डॉ. आबासाहेब गरवारे यांना ११९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे विनम्र अभिवादन

पद्मभूषण डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना ११९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आज (बुधवार, दि. २१ डिसेंबर २०२२) आदरांजली अर्पण करण्यात आली. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन.एस उमराणी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. गौतमी पवार, उपप्राचार्या डॉ. सुनीता भागवत, मएसो कला व वाणिज्य रात्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल कुलकर्णी आणि मएसोचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तत्पूर्वी मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील सौ. विमलाबाई गरवारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. विजय भालेराव, मएसोचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानिमित्ताने मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कॉमर्स असोसिएशन, इकॉनॉमिक्स असोसिएशन, बिझनेस लॅब आणि इआयएस सेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध अभ्यासशाखांच्या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि मएसो कॉलेज ऑफ कॉमर्समधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गरवारे ट्रस्टच्या वतीने पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी आर्कि. मा. राजीव सहस्रबुद्धे, गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, महाविद्यालय सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन.एस उमराणी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. गौतमी पवार, मएसोचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशनच्या प्रोग्रॅम डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख व सल्लागार मा. संजीव मेहता या कार्यक्रमात आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

सृष्टी जगताप (टी.वाय.बी.ए.), प्रज्ञा फडतरे (टी.वाय.बी.एस्ससी.- स्टॅटिस्टीक्स), स्वराली गोगटे (टी.वाय.बी.एस्ससी. – झूलॉजी), सुरभी भावे (बी.कॉम.), सोहम करंदीकर (इ. १२ वी – सायन्स), प्राजक्ता मुजुमदार (इ. १२ वी – आर्ट्स) आणि भैरवी आपटे (इ. १२ वी – कॉमर्स) या विद्यार्थ्यांचा मा. रामदास भगत, आर्कि. मा. राजीव सहस्रबुद्धे आणि मा. देवदत्त भिशीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मभूषण डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर प्रा. डॉ. आशा खिलारे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयात चालवण्यात येणारे विविध उपक्रम, स्पर्धा आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रोत्साहन याबाबत माहिती दिली. त्यानंतर मा. रामदास भगत यांच्या हस्ते ‘इआयएस सेल’ च्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी ईशा बारगजे हीने या लोगोमागील संकल्पना विशद केली.

मा. संजीव मेहता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उद्योजकता आणि त्याचे महत्व समजावून सांगितले. ते म्हणाले, उद्योजक होण्याचा कोणतेही गुप्त सूत्र नाही, उद्योजक होण्यासाठी कोणतीच वेळी लवकरची नसते किंवा कधीच उशीर झालेला नसतो. उद्योगातील अपयशाची भीति कधीच बाळगू नये कारण त्यातूनच शिकायला मिळते, अकार्यक्षम व्यवस्था किंवा रचनेबद्दल मनात अस्वस्थता आणि प्रचलीत गोष्टींना आव्हान यातूनच उद्योजकता घडते. आपल्या व्यवसायाच्या क्षेत्रात आधीपासूनच असंख्य कंपन्या असल्याने आपल्याला यश मिळेल का? असा विचार कधीच करू नये. कारण नव्या संकल्पना घेऊन आलेल्या कंपन्या यशस्वी होत असल्याचे दिसते. अमेझॉनसारख्या कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसलेली कंपनी यशस्वी ठरल्याचे आपण बघतो. अस्वस्थतेतून नव्याचा शोध, कौशल्य अशा गुणांच्या आधारे यश मिळवता येते. २१ वे शतक भारताचे शतक असल्याचे जगभर मानले जाते. देशांतर्गत प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अर्थपुरवठा हा स्टार्टअपसमोरचा अतिशय लहानसा प्रश्न आहे. खरे आव्हान आहे ते कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे. प्रत्येक विद्यापीठात स्टार्टअपसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जात आहे. फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे.

मा. रामदास भगत यांनी आपल्या भाषणात पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. ते म्हणाले, घरातील परिस्थिती बेताची असलेल्या आबासाहेब गरवारे यांनी आपल्या अफाट कष्टातून सुरू केलेले उद्योग-व्यवसाय यशस्वी करून दाखवले. महाराष्ट्रातील अग्रगण्य उद्योगपती असा नावलौकिक मिळवला. आपल्या उद्योगातून त्यांनी जगाला प्लॅस्टिक उत्पादन उपलब्ध करून दिले. या सर्व प्रवासात त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या सहकार्यांना दिले. महात्मा गांधीजींच्या विचारातील विश्वस्ताची कल्पना वास्तवात आणली. आबासाहेब गरवारे यांनी ७५ धर्मादाय संस्थांच्या स्थापनेत पुढाकार घेतला. शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील संस्थांना भरघोस आर्थिक पाठबळ दिले. त्यांचे चिरंजीव डॉ. शशिकांत गरवारे आणि त्यांच्या कन्या मोनिका, सरिता आणि सोनिया हे डॉ. आबासाहेब गरवारे यांचा वारसा अतिशय समर्थपणे पुढे चालवत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री पवार यांनी तर आभार प्रदर्शन सायली ढमढेरे यांनी केले.