news

“ज्या शाळेत घडलो, वाढलो त्या शाळेसाठी खासदार निधी उपलब्ध करून देणे हे मी माझे कर्तव्य समजतो” अशा शब्दात शाळेचे माजी विद्यार्थी आणि राज्यसभेतील खासदार अमरजी साबळे यांनी शाळेबद्दलची कृतजता व्यक्त केली. महाराष्ट् एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अद्ययावत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन राज्यसभेतील खासदार मा. श्री. अमर साबळे यांच्या हस्ते सोमवार, दि. ३ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत खा. साबळे यांनी दिलेल्या निधीतून शाळेमध्ये ६० संगणक व ७ प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, शाला समितीचे अध्यक्ष व संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य अॅड. धनंजय खुर्जेकर, शाळेचे महामात्र प्रा. गोविंद कुलकर्णी, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. राजकुमार छाजेड, राजीवजी देशपांडे, समितीचे समन्वयक पी.बी. कुलकर्णी, मुख्याध्यापक विजय सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. “मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करण्यासाठी संगणकाचा उपयोग करता येऊ शकतो. देशातील खेडी स्वयंपूर्ण व्हावीत असे म्हटले जाते. त्यामुऴे, तिथे प्राथमिक व मूलभूत गरजा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक उपक्रम आपण हाती घेतला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसल्ला आणि सुविधा त्यांच्या गावांत मिळाव्यात यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे. ही व्यवस्था उभी राहिली तर ती एक क्रांती घडेल. सामाजिक जाणीवेचा हा संस्कार मला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत मिळाला. पारंपारिक शिक्षण पद्धती आणि जगातील उत्तमोत्तम शिक्षण पद्धतीचा मेळ घालून संगणकाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना कालानुरूप शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. समाजातील विविध समस्या, विसंवाद, ताणतणाव दूर करण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे,” अशी अपेक्षा खा. साबळे यांनी या प्रसंगी व्यक्त केली. खा. साबळे १९७८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असून त्यांचे सहाध्यायी तसेच त्यांचे शिक्षक एम.डब्ल्यू. जोशी सर, चावरे सर व झाडबुके सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. धनंजय खुर्जेकर यांनी केले. ते म्हणाले, “ दृकश्राव्य माध्यमामुळे शिक्षण मनावर ठसते, शिकवण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे त्याचे महत्त्व आहे. खा. साबळे यांनी दिलेल्या निधीमुळे शाळेत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूमची निर्मिती शक्य झाली आहे. मात्र शाळेतील १९७८ सालच्या बॅचनी दिलेली ही देणगी आहे अशीच खा. साबळे यांची भावना आहे, ही विशेष बाब आहे. संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षात ते संस्थेसाठी अधिक योगदान देतील अशी आपण आशा करूया.” आपल्या भाषणात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे म्हणाले की खा. साबळे यांनी स्वखुशीने दिलेल्या निधीतून शाळेत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूम उभी राहिली आहे. त्यांच्या निर्मितीसाठी ते केवळ निधी न देता अतिशय आत्मीयतेने त्यासंबंधात सातत्याने पाठपुरावा करत होते. ‘मएसो’च्या शाळेत होणाऱ्या संस्कारांमुळे घडणाऱ्या व्यक्तिमत्वाचे उदाहरण म्हणजे मा. अमर साबळे हे आहेत. संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवात ते आजपेक्षा अधिक मोठ्या पदावरून सहभागी होतील अशी आशा आपण करूयात. संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “सामाजिक जाणीव असलेला नेता कशा पद्धतीने विचार करतो हे खा. साबळे यांच्या भाषणातून दिसून आले. शिक्षणाच्या क्षेत्रात आज सर्व जागतिक दर्जाच्या आणि आधुनिक सुविधा असल्या पाहिजेत. खा. साबळे यांनी आपल्या शाळेसाठी त्या उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!” १९७८ च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सौ. माधवी लिमये (शाळेतील श्री. पावसकर सरांची कन्या) यांनी भावना व्यक्त केल्या. धनंजय मेळकुंदे यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक विजय सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

 

म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी भारत विकास परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हैदराबाद येथे रविवार, दि. २ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या अंतिम फेरीत शाळेच्या संघाने हे यश मिळविले आहे. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री मा.आर. के. सिंह, पी. गोपीचंद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

या स्पर्धेत शाळेच्या संघाने हिंदी विभागात “फिर आज भुजाएँ फडक उँठी, हम पर प्रहार करनेवाले चिंता करें अपने प्राणों की…” हे गीत सादर केले. संस्कृत विभागात भारतभूमीची महती सांगणारे “जयतु जननी जन्मभूमी पुण्यभुवनं भारतं…” हे गीत तर लोकगीत विभागात महाराष्ट्रातील कोळी-धनगर गीते व भारुड, गोंधळ यांची शृंखला सादर केली. शाळेच्या विद्यार्थ्यांचे सूर आणि तालबद्ध सांघिक गायन ऐकून सभागृहातील श्रोते भारावून गेले आणि त्यांनी नकळत तालदेखील धरला. 

राष्ट्रीय भारत विकास परिषद या संस्थेतर्फे संस्कृत, हिंदी आणि लोकगीत अशा तीन विभागात जिल्हा, राज्य, प्रांत आणि त्यानंतर राष्ट्रीय अशा चार स्तरांवर ही स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक स्तरावरप्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघाचीच पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. संपूर्ण भारतातून पाच हजार शाळांमधील संघ या स्पर्धेत सहभागी होतात. त्यातून केवळ ७ शाळांच्या संघाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. 

अतिशय स्पर्धात्मक कसोट्यांवर झालेल्या या स्पर्धेत मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विजेतेपद मिळवून स्पर्धेवर शाळेची आणि महाराष्ट्राची मोहोर उमटविली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर व शिक्षिका सौ. श्रुती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळविले आहे.

Click Here For the Video

शाळेतल्या बाईंना आणि सरांना भेटण्याची उत्सुकता, आपल्या सवंगड्यांना शोधणाऱ्या नजरा, कॉलेजमधल्या मंतरलेल्या दिवसांचा आठव, वडाच्या पाराच्या साक्षीनं अनुभवलेले संवेदनशील क्षण, कट्ट्यावर केलेला कल्ला, हॉस्टेलवर जमलेलं मैत्र, उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा धांडोळा घेताना मनात दाटून येणाऱ्या आठवणी, जीवनाच्या प्रवासात स्थिरावल्यानंतर ‘बॅचमेट’ना भेटण्याची उत्सुकता अशा ह्द्य वातावरणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आज मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर रंगला! निमित्त होतं, संस्थेच्या १५८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याचं!
यात कोण नव्हतं? शिक्षण, क्रीडा, आरोग्यसेवा, व्यावसायिक, उद्योजक, राजकारण, पत्रकारिता, प्रशासन, संरक्षण अशा विविध क्षेत्रातल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्नेहमेळाव्यात सहभागी होऊन आपल्या शालेय-महाविद्यालयीन जीवनातल्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या शिक्षक, शिक्षिकांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
संस्थेचे अध्यक्ष भूषण गोखले यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून या स्नेहमेळाव्याला सुरवात झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एन.व्ही.अत्रे, सी.पी.चिंचोरे, श्री.वा. कुलकर्णी, माजी प्राचार्य डॉ. अरविंद इनामदार, माजी मुख्याध्यापिका लीला कुलकर्णी, मा.तु. रोमण-जाधव, माजी मुख्याध्यापक एस.व्ही. मारणे यासारखे माजी शिक्षक-प्राध्यापक-प्राचार्य या वेळी आवर्जून उपस्थित
होते. शिक्षक-विद्यार्थ्यांमधल्या स्नेहसंवादाने प्रत्येकाच्या मनातल्या जुन्या आठवणींचा कोपरा आपोआप उघडला गेला.
संस्थेच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. न. म. जोशी, प्रा. अ. ल. देखमुख, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया आणि त्यांचे कुटंबीय, अँड. दादासाहेब बेंद्रे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, नेत्रतज्ञ डॉ. श्रीकांत केळकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख, खा. अनिल शिरोळे, आ. विजय काळे, आ. मेधाताई कुलकर्णी, डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक, सुनील माळी, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शकुंतला खटावकर, ज्येष्ठ खो-खोपटू हेमंत टाकळकर, विजय अभ्यंकर, कर्नल अनंत गोखले, डॉ. माधवी कश्यप, किरण जोशी, संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार, बद्रीनाथ मूर्ती, माजी प्रबंधक अनिल ढेकणे असे अनेक मान्यवर या स्नेहमेळाव्यात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला इ.स. 2020 मध्ये 160 वर्ष पूर्ण होणार आहेत. शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या ‘मएसो’नं मूलभूत शिक्षणाबरोबरच व्यावसायिक आणि कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांनाही तितकंच महत्व दिलं आहे. 1990 सालपर्यंत 7 शाळा आणि 2 महाविद्यालयांच्या माध्यमातून शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या ‘मएसो’चा विस्तार आता 71 शाखांद्वारे 7 जिल्ह्यात झाला आहे. याची माहिती देणारी विविध दालनं या स्नेहमेळाव्याच्या ठिकाणी उभारण्यात आली होती. आपल्या संस्थेचं हे कार्य बघून उपस्थित भारावून जात होते. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी संस्थेच्या प्रयत्नांमध्ये आपलाही सहभाग असावा यासाठी अनेक माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी उत्सफूर्तपणे ‘विद्यादान निधी’देखील दिला.
आपल्या जीवनाला दिशा देणारे शिक्षक, शाळा, संस्था यांच्याबद्दल ऋतज्ञता व्यक्त करत प्रत्येक जण या स्नेहमेळाव्याच्या आठवणी मनात साठवत होता.

 

 

 

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इ.स. २०२० मध्ये १६० वर्षे पूर्ण करीत आहे आणि त्याचवेळी देशात तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. या ‘तरुण भारता’ला संस्कारांबरोबरच कौशल्य शिकविण्याची जबाबदारी ‘मएसो’वरच आहे,” असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी ज केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १५८ व्या वर्धापनदिनानिमित्त आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे, कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. “आज आपण प्रकाशित केलेल्या संस्थेच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये बुद्धी, शक्ती आणि युक्तीचा विकास करण्यासाठी संस्था करत असलेल्या विविध उपक्रमांचा संगम दिसून येतो आहे. संस्थेने आता स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळविण्याचा विचार करायला हवा. त्यामुळे संस्थेच्या कार्याचा चांगल्याप्रकारे विस्तार होईल. संस्थेच्या सर्व शाखांच्या विचारांचा आधार हा संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट असले पाहिजे. आपण करीत असलेल्या कामाचे सिंहावलोकन करण्याची ही योग्य वेळ आहे. ‘मएसो’चा परिवार झोकून देऊन काम करीत आहे. त्यामुळे संस्था भविष्यकाळात मोठी वाटचाल करेल. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेची – MAA- ची वाटचालदेखील जोमाने सुरू आहे. MAA च्या उपक्रमांसाठी ‘क्राऊड फंडिंग’ होणे आवश्यक आहे. विविध माध्यमातून मिळणारा निधी संस्थेकडे जमा झाल्यास त्याचा उपयोग गरज असलेल्या शाखांमद्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी करता येऊ शकेल. संस्थेचे कार्य समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ब्रँड प्रमोशन आणि सोशल मिडियाचा वापर वाढविला पाहिजे,” असेही भूषणजी गोखले म्हणाले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, संस्थेचे माजी सचिव मा. आर.व्ही. कुलकर्णी व प्रा. वि.ना शुक्ल आदी मान्यवर तसेच संस्था कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सरस्वती पूजनानंतर संस्थापकांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सरस्वती वंदना झाल्यानंतर संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “दरवर्षी आपण आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमातून संस्थेच्या कार्याचा वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करीत असतो. भविष्यकाळाच्या दृष्टीने महत्वाची ठरतील अशी तीन प्रकाशने आजच्या कार्यक्रमात आपण करणार आहोत. विविध अभ्यासविषयांची महाविद्यालये सुरु करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्था वृद्धिंगत व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया!” आजच्या कार्यक्रमात संस्थेचे इ.स. २०३०पर्यंतचे व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन मा. गोखले यांच्या हस्ते तर ‘म.ए.सो. २०१८ स्मरणिका’चे प्रकाशन मा. नाईक यांच्या हस्ते आणि संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मराठी भाषेतील माहितीपटाचे मान्यवरांच्या हस्ते सामुहिक प्रकाशन करण्यात आले. आज प्रकाशित झालेल्या या तीनही साहित्याच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या प्राध्यापकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात योगदान देणारे विशेष निमंत्रित गरवारे वाणिज्य महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्राध्यापक शेखर पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “सन २००८मध्ये गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले होते. त्यावेळचे सहकारी यावेळीही बरोबर असल्याने संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणे सुकर झाले. महाविद्यालयाच्या व्हिजन डॉक्युमेंटचे स्वरुप तुलनेने मर्यादित होते परंतु संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट व्यापक स्वरुपाचे असल्याने मांडणीच्या दृष्टीने नेमकी निवड करणे आवश्यक होते. त्यासाठी संस्थेचा इतिहास आणि घटना इत्यादींचा विचार करावा लागला, विविध शाखांना भेटी दिल्या. व्हिजन डॉक्युमेंटचा प्रथम आराखडा कसा असावा याबाबत मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी या कामासाठी खूप वेळ तर दिलाच पण त्यांनी केलेल्या मौलिक सूचनांमुळे व्हिजन डॉक्युमेंट आवश्यक उंची गाठू शकले. मा. भूषणजी गोखले यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. डॉ. आनंद लेले, डॉ. भरत व्हनकटे, डॉ. केतकी मोडक आणि डॉ. संतोष दशपांडे यांचे सहकार्य लाभले. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो, कारण मी ‘मएसो’ला गुरु मानतो, १९८० साली गरवारे वाणिज्य महाविद्यालयात रुजू झालो तेव्हा मा. चिरमुले आणि गोखले सरांचे मार्गदर्शन मिळाले आणि संस्थेचे काम कसे करायचे हे शिकायला मिळाले. ते ऋण फेडण्याची संधी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या निमित्ताने मला मिळाली.” संस्थेचे माजी सचिव आर. व्ही. कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाले, “१९९० सालपर्यंत २ महाविद्यालये आणि ७ शाखा असा विस्तार असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने १९९० सालपासून वेगाने केलेली प्रगती बघून आनंद वाटतो. संस्थेचे कार्य अशाच गतीने पुढे जात राहील आणि भव्य स्वरुप प्राप्त होईल. या संस्थेशी निगडित असल्याचा आनंद वाटतो. संस्थेला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा!” मा. राजीव सहस्रबुद्धे आपल्या भाषणात म्हणाले की, “संस्थेच्या नियामक मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना गेल्या तीन वर्षात काही गोष्टी प्रकर्षाने जाणविल्या, त्या म्हणजे सरकार दरबारी आणि प्रसिद्धी माध्यमात संस्थेबाबत फारशी माहिती नाही तसेच विविध शाखांमधील माजी विद्यार्थ्यांनादेखील मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीबद्दल अज्ञान आहे. त्यादृष्टीने विविध उपक्रम, प्रयत्न करण्याची आवश्यकता लक्षात आली. शालेय तसेच महाविद्यालयीन व व्यावसायिक शिक्षणामध्ये समतोल साधण्याची गरज आहे, संस्थेच्या विस्तारात हा समतोल साधण्यात आपण यशस्वी होऊ. यापुढील काळात सरकारवर अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याची गरज आहे. गरजू आणि गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण विद्यादान निधी योजना सुरू केली असून अल्पावधीतच त्याला भरघोस यश मिळाले आहे. २०२० हे वर्ष अतिशय महत्वाचे आहे कारण त्यावर्षी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची १७५ वी जयंती, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व मएसो मुलांचे विद्यालय (पेरुगेट भावे स्कूल) या शाळेचा शतकोत्तर हीरक महोत्सव व मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा अमृत महोत्सव आहे.” संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीपजी नाईक यांनी आपल्या मनोगतात, अधिकाधिक स्वावलंबी होण्याचे संस्थेचे ध्येय अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले. तर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. वाघमारे यांनी संस्थेच्या वेगवान प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-वार्तापत्र आणि स्मरणिकेबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सुधीर दाते यांनी ‘मएसो’वरील स्वरचित कविता उपस्थितासमोर सादर केली. संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमानंतर म.ए.सो. मुलांचे विद्यालय येथे मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मल्लखांब व रोलबॉल स्केटिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मा. भूषणजी गोखले आणि मा. प्रदीपजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. खेळाडूंनी यावेळी रोलबॉल स्केटिंगचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर मा. भूषणजी गोखले यांनी या खेळाडूंशी संवाद साधला.

 

 

 

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘शौर्य’ या साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिराला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कर्नल दिनार दिघे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र प्रा. सुधीर भोसले, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे उपस्थित होते. “शौर्य शिबिरामुळे स्वावलंबन, संघटन कौशल्य व आत्मविश्वास हे गुण वाढण्यास निश्चितच उपयोग होईल,” असे सांगून पाल्यांना साहसी क्रीडा प्रशिक्षणासाठी पाठवल्याबद्दल कर्नल दिघे यांनी पालकांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांमधून चालणाऱ्या शैक्षणिक कार्याबरोबरच विविध उपक्रमांची माहिती प्रा. आपटे यांनी दिली. ‘मएसो’ येत्या १९ नोव्हेंबर रोजी १५९ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्याचे निमंत्रण प्रा. भोसले यांनी उपस्थितांना दिले. सैनिकी शाळेतर्फे दि. १२ ते १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ‘शौर्य’ शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये रिव्हर क्रॉसिंग, राफ्टिंग, हॉर्स रायडींग, रायफल शूटिंग, आर्चरी, वॉल क्लायंबिंग इ. साहसी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुटीत ‘शौर्य’ शिबिर आयोजित करण्यात येते. अशा स्वरुपाचे हे ७ वे शिबिर आहे. यावेळच्या शिबिराचे एक वैशिष्टय म्हणजे महाराष्ट्रातील विविध भागांबरोबरच राजस्थानमधील प्रशिक्षणार्थीदेखील त्यात सहभागी झाले आहेत. सैनिकी शाळेची शाला समिती, शौर्य शिबिराची संयोजन समिती व म.ए.सो चे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात येते.

त्रिदल पुणे (पुण्यभूषण फाऊंडेशन) च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘पक्के पुणेकर’ सन्मानाने यावर्षी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा गौरव करण्यात आला. पुण्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात मोलाचे कार्य करून शंभर वर्षे पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून पुणेकरांच्या वतीने ‘मएसो’ला सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाचे सदस्य अॅड. धनंजय खुर्जेकर आणि संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी संस्थेच्या वतीने रमेश शहा (लायन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या या गौरव सोहळ्याला ज्येष्ठ उद्योगपती कृष्णकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ सतीश देसाई, युवराज शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामतीमधील इंग्लिश मिडियम स्कूलचे म.ए.सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडियम स्कूल असे नामकरण माजी केंद्रीय मंत्री आणि मएसोचे माजी विद्यार्थी मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते सोमवार, दि. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार, म.ए.सो.चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजीव सहस्त्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, कै. हरिभाऊ देशपांडे यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. अजितराव देशपांडे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व शाला समितीचे अध्यक्ष अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, शाळेचे महामात्र प्रा.गोविंद कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सौ. प्रतिभाताई पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, डॉ. रजनीताई इंदुलकर, म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, शाळा समितीचे सदस्य प्रा. सुधीर भोसले व श्री. बाबासाहेब शिंदे, स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर तसेच सर्व पवार व देशपांडे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मा. शरद पवार म्हणाले की, “ शाळेत उत्तम शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची योजना करण्याबरोबरच शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवाद ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची परंपरा आहे. बारामतीतील अनेक पिढ्या घडवण्याचे काम संस्था अविरतपणे करत आहे. हरिभाऊ देशपांडे देखील याच मुशीत घडले. शिक्षणाच्या विस्तारासाठी त्यांनी मुक्तहस्ते दानदेखील दिले. बारामतीमधील सामाजिक, शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आपली संपत्ती समाजासाठी देण्याची इच्छा त्यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवली. अशा हरिभाऊ देशपांडे यांचे नाव या शाळेला देण्यात आले याचा मला आनंद आहे. म.ए.सो.च्या शाळेत मला देखील उत्तम संस्कार आणि शिस्तीचे धडे मिळाले. मी जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी झालो, याचे श्रेय माझी शाळा व माझी आई यांना आहे. आम्हा तीन भावडांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाले आहेत. एकाच आईच्या तीन मुलांना आणि ‘मएसो’च्या एकाच शाळेतील तीन माजी विद्यार्थ्यांना ‘पद्म’ पुरस्काराने गौरवण्यात आले याचा अभिमान वाटतो.” कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा समितीचे अध्यक्ष मा. धनंजय खुर्जेकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “वाढती विद्यार्थी संख्या आणि कालानुरुप शिक्षण पद्धती यांचा मेळ घालण्यासाठी शाळेच्या वास्तुचा विस्तार करण्यात आला आहे. स्वावलंबी आणि कौशल्ययुक्त पिढी घडवण्यासाठी शाळेत सातत्याने विविध उपक्रम सुरु असतात. कै. हरिभाऊ देशपांडे यांच्या दातृत्वामुळेच हे शक्य झाले आहे, त्यामुळे त्यांचे ऋण कधीही फेडता येणार नाहीत.” अजित देशपांडे आपल्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, “ देशपांडे कुटुंबीय आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्यातील संबंध घनिष्ट आहेत. शाळेतील गुरुजनांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले त्यामुळेच आम्ही सर्व भावंडे आणि शाळेतील विद्यार्थी घडलो. माझे वडील हरिभाऊंचे वर्णन ‘पाण्या तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा’ असे करता येईल. त्यांना कलाकारांबद्ल अतिशय जिव्हाळा होता. भाऊंच्या सामाजिक कार्यात मा. शरद पवार यांचे सहकार्य असायचे, त्या दोघांचे संबंध अत्यंत स्नेहपूर्ण होते. वडिलांकडून मला आवाजाची देणगी मिळाली, त्यामुळेच मी आकाशवाणी आणि दूरदर्शन सारख्या माध्यमांमध्ये यशस्वी होऊ शकलो.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “बारामतीकरांचे म.ए.सो. वर खूप प्रेम आहे, त्यामुळेच येथील संस्थेच्या शाळा प्रगती करत आहेत. हरिभाऊ देशपांडे यांच्या दातृत्वातूनच ही शाळा उभी राहिली आहे. त्यांनी आईची भूमिका पार पाडली आहे, त्यांचे आशीर्वाद शाळेच्या पाठीशी आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना देशाचे सक्षम नागरिक बनवण्याची जबाबदारी आता शाळेवर आहे आणि अशाप्रकारे सक्षम झाल्यावरच शाळेतील विद्यार्थ्यांना मा. हरिभाऊ देशपांडे यांच्या कार्याची महती कळेल. पुढील पिढी घडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.” शाळेचे महामात्र प्रा. गोविंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेतील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘मएसो गीत’ व शेवटी पसायदान सादर केले. 

 

व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद उर्फ एम.पी. आवटी (निवृत्त) यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले. ते आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली!

maharashtratimes.indiatimes.com

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीची साहित्यक्षेत्रात उत्तुंग भरारी

यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. याचा संस्थेला सार्थ अभिमान असून संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन!

डॉ. ढेरे यांच्या रूपाने संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला विराजमान होत आहे. १९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदूर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी यवतमाळ येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिकेची निवड झाली आहे.

हे संमेलन दि. ११ ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत होणार आहे. 

अरुणा ढेरे यांचा जन्म दि. २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. तेथेच त्यांचे एम.ए.तसेच पीएच.डी. पर्यंतचे सर्व शिक्षण झाले. त्या पुणे विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट आहेत. इ.स.१९८३ ते ८८ या काळात त्यांनी प्राध्यापिका म्हणून पुणे विद्यापीठात काम केलेले आहे. 

प्राचीन वाङ्मय, लोकसाहित्य तसेच संतसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक कै. डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतकांनी केरळमधील आपत्तीग्रस्तांसाठी जमा केलेला १४ लाख ११ हजार रुपये निधी आज (शुक्रवार, दि. २८ सप्टेंबर २०१८) रा.स्व. संघ जनकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आला. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हा निधी जनकल्याण समितीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा अँड. अलकाताई पेठकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

या वेळी जनकल्याण समितीचे सहकार्यवाह विनायकराव डंबीर, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी, विनय चाटी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर तसेच पुण्यातील संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक उपस्थित होते. 

विशेष म्हणजे मयूर कॉलनीतील मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इ. ९ वीत शिकणाऱ्या अनिश सांगवीकर या विद्यार्थ्याने त्याला मिळालेली शिष्यवृत्तीची सर्व रक्कम केरळ आपत्तीग्रस्त निधीसाठी दिली आहे. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने याशिवाय ३.५० लाख रुपयांचा मदतनिधी महाराष्ट्र शासनाकडे जमा केला आहे. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आत्तापर्यंत विविध प्रसंगी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा प्रकारचा निधी संकलित केला असून जनकल्याण समितीच्या माध्यमातून हा निधी केरळमधील बांधवापर्यंत पोहोचवण्याची संधी संस्थेला मिळाल्याबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आनंद व्यक्त केला. 

केरळमध्ये सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती विनायकराव डंबीर यांनी यावेळी उपस्थितांना दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुधीर गाडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन आंबर्डेकर यांनी केले.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे रोप मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थिनींनी सादर केलेली नेत्रदीपक प्रात्यक्षिके पहाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. या प्रात्यक्षिकांचे नेतृत्व दिव्या निखाडे, पलक मिठारी, वैष्णवी जोशी या विद्यार्थिनींनी केले. शनिवार पेठेतील मेहुणपुरा मित्रमंडळाच्या केळकर रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुकीत शाळेने सहभाग घेतला होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच रविवार, दि. २३सप्टेंबर २०१८ रोजी दु. ३.३० वाजता ही मिरवणूक निघाली होती. त्यामध्ये शाळेच्या १२ विद्यार्थिनींनी रोप मल्लखांब आणि योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांसाठी एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर आवश्यक रचना उभी करण्यात आली होती. त्याआधारे विद्यार्थिनींनी रोप मल्लखांबाची क्रॉस, पतंगी, गौराई, शवासन, साधी आढी, निद्रासन, वादी, पश्चिमोतासन इत्यादी प्रात्यक्षिके सादर केली. योगासन प्रकारात चक्रासन, वृक्षासन, गरुडासन, नटराजासन आणि एकपादशिरासन अशी अनेक आसने दाद मिळवून गेली. गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रचंड गर्दी आणि ढोल-ताशांचा गजर , डीजेंचा दणदणाट अशा वातावरणात विद्यार्थिनींची एकाग्रता, आत्मविश्वास आणि लवचिकता सर्वांनाच अचंबित करणारी होती. विद्यार्थिनींची प्रात्यक्षिके पाहून मुख्य चौकामध्ये उपस्थित असलेल्या पुण्याच्या पोलीस उपायुक्त श्रीमती भानुप्रिया सिंग (आयपीएस अधिकारी) यांनी व्यासपीठावर बोलावून फूल देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले आणि आस्थेने विचारपूस करून शाळेला आवर्जून भेट देण्याचे आश्वासन दिले. 

पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत प्रात्याक्षिकांचे सादरीकरण व्हावे ही संकल्पना प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी मांडली. त्यानुसार लागणाऱ्या साहित्याची जमवाजमाव व सराव करण्यात आला. अफाट जनसमुदायासमोर जाताना विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि चालत्या ट्रॅक्टरवर उभारण्यात आलेल्या रचनेवर करावे लागणारे सादरीकरण ही आव्हाने समोर होतीच, परंतु विद्यार्थिनींचा आत्मविश्वास आणि सर्व टीमचा पाठिंबा यामुळे ही सर्व आव्हाने लीलया पेलता आली. प्रशालेच्या दोनही महामात्र डॉ. मानसी भाटे आणि श्रीमती चित्रा नगरकर यांनी दिलेली प्रत्यक्ष भेट टीमचा उत्साह वाढविणारी ठरली. 

या प्रात्यक्षिकांसाठी प्रशालेचे कमांडट कर्नल सारंग काशीकर (निवृत्त), उपप्राचार्य अनंत कुलकर्णी यांनी बहुमोल योगदान दिले. तसेच प्राचार्या श्रीमती पूजा जोग, शाम नांगरे, संदीप पवार, गुणेश पुरंदरे, माळी सर, थोरात सर, जगदाळे सर, अद्वैत जगधने, श्रीमती महाले यांचाही सक्रिय सहभाग होता.

 

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव सहस्रबुद्धे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. माधव भट यांची तसेच संस्थेचे सचिव म्हणून डॉ. भरत व्हनकटे यांची आणि सहाय्यक सचिव म्हणून श्री. सुधीर गाडे यांची निवड करण्यात आली. आज (दि. १९ सप्टेंबर) झालेल्या संस्थेच्या नियामक मंडळाच्या सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. 

संस्थेची वार्षिक साधारण सभा शनिवार, दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी झाली. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. यशवंत वाघमारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच श्री. प्रदीप नाईक यांची नव्याने उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय संस्थेच्या नवीन नियामक मंडळामध्ये सर्वश्री राजीव सहस्रबुद्धे, अभय क्षीरसागर, डॉ. माधव भट, डॉ. माधवी मेहेंदळे, आनंद कुलकर्णी, देवदत्त भिशीकर, सौ. आनंदी पाटील, धनंजय खुर्जेकर व विजय भालेराव यांची निवड करण्यात आली. 

२०१८ ते २०२३ या कालावधीसाठी या सर्वांची निवड करण्यात आली आहे.

पर्यावरण रक्षणाच्या हेतूने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कर्वे रस्त्यावरील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या इमारतीवर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जेवर आधारित १५.६० किलोवॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवार, दि. ११ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे महानगर पालिकेचे शहर अभियंत मा. प्रशांत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापालिकेच्या पथदिवे विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधव भट, डॉ. केतकी मोडक, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. पी.बी. बुचडे, डॉ. अंकूर पटवर्धन, चित्रा नगरकर, डॉ. मानसी भाटे, सुधीर भोसले, गोविंद कुलकर्णी, विनय चाटी, सुधीर गाडे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, सहायक सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

गरवारे महाविद्यालयाच्या आवारातील पाच इमारतींसाठी सौरऊर्जेवर आधारित एकूण ९६.१५ किलोवॅट क्षमतेचे ५ वेगवेगळे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. 

कोथरूडमधील मयूर कॉलनीतील ‘मएसो’ बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सुमारे २० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ५० किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवार, दि. ६ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे विभागाचे धर्मादाय सह-आय़ुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

संस्थेच्या चार आवारांमध्ये उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे एकूण २४२.९८ किलोवॅट वीजेची निर्मिती करणार आहे. त्यासाठी एकूण १ कोटी ८७ हजार ७७६ रुपये खर्च येणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे १५ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. संस्थेची वीजेची गरज भागवून अतिरिक्त वीज ‘नेट मीटरींग’च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला विकण्यात येणार आहे. 

खासगी कंपन्यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांना भारतीय सौरऊर्जा महामंडळ मर्यादित (SECI) या संस्थेकडून ३० टक्के अनुदान (Subsidy) मिळाले आहे. तसेच मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील एक प्रकल्प, आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील असेंब्ली हॉल आणि मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसमधील प्रकल्पाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अनुदान (Grant) मिळाले आहे

म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत अतिशय उत्साहात आणि देशभक्तीने  भारलेल्या वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण ९३.५ बीग एफएम या खासगी वाहिनीने केले. त्याचा आनंद आपणही घेऊया…

 

“व्यक्तीकडे ज्ञान असेल तर भौतिक सुखे सहज उपलब्ध होऊ शकतात पण ज्ञानाशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही. व्यक्तीकडे असलेले ज्ञान कोणीही चोरू शकत नाही, त्यामुळे ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ धन आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या यशाबाबत समाधानी न राहता अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा यासाठी त्यांचे शोधनिबंध पुस्तक रुपाने प्रकाशित झाले पाहिजेत,” असे प्रतिपादन पुणे विभागाचे धर्मादाय सह-आय़ुक्त दिलीप देशमुख यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील विविध शाळा-महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गुणवंत शिक्षक आणि प्राध्यापक यांचा गौरव समारंभ आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

मयूर कॉलनीतील म.ए.सो. सभागृहात झालेल्या या समारंभापूर्वी ‘मएसो’ बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सुमारे २० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सौरऊर्जेवर आधारित ५० किलोवॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

राज्यातील विविध विद्यापीठांनी घेतलेल्या परिक्षांमध्ये ‘मएसो’च्या शाळा-महाविद्यालयातून विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले ४० आणि पीएच. डी. प्राप्त केलेले १८ विद्यार्थी-विद्यार्थिनी, एम.फील्. पूर्ण केलेले २ सहाय्यक शिक्षक तसेच पीएच. डी. प्राप्त केलेले ९ प्राध्यापक अशा ६९ गुणवंतांचा गौरव या समारंभात करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विवेक शिंदे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), पुणे विभागाचे धर्मादाय सह-आय़ुक्त दिलीप देशमुख, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, आणि सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.

गुणगौरव समारंभाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी केले. 

मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, पुस्तक आणि स्मृतिचिन्ह भेट देऊन गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गुणवंत शिक्षक आणि प्राध्यापक यांचा गौरव करण्यात आला. गुणवंतांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात साची ओसवाल या विद्यार्थिनीने इंग्रजी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या तर पदवी शिक्षणानंतर २३ वर्षांच्या खंडानंतर PGDBM हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रज्ञा भागवत यांनी कुटुंबाबरोबरच महाविद्यालयाकडून मिळालेल्या पाठिंब्याबाबत ऋतज्ञता व्यक्त केली. 

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “यश मिळणे हा जीवनाच्या प्रवासातील एक टप्पा आहे ते ध्येय नाही हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळा-महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण आणि संस्कार केले जातात, संस्कृती जपली जाते, शिक्षणाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले जात नाही. त्यामुळेच आकाशाला गवसणी कशी घालावी हे मएसोच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कॅमेरातून आपली छबी टिपण्यापेक्षा आपली प्रतिमा निर्माण करा, त्यामुळे ‘मएसो’ने तुम्हाला काय दिले आहे हे जगाला कळेल. सामाजिक जाणीवेतूनच संस्थेने सौर उर्जेवर आधारित वीज प्रकल्प उभारला आहे, त्याचे आज उद्धाटन झाले आणि असे आणखी चार प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. जागतिक तापमान वाढीसारख्या जागतिक समस्यांवर संस्थेने केलेला हा एक छोटासा पण महत्वपूर्ण उपाय आहे.”

संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील प्रा. रसिका रहाळकर यांनी केले.

 

AGC-Nandu-Marathe-Sri-Spardha-1st-Sep-2018

आपल्या संस्थेच्या पौड रस्त्यावरील सरस्वती निवास वसतिगृहातील सभागृहाचे आज कै. चिंतामण विष्णू कुलकर्णी व कै. सरस्वती चिंतामण कुलकर्णी यांच्या स्मृत्यर्थ ‘स्वरमणी सभागृह’ असे नामकरण करण्यात आले. संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. 

या प्रसंगी कै. चिंतामण विष्णू कुलकर्णी व कै. सरस्वती चिंतामण कुलकर्णी यांच्या कन्या सौ. वीणा दिवाणजी, सौ. दीपा पानसे, सौ. अनघा राहतेकर आणि त्यांचे कुटुंबिय तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधव भट, मा. अभय क्षीरसागर, मा. आनंद कुलकर्णी व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य मा. सुधीर भोसले, डॉ. अतुल कुलकर्णी आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कै. श्री. व सौ. कुलकर्णी तसेच ‘मएसो’च्या संस्थापक त्रयीच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी इ. ५ वी व इ. ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत लक्षणीय यश मिळविले. त्याची दखल दै. महाराष्ट्र टाईम्सने आजच्या अंकात घेतली आहे.

मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व उच्च माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परिक्षांमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लक्षणीय यश मिळविले आहे. 

इ. ५ वी च्या शिष्यवृत्ती परिक्षेत पुण्यातील मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, कोथरूड या शाळेची विद्यार्थिनी कु. श्रावणी पोरे २७२ गुण मिळवून जिल्ह्यात पहिली आणि राज्यात पाचवी आली आहे. सासवड येथील मएसो वाघीरे विद्यालयातील कु. प्रथमेश कडलग हा विद्यार्थी ९१.२७ टक्के गुण मिळवून जिल्हात २ रा तर राज्यात ७ वा आला आहे. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, कोथरूड शाळेतील कु. पारस गांधी हा विद्यार्थी २६० गुण (८८.४३%) मिळवून जिल्ह्यात ७ वा तर राज्यात १४ वा आला आहे. कु. ओंकार क्षीरसागर हा विद्यार्थी २५८ गुण (८७.७५%) मिळवून जिल्ह्यात ११ वा तर राज्यात १६ वा आला आहे. या शाळेतील एकूण २६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जिल्हा यादीत स्थान मिळवले आहे. या शाळेचा निकाल ७०% लागला आहे. बारामती येथील मएसो कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयातील ८ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळाली असून शाळेचा निकाल ६३.१% लागला आहे. या शाळेतील कु. श्रीकांत प्रदीप वाळुंजकर या विद्यार्थ्याने जिल्ह्यात शहरी विभागात १६वा क्रमांक मिळवला आहे. त्याला ३०० पैकी २५६ गुण मिळाले आहेत. सासवड येथील मएसो वाघीरे विद्यालयातील एकूण ४ जणांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. 

इ. ८ वी च्या उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत पुण्यातील मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, कोथरूड या शाळेची विद्यार्थिनी कु. रुची दाते २५६ गुण मिळवून जिल्ह्यात ८ वी आली आहे. या शाळेतील २३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जिल्हा यादीत स्थान मिळवले आहे. या शाळेचा निकाल ८२.५ % लागला आहे. बारामती येथील मएसो कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयातील दोन जणांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या शाळेचा निकाल २४.५२% लागला आहे. 

म.ए.सो.सौ.विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थी शहरी सर्वसाधारण विभाग गुणवत्ता यादीत आले आहेत.

“जगभरातील सर्वोत्तम शिक्षण मराठी माध्यमातून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल आणि अशा शिक्षणाच्या बळावर तो खेड्यात किंवा जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी तो उत्तम काम करु शकेल,” अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आज येथे दिली. सोळंकी हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील सर्व शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षा (इ. १०वी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इ.१२वी) यामध्ये प्रथम आलेल्या ३५ गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, किशोर पंप्स प्रा. लि. चे कार्यकारी संचालक किशोर देसाई, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. कर्वे रस्त्यावरील म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. मएसो ज्ञानवर्धिनीतर्फे यावर्षीपासून इ. ६ वी तील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तिकेचे प्रकाशन विशाल सोळंकी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. “आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी ज्याप्रमाणे देशात क्रांतीची मशाल पेटवली, त्याचप्रमाणे देशात आता नव्या शैक्षणिक क्रांतीची सुरवात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करू शकेल,” असा विश्वास सोळंकी यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याचे काम शाळा करते. आता मात्र तुम्हाला स्वतःचा प्रवास स्वतःच करायचा आहे. त्यामुळे स्वतःसा ओळखायला शिका. जीवनात आपल्याला काय करायचे आहे ते आत्ताच ठरवा, त्यातूनच समाधान मिळेल आणि कामाचा आनंद मिळवू शकाल. जिद्द असलेल्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाला नियती नेहमीच साथ देते. आपला प्रत्येक विद्यार्थी यशस्वी आणि चांगला नागरीक कसा होईल यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कायमच प्रयत्नशील राहिली आहे. संस्थेने तुम्हाला आत्तापर्यंत सर्वकाही दिले आहे आता संस्थेला तुमचा अभिमान वाटेल असे काम करून दाखवा.” किशोर देसाई आपल्या भाषणात म्हणाले, “ जगात आपली कोणत्यातरी एका कौशल्यासाठी ओळख असणे गरजेचे आहे, परंतू एका विषयात प्रावीण्य मिळाले म्हणून थांबणे योग्य ठरणार नाही. शालेय-महाविद्यालयीन जीवनात जास्तीत जास्त अनुभव घेतला पाहिजे, त्यातून संवेदनशीलता वाढते. संवेदनशीलता वाढण्यासाठी मातृभाषेतून शिकण्याचीही आवश्यकता आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आपल्या शिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षक घडवित आहे ही बाब कौतुकास्पद आहे कारण ज्या संस्थांना शिक्षकाचे महत्व कळते त्या संस्थेचे विद्यार्थी खूप मोठे होतात. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शिक्षमाबाबत निर्णय घेत असताना आपल्या देशात आता खूप संधी आहेत याचे भान बाळगणे आवश्यक आहे. सर्वच कंपन्या संशोधनाच्या कामासाठी फार मोठी गुंतवणूक करत असल्याने भविष्यात शास्त्रज्ञांची फार मोठी गरज लागणार आहे. आज आपल्या देशात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे, परंतू शारीरिक कष्ट करावे लागणाऱ्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे, ही गंभीर बाब आहे. जीवनात न्याय, निती आणि धर्माने वागून यश मिळवता येते त्यामुळे काहीही करून मोठे होण्याची मनोवृत्ती निर्माण होऊ देवू नका. समाजासाठी केलेले काम हे परमेश्वरासाठी केलेले काम असते त्यातून मनःशांती मिळते आणि समाजात चांगुलपणाही मिळतो.” गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने मानस गाडगीळ आणि आकांक्षा बुटाला या विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कार्याचा विस्तार आणि त्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. गोविंद कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

 

 

“परिस्थिती आपल्याला शिकवत असते, पण आपण त्यातून काय शिकतो हे महत्वाचे आहे. केवळ अभ्यासातच हुशार असून चालणार नाही. अभ्यासात हुशार नसतानाही अनेकजण जीवनात यशस्वी होतात. सौ. विमलाबाई गरवारे यांनी कायम भविष्याचा वेध घेतला. महाराष्ट्रातील मुले-मुली हुशार आहेत, परंतू ती स्वतःला व्यक्त करण्यात आणि सादरीकरणात कमी पडत असल्याने त्यांची हुशारी दिसून येत नाही. त्यामुळे बोलायला शिका, त्यातूनच आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सापडत जातात. प्रत्येकाने अवांतर वाचन केले पाहिजे, मनःशांती, तणावमुक्ती आणि आनंद मिळवण्यासाठी कलागुण जोपासले पाहिजेत,” असा सल्ला गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील सुतावणे यांनी माध्यमिक शालांत परिक्षेतील गुणवंतांना दिला. 

सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जन्मदिनानिमित्त माध्यमिक शालांत परिक्षेत (इ. १० वी) उल्लेखनीय यश मिळवलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा शनिवार, दि. १४ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. विमलाबाई गरवारे यांच्या शाळेतील अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, शाळेचे महामात्र सुधीर गाडे, मुख्याध्यापक अविनाश वाघमारे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा गायकवाड व शाळेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

माध्यमिक शालांत परिक्षेत शाळेत प्रथम क्रमांक मिळवलेला चिन्मय उदय दामले (९५.६० टक्के), दुसरा क्रमांक मिळवलेली गौरी नंदकुमार कोंडे (९२.६० टक्के) तसेच विभागून तिसरा क्रमांक मिळवलेल्या नेहा विनोद बाफना आणि अंकिता दिनेश पाटील (प्रत्येकी ९२.४०टक्के) या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गरवारे ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी पांच हजार रुपयांचे पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन कौतुक करण्यात आले. 

कु. नेहा विनोद बाफना या विद्यार्थिनीने प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत मांडले. 

अबोली साने आणि आर्या पळशीकर या विद्यार्थिनींनी सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. 

शाळेचे महामात्र सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “प्रत्येकाची परिस्थिती भिन्न असते. परंतू दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची, समाजाला देण्याची परंपरा आपल्या देशात आहे. सौ. विमलाबाई आणि आबासाहेब गरवारे हे दांपत्य त्याचेच उदाहरण आहे. नोकरीचा विचारही न करता व्यवसायात मानाने उभे राहण्यासाठी सौ. विमलाबाईंनी आबासाहेबांना पूर्णपणे पाठिंबा दिला. आपल्या मुलांना व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळेतच घातले. त्यासाठी मुलांना परदेशातही पाठवले. लग्न होऊन एकत्र कुटुंबात गेल्यानंतर त्यांनी कुटुंब उत्तम प्रकारे सांभाळले परंतु भविष्याचा विचार करून त्यांनी आपल्या मुलांमधील भावबंध घट्ट करत स्वतंत्र संसार थाटायला लावला. नरसेवा हीच नारायण सेवा ही शिकवण आचरणात आणून त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांच्या जीवनातून मिळणारी ही शिकवण आजच्या विद्यार्थिनींनी आचरणात आणली पाहिजे आणि हीच सौ. विमलाबाई गरवारे यांना खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका अर्चना लडकत यांनी केले.

 

 

Career Counseling Group (CCG), ICAI jointly with Pune Branch of WIRC of ICAI in support with IQAC Savitaribai Phule Pune University and MES Garware College of Commerce organized 5 Days Workshop on ‘GST’- Girls Students Empowerment Through Skill Building on 01st July 2018 from 08.00 am to 01.00 pm at Savarkar Sabhagruha.

During the program Chief Guest Dr. Prafulla Pawar (Dean – Faculty of Commerce & Management, Savitribai Phule Pune University), Guest of Honour CA Uday Gujar (Member of Pune Branch of WIRC of ICAI), Speaker CA Shailesh Rathi, Dr. Anand Y. Lele (Officiating Principal), CA Sudam D Ghongatepatil (Vice Principal), CA Ruta Chitale were present. 

The main objective of this workshop is to Empowering Girls through Skills, Knowledge, and Leadership & increase access to decent employment and entrepreneurial opportunities. The seminar witnessed participation of over 75 Girls Students from GCC as well as from other colleges. 

A technical session was conducted which focused on various important issues related to Introduction to GST & Supply, Levy & Collection of GST and place of Supply, Time and Value of Supply, Input Tax Credit, Registration, Invoice and Records, Payment of tax, GST Return, and Miscellaneous provisions.

The seminar concluded with a session on ‘Questions and Answers’ in which clarifications were given to many queries particularly pertaining to sectors of exports, transport, real estate etc.

 

 

शिक्षणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आता शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून सोलापूरसारख्या बहुसांस्कृतिक शहरात आपल्या शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. ‘मएसो’ने MES Public School, Solapur ही विनाअनुदानित पूर्वप्राथमिक शाळा सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन रविवार, दि. १ जुलै २०१८ या दिवशी स्व. काका महाजनी स्मारक विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा. श्री. दामोदरजी दरगड यांच्या शुभ हस्ते आणि मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शाळेची प्रथम विद्यार्थिनी उपस्थित होती. याप्रसंगी गणेश पूजन व सरस्वती वंदन करण्यात आले. मएसोच्या परिवारातील इंग्रजी माध्यमाची ही ८ वी शाळा आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बाळे येथील नियोजित शैक्षणिक प्रकल्पाच्या जवळच ही शाळा सुरु करण्यात आली आहे. 

शाळेच्या उद्धाटनानंतर बाळे येथील नियोजित संकुलाच्या ठिकाणी “स्व. काका महाजनी शैक्षणिक संकुला”च्या नामफलकाचे अनावरण व वृक्षारोपण करण्यात आले.

या सर्व प्रसंगी शाला समितीचे अध्यक्ष व मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री. आनंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, शाला समितीचे सदस्य व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य श्री. विनय चाटी व श्री. गोविंद कुलकर्णी तसेच स्व. काका महाजनी स्मारक विश्वस्त समितीचे कार्यवाह श्री. राजेंद्र काटवे, सदस्य श्री. रंगनाथ बंकापूर, श्री. अशोक संकलेचा, श्री. संतोष कुलकर्णी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर शहर कार्यवाह श्री. फडके, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. विनय चाटी, श्री. संतोष कुलकर्णी व संस्था कार्यालयातील श्री. मनोज साळी, श्री. राजेश दुसाने व श्री. मोरेश्वर पनवेलकर यांनी विशेष प्रयत्न केले.

या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे :

 

 

आपल्या संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे यांनी शुक्रवार, दि. २२ जून २०१८ रोजी सकाळी भारताचे संरक्षण राज्यमंत्री मा. डॉक्टर सुभाष भामरे यांची पुण्यात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. राजीवजींनी मंत्रिमहोदयांना आपल्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ. माधव भट व अॕड. धनंजय खुर्जेकर या प्रसंगी उपस्थित होते.

आपल्या शाळेच्या (पूर्वीची मुलींची भावे स्कूल) १९६९ बॅचच्या माजी विद्यार्थिनी नीलिमा पटवर्धन (सौ. नीलिमा चिंतामण दीक्षित) यांनी शाळा आणि गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज म्हणजे शनिवार, दि. १६ जून २०१८ रोजी संस्थेला भरघोस देणगी दिली. या देणगीचा विनियोग आपल्या प्रशालेत पिण्याच्या पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी करावा अशी सूचना त्यांनी केली आहे. एस.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे हे ५० वर्ष असल्याचे औचित्य साधून सौ. दीक्षित यांनी ही देणगी दिली आहे. 

त्यांनी दिलेल्या या देणगीबद्दल संस्था त्यांची आभारी आहे.

राष्ट्रीय शिक्षणाची गंगोत्री असलेली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नव्या उमेदीने हुतात्म्यांच्या बलिदानाने पुनीत झालेल्या सोलापूर सारख्या बहुसांस्कृतिक महानगरात पदार्पण करीत आहे. संस्थेची पूर्व प्राथमिक शाळा एक 

जूलैपासून सोलापुरात सुरू होत आहे. त्याची घोषणा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी, ता. १५ जून, पत्रकार परिषदेत केली. कै. काका महाजनी ट्रस्टचे अध्यक्ष दामोदरजी दरगड, ‘मएसो’चे सचिव डॅा. संतोष देशपांडे, संस्थेचे आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. विनय चाटी, प्रशासकीय अधिकारी जगदीश मालखरे, ट्रस्टचे ट्रस्टी संतोष कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

आपल्या बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेला इ. १० वी च्या परीक्षेत मिळालेल्या यशाची दखल आज पुण्यातील वृत्तपत्रांनी घेतली आहे.

मएसो बालशिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत सर्व शिक्षकांनी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला. यावेळी पर्यावरणाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकांनी फुलझाडे लावली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश रुजविण्यासाठी शिक्षकांनीसुद्धा प्रत्यक्षात वृक्षारोपण केले पाहिजे अशी अपेक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात शैक्षणिक सहलींना गेल्यावर रस्त्याच्या दुतर्फा पेरण्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या झाडांच्या बिया देण्यात आल्या. यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे (Wildlife Photographs) प्रदर्शन भरवण्यात आले होते. जगभर फिरून जंगलातील फोटो काढताना आलेले अनुभव शाळेचे माजी विद्यार्थी प्रणव नाईक, कौस्तुभ कामत, मिहीर लिडबिडे यांनी यावेळी सांगितले. मानवी हस्तक्षेपामुळे झालेली पर्यावरणाची हानी आपणच भरून काढली पाहिजे व प्राण्यांच्या प्रजाती टिकवल्या पाहिजेत असे आवाहन या माजी विद्यार्थ्यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हितचिंतक, बारामती येथील प्रगतीशील शेतकरी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ गजानन देशपांडे यांचे रविवार, दि. ३ जून २०१८ रोजी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. संस्थेच्या बारामती येथील कै. गजानन भीवराव देशपांडे (पूर्वीचे एमईएस हायस्कूल) या शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे ते दीर्घकाळ सदस्य आणि अनेक वर्ष अध्यक्ष होते. शाला समितीचे देखील अनेक वर्ष सदस्य होते. एमईएस हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या हरिभाऊ देशपांडे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि शाळा यांच्याबद्दल असलेल्या आत्मीयतेपोटी मुक्तहस्ते देणगी दिली होती. त्यांनीच दिलेल्या भूखंडावर आज बारामतीमधील ‘एमईएस इंग्लिश मिडीयम स्कूल’ ही शाळा उभी आहे. 

कै. हरिभाऊ देशपांडे यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली.

दै. महाराष्ट्र टाईम्सने पुण्यात स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित केलेले मटा एज्युफेस्ट २०१८’ हे शैक्षणिक प्रदर्शन आज,दि. २ जून रोजी सकाळी सुरु झाले. दि. २ आणि ३ जून असे दोन दिवस चालणाऱ्या या शैक्षणिक प्रदर्शनात आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ५ आणि ६ क्रमांकाचे स्टॉल आहेत. या प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.०० अशी आहे. आपल्या संस्थेच्या शाखांपैकी आयएमसीसी, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स – बी.बी.ए., आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे बायोटेक्नॉलॉजी आणि बायोडायव्हर्सिटी हे विभाग तसेच दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्र या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. आपल्या संस्थेच्या स्टॉल्सना सर्वांनी अवश्य भेट द्यावी.

 

टाटा कॅपिटल लिमिटेडच्या कॉर्पोरेट सस्टॅनिबिलीटी विभागाच्या प्रमुख श्रीमती राधा सुळे आणि टाटा उद्योग समूहातील माजी उच्चाधिकारी श्री. मनोहर परळकर यांनी शुक्रवार, दि. २५ मे २०१८ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. केतकी मोडक आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मूलभूत शिक्षणाबरोबरच आरोग्य विज्ञान, जैवविविधता, महिला सक्षमीकरण या आणि अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. टाटा उद्योग समूह सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून अशा उपक्रमांना कायमच पाठबळ देत आला आहे. दोन्ही संस्थांनी स्वातंत्रपूर्व काळापासून जपलेली सामाजिक बांधिलकी लक्षात घेता समान दृष्टीकोन आणि समान ध्येय डोळ्यासमोर ठेऊन भविष्यकाळात एकत्रितपणे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देण्याविषयी यावेळी उभय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली.

‘आय.एम.सी.सी.’ मध्ये मिळाली करिअरला दिशा

करिअर म्हणजे केवळ आर्टस्‌, कॉमर्स किंवा बी.ई, एम.बी.बी.एस. नव्हे तर व्यक्तिच्या जीवनात प्रगतीच्या संधी मिळवून देणारा व्यवसाय असतो. यशस्वी करिअर घडवण्यासाठी अनेक घटक महत्वाचे असतात. यात शिक्षण, आपला दृष्टीकोन, आपली अंगभूत कौशल्ये, सवयी, क्षमता हे सारे घटक महत्वाचे असतात. केवळ दहावी, बारावीच्या मार्कवर करिअरची दिशा न ठरवता आणि कोणत्या क्षेत्रात किंवा विषयात जास्त संधी आहेत याचा विचार न करता, आपली आवड व क्षमता यानुसार करिअर निवडले तर त्यात यशस्वी होता येते. हाच विचार घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि करिअर कोर्सेस म्हणजेच ‘आय.एम.सी.सी.’ या संस्थेने बुधवार, दिनांक २३ मे २०१८ रोजी मोफत ‘करिअर गाईडन्स सेमिनार’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. रवींद्र वैद्य यांनी संस्थेच्या वतीने उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले. त्यानंतर ‘आय.एम.सी.सी.’ चे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

प्राध्यापिका सौ. जयश्री पाटील यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे (वाय. सी. एम. ओ. यू.) तसेच ‘आय.एम.सी.सी.’तर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘डिजिटल मार्केटिंग’ सारख्या विविध स्वायत्त कोर्सेसची माहिती दिली. 

देशपी फाऊंडेशनचे वेदार्थ देशपांडे यांनी ‘डिजिटल मार्केटिंग : काळाची गरज’ या विषयी आणि सन्मित शहा यांनी ‘प्रॅक्टिकल बी. कॉम.’ या कोर्सबाबत माहिती दिली. 

या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील अनेक प्रश्नांविषयी तज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी मोरे यांनी केले.