छायाचित्रात (डावीकडून) : ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, मा. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’चे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची १६० वर्षांची ऐतिहासिक वाटचाल मांडणाऱ्या ‘ध्यास पंथे चालता …’ या इतिहास ग्रंथाचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा ग्रंथ सिद्ध केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासूनची वाटचाल जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ संदर्भ म्हणून वाचकांना अतिशय उपयोगी ठरणार आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या महान व्यक्तीने अन्य सहकाऱ्यांबरोबर १८६० मध्ये स्थापन केलेली पुण्यातील ही पहिली खासगी शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या स्थापनेमागे युवावर्गाला शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन चारित्र्य निर्माणाबरोबरच त्यांच्यासमोर आदर्श ठेवण्याचे उदात्त ध्येय होते. जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीप्रमाणेच परमहंस मंडळी, पुणे सार्वजनिक सभा, सत्यशोधक समाज अशा संस्थादेखील कार्यरत होत्या. अशा सर्व संस्थांमुळे राष्ट्रीयत्वाची भावना वाढीला लागली आणि देशातील स्वातंत्र्य सैनिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रबळ झाली. भारतीय पुनरुस्थानाच्या कालखंडात असे नेतृत्व आणि संस्था निर्माण करण्यात आणि स्वातंत्र्य संग्रामाची वैचारिक बैठक तयार करण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महादेव गोविंद रानडे, वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या देशभक्तांचा विसर पडून चालणार नाही,” असे प्रतिपादन देशाचे मा. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत बोलताना केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आणि ‘ध्यास पंथे चालता…’ या संस्थेच्या इतिहास ग्रंथाचा प्रकाशन समारंभ देशाचे माननीय उपराष्ट्रपती श्री.  एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज (मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी) राजधानी दिल्ली येथे उपराष्ट्रपती निवासात संपन्न झाला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे तसेच ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपती निवासात उपस्थित होते.

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे पुण्यातून सहभागी झाले होते. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित संख्येने निमंत्रित पुण्यातील मएसो ऑडिटोरीअममध्ये उपस्थित होते.

दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.

ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक यांनी संस्थेच्या इतिहास लेखनामागील प्रेरणा, भूमिका आणि लेखनासाठी केलेले संशोधन कार्य याबद्दल माहिती दिली.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

“देशाने मला काय दिले? असा विचार न करता मी देशासाठी काय करू शकतो? हा भाव मनात बाळगून निरपेक्षपणे देशसेवा करणे हीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या अनामवीरांना खरी श्रद्धांजली ठरेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वयंप्रेरणेतून काम करणाऱ्या या स्वातंत्र्य योद्ध्यांची कोणतीच वैयक्तिक आकांक्षा नव्हती, आपल्या नावाची कोणी दखल घ्यावी असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. त्यांच्या बलिदानात त्यांच्या परिजनांचे योगदान देखील खूप मोठे आणि न विसरता येण्यासारखे आहे. आपण आजपर्यंत त्यांची दखल घेतली नाही ही खंत या अनामवीरांचे स्मरण करताना आपण लक्षात घेतली पाहिजे, त्यांचे मोठेपण सांगत असताना या अनामवीरांबाबत असलेल्या कर्तव्यबोधाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि त्यातून आपण देशसेवेसाठी सक्रीय झाले पाहिजे, ही खरी आवश्यकता आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या या वीरांना कायमच अनाम ठेवण्यासाठी नियोजनपूर्वक कोणी काम करत आहे का? याचाही विचार आपण केला पाहिजे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रचार प्रमुख मा. प्रमोद बापट यांनी आज येथे केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘स्वराज्य – ७५: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील पहिले पुष्प गुंफताना मा. प्रमोद बापट बोलत होते. ‘अनामवीरा …!’ हा आजच्या व्याख्यानाचा विषय होता.

म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक होते. म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’च्या अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर हे ऑनलाईन माध्यमातून या व्याख्यानाला उपस्थित होते. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आरंभीचा काळ हा विविध क्षेत्रातील उभारणीचा होता, काही क्षेत्रात आपण अपेक्षित उंची देखील गाठली. परंतू त्याचबरोबर श्रेयवादाची स्पर्धा सुरू झाली. त्यातूनच देशासाठी आहुती देणाऱ्या वीरांची नावे पुसण्याचा प्रयत्न झाला. पारतंत्र्याच्या काळात परदेशात राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेले अनेक देशभक्त स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातील देशामधील वातावरण बघून भयापोटी मायदेशी परत आले नाहीत. कलुषित दृष्टीने बघण्याचा वारसा ब्रिटीश मागे ठेवून गेले आहेत. त्यामुळे अनामवीरांची नावे दडपण्याचा प्रयत्न हेतूतः होत असेल तर त्यांची चरित्रे वाचून, त्यांच्याबद्दल श्रद्धा बाळगून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुरेसे होणार नाही, हे अस्वाभाविक प्रयत्न आणि त्यामागील योजना समजून घेऊन ते उद्ध्वस्त केले पाहिजेत. त्याचे माध्यम शिक्षण हेच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या अशा अनामवीरांनी स्वातंत्र्यासाठी आहुती दिली. मात्र, त्यांच्या परिजनांची जी परवड झाली त्याची दखल घेतली जात नाही, त्यांचे दुष्टचक्र थांबत नाही. स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशासाठी आपण काय करू शकतो? ही भावना होती, परंतू स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता देशाने आमच्यासाठी सर्व काही करायचे आहे असा विचार रूढ झाला. असे कशामुळे घडते? तर, अनामवीरांच्या बलिदानाचे स्मरण न ठेवल्याने हे होते. ते समाजाच्या हिताचे नाही. देशासाठी मी काय करू शकतो? हा कर्तव्यबोधाचा संस्कार या भूमीतला आहे. त्यातूनच डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी यवतमाळ येथे जंगल सत्याग्रह केला होता. पण आजदेखील त्याबाबत शंका उपस्थित केली जाते. अनामवीरांना प्रमाणपत्रांची गरज आहे का? हे आपण चालू देणार आहोत का? देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने याकडे लक्ष वेधले पाहिजे. देशाच्या विविध भागात राहणाऱ्या विविध समाज घटकांनी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या भाषेतून आपल्या लोककथा, लोकगीतांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत  ठेवली. स्वातंत्र्यानंतर या समाज घटकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रविरोधी शक्तींनी त्यांना आपलेसे केले आहे, हा देशासमोरील फार मोठा धोका आहे,” असे मा. प्रमोद बापट यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’चे सदस्य डॉ. आनंद लेले यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा वारसा संस्थेला लाभला आहे. कालानुरूप आणि अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून देत असतानाच हा वारसा पुढे नेण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात देशबांधवांनी जी किंमत मोजली त्याची माहिती युवा वर्गाला करून देण्यासाठी संस्थेने व्याख्यानमालेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय संस्थेच्या शाखांमधून पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य यांनी केले. ‘अनामवीरा …!’ हे व्याख्यान राष्ट्रप्रेम, राष्ट्रचिंतन आणि राष्ट्रप्रेरणा निर्माण करणारे ठरेल. राष्ट्राच्या पुर्ननिर्माणात प्रत्येकाने योगदान द्यावे यासाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील प्रत्येक विभागाने स्वतंत्र कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि आता अमृत महोत्सव साजरा करण्याचे भाग्य मला आणि माझ्या पिढीला लाभले. परंतू स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाच्या वेळी जो विचार मांडला गेला तोच आज पन्नास वर्षांनंतर देखील मांडला जातो आहे. याचे कारण स्वातंत्र्यानंतरच्या काळात अपेक्षित दिशेने आपल्या देशाची प्रगती झाली नाही. आपला हजारो वर्षांचा इतिहास लक्षात न घेता आपला देश ७५ वर्षांचाच आहे हे समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न होतो आहे. देशात भौतिक प्रगती होत राहिल. मात्र, स्वातंत्र्याच्या शताद्बी वर्षाकडे वाटचाल करताना आत्मिक प्रगती आणि संस्कारांच्या बाबतीत आपण कुठे आहोत? देशातील नागरिकांना मानसिक आणि वैचारिक स्वातंत्र्य मिळाले आहे का? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या भवितव्याची जबाबदारी केवळ सरकारची आहे ही धारणा योग्य नाही. शिक्षण क्षेत्राला यापुढील काळात समाजाचे नेतृत्व करावे लागेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रणव कुलकर्णी यांनी केले.

प्रा. राधिका गंधे यांनी राष्ट्रगीत गायन केले.

ज्येष्ठ रंगकर्मी, प्रसिद्ध गायिका किर्ती शिलेदार यांचे आज (शनिवार, दि. २२ जानेवारी २०२२) सकाळी पुण्यात निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना तसेच सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थिनी होत्या.
आपले आई-वडिल जयराम व जयमाला शिलेदार यांच्याकडून त्यांना संगीत आणि नाट्य कलेचा वारसा त्यांना लाभला होता. वयाच्या दहाव्या वर्षी किर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवलं आणि आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आणि गायनाने रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. तब्बल ६० वर्षे त्यांनी रंगभूमीची सेवा केली. एकच प्याला, कान्होपात्रा, द्रौपदी, मानापमान, ययाति आणि देवयानी, शाकुंतल, संशयकल्लोळ, सौभद्र अशा संगीत नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
२०१८ साली झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने संगीत, नाट्य आणि नृत्य या कलांच्या शिक्षणासाठी मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हे स्वतंत्र महाविद्यालय सुरू केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला होता. https://fb.watch/aHokpJTKtz/
तसेच विद्यार्थी दशेत शाळा आणि महाविद्यालयाने आपल्या कलेला कायमच प्रोत्साहन दिल्याबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली होती.

इ. ११ वी मध्ये शिकत असताना प्रशालेच्या १९७० सालच्या नियतकालिकात त्यांनी लिहिलेल्या ‘माझी आवडती भूमिका’ या लेखातून आपल्या कलेप्रती असलेला त्यांचा समर्पित भाव लक्षात येतो.

संस्थेतर्फे किर्ती शिलेदार यांनी भावपूर्ण आदरांजली!

पुणे, दि. १२ : “आपल्या देशाचा बाह्य जगाशी जेव्हा संबंध तुटला तेव्हा आपल्या देशाची अधोगती सुरू झाली. आपल्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेला वाव नाही, असा बंदिस्त समाज प्रगती कशी करू शकेल? आपल्याला जेव्हा प्रश्न पडतात, तेव्हाच बदलांना सुरवात होते. म्हणूनच आपल्या देशातील महान व्यक्तींनी व्यवस्था बदलण्यास सुरवात केली. त्यामागे देशातील माणूस जपण्याचा विचार होता. तंत्रज्ञानाने माणसांमधील विषमता दूर होते, त्यामुळे पाश्चिमात्य देशांमधील तंत्रज्ञान आपल्या देशात यावे आणि आपल्या देशातील तत्वज्ञान पाश्चात्यांना समजावे, त्यातून संपूर्ण जग एक होईल असा विचार स्वामी विवेकानंद यांनी मांडला,” असे प्रतिपादन एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. गणेश राऊत यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.

मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी खेळ व शारिरीक प्रात्यक्षिके सादर करतात. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रात्यक्षिकांशिवाय हा कार्यक्रम मर्यादित निमंत्रतांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

डॉ. गणेश राऊत या वेळी बोलताना पुढे म्हणाले की, “ स्वामी विवेकानंद देशविदेशात भ्रमण करत असताना ऐतिहासिक वास्तू आवर्जून बघत असत. आपली संस्कृती परकीयांना समजावी यासाठी आपल्या देशाचा इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. संन्यासी लोकांनी समाजासमोरचे प्रश्न सोडवायचे असतात हे स्वामी विवेकानंदांनीच पहिल्यांदा दाखवून दिले, त्यासाठी त्यांनी ‘शिवभावे जीवसेवा’ या धारणेतून रामकृष्ण मिशनची स्थापना केली. एकाच जन्मात एखादी व्यक्ती किती प्रकारची आयुष्ये जगू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होते.  स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या दोघांनीही ‘तूच तुझा प्रकाश हो’ हा संदेश दिला. भविष्यातील उज्ज्वल यशाची पायाभरणी लहान वयातच होत असते, म्हणूनच राजमाता जिजाऊंनी बालपणी शिवरायांच्या मनात विजयानगरचे साम्राज्य कशामुळे लयाला गेले? त्याची पुनर्स्थापना करता येईल का? असे प्रश्न निर्माण केले. त्यामुळेच शिवरायांच्या मनात आपल्या राष्ट्राचा उद्धार करण्याचा विचार रूजला.”

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे देशाचे सांस्कृतिक राजदूत होते. आपल्या देशाची संस्कृती जगाला समजावून सांगण्यासाठी त्यांनी देशविदेशात प्रवास केला. भारताला एकसंध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आपल्या देशाचा आत्मा एकच आहे याचा अनुभव आपणदेखील देशभर प्रवास करताना घेतो. स्वामी विवेकानंदांनी शरीराबरोबर बुद्धी आणि मन सक्षम करण्याची शिकवण दिली. युवा पिढी घडवण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याने आपण त्यांच्या विचारांचे अनुसरण केले पाहिजे. आपला इतिहास आपणच लिहीला पाहिजे हा स्वामी विवेकानंदांचा विचार अतिशय महत्वाचा आहे, कारण जेताच इतिहास लिहीत असतो. सध्याच्या काळात शस्त्रास्त्रांपेक्षा मानसिक युद्धाबाबत आपण सतर्क राहिले पाहिजे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकात युवा चेतना दिन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली. आपल्या देशातील विविध क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी खेळ आणि शारिरीक प्रात्यक्षिके दरवर्षी सादर केली जातात. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षीपासून मैदानावरील प्रात्यक्षिके न होता सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्यात मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे विद्यार्थ्यांमधील चेतना जागृत ठेवण्याचे काम होत आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या दोघांची जयंती एकाच दिवशी आहे ही विशेष बाब आहे. या दोघांनीही ‘आधी केले आणि मग सांगितले’ हे तत्व कायम पाळले. ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ब्रीदवाक्य त्यालाच अनुसरून आहे. यावर्षी संस्थेच्या शाखांमधील सर्व घटकांनी मिळून एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला आहे. सर्वजण १ जानेवारीपासून रोज नियमितपणे १२ सूर्यनमस्कार घालत असल्याने हा संकल्प निश्चितच पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली महाजन यांनी केले.

संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

राधिका गंधे यांनी सरस्वती वंदना आणि वंदेमातरम् सादर केले.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळणार तज्ञांचे मार्गदर्शन

मएसो शिक्षण प्रबोधिनी व मएसो व्यक्तिमत्व विकास केंद्र यांच्यावतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी पौड रस्त्यावरील सरस्वती भवन येथे तयार करण्यात आलेल्या ‘व्हर्च्युअल क्लासरूम’चे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते आज (बुधवार, दि. ५ जानेवारी २०२२) करण्यात आले. या व्हर्चुअल क्लासरूमच्या माध्यमातून संस्थेच्या पुण्यातील व पुण्याबाहेरील शाखांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकाचवेळी तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पुणे महानगर पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना देखील या व्हर्चुअल क्लासरूमचा लाभ मिळणार आहे. या प्रसंगी संस्थेचे माजी सचिव प्रा. वि.ना. शुक्ल यांचे उद्धाटनपर सत्र आयोजित करण्यात आले होते.

संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी, गोविंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रा. शुक्ल यांनी आपल्या मार्गदर्शनपर सत्रात बोलताना म्हणाले की, ‘व्हर्च्युअल क्लासरूम’च्या माध्यमातून शिकवणे हा शिक्षकांसाठी अतिशय आनंददायी अनुभव ठरेल. ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ ही विचार मंथनाचे व्यासपीठ व्हावे त्यातून, विद्यार्थ्यांबरोबरच समाजाला देखील फायदा होईल. शिक्षणाच्या क्षेत्रात आजपर्यंत प्रश्न वेगळे होते. परंतू कोरोनाच्या साथीमुळे विद्यार्थी-पालक-शिक्षक यांची प्रत्यक्ष भेट होत नसल्याने निर्माण झालेला संवादाचा अभाव हा एक वेगळाच प्रश्न उभा राहीला.

काळाबरोबर समस्यादेखील बदलल्या, पण त्या सोडविणारे आपणच आहोत. मागील दोन-अडीच वर्षात ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू आहे. मात्र, त्यातून विद्यार्थ्यांच्या मनातील शंका समजत नाहीत, प्रत्यक्ष वर्ग भरत नसल्याने शिकवण्यात जिवंतपणा वाटत नाही, शंकानिरसन करण्याची संधी मिळत नाही, ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा विद्यार्थ्यांकडे अभाव आहे, त्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. केवळ परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही. या सर्व समस्यांवर विचारमंथन झाले आहे का? या सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे.

क्रमिक शिक्षणाच्या पलीकडे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक भान, नीतिमूल्य रुजवणे ही शिक्षणाची उपांगे आहेत, त्यातूनच व्यक्ती आणि समाज घडतो. भाषा विषयातून विद्यार्थ्यांचा भावात्मक विकास होतो व त्यांचे मूल्यवर्धन होते. इतिहासाच्या शिक्षणातून आपला वारसा, जगातील अन्य देशांपेक्षा आपले वेगळेपण याची जाणीव होते, त्यातूनच त्याची जडणघडण आणि सांस्कृतिक विकास होतो. त्यामुळे आपण शिकवत असलेल्या विषयातून आपण कोणती मूल्ये रूजवू शकतो याचा विचार प्रत्येक शिक्षकाने केला पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. शिक्षक हा चिंतनशील, व्यासंगी आणि जाणीवा जागृत असणारा असला पाहिजे. शिक्षकाने संवेदनशीलपणे स्वतःमधील उणीवा दूर केल्या तर तो विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आनंद देऊ शकतो. देशासमोरच्या समस्या सोडविण्याची पूर्वतयारी शिक्षकाने करून घेतली पाहिजे. देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचणारे आपण आहोत, आपली ही जबाबदारी शिक्षकांनी झटकू नये. आपली भूमिका न सोडता विद्यार्थ्यांसाठी पथदर्शक ठरूया!

प्रा. शुक्ल यांनी यावेळी विद्यार्थ्यांसाठी कोणते उपक्रम घेता येतील?, पालकांनी विद्यार्थ्यांना सांगायचे उपक्रम कोणते, शिक्षकांनी स्वतःसाठी कोणते उपक्रम करावेत? याबाबात सविस्तर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून ही सुविधा संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांपुरती मर्यादित न राहता त्याद्वारे मएसो शिक्षण प्रबोधिनी आणि मएसो व्यक्तिमत्व विकास केंद्राचा विस्तार व्हावा आणि शिक्षण संस्कृतीत त्यांचे स्थान निर्माण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी पुणे महानगर पालिकेच्या शाळांमधील चाळीस शिक्षकांना पहिल्या टप्प्यात मएसो शिक्षण प्रबोधिनीतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मएसो शिक्षण प्रबोधिनीचे सहाय्यक संचालक केदार तापीकर यांनी तर सूत्रसंचालन वर्षा न्यायाधीश यांनी केले.

 

 

 

 

 

 

मएसो भावे प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दै. सकाळच्या पुणे टुडे पुरवणीत पान क्र. ४ वर आज प्रकाशित झालेला लेख…

“१९७१ साली बांगला देशाच्या मुक्तीसाठी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या युद्धात तीनही सेनादलांमधील उत्कृष्ठ समन्वयामुळेच भारताला निर्विवाद यश मिळाले,” असे प्रतिपादन या युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेले ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई (निवृत्त) यांनी आज येथे केले. १९७१ साली झालेल्या युद्धातील विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेले वर्षभर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचा समारोप आज ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई (निवृत्त) आणि लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) यांच्या व्याख्यानाने झाला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल संजीव कपूर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस)चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

शरदचंद्र फाटक आणि पूजा शशांक फाटक यांनी लिहिलेल्या ‘The Valiants : Martyrs of Indo-Pak War1971’ या पुस्तकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमापूर्वी मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील छात्रांनी एअर मार्शल संजीव कपूर यांना मानवंदना दिली.

युद्धभूमीवरील परिस्थितीचे वर्णन करताना ग्रुप कॅप्टन हेमंत सरदेसाई (निवृत्त) म्हणाले की, ३ डिसेंबर १९७१ या दिवशी युद्धाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर नौदलाच्या विमानांनी चितगांवची हवाईपट्टी उद्ध्वस्त केली. बांगला देश मुक्तीवाहिनीतील सैनिकांनी तेथे असलेल्या इंधनाच्या साठ्याला आग लावली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ डिसेंबरला गोरखपूरमधून हवेत झेपावलेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानांनी रात्रीच्या वेळेत तेजगांववर बॉम्बवर्षाव केला. ४ आणि ५ डिसेंबर या दोन दिवसांमध्ये आपल्या हवाई दलाची ६ हंटर विमानांबरोबरच सुखोई विमान देखील पाकिस्तानच्या सैन्याने पाडले. त्यामुळे आपल्या सैन्यदलांनी रणनीति बदलली आणि शत्रूच्या विमानतळांवरील धावपट्ट्या उद्ध्वस्त करायला सुरवात केली. हवाईदलाच्या संरक्षणात पायदळाचे सैनिक ढाका शहराकडे कूच करत होते. हवाई हल्यात ढाक्यातील गव्हर्नर हाऊस जेव्हा बेचिराख झाले तेव्हा हे युद्ध आपल्या हातातून गेल्याची जाणीव पाकिस्तानच्या सैन्याला झाली.

लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (निवृत्त) यांनी आपल्या व्याख्यानात १९७१ च्या युद्धातील हवाईमार्गाने केलेल्या कारवाईचे (Air Born) महत्व विशद केले. आपल्या सैन्याचा मार्ग रोखण्यासाठी शत्रूने निर्माण केलेले विविध प्रकारचे अडथळे दूर करून शत्रूच्या प्रदेशात घुसण्यासाठी हीच कारवाई उपयोगी ठरते. १९७१ च्या युद्धात भारताने पूर्व पाकिस्तानातील तँगाईलच्या परिसरात अशी कारवाई केली होती. पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आताच्या बांगला देशात नद्यांची पात्रे खूपच रूंद आहेत आणि या नद्या समुद्राच्या दिशेने पुढे जातात तशी ही रूंदी वाढत जाते. तसेच या नद्यांचे पात्र ओलांडण्यासाठी फारच कमी पूल आहेत. त्यामुळे हवाईमार्गाने कारवाई करणे आवश्यक होते. कलाईकुंडा आणि पानागढ या भागात पॅराशूटच्या मदतीने भारताचे सातशे ते आठशे जवान शस्त्रास्त्रांसह उतरले. प्रत्यक्षात या संख्येचा नेमका अंदाज न आल्याने ‘बीबीसी’ या ब्रिटीश रेडिओ वाहिनीने पाच हजार सैनिक उतरल्याची बातमी दिली. पाकिस्तानी सैन्य त्यावेळी चीनकडून लष्करी मदतीच्या प्रतिक्षेत होते त्यामुळे हे चीनचेच सैनिक असावेत असा त्यांच्या समज झाला. पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल नियाझी हे परिस्थितीचे आकलन करण्यात चुकले आणि रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयाला त्यांनी तसा संदेश देखील पाठविला. या परिस्थितीचा फायदा भारतीय घेत भारतीय फौजांनी ढाका ताब्यात घेतले.  

एअर मार्शल संजीव कपूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, स्वर्णिम विजय वर्षाचे औचित्य साधून व्याख्यानमालेचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे अभिनंदन केले. १९७१ च्या युद्धातील नायकांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि ऐकण्याची संधी या व्याख्यानमालेमुळे आजच्या युवा पिढीला मिळाली ही फार मोठी गोष्ट आहे असे ते म्हणाले. केंद्र सरकारने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींसाठी प्रवेशाची दारे खुली केल्यानंतर सुमारे २ लाख मुलींनी अर्ज केल्याची माहिती त्यांनी दिली. हवाई दलात रूजू झालेल्या महिला वैमानिक पुरूष वैमानिकांच्या तुलनेत कुठेच कमी नाहीत असा आपला अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. युवा पिढीने आपल्या देशाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे कारण तो आपल्याला खूप काही शिकवतो. ज्ञान संपादन करण्यासाठी जगभरातून माणसे आपल्या देशात येत होती. नालंदा आणि तक्षशीला या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी जगभरातील ४० देशांमधील विद्यार्थी अनेक महिने पायी प्रवास करून भारतात येत असत. आपल्या पूर्वजांकडील ज्ञान मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे लोक भारतात आले तसेच काही जण या देशातील संपत्ती लुटायला आले. एकेकाळी इंग्लंड हा जगाचा कारखाना होता. त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या शोधात ब्रिटीश भारतात आले, आणि त्यांनी आपला देश लुटला. जगाच्या एकूण उत्पन्नात असलेला भारताचा ३३ टक्के वाटा घसरून तो केवळ एक टक्क्यापर्यंत घसरला. आज इंग्लंडची जागा चीनने घेतली आहे आणि तो जगाची लूट करतो आहे. १९९१ पासून भारताची परिस्थिती बदलत आहे. २०२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन होईल. त्यामुळे युवा पिढीने मोठी स्वप्ने बघितली पाहिजेत, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरवातील एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी प्रास्ताविक केले.

इंजिनिअर सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन तर डॉ. लीना चांदोरकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

भारताचे राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद यांची त्यांच्या पुणे भेटीदरम्यान सोमवार, दि. ६ डिसेंबर २०२१ रोजी संध्याकाळी राजभवन येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय प्र. क्षीरसागर, सचिव प्रा. डॉ. भरत सि. व्हनकटे उपस्थित होते. या प्रसंगी मा. राष्ट्रपतींना म.ए.सो. चे माहितीपत्रक, माहितीपटाची सीडी आणि स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.

या भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. राष्ट्रपतींना म. ए. सो. च्या कार्याबद्दल आणि विस्ताराबद्दल माहिती दिली. संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्य लढ्याबरोबरच देशातील नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि आत्मभान जागृत करण्यासाठी असलेली राष्ट्रीय शिक्षणाची गरज लक्षात घेऊन संस्थेची स्थापना केल्याचे सांगितले. म.ए.सो. च्या कार्याचा विस्तार आता बालवाडी ते  पदव्युत्तर शिक्षण आणि त्यापुढे जाऊन संशोधन केंद्रापर्यंत झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. ‘मएसो’तर्फे मुला-मुलींसाठी सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांबद्दल मा. राष्ट्रपतींनी यावेळी समाधान व्यक्त केले.

‘मएसो’ने महिला सक्षणीकरणाच्या हेतूने मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा सुरू केली असून मुलींसाठी असलेली राज्यातील ही पहिली निवासी सैनिकी शाळा असल्याचे सांगितले. या शाळेच्या गेल्या २५ वर्षांतील वाटचालीबद्दल मा. राष्ट्रपतींना माहिती देण्यात आली. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सैनिकी शाळेतील मुलींना आता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये थेट प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे, सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींच्या भवितव्याच्या दृष्टीने हा खूप महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल मा. भूषणजी गोखले यांनी आभार व्यक्त केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात संस्थेने केलेल्या योगदानाची माहिती मा. राष्ट्रपतींना या वेळी देण्यात आली.

सन २०१८ साली पुणे भेटीदरम्यान एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात मा. राष्ट्रपतींनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीबद्दल प्रशंसोद्गार काढल्याचे स्मरण संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव रा. सहस्रबुद्धे यांनी करून दिले, तेव्हा मा. राष्ट्रपतींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० वर्षांच्या वाटचालीचा इतिहास उलगडून सांगणाऱ्या  ‘ध्यासपंथे चालता…’ या ग्रंथांबद्दल जाणून घेतल्यानंतर मा. राष्ट्रपतींनी, हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्याची प्रत भेट देण्यासाठी राष्ट्रपती भवनात येण्याची सूचना यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती येथील कै. गजाननराव भीवराव देशपांडे विद्यालय (पूर्वीचे मएसो विद्यालय, बारामती) या शाळेचे माजी विद्यार्थी आणि विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेचे माजी सचिव दत्तात्रेय राजाराम उंडे यांचे बुधवार, दि. ८ डिसेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
त्यांचे वडील राजाराम अनंत उंडे हे मएसो विद्यालय, बारामती या शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते.
बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठान या संस्थेच्या स्थापनेपासून सलग ४८ वर्षे संस्थेच्या सचिव पदावर द. रा. उंडे तथा अण्णा कार्यरत होते. बारामती सूतगिरणी, कॉसमॉस बँक, महात्मा गांधी बालक मंदिर, बारामती टेक्स्टाईल पार्क या संस्थांच्या संस्थात्मक कार्यात त्यांनी भरीव सहभाग घेतला. उच्चविद्याविभूषित असलेले उंडे हे प्रगतीशील शेतकरीदेखील होते. एक समाजसेवक, संगीतप्रेमी अभिजात साहित्याचे वाचक म्हणून त्यांचा लौकिक होता. उंडे यांनी प्रामाणिकपणा, झोकून काम करण्याची वृत्ती यांसारख्या अनेक गुणांनी बारामती शहरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

म.ए.सो. बालशिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेच्या शताद्बी वर्षातील पदार्पणानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी लिहिलेला लेख शुक्रवार, दि. २२ ऑक्टोबर २०२१ रोजी दै. सकाळच्या पुणे टुडे पुरवणीच्या पान क्र. ८ वर प्रकाशित झाला.

पुणे, दि. २२ : “इंग्रजी भाषा अवगत असणे आवश्यकच आहे परंतु, मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड बाळगू नये. मातृभाषेतील शिक्षणामुळे विविध विषयांतील संकल्पना स्पष्ट होतात, अभिजात साहित्याची आवड निर्माण होते, त्यामुळे इ. ७ वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे,” अशी अपेक्षा जेष्ठ उद्योगपती व शाळेचे माजी विद्यार्थी पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी आज येथे व्यक्त केली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेच्या शताद्बी महोत्सवाचे उद्घाटन फिरोदिया यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. शाळेचे माजी विद्यार्थी आणि ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या सदस्या व शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, शाळेचे महामात्र सुधीर भोसले, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे व शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी फाळके व्यासपीठावर उपस्थित होते.

“मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांनी इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांच्याही पुढे जाण्याचा निश्चय केला पाहिजे. आपल्यामध्ये कष्ट करण्याची तयारी आहे आणि पुढे जाण्याची क्षमता आहे हे समजून घेतले पाहिजे. लहान गावांमधील आणि ग्रामीण भागातील मुलांनीच क्रिकेट विश्वात भारतीय संघाच्या विजयाची परंपरा निर्माण केलेली आपल्याला दिसते. त्यापूर्वी आपला संघ सामना अनिर्णित राखण्यातच धन्यता मानायचा. आपल्या देशात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. आपल्या नेत्यांनी स्वप्न बघायची, त्यांनीच ती पूर्ण करायची आणि आपण केवळ त्यांचे अनुसरण करायचे असा काळ आता राहिला नाही. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित ठरवून ते साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने शाळेतील एका विद्यार्थ्याची जबाबदारी स्वीकारून आपल्याकडे असलेल्या ज्ञान-कौशल्यात त्याला पारंगत करावे, हीच शालामातेची खरी सेवा ठरेल आणि शाळेचे ऋण फेडल्याचे समाधानदेखील लाभेल,” असेही फिरोदिया यावेळी म्हणाले.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “पारतंत्र्याच्या काळात १६१ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा भर हा प्रामुख्याने शालेय शिक्षणावरच होता. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीचा प्रभाव वाढत असतानाच संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आदी प्रभुतींनी मातृभाषेतून राष्ट्रीय शिक्षण देण्याची दूरदृष्टी दाखवली. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. विविध भाषा शिकताना मराठी माध्यमात शिकल्याचा फायदा होतो. प्राथमिक शाळेत शिकवले जाणारे श्लोक, पाढे यांचे पाठांतर जीवनात व्यावहारिकदृष्ट्यादेखील उपयोगी ठरते. बालशिक्षण मंदिर शाळा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना घडवण्यात यशस्वी ठरली आहे. चांगल्या शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपले प्रतिबिंब दिसते, त्यामुळे त्याला घडवण्यासाठी शिक्षक भरपूर कष्ट घेतो हे लक्षात ठेवून शिक्षकांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत. लहान मुलांमध्ये जिद्द निर्माण करू शकलो तरच आपली भावी पिढी व पर्यायाने आपला देश समर्थ बनेल आणि आज आपल्याला त्याचीच गरज आहे.”

शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदी पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शताद्बी वर्षात शाळेमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळेचे हितचिंतक, माजी विद्यार्थी अशा सर्व घटकांना सामावून घेणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. परदेशातून येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व त्यांची तीन तासांची शाळा, तिळगूळ समारंभ, निबंध स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा, स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा चेतना दिनी विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, याशिवाय संगीत रजनी, शिवचरित्र व्याख्यानमाला, आकाशदर्शन, दंतचिकित्सा अशा विविध कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.

कार्यक्रमात सुरवातील शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. भक्ती दातार यांनी स्वरचित स्वागतगीत सादर केले.

शाळेचे महामात्र सुधीर भोसले यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय करून दिला.

शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी आभार प्रदर्शन तर शिक्षिका मंजुश्री गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

‘१९७१ च्या युद्धातील नौदलाची कामगिरी’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा (निवृत्त).

“बांगलादेशाच्या मुक्ती संग्रामात भारतीय नौदलाची ताकद जगाला दिसून आली. १९७१ हे वर्ष भारतीय नौदलाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. वर्षाच्या सुरवातीला युद्धाची फारशी तयारी नसलेल्या भारतीय नौदलाने लक्षणीय कामगिरी बजावली. आपल्याकडे असलेल्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेच्या मर्यादा लक्षात घेऊन नौदलाने अपूर्व कामगिरी बजावली. आयएनएस विक्रांतवरून झेपावलेल्या सी-हॉक, एलिझे आणि चेतक या विमानांनी पूर्व पाकिस्तानातील कॉक्स बझार, चितगांव, खुलना, मोंगला, पुस्सुर अशा ठिकाणी तब्बल २८६ हवाईहल्ले करून बंदरे, हवाईतळ आणि लष्करी ठाणी उद्ध्वस्त केली. पश्चिम पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अरबी समुद्रात भारतीय नौदलाने अशीच लक्षणीय कामगिरी केली. त्यामुळे संपूर्ण दगाला भारतीय नौदलाची ताकद दिसून आली,” असे प्रतिपादन व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा (निवृत्त) यांनी मंगळवार, दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘१९७१ च्या युद्धातील नौदलाची कामगिरी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त). छायाचित्रात (डावीकडून) इंजिनिअर सुधीर गाडे, आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, व्हाईस अॅडमिरल विनोद पसरिचा (निवृत्त), कमांडर इंद्रजित रॉय (निवृत्त), मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त).

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, कमांडर इंद्रजित रॉय (निवृत्त), सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बांगला देश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलांनी गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे करण्यात येत आहे. त्याअंतर्गत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कमांडर इंद्रजित रॉय (निवृत्त) यांनी या वेळी देशाच्या पश्चिम आघाडीवर नौदलाने केलेल्या पराक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, “देशाच्या पूर्वेला असलेल्या बांगला देशाचा मुक्ती संग्राम देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर लढला गेला. देशाच्या पश्चिमेला असलेल्या विशाल अरबी समुद्रात उत्तरेला पाकिस्तानचा समुद्र किनारा आणि कराची हे एकमेव बंदर आहे. गुजरातमधील ओखापासून ते जवळ आहे. १९७१ सालच्या मार्च महिन्यात भारतीय नौदलाला आठ मिसाईल बोटी मिळाल्या होत्या. या बोटींवर विमानविरोधी यंत्रणा नसल्याने त्यांचा वापर युद्धासाठी केला जात नाही मात्र आपल्या नौदलाने अन्य युद्धनौकांबरोबर त्यांचा वापर केला. या आठपैकी दोन बोटींनी कराची आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर हल्ला केला. त्यावेळी चार बोटी अरबी समुद्रात नौदलाच्या ताफ्यातील लढाऊ जहाजांसमवेत तैनात होत्या तर उरलेल्या दोन बोटी मुंबईत सज्ज होत्या. भारतीय नौदलाने या कारवाईत पाकिस्तानच्या पीएनएस पीएनएस आणि पीएनएस मुहाफिज या दोन युद्धनौकांना जलसमाधी दिली. अरबी समुद्रात भारतीय नौदलाने बजावलेल्या कामगिरीमुळे पाकिस्तानच्या कारवायांना पायबंद बसला आणि त्याचा फार मोठा परिणाम पूर्व आघाडीवर झाला.”

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर इंजिनिअर सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा बर्वे यांनी केले.

वनवासी कल्याण आश्रमाचे माजी अध्यक्ष कै. जगदेव राम जी उरांव यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणाऱ्या ‘हमारे जगदेव राम’ या चित्रमय स्मृतिग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात गुरुवार, दि. १६ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या अखिल भारतीय नगरीय कार्य आयामाचे प्रमुख व अखिल भारतीय कार्य मंडळाचे सदस्य मा. भगवान जी सहाय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

वनवासी कल्याण आश्रम सेवा, सामाजिकता आणि राष्ट्रीयता या तीन बिंदूंच्या आधारे देशभरात कार्यरत असून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थांच्या पाठबळावर या कामाचा अधिक विस्तार होत असल्याचे मा. सहाय यांनी यावेळी सांगितले.

वनवासी कल्याण आश्रमाच्या महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष मा. दिलीपभाई मेहता, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, ‘मएसो’च्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे तसेच कल्याण आश्रमाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

“१९७१ साली झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात एएन-१२ या विमानांनी केलेली कामगिरी विलक्षण होती. पाकिस्तानने केलेल्या आगळीकीनंतर १९७१ च्या ३ डिसेंबरच्या रात्री युद्धाला तोंड फुटले. त्यावेळी हवाई हल्ल्यांसाठी सर्वप्रथम एएन-१२ विमानांचाच उपयोग करण्यात आला. मुळात ही विमाने माल वाहतुकीसाठीची होती, परंतू भारतीय हवाई दलाची बॉम्ब हल्ल्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता,” अशी माहिती ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त) यांनी आज व्याख्यानात दिली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘द एअर ऑपरेशन्स’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. १९७१ च्या बांग्लादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्यांनी केलेली हवाई वाहतूक आणि हेलिकॉप्टरच्या कारवाईची माहिती ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त) आणि एअर कमोडोर आर.एम.श्रीधरन (निवृत्त) यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त),  आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त). छायाचित्रात (डावीकडून) डॉ. भरत व्हनकटे, आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त), एअर कमोडोर आर.एम.श्रीधरन (निवृत्त), मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त).

भारतीय लष्कराने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवत लष्करी वर्चस्व सिद्ध केले. हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यंदा या दैदिप्यमान विजयाचे ५० वे वर्ष. त्यानिमित्ताने भारताने आजपर्यंत विविध युद्धांमध्ये मिळविलेल्या विजयांची माहिती समाजाला करून देण्यासाठी वर्षभर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील हे सहावे व्याख्यान होते.

“१९६१ सालापासून एएन-१२ विमानांच्या दोन स्क्वॉड्रन भारतीय हवाई दलात कार्यरत होत्या. या विमानांनी ३२ वर्षे सेवा बजावली. लेह-लडाखमध्ये शस्त्रास्त्रे आणि मालवाहतूक करण्यासाठीच त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. १९६३ ते १९८६ या काळात हे विमान दर शनिवारी जोरहाट, गुवाहाटी, बडडोगरा असा प्रवास करून दिल्लीला परत येत असे. आयएल-७६ विमानांकडे ही कामगिरी सोपवण्यात येईपर्यंत एएन-१२ विमान तिथे कार्यरत होते. १९७० साली या विमानाचा वापर बॉम्ब हल्ल्यांसाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदनगर जवळील के. के. रेंजमध्ये त्यासाठीच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर घेण्यात आल्या. तेव्हा १९७१ च्या युद्धाची कोणतीच शक्यता नव्हती. परंतू भारतीय हवाई दलाची बॉम्ब हल्ल्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. १९७१ च्या मध्यावर हवाई दलाने बॉम्बहल्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वैमानिक व अन्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. त्यासाठीची नियमावलीदेखील तयार करण्यात आली होती. याच वेळी एक कोटी शरणार्थी बांग्लादेशातून भारतात आले होते. या परिस्थितीवर एकच उपाय दिसत होता तो म्हणजे बांग्लादेशची निर्मिती! त्यासाठी थेट कारवाई आणि पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर बॉम्बहल्ले करणे आवश्यक होते. १९७१ च्या ऑगस्ट महिन्यात सर्वांना युद्धाची जाणीव झाली होती. दुसरीकडे हवाई दलाने देखील प्रशिक्षणाचा वेग वाढवला होता. एएन-१२ विमाने शत्रूच्या विमानविरोधी तोफांच्या सहजपणे टप्प्यात येणारी आणि शत्रूच्या विमानांच्या नजरेत येऊ शकतील अशी होती. या विमानांमध्ये स्वसंरक्षणाची कोणतीही यंत्रणा नव्हती. दहा हजार किलोग्रॅम वजन वाहून नेण्याच्या या विमानांच्या क्षमतेचा वापर तेवढ्याच वजनाचा अतिसंवेदनशील दारुगोळा नेण्यासाठी करता येईल अशी सुधारणा त्यात करण्यात आली. याच विमानांद्वारे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातील रडार शोधण्यात आली होती. १९७१ च्या ३ डिसेंबरच्या रात्री पाकिस्तानने केलेल्या आगळीकीनंतर युद्धाला तोंड फुटले. त्यावेळी हवाई हल्ल्यांसाठी सर्वप्रथम एएन-१२ विमानांचाच उपयोग करण्यात आला. पहिल्यांदा चंगा-मंगा त्यानंतर सुलेमानकी ब्रीज आणि नंतर फोर्ट अब्बास या ठिकाणांवर या विमानांनी हवाई हल्ले केले. पीरपंजाल पर्वतरांगांमध्येदेखील या विमानांचा वापर करण्यात आला होता”, असेही ग्रुप कॅप्टन ए.जी. बेवूर (निवृत्त) यांनी या वेळी सांगितले.

एअर कमोडोर आर.एम.श्रीधरन (निवृत्त) यांनी यावेळी रात्रीच्या वेळी हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलेल्या कैलाशर ते सिल्हेट या जगातील पहिल्या विशेष कारवाईची माहिती दिली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना चांदोरकर यांनी केले.

 

 

 

 

“प्रत्येक व्यक्ती महत्वाची असते हे लक्षात घेऊन विद्यार्थ्याची प्रतिष्ठा जपणे महत्वाचे आहे. महाविद्यालयातील प्रत्येक घटकाच्या वर्तनात विद्यार्थ्याबद्दल आस्था व स्नेह असणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षणाबरोबरच त्याचे आकलन, त्याचा दृष्टिकोन, त्याची पार्श्वभूमी असे सांस्कृतिक भांडवल असते. त्यामुळे विद्यार्थ्याकडे काळजीपूर्वक बघणे आवश्यक असते. त्याला महाविद्यालयाकडून मिळणारे मार्गदर्शन आणि पाठबळ अतिशय महत्वाचे असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची महाविद्यालये ही जबाबदारी निश्चितच पार पाडतील याचा विश्वास आहे,” असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. एन.एस. उमराणी यांनी आज येथे सांगितले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात बांधण्यात आलेल्या नवीन अमृत महोत्सवी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते.

या वेळी व्यासपीठावर ‘मएसो’चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व मा. प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. जी.आर. धनवडे उपस्थित होते.

डॉ. उमराणी पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील या नव्या इमारतीचे उद्घाटन करताना शिक्षक आणि प्रकुलगुरू अशा दोन्ही भूमिकेतून मला खूप आनंद होत आहे. ‘ऑक्स्फर्ड ऑफ द ईस्ट’ अशी ख्याती असलेल्या पुणे शहरात ‘मएसो’ ने शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून टोलेजंग काम केले आहे. मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा प्राचार्य या नात्याने त्या कामात योगदान देण्याची संधी मला मिळाली याचे मला भान आहे. या प्रांगणात काम करताना जसा आनंद मिळाला तसाच आनंद आज मला होतो आहे. या नव्या प्रतिभासंपन्न वास्तूत कर्तबगार नागरीक, शिक्षक, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते घडतील. शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम आणि जागतिक दर्जाचे नागरिक घडवणे हे नवीन शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे. सर्वोत्तम महाविद्यालयाचे पारितोषिक, नॅकचे मूल्यांकन आणि स्वायत्ततेच्या दिशेने होणारा प्रवास यामुळे महाविद्यालयाची ही जबाबदारी आणखी वाढते. विद्यार्थ्याच्या  प्रवेशापासून त्याला पदवी परीक्षेची गुणपत्रिका देण्यापर्यंत महाविद्यालयाने त्याची प्रतिष्ठा जपली पाहिजे. नव्या शैक्षणिक धोरणात देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारे विद्यार्थी घडवणारा अभ्यासक्रम आखण्यात आला आहे. उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर हे देखील या धोरणाचे एक वैशिष्ट्य आहे. शिक्षणावरील खर्चाबाबत जोपर्यंत जागरूकता निर्माण होणार नाही तोपर्यंत शिक्षणाच्या दर्जाबाबतही सजगता निर्माण होणार नाही. संगीत, कला, योग, आयुर्वेद अशा आपल्या पारंपारिक विषयांचा समावेश करण्यात आल्याने आपण आता मुक्त शिक्षणाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना आपले ध्येय साधण्यासाठी आपल्या सोयीनुसार शिक्षण घेता येणार आहे.”

‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “कोरोनानंतरच्या काळातील शिक्षणाचा विचार करताना सिंहावलोकन करण्याची आवश्यकता आहे. घरांमध्ये अडकून पडल्यामुळे मुलांची मानसिक कुचंबणा झाली आहे. महाविद्यालये सुरू होतील तेव्हा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने हाताळायचे याचा विचार आत्ताच केला पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नागरिक घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यात प्रत्येक जण महत्वाचा आहे. नव्या कल्पना, सृजनशील दृष्टिकोन समोर ठेवून हे काम केले पाहिजे.”

मएसो आबासाहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात नव्या इमारतीच्या बांधकामाची गरज विशद करून महाविद्यालयाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन तर डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या

इमारतीची सफर घडवणारी लघुचित्रफित पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचे आज (शुक्रवार, दि. २० ऑगस्ट २०२१) उद्घाटन करण्यात आले. गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मा. सी. जे. पाठक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि गरवारे हायटेक फिल्म्स लिमिटेडच्या मनुष्यबळ आणि प्रशासन विभागाचे अध्यक्ष डॉ. विहार राखुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळ सदस्य व शाला समितीच्या अध्यक्ष सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता नाईक हे उपस्थित होते.

शाळेच्या सुमारे ८० वर्ष जुन्या असलेल्या इमारतीचे नूतनीकरण गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या सहयोगाने करण्यात आले आहे. शाळेतील शैक्षणिक व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे वीजेच्या खर्चात बचत होणार आहे. मुळातच भव्य आणि प्रशस्त असलेल्या शाळेच्या या इमारतीचे नूतनीकरण केल्यामुळे तेथील हवेशीर, स्वच्छ, सुंदर वातावरणाने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आनंदात आणि उत्साहात भर पडणार आहे. शासनाने शाळेच्या इमारतीला ‘हेरिटेज वास्तू’चा दर्जा दिला आहे. नूतनीकरण झालेल्या शाळेच्या या इमारतीमुळे पुणे शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर पडली आहे.

या प्रसंगी बोलताना मा. सी. जे. पाठक म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी सर्वांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले होते. संस्था आणि संस्थेच्या शाळांमधील शिक्षक अतिशय कष्टपूर्वक त्याच दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळेच कला, क्रीडा, वैचारिक प्रगल्भता अशा सर्व अंगांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास झालेला दिसून येतो. त्यामुळेच शाळेला नांवलौकिक मिळाला आहे. शाळेचे अनेक माजी विद्यार्थी देश-विदेशात विविध क्षेत्रात उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. कंपनीच्या कामाच्या निमित्ताने प्रवास करताना त्यांची गाठ पडते आणि सहजपणे आपुलकीची भावना निर्माण होते, ते आवर्जून शाळेची चौकशी करतात. अशा या गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या शाळेला आणि संस्थेला कै.आबासाहेब गरवारे आणि कै. विमलाबाई गरवारे यांनी आर्थिक सहकार्य केले होते. आबासाहेब गरवारे यांचे बालपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेले. त्यांनी सुरवातीला लहान-मोठी कामे केली पण त्यांचे व्हिजन मोठे होते. त्यामुळे तंत्रज्ञान, कच्चामाल आणि पैशाचा अभाव असताना देखील त्यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योग आपल्या देशात आणि पर्यायाने महाराष्ट्रात आणले. सामान्य माणसांतले असामान्यत्व पुढे आणण्यासाठी त्यांनी विविध संस्थांना मदत केली. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव मा. शशिकांत गरवारे हे देखील त्या सर्व संस्थांना मदत करत आहेत. आबासाहेब आणि विमलाबाई गरवारे यांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करत गरवारे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गरवारे परिवार विविध विधायक कामे करत आहे. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या नूतनीकरणासाठी आर्थिक सहयोग करण्यात आला असून संस्थेने केलेला शाळेचा कायापालट पाहून त्यांनी संस्थेला धन्यवाद दिले आहेत.

‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शशिकांत गरवारे यांना शाळेबद्दल जी आपुलकी आहे ती, त्यांनी दिलेल्या आर्थिक सहयोगा इतकीच मोलाची आहे. हेरिटेज वास्तूसाठी असलेले सर्व निकष पाळून शाळेच्या इमारतीचे अतिशय सुंदर नूतनीकरण झाले आहे. शाळेबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेतूनच अनेक माजी विद्यार्थी शाळेला विविध प्रकारे सहकार्य करत असतात. त्यातूनच शाळेचे ‘सुबोधवाणी’ हे वेब रेडिओ केंद्र सुरु झाले आहे, शाळेत इलेक्ट्रॉनिक क्लासरुम तयार झाल्या आहेत. शाळेबरोबर असलेली नाळ जीवनात कायम राहाते. शिक्षण हा जीवनाचा पाया आहे, ते आनंददायी व्हावे यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी सक्षम नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांनी अभ्यासक्रम, वर्गातील शिक्षण याच्यापलीकडे जाऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. आज देशात उद्योजक तयार होण्याची गरज आहे, त्यासाठी रोलमॉडेल म्हणून सर्वांनी आबासाहेब गरवारे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या आणि शाळेच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणामागील भूमिका विशद केली.

शाळेतील शिक्षिका सौ. पद्मा पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र. ल.गावडे यांचे रविवार, दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी दु:खद निधन झाले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, जनता सहकारी बॅंक, पुणे आणि नगर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:०० वाजता श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या श्रद्धांजली सभेत ऑनलाईन माध्यमातून सहभागी होण्यासाठी लिंक …
https://zoom.us/j/93612023115?pwd=U0R1VHdFMGZ5eFBSVHdXSkpuTnBEUT09

Meeting ID: 936 1202 3115
Passcode: 425225

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (इ.१२ वी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळांनी घवघवीत यश मिळवले आहे. संस्थेच्या सर्व शाळांचा एकत्रित निकाल ९९.९२ टक्के लागला आहे.
संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

पुणे, २ ऑगस्ट : ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र.ल. गावडे यांचे काल रात्री उशीरा पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. गावडे यांनी अनेक शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक संस्थांच्या कार्यात पदाधिकारी, मार्गदर्शक, हितचिंतक व देणगीदार म्हणून अमूल्य योगदान दिले आहे.

प्रा. डॉ. प्रभाकर लक्ष्मण गावडे यांचा जन्म २० जून १९२४ रोजी नेवासे येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण अहमदनगरमधील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात झाले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. १९५० मध्ये ते बी.टी. झाले. पुणे विद्यापीठातून मराठी व संस्कृत हे विषय घेऊन ते १९५२ मध्ये एम.ए. आणि १९५६ मध्ये एम.एड झाले.

‘सावरकर : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर १९६८ मध्ये त्यांनी पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. संपादन केली होती. त्यासाठी त्यांनी सादर केलेल्या प्रबंधाला पुणे विद्यापीठातर्फे उत्कृष्ट प्रबंधाबद्दल ‘न. चि. केळकर पारितोषिक’ व ‘परांजपे पारितोषिक’ मिळाले होते. तसेच, १९७१ – ७२ मध्ये या ग्रंथास महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला होता. ‘मराठी-वाङ्मय’ हा त्यांचा अध्यापनाचा विषय होता.  स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद तसेच ज्ञानेश्वरी हे त्यांच्या अभ्यासाचे आणि चिंतनाचे विषय होते आणि त्यावर ते व्याख्याने देखील देत असत.

प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांनी १९४६ ते १९८२ या प्रदीर्घ कालखंडात अध्यापक, मुख्याध्यापक म्हणून कार्य केले. १९६३ ते १९८२ या काळात त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत प्रथम उपमुख्याध्यापक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६९ ते ८२ ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे कला व शास्त्र महाविद्यालयात आणि १९६८ ते ७२ या काळात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी अध्यापन केले.

डॉ. प्र. ल. गावडे यांचे शैक्षणिक प्रशासन सेवेतील कार्यही प्रदीर्घ आणि मौल्यवान आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये सहाय्यक सचिव, सचिव आणि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. संस्थेच्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी मएसो मुलांचे विद्यालयातील (पूर्वीची भावे स्कूल) सभागृहाचे ‘गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृह’ असे नामकरण करण्यात आले. तसेच मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयातील अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहा’ चे उद्घाटन डॉ.गावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. सन २०१७ मध्ये ‘मएसो’च्या १५८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याला डॉ. गावडे सर वयाच्या ९४ व्या वर्षी अंथरुणावरून न उठण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला बाजूला ठेऊन आपल्या सुहृदांना भेटण्यासाठी व्हीलचेअरवरून आले होते. त्यांच्याशी संवाद साधताना अनेकजण आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवून त्यांच्यासमोर अक्षरशः नतमस्तक झाले होते.

शालेय शिक्षण, विद्यार्थ्यांसाठीच्या ‘साहित्यविहार’, ‘कथाकौस्तुभ’ या पुस्तकांचे संपादन तर ‘शालेय मराठी व्याकरण’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इ. ९ वी, ११ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या मराठी भाषेच्या  पाठ्यपुस्तकांचे सहसंपादन देखील त्यांनी केले होते.

डॉ. प्र. ल. गावडे यांना विविध सन्माननीय पुरस्कार मिळालेले आहेत. ‘आदर्श शिक्षक – राज्य पुरस्कार’ (१९७६), ‘उत्कृष्ट साहित्य समीक्षेबद्दल ‘पु. भा. भावे स्मृति समितीचा’ पुरस्कार (१९९७), ‘सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल अ‍ॅड. डी. आर. नगरकर पुरस्कार’, ‘शैक्षणिक कार्याबद्दल राजा मंत्री पुरस्कार’, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे कृतज्ञता पुरस्कार’ (१९९८) आणि ‘विचार प्राथमिक शिक्षणाचा’ या पुस्तकास म. सा. परिषदेचे ‘ना. गो. चाफेकर पारितोषिक’ (१९९८) अशा विविध पुरस्कारांनी डॉ. प्र. ल. गावडे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे विद्यापीठाच्या १३ व्या पदवीप्रदान समारंभात शनिवार, दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी डॉ. गावडे यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते  डी.लिट्. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शनिवार, दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यापीठाच्या ६९ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करून डॉ. गावडे यांचा सन्मान केला.

डॉ. प्र. ल. गावडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्या वेळी ‘अमृतसंचय’ हा ‘डॉ. प्र. ल. गावडे अमृतमहोत्सव गौरव ग्रंथ’ प्रकाशित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे गुरुवर्य प्रा. डॉ. प्र.ल.गावडे यांना विनम्र श्रद्धांजली!

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पेरुगेट भावे स्कूलचे (आताची म.ए.सो. मुलांचे विद्यालय) माजी विद्यार्थी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बळवंतराव मोरेश्वरराव उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांनी आज वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत (इ.१० वी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Virtual unveiling of Rani Lakshmi Bai Statue located at RLMSS at the hands of Chief of the Army Staff of the Indian Army General Manoj Mukund Narwane on 13th July, 2021

 

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयातील विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात उपलब्ध करून देत जबाबदार, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी घडवण्याचे काम संस्था करत आहे. या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थिनी आज देशाच्या सैन्यदलात सेवा बजावत आहेत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये देखील अशाच पद्धतीने शाळेच्या माजी विद्यार्थिनी लक्षणीय कामगिरी बजावत आहेत, हे शाळेसाठी खरोखरच अभिमानास्पद आहे,” अशा शब्दात देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शाळेच्या कामगिरीचे कौतुक केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित समारंभात शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि पुण्यातल्या NCC ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या महामात्र डॉ. मानसी भाटे आणि चित्रा नगरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते हे उपस्थित होते.

मएसो ऑटोरीअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलद्वारे करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या की, मुलींसाठी सैनिकी शाळा चालवत असल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानायला हवेत. संस्थेने अतिशय सुंदर शाळा उभी केली आहे. यापूर्वीदेखील या शाळेच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आले होते. शाळेला असलेले राणी लक्ष्मीबाई यांचे नावच प्रेरणादायी आहे. सैनिकांचा गणवेश आणि त्यांची शिस्त बघूनच मी वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी आपण एक मुलगी आहोत असा विचार न करता आपल्यातील स्त्री शक्ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्ये कणखरपणा आणि एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थिनींनी आपल्याला एखादी गोष्ट जमेल का? असा विचार करण्याची गरज नाही. कठीण परिस्थितीवर आपल्या अनुभवाच्या आधारे मात करायला शिकता आले पाहिजे. प्रश्न निर्माण होतील तेव्हा खचून न जाता शाळेने दिलेले संस्कार आठवा आणि अडचणींचे संधी रुपांतर करा.”

राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC च्या वायूदलाचे युनिट शाळेत नव्याने सुरू झाले आहे. पुण्यातल्या NCC ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या हस्ते यावेळी शाळेला NCC चा ध्वज प्रदान करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी तो स्वीकारला. ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन आर.एस. जाधव यावेळी उपस्थित होते.

 

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या स्थापनेमागील महिला सक्षमीकरणाची भूमिका विशद केली.
डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन तर अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची आणखी एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने दि. ७ जुलै २०२१ रोजी २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण करण्याचा कार्यक्रम मंगळवार, दि. १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मयूर कॉलनीमधील मएसो ऑडिटोरीअम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC हे आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्धाटन व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर AVSM, VSM (Deputy Chief of Integrated Defence Staff (Medical)) व ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) हे या समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभाचे प्रक्षेपण फेसबुक आणि ‘मएसो’च्या युट्यूब चॅनेलद्वारे करण्यात येणार आहे.

त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आभासी पद्धतीने या समारंभात सहभागी होता येणार आहे …

https://www.youtube.com/watch?v=2taN2FqpvEM

https://www.facebook.com/100973985597451/posts/101884895506360/

ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच NCC चा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी होणार आहे.

छायाचित्रात (डावीकडून) शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते, सैनिकी शाळेच्या शाला समिती अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’ चे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आणि शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या समारंभाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे आणि सैनिकी शाळेच्या शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे यांनी ही माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते उपस्थित होते.

“सभ्य आणि समर्थ समाजनिर्मितीसाठी महिलांचे सक्षमीकरण अतिशय महत्वाचे ठरते, म्हणूनच महिलांचे शिक्षण व सक्षमीकरणासाठी ‘मएसो’ सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे. आजमितीस सुमारे २० हजार विद्यार्थिनी संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आज देशाच्या सशस्त्र सेनादलांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थिनींनी जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे,” अशी माहिती आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली.

“शाळेतील स्वावलंबी जीवनशैली, नियमितपणा, शिस्त, संस्कार, विविध उपक्रमांमुळी विस्तारणारा दृष्टिकोन या सर्वांचा अतिशय सकारात्मक परिणाम विद्यार्थिनींवर होतो. त्यामुळे त्यांच्यात अन्य शाळांमधील विद्यार्थिनींच्या तुलनेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. शाळेत मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि प्रशिक्षणाच्या जोरावर आमच्या सैनिकी शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींनी सशस्त्र सेनादलांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अन्य क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थिनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे,” असे डॉ. मेहेंदळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

“शाळेतील शिक्षण व प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींची बौद्धिक, मानसिक आणि शारिरीक जडणघडण अतिशय उत्तमरितीने होते. त्यामुळेच त्या सशस्त्र सैन्यदलांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या परिक्षांप्रमाणे अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. शाळेतील विद्यार्थिनींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमधील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले तर त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल,” असे शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने इ. स. १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. गेल्या १६० वर्षात संस्थेने शिशु शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत व त्यापुढे जाऊन संशोधनापर्यंत आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षणापासून कौशल्यविकास अभ्यासक्रमांपर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७० शाखांमधून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्रमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील अनेक उपक्रम हे समाजातील विविध घटकांच्या गरजा आणि काळानुरूप निर्माण झालेल्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आले आहेत.

पुणे, दि. २१ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या योग सप्ताहाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून सांघिक ऑनलाईन योगासनांद्वारे आज करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळातील सर्व बंधने पाळून ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम मएसो ऑडिटोरीअम येथे पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या फेसबुक व वेबसाईटद्वारे करण्यात आले. पुणे शहराबरोबरच संस्थेच्या  कासारआंबोली, सासवड, बारामती, शिरवळ, नगर, पनवेल, बेलापूर, कळंबोली, लोटे-घाणेखुंट येथील विविध शाखांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्चमारी आणि हितचिंतक अशा सुमारे २५ हजार जण त्यात सहभागी झाले होते. त्यांनी योग प्रात्यक्षिकाचे अनुसरण करत यावेळी सूर्यनमस्कारासह १५ योगासने केली. या प्रसंगी ‘योगाचे महत्व’या विषयी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. अभय माटे यांनी मार्गदर्शन केले.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, मएसो संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगाभ्यास करताना संस्थेचे मान्यवर पदाधिकारी.

श्री. मनोज साळी, श्री. जयसिंग जगताप आणि सौ. सुष्मिता नांदे यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. त्यांचासमवेत संस्थेच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनीही योगाभ्यास केला. त्याचे सूत्रसंचालन प्रा. शैलेश आपटे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. अभय माटे. या वेळी व्यासपीठावर उपस्थित (डावीकडून) ‘मएसो’च्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना मा. अभय माटे म्हणाले की, “योग हा शद्ब युज या संस्कृत धातू पासून तयार झाला आहे आणि युज याचा अर्थ जोडणे असा आहे. शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि चैतन्य यांना जोडण्याचे काम योग करतो. योगाच्या सरावाने व्यक्तीच्या कर्मात कुशलता येते. ‘योग: कर्म सुकौशलम्’ ही उक्ती साध्य होते. एखाद्या तांब्यामध्ये असलेले सगळे पाणी न सांडता भांड्यामध्ये ओतणे हे कौशल्याचे रोजच्या जीवनातील साधे उदाहरण आहे. कौशल्यामुळे कोणतेही काम करणे सहज शक्य होते. जीवनाचा आनंद मिळवण्यासाठी पतंजली ऋषिंनी अष्टांग योग सांगितला आहे. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा समावेश आहे. व्यक्ती आणि समाज यांच्यातील हितसंबंध राखणे म्हणजे यम त्यासाठी अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, सत्य, अपरिग्रह असे पाच भाग आहेत. वैयक्तीक जीवन चांगले राखण्यासाठी शरीर आणि मनाची शुद्धता, स्वाध्याय, ईश्वरभक्तीचा अवलंब करण्यास सांगितले आहे. आसन ही केवळ शारिरीक क्रिया नाही तर शरीर आणि मनाची लवचिकता साधण्यासाठी आसनांची योजना केली गेली आहे. आपला श्वास आणि उत्च्छ्वास यांचे नियमन करण्यासाठी प्राणायाम उपयोगी ठरतो, त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे शक्य होते आणि आपल्या अंतरंगात जाण्याचा मार्ग सुकर होतो. आपल्या चित्ताला बांधून ठेवणारे धारणा-ध्यान-समाधी यांची योजना अष्टांग योगात आहे. कारण उपलब्ध पर्यायातून निवड करण्याचे कार्य बुद्धी करते परंतू त्याचा नेमकेपणाने उपयोगात आणते ते चित्त. याचप्रमाणे विपर्याय, विकल्प आणि निद्रा यांचा यामध्ये समावेश आहे. निद्रेमुळे चित्ताला विश्रांती मिळते. या सर्व वृत्तींवर ताबा योगामुळेच मिळवता येतो आणि त्यातूनच मोक्ष किंवा कैवल्यप्राप्ती होते. या चित्तवृत्तींमुळेच शिक्षण मिळत असते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेने योग सप्ताहाचे आयोजन केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो.”

मा. विजय भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “ज्ञानसंवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व लक्षात घेऊन संस्थेने क्रीडावर्धिनीची स्थापना केली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करणारी ‘मएसो’ ही एकमेव संस्था आहे. निष्णात प्रशिक्षकांकडून दर्जेदार प्रशिक्षणाची सोय संस्थेमध्ये आहे. योग सप्ताहाचे आयोजन हा देखील एक असाच महत्वपूर्ण उपक्रम आहे. कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा एक महत्वाचा उपचार आहे आणि त्यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे, हे लक्षात घेऊन आजपासून योगसप्ताह आयोजित करण्यात आला आहे.”

७ व्या योगदिनाच्या शुभेच्छा देताना संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “योगाचा अवलंब केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ होत आहे. त्यामुळे आज जगभरातील शंभर देशांमध्ये योगदिन साजरा केला जात आहे. प्रत्यक्षात रोजच योगाभ्यास केला पाहिजे.”

मा. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राही भालेराव यांनी केले. सरस्वती वंदना आणि शांतीमंत्र अपूर्वा साने यांनी सादर केला.

म.ए.सो. क्रीडावर्धिनी आयोजित योग सप्ताहाच्या उद्घाटनानिमित्त आंतरराष्ट्रीय योगदिनी म्हणजेच सोमवार, दि. २१ जून २०२१ रोजी सकाळी ७.३० वाजता सांघिक ऑनलाईन योगासने आयोजित करण्यात आली आहेत.

या प्रसंगी ‘योगाचे महत्व’ या विषयावर योग प्रशिक्षक मा. अभय माटे (अध्यक्ष, जनता सहकारी बँक) मार्गदर्शन करणार आहेत.

खालील लिंकद्वारे या उपक्रमात सहभागी व्हावे.

https://www.facebook.com/mespune

https://www.youtube.com/c/MaharashtraEducationSocietyPuneofficial

🕉️ *Be With Yoga, Be At Home* 🕉️

आंतरराष्ट्रीय योगदिनी आयोजित सांघिक ऑनलाईन योगासनांमध्ये समाविष्ट असलेल्या योगासनाची स्वतंत्र क्लिप …

०. शरीर संचालन – https://youtu.be/9la8BMmeGMo
००. सूर्यनमस्कार – https://youtu.be/ERFddbsW_uU
१. ताडासन – https://youtu.be/R38VGav6mFg
२. अर्धचक्रासन – https://youtu.be/jGE6DNbiMzg
३. वक्रासन – https://youtu.be/NfbLFRAhROc
४. शशकासन – https://youtu.be/8AcgraKw33M
५. उत्तानपादासन – https://youtu.be/SOQBaZynE6Y
६. पवनमुक्तासन – https://youtu.be/EgRM0GwZ49c
७. शलभासन – https://youtu.be/x6YY16purAA
८. शलभासन – १ : उजव्या पायाने – https://youtu.be/2RAP5Ym6EYI
९. भुजंगासन – https://youtu.be/u-I_l9EaMow
१०. मकरासन – https://youtu.be/SxDjcJegtuY
११. कपालभाती – https://youtu.be/yO8Vo8EQmPw
१२. अनुलोम-विलोम – https://youtu.be/m_eTYy8D3F0
१३. भ्रामरी – https://youtu.be/WqbgGgFOdPw
१४. ओंकार – https://youtu.be/YVFoNWucTes

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या वतीने म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळा, मयूर कॉलनी येथे सोमवार, दि. २४ मे २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू झाले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते लसीकरणासाठी आलेल्या पहिल्या नागरिकाला कूपन देऊन लसीकरणाची सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाचे सदस्य व म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ते २०३०-३१ या दहा वर्षांच्या कालावधीसाठी हा स्वायत्त दर्जा देण्यात आला आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयाला स्वायत्तता देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार या संबंधातील पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शुक्रवार, दि. १४ मे २०२१ रोजी महाविद्यालयाला मिळाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अग्रगण्य वाणिज्य महाविद्यालयांपैकी एक असलेल्या म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एम.कॉम., बी.बी.ए., बी.बी.ए. (सी.ए.), बी.बी.ए. (आय.बी.) असे अभ्यासक्रम येथे चालविले जातात. कॉमर्स विषयातील संशोधन केंद्रही येथे आहे. उद्योजकता विकास केंद्र, प्लेसमेंट सेल, कॉमर्स लॅब हे या महाविद्यालयाचे वैशिष्टयपूर्ण उपक्रम आहेत. राष्ट्रीय मुल्यांकन आणि अधिस्विकृती परिषद म्हणजेच ‘नॅक’तर्फे करण्यात आलेल्या तिसऱ्या फेरीच्या मुल्यांकनात महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार देखील मिळाला आहे. ह्या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी जगभरात आपल्या कर्तृत्वाने महाविद्यालयाबरोबरच संस्थेचे व देशाचेही नाव उज्ज्वल करत आहेत आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी जगदीश राजाराम मालखरे यांचे आज संध्याकाळी कोरोना विषाणूच्या संसर्गाने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
१९९५ पासून त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात विविध पदांवर काम केले.
मूळचे सोलापूरचे असलेले मालखरे १९८४ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले. त्यानंतर १९८७ ते १९९२ पर्यंत त्यांनी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. या काळात नाशिक शहर, नाशिक विभाग आणि मध्य मुंबईचे संघटन मंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांच्याकडे परिषदेचे प्रदेश कार्यालय मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. अभिनव आणि धाडसी कार्यक्रमांची आखणी करून ते यशस्वीपणे पार पाडणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. ते उत्तम गीत गायक होते. शांत स्वभावाच्या मालखरे यांचे अनेकांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते.
संस्थेतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य आणि जुन्या पिढीतील बांधकाम व्यावसायिक अनंत नारायण तथा दादा गोगटे यांचे काल रात्री कोरोना विषाणूच्या संसर्गाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी हे त्यांचे जावई आहेत.

गोगटे हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या नियामक परिषदेचे व पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे माजी सदस्य होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह तसेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

कोरोना साथीमुळे ‌सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आज (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात ४ विद्यार्थिनी आणि १३ विद्यार्थी अशा एकूण १७ जणांनी रक्तदान केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, नियामक मंडळाचे सदस्य व इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ देत आहेत.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने रक्तदानासाठीचे सर्व निकष पूर्ण करू शकणाऱ्या जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.

छायाचित्रात (डावीकडून) – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संतोष देशपांडे.

कोरोना साथीमुळे ‌सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि म.ए.सो  कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आज (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) संयुक्तपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या शिबिरात महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी या वेळी रक्तदान केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता आचार्य, महाविद्यालयाचे उपप्राचार्य सीए (डॉ.) सुदाम धोंगटे पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ देत आहेत.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने रक्तदानासाठीचे सर्व निकष पूर्ण करू शकणाऱ्या जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.

छायाचित्रात (डावीकडून) – म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे उपप्राचार्य सीए (डॉ.) सुदाम धोंगटे पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता आचार्य, मएसोच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले.

 

पुणे, दि. १९ : कोरोना साथीमुळे ‌सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने आज (सोमवार, दि. १९ एप्रिल २०२१) महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी.बी. बुचडे, डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक वाणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नितीन आडे, युथ रेडक्रॉसचे प्रा. प्रवीण दुसाने, राष्ट्रीय छात्रसेनेच्या भूदल विभाग प्रमुख प्रा. प्रवीण दुसाने, राष्ट्रीय छात्र सेनेच्या नौदल विभागाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश शेलार, महाविद्यालयाचे प्रबंधक किसन साबळे यांचा शिबिराच्या आयोजनात विशेष सहभाग होता.

महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी या वेळी रक्तदान केले.

रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे अशी माहिती डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. शैलजा पारगांवकर यांनी या वेळी दिली.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने वरील सर्व सूचनांचे पालन करून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.

म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि म.ए.सो  कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय यांनी संयुक्तपणे उद्या (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. म. ए. सो. गरवारे कॉलेज असेंब्ली हॉलमध्ये सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत हे शिबिर होणार आहे.

कोथरूडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसमध्ये देखील उद्या (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्याने सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

गुढीपाडव्याचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सतीश कुलकर्णी व सामंत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या रामायणावर आधारित दिनदर्शिका आणि बालगोपाळांसाठीच्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन आज (मंगळवार, दि. १३ एप्रिल २०२१) करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उद्योजक मा. सतीश कुलकर्णी, सुमित्र माडगूळकर, रवींद्र खरे आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे यावेळी उपस्थित होते.

या ध्वनिचित्रफितीचे संहिता लेखन सौ. प्राजक्ता माडगूळकर यांनी केले असून निवेदन कु. पलोमा माडगूळकर यांनी केले आहे. रवींद्र खरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. अमेय घाटपांडे आणि मंथन टन्नू यांनी तांत्रिक बाजू सांभाळली असून या ध्वनिचित्रफितीचे ध्वनीमुद्रण म.ए.सो. स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे.

प्रभू रामचंद्रांचे आदर्श जीवन कायम नजरेसमोर राहावे या हेतून ही दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार करण्यात आली असून हा प्रकल्प दोन महिन्यात साकारण्यात आल्याचे इंजि. सुधीर गाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

मा. सतीश कुलकर्णी यावेळी म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील किन्हई या आमच्या गावी १९३५ च्या सुमारास माडगूळकर कुटूंब राहात होते. गावातील राम मंदिरातच ग.दि. माडगूळकर यांना गीत रामायणची प्रेरणा मिळाली असावी. अध्योद्धेचे राममंदिर, राम, महाराष्ट्र, आमचे गाव, ग.दि.माडगूळकर, गीत रामायण हे सगळं कसे जुळवून आणता येईल याचा गेल्या चार वर्षांपासून विचार सुरू होता. रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्रे उपलब्ध होत नसल्याने हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता मात्र सुधीर गाडे यांच्यामुळे कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राकडून ही चित्रे उपलब्ध झाली आणि प्रकल्प साकारला. या कामी माडगूळकर कुटुंबाची देखील मदत मिळाली.  रामायणातून आपण बरेच काही शिकू शकतो. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे काय? हे जगभरातील लोकांनी समजून घेतले पाहिजे. रामायण आणि महाभारतातून अनेक गोष्टी शिकाया मिळतात. पुत्रमोहाने कोणती परिस्थिती ओढवते? हे रामायणात कैकेयी आणि भरत तसेच महाभारतात धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांच्यावरून दिसते. जे आपले नाही ते बळजबरीने आपण मिळवले तर त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात हे आपल्याला रावणाने केलेले सीतेचे अपहरण आणि कौरवांनी कपटाने बळकावलेले पांडवांचे राज्य या उदाहरणांवरून दिसून येते. भारतात आजही या गोष्टी लागू पडतात.”

ग.दि. माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगूळकर म्हणाले, “ज्यांना वाचता येत नाही किंवा मराठी भाषा कळत नाही अशा ३ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी रामायणावरील दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार केल्याबद्दल आणि त्यात माडगूळकर कुटुंबीयांना सहभागी करून घेतल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानतो. पुढच्या पिढीपर्यंत हे सर्व पोहोचावे हा त्यामागील उद्देश आहे. याच उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यात गदिमांचे स्मारक उभे राहात आहे. त्यातील एक दालन गीत रामायणासाठी राखीव असेल. अयोद्धेतील राममंदिराची एक तरी भिंत गदिमांच्या गीत रामायणाने भरलेली नक्कीच असेल.”

ध्वनिचित्रफितीचे पार्श्वसंगीतकार रवींद्र खरे म्हणाले की, “वाल्मिकी रामायण हा कलात्मकतेने मांडलेला इतिहास आहे. कलात्मकतेमुळे इतिहास दीर्घकाळ टिकतो आणि सर्वदूर त्याचा प्रसार देखील होतो. राजकारण आणि राज्यव्यवहार यांची प्रभू रामचंद्रांनी कायम केलेली प्रथा व पद्धत जगातील सर्वात आदर्श होती. त्यामुळेच त्यांच्यानंतर २५०० वर्षे म्हणजे महाभारत घडेपर्यंत ती टिकून होती, हेच रामाचे मोठेपण आहे. रामभक्तीच्या भावनेच्या भरात रामायणाचा इतिहास मागे पडू नये. लहानपणी अचूकतेचा व ध्येयनिष्ठेचा संस्कार, कुमारवयात चिकित्सा व कुतूहल आणि मोठेपणी वास्तवाचा शोध घेण्यासाठी रामायण वाचले पाहिजे. रामायण हा इतिहास आहे कारण वाल्मिकींनी रामाच्या ८३ पिढ्यांची नावे त्यात दिली आहे. तरूण पिढीने नगररचना, आरोग्यचिकित्सा, भूगोल, तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रांचे ज्ञान अशी विविध पैलूंनी रामायणाचा अभ्यास केला पाहिजे.”

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “रामायणावरील दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे लहानपणी झालेले संस्कार कायम टिकून राहतात. रामायण आणि महाभारत हे खूप मोठे विषय आहेत, त्यांचा खूप अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. राम हा सहनशील होता आणि सहनशीलतेचा कडेलोट झाला तेव्हा कृष्ण उभा राहिला. रामायण आणि महाभारत या केवळ कथा नाहीत. त्यातील अनेक मूल्ये जीवनात आचरणात आणण्यासारखी आहेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. सुधीर गाडे यांनी केले.

 

“भारतापासून वेगळे झाल्यानंतर पाकिस्तानने बांगला देशात केवळ लूटमार, अत्याचार आणि नरसंहार केला. बांगला संस्कृती आणि भाषा यावर अतिक्रमण केले. बलुचिस्तानातदेखील पाकिस्तानने असाच नरसंहार केला आहे. पाकिस्तानच्या या कारवाया बघून जॉर्डनच्या राजाने आपल्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याला निमंत्रण दिले आणि त्या देशातील पॅलेस्टिनी नागरिकांचा संहार केला. क्रूरपणा हा पाकिस्तानचा स्थायीभावच आहे. दुसरीकडे बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुक्ती वाहिनीला मदत करण्यासाठी तब्बल तीन लाख भारतीय सैनिक बांगला देशात उतरले होते. मात्र सहा महिन्याच्या काळात भारतीय सैनिकांनी तिथल्या नागरिकांवर कोणतेही अत्याचार केले नाहीत. त्यामुळे भारतीय सैनिकांचे हे संस्कार आणि संस्कृतीला माझा सलाम आहे,” असे बांगला देश मुक्ती संग्रामात भाग घेतेलेले बांगला देशच्या लष्करातील निवृत्त अधिकारी लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर आज (बुधवार, दि. २४ मार्च २०२१) येथे म्हणाले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘द हिस्ट्री अनफोल्डिंग’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. बांगला देशचे मुंबईतील उप-उच्चायुक्त मा. मोहम्मद लुत्फोर रहमान तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे या वेळी उपस्थित होते.

१९७१ साली झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याने केलेल्या अतुलनीय पराक्रमाची आठवण कायम ठेवण्यासाठी १६ डिसेंबर हा दिवस दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असलेल्या व्याख्यानमालेतील हे व्याख्यान होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल एस.एस. मेहता (निवृत्त) होते. बांगला देशातील ‘बीर उत्तम’ हा नागरी सन्मान मिळालेले मा. शहाबुद्दीन अहमद आणि लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर हे ढाका येथून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

लेफ्टनंट कर्नल काझी सज्जाद अली झहीर यांचा भारत सरकारने या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांना बांगला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानले जाणारे ‘स्वाधीनता पदक’ आणि ‘बीर प्रोतिक’ या पुरस्कारांनी या पूर्वीच गौरविण्यात आले आहे.

आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, “तेराशे किलोमीटर अंतर आणि सांस्कृतिक दुरावा असलेले दोन प्रदेश मिळून एक देश कसा काय निर्माण होऊ शकतो? हा प्रश्नच होता. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत शेख मुजीब-उर-रहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगने प्रचंड विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानी संसदेचे अधिवेशन ढाका येथे घेण्याची त्यांची मागणीदेखील जनरल याह्याखान यांनी फेटाळून लावली होती. बांगला देशच्या मुक्तीसाठी लढताना भारतीय सैन्यातील १७-१८ वर्ष वयाचे सैनिक धारातीर्थी पडले. त्यांचे हे हौतात्म्य विसरता येणार नाही. भारत आणि बांगला देशातील संबंध रक्त आणि परिश्रमाने जोडलेले आहेत. नवीन पिढीला त्याची माहिती करून देण्याची गरज आहे. १९७१ च्या मुक्ती संग्रामाचे ऋण हे पैशाने फेडता येण्यासारखे नाहीत, दोन्ही देशांमधील संबंध, संपर्क, संवाद आणि समन्वय वाढवून त्यातून उतराई होता येईल.”

शहाबुद्दीन अहमद म्हणाले की, “आत्मसन्मान राखण्यासाठी आणि लोकशाही पद्धतीने जीवन जगण्यासाठी बांगला देशची निर्मिती झाली आहे. भारतातून वेगळे झाल्यापासूनच पश्चिम पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांनी पूर्व पाकिस्तानातील बंगाली जनतेवर अन्याय आणि अत्याचार सुरू केले होते. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये मी वैमानिक म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी एकूण ३०० वैमानिक होते, त्यापैकी केवळ ३० वैमानिक पूर्व पाकिस्तानातील होते. लष्कर आणि नोकरशाहीत देखील असाच दुजाभाव केला जात होता. वंगबंधू शेख मुजीब-उर-रहमान यांच्या प्रेरणेने मी पूर्व पाकिस्तानात परतलो. मी नागरी सेवेतील वैमानिक होतो परंतू बांगला देश मुक्ती संग्रामाच्या वेळी मी लढाऊ वैमानिक झालो. तेव्हा बांगला देशाकडे केवळ चार विमाने होती आणि त्यातील एक विमान जोधपूरच्या महाराजांनी दिले होते.  चार विमाने आणि नऊ वैमानिकांच्या बळावर २८ सप्टेंबर १९७१ रोजी बांगला देशच्या हवाई दलाची स्थापना झाली. भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन चंदनसिंग यांनी आम्हाला १५ दिवस प्रशिक्षण दिले आणि १४ रॉकेट घेऊन आम्ही हेलिकॉप्टरने ढाका आणि चितगांव येथील पाकिस्तानी फौजांवर हवाई हल्ला केला. त्यानंतर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी युद्धाची अधिकृत घोषणा केली आणि भारतीय हवाई दल या युद्धात उतरले. भारताने केलेली मदत आम्ही कधीच विसरू शकणार नाही.”

मोहम्मद लुत्फोर रहमान आपल्या भाषणात म्हणाले की, “वंगबंधू शेख मुजीब-उर-रहमान यांच्या जन्मशताद्बी वर्षातच भारताने त्यांना ‘गांधी शांती पुरस्कार’ जाहीर केला आहे, त्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो. शेख मुजीब-उर-रहमान यांचे नाव कधीही विसरता येणार नाही कारण त्यांनी बांगला देश जगाच्या नकाशावर आणला. बांगला देशाच्या स्वातंत्र्य युद्धाला जगाच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. बंगाली जनतेच्या अस्मितेची जाणीव त्यांना लहानपणापासूनच होती. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी चळवळींमध्ये कधीच तडजोड केली नाही. बंगाली लोकांच्या हक्काचा, त्यांचे भविष्य घडविणारा देश मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. बांगला देशाच्या स्वातंत्र्य युद्धामुळे भारत आणि बांगला देश यांच्यात निर्माण झालेले भावबंध कधीही न संपणारे आहेत, त्यातूनच दोन्ही देशांमधील सहकार्य दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातूनच दोन्ही देशांमधील सीमा प्रश्नावर तोडगा निघू शकला. आता दोन्ही देश उत्तम पद्धतीने शेजारधर्म पाळत आहेत. भारताकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीबरोबरच होणारा पायभूत सुविधांचा विकास, दोन्ही देशातील बंदरे-जलमार्ग-रस्ते यांची जोडणी, उर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांमुळे रास्त दरात उपलब्ध होणारी वीज अशी अनेक उदाहरणे आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनी दहशतवादाच्या विरोधात कंबर कसल्यामुळे मूलतत्ववादी आणि दहशतवादी कारवाया संपुष्टात आल्या आहेत. परस्परांच्या हितासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करून विकास साधत आहेत.”

लेफ्टनंट जनरल एस.एस. मेहता (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “बांगला देशचे स्वातंत्र्य युद्ध म्हणजे लोकशाहीने लष्करशाहीवर, मानवतेने क्रौर्यावर आणि जुलुमशाहीवर मुक्ततेने मिळवलेला विजय आहे. बांगला देशातील भारतीय सैन्याच्या संस्कारी वर्तनातून दिलेला मानवतेचा संदेश, मुक्तीवाहिनीने युद्धभूमीवर दिलेला प्रामाणिकपणाचा परिचय, १३ दिवसात पूर्व पाकिस्तानातील जनतेला मिळालेली मुक्ती, ३ हजारांच्या भारतीय फौजेसमोर शरण आलेले ३० हजार पाकिस्तानी सैनिक म्हणजे बांगला देशचे स्वातंत्र्य युद्ध आहे. बांगला देशी जनतेच्या वेदना आणि व्यथा समजून घेण्यास जगात कोणालाच वेळ नव्हता. जेव्हा दोन लोकशाही देश एकत्र येतात तेव्हा त्यांना कोणीच रोखू शकत नाही.”

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

सौ. लीना चांदोरकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

Scroll to Top
Skip to content