“मूल्य जपत आजच्या काळातील नवीन प्रश्न सोडविणे म्हणजे यश”
“यश म्हणजे मागच्या पिढीची नक्कल करणे नाही तर यश म्हणजे मूल्य जपत आजच्या काळातील नवीन प्रश्न सोडविणे. त्यादृष्टीने नवीन प्रश्न काय आहेत, नव्या समस्या काय आहेत हे ओळखण्यासाठी आवश्यक असलेले कुतुहल आत्मसात केले पाहिजे,” असा सल्ला मा. श्री. इंद्रनील चितळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ काल (बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६) आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. इंद्रनील चितळे (मॅनेजिंग पार्टनर, चितळे बंधू) उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
कोथरुडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये झालेल्या या समारंभात माध्यमिक शालांत परीक्षेतील ६० व उच्च माध्यमिक परीक्षेतील ३० आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी परीक्षेतील १६ यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
चितळे पुढे म्हणाले, “कुतुहलाची भावना विकसित करायची असेल तर त्यासाठी मोकळेपणाने विचार केला पाहिजे. कल्पना, भावना आणि माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी लोकांशी संपर्क आणि संवाद साधण्याचे कौशल्य असले पाहिजे आणि त्यातून निर्माण झालेली विश्वासार्हता कायमस्वरुपी टिकवून ठेवण्याची क्षमता निर्माण करता आली पाहिजे. याशिवाय गुणवत्ता कायम राखण्यासाठी काय केले पाहिजे याच्याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असते. कुतुहल, शिस्त, क्षमता वाढविणे, संवादकौशल्य यातच यशाचे गमक आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. आनंदी पाटील म्हणाल्या की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा आहे. या माजी विद्यार्थ्यांनी केवळ देशभरातच नव्हे तर जगातील अनेक देशात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. आपल्या यशातून त्यांनी आपले पालक, शाळा आणि संस्था यांचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवावी आणि भविष्यात नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे होण्याचा प्रयत्न करावा.
आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी संस्थेच्या संस्थापकांनी दिलेले संस्कार आणि मूल्ये यांच्या आधारे नवे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
सौ. राही भालेराव आणि सौ. माधवी बाबरस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
एक झाड लावू, पर्यावरणाचे रक्षण करू
पर्यावरण रक्षण आणि संवर्धन याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या वर्षी पालखी सोहळा तसेच रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि दिवाळी हे सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराबरोबरच स्वदेशी वस्तूंना देखील प्राधान्य देण्यात यावे अशी अपेक्षा आहे.
संस्थेच्या या उपक्रमाचा प्रारंभ आज (गुरुवार, दि. ९ जुलै २०२६) पालखी सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आला. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी झाडाचे किमान एक रोपटे लावावे आणि त्याची निगा राखावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड या शाळेचे माजी विद्यार्थी आणि मएसोचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते आज शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी बोलताना ते म्हणाले की आपल्या देशात झाडांची संख्या दरडोई २ ते ३ असण्याची गरज आहे पण प्रत्यक्षात दरडोई जेमतेम एक झाड आहे. महानगरांमध्ये झाडांपेक्षा इमारतींची संख्या कितीतरी जास्त आहे. त्यामुळे केवळ सावली कमी झाली आहे असे नाही तर पर्यावरणाकडे पुरेसे लक्ष न दिल्याने दुसऱ्या बाजूला आपल्या अन्नधान्याचे पोषणमूल्य कमी झाले आहे, त्याचा विपरित परिणाम माणसाच्या आरोग्यावर झाला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे. संस्थेचे सर्व माजी विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. सदस्य श्री. विजय भालेराव, शाळेच्या शाला समितीच्या मा. अध्यक्षा सौ. मैत्रेयी देसाई, शाला समितीच्या मा. महामात्रा डॉ.अश्विनी पाटील, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे मा. सदस्य सौ. प्रणिता जोगळेकर आणि डॉ. अजिंक्य देशपांडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका खेडलेकर तसेच शाळेतील शिक्षक, कर्मचारीवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
हरित शाळांची उभारणी, शिक्षकांचे सक्षमीकरण!
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील शिक्षकांसाठी पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनच्या सहकार्याने ‘हरित शालेय परिसर आणि शाश्वत शाळांसाठी साधनसामुग्रीचे प्रभावी व्यवस्थापन’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पुण्यातील मएसो मुलांचे विद्यालयाच्या गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृहात शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी झालेल्या या कार्यशाळेत चार जिल्ह्यातील २८ शाळांमधील १०० शिक्षक सहभागी झाले होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनच्या संचालक सौ. अनुष्का काजबाजे आणि फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश माणेरीकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, व्यवस्थितपणा व शिस्त हे गुण विकसित व्हावेत, त्यांच्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी आणि ते भविष्यात सुजाण व जबाबदार नागरिक व्हावेत या हेतूने संस्थेतर्फे दरवर्षी ‘स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक शाळा’ ही स्पर्धा घेण्यात येते. त्यामध्ये स्वच्छता, आरोग्य, सुरक्षितता, सुशोभीकरण, पर्यावरणपूरकतेसाठीचे प्रयत्न या निकषांच्या आधारे प्रत्येक शाळेचे मूल्यमापन करण्यात येते. शाळेतील अग्निशमन यंत्रणा व त्याची सिद्धता, विद्यार्थी वाहतुकीशी संबंधित खबरदारी व उपाययोजना अशा सुरक्षिततातविषयक मुद्यांचा देखील या वेळी विचार केला जातो.
मागील वर्षी शाळांच्या मूल्यमापनासाठी पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पूर्ण इकोव्हिजन या संस्थेचे सहकार्य घेण्यात आले. या संस्थेने स्पर्धेची गुणवत्ता वाढविण्यासाठी काही निकष नव्याने सुचवले. त्यामुळे ‘स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक शाळा’ ही स्पर्धा अधिक परिमाणकारक व्हावी या साठी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन एक दिवसाची ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत संवादात्मक शिक्षणासोबतच निसर्गावर आधारित उपाययोजना आणि जुन्या किंवा टाकाऊ वस्तूंचा वापर करून उपयुक्त आणि आकर्षक वस्तू तयार करण्याच्या पद्धतींवर आधारित प्रत्यक्ष कृतींचा समावेश होता. कार्यशाळेत झालेल्या मुख्य सत्रांमध्ये डॉ. राजेश माणेरीकर यांनी ‘हरित शाळा लेखापरीक्षण (Green School Audit) : निष्कर्ष व तफावत’ याचे विश्लेषण मांडले. डॉ. मानवी सिंग यांनी ‘पर्यावरण शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश आणि हरित शालेय परिसर विकसित करण्यासाठीच्या विविध कल्पना’ या विषयांचे दोन वेगवेगळ्या सत्रांमध्ये सविस्तर विवेचन केले. सौ. अनुष्का काजबाजे यांनी ‘ओला कचरा, पालापाचोळा आणि सेंद्रिय पदार्थांचे जिवाणूंद्वारे विघटन करून उत्कृष्ट खत तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रिया व वनस्पतींसाठी उत्तम खत असलेल्या पर्यावरणपूरक आणि रसायनमुक्त सेंद्रिय द्रावणाचा वापर (कंपोस्टिंग व बायो-एन्झाइम्स)’ या विषयी माहिती दिली. कु. रोहिणी एस. यांनी टी-शर्टपासून टोट बॅग तयार करण्याची कृती दाखवली. तर ९० दिवसांच्या शालेय कृती आराखड्याची तयारी करण्याबाबत पूर्णम इकोव्हिजनच्या टीमने मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे कृतीकेंद्री समारोप. केवळ प्रमाणपत्र देण्याच्या पद्धतीऐवजी प्रत्येक सहभागी शाळेने स्वतःचा ९० दिवसांचा शालेय कृती आराखडा तयार केला. या आराखड्यामुळे कार्यशाळेतील शिकवण पुढील तीन महिन्यांत संबंधित शाळेच्या परिसरात प्रत्यक्ष अनुभवास येण्याजोग्या पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे त्वरित अनुसरणात येईल. राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२० मध्ये अशाच कृती अपेक्षित आहेत. कार्यशाळेत सहभागी झालेल्या शिक्षकांनी या वेळी आपेल मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेच्या समारोपाचे सत्र झाले. या प्रसंगी नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव आणि अजय पुरोहित, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनच्या संचालक सौ. अनुष्का काजबाजे आणि फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश माणेरीकर उपस्थित होते.
मा. बाबासाहेब शिंदे यांनी या वेळी बोलताना, पर्यावरण रक्षणासाठी आणि हवामान बदलाच्या गंभीर परिणामांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल तसेच आपली शाळा ‘पर्यावरणपूरक व शाश्वत शाळा’ करण्याच्या निश्चयाबद्दल शाळा आणि शिक्षकांचे कौतुक केले.
या कार्यशाळेमुळे पर्यावरण शिक्षण प्रभावी करण्यासाठी आणि शालेय परिसरात शाश्वत, पर्यावरणपूरक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करणारे एक प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले.

Scroll to Top
Skip to content