‘स्वामी विवेकानंदांचे जीवन निर्भयतेचे स्मरण करून देते’

“नरेंद्र जन्माला येतो, स्वामी विवेकानंद घडवावे लागतात. स्वामी विवेकानंदांचे जीवन निर्भयतेचे स्मरण करून देते. कुशाग्र बुद्धी, बुद्धिप्रामाण्यवाद, जगाच्या कल्याणाचा विचार, सहसंवेदना, अमोघ वक्तृत्व अशा अनेक गुणांमुळे नरेंद्र पुढे जाऊन स्वामी विवेकानंद झाले,” असे प्रतिपादन मुंबईतील सोमय्या कॉलेजचे प्राध्यापक मा. सागर म्हात्रे यांनी आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी२०२३) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कबड्डीपटू मा. शक्तीसिंग यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. देवदत्त भिशीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ, संतोष देशपांडे, ॲड. सागर नेवसे, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र श्री. सुधीर भोसले, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.

नवी मुंबईतील म.ए.सो.चे हितचिंतक, निमंत्रित, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी यावेळी मैदानी खेळ व शारिरीक प्रात्यक्षिके सादर करतात.या वर्षी पहिल्यांदाच पुणे येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमाबरोबरच नवीन पनवेल येथील मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन पनवेल येथील मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, मएसो पब्लिक स्कूल, कळंबोली मएसो ज्ञान मंदिर आणि मएसो विद्या मंदिर बेलापूर या शाखांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी लेझीम, लाठीकाठी, ढोल पथक, ध्वज पथक, डंबेल्स, बटरफ्लाय ड्रील, फ्लॉवर ड्रील, रिंग ड्रील, ॲरोबिक्स असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

स्वामीजींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगून प्रा. म्हात्रे यांनी स्वामीजींचे तेजस्वी जीवन उलगडले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, “स्वामीजींमधील गुण आत्मसात केले तर भविष्यातील स्वामी विवेकानंद घडतील. महान विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करा. त्यांच्या विचारांतूनच तुमचाही सामान्यापासून असामान्यत्वाकडे प्रवास सुरू होईल.”

मा. शक्तीसिंग यादव यावेळी बोलताना म्हणाले, “स्वतःच्या स्वप्नांचा ध्यास घ्या. ती पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करा. खेळ, अभ्यास किंवा जे काही कराल त्यात एकाग्रता वाढवा. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठे व्हा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा आजचा हा दिवस युवा चेतना दिन तुम्हा सर्वांबरोबर साजरा करताना मला विशेष आनंद होत आहे.”

मा. देवदत्त भिशीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “स्वामी विवेकानंदांच्या विचारात व्यक्ती नव्हे तर समष्टीचा विचार होता.‌ ते एक योद्धा संन्यासी, युगनायक होते.” स्वामीजींचे विचार आजच्या युवांपर्यंत

पोहोचण्यासाठी सर्व शाळांनी वर्षभरात स्वामीजींचे एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा असे आवाहनही मा. भिशीकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीचा आढावा घेतला व युवा चेतना दिन साजरा करण्यामागील म. ए. सो. ची भूमिका विषद केली. आपल्या देशातील विविध क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी क्रीडा प्रात्यक्षिके व शारीरिक कवायती दरवर्षी सादर केली जातात. त्यात मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे विद्यार्थ्यांमधील चेतना जागृत ठेवण्याचा हेतू पूर्ण होत आहे, असे त्यांनी सांगितले.

रायफल शूटिंग क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या फडके विद्यालयातील चि. वेदांत पाटील याने उपस्थित युवांना प्रतिज्ञा दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभाग-मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती निशा देवरे यांनी केले.

डॉ. संतोष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

म. ए. सो. पब्लिक स्कूल कळंबोली या शाळेतील विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् सादर केले.