गरवारे कॉलेजमधील संगणक प्रयोगशाळेचे मा. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

खासदार निधीतून उभारणी

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) मधील संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. ५ ऑक्टोबर २०२४) करण्यात आले. मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. मा. श्री. जावडेकर यांनी या वेळी शिक्षणातील नवीन संधी, नवीन तंत्रज्ञान, वर्तमानकाळातील घडामोडी या विषयी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.

याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, महाविद्यालयाच्या विकास समितीचे मा. अध्यक्ष सीए राहुल मिरासदार, प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, संस्थेच्या निमायक मंडळाचे मा. सदस्य, संस्थेचे मा. सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मा. सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, महाविद्यालयातील प्राध्यापक आदी  मान्यवर उपस्थित होते. मा. श्री. जावडेकर यांचे महाविद्यालयातील १९७१ च्या बॅचचे सहाध्यायी या वेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

या वेळी बोलताना मा. श्री. जावडेकर म्हणाले, “नाविन्याला, संशोधनाला प्रोत्साहन देणारे शिक्षण आणि अभ्यासविषयांच्या निवडीतील लवचिकता ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आवडीच्या विषयांचे शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना शक्य झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या नवीन तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, यासंबंधात होत असलेल्या नकारात्मक चर्चेत अर्थ नाही. भारतात संगणक आले तेव्हा बहुतेकांनी त्याला विरोध केला. पण आज आपण त्या क्षेत्रात खूप प्रगती केली असून मोबाईल फोनचे उत्पादन करणारा भारत हा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांच्या किंमतीपेक्षा तंत्रज्ञानातील संशोधनाचे मूल्य अधिक असते. महाविद्यालयीन शिक्षणात आपल्या आवडीचे विषय निवडण्याची परवानगी आता विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे एकाच वेळी दोन अभ्यासशाखांची पदवी मिळवणे शक्य झाले आहे. ‘स्वयं’च्या माध्यमातून दोन हजारांपेक्षा अधिक मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत. काही कारणाने शिक्षणात खंड पडला तरी दोन वर्षांच्या आत शिक्षण पुन्हा सुरू करता येते. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि झोकून देऊन मनासारखे शिक्षण घ्यावे.”

महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ‘बस नं. १५३२’ या पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकेतील विद्यार्थी कलाकार आणि पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘मिस पुणे’ किताब मिळालेली विद्यार्थिनी सुहानी नांदगुडे यांचा सत्कार  मा. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देताना त्यांनी साहित्य चर्चा मंडळ, वक्तृत्व, संगीत, कलामंडळ, हस्तलिखित पाक्षिक ‘निनाद’ अशा उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा. श्री. बाबासाहेब शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही कोणाही एका व्यक्तीच्या मालकीची संस्था नसून माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शिक्षकांनी चालवलेली संस्था आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार व परवडणारे शिक्षण देण्यासाठी संस्था माजी विद्यार्थी आणि संस्थेचे हितचिंतक यांच्या माध्यमातून निधी जमा करून पायाभूत सुविधा निर्माण करते. मा. श्री. प्रकाश जावडेकर हे संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांनी दिलेल्या निधीतून ही संगणक प्रयोगशाळा उभी राहिली आहे. भविष्यातदेखील ते संस्थेला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात, संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाशी जोडले जाण्याचे तसेच आर्थिक स्वरुपात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन माजी विद्यार्थ्यांना केले.

प्राचार्य डॉ. देसर्डा यांनी आभारप्रदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा केला जातो. योग हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे, ज्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेचा समावेश आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक सुदृढता आणि मानसिक संतुलन साधता येते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. वर्षभर योगाभ्यास करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

मएसो भावे प्राथमिक शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मुक्त हालचाली घेण्यात आल्या. इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले. तसेच ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, भुजंगासन, पद्मासन इ. आसने विद्यार्थ्यांनी करुन दाखविली आणि मनोरे सादर केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी रोज सूर्यनमस्कार घालण्याचा व योगासने करण्याचा संकल्प केला.

मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागातर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये इ. १२ वी मधील सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. क्रीडा शिक्षक श्री. सुनील तनपुरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन इत्यादी विविध आसनांचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. त्यांनी आसनांचे प्रात्यक्षिक योग्य पद्धतीने कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना योगाचे तंत्र समजून घेण्यास मदत झाली. तसेच शिक्षणाच्या परिपूर्णतेसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व त्यांना पटवून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योगाभ्यासाला आपल्या आयुष्यामध्ये नियमित भाग बनवण्याचा निर्धार केला.

बारामतीमधील मएसो कै. ग. भि. देशपांडे माध्यमिक विद्यालयात तीन हजार विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी एकाच वेळी सामूहिक योगाभ्यास करून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला. विद्यालयातील योगशिक्षक श्री. दादासाहेब शिंदे यांनी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन, पद्मासन, बद्धकोनासन, वज्रासन, शशांकासन, कपालभाती, शुद्धीकरण क्रिया, भ्रामरी प्राणायाम, ओमकार, सूर्यनमस्कार यांची सामुहिक प्रात्यक्षिके करून घेतली. प्रात्यक्षिकांचे विवेचन क्रीडाशिक्षक श्री. अनिल गावडे यांनी केले.

मएसो रेणावीकर माध्यमिक विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरमधील विद्याधाम या संस्थेतील योगशिक्षक श्री. संजय सुरसे व योगशिक्षिका सौ. स्वाती सोनसळे हे उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम केला. शाळेतील सर्व शिक्षकांनी योगाभ्यासात सहभाग घेतला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये अशाचप्रकारे उत्साहाच्या वातावरणात आजचा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांनी इ. १0 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

खालील तक्त्यामध्ये प्रत्येक शाखेच्या निकालाच्या टक्केवारीचा तपशील दिला आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांनी इ. १२ वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

खालील तक्त्यामध्ये प्रत्येक शाखेच्या निकालाच्या टक्केवारीचा तपशील दिला आहे. 

सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा! 

मएसो मुलांचे विद्यालय (भावे स्कूल) चे आहेत माजी विद्यार्थी
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख (ATS Chief) सदानंद दाते यांची आज (बुधवार, दि. २७ मार्च २०२४) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली.
नवीन नियुक्तीबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे सदानंद दाते यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
सदानंद दाते हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आहेत.  मएसो मुलांचे विद्यालय (भावे स्कूल) मधून १९८२ साली ते इ. १० वी ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
भारतीय पोलीस सेवेतील १९९० च्या तुकडीचे अधिकारी असललेल्या दाते यांनी मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय शौर्य दाखवले होते. त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे. केंद्रातही सीआरपीएफमध्ये प्रतिनियुक्तीवर त्यांनी काम केले आहे.

जग्वार, मिराज – २०००, सुखोई – ३०, तेजस, राफेल अशी नावं ऐकली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. सैन्यदलांची प्रात्यक्षिके आणि त्यांचे विविध माध्यमातून होणारे प्रसारण, चित्रपट आणि व्हिडीओ गेम्स, क्वचित प्रसंगी दूरवर आकाशात होणारे दर्शन एवढाच तो काय आपला या लढाऊ विमानांशी येणारा संबंध. त्याचा प्रत्यक्ष थरार अनुभवण्याची संधी फारच दुर्मिळ. या लढाऊ विमानांच्या मॉडेलची प्रात्यक्षिके आपल्याला काही प्रमाणात का होईना त्या थराराचा अनुभव देऊन जातात, एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. ‘दुधाची तहान ताकावर …’ अशी भावना निर्माण करत ही प्रात्यक्षिके आपल्या मनात लढाऊ विमानांबद्दलची उत्सुकता ताणून जातात. ड्रोनच्या रुपाने झालेल्या क्रांतीमुळे आता तर वैमानिकाशिवाय विमान ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे.

सैन्यदलात दाखल होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी तर असा ‘एरो मॉडेलिंग शो’ म्हणजे त्यांच्या आकांक्षांना मिळणारे खतपाणीच! त्यासाठीच पिरंगुटनजिक कासारआंबोली येथे असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत अलिकडेच ‘एरो मॉडेलिंग शो’ आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे,  उपाध्यक्षा आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होते. पिरंगुट परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना देखील या वेळी मुद्दामहून बोलविण्यात आले होते.

सदानंद काळे व अथर्व काळे यांनी विविध विमानांच्या मॉडेलच्या माध्यमातून ही प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये भारतीय वायुदलाकडे असलेल्या सुखोई – ३०, तेजस, राफेल इत्यादी विविध लढाऊ विमानांच्या मॉडेलबरोबरच उडणारा गरुड, मासा, उडती तबकडी, बॅनरसह पुष्पवृष्टी करणारे विमान यांचा देखील समावेश होता.

देशाच्या राजधानीत या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्यदलातील महिलांच्या लक्षणीय  सहभागामुळे “हाय जोश” मध्ये असलेल्या सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींना ही रोमहर्षक प्रात्यक्षिके बघून “गगन ठेंगणेच” वाटायला लागले होते. अशा वातावरणात “इच्छाशक्ती पुढे सर्व अडथळे हार मानतात, त्यामुळे आयुष्यात कधीही हार मानू नका.” हा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि पॅराऑलिंपियन पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी दिलेला संदेश विद्यार्थिनींसाठी मोलाचा ठरला.

“युद्धामध्ये पायलट विरहित विमानांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे एरो मॉडेलिंगचे शिक्षण घेऊन आजच्या पिढीने सैन्यातील ही नवीन संधी ओळखावी आणि आपल्या भारत देशाच्या सेवेसाठी आपले योगदान द्यावे,” अशा शद्बात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थिनींच्या मनावर कोरले गेले.

 

 

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, नाटककार, कथाकार, कांदबरीकार आणि समिक्षक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कुसुमाग्रज यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांनी अथक मेहनत घेतली. त्यामुळे मातृभाषेचा गौरव करण्यासाठी व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिनवादन करण्यासाठी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

म. ए. सो. पूर्व प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना समजावून  सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, स्त्री साक्षरतेचे महत्व पटवून देणारे सावित्रीबाई फुले आणि म. ज्योतिबा फुले, ताराबाई मोडक तसेच मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक वि. वा.शिरवाडकर तथा कवि कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, कवयित्री शांता शेळके  यांच्या व्यक्तीरेखा विद्यार्थ्यांनी या प्रसंगी सादर केल्या. या कार्यक्रमाला म.ए. सो. भावे प्राथमिक शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. वृषाली ठकार आणि आदर्श शिक्षिका मा. सौ. दीपाली कुलकर्णी यांना निमंत्रित करण्यात आले होते. सौ. दीपाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना खूप छान गोष्ट सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन नृत्यगीते सादर केली. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

कळंबोली येथील एम. ई. एस. पब्लिक स्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिना’चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला.   महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिवसाचे महत्त्व सांगितले. ह्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी समुहगीते सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे मराठी दिवसाचे महत्त्व सांगितले. अशाप्रकारे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ अनुवादिका श्रीमती उमा कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘माझा प्रवास’ (भाषांतर ते अनुवाद) हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

*****************************************************************************************************

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाराव्या ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या बेसबॉल खेळाडू कु. रेश्मा पुणेकर यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. १९ जानेवारी २०२४) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे होते.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, संस्थेचे सहाय्यक सचिव श्री. सुधीर भोसले, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी आणि मा. राजीव देशपांडे , मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. विजय भालेराव, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, संस्था समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी आदी मान्यवर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता तावरे या देखील या वेळी उपस्थित होत्या. ही स्पर्धा दि. १९ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.

जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या क्रीडा ज्योतीचे स्वागत प्रमुख पाहुण्या रेश्मा पुणेकर यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

“विद्यार्थ्यांनी स्वतःचे आरोग्य व्यवस्थित ठेवले पाहिजे. बंद खोलीतील खेळ खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा. खेळातून आरोग्य तर सुधारतेच पण मन, मेंदू आणि मनगटाचा विकास होतो. खेळाच्या माध्यमातून देखील चांगले करीअर करण्याच्या संधी असतात,” असे विचार मा. कु. रेश्मा पुणेकर यांनी मांडले.

“इ. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य प्रमाणात ‘मएसो क्रीडा करंडक’ स्पर्धा भरवून ‘मएसो’ ने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात वेळ वाया न घालवता त्याकडे पाठ फिरवून मैदानावर यावे,” असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना केले.

या स्पर्धेत सात जिल्ह्यांतील ‘मएसो’ च्या प्राथमिक शाळा तसेच बारामती शहर व परिसरातील सतरा प्राथमिक शाळांमधील बाराशे खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत सूर्यनमस्कार, डॉजबॉल, गोल खो-खो, लंगडी या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. प्रतिस्पर्ध्यांना बाद करण्याची जिद्द आणि नजरेतली भेदकता, हातात न मावणारा बॉल सांभाळत नेमका वेध घेताना लावलेला जोर, पाठलाग करणाऱ्या खेळाडूला चपळाईने चकवा देत दिलेला खोs आणि क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्सुकता अशा चैतन्यमयी वातावरणात लहानग्यांनी ‘मएसो क्रीडा करंडक स्पर्धे’तील मैदाने दणाणून गेली. लहानग्या खेळाडूंच्या आवेशपूर्ण चढायांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सत्रातील सामने आज रंगले. अनेक सामने अत्यंत रोमहर्षक आणि चुरशीचेही झाले.

स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, मएसो क्रीडावर्धिनीचे सदस्य, शाला समितीचे सदस्य, शाळेच्या सल्लागार समितीचे सदस्य, माजी शिक्षक, पालकवृंद, सर्व शाळांचे क्रीडाशिक्षक आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विजय भालेराव यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शंकर घोडे यांनी तर आभार प्रदर्शन मा. सुधीर भोसले यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्याना’त मुंबईस्थित ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ (फिन्स) या संस्थेचे सेक्रेटरी जनरल मा. डॉ. शेषाद्री चारी यांनी ‘बिगिनिंग ऑफ न्यू कालचक्र : इन लाईट ऑफ अॅन इंटरनॅशनल सिनॅरीओ’ या विषयावर मांडलेले विचार

 

मा. डॉ. शेषाद्री चारी यांच्या व्याख्यानाची महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी …

 

मा. डॉ. शेषाद्री चारी यांच्या व्याख्यानाची दै. सकाळ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी …

कोणत्याही साधनांशिवाय केलेले सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार, संगीताच्या तालावर केलेल्या सामुहिक कृतींमधून नजरेत भरणारी लयबद्धता, परस्पर समन्वय आणि सांघिक भावनेचे होणारे दर्शन, गंभीर मंत्रोच्चारासह घातलेले सूर्यनमस्कार आणि केलेली योगासने, सळसळत्या वयाला साद घालणाऱ्या उडत्या लयीच्या गाण्यांवरील एरोबिक्सची, संयम आणि सांघिकतेची जाणीव करून देणारे मनोरे, एरोबिक्स पॉम्पॉमवर थिरकणारी अल्लड पावले, ढोल-ताशाच्या तालावर खेळली गेलेली लेझीम अन् झांजा आणि शिवकन्यांचा जोशपूर्ण अविष्कार दाखविणारी शिववंदना बघून उपस्थितांची मने भारावून गेली होती, मनात नवी पिढी आणि भविष्यातील भारताबद्दलचा अभिमान भरून पावला होता. निमित्त होते, ‘युवा चेतना दिन’कार्यक्रमाचे!
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध क्रीडा प्रात्यक्षिके बघून सर्वचजण भारावून गेले.
म.ए.सो. तर्फे दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘युवा चेतना दिन’ साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या कार्यक्रमाला म.ए.सो.च्या माजी विद्यार्थिनी व आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे – साखरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीपजी नाईक हे होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य व म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव आणि संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
म. ए. सो. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (दि. १२ जानेवारी २०२४) हा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्नेहल शिंदे – साखरे म्हणाल्या, “शालेय वयातच आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न सुरू करा. सातत्याने प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते, कठोर परिश्रमांना पर्याय नसतो, अपयश आले तरी पाठ न फिरवता मेहनत केली तर त्याचे फळ मिळतेच. मला करावा लागलेला संघर्ष आणि मिळालेले यश यांची किंमत मला खेळामुळेच समजली. सोशल मिडियात अडकून पडलात तर आपले अनमोल जीवन व्यर्थ जाईल आणि विकतचे दुखणे मागे लागेल.”
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. प्रदीप नाईक म्हणाले की, आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोघांची जयंती आहे. संकल्पाची शक्ती या दोघांच्या जीवन चरित्रातून आपल्याला कळते. या दोघांचे जीवन सर्वांसाठी आदर्श आहे. त्याआधारे समाजजीवनात चेतना निर्माण केली पाहिजे.
ज्ञानोपासना आणि बलोपासना यांची आवश्यकता लक्षात घेऊन म.ए.सो. युवा चेतना दिन साजरा करत आली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींना जीवनात महत्त्व द्यावे,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विजय भालेराव यांनी केले. ते म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांप्रमाणे अनेक वीर घडवले, त्यांना सशक्त बनवले, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केली. स्वामी विवेकानंदांनी स्तासमुद्रापार आपला देश आणि आपली संस्कृती यांचा झेंडा फडकावला अशा कर्त्वृत्ववान महापुरुषांच्या देशात आपला जन्म झाला आहे त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. हेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेली १६३ वर्ष कार्य करणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आपण घटक आहोत. खेळाच्या माध्यमातून व्यायामाची आवड निर्माण व्हावी तसेच सशक्त आणि धैर्यवान विद्यार्थी घडावेत यासाठी म.ए.सो. क्रीडावर्धिनीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसज्ज क्रीडांगण, खेळांची साधने आणि प्रशिक्षणांची व्यवस्था करण्यात आली आहे. पारंपारिक तसेच आधुनिक क्रीडा प्रकारातील उत्तम खेळाडू घडावेत यासाठी क्रीडा शिक्षकांप्रमाणेच क्रीडा तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मएसो क्रीडा करंडक स्पर्धा, शाळा व महाविद्यालयांमध्ये ओपन जिमची उभारणी असे विविध उपक्रम म.ए.सो. क्रीडावर्धिनी राबवत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नेहा कुलकर्णी यांनी तर प्रात्यक्षिकांचे सूत्रसंचालन सौ. अर्चना लडकत यांनी केले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

निसर्ग नृत्य, स्कार्फ नृत्य, पाँम-पाँम नृत्य, टाळ नृत्य, टिपरी नृत्य, लेझीम असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून विद्यार्थ्यांनी ‘युवा चेतना दिन’च्या कार्यक्रमात उपस्थितांची मने जिंकली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे म. ए. सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी खेळ व शारीरिक प्रात्याक्षिके सादर करतात. यावर्षी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवी मुंबईमधील नवीन पनवेल, कळंबोली आणि बेलापूर या तीनही ठिकाणच्या विद्यालयांचा ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रम शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४.३० वाजता कळंबोलीतील म. ए. सो. ज्ञानमंदिर व म. ए. सो. पब्लिक स्कूल या विद्यालयांच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू मा. नामदेव बडरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. आनंद लेले, डॉ. गोविद कुलकर्णी, डॉ. रविकांत झिरमिटे, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे मा. नामदेव बडरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी म. ए. सो. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व मएसो गीत सादर केले.

मा. सुधीर भोसले यांनी म. ए. सो. च्या शाळांमध्ये क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. संजना बाईत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

विद्यार्थ्यांनी आपले शरीर सुदृढ ठेवावे आणि त्यासाठी दररोज व्यायाम करावा, बलोपासना करावी असा सल्ला मा. नामदेव बडरे यांनी मनोगत व्यक्त करताना दिला. तसेच संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि संस्थेचे नाव जगभर पसरावे यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात मा. बाबासाहेब शिंदे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.

ऑलिम्पिक खेळाडू आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त मा. ललिता बाबर यांनी युवा चेतना दिनाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास म. ए. सो. चे हितचिंतक, निमंत्रित, पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. कविता जगे यांनी केले.

शाळेचे महामात्र डॉ. रविकांत झिरमिटे यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाची सांगता म. ए. सो. ज्ञानमंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘वंदे मातरम्’ने झाली.

संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

“संपूर्ण महाराष्ट्रात ८ ते १० लाख विद्यार्थी स्पर्धा परिक्षांची तयार करतात, त्यापैकी दीड ते दोन लाख विद्यार्थी पुण्यात स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यात येतात. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर अधिकारी तयार होतात. सरकारी व्यवस्थेतून परिवर्तन घडवता येते. त्यामागे सेवेची भावना असणे महत्वाचे असते. केवळ जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिने स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचा विचार विद्यार्थ्यांनी करू नये. सध्या या स्पर्धा परिक्षांबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झाली आहे, परंतू या परिक्षांच्या तयारीतून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनाचे व्यापारीकरण न करता चांगले अधिकारी घडवण्याच्या हेतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र चालवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशा शद्बात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे यांनी संस्थेची भूमिका मांडली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व ज्ञानदीप अॅकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे मार्गदर्शन केंद्र चालवण्यात येणार आहे. त्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मा. बाबासाहेब शिंदे बोलत होते.

या वेळी प्रमुख वक्ते मा. निहाल राजश्री प्रमोद कोरे, ज्ञानदीप अॅकॅडमीचे संचालक मा. महेश शिंदे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागातील माजी अधिकारी मा. चंद्रकांत निनाळे व्यासपीठावर उपस्थित होते. महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मएसो गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार, दि. १३ जानेवारी २०२४ रोजी हा कार्यक्रम झाला.

या प्रसंगी बोलताना मा. निहाल कोरे म्हणाले की, स्पर्धा परिक्षांसाठी दीर्घकाळ कराव्या लागणाऱ्या तयारीमुळे वय हातून निसटते असा भ्रम निर्माण केला जातो परंतू, स्पर्धा परिक्षांची तयारी ही आपण आपल्यामध्ये केलेली गुंतवणुक आहे, त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र परिवर्तन होते. इतरांच्या दृष्टीने जेव्हा यशाची किंवा ध्येय गाठण्याची आशा मावळते तेव्हा आपल्याकडे ठाम विश्वास असायला हवा. स्वतःशीच संघर्ष करायचा असतो, त्यामुळे आपण स्थितप्रज्ञ असायला हवे. ध्येयप्राप्तीसाठी प्रतिकूल परिस्थितीत देखील सोईसुविधांची फिकीर न करता कष्ट करण्याची मानसिकता आवश्यक आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी नाकारण्यातली ताकद खूप मोठी असते. तारूण्य, त्याग, तपश्चर्या आणि संघर्ष यातून भव्य-दिव्य घडेल याची खात्री बाळगा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मा. महेश शिंदे म्हणाले की, स्पर्धा परिक्षांची तयारी नेमकी कशी करावी? याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या केंद्रामध्ये मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट ध्येय नसते. अस्तित्वाच्या संघर्षातूनच जीवनमान सुधारण्याचे ध्येय नजरेसमोर येते. आपण नेमके काय करत आहोत हे कळणे आवश्यक असते. सातत्याने केलेल्या प्रयत्नातूनच यश मिळते. त्यादृष्टीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहयोगाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दर आठवड्याला एका तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महागड्या कोचिंग क्लासमध्ये केले जाणारे मार्गदर्शन येथे सवलतीत मिळणार आहे. त्यामध्ये क्षमता विस्तारावर भर दिला जाणार आहे.

डॉ. विलास उगले यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक केले. स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्राथमिक स्तरापासून अभ्यासाची मजबूत पायाभरणी होणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्थेची तपशीलात माहिती असावी लागते. या गोष्टी लक्षात घेऊन संस्थेने ज्ञानदीप अॅकॅडमीच्या सहकार्याने मार्गदर्शनाची व्यवस्था निर्माण केली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

डॉ. किशोर देसर्डा यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला.

डॉ. शोभा करेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्रा. किसन कुमरे यांनी आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत गौरव कार्यक्रमात बोलताना राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर. याप्रसंगी उपस्थित (डावीकडून) डॉ. अतुल कुलकर्णी, मा. बाबासाहेब शिंदे, मा. प्रदीप नाईक व मा. सौ. आनंदी पाटील

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पीएच्. डी. प्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांसमवेत संस्थेचे पदाधिकारी (छायाचित्रात डावीकडून बसलेले) डॉ. राजीव हजिरनीस, सी.ए. राहुल मिरासदार, डॉ. अतुल कुलकर्णी, मा. बाबासाहेब शिंदे, मा. प्रदीप नाईक, प्रमुख पाहुणे मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सौ. आनंदी पाटील, श्री. सुधीर भोसले, डॉ. आनंद लेले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या आपल्या देशासाठी आगामी २५ वर्षे अत्यंत महत्वाची आहेत. विकसनशील देशाचे रुपांतर विकसित देशामध्ये करायची धुरा देशातील तरूण पिढीवर आहे. देशाच्या अमृतकाळात तरूण वर्गाला उद्यमी करण्यासाठी शिक्षण व्यवस्था त्यांच्यामध्ये शिक्षणाबरोबरच कौशल्यक्षमता कशी रुजवते यावर विकसित देश निर्माण होणे अवलंबून आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा बदल घडविणारे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण भविष्यातील भारतासाठी यशस्वी करणे आवश्यक आहे, ” असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी आज येथे व्यक्त केले.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व  पीएच्.डी. प्राप्त केलेल्या ४२  गुणवंत विद्यार्थी आणि    शिक्षकांचा गौरव समारंभ आज (सोमवार, दि. ८  जानेवारी २०२४) आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी डॉ. देवळाणकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत  होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा मा. सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी होते.

डॉ. देवळाणकर पुढे म्हणाले की, दरवर्षी १२ ते १३ लाख विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यामुळे सुमारे १२ अब्ज डॉलर इतका पैसा देशाबाहेर जातो. ही बाब आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. अतिशय बुद्धिमान विद्यार्थी देशाबाहेर जात असल्याने आपल्या देशातील शिक्षणात दर्जात्मक सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता होती. ती पूर्ण करण्यासाठी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२४ – २५ वर्षात देशात लागू करण्यात येणार असून ते सक्तीचे करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना विषय निवडीत लवचिकता आणि स्वातंत्र्य मिळणार आहे. मूळ विषयाचे शिक्षण ६० टक्के आणि आवडीच्या विषयांचे शिक्षण ४० टक्के असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे वर्गातील मिळणारे शिक्षण आणि बाजारातील गरज यातील तफावत दूर होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवनात फार मोठे परिवर्तन होणार आहे. शिक्षक व प्राध्यापकांना देखील या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र, त्यांनी भविष्यातील भारतासाठी हा त्रास सहन करावा असे आवाहन डॉ. देवळाणकर यांनी या वेळी केले.

मा. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलेल्या प्रास्ताविकात नव्या शैक्षणिक धोरणानुसार, मातृभाषेतून शिक्षण आणि कौशल्य विकसन याला संस्था प्राधान्य देत असून शाळा सक्षम करण्यात येत असल्याचे सांगितले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या वाढत्या प्रभावात देखील संस्थेच्या मराठी माध्यमाच्या शाळा उत्तम प्रकारे टिकून आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संस्था अनुदानित शाळांमध्ये देखील संस्था पगारावर चांगले शिक्षक नियुक्त करत आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी घडत असल्याचे दिसून येत आहे असे ते म्हणाले.

मा. प्रदीप नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, देशात होणाऱ्या विकासामुळे देशातील लोकसंख्येची गुणवत्ता वाढत आहे आणि महासत्तेच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीसाठी  ते आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देवकी बुचे यांनी केले.

डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मा. बाबासाहेब शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी मा. सौ. आनंदी पाटील यांची आज ( मंगळवार, दि. १२ सप्टेंबर २०२३) निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या सचिवपदी मा. डॉ. अतुल कुलकर्णी यांची तर सहाय्यक सचिवपदी मा. सुधीर भोसले यांची निवड करण्यात आली.

मा. बाबासाहेब शिंदे हे व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते असून सौ. आनंदी पाटील या उद्योजिका आहेत. मा. डॉ. अतुल कुलकर्णी आणि मा. सुधीर भोसले मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कार्यरत असून अनुक्रमे शिक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स हे त्यांचे विषय आहेत.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष म्हणून एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची तर उपाध्यक्ष म्हणून मा. प्रदीप नाईक यांची संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फेरनिवड करण्यात आली आहे.

 

संस्थेच्या नियामक मंडळावर सदस्य म्हणून मा. देवदत्त भिशीकर, मा. विजय भालेराव, मा. अॅड. सागर नेवसे, मा. डॉ. विवेक कानडे, सीए मा. राहुल मिरासदार, मा. डॉ. राजीव हजरनीस, मा. अजय पुरोहित यांची निवड झाली आहे.

वर्ष २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी ही निवड आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी सौ. आनंदी पाटील आणि बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सौ. पाटील या मेकॅनिकल इंजिनिअर असून व्यवसायाने उद्योजिका आहेत. मार्च २०१७ पासून त्या मएसोच्या नियामक मंडळाच्या सदस्य आहेत. मएसो बाल शिक्षण मंदिर व शिशु मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या महाविद्यालय सल्लागार समितीच्या सदस्य तसेच मएसो रेणुका स्वरुप करिअर कोर्सेसच्या सल्लागार समिती सदस्य अशी त्यांच्याकडे सध्या जबाबदारी आहे.

यापूर्वी त्यांनी पुण्यातील औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलांची), औंध, पुणे (Government ITI – Boy’s) या संस्थेच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या उपाध्यक्ष आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची), औंध, पुणे (Government ITI – Girl’s) या संस्थेच्या संस्था व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

बाबासाहेब शिंदे हे स्वतंत्र व्यावसायिक असून पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या पिंगोरी या गावात ते ग्रामविकासाचे कार्य करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगर ग्रामविकास गतीविधीची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

ऑक्टोबर २०१८ पासून ते मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. मएसो वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेच्या शाला समितीचे अध्यक्ष तसेच मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आणि मएसोच्या बारामतीमधील शाळांच्या शाला समितीचे सदस्य अशी त्यांच्याकडे सध्या जबाबदारी आहे.

डॉ. माधव भट आणि सीए अभय क्षीरसागर यांनी संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांवर सौ. आनंदी पाटील व बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

“भारताला गुडघे टेकायला लावणे हेच पाकिस्तानचे ध्येय आहे, त्यामुळे सातत्याने अतिरेकी हल्ले घडवून भारताला रक्तबंबाळ करण्याचे त्यांचे धोरण आहे. या अतिरेकी कारवाया पाकिस्तान पुरस्कृत आहेत. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून आपण कारवाई करू शकतो हे दाखवून देण्यासाठीच भारताने हवाईहल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत भारतातील नागरिकांनी एकजूटीने आणि खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. प्रसार माध्यमांनी आपली लक्ष्मणरेषा सांभाळली पाहिजे आणि त्याचबरोबर नागरिकांनी जनमानस अस्वस्थ होईल अशी कोणतीही कृती आपल्याकडून होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे, आपल्या आसपास काही आक्षेपार्ह घटना घडत असतील तर पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे,” असे प्रतिपादन भारतीय हवाईदलाले माजी उपप्रमुख आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन मंच यांनी ‘पाकिस्तानवरील नियंत्रित हवाईहल्ला आणि भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावर अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये हे व्याख्यान झाले. त्यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते. “भारताने शांततेसाठी सर्व प्रयत्न केले परंतु पाकिस्तानने कोणताच प्रतिसाद दिला नाही, कारण पाकिस्तानच्या लष्कराला संवाद साधण्यात कोणताच रस नाही. स्वतंत्र झाल्यानंतर ७० वर्षांपैकी ५० वर्षे पाकिस्तानात लष्कराची सत्ता आहे. जनरल मुहम्मद झिया उल हक यांच्या कार्यकाळापासून पाकिस्तानी दहशतवाद बोकाळला आहे. ५७ इस्लामी देशांचा समावेश असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन या संघटनेच्या बैठकांमध्ये वारंवार काश्मीर प्रश्नाचे रडगाणे गात आला आहे. या संघटनेच्या दि. १ व २ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत भारताला सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर पाकिस्तानाने या बैठकीवरच बहिष्कार घालण्याची धमकी दिली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडले आहे. त्यामुळे तो आता असे उद्योग करत आहे. भारताने पाकिस्तानला दिलेला व्यापारी कारणांसाठी दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा आता काढून घेतला आहे. याशिवाय भारतातून पाकिस्तानात वाहून जाणारे नद्यांचे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत आपण पाकिस्तानमधील जनतेला त्रास होऊ नये असाच विचार करत आलो आहोत. पाकिस्तान मात्र कायमच दहशतवादाला प्रोत्साहन देत आला आहे. भारताच्या सीमेजवळ त्याने अतिरेक्यांचे प्रशिक्षण तळ उभारले. भारतीय हवाईदलाने नुकत्याच केलेल्या हल्ल्यात हे तळ उद्ध्वस्त केले आहेत, कोणत्याही नागरी वस्तीवर किंवा पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर हल्ला केलेला नाही.” “भारत आता देशहितासाठी बचावात्मक नाही तर आग्रही पुढाकार घेत असल्याचे दिसून येते. भारतीय सैन्याला संरक्षण दले असे न म्हणता सशस्त्र दले असे म्हटले पाहिजे. त्यातून देशाची मानसिकता घडत असते. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचे महत्त्व खूप मोठे आहे. लढाऊ विमाने हवेत असतानाच त्यांच्यात इंधन भरता येते, त्यामुळे या विमानांची कार्यक्षमता वाढते. ५ हजार किलोमीटर अंतर मारक क्षमता असणारे अग्नीसारखे क्षेपणास्त्र आता भारताकडे आहे. याशिवाय इ.स. २०२० पर्यंत भारत हा सरासरी वय २९ असणारा जगातील सर्वात तरुण देश झालेला असेल. ही युवाशक्ती आपल्या देशाची फार मोठी ताकद आहे,” असेही ते यावेळी म्हणाले. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर विविध युद्धांच्या काळात भारताने घेतलेल्या अनेक निर्णयांचा उपापोह एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या व्याख्यानात केला. प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले. मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

आपल्या संंस्थेचे मा.अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात अबूधाबी येथे होणाऱ्या या संमेलनाचे हे आठवे वर्ष आहे.

Scroll to Top
Skip to content