‘नवोन्मेष’ हॅकेथॉन उत्साहात संपन्न

‘नवोन्मेष – २०२६’ ही राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धा अतिशय उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस आणि मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ व २८ फेब्रुवारी २०२६ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आसाम, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, दिल्ली आणि चंडीगड यांसारख्या राज्यांमधील सुमारे १३०० स्पर्धकांनी त्यात भाग घेतला.

‘नवोन्मेष’चे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, एमईएस मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष व उद्योजक अजय पुरोहित आणि किन्नयशोदा सामाजिक संस्थेच्या संस्थापक सौ. सुमेधा संभाजी लिह्मण यांच्या हस्ते करण्यात आले. किन्नयशोदा सामाजिक संस्थेचे व्यवस्थापक यश प्रशांत पाटील यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती.

आरोग्यसेवा, शाश्वत विकास, फिनटेक, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि अ‍ॅग्रीटेक अशा विविध क्षेत्रांशी संबंधित नाविन्यपूर्ण प्रकल्प त्यांनी सादर केले. आयसिनर्जी, व्हीफोर्सी, स्किली, ओरॅकल अप्लिकेशन्स, बीएनवाय मेलन आणि मिअरस टेक्नॉलॉजीज यांसारख्या अग्रगण्य संस्थांमधील अनुभवी तज्ज्ञांमार्फत या प्रकल्पांचे संपूर्ण मूल्यमापन करण्यात आले. त्यामुळे स्पर्धकांना त्यांच्या प्रकल्पांची उपयुक्तता आणि परिणामकारकता तसेच त्या संदर्भातील व्यावहारिक दृष्टीकोन समजला.

ही स्पर्धा अत्यंत चुरशीची होती, तीन कठोर फेऱ्यांमध्ये ती पार पडली. स्पर्धकांच्या सर्जनशीलतेला, तांत्रिक कौशल्यांना आणि समस्या सोडवण्याच्या त्यांच्या क्षमतेला अधिकाधिक आव्हान देण्यासाठी प्रत्येक फेरीची रचना करण्यात आली होती. अंतिम फेरीत निवडक संघांनी आपल्या अभिनव कल्पना आणि कार्यक्षम प्रोटोटाइप सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पारदर्शक मूल्यमापन पद्धती आणि उद्योग क्षेत्राशी परिपूर्ण सहकार्य यामुळे नवोन्मेष हॅकेथॉनने नवकल्पनांना चालना देणारे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे. आरोग्यसेवा, शाश्वतता, फिनटेक, ऑटोमेशन आणि अ‍ॅग्रीटेक यांसारख्या विविध क्षेत्रांतील उद्योग-प्रेरित समस्यांची काळजीपूर्वक निवड ही नवोन्मेष ची खासियत असून त्यामुळे या हॅकेथॉनची उपयुक्तता आणि परिणामकारकता ठळकपणे दिसून येते.

‘नवोन्मेष’चा समारोप आयसिनर्जीचे संस्थापक अतुल ठोंबरे, शिक्षणतञ डॉ. अमोल गोजे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय भालेराव तसेच एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसचे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

‘नवोन्मेष – २०२६’ हा उपक्रम परिवर्तनशील विचारांना प्रोत्साहन देत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भविष्यकालीन नेतृत्वाची पायाभरणी करणारा ठरला आहे.

 

‘स्वरवेध’ लोकगीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’तर्फे आयोजित करण्यात आलेली ‘स्वरवेध’ ही लोकगीत गायन स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी तालवाद्यांचे तज्ञ कलाकार संतोष मोरे आणि शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या हस्ते पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे होते. ‘मएसो कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, ‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर भोसले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना संतोष मोरे म्हणाले, “लोकगीत गायन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल ‘मएसो’चे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. ही कला मातीतील, लोकांनी जगवलेली, संतांनी भर घातलेली आहे, पालक आणि शिक्षकांच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती भावी पिढ्या आत्मसात करत आहे. स्पर्धेत सहभागी झालेले सर्वच विद्यार्थी कलाकार आहेत, कारण स्पर्धा असूनही त्यांच्या मनात कोणाबद्दल इर्षा नव्हती आणि जो मनाने निर्मळ असतो तोच कलावंत असतो. परिक्षक म्हणून आम्ही परिक्षण करत नव्हतो तर तो निखळ आनंद घेत होते. विद्यार्थी कोणत्याही शाळेचा असला तरी शिक्षकांमध्ये दिसलेला मातृवत्सलभाव या स्पर्धेत दिसून आला, हे ‘मएसो’चे वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेच्या रंगमंचाने दिलेला आत्मविश्वास हेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे खरे भांडवल आहे.”
शाहीर हेमंतराजे मावळे यांनी, एखादी कला शिकण्याचे आवाहन शिक्षकांना केले. किर्तन हे १० मिनिटांमध्ये सादर करणे शक्य नसल्याने त्यासाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्याची सूचना केली. आपल्या दिव्यंगत्वावर मात करून तसेच स्पर्धाकाळात आलेल्या तात्पुरत्या अडचणींवर मात करून प्रभावी सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकांचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना सादरीकरणासंदर्भात विविध सूचना केल्या.
अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब शिंदे म्हणाले की, आजच्या जागतिकीकरणाच्या काळात आणि नवतंत्रज्ञानाचा उदय होत असताना लोककलांचा विसर पडू नये म्हणूनच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. असे वेगळ्या स्वरुपाचे उपक्रम आयोजित करणे हे ‘मएसो’चे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अवांतर वाचन आणि विविध कलागुणांची आवश्यकता असल्याने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच कलागुणांना महत्व देण्यात आले आहे. जे सहज सादर होते ते लोकगीत. शाहीर, लोककलावंत हे संस्कृतीचे वाहक असतात. लोकगीतांनीच आजपर्यंत पिढ्या घडल्या आहेत आणि संस्कृती प्रवाही राहिली आहे.
समारंभाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ यांनी ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या रंगवेध, तालवेध आणि स्वरवेध या स्पर्धांचा आढावा घेतला. ‘जे जे देखील स्वप्नी, ते ते तैसेचि होतसे’ असे म्हणता येईल अशा पद्धतीने या स्पर्धा उत्तमरित्या पार पडत आहेत असे सांगून ते म्हणाले, “विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन मिळते, त्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि शिक्षक यांनी घेतलेले कष्ट कारणीभूत असतात. कलेची साधना करणाऱ्याला पूर्वी वाया गेला असे म्हणत असत, आज मात्र त्याच कलेद्वारे करियर घडू शकते.”
मएसो भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात दि. २३ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ४ थी), उच्च प्राथमिक (इ. ५ वी ते ७ वी) आणि माध्यमिक (इ. ८ वी ते ११ वी) अशा तीन गटात ६०० विद्यार्थ्यांनी ५८ संघांद्वारे सहभाग घेतला आणि लोकगीतांपैकी कीर्तन, भारुड, गवळण, पोवाडा या गायन प्रकारांद्वारे आपली कला सादर केली. यशस्वी संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली.
प्राथमिक गटात मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – इंग्रजी माध्यम विभागाच्या संघाने सादर केलेल्या भारुडाने प्रथम क्रमांक मिळवला. मएसो रेणावीकर विद्या मंदिर, अहिल्यानगर शाळेच्या संघाने सादर केलेल्या गवळण या लोकगीत प्रकाराला दुसरा, मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – मराठी विभागाच्या संघाने सादर केलेल्या भारुडाला तिसरा क्रमांक मिळाला. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेने गोंधळ सादर केला होता, या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
उच्च प्राथमिक विभागात मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेने पोवाडा सादर केला होता, त्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – इंग्रजी माध्यम विभागाच्या संघाने सादर केलेल्या गोंधळाला दुसरा, मएसो रेणावीकर विद्या मंदिर, अहिल्यानगर शाळेच्या संघाने सादर केलेल्या गोंधळाला तिसरा क्रमांक मिळाला. मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, पनवेल – मराठी माध्यम विभागाच्या संघाला त्यांनी सादर केलेल्या किर्तनासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
माध्यमिक गटात मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला, या संघाने भारुड सादर केले होते. मएसो रेणुका स्वरुप प्रशालेच्या संघाने भारुड सादर केले, त्यांना दुसरा; मएसो रेणावीकर विद्यालय, अहिल्यानगर शाळेच्या संघाने देखील भारुड सादर केले, त्यांना तिसरा क्रमांक मिळाला. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेने भारुड सादर केले, त्या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या वेळी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे पालक समीर धर्माधिकारी या समारंभाला आवर्जून उपस्थित होते.
समारंभाचे सूत्रसंचालन अनिल म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले.
‘स्वरवेध’ लोकगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरवेध’ लोकगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायिका आरती कुंडलकर व सुप्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर यांच्या हस्ते सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मएसो’च्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष व उद्योजिका सौ. आनंदीताई पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी ‘मएसो कलावर्धिनी’ चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ व महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
पूर्व प्राथमिक (इ. १ ली ते ४ थी), प्राथमिक (इ. ५ वी ते ७ वी) आणि माध्यमिक (इ.८ वी ते ११ वी) अशा तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये कीर्तन, भारुड, गवळण, पोवाडा या लोकगीत प्रकारांचा समावेश आहे.
या प्रसंगी बोलताना आरती कुंडलकर म्हणाल्या की, शालेय जीवनामध्ये कला शिक्षणाची नितांत गरज आहे. गायन, वादन, नृत्य इ. कला विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात, त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलवतातत. कोणतेही सांगीतिक शिक्षण घेताना शास्त्रीय संगीताचे किमान ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.
सुयोग कुंडलकर म्हणाले की, ‘मएसो’ विद्यार्थ्यांवर अनेक वर्षांपासून संगीताचे उत्तम संस्कार करीत आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून बालवयातच संगीताचे बाळकडू देत आहे.
सौ. आनंदीताई पाटील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, बालवयातच विद्यार्थ्यांना ‘स्वरवेध’ हे एक उत्तम आंतरशालेय व्यासपीठ लाभले आहे. याचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी भविष्यात या व्यासपीठाची व्याप्ती वाढवून अनेक कला प्रकार समाविष्ट करावेत.
प्रास्ताविकात डॉ. दिलीप शेठ म्हणाले की, ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून विविध कलांचे संस्कार विद्यार्थ्यांवर घडविणे हा ‘मएसो’चा उद्देश आहे.
चित्रकलेसाठी ‘रंगवेध’, गायन कलेसाठी ‘स्वरवेध’, वादन कलेसाठी ‘तालवेध’ आणि तसेच पुढे ‘नृत्यवेध’, ‘नादवेध’ असे उपक्रम आयोजित करण्याचा मानस आहे.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ‘मएसो कलावर्धिनी’चे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन कविता चाटी यांनी केले.
स्पर्धेचे नियोजन अनिल म्हस्के यांनी केले.

“ज्ञान हे दडपून टाकण्याचे शस्त्र नाही तर सर्वांना सुखी करणारे शास्त्र”

जे. नंदकुमार : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान

‘भारतीय ज्ञान परंपरा : यशाकडे नेणारा मार्ग’ या विषयावर आपले विचार मांडताना ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार. या वेळी व्यासपीठावर उपस्थित (छायाचित्रात डावीकडून) सौ. आनंदी पाटील, बाबासाहेब शिंदे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), प्रदीप नाईक, डॉ. अतुल कुलकर्णी

पुणे, दि. १७ : “पाश्चात्य परंपरेत इतरांना दडपून टाकण्यासाठी शस्त्र म्हणून ज्ञानाचा विचार केला जातो. भारतीय परंपरेत मात्र प्रत्येक व्यक्तीला श्रेष्ठ, सुखी, संपन्न, निरामय बनवण्यासाठीचे शास्त्र म्हणून ज्ञानाकडे बघितले जाते. आपल्या परंपरेत ज्ञान लादले जात नाही तर व्यक्तीच्या ठायी असलेल्या ज्ञानाची जाणीव त्याचा करून दिली जाते,    हे भारतीय ज्ञान परंपरेचे वैशिष्ट्य आहे,” असे प्रतिपादन ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे राष्ट्रीय संयोजक जे. नंदकुमार यांनी येथे बोलताना केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मृतीदिनी ‘भारतीय ज्ञान परंपरा : यशाकडे नेणारा मार्ग’ या विषयावर नंदकुमार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

नंदकुमार पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय ज्ञान परंपरेप्रमाणेच जगात विविध ज्ञान पंरपरा आहेत. परंतु, त्या परंपरांनी स्थल-काल-सापेक्ष विचार केला. भारतीय ज्ञान परंपरेने मात्र संपूर्ण सृष्टीचा विचार केला हे तिचे मोठेपण आहे. त्यामुळेच भारताला गुरुस्थानी मानणारी आणि पूर्वापार चालत आलेली ज्ञान परंपरा चीनमध्ये आजही अस्तित्वात आहे. तेथील राजकीय विचारसरणीमुळे अद्याप ती विकसित झालेली नाही. स्त्री आणि पुरुष हे दोघेही एकाचवेळी ब्रह्म तत्वापासून अस्तित्वात आल्याची धारणा असल्यामुळे भारतीय परंपरेत स्त्री-पुरुष समानता ही अंगभूत आहे. पाश्चिमात्य विचारसरणीत पुरुषापासून स्त्री ची निर्मिती आणि पुरुषासाठी स्त्रीचे अस्तित्व ही धारणा असल्याने त्यांच्याकडे स्त्रियांचे शोषण होत आले आहे. संघर्षमय जगाला शांती मिळवून देण्याची क्षमता फक्त भारतीय ज्ञान परंपरेत आहे.

ज्ञान म्हणजे काय, ते प्राप्त करण्याची व्यवस्था काय आणि त्याचे वेगळेपण कोणते हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. दर्शन, ज्ञान आणि विद्या म्हणजे ज्ञान अशी ज्ञानाची व्याख्या आहे. दर्शन किंवा दृष्टीकोन यांच्या आधारे केलेला विचार ज्ञानाकडे घेऊन जातो आणि या दर्शनाच्या आधारे सुसंघटित किंवा सुनियोजित पद्धतीने विशिष्ट विषयाचे ज्ञान मिळविल्याने विद्या प्राप्त होते. भारतीय ज्ञान हे केवळ अध्यात्मिक नाही. भारतीय ज्ञान पंरपरेत कधीही नष्ट न होणारे म्हणजे परा किंवा अ-क्षर ज्ञान आणि अपरा म्हणजेच भौतिक ज्ञान असे विद्येचे दोन प्रकार आहेत. पाश्चात्यांनी आपल्याकडील ज्ञानाची केवळ चोरीच केली नाही तर त्यावर आपला हक्क सांगितला. त्यांनी आपल्या देशातील ज्ञानी व्यक्तींचा बुद्धीभेद केला. भारतीय ज्ञान हे भौतिक नाही, ते वास्तववादी नाही असा भ्रम पसरवला. संस्कृत भाषा असो की आपली ग्रंथसंपदा पाश्चात्यांनी सर्वकाही विद्रुप केले, भारतीय समाजाला आत्मविस्मृतीत  ढकलले. १८ विद्या, ६४ कला आणि उपकला अशी समृद्ध ज्ञान परंपरा असलेल्या भारताबद्दल कोणतीही माहिती नसताना पाश्चात्यांनी आपल्यावर त्यांचे ज्ञान लादले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतकेंद्री शिक्षण व्यवस्थेचा आग्रह धरण्यात आला आहे, मात्र ते अद्याप पूर्णपणे लागू झालेले नाही.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना बाबासाहेब शिंदे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून असलेला राष्ट्रीय शिक्षण देण्याचा हेतू आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्ट करण्यात आलेल्या भारतीय ज्ञान परंपरेचे एक नाते असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आप्या देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली पण भारतीय ज्ञान परंपरेशी फारकत घेतली. केवळ अध्यात्मच नाही तर गणित, विज्ञान, खगोलशास्त्र अशी विविध शास्त्रे यांचा शिक्षणात समावेश होता, ते शिकविणारी नालंदा, तक्षशीला यासारखी जगद्विख्यात विद्यापीठे आपल्या देशात होती, आपल्या देशात मोठ-मोठे शोध लागत होते, जगभर होणाऱ्या व्यापारामुळे देशात समृद्धी नांदत होती. भारताने लावलेला शून्याचा शोध, देशातील मंदिरे, लेण्यांचे स्थापत्य हे सर्वकाही अचंबित करणारे आहे. त्यांचा विसर पडू नये म्हणून नव्या शैक्षणिक धोरणाचा उपयोग होणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात अतिशय जलद गतीने होणारे बदल, पाश्चात्यांचा भांडवलवादी दृष्टीकोन, अपयशी ठरलेला साम्यवादी विचार या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय विचार अतिशय महत्वाचा आहे. भारतीय ज्ञान परंपरा शिक्षणाशी जोडली जात असताना तिचा नव्याने उहापोह व्हावा या हेतूने आजचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नेहा देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले.

 

!!! भावपूर्ण श्रद्धांजली !!!
महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला. ही धक्कादायक घटना सर्वांनाच शोकमग्न करणारी आहे. अजित पवार हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो हायस्कूल, बारामती म्हणजेच सध्याची मएसो ग.भि. देशपांडे विद्यालय या शाळेचे माजी विद्यार्थी होते. १९६८ ते १९७४ या कालावधीत त्यांनी या शाळेत शिक्षण घेतले.
कै. अजित पवार यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली!

७७ वा  प्रजासत्ताक दिन शिस्तबद्धतेने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांद्वारे, शिस्तबद्धतेने आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

सासवड येथील मएसो वाघिरे विद्यालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे होते. या वेळी प्रशालेचे जेष्ठ सेवक श्री. हनुमंत कारके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्र गीत, राज्य गीत यांचे गायन झाले आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांच्या संचलनाने आणि मानवंदनेने शालेय परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. पूर्व-प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचे प्रात्यक्षिक, इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी टटिंग नृत्य तसेच बालवाडी ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबावरील विविध प्रात्यक्षिके सादर केली.

मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्यासाठी पाच संकल्प सांगितले. तसेच शिस्त, स्वच्छता आणि प्रामाणिकपणा हे आचरणात आणले तर स्वतःची, राज्याची आणि  देशाची प्रगती होईल असे ते म्हणाले.

मराठी माध्यमाच्या पूर्व-प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा अशा पाचही शाखा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अनेक माजी विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

म. ए. सो. मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील (पूर्वीचे भावे स्कूल) कार्यक्रमाला शाळेतील १९७१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असलेले एअर व्हाईस मार्शल किरण प्रभाकर पळसुले व्हीएसएम (निवृत्त) हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाला समितीचे मा. अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, महामात्र श्री. सुधीर गाडे, शाळेचे पदाधिकारी, पालक, आजी-माजी विद्यार्थी, शाळेच्या परिसरातील नागरिक मोठ्या  संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने सामुदायिक कवायत व विद्यार्थ्यांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच सर्व उपस्थितांनी साक्षरतेची प्रतिज्ञा घेतली.

म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना शाळेत ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रमिला कांबळे व सौ. विद्या शिरोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाला समितीच्या महामात्रा डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी कवायत, लेझीम, डंबेल्स, सूर्यनमस्कार व तायक्वांदो यांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमप्रकारे सादर केली. पूर्व-प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी “नन्हा मुन्ना राही हूं” या देशभक्तीपर गीतावर उत्कृष्टतेने नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. शाळेतील विद्यार्थी रियांश हिंगमिरे व आरोह सातव यांनी मराठी व इंग्रजीमध्ये प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली. शाळेतील शिक्षिका सौ. रोहिणी पवार यांनी दिल्लीतील कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील संचलनाची तसेच महाराष्ट्राच्या चित्ररथाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. शाला समितीच्या महामात्रा डॉ. अश्विनी पाटील यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ होण्यासाठी छोट्या मुलांनी काय करणे अपेक्षित आहे, याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहगीतातून वातावरणात अधिकच जोश निर्माण झाला. ‘भारत माता की जय’ या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ज्येष्ठ शिक्षिका सौ. भारती कुंभार व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ मराठी साहित्यिक कै. व्यंकटेश माडगूळकर यांचे सुपुत्र श्री. मोहन व्यंकटेश माडगूळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. अजय पुरोहित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शाळेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे यावेळी उपस्थित होते. घोष पथकातील विद्यार्थ्यांनी वंशीवर राष्ट्रगीत सादर करून वातावरण भारावून टाकले. त्यानंतर ध्वजगीत सादर करण्यात आले. एन. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रशालेतील शिक्षक श्री. अनंत कुलकर्णी यांनी भारतीय संविधानाच्या हस्तलिखिताची माहिती दिली व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. मा. श्री. मोहन व्यंकटेश माडगूळकर यांनी विद्यार्थ्यांना मराठी शाळेत शिक्षण घेत असल्याचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला. मा. श्री. अजय पुरोहित यांनी “भारत माझा देश आहे” या भावनेचा विसर पडू न देण्याची व आपण विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असल्याची जाणीव ठेवण्याविषयी प्रेरणादायी विचार मांडले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी साधन कवायत, तर एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत जखमी जवानांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी या वेळी प्रेरणादायी गीत सादर केले. उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी लेझीम पथकाचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत भरली.

म. ए. सो. चे. कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बारामती जिल्ह्याचे मा. संघचालक श्री. दिपक पेशवे उपस्थित होते. कोल्हापूर येथील विभागीय मंडळातील शिक्षण उपसंचालक मा. श्री. राजेश क्षीरसागर, बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. निलेश गवळी तसेच प्रशालेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित अत्यंत उत्साहात संपन्न झाला. मा. श्री. दिपक पेशवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीताचे सादरीकरण व संविधानाचे वाचन झाले. एन. सी. सी., आर. एस. पी., स्काऊट व गाईड यांच्या पथकांनी घोष पथकाच्या साह्याने प्रमुख पाहुणे व पदाधिकाऱ्यांना मानवंदना दिली. त्यानंतर विविध स्पर्धांत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तक देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

म.ए.सो.चे सौ.निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय, बारामती यांनी म.ए.सो.च्या क्रीडावर्धिनीतर्फे आयोजित मएसो क्रीडा करंडक स्पर्धेत विविध खेळात यश संपादन केले. या सर्व खेळातील खेळाडूंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले.  त्यानंतर पूर्व प्राथमिक विभागाचे “ऑपरेशन सिंदूर” वर आधारित देशभक्तीपर गीत, प्राथमिक विद्यालयाचे सूर्यनमस्कार, माध्यमिक विद्यालयाचे एन.सी.सी.चे “शौर्य, अनुशासन, धैर्य” यावर आधारित प्रात्यक्षिक, लेझीम प्रात्यक्षिक, सर्व विद्यार्थ्यांचे कवायत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

म. ए. सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे भारतीय नौसेनेतील अधिकारी श्री. संतोष तोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. अजय पुरोहित, महामात्र डॉ. श्री. गोविंद कुलकर्णी आणि मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री. राजीव देशपांडे, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा. श्री. पी. बी. कुलकर्णी हे उपस्थित होते.    कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन सादर केले. इ. ५ वी व ६ वी च्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

म. ए. सो. ज्ञान मंदिर व म. ए. सो. पब्लिक स्कूल, कळंबोली येथे प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई विमानतळाचे इमिग्रेशन पोलीस निरीक्षक श्री. दिपक आबाजी कदम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर विद्यालयातील गायक वृंदाने राष्ट्र गीत, ध्वज गीत व राज्य गीत सादर केले. त्यानंतर आर. एस. पी.च्या विद्यार्थ्यांनी संचलन सादर केले. या संचलनानंतर विद्यार्थ्यांची शालेय परिसरातून रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कवायत, एरोबिक्स, सूर्यनमस्कार व लेझीम इत्यादींचे सादरीकरण केले. देशभक्तीपर गीते व स्फूर्तीदायक भाषणे यावेळी सादर करण्यात आली. म. ए..सो. क्रीडा करंडक विजेत्या खेळाडूंचे व इतर बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

मएसो ज्ञानमंदिर, कळंबोलीने पटकवला ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’

आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते बक्षीस वितरण

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मएसो ज्ञानमंदिर, कळंबोली या शाळेने पटकावले. स्पर्धेचे हे १४ वे वर्ष होते.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही तीन दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडली. स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ‘मएसो’चे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मएसो क्रीडावर्धिनी व शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, ‘मएसो’चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव सुधीर भोसले, शाला समितीच्या महामात्र डॉ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.

‘मएसो क्रीडा करंडक २०२६’ साठी मुले व मुली या गटांत सूर्यनमस्कार, लंगडी, डॉजबॉल आणि गोल खो-खो या खेळांच्या सांघिक मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना सांघिक व वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

या प्रसंगी मा. तेजल हसबनीस म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या असतात. त्यांच्यात संघभावना, शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती विकसित होते. चांगला माणूस होण्यासाठी खेळांतून प्रोत्साहन मिळते.”

मा. श्री. प्रदीप नाईक यांनी अध्यक्षीय मनोगतात सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यात तुमच्यातील काही विद्यार्थी ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढील वर्षीचा ‘मएसो क्रीडा करंडक’ पनवेल येथील मएसो आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय येथे आयोजित करण्यात येणार असल्याचे मा. श्री. विजय भालेराव यांनी घोषित केले.

डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ. मंजुषा दुर्वे यांनी आभार मानले.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शाळेच्या सर्व शिक्षिका, क्रीडाशिक्षक यांनी क्रीडास्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या शाळा ठरल्या विजेत्या

सूर्यनमस्कार स्पर्धेत मुलांमध्ये मएसो ज्ञान मंदिर कळंबोली, मएसो पब्लिक स्कूल कळंबोली, मएसो दामोदर शंकर रेणावीकर विद्या मंदिर अहिल्यानगर, तर मुलींमध्ये मएसो ज्ञान मंदिर कळंबोली, मएसो पब्लिक स्कूल कळंबोली, मएसो बाल विकास मंदिर सासवड

लंगडी स्पर्धेत मुलांमध्ये मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, मएसो इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ, मएसो हरिभाऊ गजानान देशपांडे बारामती, तर मुलींमध्ये मएसो इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ, मएसो सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, मएसो विद्यामंदिर बेलापूर

डॉजबॉल स्पर्धेत मुलांमध्ये मएसो विद्या मंदिर बेलापूर, मएसो ज्ञान मंदिर कळंबोली, मएसो निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, तर मुलींमध्ये मएसो बाल विकास मंदिर सासवड, मएसो निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, मएसो इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ

गोल खोखो स्पर्धेत मुलांमध्ये मएसो निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, मएसो ज्ञान मंदिर कळंबोली, मएसो इंग्लिश मिडीयम स्कूल शिरवळ, तर मुलींमध्ये मएसो ज्ञान मंदिर कळंबोली, मएसो निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय बारामती, मएसो बाल विकास मंदिर सासवड

या शाळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला.

मनातील जिद्द, सातत्यपूर्ण सरावाने खेळाडू घडतो
आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मिहीर आंब्रे यांचे मत; ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’चे उद्घाटन
“खेळामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर आपल्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टी मिळतात. खेळात हार-जीत होणे, यापेक्षाही खिलाडूपणाची भावना मोठी असते. तुमच्या मनातली खेळाविषयीची जिद्द आणि सरावातील सातत्य टिकवून ठेवा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. त्यातूनच एक चांगला खेळाडू घडतो”, असे मत छत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू मिहीर आंब्रे यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मएसो क्रीडा करंडक’ या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन मिहीर आंब्रे यांच्या उपस्थितीत मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, मयूर कॉलनी कोथरूड येथे पार पडले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदी पाटील, मएसो क्रीडावर्धिनी व शाला समितीचे अध्यक्ष विजय भालेराव, ‘मएसो’चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव सुधीर भोसले, शाला समिती महामात्र डॉ. नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी उपस्थित होते. मिहीर आंब्रे यांनी स्पर्धेचा शुभंकर ‘वीर’ आणि फुगे सोडून, तसेच ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन केले.
मिहीर आंब्रे म्हणाले, “तुमच्याएवढाच छोटा असताना, खेळांची वाट पहायचो. खेळ आपल्याला शिस्त शिकवतात, खिलाडूपणा, एकाग्रता वाढवतात. खेळताना विकसित झालेली कौशल्ये आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगी उपयोगी पडतात. शालेय वयातच क्रीडा संस्कृती रुजली, तर आपल्याला मोठेपणी कोणताही खेळ खेळता येतो. खेळ जिंकण्यापेक्षा अधिक उत्कृष्ट कसा खेळता येईल, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, मिहीर यांच्या क्रीडाप्रेमाची सुरवात इथे शाळेतच झाली. आज त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवले आहे. असा आदर्श घेतला पाहिजे. मनात जिद्द ठेवा आणि ध्यास घ्या. जीवनाच्या सर्व क्षेत्रात तो उपयोगी पडतो.
मिहीर आंब्रे बालशिक्षण मंदिर शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने, त्यांनी व्यासपीठीय औपचारिकता बाजूला ठेवत विद्यार्थ्यांमध्ये जाऊन सर्व छोट्या खेळाडूंशी संवाद साधत जीवनातील खेळांचे महत्त्व समजावून सांगितले.
प्रास्ताविकात विजय भालेराव यांनी स्पर्धा पर्यावरणपूरक असल्याचा उल्लेख केला. या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष असून संस्थेव्यतिरिक्त अन्य पाच शाळांचा सहभाग स्पर्धेत आहे. खेळ शिस्त, संघभावना निर्माण करतात, असे ते म्हणाले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार मानले. डॉ. वैशाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
“यशस्वी आयुष्यासाठी ‘प’चे पंचक महत्वाचे”
म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ‘अभिव्यक्ती’चे आयोजन
“यशस्वी आयुष्य घडवायचे असेल, तर ‘प’चे पंचक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रेम, पुस्तक, प्रयत्न, पर्यटन आणि पैसे ही ती पंचसूत्री आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘अभिव्यक्ती – २६’ या वार्षिक उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ असा या कार्यक्रमाचा विषय होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, म.ए.सो. चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विलास उगले, गायिका प्रांजली बर्वे इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते. अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी ‘अभिव्यक्ती’ कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, मूकअभिनय, गायन-वादन सादर केले. यात महाविद्यालयाच्या ‘आगम कलामंडळा’ने सादर केलेले ‘महाराष्ट्राची लोकधारा’ चे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. तसेच ‘विविधतेतून एकता’ आणि ‘शिवरायांची गाथा’ या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका प्रांजली बर्वे यांनी यानिमित्ताने एक गाणे सादर केले.
प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी आपल्या प्रास्ताविकात, आजचा युवा हा उद्याचा राष्ट्रनिर्माता असल्याचे सांगताना विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ‘अभिव्यक्ती’ हे व्यासपीठ असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने समर्थनम् फाउंडेशनच्या वतीने महाविद्यालयातील दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगासाठी मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. सुभाष पालवे आणि प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी केले. डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची नवी दिल्लीतील प्रजासत्ताकदिनाच्या पथसंचलनासाठी निवड

देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी (आरडी परेड) म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या आर्मी विंगमधील सिनियर अंडर ऑफिसर कार्तिक बरगे, सिनियर अंडर ऑफिसर जिज्ञासा यादव, कॅडेट हर्षवर्धन तिडके तसेच नेव्हल विंगमधील कॅडेट सृष्टी पवार आणि कॅडेट समर्थ केदारे या पाच विद्यार्थ्यांची कठोर निवड प्रक्रियेनंतर देशातील सर्वोत्तम एन.सी.सी. कॅडेट्समधून या पथसंचलनासाठी निवड झाली आहे.
“विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, भविष्यातही अशाच प्रकारे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकतील,” अशी अपेक्षा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियमाक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी व्यक्त केली आणि विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
“एन.सी.सी.मुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ होते. या निवडीमुळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे,” अशी भावना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विलास उगले यांनी व्यक्त केली.
एन.सी.सी. केअर टेकर ऑफिसर डॉ. राजेंद्र जमदाडे व डॉ.माधव इंचुरे यांनी विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे कौतुक करत त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
राजधानी दिल्लीमधील वास्तव्यादरम्यान हे विद्यार्थी देशातील विविध राज्यांतील कॅडेट्ससोबत परेड, सांस्कृतिक कार्यक्रम, पंतप्रधान रॅली, तसेच विविध राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या निवडीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही एन.सी.सी.मध्ये सहभागी होण्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून हे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

रोमहर्षक सैनिकी प्रात्यक्षिकांनी ‘युवा चेतना दिन’ साजरा

युद्धाच्या बातम्या, युद्धातील शौर्याच्या व पराक्रमाच्या कथा वाचायला सर्वांनाच आवडते पण युद्धात होणारी जीवितहानी कधीही भरून काढता येत नाही. म्हणूनच युद्धस्य कथा रम्याः असे म्हटले जाते. तरीही युद्ध झालेच तर ते कसे लढले जाते, प्रत्यक्ष रणभूमीवर लढणारे सैनिक कोणते तंत्र वापरतात, शत्रूवर तुटून पडण्यापूर्वी नियोजन कसे केले जाते, व्यूहरचना नेमकी कशी असते, तोफगोळे आणि विमानांच्या प्रचंड आवाजात देखील परस्परांशी संवाद कसा साधतात हे जाणून घेण्याची संधी मिळाली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा व महाविद्यालयांमधील ‘एनसीसी’च्या छात्रांनी सादर केलेल्या रोमहर्षक प्रात्यक्षिकातून. निमित्त होते,  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा चेतना दिना’चे.

कासारआंबोली येथील म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत सोमवारी, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला महिंद्र समुहाच्या एरोस्पेस अँड डिफेन्स, ट्रक्स, बसेस अँड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट विभागाचे प्रेसिडेंट मा. श्री. विनोद सहाय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, नियामक मंडळाचे सदस्य व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रन एनसीसी पुणे चे कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर शैलैंद्र मराठे, २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी पुणेचे कमांडिंग ऑफिसर कर्नल किरण राऊल, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी तसेच संस्थेचे मा. सहाय्यक सचिव आणि म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र श्री. सुधीर भोसले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे व आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, सौ. सहाय, महिंद्र उद्योग समुहातील अधिकारीवर्ग, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर तसेच पालक, ग्रामस्थ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

‘एनसीसी’च्या छात्रांनी बॅटल फॉर्मेशन, रायफल ड्रील, सॅमाफोर सिग्नल्स, सायलेंट कम्युनिकेशन, सेक्शन अटॅक अशा विविध प्रात्यक्षिकांद्वारे नेतृत्वक्षमता, संघभावना, समन्वय आणि देशभक्ती यांचा परिचय करून देत उपस्थितांची मने जिंकली. म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील विद्यार्थ्यांनी काश्मीरमध्ये पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेले नृशंस हत्याकांड आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांचे नाट्य, नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून केलेले सादरीकरण सर्वांच्याच मनाचा ठाव घेणारे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. राजधानी दिल्ली येथीस प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात राष्ट्रीय छात्र सेनेच्या तुकडीत निवड झालेला ज्युनिअर अंडर ऑफिसर अनुराग पांडे याने या संचलनाचे नेतृत्व केले. आयएनएस विक्रांत, तेजस लढाऊ विमान, अग्नी क्षेपणास्त्र यांच्या प्रतिकृतींनी सजलेल्या चित्ररथाने आणि सैनिकी शाळेच्या अश्वारुढ छात्रांनी या शिस्तबद्ध संचलनाची शोभा वाढवली.

विविध क्रीडा प्रकारात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करून उपस्थितांना ‘युवा चेतना दिना’च्या शुभेच्छा दिल्या. व्यक्तीच्या जीवनात शिस्त ही महत्वाची असते, सैन्यदलांमध्ये अनुशासनाला सर्वाधिक महत्व दिले जाते. हाच धागा घेऊन आजच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. म.ए.सो. क्रीडावर्धिनीच्या कार्याचा आढावा घेताना श्री. भालेराव यांनी संस्थेच्या विविध शाखांमधील खेळाडूंनी केलेल्या नेत्रदिपक कामगिरीची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे मा. श्री. विनोद सहाय आपल्या भाषणात म्हणाले की, एकेकाळी समृद्ध असलेला आपला देश परकीय आक्रमणांमुळे काही शतके गुलामगिरीत होता. आता २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दीष्ट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसोमर ठेवले आहे. त्यासाठी देशातील सर्व नागरिकांची भूमिका आणि योगदान महत्वाचे आहे. १४० कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेला देश विकसित होणे याचाच अर्थ जगाचा विकास होणे आहे. ही केवळ देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी नाही. आपण प्रत्येकाने त्याचे नेतृत्व केले पाहिजे कारण सामान्य माणसांच्या प्रयत्नानेच देश मोठा होते. त्यासाठी जीवनात प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. राष्ट्र सर्वप्रथम, त्यानंतर संघटना आणि त्यानंतर व्यक्ती हा प्राधान्यक्रम निश्चित केला तर विकसित भारताचे ध्येय साध्य होईल.

दैनंदिन जीवनात शुद्ध आचरण, नीतिमत्ता, नैतिक मूल्ये आणि कायद्याचे पालन यांच्याशी तडजोड न करण्याचा सल्ला मा. सहाय यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या तत्वांचे पालन हेच मोठे देशकार्य असून प्रत्येकाने आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची कास धरली तर विकसित भारताचा संकल्प २०४७ सालापूर्वीच साध्य होईल असे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. प्रदीप नाईक म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी तरुणांना युद्धाचे शिक्षण दिले तर योद्धा संन्यासी अशी ओळख असलेल्या स्वामी विवेकानंद यांनी स्वत्वाची ओळख व्हावी यासाठी व्यक्तिमत्वातील दोष दूर करण्यासाठी अंतर्गत संघर्षाची प्रेरणा दिली. प्रत्येकाने या दोघांची शिकवण आत्मसात केली पाहिजे.

या वेळी प्रशालेच्या आवारात छात्रांनी तयार केलेल्या भारतीय नौसेनेच्या ताफ्यातील आयएनएस विक्रांत, आयएनएस इम्फाळ, आयएनएस शिवालिक या युद्धनौकात तसेच तेजस हे लढाऊ विमान, अग्नी क्षेपणास्त्र यांच्या प्रतिकृती (मॉडेल) प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. त्यांची सखोल तांत्रिक माहिती या छात्रांनी प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांना दिली.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी गायलेल्या संपूर्ण वंदेमातरम गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योति खिरीड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले.

 

एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगचा शपथग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या ए. एन. एम. जी. एन. एम. आणि बी.एससी. (नर्सिंग) च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण समारंभ सोमवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर व ज्येष्ठ उद्योगपती मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे होते.

प्राचार्य मिलिंद काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना केलेल्या दीपहस्तांतरणाने शपथग्रहण समारंभ पार पडला. प्राचार्य काळे यांनी या वेळी वार्षिक अहवालाचे वाचन केले.

मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे यांनी आपल्या भाषणात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची शिस्त, एकाग्रता, नीटनेटकेपणा, संयम, निष्ठा याविषयी कौतुक केले. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा शपथग्रहण समारंभ पाहून आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचे  सांगितले. ते म्हणाले, “माझी आई ससून रुग्णालयामध्ये नर्स होती आणि वडील डॉक्टर असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राशी माझा लहानपणापासून संबंध आला, आई-वडिलांचे काम लहानपणापासून बघायला मिळाल्याने या क्षेत्राशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बहिणीच्या ट्रान्सप्लांट सर्जरीच्या दरम्यान तिच्याबरोबर परदेशात असताना नर्सेसचे काम किती महत्त्वाचे असते हे मी अगदी जवळून बघितले. त्यामुळे नर्सिंग हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या सूचनेवरून मी केवळ चार पत्रे असलेल्या नंदुरबार येथील शाळेचे भव्य शाळेमध्ये रूपांतर केले आहे. एम. ई. एस. आय. एच. एस. मध्ये सर्वकाही उपलब्ध आहे आणि मला ते फक्त वाढवायचे आहे, हे काम करायला मला आवडेल.” शपथग्रहणाच्या दिमाखदार सोहळ्याने प्रभावित होऊन मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे यांनी नर्सिंगच्या विद्यार्थिनींसाठी आपल्या आईच्या नावे दरवर्षी दहा लाख रुपये शिष्यवृत्ती म्हणून देण्याचे जाहीर केले आणि आगामी दीड वर्षामध्ये या ठिकाणी एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगची नवीन इमारत दिमाखात उभी राहील याची शाश्वती सर्व पालकांना दिली.

मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या या प्रकल्पाची पार्श्वभूमी, प्रारंभ आणि पुढील वाटचाल याची माहिती दिली. हा सर्व प्रकल्प ज्यांच्या सहकार्याने व सोबतीने पूर्ण झाला त्या कै. अण्णा सावंत, राजूभाई रेडीज अशा अन्य मान्यवरांचे स्मरण केले. कै. अण्णा सावंत यांनी आपले राहते घर रुग्णालयासाठी पहिली तीन वर्षे दिले व स्वतः भाड्याच्या घरात राहत होते याचा उल्लेख आवर्जून केला. विद्यार्थ्यांना शपथग्रहणाचा अर्थ समजावून सांगितला. तसेच “या ज्योतीने सरे आपदा …”  या प्रार्थनेतील ओळींचा अर्थ सांगत रुग्णांच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठी तयार राहण्याचा संदेश दिला आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय समारोपात मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांनी नर्सिंगच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंगची निवड केल्याबद्दल त्यांच्या पालकांचे आभार मानले. कॉलेजची वैशिष्ट्ये विशद करत पुढील दोन वर्षात तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल अशा इमारतीमध्ये तुमची मुले शिकत असतील असे सांगितले.

समारंभाच्या प्रारंभी सौ. मेघना गोखले यांनी मा. श्री. अनिरुद्ध देशपांडे व मा. श्री. रवींद्र वंजारवाडकर यांचा परिचय करून दिला.

प्रोफेसर शिवप्रसाद हाळेमनी यांनी आभारप्रदर्शन केले.

पसायदानाने समारंभाची सांगता झाली.

‘मएसो’ आणि ‘लोकमान्य मल्टिपर्पज’ यांच्यात कौशल्य प्रशिक्षणविषयक सामंज्यस्य करार

 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्यादरम्यान कौशल्यविषयक प्रशिक्षणासाठी सामंज्यस्य करार करण्यात आला. त्या नुसार उद्योजकता विकास, महिला सक्षमीकरण, जर्मन भाषा, मोडी लिपी, मुद्रित शोधन इत्यादी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत या अभ्यासक्रमाचे वर्ग आयोजित करण्यात येणार असून त्यात प्रत्यक्ष कार्यानुभवावर भर देण्यात येणार आहे. हे अभ्यासक्रम १८ ते ८० पर्यंतच्या वयोगटासाठी उपलब्ध राहणार आहेत.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या करारावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सीए राहुल मिरासदार, म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, प्रा. डॉ. तनुजा देवी, लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑप. सोसायटी लि.चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, प्रा. डॉ. गणेश राऊत आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि करिअरविषयक संधीचा लाभ घेण्यासाठी ते सक्षम व्हावेत या साठी विविध कोर्सेस, कार्यशाळा, लाईफ स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रम, सॉफ्ट स्कील प्रशिक्षणाचा पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, स्टॉक मार्केटविषयक प्रशिक्षण आणि अन्य कौशल्यविकसन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात बोलताना डॉ. सौ. लीना देशपांडे. छायाचित्रात (डावीकडून) डॉ. अतुल कुलकर्णी, बाबासाहेब शिंदे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), प्रदीप नाईक आणि सौ. आनंदी पाटील

“माणसाची उंची वाढली तरच व्यावसायिक यश मिळते”

पुणे, दि. २४ : “जीवनात ज्ञान आणि कौशल्य पुरेसे ठरत नाही तर आपली मनोवृत्ती काय आहे यावर यश अवलंबून असते. ज्ञान, कौशल्य, मनोवृत्ती, मूल्ये आणि एक माणूस म्हणून परिस्थितीची जाणीव असणे आवश्यक असते. या गुणांचा संगम व्यक्तिमत्त्वात असतो तेव्हाच मोठेपण मिळते. रोजच्या जगण्यात आपण विशिष्ट मते घेऊन वावरत असतो. मात्र, त्याकडे जागरुकपणे लक्ष देण्याची गरज असते. दुसऱ्या व्यक्तीच्या भावना जाणून घेतल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात. माणसाची उंची वाढली तरच व्यावसायिक यश मिळते,” अशा शद्बात भारत फोर्ज लिमिटेडच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या सहयोगी उपाध्यक्ष आणि सीएसआर विभाग प्रमुख डॉ. सौ. लीना देशपांडे यांनी आज पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य देखील या समारंभाला उपस्थित होते.

कोथरूडमधील मयूर कॉलनीत असलेल्या म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये आज (सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५) हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत डॉ. अतुल कुलकर्णी, बाबासाहेब शिंदे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), डॉ. सौ. लीना देशपांडे प्रदीप नाईक, सौ. आनंदी पाटील आणि संस्थेचे पदाधिकारी व अन्य मान्यवर

डॉ. देशपांडे पुढे म्हणाल्या, “ सातत्य, नम्रता, कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मक विचार, अपयश पचवण्याची तयारी आणि निग्रह यातच यशाचे गमक आहे. परिस्थितीनुसार बदल करणे हे आवश्यकच असते पण त्याचबरोबर भविष्यातील संधी आणि आव्हाने यांचा वेध घेणे अतिशय महत्वाचे असते. विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिल लर्निंग यासारखे नवीन तंत्रज्ञान देखील आत्मसात केले पाहिजे. संवादकौशल्य हा कळीचा विषय आहे. आपल्याकडे असलेल्या क्षमता आणि कौशल्य ठामपणे मांडण्याचे सध्याचे दिवस आहेत, त्यादृष्टीने आवश्यक असलेली संवाद कौशल्ये प्रत्येकाने शिकली पाहिजेत.”

समारंभाच्या प्रारंभी डॉ. लीना देशपांडे यांचे स्वागत आणि परिचय सौ. आनंदी पाटील यांनी करून दिला. डॉ. लीना देशपांडे यांना नवी दिल्लीत दि. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या १६ व्या इंडिया सीएसआर समिटमध्ये इंडिया सीएसआर पर्सन ऑफ द इयर २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्ल त्यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते डॉ. देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.

समारंभाचे प्रास्ताविक करताना बाबासाहेब शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने कायमच विद्यार्थ्यांना काळानुरुप शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. संशोधन आणि कौशल्य विकासाला संस्था आवर्जून प्राधान्य देत आहे. मूल्याधिष्ठित आणि परवडणारे शिक्षण देण्याचा वारसा जपत संस्थेची वाटचाल सुरू आहे. समाजातील सर्व  घटकांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, हितचिंतक आणि समाजहितैषी व्यक्तींच्या पाठबळावर हे शक्य होत आले आहे.

आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, देश पारतंत्र्यात असताना लॉर्ड मेकॉले याच्या शिक्षणविषयक धोरणांच्या विरोधात जात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याचे प्रयत्न केले. संस्थेच्या परंपरेने जपलेली संस्कृती आणि संस्कार विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतात, जीवनात निश्चितपणे ते उपयोगी पडतील. जीवनात कितीही यश मिळाले तरी पाय जमीनीवर घट्ट राहतील याकडे लक्ष द्यावे लागते.

गौरवप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने संस्थेच्या विविध शाखांमधील पाच विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.

मानसी ऊस्तूरीकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन तर डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांची पुण्याई आणि गेल्या १६५ वर्षांची तपश्चर्या यांच्या बळावर संस्थेला आपल्या कार्यात यश मिळत आले आहे आणि नांवलौकिक प्राप्त झाला आहे. शिक्षण क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत, मोठ्या प्रमाणावर परदेशी विद्यापीठांची कॅम्पस सुरू होत आहेत. ‘मएसो’समोर निर्माण होणाऱ्या अशा आव्हानांबरोबरच अल्प मुदतीचे अभ्यासक्रम, कौशल्यविकास, विकासामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक गरजा अशा विविध स्वरुपाच्या संधी उपलब्ध आहेत,” अशा शब्दात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी संस्थेच्या भावी वाटचालीविषयी भूमिका मांडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६५ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मा. उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य, संस्थेचे माजी प्रबंधक श्री. अनिल जोशी, निवृत्त उप-प्रबंधक श्री. अजित बागाईतकर, संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी आणि संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सहकारी श्री. सुधीर दाते यांनी शद्बबद्ध केलेल्या ‘मएसो’च्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या भावे प्राथमिक शाळा, रेणुका स्वरुप प्रशाला आणि सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला या तीन शाळांमधील निवडक विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी मुखोद्गत केलेल्या श्रीमद्भगवद्गीतेमधील १५ व्या अध्यायाचे सामुहिक पठन केले. नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ. दिलीप शेठ यांनी या अध्यायाचे विवेचन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले. काळानुरुप वाटचाल करत असताना संस्था आपल्या संस्कृतीला अनुसरून विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. भौतिक साधनांमध्ये वाढ होत असताना संस्थेच्या नवीन अभ्यासक्रमांना मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मा. श्री. बाबासाहेब शिंदे म्हणाले, “संस्थेचा समृद्ध वारसा पुढे घेऊन जात असताना सद्यःस्थितीतील आव्हाने आणि संधी यांचा मागोवा घेण्याची गरज आहे. संस्थेची स्थापना झाल्यापासून गेल्या १६५ वर्षांमध्ये झालेला पुणे शहराचा विस्तार आणि संस्थेचा विस्तार याचा विचार करता संस्थेच्या कार्याचा अजूनही विस्तार होण्याची गरज आहे. परदेशी विद्यापीठांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन हा विस्तार केला पाहिजे. संस्थेच्या प्रयत्नांना समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे इंजिनिअरिंग आणि विधी महाविद्यालयात झालेल्या शंभर टक्के प्रवेशांवरून दिसून आले आहे. इंजिनिअरिंग कॉलेजप्रमाणेच लोटे – घाणेखुंट येथील परशुराम हॉस्पिटलसाठी देणगीदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी तीन कोटी रुपयांचा निधी उभा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या वैचारिक बांधिलकीमुळे समाजातील विविध घटकांना संस्थेशी निगडीत होण्याची इच्छा आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात आणि शासकीय पातळीवर आज अतिशय सकारात्मक वातावरण आहे. या संधीचा फायदा आपण करून घेतला पाहिजे. त्यामुळेच संस्थेतील प्रत्येक घटकाने संस्थेच्या विस्तारासाठी प्रयत्न करावा. संस्थेला १७५ व्या वर्षी एक वेगळी उंची प्राप्त झालेली दिसेल.”

मा. श्री. प्रदीप नाईक आपल्या भाषणात म्हणाले की, संस्थेच्या वाटचालीत गेले एक वर्ष अनेक वैशिष्ट्यांनी भरलेले आहे. इंजिनिअरिंग आणि विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून खूप मोठे यश संस्थेला मिळाले आहे. देशहिताच्या दृष्टीने महत्वाच्या अनेक क्षेत्रांमध्ये काम करणे अद्याप बाकी आहे. क्रीडा आणि कृषी या क्षेत्रांचा त्यादृष्टीने विचार केला पाहिजे. शेतीचे घटणारे प्रमाण रोखण्यासाठी विविध स्पर्धा, उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करता येऊ शकते.

या कार्यक्रमात पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त भागातील आपत्ती निवारणासाठी संस्थेच्या विविध शाखांमधील कर्मचाऱ्यांनी जमा केलेला ५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मा. भूषण गोखले यांच्या हस्ते सेवा भारती या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे आपत्ती निवारण प्रमुख श्री. सदानंद कुलकर्णी यांच्याकडे सुपुर्द केला. श्री. कुलकर्णी यांनी सेवा भारतीतर्फे सुरू असलेले आपत्ती निवारण कार्य आणि निधीचा विनियोग याविषयी माहिती दिली.

संस्थेच्या मुख्य कार्यालयातील निवृत्त कर्मचारी श्री. वामन शेंडे दरवर्षी संस्थेच्या वर्धापनदिनी कृतज्ञतेच्या भावनेने संस्थेला निधी देतात. त्यांनी दिलेल्या निधीचा धनादेश मा. बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते संस्थेचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. तसेच संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य डॉ. निर्भय पिंपळे, डॉ. नेहा देशपांडे आणि सौ. प्रणिती जोगळेकर यांनी देखील आपला निधी मा. गोखले सरांकडे सुपुर्द केला.

कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्री. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.

पुणे, दि. १३ : “इंजिनीयर होणे म्हणजे केवळ चांगली मशिन्स बनवणे नाही तर चांगले भविष्य घडवणे आहे,  परमेश्वराने प्रत्येकाला जग बदलण्याची क्षमता दिली आहे, तुम्ही जे शिकाल त्याचा उपयोग कसा करायचा हे तुमच्या हातात आहे. आपले करियर घडवत असताना हे लक्षात ठेवा की किंमतीपेक्षा मूल्यांचे महत्व खूप अधिक आहे. प्रामाणिकपणा, सहानुभूती, विनयशीलता आणि चिकाटी या गुणांना कोणतेही सॉफ्टवेअर पर्याय ठरू शकत नाही, मशिनवर ते तयार करता येत नाहीत. बोर्डरूम आणि शॉपफ्लोअर दोन्ही ठिकाणी तुमच्या अधिकारांपेक्षा तुमची पात्रता किती तरी अधिक महत्वाची ठरते. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचा केवळ कौशल्यांचा विकास होणार नाही तर जीवनाच्या उद्देशाला दिशा मिळणार आहे. इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी शिकत असतानाच सामाजिक प्रकल्प, इंटर्नशीप, ओपनसोर्स कम्युनिटीज, उद्योजकता, विक्री आणि आंतरशाखीय संशोधन यामध्ये सहभागी झाले पाहिजे. कारण तिथेच खरे शिक्षण सुरू होते.,” अशा शद्बात किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी इंजिनियरीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने स्थापन केलेल्या ‘मएसो मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’चे उद्घाटन किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांच्या हस्ते आज (सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘मएसो मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष मा. श्री. संजय किर्लोस्कर. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित (छायाचित्रात डावीकडून) कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद जाधव, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त मा. श्री. पुरुषोत्तम लोहिया, ‘मएसो’चे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर भोसले.

या वेळी व्यासपीठावर ‘मएसो’चे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद जाधव, आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर भोसले उपस्थित होते. कोथरुडमधील मयूर कॉलनीतील एमईएस ऑडिटोरीअममध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला राजकुमार चोरडिया, देवीचंद चोरडिया, मदन जैन, शरद सारडा, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

“तंत्रज्ञान, शाश्वतता आणि सर्वसमावेशी विकासाच्या आघाडीवर आपला देश जगाचे नेतृत्व करू शकतो. देशातील केवळ अतिश्रीमंतासाठी नाही तर सर्व भारतीयांसाठी नवीन संशोधन करणारे इंजिनियर असतील तरच ते शक्य होईल. त्यामुळे भारताला इंजिनियरची गरज आहे. त्यांनी शेतकरी, छोटे व्यवसाय, दूरवर राहणारे लोकसमूह आणि पर्यावरण याच्याशी संबंधीत समस्यांवर उपाय शोधण्याची गरज आहे. कारण त्यासाठीच काम करण्याची खरी गरज आहे,” असेही किर्लोस्कर यांनी या वेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाबासाहेब शिंदे यांनी इंजिनियरिंग कॉलेज सुरू करण्यामागील भूमिका विशद केली. ते म्हणाले, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी शिक्षणाकडे व्यापारी दृष्टीने न बघता विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देते. त्यासाठी संस्थेचे हितचिंतक, समाजातील सज्जनशक्ती कायमच संस्थेच्या पाठीशी उभी राहते. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम लोहिया यांनी या कॉलेजचे दीड लाख स्क्वेअर फूट बांधकाम करून देण्याची जबाबदारी स्वीकारली. संस्थेच्या वाटचालीतील ही सर्वात मोठी देणगी आहे. आपल्या देशात चांगेल मनुष्यबळ तयार होते पण ते परदेशात स्थायिक होत असल्याने देशाला त्याचा उपयोग होत नाही. ‘मएसो’च्या इंजिनियरिंग कॉलेजमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाचा अभिमान निर्माण व्हावा आणि देशाच्या विकासात योगदान देणारे उद्यमी निर्माण व्हावेत आणि विकसनशील भारताला विकसित भारत बनवणारे मनुष्यबळ निर्माण व्हावे हा आमचा उद्देश आहे.”

पुरुषोत्तम लोहिया आपल्या भाषणात म्हणाले की, शिक्षण माणसाला केवळ रोजगार मिळवून देत नाही तर चांगले व विवेकी विचार, संस्कार, नितिमूल्य, कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी यांची जाणीव निर्माण करते. लोहिया कुटुंबियांच्या सहकार्याने सुरू झालेले हे महाविद्यालय माझ्या वडिलांच्या नावाने ओळखले जाणार आहे, याचा मला आनंद आहे. ‘मएसो’ च्या शिक्षण क्षेत्रातील इतिहासामुळे संस्थेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळेच या नवीन महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाचे सर्व प्रवेश पूर्ण क्षमतेने भरले आहेत. हे महाविद्यालय केवळ अभियंता घडवणार नाही तर जबाबदार नागरिक, नवनिर्मिती करणारे कृतीशील विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे तरुण तयार करेल.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन तर श्रीमती अमिता सोळंके यांनी सूत्रसंचालन केले.

 

‘मएसो मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना किर्लोस्कर ब्रदर्स लि. आणि एम.सी.सी.आय.ए. चे अध्यक्ष मा. श्री. संजय किर्लोस्कर. या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित (छायाचित्रात डावीकडून) कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. मकरंद जाधव, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), श्री मुकुंद भवन ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त मा. श्री. पुरुषोत्तम लोहिया, ‘मएसो’चे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर भोसले.

 

 

 

“आजचे पालक खूप जागरुक आहेत, जीवापाड मेहनत करून आपल्या मुलांना शिक्षणाच्या संधी आणि साधन-सुविधा उपलब्ध करून देत आहेत, त्यामुळेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूर्ण वेळ देता येतो आहे. आपल्याला मिळणाऱ्या या वेळेचा सदुपयोग करा आणि शिस्त, कठोर परिश्रम, समर्पित भावना व सातत्याने प्रयत्न करून जीवनात यशस्वी व्हा, असा सल्ला पुणे रेल्वे विभागातील पोलीस अधीक्षक मा. सौ. अश्विनी देवधर – सानप यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज (मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५) मयूर कॉलनीतील म. ए. सो. ऑडिटोरियममध्ये दुपारी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. सौ. सानप बोलत होत्या.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक यांच्या विशेष उपस्थितीत हा समारंभ झाला. मएसोच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे,  नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, मएसोचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेच्या नियामक मंडळ आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य देखील या समारंभाला उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ६६ गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षेतील २८ यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

या वेळी सौ. सानप पुढे म्हणाल्या, “शिक्षणाप्रमाणे अन्यत्र यश मिळवण्यासाठी आपले विचार मांडण्यासाठी, तो पटवून देण्यासाठी संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास असणे तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी चौफेर वाचन आणि अद्ययावत माहिती असणे आवश्यक असते. आजकाल अनेकजण अतिशय आक्रमकपणे व्यक्त होतात, अशा परिस्थितीत आपण आपल्या संयमाची पातळी वाढवण्याची आज गरज आहे. पालकांनी मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली पाहिजे. त्यांना सोयी-सुविधा पुरवितानाच ती स्वावलंबी देखील होतील याकडे लक्ष दिले पाहिजे तसेच अपयश आणि पराजय यांचा सामना करण्याची क्षमता त्यांच्या निर्माण होईल याची काळजी घेतली पाहिजे.”

समारंभाच्या प्रारंभी मा. सौ. आनंदीताई पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, “जीवनात उत्तुंग यश प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांची फार मोठी परंपरा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला लाभली आहे. नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसमोर त्यांचा आदर्श ठेवावा हा या  समारंभाच्या आयोजनामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा आनंद घेत शिकता येईल असा अभ्यासक्रम निवडावा. शिक्षणात आणि व्यावसायिक जीवनात यश मिळवत असताना आपल्या महान संस्कृतीची ओळख करून घ्यावी. त्यामुळे आपल्या देशाबद्दल आदर, आत्मीयता आणि समर्पणाचा भाव जागृत होईल. संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या हातून समाजाची सेवा घडेल तो संस्थेसाठी आनंदाचा दिवस असेल.”

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. प्रदीप नाईक  म्हणाले की, आपल्या संस्थेत गुणवंत विद्यार्थी घडावेत, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने जीवनात यश मिळवावे अशी प्रत्येक शिक्षण संस्थेची इच्छा असते. त्यासाठी मोठ्या संख्येने नवीन शिक्षक निर्माण व्हावे लागतात. शिक्षक होणे म्हणजे घडवण्याचे सामर्थ्य असणे आणि या सृजनातूनच देशाची आणि समाजाची प्रगती होते. नव्या पिढीतील विद्यार्थ्यांमध्ये तशी गुणवत्ता आहे.

संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतील शिक्षिका सौ. उमा गोंधळेकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.

 

 

“कायद्याच्या शिक्षणातील चांगल्या बदलांमुळे अनेक संधी उपलब्ध”
पुणे, दि. १६ : “कायद्याचे शिक्षण अतिशय महत्वाचे असून त्यात अनेक चांगले बदल झाले आहेत. तीन वर्षांच्या शिक्षणानंतर अगदी तरूण वयातच न्यायव्यवस्थेत प्रवेश करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आर्बिट्रेशन, कायद्याच्या क्षेत्रातील मोठ्या व्यावसायिक संस्था यामुळे नवीन वकीलांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध झाल्या आहेत. तालुका आणि जिल्हा न्यायालयातील वकिली ही खरी वकिली असून वकिलांना तिथे फार मोठा वाव आहे,” असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्ती मा. न्या. अभय एस. ओक यांनी आज (शनिवार, दि. १६ ऑगस्ट २०२५) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘एमईएस लॉ कॉलेज’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, या वेळी “कायदा क्षेत्रातील व्यावसायिक भवितव्य आणि नव-अधिवक्त्यांची भूमिका” या विषयावर न्या. ओक बोलत होते. कोथरूडमधील म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी म.ए.सो. चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता मा. अॅड. चिन्मय खळदकर यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लॉ स्कूलच्या संचालक आणि विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक आणि म. ए. सो. च्या नियामक मंडळचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांची या वेळी विशेष उपस्थिती होती.
एमईएस लॉ कॉलेजच्या महाविद्यालय सल्लागार समितीचे अध्यक्ष व म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे सदस्य अॅड. सागर नेवसे, एमईएस लॉ कॉलेजचे महामात्र व म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी आणि म.ए.सो. चे सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
“भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिले आहेत, त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्येदेखील सांगितली आहेत. प्रत्येक नागरिकाने या कर्तव्यांचे पालन करणे, घटनात्मक संस्थांचा आदर करणे आणि राष्ट्रीय आदर्शंचा सन्मान करणे आवश्यक आहे. परंतू कायदा आणि या मूलभूत कर्तव्यांविषयी असलेल्या अज्ञानातून अनेक घटना घडत असतात. त्यामुळे कायद्याचे शिक्षण अतिशय महत्वाचे आहे. वकिली व्यवसायात लहान-मोठे असे काही नसते. तालुका व जिल्हा न्यायालयांमध्ये पक्षकाराचे भवितव्य कायमचे घडते किंवा बिघडते, त्यामुळे या न्यायालयांमधील वकिली अतिशय महत्वाची आहे,” असेही न्या. ओक या वेळी म्हणाले.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड म्हणाले, “सातत्याने केलेले कष्ट आणि चिकाटी यामुळेच वकिलीच्या क्षेत्रात यश नक्कीच मिळते. तंत्रज्ञानामुळे वकिलीचे स्वरुप आता पूर्णपणे बदलले आहे. सायबर लॉ, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सातत्याने होणाऱ्या बदलांशी जुळवून घेणे विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे.”
मा. अॅड. चिन्मय खळदकर यांनी आपल्या व्याख्यानात आर्थिक आणि सामाजिक गुंतागुंत वाढल्यामुळे न्यायालयासमोर निर्माण झालेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. भविष्यातील विविध आव्हाने, आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे निर्माण होणारी गुंतागुंत, अडथळे यामुळे होणाऱ्या बदलांमुळे वकिलांसाठी मोठ्या प्रमाणावर व्यवसायिक संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. सर्वच स्तरावर आणि विशेषतः करविषयक कायद्यांच्या क्षेत्रात चांगल्या वकीलांची फार मोठी गरज असल्याचे ते म्हणाले. भाषेवर प्रभुत्व, कल्पनाशक्तीचा आणि ऐकून घेण्याची कला यांचा विकास हाच वकिलीच्या क्षेत्रातील यश आणि समाधानाचा पाया आहे असल्याचे सांगितले.
मा. बाबासाहेब शिंदे म्हणाले की, म.ए.सो.ने कायमच मूलभूत शिक्षणाबरोबरच समाजाची गरज ओळखून व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. त्या परंपरेनुसार संस्थेने आता विधी आणि अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहे. या दोन्ही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश होत असून भविष्यात ही महाविद्यालये शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवतील.
म.ए.सो. चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, वकिलीच्या क्षेत्रात ज्ञान आणि आत्मविश्वास अतिशय आवश्यक असून प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात कायद्याविषयी सज्ञानता असणे महत्वाचे आहे असे सांगितले.
मा. अॅड. सागर नेवसे यांनी आपल्या प्रास्ताविकात एमईएस लॉ कॉलेजमध्ये क्रमिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये अनुभवावर आधारित व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
म.ए.सो. चे सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.
समारंभाचे सूत्रसंचालन एमईएस लॉ कॉलेजच्या प्रा. शिवानी मुजुमदार यांनी केले.

कै. सौ. विमलाबाई गरवारे यांना  ११४ व्या जयंतीनिमित्त आज (सोमवार, दि. १४ जुलै २०२५) गरवारे ट्रस्टचे संचालक व म .ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री. सुनील सुतवणे यांच्या हस्ते म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी म. ए. सो. च्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. निर्भय पिंपळे, प्रशालेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, उपमुख्याध्यापिका सौ. श्रद्धा खिरीड, पर्यवेक्षिका सौ. जयश्री शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथेप्रमाणे म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील कै. आबासाहेब गरवारे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास देखील पुष्पाहार वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी मा. श्री. सुनील सुतवणे, म. ए. सो. चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव सुधीर भोसले, म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा, आणि म. ए. सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते.

 

कृतज्ञता आणि दातृत्वाचा अद्वितीय आदर्श

       एक निवृत्त शिक्षिका आपल्या आयुष्यभराच्या कमाईतील मोठा भाग आपली कारकीर्द घडलेल्या संस्थेला देण्याची घटना खरोखरच दुर्मिळ आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थिनी, माजी शिक्षिका आणि संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाच्या माजी सदस्या सौ. माणिक फुलंब्रीकर यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या प्रॉव्हिडंट फंडामध्ये जमा झालेला तब्बल १ कोटी रुपयांचा निधी आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला दिला. त्यांची ही कृती दातृत्वाचा अद्वितीय आदर्शच आहे.

            मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या ए.व्ही. हॉलमध्ये आज (गुरुवार, दि. १० जुलै २०२५) झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात सौ. फुलंब्रीकर यांनी हा निधी मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि खासदार सौ. मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

            या वेळी व्यासपीठावर श्री. विलास फुलंब्रीकर, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, मएसोचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव सुधीर भोसले उपस्थित होते.

            “एक विद्यार्थिनी आणि शिक्षिका म्हणून १९७३ ते २०१५ असा प्रदीर्घ काळ संस्थेशी माझा संबंध आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात माझे व्यक्तिमत्व फुलले, संस्थेने मला ओळख दिली. त्यामुळे संस्थेबद्दल वाटणारे प्रेम मनाच्या तळातून आलेले आहे. आज मी देत असलेल्या निधीपेक्षा संस्थेने मला किती तरी पटीने अधिक दिले आहे,” अशा शद्बात सौ. माणिक फुलंब्रीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

            या वेळी बोलताना खासदार सौ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “ कृतज्ञतेसारखा दुसरा कोणता अलंकार नाही, कारण ती माणसाला सर्वात सुंदर बनवते असे ज्येष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी म्हटले आहे.  फुलंब्रीकर मॅडम माझ्या शिक्षिका आहेत. त्यांनी दिलेल्या निधीचा आकडा ऐकून कोणीही आश्चर्यचकित होईल. एका निवृत शिक्षिकेला इतका निधी देण्याची इच्छा का झाली असेल, त्यांच्या मनाची श्रीमंती किती असेल आणि त्यांच्या मनातील कृतज्ञतेचा भाव किती उच्च स्तराचा असेल असे विचार मनात येतात. फुलंब्रीकर मॅडम या आमच्या प्रेरणास्थान आहेत आणि राहतील. मी देखील माझ्या खासदार निधीतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसाठी आवश्यक निधी देईन.”

            आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब शिंदे म्हणाले, “एका मध्यमवर्गीय व्यक्तीने, निवृत्त शिक्षिकेने आपल्या स्वकमाईचा इतका मोठा भाग देणगी म्हणून देण्याचा हा प्रसंग दुर्मिळ आहे. अशाच शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या आधारे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वटवृक्ष उभा आहे.  सौ. फुलंब्रीकर यांचा संस्थेशी प्रदीर्घ ऋणानुबंध आहे, त्यांनी घालून दिलेले उदाहरण कायमस्वरुपी लोकांच्या चर्चेत राहील आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकजण त्यांचे अनुकरणदेखील करतील याची मला खात्री आहे. त्यांच्या इच्छेनुसार या निधीतून महाविद्यालयातील प्रयोगशाळांचे नूतनीकरण करण्यात येणार येईल. सौ. फुलंब्रीकर यांची कोणतीही अपेक्षा नसली तरी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्रयोगशाळेला त्यांचे नांव देण्यात येईल.”

            मएसोचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

            डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी आभारप्रदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्याचे क्रीडा राज्यमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे यांचा काल (गुरुवार, दि. २९ मे २०२५) सत्कार करण्यात आला. संस्थेचे सहाय्यक सचिव मा. श्री. सुधीर भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सचिन आंबर्डेकर यांनी मंत्रीमहोदयांना संस्थेचे बोधचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

म.ए.सो. भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात क्रीडा भारतीच्या पुणे महानगरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिजामाता सन्मान पुरस्कार आणि क्रीडा भारती जीवन गौरव पुरस्कार प्रदान समारोहाचे औचित्य साधून हा सत्कार करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडू मा. श्री. उमेश झिरपे, अखिल भारतीय क्रीडा भारतीचे महामंत्री मा. श्री. राज चौधरी, क्रीडा भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष मा. श्री. विजय पुरंदरे, क्रीडा भारतीच्या पुणे महानगराचे अध्यक्ष मा. प्रा. शैलेश आपटे, मंत्री मा. श्री. विजय रजपूत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

म. ए. सो. मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या नवीन इमारतीचे मा. श्री. आदित्य लोहिया यांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म. ए. सो. मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या नवीन शाखेच्या इमारतीचे भूमिपूजन श्री मुकुंद भवन ट्रस्टचे विश्वस्त मा. श्री. आदित्य लोहिया आणि त्यांची पत्नी सौ. खुशबू यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. १७ मे २०२५) दुपारी २:३० वाजता अतिशय आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात करण्यात आले. कर्वे रस्त्यावरील म. ए. सो. गरवारे महाविद्यालयाच्या आवारात ही नवी इमारत बांधण्यात येणार आहे.

याप्रसंगी मा. श्री. पुरुषोत्तम लोहिया, म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, लोहिया परिवारातील सदस्य, म. ए. सो. चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या वेळी मा. श्री. बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते मा. श्री. आदित्य लोहिया व मा. श्री. पुरुषोत्तम लोहिया यांचा तर मा. सौ. आनंदीताई पाटील यांच्या हस्ते लोहिया परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचा इ. १० वी चा निकाल ९१.१०% टक्के लागला असून संस्थेच्या १५ शाखांपैकी ८ शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

इ. १० वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक समूहाचे व संबंधित प्राचार्य / मुख्याध्यापकांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन!💐💐💐

इ. १२ वी च्या परीक्षेत मएसो चे ९५.८६% टक्के विद्यार्थी यशस्वी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचा इ. १२ वी चा निकाल ९५.८६% लागला असून संस्थेच्या १२ शाखांपैकी ५ शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
इ. १२ वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक समूहाचे व संबंधित प्राचार्य / मुख्याध्यापकांचे संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन!💐💐💐

म.ए.सो.चे तीन विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी रोहन राजेंद्र पिंगळे आणि कपिल लक्ष्मण नलवडे यांनी  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तर एमईएस प्री-आएएस कॉम्पिटेटीव्ह एक्झाम ट्रेनिंग सेंटरचा विद्यार्थी रोहित विष्णू गायकवाड याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या हस्ते आज त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव व डॉ. दिलीप शेठ, म. ए. सो. चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी व सहाय्यक सचिव सुधीर भोसले, म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, म. ए. सो. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रोहन पिंगळे हा म. ए. सो. आबासाहेब गरवारे कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र शाखेचा माजी विद्यार्थी असून त्याने ५८१ वा तर म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी असलेल्या कपिल नलवडे याने ६६२ वा क्रमांक मिळवून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२५ च्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या दोघांचीही भारतीय महसूल सेवेत निवड झाली आहे. याचबरोबर दिव्यांग असलेल्या रोहित गायकवाड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत यश मिळवले असून बृहनमुंबई महानगर पालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदावर त्याची निवड झाली आहे.

कपिल नलवडे आणि रोहित गायकवाड यांना एमईएस प्री-आएएस कॉम्पिटेटीव्ह एक्झाम ट्रेनिंग सेंटरमध्ये डॉ. शोभा कारेकर, डॉ. अपर्णा आगाशे, डॉ. विमली बसू आणि प्रा. किशन कुंबरे यांनी मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने शकुंतला खटावकर सन्मानित

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने शुभंकर खवले व प्रियेशा देशमुख गौरवान्वित

माजी राष्ट्रीय महिला कबड्डीपटू, संघटक आणि मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी शकुंतला खटावकर यांना आज २०२३-२४ या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ५ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मल्लखांबपटू आणि म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा माजी विद्यार्थी शुभंकर खवले याचा आजच्या समारंभात २०२३ -२४ या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ३ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

नेमबाज व मएसो रेणुका स्वरूप प्रशालेची माजी विद्यार्थिनी प्रियेशा देशमुख या दिव्यांग खेळाडूला पॅरा-शूटींग या क्रीडा प्रकारात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ३ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मएसो शूटींग रेंजवरील प्रशिक्षणाने प्रियेशा यांचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. तेथेच त्यांना आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांचे मार्गदर्शन लाभले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज (शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२५) झालेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभात मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार्थींना गौरविण्यात आले. या वेळी राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे दत्ता भरणे, मा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शकुंतला खटावकर या ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळवणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला क्रीडापटू आहेत. १९७८ मध्ये केंद्र शासनाच्या अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. १९७९ ते १९८२ या कालावधीत १०६ राष्ट्रीय कबड्डी सामने खेळण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ८ वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत.

प्रियेशा देशमुख यांचा आज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात मएसो क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष व मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव यांच्या हस्ते व अंजली भागवत यांच्या विशेष उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी मएसोचे सहाय्यक सचिव व मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे क्रीडा संचालक व मएसोच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. उमेश बिबवे आणि प्रियेशा यांचे वडील श्री. शरदराव देशमुख उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे सर्व पुरस्कारार्थींचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

 

 

 

बारामुल्लातील महिलांना फॅशन डिझाइनिंगचे प्रशिक्षण 

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे भारतीय लष्कर, असीम फाऊंडेशन आणि महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चिनार युवा केंद्रात चालवण्यात येणारा पहिला ‘फॅशन डिझाइनिंग स्कील कोर्स’ पूर्ण केलेल्या ४० विद्यार्थिनी आणि महिला प्रशिक्षणार्थींना मंगळवार, दि. ८ एप्रिल २०२५ रोजी प्रमाणपत्र देण्यात आली. वर्षभरात दोन वेळा हा कोर्स आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एजुकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, ‘मएसो’च्या नियामक मंडळ सदस्य आणि मएसो आयएमसीसीच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. सौ.  मानसी भाटे आणि मएसो  रेणुका स्वरूप करियर कोर्सेच्या समन्वयक सौ. सारिका वाघ यांच्या हस्ते ही प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.  या वेळी चिनार युवा केंद्राचे मार्गदर्शक मेजर अंकित शर्मा आणि असीम फाऊंडेशनच्या विश्वस्त निरूता किल्लेदार हे देखील उपस्थित होते.

सौ. आनंदीताई पाटील यांनी  प्रशिक्षणार्थिंना मार्गदर्शन केले. तसेच मेजर अंकित शर्मा यांनीही विद्यार्थिनींशी संवाद साधला.

काश्मीर खोऱ्यातील अनेक अडचणींना तोंड देत प्रशिक्षणार्थिंनी हा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. आपल्या भावना व्यक्त करताना, फॅशन डिझाइनिंगच्या प्रशिक्षणामुळे स्वयंरोजगार मिळवणे शक्य होणार असल्याचे काही प्रशिक्षणार्थिंनी सांगितले. तर काही जणींनी या प्रशिक्षणानंतर स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.

चिनार युवा केंद्रात चालवण्यात येणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण, संगीत आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयक प्रशिक्षणासाठी ‘मएसो’च्या सहकार्यासंदर्भात या वेळी विचारविनिमय करण्यात आला.

Scroll to Top
Skip to content