
“माणसाची उंची वाढली तरच व्यावसायिक यश मिळते”
पुणे, दि. २४ : “जीवनात ज्ञान आणि कौशल्य पुरेसे ठरत नाही तर आपली मनोवृत्ती काय आहे यावर यश अवलंबून असते. ज्ञान, कौशल्य, मनोवृत्ती, मूल्ये आणि एक माणूस म्हणून परिस्थितीची जाणीव असणे आवश्यक असते. या गुणांचा संगम व्यक्तिमत्त्वात असतो तेव्हाच मोठेपण मिळते. रोजच्या जगण्यात आपण विशिष्ट मते घेऊन वावरत असतो. मात्र, त्याकडे जागरुकपणे लक्ष देण्याची गरज असते. दुसऱ्या व्यक्तीच्या भावना जाणून घेतल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात. माणसाची उंची वाढली तरच व्यावसायिक यश मिळते,” अशा शद्बात भारत फोर्ज लिमिटेडच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या सहयोगी उपाध्यक्ष आणि सीएसआर विभाग प्रमुख डॉ. सौ. लीना देशपांडे यांनी आज पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य देखील या समारंभाला उपस्थित होते.
कोथरूडमधील मयूर कॉलनीत असलेल्या म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये आज (सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५) हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. देशपांडे पुढे म्हणाल्या, “ सातत्य, नम्रता, कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मक विचार, अपयश पचवण्याची तयारी आणि निग्रह यातच यशाचे गमक आहे. परिस्थितीनुसार बदल करणे हे आवश्यकच असते पण त्याचबरोबर भविष्यातील संधी आणि आव्हाने यांचा वेध घेणे अतिशय महत्वाचे असते. विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, मशिल लर्निंग यासारखे नवीन तंत्रज्ञान देखील आत्मसात केले पाहिजे. संवादकौशल्य हा कळीचा विषय आहे. आपल्याकडे असलेल्या क्षमता आणि कौशल्य ठामपणे मांडण्याचे सध्याचे दिवस आहेत, त्यादृष्टीने आवश्यक असलेली संवाद कौशल्ये प्रत्येकाने शिकली पाहिजेत.”
समारंभाच्या प्रारंभी डॉ. लीना देशपांडे यांचे स्वागत आणि परिचय सौ. आनंदी पाटील यांनी करून दिला. डॉ. लीना देशपांडे यांना नवी दिल्लीत दि. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या १६ व्या ‘इंडिया सीएसआर समिट’मध्ये ‘इंडिया सीएसआर पर्सन ऑफ द इयर २०२५’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्ल त्यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते डॉ. देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
समारंभाचे प्रास्ताविक करताना बाबासाहेब शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने कायमच विद्यार्थ्यांना काळानुरुप शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. संशोधन आणि कौशल्य विकासाला संस्था आवर्जून प्राधान्य देत आहे. मूल्याधिष्ठित आणि परवडणारे शिक्षण देण्याचा वारसा जपत संस्थेची वाटचाल सुरू आहे. समाजातील सर्व घटकांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, हितचिंतक आणि समाजहितैषी व्यक्तींच्या पाठबळावर हे शक्य होत आले आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, देश पारतंत्र्यात असताना लॉर्ड मेकॉले याच्या शिक्षणविषयक धोरणांच्या विरोधात जात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याचे प्रयत्न केले. संस्थेच्या परंपरेने जपलेली संस्कृती आणि संस्कार विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतात, जीवनात निश्चितपणे ते उपयोगी पडतील. जीवनात कितीही यश मिळाले तरी पाय जमीनीवर घट्ट राहतील याकडे लक्ष द्यावे लागते.
गौरवप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने संस्थेच्या विविध शाखांमधील पाच विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले.
मानसी ऊस्तूरीकर यांनी समारंभाचे सूत्रसंचालन तर डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.
