news

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील वाढीव बांधकामाचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शनिवार, दि. २० ऑगस्ट २०१६ रोजी करण्यात आले. या प्रसंगी बोलताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर. ((डावीकडून, बसलेले) संजय इनामदार, राजीव सहस्रबुद्धे, डॉ. प्र. ल. गावडे , एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), डॉ. यशवंत वाघमारे, डॉ. संतोष देशपांडे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय (भावे स्कूल) या शाळेच्या वतीने “सामाजिक रक्षाबंधन – संदेश पर्यावरणाचा” या उपक्रमाअंतर्गत “ई कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर” या अभियानाची सुरवात रविवार, दि. २१ ऑगस्ट २०१६ रोजी टिळक चौकात (अलका टॉकीज चौक) झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला जाहीर झाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवार, दि. १८ ऑगस्ट २०१६ रोजी देण्यात आला.
२०१५-१६ वर्षासाठीचा हा पुरस्कार असून शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तो देण्यात येतो.

“शाळेने दिलेले संस्कार भावनांच्या कोलाहलात विसरू नका” – डॉ. अनिरुद्ध देशपांडे
“आपल्या हेतूबद्दल स्वच्छ असलं पाहिजे त्यामुळे जीवनाचा उद्देश कळतो, योग्य-अयोग्य काय हे कळलं पाहिजे त्यामुळे शरीर सुदृढ राखता येतं, जीवनात प्रमाणबद्धता असली पाहिजे त्यामुळे काय बोलावं, कोणाकडे किती वेळ जावे आदी गोष्टी कळतात, विनोदबुद्धी जागृत असली पाहिजे त्यामुळे निर्व्याज्यपणे हसता येतं आणि आपल्या जीवनाचा अर्थ कळला पाहिजे ही चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकल्याची लक्षणे आहेत. तुम्ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या फार मोठी परंपरा असलेल्या संस्थेचे विद्यार्थी आहात ही भाग्याची गोष्ट आहे. शाळेने दिलेले संस्कार भावनांच्या कोलाहलात विसरू नका,” असा आपुलकीचा सल्ला ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिला.
मार्च-एप्रिल २०१६ मध्ये माध्यमिक शालांत (इयत्ता १० वी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १२ शाळांमधील ४४ विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ बुधवार, दि. ३ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी ४ वाजता पुण्यातील म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात (असेंब्ली हॉल) आयोजित करण्यात आला होता. डॉ. अनिरूद्ध देशपांडे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला.
या कार्यक्रमाला मा. दिनकर टेमकर शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे – १ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, सचिव डॉ. संजय देशपांडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ बारामती येथील कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या ईशस्तवनाने झाली.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मान्यवरांचा परिचय, स्वागत तसेच प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
संस्थेने आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके निबंध स्पर्धा आयोजित करण्यास सुरूवात केली आहे. २०१५-१६ हे त्याचे पहिलेच वर्ष. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आणि तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रत्येक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मा. टेमकर यांच्या हस्ते प्रातिनिधक स्वरूपात पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. या मराठी भाषेतील निबंधासाठी कु. अनघा योगेश उबाळे, कु. प्रथमेश दिलीप कोल्हाळे आणि कु. श्रुतिका महेंद्र कुंडा या तिघांना तर कु. साक्षी सचिन घोलप, कु. सानिका गणेश मोरे आणि कु. सृष्टी तुषार करमळकर या तिघांना इंग्रजी भाषेतील निबंधासाठी पुरस्कार देणात आले. श्री. अजिंक्य देशपांडे यांनी यावेळी या स्पर्धेविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीची जोपासना करण्यासाठी आणि त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी भारत सरकारच्या वतीने सी.आय.ए.एस.सी. स्पर्धा घेण्यात येते. वाघीरे हायस्कूलचे महामात्र डॉ. अंकुर पटवर्धन यांनी ही स्पर्धा आणि स्पर्धेत शाळेला मिळालेल्या यशाबाबत यावेळी माहिती दिली. दोन स्तरावर घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत आपल्या संस्थेच्या सासवड येथील वाघीरे हायस्कूलची पहिल्या स्तरावर निवड झाली होती. २०१६-१७ वर्षासाठी देशभरातून निवडण्यात आलेल्या केवळ ३३ शाळांमध्ये वाघीरे हायस्कूलचा समावेश होता. “बौद्धिक स्वामित्त्व हक्क” या विषयावर दिल्ली येथे कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यानंतर शाळेने सादर केलेल्या सुधारित प्रकल्पाला दुसऱ्या स्तरावर देशभरातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या वैष्णव सुखदेव बारवकर, प्रथमेश दिलीप कोल्हाळे, श्रेयस गजानन यादव आणि रोहित अनिल दीक्षित या चार विद्यार्थ्यांचा सत्कार मा. टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला. हे सर्व विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी दिल्ली येथे जाणार आहेत.
या विशेष पुरस्कार वितरणानंतर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेची उंची वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून ते म्हणाले, “आईवडिल आणि गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. आपली प्रतिमा आपल्यालाच निर्माण करावी लागते. विमान जसं वरती जातं तसंच ते परत खालीही येतं. त्यामुळे पाय जमिनीवर राहातील याचे भान ठेवा. आपल्या जीवनात समाजाचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामुळे समाजाला परत द्यायला शिका. जसे मोठे व्हाल तसे अमिषांपासून, व्यसनांपासून दूर राहा. शाळेबाहेरच्या टपऱ्यांवर जिथे अमली पदार्थ विकले जात असतील तिथे प्रयत्नपूर्वक ही विक्री रोखली पाहिजे, त्यासाठी एक कार्यक्रमच राबवण्याची गरज आहे. तुमचे वय स्वप्न बघण्याचे आहे, पण अशीच स्वप्न बघा जी झोपू देत नाहीत. आपले आरोग्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे तब्ब्येत कमवा. ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा. आम्हाला तुमचा अभिमान आहेच, पण आयुष्यात असे काही करा की आईवडिलांना आणि गुरुजनांनाही तुमचा अभिमान वाटेल.“
या नंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते १० वी आणि १२ वी च्या परिक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. मृण्मयी अभिजित चितळे, अथर्व विनय पारसवार, आशा लहू कानतोडे या पारितोषिक प्राप्त गुणवंतांनी या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण उपसंचालक मा. टेमकर म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे, भरपूर खेळलं पाहिजे. व्यसनांपासून दूर राहा. ज्ञान आणि व्यवहार ज्ञान यांची सांगड घालायला शिका. समाज आणि देशाला आपला काय उपयोग होईल याचा विचार करा. देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले? याचा विचार करा. चांगले नागरिक व्हा.”
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिरूद्ध देशपांडे विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना म्हणाले, “संपूर्ण आयुष्य तुमच्यासमोर आहे. ते कसे व्यतित करायचे, कोणकोणत्या गोष्टींचे भान राखायचे हे आता तुम्हालाच ठरवायचे आहे, तुमच्यासमोर संधींचे आकाश खुले आहे. जीवनात स्पर्धा महत्त्वाची आहे पण स्पर्धा हे जीवनाचे तत्वज्ञान बनता कामा नये. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही, तंत्रज्ञान हे माहिती जमा करण्याचे साधन आहे. माहिती म्हणजे ज्ञान नाही, तसे असते तर सर्वच ग्रंथालये महान ठरली असती आणि त्यातील ग्रंथ हे ऋषी झाले असते. ज्ञानाचे स्वरूप विस्तृत आहे. निसर्गात जाऊन आनंद लुटला पाहिजे तो आनंद कॉम्प्युटर देऊ शकणार नाही. कोणताच हुशार विद्यार्थी आता पुढे जाऊन शिक्षक व्हायचे आहे असे म्हणत नाही. कोणीच शिक्षक होण्यास तयार नसेल तर भविष्यात विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? शिक्षक होणे म्हणजे पिढी घडवणे आणि त्या महत्त्वाकांक्षेसारखा आनंद दुसऱ्या कशातच नाही. जीवनात तळमळ ही फार महत्त्वाची असते. कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका अंगी उद्दामपणा येऊ देऊ नका. कृतघ्नता हा सर्वात मोठा दुर्गुण आहे, कृतज्ञता बाळगता आली पाहिजे. नव्या संस्कारांना सामोरे जाताना कसोटी लागते पण पर्यावरणाचे रक्षण करणे, प्लॅस्टिकचा वापर टाळणे, पाण्याची आणि अन्नाची नासाडी होऊ न देणे यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टीतून जीवनाला दिशा मिळते. आपल्याकडे कौशल्य असणे आवश्यकच आहे पण दुसऱ्याकडे असलेल्या कौशल्याचा आदर करायला शिकले पाहिजे. समुहात राहिले म्हणजे अहंकार कमी होतो, निखळ आनंद घेता येतो. मूल्यसंपन्न जीवन जगणे ही आपण शाळेला दिलेली खरी भेट असते. श्रमाशिवाय एकही पैसा मिळवण्याची इच्छा करू नका आणि आपला देश, आपला समाज यांच्याबद्दल मनात कधीही तुच्छतेचा भाव निर्माण होऊ देऊ नका. आपला देश आणि समाज जसा आहे तसा स्वीकाराला पाहिजे आणि अपेक्षित आहे तसा घडवला पाहिजे,”
संस्थेचे सचिव डॉ. संजय देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
बारामती येथील कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी गायलेल्या पसायदानाने या आनंद सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील शिक्षिका श्रीमती प्रिती धोपाटे यांनी केले.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या विद्यार्थीनींनी संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रिकर यांना शनिवार,दि. ३० जुलै २०१६ रोजी मानवंदना दिली. श्री. पर्रिकर एका कार्यक्रमासाठी संस्थेच्या मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात आले होते. त्यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल(निवृत्त) श्री.भूषण गोखले, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश मालखरे, नियामक मंडळ सदस्या आणि शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवीताई मेहेंदळे आदी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं या वेळी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन सैनिकी शाळेतील विद्यार्थीनींच्या भवितव्याच्या दृष्टीने मागण्यांचे एक निवेदन त्यांना दिले. सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी लष्कराच्या चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत (OTA – Officer’s Training Academy) काही जागा राखीव ठेवण्याबाबत आपण विचार करू असं पर्रिकर यांनी या वेळी सांगितलं.
म.ए.सो. ची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही निवासी शाळा असून राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. सध्या या शाळेत ६५० विद्यार्थीनी इ. ५ वी ते इ. १२ वीचे शिक्षण घेत आहेत. शाळेच्या सध्याच्या मंजूर शुल्क रचनेत बदल करण्याची तसेच या विद्यार्थीनींना संरक्षण दलात प्रवेश मिळावा यासाठी संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. शाळेत कठोर लष्करी प्रशिक्षण घेऊनही या विद्यार्थीनींना संरक्षण दलात थेट प्रवेश मिळण्याची कोणतीही योग्य संधी उपलब्ध नाही. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी त्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागत आहे. परिणामी शाळेचा मूळ उद्देशच बाजूला पडत आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती संस्थेनं दिलेल्या निवेदनात संरक्षण मंत्र्यांना केली आहे.
लष्करी प्रशिक्षणाबरोबरच यथोचित शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने इयत्ता १२ वी नंतर या विद्यार्थीनींच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सातत्य राहात नाही. केंद्र आणि राज्य सरकारनं सहकार्य आणि मार्गदर्शन केल्यास या विद्यार्थ्यीनींना संरक्षण दलात प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक असलेल्या पुढील अभ्यासक्रमांसाठी नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे आव्हान स्वीकारण्यास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तयार आहे, असं संरक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. याशिवाय मुलांच्या सैनिकी शाळेप्रमाणेच मुलींच्या सैनिकी शाळेलाही केंद्र सरकारने विविध योजनांमधून वेतनेतर अनुदान द्यावे, विशेष बाब म्हणून शाऴेमधे एन.सी.सी. युनिटला मान्यता द्यावी, क्रीडा विषयक सोयी-सुविधांसाठी केंद्र सरकारनं आर्थिक सहाय्य द्यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

“शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, खोड्या, मारामाऱ्या मला आज आठवत आहेत. आज मला जे प्रेम, जिव्हाळा मिळाला तो अनमोल आहे, त्याबद्दल मी आभार मानणार नाही, तो मी ह्रदयात जपून ठेवत आहे. पुनर्जन्म मिळाला तर मी पुण्यातच जन्माला येईन आणि भावे हायस्कूलचाच विद्यार्थी होईन,” अशा शद्वात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
निमित्त होतं बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95 व्या वाढदिवसाचं. 29 जुलै 1922 हा बाबासाहेबांचा जन्मदिवस. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचं शिक्षण झालं. ते ज्या वर्गात शिकले त्याच वर्गात शाळेनं आपल्या या माजी विद्यार्थ्याचा आगळावेगळा सत्कार समारंभ आयोजित केला होता. शाळेतील यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, शाळेचे मुख्याध्यापक प्रा. के. एन. अरनाळे आणि सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश मालखरे उपस्थित होते.
शाळेतील राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी (एन.सी.सी.) मानवंदना देऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं शाळेच्या आवारात स्वागत केलं. त्यानंतर शाळेतील शिक्षिकांनी बाबासाहेबांचे औक्षण केले. शाळेच्या प्रवेशद्वारापासून बाबासाहेब ज्या वर्गात शिकले त्या वर्गापर्यंत पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापकांच्या खोलीच्या शेजारच्याच खोलीत बाबासाहेबांचा वर्ग होता. तिथे वेदमंत्रांच्या उच्चारांनी बाबासाहेबांने अभिष्टचिंतन करण्यात आले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील जिवंत देखावा साकारून बाबासाहेबांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या राष्ट्रपुरूषांच्या प्रसिद्ध घोषवाक्यांचा जयजयकार या विद्यार्थ्यांनी या वेळी केला. “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीति …” हे स्फूर्तिगीत यावेळी या विद्यार्थ्यांनी सादर केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बाबासाहेबांनीच लिहीलेल्या ‘हिरकणी’ या कथेची समिक्षा सौ. रमा लोहोकरे यांनी सादर केली आणि त्यानंतर या कथेचे अभिवाचन शाळा समितीचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पुरंदरे, सौ. गौरी पुरंदरे, सौ. प्रमिला सातपुते, अतुल दळवी आणि सौ. सुनीता खरात यांनी केले. हा सर्व कार्यक्रम बाबासाहेब अत्यंत तन्मयतेने अनुभवत होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधताना ते म्हणाले की, “ही कथा ऐकत असताना मी मनाने रायगडावरच होतो. आजपर्यंत मी जे काही केलं आहे ते शाळेनं केलेल्या संस्कारामुळेच करू शकलो आहे. मी 95 वर्षांचा झालो असलो तरी शाळेनं आज दिलेलं प्रेम, जिव्हाळा पाहून मला लहानच राहावं असं वाटतं आहे. आजचा हा आगळावेगळा सोहळा पाहून मी थक्क झालो आहे. आज इतक्या वर्षांनी मी शाळेच्या या वेगळ्याच जगात आलो आहे. देवानं मला विचारलं तर मला पुन्हा या पुण्यातच जन्माला यायचं आहे आणि भावे हायस्कूलमध्येच शिकायचं आहे. शाळेतल्या अनेक घटना अजूनही मला आठवत आहेत. शाळेतल्या लेले सरांनी भूगोल शिकवताना हे विश्व किती मोठं आहे आणि आपण त्यात किती कणभर आहोत हे सांगतानाच आपल्यातही आकाशाएवढं होण्याची क्षमता आहे हे लक्षात आणून दिलं होतं. त्यामुळे खूप शिका, खूप दंगा करा, खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि आज माझ्यावर केलंत तसंच शिवचरित्रावर प्रेम करा.”
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रा. के.एन. अरनाळे यांच्या हस्ते मानपत्र अर्पण करण्यात आलं. तसंच मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी शिक्षकांच्या वतीने श्री. पी. के. कुलकर्णी यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीनं सासवड येथे वाघीरे विद्यालयाच्या आवारात स्थापन केलेल्या इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड या इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि. १५ जुलै २०१६ रोजी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी या शाळेत प्रवेश घेतलेल्या छोट्या दोस्तांच्या समवेत केले.
सासवडमधील पालकांचा संस्थेशी दीर्घकाळापासून परिचय असल्याने संस्थेची ही शाळा, इंग्रजी माध्यमाची असली तरी या शाळेत भारतीय परंपरेनुसारच संस्कार होतील असा विश्वास पालकांनी या वेळी व्यक्त केला.
या आनंद सोहळ्याला संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष मा. विवेक शिंदे, संस्थेचे सचिव मा. डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य मा. भालचंद्र पुरंदरे, मा. शामाताई घोणसे, संस्थेच्या आजीव मंडळाचे सदस्य आणि म.ए.सो. वाघीरे प्रशालेचे महामात्र मा. अंकुर पटवर्धन, मा. श्रीमती सविता काजरेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जगदीश मालखरे, माजी आजीव सदस्य मा. वि. ना. शुक्ल, मा. आर. व्ही. कुलकर्णी, आणि वाघीरे शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन इमारतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेला शुभेच्छा दिल्या आणि शाळेची सूत्रे समन्वयक श्रीमती शलाका गोळे यांच्याकडे सुपूर्द केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रमुख श्रीमती मेघा जांभळे यांनी केले.

सोमवार दि.27/03/17 रोजी कालीदास कलामंदिर, नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार वर्ष 2015-16 व 2016-17 साठी एकत्रित देण्यात आले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची 156 वर्षांची उज्वल परम्परा  व आदिवासी मुली- मुलांसाठी संस्थेने दिलेले योगदान,त्याच बरोबर देशातील पहिल्या मुलींच्या सैनिकी प्रशालेमध्ये गिरिकन्याना मिळत असणारे सैन्य प्रशिक्षण  व त्यांचे सक्षमीकरण या सर्वाचा विचार करुन शासनाने सदर पुरस्कार सैनिकि प्रशालेस दिला.
सदर पुरस्कारामध्ये 50,001/- रु. धनादेश, प्रमाणपत्र व शाल श्रीफळ इत्यादीचा सामावेष होता.
सदर पुरस्कार देण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना.श्री.विष्णु सवरा तसेच ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे, मा.मनिषा वर्मा सचिव ,आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन तसेच नाशिकच्या प्रथम नागरिक व महिला महापौर मा.रंजनाताई भानसी  आदि मान्यवार उपस्थित होते.महराष्ट्रातील 16 व्यक्तीना व 7 संस्थाना आदिवासी सेवक व सेवा  संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आदिवासी सेवक संस्था कार्यकर्ते उपस्थित होते. म ए सोसायटी तर्फे श्रीमती चित्रा नगरकर तसेच सैनिकि प्रशालेतर्फे प्राचार्या पूजा जोग, उप-प्राचार्य श्री.अनंत कुलकर्णी यानी सदर पुरस्कार स्विकारला. या देखण्या व भव्य-दिव्य कार्यक्रमाचे नियोजन व कार्यवाही आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक श्री.राजीव जाधव यानी केली. सदर पुरस्कार सैनिकी प्रशालेस मिळाल्याने संस्था पदधिकारी व समाजातून प्रशालेच्या कामाचे कौतुक होत आहे.