“यशस्वी आयुष्यासाठी ‘प’चे पंचक महत्वाचे”
म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात ‘अभिव्यक्ती’चे आयोजन
“यशस्वी आयुष्य घडवायचे असेल, तर ‘प’चे पंचक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रेम, पुस्तक, प्रयत्न, पर्यटन आणि पैसे ही ती पंचसूत्री आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘अभिव्यक्ती – २६’ या वार्षिक उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ असा या कार्यक्रमाचा विषय होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, म.ए.सो. चे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विलास उगले, गायिका प्रांजली बर्वे इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते. अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी ‘अभिव्यक्ती’ कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, मूकअभिनय, गायन-वादन सादर केले. यात महाविद्यालयाच्या ‘आगम कलामंडळा’ने सादर केलेले ‘महाराष्ट्राची लोकधारा’ चे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. तसेच ‘विविधतेतून एकता’ आणि ‘शिवरायांची गाथा’ या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सांस्कृतिक कार्यक्रमात गायिका प्रांजली बर्वे यांनी यानिमित्ताने एक गाणे सादर केले.
प्राचार्य डॉ. विलास उगले यांनी आपल्या प्रास्ताविकात, आजचा युवा हा उद्याचा राष्ट्रनिर्माता असल्याचे सांगताना विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ‘अभिव्यक्ती’ हे व्यासपीठ असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने समर्थनम् फाउंडेशनच्या वतीने महाविद्यालयातील दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगासाठी मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. सुभाष पालवे आणि प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी केले. डॉ. बाबासाहेब गव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Scroll to Top
Skip to content