक चीनचे राष्ट्राध्यक्ष चाऊ ऐन लाय यांच्या लक्षात आणूनही दिली होती. परंतू, त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. 1960 सालापर्यंत चार हजार किलोमीटर लांब असलेल्या चीन सीमेवर आसाम रायफल्सची तैनाती होती. तेव्हा सीमाभागात भारताने रस्तेदेखील बांधलेले नव्हते. 1961 सालच्या ऑक्टोबर महिन्यात लेह ते चुशूल हा रस्ता झाला आणि त्यानंतर जानेवारी 1962 मध्ये बोडिला ते तवांग हा रस्ता बांधण्यात आला. चीनच्या युद्धनीतीचे जाणकार असलेले लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांनी तवांग ते हुलियांग हा रस्ता बांधण्याचा आग्रह धरला होता मात्र तत्कालिन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांनी तो मान्य केला नाही. चीन भारतावर आक्रमण करणार नाही अशी खात्रीच राजकीय नेतृत्वाला वाटत होती. त्यामुळेच चीनच्या सीमेवरील लहान असलेल्या ठाण्यांवर अतिशय कमी संख्येने सैन्य तैनात करण्यात आले होते. एकूण 36 ठाण्यांवर आपल्या फक्त दोन बटालियन तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भारतीय सैन्याची ताकद विखुरली गेली. 22 चीनी सैनिकांच्या तुलनेत केवळ तीन सैनिक सीमेवर तैनात होते. चीनने त्यांची ठाणी वाढवल्यानंतर भारताने देखील ठाणी वाढवली आणि त्यामुळे भारतीय सैन्य अधिकच कमकुवत झाले. एका ठाण्यावर केवळ 11 सैनिक तैनात होते. त्यातच भारतीय सैनिकांकडे शस्त्रे, दारूगोळा, साधनसामुग्री यांचा प्रचंड अभाव होता, राजकीय नेतृत्वाने त्यांना स्वतःच्या हिमतीवर लढण्यासाठी सोडून दिले होते. त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धात युरोपात अतुलनीय पराक्रम जागवणारी भारतीय सैनिकांची एक सबंध तुकडीच चीनविरूद्धच्या युद्धात गारद झाली. या युद्धात भारताचे 1383 सैनिक धारातिर्थी पडले तर 1696 सैनिक बेपत्ता झाले. अमेरिका आणि इंग्लंडने या काळात भारताला पाठिंबा दिला. अमेरिकेने शस्त्रे देण्याची तयारी दाखवली. भारतीय सेनानींचा विरोध डावलून पर्वतरांगांमधील युद्धासाठी उपयोगी नसलेली शस्त्रे भारताने अमेरिकेकडून खरेदी केली. या युद्धातील भीषण अनुभवांमुळे काही सैन्याधिकाऱ्यांनी राजीनामे देखील दिले. युद्धकाळात पायउतार व्हावे लागलेल्या कृष्ण मेनन यांची देशाच्या संरक्षण मंत्री पदी पुन्हा वर्णी लावण्यात आली, देशातील नोकरशाहीला या सर्व घडामोडींची कोणतीच झळ बसली नाही. मात्र, या युद्धामुळे संरक्षण दलांची आवश्यकताच नाही अशी धारणा करून घेतलेल्या राजकीय नेतृत्वाला संरक्षण दलांचे महत्व लक्षात आले. त्यातूनच सैन्यात मोठ्या संख्येने भरती सुरू झाली आणि संरक्षण खर्चावरील तरतूदीत वाढ झाली, हीच या युद्धाची फलनिष्पती म्हणता येईल,” असे पित्रे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, 62 साली झालेल्या चीनविरूद्धच्या युद्धाची आठवण आपल्या कोणालाच आवडत नाही. या युद्धामुळे शेजारी देशांबाबत वाटणारा विश्वास भारताने गमावला.

चीनविरुद्धच्या युद्धात लडाखमध्ये तैनात असलेल्या ब्रिगेडीअर रघुनाथ जठार (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लडाखमधील परिस्थिती विशद केली. ते म्हणाले “चीनने भारताच्या सीमावर्ती भागात फार पूर्वीपासूनच रस्तेबांधणी केलेली आहे. भारताने लडाखमध्ये डरबूक-श्योक-दौलतबेग ओल्डी हा रस्ता बांधायला सुरवात केल्याने चीन अस्वस्थ झाला. दौलतबेग ओल्डी हे या भागातील मोक्याचे ठिकाण असून तिथून काराकोरम परिसरावर नियंत्रण मिळवता येते. रेझिंग्ला भागात चीनच्या सैन्याला थोपवताना शस्त्रास्त्रांच्या अभावामुळे 126 पैकी 114 सैनिक धारातिर्थी पडले. वझिरीस्तानातील धुमश्चक्री वगळता भारतीय सैन्याचा इतका दारूण पराभव कधीच झाला नव्हता. भारतीय सैनिकांनी अशा परिस्थितीत देखील चीनच्या सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी केली. युद्ध संपल्यानंतर तीन महिन्यानंतर भारतीय सैनिकांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले तेव्हा ते बर्फात गोठलेले होते पण प्रत्येक सैनिक लढाईच्याच पवित्र्यात होता असे लक्षात आले.”

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

सौ. अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

“भारतीय सैन्य 1947-48 मध्ये पाकिस्तानविरूद्ध झालेल्या युद्धात अतिशय धाडसाने लढले त्यामुळेच काश्मीर आज भारतात आहे. लडाख आणि लेहसारख्या भागात फौजांनी केलेल्या पराक्रमाची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही” असे मत ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी आज येथे व्यक्त केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘पहिले भारत-पाकिस्तान युद्ध 1947-48’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी अशोक गोखले हे होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘पहिले भारत-पाकिस्तान युद्ध 1947-48’ या विषयावर व्याख्यान देताना ब्रिगेडिअर हेमंत महाजन (निवृत्त)

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

1971 साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आठवण कायम ठेवण्यासाठी 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी त्याला 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारतीय सैन्याच्या पराक्रमाची माहिती समाजाला व्हावी या हेतूने वर्षभर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यातील पहिले व्याख्यान आज आयोजित करण्यात आले होते.

“पाकिस्तानी फौजांनी भारतावर आक्रमण करण्यासाठी त्यांच्या प्रदेशातील पश्तून आदिवासी टोळ्यांचा वापर केला. भारतीय सीमेवर पुरेशी गस्त नसल्याने या टोळ्या थेट श्रीनगरपर्यंत घुसू शकल्या. त्यानंतर काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांनी काश्मीरच्या भारतातील विलिनीकरण करारावर स्वाक्षरी केली. याच काळात लडाखमध्ये लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या फौजांनी कोणत्याही मदतीशिवाय 6 महिने लढा दिला. परंतु त्यांच्या या पराक्रमाची फारशी दखल घेतली गेली नाही. त्याचप्रमाणे लेहमध्ये एअर कमोडोर मेहरसिंग आणि फ्लाईट लेफ्टनंट एस.डी. सिंग यांच्या सोबतीने जनरल थिमय्या स्वतः वायू दलाच्या पहिल्या विमानातून उतरले, त्यामुळे सैन्याचे मनोबल वाढले. जेव्हा पाकिस्तानातील आदिवासी टोळ्यांच्या हे लक्षात आले की आपल्याला आता भारतीय सैन्याला तोंड द्यावे लागणार आहे, तेव्हा त्यांनी काढता पाय घेतला आणि त्यानंतर पाकिस्तानी सैन्य समोर आले. विशेष म्हणजे या युद्धात स्थानिक नागरिकांचा आपल्या सैन्याला खूप पाठिंबा होता आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर माहिती सैनिकांना मिळत होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी अशोक गोखले. छायाचित्रात (डावीकडून) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त).

आपल्या अध्यक्षीय भाषणात अशोक गोखले म्हणाले, “बांगला देशचे युद्ध हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. भारतीय सैन्याचा पराक्रम, धाडस, त्याग यांची इतिहासात ठळकपणे नोंद झाली पाहिजे. 1947-48 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात घटना कशा घडत गेल्या, त्याचे सूत्रधार कोण, त्यांचे कर्तृत्व आणि कृती यांचा मागोवा घेतला जाईल. पण प्रत्यक्षात असे दिसून येत होते की, 1945 साली दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटीशांना भारतातून बाहेर पडण्याची घाई झाली होती कारण, त्यांची आर्थिक स्थिती ढासळली होती तसेच त्यांना भारतीय सैनिकांच्या बंडाची भीति होती आणि स्वातंत्र्य लढा मजबूत होत चालला होता. ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे स्थान डळमळीत झाले नसते तर स्वातंत्र्य मिळताना भारतातील परिस्थिती चांगली राहिली असती आणि झालेली मनुष्यहानी टळली असती. भारतासंबंधातील धोरणे जोपर्यंत पाकिस्तानचे सैन्य ठरवत राहिल तोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंधात सुधारणा होणार नाहीत.”

व्याख्यानानंतर मान्यवरांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातील एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

सौ. अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी गुरुवार, दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी त्यांचे स्वागत केले.

या वेळी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, “आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या संस्थेत आल्याचा मला खूप आनंद वाटतो आहे. शिक्षण आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार करणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत.”

संस्थेचे सचिव मा. डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. विजय भालेराव, मा. सौ. आनंदीताई पाटील, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य मा. डॉ. अतुल कुलकर्णी, मा. श्री. विनय चाटी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री श्री. शंकर गायकर, श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण अभियानाचे प्रांत प्रमुख श्री. संजय मुद्राळे, प्रांत सहप्रमुख श्री. मिलिंद देशपांडे, पुणे महानगर प्रमुख श्री. महेश पोहनेरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. मा. सुधीर गाडे यांनी यावेळी संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

 

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या बोधवाक्याला अनुसरून गेल्या १६० वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. विद्यार्थी घडविताना संस्थेच्या सर्व घटकांमध्ये आत्मीयता निर्माण झाली आहे, म्हणूनच विशाल स्वरुपाचा ‘मएसो परिवार’ आकाराला आला आहे. १६० वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीनंतर आता पुढील वाटचाल करताना संस्थेने नाविन्याचा विचार केला पाहिजे. शौर्य, सांस्कृतिक पाया आणि ज्ञानाधिष्टित शिक्षणाचा विचार केला पाहिजे. आजपर्यंत आपल्या देशात केवळ पाश्चिमात्य संकल्पनेवर काम होत राहिले, आता आपल्या देशासाठी आवश्यक शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अपेक्षित असलेले योगदान संस्था निश्चितच देईल,” असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज व्यक्त केला.

संस्थेच्या १६० व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेचे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. अभय क्षीरसागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. एन.एस. उमराणी व संस्थेचे हितचिंतक, देणगीदार व संस्थेचे माजी विद्यार्थी, ‘सावली’ संस्थेचे संस्थापक मा. श्री. वसंत ठकार व त्यांचे सहकारी तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत करताना संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे म्हणाले की, संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांच्या ऑनलाईन व्याख्यानांचा लाभ सर्वांना मिळाला. या व्याख्यानांमुळे संस्थेच्या कार्याची माहिती देशपातळीवर पोहोचण्यास मोठी मदत झाली. यानिमित्ताने संस्थेच्या कार्याला मिळालेली प्रसिद्धी उत्साहवर्धक आहे.

संस्थेचे एक हितचिंतक, देणगीदार व संस्थेचे माजी विद्यार्थी, ‘सावली’ संस्थेचे संस्थापक मा. श्री. वसंत ठकार यांनी यावेळी संस्थेला भरघोस निधी दिला. संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कामाचा विस्तार फार मोठा असला तरी त्यात एकोपा आहे. त्यामुळेच मी परत एकदा संस्थेशी जोडला गेलो. संस्थेचे अध्यक्ष भूषणजी गोखले आजदेखील नवीन विषय शिकण्याचा संकल्प करत आहेत यावरून शिक्षण कधीच संपत नसते, ते निरंतर चालूच राहाते हे स्पष्ट होते. आजकाल आपल्या पालकांची विचारपूस देखील न करण्याच्या काळात १६० वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना करणाऱ्या संस्थापकांचे स्मरण आणि अभिवादन करत आहे, हे विशेष आहे.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे आपल्या भाषणात म्हणाले की, संस्थेने भविष्याकडे वाटचाल करताना आता ‘Good Education & Good Governance’ चा अंगीकार केला पाहिजे. १६० वर्षांपूर्वी १०x १० फूट आकाराच्या खोलीत मराठी विषयाच्या वर्गाच्या रुपाने सुरू झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा विस्तार ७० पेक्षा अधिक शाखा आणि असंख्य विषय शिकवण्यापर्यंत झाला आहे. या सर्व कार्याच्या इतिहास लेखनाचे काम साडेतीन वर्षांपूर्वी सुरू झाले आणि आज ते पूर्णत्वास गेले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. एन.एस. उमराणी यांनी विद्यापीठाच्या वतीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “आपल्या संस्थापकांच्या विचारसरणीच्या आधारे दैदिप्यमान आणि वैभवशाली वाटचाल करणाऱ्या या संस्थेचा एक भाग असल्याचा खूप अभिमान वाटतो. मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा प्राचार्य म्हणून काम करताना महाविद्यालयाला शैक्षणिक आणि वैचारिक उंची देण्याचा प्रयत्न केला. उद्योग जगताशी समन्वय साधला. त्यातून वाणिज्य विषयक शिक्षणाचे मॉडेल निर्माण झाले. केवळ नोकरी आणि व्यवसायासाठी उपयोगी शिक्षण न देता जीवनाची उंची वाढवण्यासाठी संस्थेने केलेल्या परिश्रमाची फळे आज दिसत आहेत.”

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांनी या प्रसंगी बोलताना, शेतीच्या तंत्रज्ञानाकडे वळण्याची गरज व्यक्त केली. कोरोना महामारीमुळे अनेक गोष्टींचे महत्त्व लक्षात आले. आपल्या देशातील ७० टक्के लोकसंख्या आजही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीच्या तंत्रज्ञानाचे महत्व अधोरेखित होते. संस्थेच्या संस्थापकांनी स्वदेशी शिक्षण, स्वावलंबी आणि देशप्रेमाने भारलेला समाज निर्माण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. त्यांचे हे हेतू आजदेखील तितकेच संयुक्तिक आहेत, असे ते म्हणाले.

संस्थेचे माजी सचिव मा. प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयातील निवृत्त अधिकारी श्री. वामन शेंड्ये यांनी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेला निधी दिला.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अवघ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, अभिजात कलांची खाण आणि विद्येचे माहेरघर असलेल्या आपल्या पुण्यनगरीमध्ये, तिचा विशेषपणा जपण्यात आणि तो वाढविण्यात गेली, दीडशे वर्षांहूनही अधिक कालावधी शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था म्हणजेच महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी येत्या १९ नोव्हेंबरला १६० वर्षे पूर्ण करीत आहे. मी स्वतः इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, मराठी माध्यम शाळेतून तर इयत्ता पाचवी ते दहावीचे शिक्षण महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्याच सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतून पूर्ण केले आहे. इ. दहावीची दुसरी सहामाही खूपच भावनाशील होती. इ. ११ वी व १२ वी चे शिक्षण मी आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घेतले. आयुष्यातले ते फुलपंखी दिवस आजही जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहतात आणि आपण जे काही आहोत त्याची मुळे किती खोलवर आपल्याला शाळेतून मिळालेल्या संस्कारांमध्ये आहेत याची जाणीव होते.

मला आठवतंय, मी १९७५ साली सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये प्रवेश घ्यायला आले त्या वेळेस हॉलमध्ये असलेल्या १९६१ च्या पूररेषेच्या पातळीची आठवण करून देणाऱ्या खुण-रेषेने माझं लक्ष वेधलं आणि त्यानंतरही शाळा सुस्थितीत असल्याचं आश्चर्य आणि अशा शाळेमध्ये प्रवेश घेत आहोत याचा आत्मीय अभिमान माझ्या बालमनाला त्यावेळी कमालीचा जाणवत होता. शाळेचं ग्रंथालय उत्तमोत्तम ग्रंथ संपदेने नटलेलं होतंच, शिवाय सुसज्ज प्रयोगशाळेमध्ये मुक्त विहार करावयाची मुभाही होती. एकत्र शिक्षण असल्यामुळे आम्हा मुला-मुलींमध्ये मार्क्स मिळविण्यासाठी कायम निकोप स्पर्धा असायची.

विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले आहे …

“विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी

न दिसे एकही वस्तू विद्येने असाध्य आहे जी” 

शाळेमध्ये अशी विद्या आणि संस्कार रुजविण्यासाठी ज्या ऋषितुल्य शिक्षक वृन्दाचे बहुमूल्य मार्गदर्शन आणि अनमोल सहवास लाभला तो आम्हा विद्यार्थ्यांसाठी अतुलनीय ठेवाच आहे. आमचे अत्रे सर सुंदर अक्षरात संपूर्ण फळ्याचा वापर करायचे. त्यांच्या स्पष्ट आणि करारी आवाजात ज्या पद्धतीने ते इतिहास शिकवायचे त्यातील प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे रहायचे. संस्कृत भाषेची आणि विषयाची अवीट गोडी मेधा ओक बाईंकडून मिळाली, तर विज्ञानाचे केळकर सर दैनंदिन जीवनातले सोपे प्रयोग करायला शिकवायचे. त्यामुळे विज्ञान विषयही आवडायचा. शाळेमध्ये खेळालाही तितकेच महत्व होते. एके वर्षी तर काही अपरिहार्य कारणामुळे शाळेचा वार्षिक स्नेहसमारंभ अचानक रद्द झाला, त्यावेळी गुरुवर्य प्र. ल. गावडे सरांनी अतिशय संयमाने ज्या पद्धतीने आणि कौशल्याने ती परिस्थिती हाताळली त्यावरून अशा कठीण परिस्थितीमध्ये कशाप्रकारे निर्णय घ्यावेत याचा परिपाठच आम्हा विद्यार्थ्यांना मिळाला. मी आठवीत असताना शिक्षकांचा दीर्घकाळ संप सुरु होता, परंतू  संपानंतर जेव्हा शाळा सुरु झाली तेव्हा सर्व शिक्षकांनी शाळेव्यतिरिक्त थांबून संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होवू दिले नाही. त्यावेळेस मात्र माझा अत्यंत आवडता विषय ‘बागकाम’ मात्र करता आले नाही. अशा अनेक आठवणी आहेत त्या मंतरलेल्या दिवसांच्या ज्याने उर भरून येतो, मन भूतकाळात रमून जाते.

मी पुण्याची महापौर झाल्यानंतर शाळेतल्या माझ्या १९८० च्या बॅचने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने माझं कौतुक केलं. त्या समारंभाला माझे सर्व मित्र-मैत्रिणी आणि मला शिकविणारे जवळपास सर्वच शिक्षकवृंद उपस्थित होते. आम्हा सर्वाना अत्यंत आदरणीय असणाऱ्या गुरुवर्य गावडे सरांनी त्या वेळेच्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या मित्र-मैत्रिणींनी, माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या शाळेने दिलेल्या या कौतुकाच्या थापेमुळे आणि माझ्यावर व्यक्त केलेल्या विश्वासामुळे मी अधिक उत्साहाने व जोमाने काम सुरु केले. माझ्या आयुष्यातला तो अतिशय आनंदाचा आणि महत्वपूर्ण दिवस होता. जेव्हा-जेव्हा मला निराश झाल्यासारखं वाटतं त्या वेळेस ज्यांच्या पुस्तकांचा मला आधार असतो त्यांनी, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे,

“It is a shame to dream small, even when we have  the potential to do something great and noteworthy.”

खऱ्या अर्थाने माझ्या शाळेने व ‘मएसो’च्या प्रत्येक एककाने माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्षमता आणि सुप्त गुण ओळखून फक्त मोठी स्वप्नेच पहायला शिकवली नाहीत तर ती स्वप्ने पूर्ण करायला, उंच भरारी घ्यायला आमच्या पंखातही  बळ दिले. त्यामुळेच मानसशास्त्रातून एम. ए. ची पदवी संपादन केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता मी जर्मन भाषेचे शिक्षण घेतले, पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला आणि एम.बी. ए. ची पदवीही मिळवली. “हाती घ्याल ते तडीस न्या” हा माझ्या गुरुजनांनी दिलेला वसा जपताना आणि जगताना राजकारणात प्रवेश केला आणि अनेक समाजोपयोगी कामे मार्गी लावली याचं समाधान वाटतं. खास महिला सक्षमीकरणासाठी ११२ कोटी रुपयांचं बजेट उपलब्ध करून दिलं.

आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विस्तारलेल्या ज्ञानवृक्षाच्या छायेत हजारो विद्यार्थी ‘केजी टू पीजी’ शिक्षण घेत आहेत आणि विश्वसंचारी झेप घेत आहेत. खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेमी, सुसंस्कृत, समाजाभिमुख, सुजाण नागरिक निर्माण करणाऱ्या आणि आपले ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवणाऱ्या महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीला दैदिप्यमान अशा निरंतर वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

“शिक्षण हा समाजाचा कणा आहे, त्यामुळे भारतकेंद्रीत शिक्षण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तयार करण्यात आले आहे. या धोरणामुळे देशातील भावी पिढी स्वावलंबी, चारित्र्यवान आणि सामर्थ्यसंपन्न होईल. हे धोरण आत्मनिर्भर भारताचा पाया रचणारे आहे. देशाने एकमुखाने या धोरणाचे स्वागत केले आणि त्यातील वैशिष्ट्यांमुळे  जगातील अनेक देशांनी त्यांचे शिक्षण धोरण ठरविण्यासाठी भारताकडे सहकार्य मागितले आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण मंत्री मा. डॉ. रमेश पोखरियाल जी ‘निशंक’ यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर २०२०) डॉ. पोखरियाल यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.

डॉ. पोखरियाल आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील. १६० वर्षापूर्वी स्वदेशी शिक्षणाचे महत्व ओळखून देशप्रेम आणि समर्पण भावनेतून शिक्षण संस्था सुरू करणे ही घटनाच विलक्षण आहे. राष्ट्रीय शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या या संस्थेत तयार झालेले विद्यार्थी ज्या-ज्या क्षेत्रात गेले तिथे त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले.

पाश्चिमात्य विचारसरणी जगाकडे बाजार म्हणून बघते आपण मात्र संपूर्ण जगाला आपले कुटूंब मानतो. त्यामुळे आपली भावना जगाच्या कल्याणाची असते. या आपल्या शिकवणुकीमुळे आज जग अचंबित झाले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे मुल्याधिष्ठीत शिक्षणावर भर देणारे व्यापक आणि संपूर्ण परिवर्त घडवून आणणारे धोरण आहे. ते तयार करत असताना समाजातील सर्व घटकांशी विचारविनिमय करण्यात आला. सर्वांची मते विचारात घेण्यात आली. त्यामुळे हे शिक्षण धोरण सरकारने नाही तर समाजाने तयार केलेले आहे. व्यक्ती आपल्या मातृभाषेतूनच अधिक चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे या धोरणात

मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देण्यावर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील २२ प्रादेशिक भाषांपैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्याने शिकावी असा आग्रह आहे. त्यामुळे भाषांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होणार आहे. हे करत असताना इंग्रजी भाषेला कोणत्याही प्रकारे विरोध करण्यात आलेला नाही. जपान, जर्मनी, इस्राईल या देशांमध्ये मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते, परिणामी ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात या देशांनी विकास साधला आहे.

दीर्घ कालावधीनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण तयार झाल्याची चर्चा होते. प्रत्यक्षात लॉर्ड मॅकॉलेने देशातील समृद्ध शिक्षण परंपरा, भाषा आणि संस्कृति उद्धवस्त करण्यासाठी १५० वर्षांपूर्वी तयार केलेल्या धोरणानंतर खऱ्या अर्थाने भारतीय जीवनमूल्यांवर आधारलेले हे पहिलेच शैक्षणिक धोरण आहे. ते सर्वसमावेशक आणि प्रभावी आहे.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम्’ ची शिकवण माणूस घडवणारी आहे, माणसाचे मशिन बनवणारी नाही. लॉर्ड मॅकॉले नव्या शिक्षण पद्धतीच्या आधारे जेव्हा देशाच्या संस्कृतीवर आघात करत होता, त्याच कालखंडात राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यक्त झालेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच सहयोग देईल.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आभारप्रदर्शन तर डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

                 डॉ. श्यामा घोणसे

१९ नोव्हेंबर २०२० ला ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ शतकोत्तर हीरक महोत्सव वर्षपूर्ती साजरी करत आहे. साध्या सोप्या भाषेत बोलायचे तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे ने महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्राला अखंडपणे १६० वर्षे आपले अमूल्य योगदान दिलेले आहे. संस्था म्हणून विचार करता हा कालखंड तेजस्वी हिऱ्याला बावन्नकशी सोन्याचे कोंदण लाभावे असा लखलखित, देदीप्यमान असला तरी, कसल्याही सत्ता-संपत्ती-धनदांडगेपणा यांचा वरदहस्त नसल्यामुळे, कसोटी पाहणारा होता.

वामन प्रभाकर भावे, लक्ष्‍मण नरहर इंदापूरकर यांच्यासारखे शिक्षणातून राष्ट्रीय वृत्तीचा जागर करणारे शिक्षक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतीला शिक्षणाची जोड देणारे द्रष्टे सचिव, खजिनदार आणि वैयक्तिक विकासाच्या ध्यासाला समाजहिताची, राष्ट्रीय अस्मितेची जोड देणारा सुजाण पालकवर्ग या त्रिसूत्रीतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची गंगोत्री उगम पावली. त्यामुळेच परकीय सत्तेच्या रोषाचा, लाभालाभाचा विचार न करता ‘मएसो’च्या या ज्ञानगंगोत्रीने आज “केजी टू पीजी” आणि सेवाभावी वैद्यकीय शिक्षणाबरोबरच पत्रकारिता, व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करीत नवीन पिढीला आत्मनिर्भर बनविणारे विविध  अभ्यासक्रम शिकविणाऱ्या ७७ शाखांइतका पल्ला गाठलेला आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या विविध क्षेत्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या रूपाने योगदान देत   विशाल रूप धारण केले.                                            .

विविध शाखा विस्तारलेल्या ‘मएसो’चे “क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे” हे बोधवाक्य!

‘मएसो’चा इतिहास खूप मोठा आहे. या प्रवासात चढ-उतार, वाटा, वळणे खूप आहेत. प्राध्यापक म्हणून, आजीव सदस्य, नियामक मंडळ सदस्य आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० वर्षांच्या इतिहासातील आजीव सदस्य मंडळाची पहिली महिला अध्यक्ष म्हणून माझ्या संस्थेबद्दल भरभरून बोलण्यासारखेही खूप आहे. माझा आणि संस्थेचा ऋणानुबंध जवळपास तीन तपांहून अधिक आहे.

शिक्षणाचे होणारे बाजारीकरण, या क्षेत्रात होणारे काही स्तुत्य तर काही काळजीमग्न करणारे बदल, ज्ञानाची विस्तारलेली क्षेत्रे आणि विद्यार्थी-शिक्षकांचे तुटत चाललेले नाते, पालकांचा अनाठाई हस्तक्षेप, बदलती शैक्षणिक धोरणे या सगळ्यांची गेली किमान चाळीस वर्षे मी साक्षी आहे, त्याची घटक आहे. या पार्श्वभूमीवर गेली १६० वर्षे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अक्षुण्ण प्रवास करु शकली; त्याची कारणमीमांसा करीत असताना काही गोष्टी नमूद करायलाच हव्यात. आपापल्या क्षेत्रात नामांकित असूनही संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने, निरलसपणे योगदान देणारे संचालक मंडळ, प्रयोगशील शिक्षक आणि या प्रयोगातही त्यांचे विद्यार्थ्यांशी असणारे आत्मीय नाते, समर्पण वृत्तीचे शिक्षकेतर बंधू-भगिनी आणि स्वागतशील, सहकार्य करणारे पालक यांची प्रदीर्घ परंपरा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला लाभलेली आहे. “शिक्षण विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही”, सामाजिक समरसतेचा प्रयोग करीत असताना शिक्षण हे प्रभावी साधन आहे याचे भान आणि जाण असलेले द्रष्टे क्रियावंत मएसोला आरंभापासूनच लाभले. त्यामुळेच त्यावेळची सासवड, बारामतीसारखी छोटी गावे असतील,वैद्यकीय शिक्षणाच्यादृष्ट्या, वैद्यकीय सुविधेच्यादृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या लोटे घाणेखुंटसारख्या दुर्लक्षित भागात, महानगरातल्या माथाडी कामगारबहुल आव्हानात्मक उपनगरात, ‘मएसो’ पोहोचली. स्त्री शिक्षण हा आरंभापासूनच ‘मएसो’च्या ध्येयधोरणातील भाग असल्यामुळे इथे मुलींची संख्याही अधिक आहे. शिक्षणाला आत्मसामर्थ्य-संपन्नतेची जोड देणारी महाराष्ट्रातील मुलींची पहिली सैनिकी शाळा काढण्याचा प्रयोगही इथेच रुजला, बहरला आहे.

हे सारे, यासारखे सारे जे आहे ते, नोंद घेण्यासारखे आहेच. पण यापेक्षाही अधिक महत्त्वाचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने अनेक पिढ्यांशी नाते जोडलेले आहे. म्हणूनच, आजोबा-आजी ते नातवंडे ‘मएसो’चेच विद्यार्थी असल्याचे पिढीजात चित्र दिसते. आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वसंपन्न, मुद्रांकित असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच आपले दररोजचे साधे परंतु सदाचारसंपन्न जीवन जगणारे, प्रतिकूलतेतही आपल्या घासातला घास समाजासाठी  देणारे, चारित्र्यसंपन्न  विद्यार्थी/नागरिक घडविण्याचे कार्यही ‘मएसो’ने केलेले आहे. त्यामुळेच एअरपोर्टवर भेटणारा एखादा रुबाबदार अधिकारी मी ‘मएसो’चा आहे, हे ज्या आत्मीयतेने सांगतो; त्याच आत्मीयतेने,अभिमानाने सांगणारे रिक्षावाले काका सहजपणे भेटतात. कडक सॅल्यूट ठोकत मी ‘मएसो’ची आहे सांगणारी महिला अधिकारी असेल किंवा एखाद्या प्रदर्शनात जिच्या कलाकुसरीचे कौतुक करावे ती व्यावसायिक भगिनी ‘मएसो’ची असते आणि भाजीचा हिशेब चोखपणे देणारी,आत्मियतेने भाजीची पिशवी गाडीत ठेवणारी मैत्रिणी “मी ‘मएसो’ची” असे सांगते तेव्हा कळते मित्रमैत्रीणींनो की, माझी मएसो कशी, कुठे-कुठे, किती प्रभावीपणे रूजली आहे. जेव्हा ‘मएसो’च्या एखाद्या शाखेचे म्हणजे शाळेचे किंवा काॕलेजचे नाव घेतले जाते, तेव्हा मूळ प्रवाह किंवा प्रभाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचाच असतो.

…तर मग आपण आज एकमेकांना शुभेच्छा देऊयात…

आपण एकशे साठ वर्षांचे झालो…१६१ व्या वर्षात प्रवेश केला आहे…

मनःपूर्वक शुभेच्छा आणि

“हो ‘मएसो’… तू आमच्या श्वासात, ध्यासात आणि स्वप्नातही आहेस…

तुझ्यामुळेच आम्ही आहोत, तुझ्यामुळेच आम्ही आहोत, सदैव तुझ्याबरोबरच राहण्याचा आशीर्वाद तू आम्हांला दे!”

  • डॉ. श्यामा घोणसे

“महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे योगदान फार मोठे आहे, महाराष्ट्र आणि देश ते कधीही विसरू शकणार नाही. आपला देश स्वावलंबी, समृद्ध, सामर्थ्यसंपन्न, शक्तीशाली व्हावा आणि जगातील आर्थिक महासत्ता व्हावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी नेमका जीवन दृष्टीकोन बाळगून काम करण्याची गरज आहे. भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी आज केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त आज (मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२०) मा. गडकरी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. श्री. प्रदीप नाईक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि मा. श्री. अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर गाडे उपस्थित होते.

मयूर कॉलनीत असलेल्या मएसो ऑडियोरिअममध्ये कोविड -१९ महामारीच्या संदर्भातील सर्व शासकीय नियमांचे काटेकोर पालन करत निमंत्रित मान्यवरांच्या मर्यादित उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

मा. गडकरी आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर याद्रष्ट्या व्यक्तींनी देश पारतंत्र्यात असताना स्वदेशी शिक्षणाची गरज लक्षात घेऊन देशातील भावी पिढीवर संस्कार करून स्वावलंबी, संपन्न, समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्र निर्माण व्हावे या भावनेतून या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्थेचा १६० वर्षांचा इतिहास हा पिढी घडवण्याचा इतिहास आहे.

लहान विद्यार्थ्यांवर संस्कार करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणे आणि त्याला एक आदर्श माणूस बनवणे हे समाजासाठी आवश्यक असते. ज्ञान ही अतिशय प्रभावी शक्ती आहे. ज्ञानाच्या आधारे संपत्तीची निर्मिती करणे आवश्यक असल्याने आत्मनिर्भर भारताची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. या ज्ञानाचे संवर्धन करण्यासाठी शालेय स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हे ज्ञान मिळवून आपल्या देशाला जगात नाव मिळवून दिले आहे. पुणे हे खऱ्या अर्थाने विद्येचे माहेरघर आहे. पुण्यातील लाखो विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत, याचे कारण पुण्यातील शिक्षणसंस्था. पुण्यातील शिक्षण संस्थांनी सुसंस्कारित आणि चांगल्या पिढ्या घडविल्या आहेत. पुण्यात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती राहातात. डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षणाची गुणवत्तादेखील वाढली आहे.  समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे हे महत्त्वाचे आहे पण त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण मिळणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. विविध क्षेत्रात प्रगती आणि विकास करायचा असेल तर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, सृजन, उद्योजकता, शास्त्र, तंत्रज्ञान आणि संशोधन या सर्वच क्षेत्रात ज्ञान मिळविण्याची गरज आहे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने हे ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. एक मोठी शक्ती एवढ्याच दृष्टिकोनातून ज्ञानाचा विचार करून चालणार नाही. त्याच्याबरोबर मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, कुटुंब पद्धती, शिक्षण पद्धती ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्याला ज्ञान आणि संपत्ती दोन्ही मिळवायचे आहे. संपत्तीबरोबरच मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विश्वकल्याणाचा विचार देणारी भारतीय संस्कृती आणि इतिहास, परंपरा यांचे हेच वैशिष्ट्य आहे की, आपल्या संस्कार पद्धतीमुळे आदर्श नागरिक देखील घडतात. यामध्ये ‘मएसो’ सारख्या शिक्षण संस्थांचा फार मोठा वारसा आहे.

आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल, त्याचप्रमाणे फार मोठ्या संख्येने शिक्षणासाठी परदेशांमध्ये जात असलेल्या आपल्या देशातील विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे ही क्षमता आहे, मात्र तशी महत्त्वाकांक्षा आपण बाळगली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात पवित्र विचाराने, निस्पृह, निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची गती कमी आहे, ही खेदाची बाब आहे. चांगल्या माणसाचा चांगुलपणा समाजात जेव्हा प्रस्थापित होईल तेव्हाच समाज बदलेल. त्यामुळे निस्पृह भावनेने शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण करणे, त्यातून चांगल्या समाजाची निर्मिती करणे आणि एका चांगल्या समाजातून एक चांगले राष्ट्र निर्माण करणे ही आपल्या सर्वांची जीवननिष्ठा आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणेच अनेक महापुरुषांच्या स्वप्नातील सुखी, समृद्ध, संपन्न, स्वावलंबी, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी त्यांच्या विचारांच्या आधारावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत ज्ञानयोगी तयार करताना, त्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करताना, संस्काराद्वारे त्यांच्यातील माणूसपण जोपासून चांगले नागरिक घडवण्याचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राष्ट्रीय पुनर्निमाणात योगदान देत राहील याचा मला विश्वास आहे.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, ज्ञानातून मिळणारी शक्ती विकसित करण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्यविकास इ. माध्यमातून अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन तर प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी येत्या १९ नोव्हेंबर २०२० रोजी १६० वर्ष पूर्ण करत आहे. संस्थेच्या या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी यांचे व्याख्यान मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.

याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री मा. श्री. रमेश जी पोखरियाल ‘निशंक’ यांचे व्याख्यान बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ४.४५ वाजता होणार आहे.

सध्या कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ही दोन्ही व्याख्याने ऑनलाईन माध्यमातून होणार आहेत.

कोथरूडमध्ये मयूर कॉलनीत असलेल्या एमईएस ऑडिटोरीअम येथे मान्यवर निमंत्रितांच्या मर्यादित उपस्थितीत व सरकारी नियमांचे पालन करून ही ऑनलाईन व्याख्याने होणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या ‘ध्यासपंथे चालता …’ या ग्रंथाचे प्रकाशन शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षपूर्तीच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात आज (दि. १२ नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी ही माहिती दिली.

यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव सुधीर गाडे उपस्थित होते.

या ऑनलाईन व्याख्यानांमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक आहेत …  https://www.facebook.com/mespune  किंवा  https://www.youtube.com/c/MaharashtraEducationSocietyPuneofficial

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे विख्यात उद्योजक डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना आज सोमवार, दि.२ नोव्हेंबर २०२० रोजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशालेमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते डॉ. आबासाहेब गरवारे आणि सौ. विमलाबाई गरवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी म.ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य आणि गरवारे चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी मा. श्री. सुनील सुतावणे, शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, म.ए.सो. चे साहाय्यक सचिव व शालेचे महामात्र श्री. सुधीर गाडे, म.ए.सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रामदास अभंग, पर्यवेक्षक श्री.किसन यादव, माजी मुख्याध्यापक श्री.अविनाश वाघमारे आणि प्रशालेचे शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.
मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे तसेच म.ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य व गरवारे ट्रस्टचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. सुनील सुतावणे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
तसेच महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे साहाय्यक सचिव मा. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे, म.ए.सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर, वरिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा आगाशे व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षिका श्रीमती स्मिता कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘करिअर वेबिनार’चे आयोजन
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवानिमित्त आबासाहेब गरवारे महाविद्यालय, गरवारे काॅलेज ऑफ काॅमर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  अँड करिअर कोर्सेस या ‘मएसो’च्या घटकसंस्थांच्यावतीने बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर वेबिनार’चे आयोजन करण्यात आले आहे. बारावीचा हा महत्त्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर विविध क्षेत्रे विद्यार्थ्यांना खुणावत असतात, त्यापैकी नेमके काय निवडावे, हा प्रश्नही असतो. ‘स्कोप’ कशात असेल, याचीही पडताळणी सुरू असते. अशा वेळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन कामी येते आणि हे मार्गदर्शन घरबसल्या मिळणार आहे. दि. २३ जुलै ते ३१ जुलै दरम्यान होणाऱ्या या वेबिनारमध्ये…नक्की नोंदणी करा.
डॉ भरत व्हनकटे

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र.ल. गावडे यांनी गुरुवार, दि. २० जून २०१९ रोजी ९६ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी डॉ. गावडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले आणि संस्थेच्या नव्याने सुरु होत असलेल्या तीन महाविद्यालयांची माहिती दिली. संस्थेच्या वाटचालीबद्दल यावेळी गावडे सरांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी संस्थेचे साहाय्यक सचिव सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे प्रबंधक नीलकंठ मांडके उपस्थित होते.

gawade-sir-birthday

ssc-result-news-2019

Dr-PB-Buchadeमएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी प्रा. (डॉ.) पी.बी. बुचडे यांची निवड करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निवड समितीमार्फत ही निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आज (दि.२७) त्यांनी नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.

डॉ. बुचडे यांना शिक्षण, संशोधन व प्रशासन क्षेत्रातील ३२ वर्षांचा अनुभव असून त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. पी.एचडी. साठी ते मार्गदर्शकही आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स अभ्यास मंडळाचे प्रमुख म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले आहे.

डॉ. बुचडे सन १९८६ पासून मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कार्यरत असून २००० सालापासून ते इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख आहेत. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणून सध्या ते जबाबदारी सांभाळत होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री. अभय क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. मा. अभय क्षीरसागर हे व्यवसायाने सनदी लेखापाल आहेत. ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे ते गेली १० वर्षे सदस्य असून संस्थेच्या विविध समित्यांमध्ये कार्यरत आहेत. तसेच संस्थेला व संस्थेच्या विविध शाखांना त्यांचे अर्थविषयक मार्गदर्शन लाभत आहे.

संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.

GB-VC-Kshirsagar

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील ‘सर्क्युलर बिल्डिंग’च्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमीपूजन व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मंगळवार, दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. यशवंत वाघमारे, श्री. प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य श्री. प्रल्हाद राठी, ॲड. धनंजय खुर्जेकर, डाॅ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आनंद लेले, सदस्य व आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. बी. बुचडे,डाॅ. अतुल कुलकर्णी, प्रा. सुधीर भोसले, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. विनय चाटी, प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन अंबर्डेकर, प्रबंधक नीलकंठ मांडके, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे उपप्राचार्या डाॅ. सुनिता भागवत, डाॅ. सोनावणे, प्रबंधक किसन साबळे उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सुधारित बोधचिन्हाचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मंगळवार, दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. यशवंत वाघमारे, श्री. प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य श्री. प्रल्हाद राठी, ॲड. धनंजय खुर्जेकर, डाॅ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आनंद लेले, सदस्य व आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. बी. बुचडे,डाॅ. अतुल कुलकर्णी, प्रा. सुधीर भोसले, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. विनय चाटी, ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अंबर्डेकर, प्रबंधक नीलकंठ मांडके उपस्थित होते.

गरवारे वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे यांनी केले. ‘बोधचिन्हांना संस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्व असते. त्यावरुनच संस्थेची ओळख ठरते. उद्दीष्ट्ये समजतात. सशस्त्र सेनांमध्येही बोधचिन्ह अतिशय मानाने सांगितले जाते,’ असे विचार एअरमार्शल गोखले यांनी व्यक्त केले. नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळाच्या सदस्य, तसेच गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डाॅ. केतकी मोडक यांनी संस्थेच्या बोधचिन्हाचा इतिहास आणि नव्या बोधचिन्हाची संकल्पना या विषयी माहिती दिली.

newlogo-inauguration

मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता, पुणे ४ या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शालेय खर्चासाठीच्या निधी संकलनासाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शुक्रवार, दि. १९ एप्रिल २०१९ रोजी मयूर कॉलनीतील मएसो सभागृहात ‘कलासंयुज’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) उपस्थित होते. यावेळी शाला समितीच्या अध्यक्ष मा. आनंदीताई पाटील, महामात्र प्रा. सुधीर भोसले, मुख्याध्यापक भाऊ बडदे व सर्व शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. माधुरी आपटे (नृत्य), सुरमणि सानिया पाटणकर (गायन), मृणाल भोंगले (चित्रकला) आणि नितीन महाबळेश्वरकर (गायन) या कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

19th-Apr-2019

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यावर क्रीडा संस्कार व्हावा या उद्देशाने म.ए.सो. क्रीडावर्धिनीतर्फे शनिवार, दि. १३ एप्रिल २०१९ ते मंगळवार, दि. ३० एप्रिल २०१९ या कालावधीत संस्थेच्या पुण्यातील शाळांबरोबरच शिरवळ, बारामती, सासवड, अहमदनगर, कळंबोली येथील शाळांमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये लंगडी, कबड्डी, मल्लखांब, खो-खो, नेमबाजी, थ्रो-बॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल. स्केटींग इत्यादी खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा प्रकारच्या शिबिराचे हे सलग दहावे वर्ष आहे. संस्थेच्या विविध शाखांमधील १२४९ विद्यार्थी या उन्हाळी शिबिरात सहभागी झाले आहेत.

10th-Apr-2019

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामतीमधील मएसो कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि अहमदनगरमधील मएसो रेणावीकर माध्यमिक शाळा या दोन शाळांना केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून ‘अटल टिंकरींग लॅब’ मंजूर झाल्या आहेत. 

विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा आणि त्यांच्यात विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, जेणे करून देशामध्ये तंत्रज्ञानात्मक सर्जनशीलतेचे वातावरण आणि संस्कृती विकसित व्हावी, हा ‘अटल टिंकरींग लॅब’चा प्रमुख उद्देश आहे. 

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आणि सासवडमधील मएसो वाघीरे विद्यालय या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या तीन शाळांमध्ये यापूर्वीच ‘अटल टिंकरींग लॅब’ कार्यरत आहेत.

“भारताला गुडघे टेकायला लावणे हेच पाकिस्तानचे ध्येय आहे, त्यामुळे सातत्याने अतिरेकी हल्ले घडवून भारताला रक्तबंबाळ करण्याचे त्यांचे धोरण आहे. या अतिरेकी कारवाया पाकिस्तान पुरस्कृत आहेत. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून आपण कारवाई करू शकतो हे दाखवून देण्यासाठीच भारताने हवाईहल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत भारतातील नागरिकांनी एकजूटीने आणि खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. प्रसार माध्यमांनी आपली लक्ष्मणरेषा सांभाळली पाहिजे आणि त्याचबरोबर नागरिकांनी जनमानस अस्वस्थ होईल अशी कोणतीही कृती आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे, आपल्या आसपास काही आक्षेपार्ह घटना घडत असतील तर पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे,” असे प्रतिपादन भारतीय हवाईदलाले माजी उपप्रमुख आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन मंच यांनी ‘पाकिस्तानवरील नियंत्रित हवाईहल्ला आणि भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावर अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये हे व्याख्यान झाले. त्यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते. “भारताने शांततेसाठी सर्व प्रयत्न केले परंतु पाकिस्तानने कोणताच प्रतिसाद दिला नाही, कारण पाकिस्तानच्या लष्कराला संवाद साधण्यात कोणताच रस नाही. स्वतंत्र झाल्यानंतर ७० वर्षांपैकी ५० वर्षे पाकिस्तानात लष्कराची सत्ता आहे. जनरल मुहम्मद झिया उल हक यांच्या कार्यकाळापासून पाकिस्तानी दहशतवाद बोकाळला आहे. ५७ इस्लामी देशांचा समावेश असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन या संघटनेच्या बैठकांमध्ये वारंवार काश्मीर प्रश्नाचे रडगाणे गात आला आहे. या संघटनेच्या दि. १ व २ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत भारताला सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर पाकिस्तानाने या बैठकीवरच बहिष्कार घालण्याची धमकी दिली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडले आहे. त्यामुळे तो आता असे उद्योग करत आहे. भारताने पाकिस्तानला दिलेला व्यापारी कारणांसाठी दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा आता काढून घेतला आहे. याशिवाय भारतातून पाकिस्तानात वाहून जाणारे नद्यांचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत आपण पाकिस्तानमधील जनतेला त्रास होऊ नये असाच विचार करत आलो आहोत. पाकिस्तान मात्र कायमच दहशतवादाला प्रोत्साहन देत आला आहे. भारताच्या सीमेजवळ त्याने अतिरेक्यांचे प्रशिक्षण तळ उभारले. भारतीय हवाईदलाने नुकत्याच केलेल्या हल्ल्यात हे तळ उद्ध्वस्त केले आहेत, कोणत्याही नागरी वस्तीवर किंवा पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर हल्ला केलेला नाही.” “भारत आता देशहितासाठी बचावात्मक नाही तर आग्रही पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. भारतीय सैन्याला संरक्षण दले असे न म्हणता सशस्त्र दले असे म्हटले पाहिजे. त्यातून देशाची मानसिकता घडत असते. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचे महत्त्व खूप मोठे आहे. लढाऊ विमाने हवेत असतानाच त्यांच्यात इंधन भरता येते, त्यामुळे या विमानांची कार्यक्षमता वाढते. ५ हजार किलोमीटर अंतर मारक क्षमता असणारे अग्नीसारखे क्षेपणास्त्र आता भारताकडे आहे. याशिवाय इ.स. २०२० पर्यंत भारत हा सरासरी वय २९ असणारा जगातील सर्वात तरुण देश झालेला असेल. ही युवाशक्ती आपल्या देशाची फार मोठी ताकद आहे,” असेही ते यावेळी म्हणाले. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर विविध युद्धांच्या काळात भारताने घेतलेल्या अनेक निर्णयांचा उपापोह एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या व्याख्यानात केला. प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले. मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

“कला ही माणसाला निसर्गातील इतर प्रणिमात्रांपासून वेगळी बनवते, कलेमुळेच माणसाचा प्रवास बाह्यरुपाकडून अंतरंगाकडे होतो. आज सर्वत्र मूल्यशिक्षणाबाबत बोलले जात आहे. कला हेच सौंदर्याचे प्रमुख मूल्य आहे. आज व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघितले जाते. पण कलेमुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य बघायला आपण शिकतो. कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यामुळे प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य ओळखायची क्षमता निर्माण होते आणि ती जाणीव आपल्या आचरणात येते, ” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भरतनाट्यम नृत्यांगना व ज्येष्ठ गुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज (दि. १७ जानेवारी २०१९) झाले. त्यावेळी डॉ. सुचेता भिडे-चापेकर बोलत होत्या. 

मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरीयममध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाच्या सदस्य व मएसो कलावर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे तसेच ‘मएसो कलावर्धिनी’तील कला मार्गदर्शक व आघाडीच्या शास्त्रीय गायिका आरती ठाकूर-कुंडलकर, ज्येष्ठ संवादिनी वादक सुयोग कुंडलकर, ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण व रश्मी देव याप्रसंगी उपस्थित होते. 

‘मएसो कलावर्धिनी’त सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी शास्त्रीय संगीत, संवादिनी (हार्मोनियम), तबला यांचे तसेच सर्व शाळांमधील इ. ६ वी ते इ. ९ वी तील विद्यार्थ्यांसाठी अभिनयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

संगीत, अभिनय आदी ललित कलांच्या शिक्षणामुळे व्यक्तिमत्वावर अतिशय सकारात्मक आणि दूरगामी परिणाम होत असतो. त्यामुळे कोणत्याही कलेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने ‘मएसो कलावर्धिनी’ची स्थापना केली असल्याचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 

‘मएसो कलावर्धिनी’त तीन महिन्यांच्या अभिनय प्रशिक्षण वर्गात आठवड्यातून दोन दिवस दोन-दोन तास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून कलेची आवड जोपासायला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच मदत होईल असे योगेश सोमण यांनी यावेळी सांगितले. 

आरती ठाकूर-कुंडलकर कलेच्या प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून सांगताना म्हणाल्या की, संगीत हे स्वतःच्या आनंदासाठी शिकले पाहिजे. अल्प कालावधीत कलेची तोंडओळख होते आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू होतो. कलेचे रसग्रहण शिकल्यामुळे कलाकाराबरोबरच उत्तम रसिकही घडतात. 

मएसो कलावर्धिनीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी, ‘मएसो कलावर्धिनी’त कालांतराने नृत्य, शिल्प, चित्र आदी कलांचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार असल्याची माहिती आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात दिली. 

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील शिक्षिका सौ. श्रुती जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर आरती ठाकूर-कुंडलकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी तर संजय देशपांडे यांनी तबल्यावर साथ केली.

Scroll to Top
Skip to content