news

प्रकाशझोतात पार पडणार स्पर्धा

सासवड, दि. १८ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी म. ए. सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा सासवड येथील  म. ए. सो. वाघीरे हायस्कूलच्या मैदानावर शुक्रवार, दि. २० जानेवारी ते रविवार, दि. २२ जानेवारी २०२३ या काळात होणार आहे. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो, सूर्यनमस्कार या खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रकाशझोतात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष आहे.

ही माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव यांनी आज (बुधवार, दि. १८ जानेवारी २०२३ रोजी) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, म.ए.सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, म.ए.सो. बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर, म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे उपस्थित होते.

या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महादेव कसगावडे यांच्या हस्ते होणार असून के. जे. इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष श्री. कल्याण जाधव हे या याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू  सायली केरीपले यांच्या हस्ते होणार असून  बांधकाम व्यवसायिक शिरीष जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या स्पर्धेचे यजमानपद सासवड येथील म. ए. सो. बाल विकास मंदिर या शाळेकडे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आली आहे.

शासन स्तरावर १४ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र, प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कोणतीच स्पर्धा आयोजित केली जात नाही हे लक्षात घेऊन संस्थेने सन २०११ पासून म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली.

 

लष्करी वेशात शिस्तबद्ध संचलन करत मान्यवरांना दिलेली मानवंदना, रिदम योगाद्वारे झालेले एकाग्रतेचे दर्शन, कराटे आणि अश्वारोहणातून दिसलेले धाडस, धनुर्विद्या आणि रायफल शूटिंगमुळे दिसून आलेली अचूकता, रोप मल्लखांबामुळे साधलेली लवचिकता, लेझमीच्या खेळातून साधलेली सांघिक भावना, मार्शल आर्टसच्या प्रशिक्षणातून झालेली स्वसंरक्षणाची तयारी बघून अचंबित झालेले प्रेक्षक असे दृश्य आज बघायला मिळाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिना’च्या कार्यक्रमात. विद्या आणि बळाच्या आधारे आपण जग जिंकू शकतो, जगात वंदनीय ठरू शकतो हा संदेशच मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या साहसी प्रात्यक्षिकांमधून या वेळी दिला आणि स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला समर्थ भारत निर्माण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हे दाखवून दिले.
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या विविध शाखांमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करतात. यावर्षी मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचीच मने जिंकली.
मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी २०२३) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक हे होते. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर या प्रमुख अतिथी म्हणून तर समर्थ भारत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुहास क्षीरसागर या वेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. संस्थेचे मा. उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे सर्व निर्बंधांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत व बंदिस्त जागेत मैदानी प्रात्यक्षिकांशिवाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांसह अतिशय उत्साहात पार पडला.
प्रमुख वक्ते श्री. सुहास क्षीरसागर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या कार्याची महती विशद केली. ते म्हणाले की, महापुरूषांचे आयुष्य दीपस्तंभासारखे असते. एखाद्या विचाराचा ध्यास घेणे म्हणजे काय हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून शिकायला मिळते. भारतीय जीवन पद्धती ही वेदांतावर आधारित आहे हे त्यांनी जगाला सांगितले. त्याग हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे, आपली संपत्ती इतरांना उपयोगी पडली तरच जीवनात सुख आणि शांतता लाभू शकते, स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विचार करण्याची शिकवण भारतीय संस्कृती देते, हे स्वामीजींनी जगाला पटवून दिले. आपल्या देशातील जनता स्वत्व विसरली आहे, भारताची जगभर कुचेष्टा सुरू आहे, त्यामुळे आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी स्वामीजींनी देशभर प्रवास केला. मन, बुद्धी आणि मनगट बळकट असेल तरच जग जिंकता येते हे त्यांनी समजावून सांगितले. आजच्या पिढीने देखील आपल्या क्षमता ओळखण्याची गरज आहे कारण तीच यशाची गुरुकिल्ली आहे.
श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर विद्यार्थ्यांना मर्गदर्शन करताना म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले कुटूंब, गुरूजन आणि शाळा-महाविद्यालय यांचा पाठिंबा असणे अनिवार्य असते. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मला टेबल टेनिस खेळाच्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता आले. त्याचबरोबर खेळामुळे मला काही महत्वाचे गुण शिकायला मिळाले ते म्हणजे ध्येय निश्चिती, सांघिक भावना, कठोर परिश्रम आणि अपयश पचवण्याची क्षमता. त्यामुळे सातत्याने कठोर परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी युवा चेतना दिनाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. तर श्री. विजय भालेराव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
या वेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांचा परिचय प्रा. शैलेश आपटे यांनी करून दिला.
मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतील शिक्षिका श्रीमती शिरीषा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

“नरेंद्र जन्माला येतो, स्वामी विवेकानंद घडवावे लागतात. स्वामी विवेकानंदांचे जीवन निर्भयतेचे स्मरण करून देते. कुशाग्र बुद्धी, बुद्धिप्रामाण्यवाद, जगाच्या कल्याणाचा विचार, सहसंवेदना, अमोघ वक्तृत्व अशा अनेक गुणांमुळे नरेंद्र पुढे जाऊन स्वामी विवेकानंद झाले,” असे प्रतिपादन मुंबईतील सोमय्या कॉलेजचे प्राध्यापक मा. सागर म्हात्रे यांनी आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी२०२३) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कबड्डीपटू मा. शक्तीसिंग यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. देवदत्त भिशीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ, संतोष देशपांडे, ॲड. सागर नेवसे, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र श्री. सुधीर भोसले, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.

नवी मुंबईतील म.ए.सो.चे हितचिंतक, निमंत्रित, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी यावेळी मैदानी खेळ व शारिरीक प्रात्यक्षिके सादर करतात.या वर्षी पहिल्यांदाच पुणे येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमाबरोबरच नवीन पनवेल येथील मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन पनवेल येथील मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, मएसो पब्लिक स्कूल, कळंबोली मएसो ज्ञान मंदिर आणि मएसो विद्या मंदिर बेलापूर या शाखांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी लेझीम, लाठीकाठी, ढोल पथक, ध्वज पथक, डंबेल्स, बटरफ्लाय ड्रील, फ्लॉवर ड्रील, रिंग ड्रील, ॲरोबिक्स असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

स्वामीजींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगून प्रा. म्हात्रे यांनी स्वामीजींचे तेजस्वी जीवन उलगडले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, “स्वामीजींमधील गुण आत्मसात केले तर भविष्यातील स्वामी विवेकानंद घडतील. महान विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करा. त्यांच्या विचारांतूनच तुमचाही सामान्यापासून असामान्यत्वाकडे प्रवास सुरू होईल.”

मा. शक्तीसिंग यादव यावेळी बोलताना म्हणाले, “स्वतःच्या स्वप्नांचा ध्यास घ्या. ती पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करा. खेळ, अभ्यास किंवा जे काही कराल त्यात एकाग्रता वाढवा. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठे व्हा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा आजचा हा दिवस युवा चेतना दिन तुम्हा सर्वांबरोबर साजरा करताना मला विशेष आनंद होत आहे.”

मा. देवदत्त भिशीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “स्वामी विवेकानंदांच्या विचारात व्यक्ती नव्हे तर समष्टीचा विचार होता.‌ ते एक योद्धा संन्यासी, युगनायक होते.” स्वामीजींचे विचार आजच्या युवांपर्यंत

पोहोचण्यासाठी सर्व शाळांनी वर्षभरात स्वामीजींचे एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा असे आवाहनही मा. भिशीकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीचा आढावा घेतला व युवा चेतना दिन साजरा करण्यामागील म. ए. सो. ची भूमिका विषद केली. आपल्या देशातील विविध क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी क्रीडा प्रात्यक्षिके व शारीरिक कवायती दरवर्षी सादर केली जातात. त्यात मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे विद्यार्थ्यांमधील चेतना जागृत ठेवण्याचा हेतू पूर्ण होत आहे, असे त्यांनी सांगितले.

रायफल शूटिंग क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या फडके विद्यालयातील चि. वेदांत पाटील याने उपस्थित युवांना प्रतिज्ञा दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभाग-मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती निशा देवरे यांनी केले.

डॉ. संतोष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

म. ए. सो. पब्लिक स्कूल कळंबोली या शाळेतील विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् सादर केले.

 

 

 

पद्मभूषण डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना ११९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आज (बुधवार, दि. २१ डिसेंबर २०२२) आदरांजली अर्पण करण्यात आली. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन.एस उमराणी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. गौतमी पवार, उपप्राचार्या डॉ. सुनीता भागवत, मएसो कला व वाणिज्य रात्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल कुलकर्णी आणि मएसोचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तत्पूर्वी मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील सौ. विमलाबाई गरवारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. विजय भालेराव, मएसोचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानिमित्ताने मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कॉमर्स असोसिएशन, इकॉनॉमिक्स असोसिएशन, बिझनेस लॅब आणि इआयएस सेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध अभ्यासशाखांच्या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि मएसो कॉलेज ऑफ कॉमर्समधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गरवारे ट्रस्टच्या वतीने पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी आर्कि. मा. राजीव सहस्रबुद्धे, गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, महाविद्यालय सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन.एस उमराणी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. गौतमी पवार, मएसोचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशनच्या प्रोग्रॅम डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख व सल्लागार मा. संजीव मेहता या कार्यक्रमात आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

सृष्टी जगताप (टी.वाय.बी.ए.), प्रज्ञा फडतरे (टी.वाय.बी.एस्ससी.- स्टॅटिस्टीक्स), स्वराली गोगटे (टी.वाय.बी.एस्ससी. – झूलॉजी), सुरभी भावे (बी.कॉम.), सोहम करंदीकर (इ. १२ वी – सायन्स), प्राजक्ता मुजुमदार (इ. १२ वी – आर्ट्स) आणि भैरवी आपटे (इ. १२ वी – कॉमर्स) या विद्यार्थ्यांचा मा. रामदास भगत, आर्कि. मा. राजीव सहस्रबुद्धे आणि मा. देवदत्त भिशीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मभूषण डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर प्रा. डॉ. आशा खिलारे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयात चालवण्यात येणारे विविध उपक्रम, स्पर्धा आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रोत्साहन याबाबत माहिती दिली. त्यानंतर मा. रामदास भगत यांच्या हस्ते ‘इआयएस सेल’ च्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी ईशा बारगजे हीने या लोगोमागील संकल्पना विशद केली.

मा. संजीव मेहता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उद्योजकता आणि त्याचे महत्व समजावून सांगितले. ते म्हणाले, उद्योजक होण्याचा कोणतेही गुप्त सूत्र नाही, उद्योजक होण्यासाठी कोणतीच वेळी लवकरची नसते किंवा कधीच उशीर झालेला नसतो. उद्योगातील अपयशाची भीति कधीच बाळगू नये कारण त्यातूनच शिकायला मिळते, अकार्यक्षम व्यवस्था किंवा रचनेबद्दल मनात अस्वस्थता आणि प्रचलीत गोष्टींना आव्हान यातूनच उद्योजकता घडते. आपल्या व्यवसायाच्या क्षेत्रात आधीपासूनच असंख्य कंपन्या असल्याने आपल्याला यश मिळेल का? असा विचार कधीच करू नये. कारण नव्या संकल्पना घेऊन आलेल्या कंपन्या यशस्वी होत असल्याचे दिसते. अमेझॉनसारख्या कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसलेली कंपनी यशस्वी ठरल्याचे आपण बघतो. अस्वस्थतेतून नव्याचा शोध, कौशल्य अशा गुणांच्या आधारे यश मिळवता येते. २१ वे शतक भारताचे शतक असल्याचे जगभर मानले जाते. देशांतर्गत प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अर्थपुरवठा हा स्टार्टअपसमोरचा अतिशय लहानसा प्रश्न आहे. खरे आव्हान आहे ते कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे. प्रत्येक विद्यापीठात स्टार्टअपसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जात आहे. फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे.

मा. रामदास भगत यांनी आपल्या भाषणात पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. ते म्हणाले, घरातील परिस्थिती बेताची असलेल्या आबासाहेब गरवारे यांनी आपल्या अफाट कष्टातून सुरू केलेले उद्योग-व्यवसाय यशस्वी करून दाखवले. महाराष्ट्रातील अग्रगण्य उद्योगपती असा नावलौकिक मिळवला. आपल्या उद्योगातून त्यांनी जगाला प्लॅस्टिक उत्पादन उपलब्ध करून दिले. या सर्व प्रवासात त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या सहकार्यांना दिले. महात्मा गांधीजींच्या विचारातील विश्वस्ताची कल्पना वास्तवात आणली. आबासाहेब गरवारे यांनी ७५ धर्मादाय संस्थांच्या स्थापनेत पुढाकार घेतला. शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील संस्थांना भरघोस आर्थिक पाठबळ दिले. त्यांचे चिरंजीव डॉ. शशिकांत गरवारे आणि त्यांच्या कन्या मोनिका, सरिता आणि सोनिया हे डॉ. आबासाहेब गरवारे यांचा वारसा अतिशय समर्थपणे पुढे चालवत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री पवार यांनी तर आभार प्रदर्शन सायली ढमढेरे यांनी केले.

सासवड, दि. १० : “ प्रदीर्घ परंपरा आणि इतिहास असलेल्या सासवडमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने वाघीरे विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचा पाया रचला.  शिक्षणासाठी आजदेखील अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना ८ ते १० किलोमीटर लांब जावे लागते, १९०६ मध्ये वाघीरे विद्यालय सुरू करताना संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी घेतलेले कष्ट खूप मोलाचे आहेत. या शाळेने दर्जेदार शिक्षणाद्वारे उज्जवल व्यक्तिमत्वाचे असंख्य नामवंत विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थीदशेत असताना अशा या शाळेत शिकणाऱ्या मित्रांचा हेवा वाटायचा”, अशा शद्बात पुरंदर-हवेली मतदार संघाचे आमदार मा. संजय जगताप यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा गौरव केला.

म.ए.सो. वाघीरे विद्यालयातील सभागृहाचे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे सभागृह असे नामकरण आमदार जगताप यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. १० डिसेंबर २०२२) करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष मा. विजय कोलते यांच्या पुढाकारातून शाळेतील सभागृहाचे नामकरण करण्यात आले आहे. मा. विजय कोलते आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब भोसले, शाळेचे महामात्र श्री. सुधीर भोसले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आणि शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ व्यासपीठावर उपस्थित होते.

“वाघीरे विद्यालयाचा परिसर आता व्यापारी भाग झाला आहे. त्याचा विचार करून सासवडचा विकास करण्यात येत आहे. विकास आराखड्यात वाघीरे विद्यालयासाठीच्या विस्तारित जागेची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अपेक्षा आम्ही सासवडकर म्हणून पूर्ण करू, संस्थेने त्यादृष्टीने नगरपालिकेला प्रस्ताव द्यावा,” असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.

मा. विजय कोलते यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आचार्य अत्रे यांचे कर्तृत्व जगभरात पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती आपल्या भाषणात दिली. ते म्हणाले की, ब्रिटीश कवि, नाटककार, अभिनेता विल्यम शेक्सपिअर यांच्या स्ट्रॅटफोर्ड या जन्मगावी त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक ठिकाणे हेच त्यांचे स्मारक आहे. शेक्सपिअरच्या स्मारकासारखेच आचार्य अत्रे यांचे भव्यस्मारक उभारण्याचे आम्ही ठरवले आहे. ब्रिटीश असल्याने शेक्सपिअर याचे नांव जगभर झाले. मात्र, चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आचार्य अत्रे मराठी असल्याने ते जगाला माहीत झाले नाहीत. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, ग्रंथालय यांना त्यांचे नांव देण्यात आले आहे, त्यांच्या नावाने प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कार देखील दिले जाता. मुंबईत वरळी येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी शासनाने मुख्यमंत्री निधीतून केलेले अर्थसहाय्य आणि प्रत्येक शिक्षकांने दिलेला प्रत्येकी पाच रुपये निधी अशा माध्यमातून प्रतिष्ठानकडे मोठा निधी जमा झाला आहे. पण आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे शिक्षण ज्या शाळेत झाले त्या वाघीरे विद्यालयात त्यांच्या नावाचे एक सभागृह असणे ही खूप महत्वाची आणि आनंदाची बाब आहे. त्याबद्दल मी प्रतिष्ठानतर्फे शाळेला आणि संस्थेला धन्यवाद देतो.

एअर मार्शल भूषण गोखले यावेळी बोलताना म्हणाले की, शक्ती आणि भक्तीचा संगम असल्याने पुरंदरचे नाव मोठे आहे. अशा गावात असलेल्या आमच्या संस्थेच्या वाघीरे विद्यालयाचा आम्हाला अभिमान आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचा त्यांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. अटल टिंकरींग लॅब सारखे जिज्ञासूवृत्ती जोपासणारे विविध उपक्रम वाढविले पाहिजेत. पुढील पिढीला जिज्ञासू बनवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांना सक्षम बनविण्यात आपले आणि देशाचे हित आहे. मा. विजय कोलते यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतार्य अत्रे यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशी विनोदी विषयांवरील निबंध स्पर्धा आयोजित करावी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी त्यासाठी निश्चितच सहकार्य करेल. सर्वांचे लाडके आमदार असलेले मा. संजय जगताप पाय जमीनीवर असलेले नेते आहेत. पुरंदर परिसराचा विकास करण्याची त्यांची तळमळ पुरंदर विमानतळासाठी ते घेत असलेल्या पुढाकारातून दिसून येते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला आपल्या प्रास्ताविकात वाघीरे विद्यालय आणि सासवड यांच्यातील ऋणानुबंध उलगडले. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने १६२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने पुण्याबाहेर आपल्या कार्याचा विस्तार करताना १९०६ साली सासवडमध्ये शाळा सुरू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हाच हेतू त्यामागे होता. तेव्हापासून शाळेने दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. त्यामध्ये संस्थेप्रमाणेच सासवडमधील नागरीकांचादेखील मोठा सहभाग आहे. संस्थेने अतिशय परिश्रमपूर्वक ही शाळा सुरू केली. नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली. ही शाळा सुरू व्हावी, तिचा विस्तार व्हावा यासाठी  सासवडमधील विविध लोकांनी मदत केली. निधीसंकलन आणि लोकाश्रयातून शाळा उभी राहिली. शिक्षण संस्थेला अर्थसहाय्य देण्याचा प्रघात नसताना नगरपालिकेने शाळेला वार्षिक १५० रुपये अनुदान सुरू केले. पुढील काळात त्यात वाढ करून वार्षिक ७०० रुपये अनुदान मिळू लागले. परिणामी शाळेला चांगले मुख्याध्यापक मिळत गेले, शाळेतील संस्कारांमधून चांगले विद्यार्थी घडत गेले. या शाळेने देशाला वि. म. तारकुंडे यांच्या रुपाने सरन्यायाधीश, डॉ. राम ताकवले यांच्यासारखे तीन कुलगुरू अशी  अनेक नररत्ने दिली आहेत. चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तीमत्वाचे आचार्य अत्रे हे याच शाळेचे माजी विद्यार्थी होते. त्यांची आठवण राहावी यासाठी शाळेतील सभागृहाला त्यांचे नाव देण्यात येत आहे. वाघीरे विद्यालयाच्या परिसरातील प्राथमिक शाळेचे नूतनीकरण करून त्या जागेत आचार्य अत्रे यांच्या नावाने एक भव्य सभागृह उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी नगरपालिकेने सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे.

ऐश्वर्या कामठे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातील ईशस्तवन आणि शेवटी वंदेमातरम सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक प्रमोद ठुबे यांनी तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांनी केले.

म.ए.सो.‘स्वरवेध’ गायन स्पर्धा : विद्यार्थ्यांना मान्यवर कलाकारांचा सल्ला

“अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची कास धरा, एकदा पाया पक्का झाला की कोणत्याही प्रकारचे संगीत आत्मसात करता येईल. स्पर्धेमुळे संगीतात आपली प्रगती होते आणि संगीतामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असल्याने एक चांगला माणूस घडतो, म्हणूनच सूरांचा ध्यास घ्या. त्याचबरोबरच शिक्षण देखील तितकेच महत्वाचे आहे,” असा सल्ला शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी आज (बुधवार, दि. ३० नोव्हेंबर २०२२) विद्यार्थी स्पर्धकांना दिला. निमित्त होते, म.ए.सो.च्या ‘स्वरवेध’ या गायन स्पर्धेचे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे म.ए.सो. कलावर्धिनी आणि म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये संस्थेच्या सहा जिल्ह्यातील विविध शाळांमधून निवड झालेल्या इ. ५ वी ते १२ वी मधील ७२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तीन गटात प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिके विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कोथरूडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरीअममध्ये आज (बुधवार, दि. ३० नोव्हेंबर २०२२) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी तर संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सानिया पाटणकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी संगीतातील गुरुंचे महत्व, पालकांचा पाठिंबा, तंत्रज्ञानाचा समर्पक वापर, संगीताबरोबरच शिक्षणाचे महत्व आणि वैयक्तिक आरोग्य याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून महावीर बागवडे, शुभांगी मांडे आणि गौरी जोशी यांनी काम पाहिले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सानिया पाटणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळ सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे, म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य सुधीर भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.

दरम्यान, आज सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे हे होते.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील, नियामक मंडळ सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे, म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.

स्पर्धकांना मार्गदर्शन करताना प्रियदर्शिनी कुलकर्णी म्हणाल्या की, स्पर्धा म्हटले की इर्षा, जिद्द अशा दृष्टीने विचार केला जातो. परंतु, संगीत क्षेत्रात सादरीकरण हा सांगितीक जडणघडणीचा भाग असतो. श्रोत्यांसमोर आपली कला सादर करण्यासाठीचा धिटपणा कलाकाराच्या मेहनतीमधूनच येतो. कलाकार आपल्या सादरीकरणातून श्रोत्यांपर्यंत आपली कला पोहोचवतो आणि श्रोते ती ग्रहण करतात. ही समजून घेण्याची प्रक्रिया आहे. कलाकार आणि श्रोते यांच्यात एक संवाद स्थापित होतो. हा संवाद जो कलाकार प्रभावीपणे साधू शकतो तो स्पर्धा जिंकतो. स्पर्धेत यश न मिळालेल्या कलाकारांना अधिक मेहनतीची गरज लक्षात येते.

डॉ. माधवी मेहेंदळे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ‘स्वरवेध’स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.

आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या प्रसंगी संस्थेच्या वतीने नुकत्याच सादर करण्यात आलेल्या ‘वज्रमूठ’या महानाट्याच्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या युट्यूब चॅनेलवर https://youtu.be/96fZ033rPEM या लिंकद्वारे बघण्यासाठी ती सर्वांना उपलब्ध आहे. या महानाट्यामध्ये संस्थेच्या शाळा-महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी संस्थेची स्थापना करताना आरंभीच्या वर्षांमध्ये कोणत्या अडचणींना तोंड दिले, कोणत्या प्रकारे त्यांनी त्याग केला हे या महानाट्यातून मांडण्यात आले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रीति धोपाटे यांनी केले तर आदित्य देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहल उपाध्ये यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्नाली देशपांडे यांनी केले.

स्पर्धेच्या दिवसभरातील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिक्षक अजय धुमाळ यांनी केले.

आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि हाडाचे शिक्षक असलेले वामन प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या रुपाने एकत्र आलेल्या शक्ती, बुद्धी आणि युक्तीच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना. ब्रिटिश सत्तेकडून देशाची आणि देशबांधवांची होणारी अवहेलना, होणारा अपमान याच्या विरोधात एकत्र येऊन शिक्षणाबरोबरच स्वावलंबन, इंग्रजी व लॅटिन भाषेबरोबर संस्कृत, भूगोलाबरोबर आपला दैदिप्यमान इतिहास, संस्कारांद्वारे संस्कृतीचा पुरस्कार करण्याच्या निश्चयाने स्थापन झालेल्या शिक्षण संस्थेचा इतिहास आज (रविवार, दि. २० नोव्हेंबर २०२२) सर्वांसमोर भव्य-दिव्य स्वरुपात सादर झाला, वज्रमूठ या महानाट्याद्वारे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या संस्थापकांना आदरांजली वाहण्यासाठी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सादर करण्यात आलेल्या या महानाट्याला शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी साकारलेले हे महानाट्य सर्वांच्याच काळजाचा ठाव घेणारे ठरले.

ब्रिटिश सत्तेचा रोष आणि उपद्रव, आर्थिक अडचणी, समाजाकडून हेटाळणी अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा सुरू राहाव्यात म्हणून संस्थेच्या संस्थापकांनी केलेला असीम त्याग, कष्ट आणि संघर्ष यांची माहिती नव्या पिढीला या महानाट्यातून झाली. तसेच सुमारे दीडशे वर्षापूर्वीच्या काळातील घरांची रचना, माणसांचे पेहराव,  तेंव्हाच्या चालीरिती, सण साजरे करायच्या पद्धती या सर्व गोष्टी माहिती झाल्या.

संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी सदस्य भालचंद्र पुरंदरे यांनी लिहिलेली या महानाट्याची संहिता मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचा माजी विद्यार्थी अभिषेक शाळू याने तितक्याच ताकदीने रंगमंचावर साकारली आहे. होनराज मावळे याचे संगीत, महेश लिमये आणि तेजस देवधर यांचे ध्वनी संयोजन व प्रकाश व्यवस्था अशा सर्वच अंगाने कसदार निर्मिती असलेल्या या महानाट्यातून इतिहासातील घटना प्रेक्षकांसमोर जीवंत झाल्या.

या महानाट्याच्या कार्यक्रमाला जागतिक किर्तीच्या नृत्यांगना व संस्थेच्या माजी विद्यार्थिनी मनिषाताई साठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील व उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने परंपरा आणि नवता यांची चांगली सांगड घातली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या मूलभूत विषयांबरोबरच संस्थेने कालसुसंगत अशा विविध विषयांचे शिक्षण उपलब्ध करून दिले आहे याचा माजी विद्यार्थिनी म्हणून खूप अभिमान वाटतो. ‘मएसो’ने दिलेल्या शिकवणुकीतून प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मभान यावे अशी माझी इच्छा आहे,” अशा शद्बात मनिषाताई साठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वंशज, कै. वामन प्रभाकर भावे यांचे पणतू मंगेश भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांचे नातू दिलीप इंदापूरकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आनंदीताई पाटील यांनी या महानाट्याच्या निर्मितीमागील भूमिका आणि प्रक्रिया विषद केली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची वाटचाल ही ध्येय, त्याग आणि बलिदानाची असून वारकऱ्यांच्या दिंडीप्रमाणेच संस्थेचे शिक्षक गेली १६२ वर्षे ‘मएसो’ची ज्ञानदिंडी वाहून नेत आहेत, असे सांगितले.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन तर इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

१७५ विद्यार्थ्यांचा सहभाग : दृक-श्राव्य माध्यमाचा वापर
पारतंत्र्याच्या काळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची उभारणी करताना संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी कोणत्या अडचणींना तोंड दिले, त्यांनी कोणत्या प्रकारे त्याग केला याची माहिती देणारे ‘वज्रमूठ’ हे महानाट्य रविवार, दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळामध्ये पुण्यातील स्वारगेट जवळ असलेल्या गणेश कला क्रीडा मंच येथे सादर होणार आहे. १६२ वर्ष पूर्ण करत असताना संस्थेच्या वतीने संस्थापकांना आदरांजली म्हणून या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. दृक-श्राव्य माध्यमाच्या आधारे सादर करण्यात येणाऱ्या या महानाट्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुण्यामधील शाळा आणि महाविद्यालयामधील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, माजी विद्यार्थी असे १७५ कलाकार भूमिका साकारणार आहेत. ही माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी आज (बुधवार, दि. १६ नोव्हेबर २०२२) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे मा. उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, नियामक मंडळाचे माजी सदस्य व या महानाट्याचे सूत्रधार श्री. भालचंद्र पुरंदरे, साहाय्यक दिग्दर्शक श्री. अभिषेक शाळू उपस्थित होते.
‘वज्रमूठ’ महानाट्याच्या सादरीकरणाच्या वेळी संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नृत्यांगना श्रीमती मनिषाताई साठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून ‘मएसो’चे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. पुणे शहरातील मान्यवर या महानाट्याला आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
महानाट्याच्या कथानकाबद्दल माहिती देताना श्री. भालचंद्र पुरंदरे म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हा शिक्षणक्षेत्रातील एक वटवृक्ष आहे. त्याची गोष्ट ‘वज्रमूठ’ या महानाट्यातून सांगण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक क्रांतिकारक होते, त्यांच्या पत्नींना देखील अनेक यातना भोगाव्या लागल्या. त्याच या महानाट्याच्या मध्यवर्ती भूमिकेत आहेत, त्याच ही गोष्ट सांगत आहेत. अतिशय पराकोटीच्या विपरित परिस्थितीत असतानादेखील नैराश्य हा शद्ब देखील त्यांच्या शद्बकोशात नव्हता. हा एक फार मोठा संस्कार या महानाट्याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. ही सर्व चरित्रे समाजासमोर आली पाहिजेत यासाठी अतिशय श्रद्धेने हे महानाट्य साकारत आहोत, आमच्या भावना कलेच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. भारुड, कीर्तन, पारंपारिक नृत्य, महिलांचे पारंपारिक खेळ अशा विविध कला प्रकारांचा उपयोग करण्यात आला आहे.
आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर या तीन समाजधुरिणांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुण्यातल्या गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षण तसेच शास्त्रीय आणि औद्योगिक शिक्षण देण्याचा उद्देश त्यांच्यासमोर होता. या विषयांची निवड करण्यामागे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाची आणि स्वावलंबनाची दूरदृष्टी होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
एतद्देशियांनी सुरु केलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आपल्या १६२ वर्षांच्या वाटचालीत स्वतःमध्ये कालसुसंगत बदल करत ज्ञानदानाचे आपले पवित्र कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर ही ओळख घडवण्यात संस्थेने महत्त्वाचा वाटा उचलला आहे. महाराष्ट्रातल्या ७ जिल्ह्यांमध्ये असलेल्या संस्थेच्या ७० हून अधिक शाखांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज संस्थेच्या कार्याचा विस्तार पूर्वप्राथमिक शिक्षणापासून संशोधनापर्यंतच्या शिक्षणापर्यंत झाला आहे. त्यामध्ये शालेय शिक्षण, मुलींचे सैनिकी शिक्षण, कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक, व्यवस्थापन, आयुर्वेद, नर्सिंग, प्रायोगिक कला या विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा समावेश आहे.
आत्तापर्यंतच्या वाटचालीत आलेल्या आव्हानांवर मात करत संस्थेचा हा प्रवास असाच पुढे सुरु राहणार आहे.

विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना प्रयोगाद्वारे होणार सोप्या

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमधील लेफ्टनंट कर्नल कै. सुहास गोगटे विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळा श्रीमती गोगटे यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. १२ नोव्हेंबर २०२२) पार पडला.

११ नोव्हेंबर – राष्ट्रीय शिक्षण दिवस, १४ नोव्हेंबर – बाल दिन व १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वर्धापन दिन, या दिवसांचे औचित्य साधून म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने विज्ञान आठवडा आयोजित केला आहे, याची सुरुवात विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेच्या हस्तांतरण सोहळ्याने झाली. प्रयोगशाळेमधील ३-डी प्रिंटर च्या साह्याने तयार करण्यात आलेल्या समया मोबाईल ॲपद्वारे प्रज्वलित करून अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.  श्रीमती गोगटे यांनी पती लेफ्टनंट कर्नल कै. सुहास गोगटे यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून ही प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे.

विश्व जिज्ञासा प्रयोगशाळेचा फायदा सैनिकी शाळेतील छात्रांबरोबरच प्रशालेच्या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांना होणार असून विज्ञानातील संकल्पना त्यांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे समजून घेता येणार आहेत.  कृतिशील सहभागातून  ही प्रयोगशाळा शैक्षणिक क्षेत्रातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मैलाचा दगड ठरेल, याच्या वापरातून विद्यार्थिनींनी मूलभूत संकलनांचा अभ्यास करावा व यशाची शिखरे सर करावीत अशी अपेक्षा प्रमुख अतिथी श्रीमती गोगटे यांनी या वेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्त्रबुद्धे, शाळा समितीच्या मा. अध्यक्षा डॉ. माधवी मेहंदळे, शाळा समितीच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे, मुळशी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. विठ्ठल कु़भार, सचिव श्री.सतीश शिंदे, प्रशालाचे कमांडंट म. यज्ञरामण, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे व श्री. संदीप पवार तसेच शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे सदस्य श्री. सागर दळवी, तसेच कॅ. वैद्य उपस्थित होते.

या प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी सैनिकी शाळेच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती मंजिरी पाटील व संपूर्ण विज्ञान विभागाने कॅम्पस डायरेक्टर श्रीमती गीतांजली बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांमध्ये यावर्षी ‘सामाजिक भोंडला’ हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. मुलगा-मुलगी कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकत्रितपणे या भोंडल्यात सहभागी व्हावे आणि शाळेशी संबंधित सर्व घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचे महत्व समजावे म्हणून भोंडल्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर करण्यात आला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून  भोंडल्यासाठी हत्तीची प्रतिमा तयार केली. भोंडल्याच्या सुरवातील सर्वांना भोंडल्याची परंपरा व इतिहास सांगण्यात आला. त्यांनतर हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून सर्वांनी भोंडल्याची अनेक गाणी गायली. भोंडल्यासाठी निवडलेली ही गाणी विविध सामाजिक संदेश देणारी होती. सर्वांनी भोंडल्याचा मनसोक्त आनंद लुटून खिरापतीचा आस्वाद  घेतला.  भोंडल्याच्या कार्यक्रमामुळे शाळांची मैदाने फुलून गेली होती. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबरच शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी या सामाजिक भोंडल्याच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुणे, बारामती, सासवड, शिरवळ, नगर, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी असलेल्या सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम अतिशय आनंदात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

म. ए. सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक भोंडल्यामध्ये प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि विद्यमान नगरसेविका मा. माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी ‘एक झाड लावू बाई, दोन झाड लावू’ हे पर्यावरण पूरक गीत मोठ्या आनंदाने गायिले. प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व नेत्रतज्ञ डॉ. गीतांजली शर्मा या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या महाभोंडल्यात सहभागी होता आले याबद्दल प्रशालेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड या शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक भोंडल्यात माजी विद्यार्थ्यांबरोबरच सहभागी झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी देखील भोंडल्यात प्रत्यक्ष फेर धरला आणि आनंद घेतला. सामाजिक कार्य करणारे आणि शाळेला सहकार्य करणारे कर्मचारी, अधिकारी, कार्यकर्ते, यांचा यावेळी सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

म. ए. सो. रेणुका स्वरुप प्रशालेमध्ये माजी विद्यार्थिनींच्या हस्ते भोंडल्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गजराजाच्या प्रतिमेभोवती फेर धरून भोंडल्याची गाणी म्हणत सर्वांनी भोंडला साजरा केला.  सामाजिक जाणीवांचाही जागर व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रशालेतून १९८१ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या तुकडीपासून नुकत्याच बाहेर पडलेल्या विद्यार्थिनी देखील आवर्जून सहभागी झाल्या होत्या. शाळेच्या आजी-माजी शिक्षिका, कर्मचारी देखील या भोंडल्यात सहभागी झाल्या होत्या.

म. ए. सो. मुलांचे विद्यालयातील सामाजिक भोंडल्याला २५० विद्यार्थी, माजी विद्यार्थी-शिक्षक, पालक आवर्जून  उपस्थित होते.

म. ए. सो. पूर्व-प्राथमिक शाळा, सदाशिव पेठ या शाळेत माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा भोंडला आयोजित करण्यात आला होता. माजी विद्यार्थ्यांना त्यांचे बालपण परत अनुभवता यावे म्हणून शाळा विविध फुलांनी सजवण्यात आली होती. सर्वांनी गप्पा – गोष्टींमधून पूर्वस्मृतींना उजाळा दिला.

म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मा. खासदार श्री.प्रकाश जावडेकर यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन प्रा. ए. पी‌. कुलकर्णी यांच्या हस्ते बुधवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आले. खासदार श्री. प्रकाश जावडेकर यांनी आपल्या खासदार निधीतून ₹ १०,००,०००/- इतक्या किंमतीचे व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या निधीतून महाविद्यालयाच्या मैदानावर १३ प्रकारची साधने बसवण्यात आली आहेत.

याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे मा. अध्यक्ष श्री. देवदत्त भिशीकर, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी, म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. पी. बी. बुचडे, म. ए. सो. चे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, प्रा. शैलेश आपटे इ. मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या साधनांचा चांगला उपयोग होईल असे मत याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये शौर्य साहसी क्रीडा व सैन्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे पैलू एकाच छताखाली घडविण्याचे ठिकाण म्हणजे शौर्य शिबिर होय. पहाटे साडेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी या शिबिराचा दिवस पूर्ण होतो. यामध्ये शारीरिक कसरती, बौद्धिक कार्यक्रम आणि कलाकौशल्य यांना वाव दिला जातो.

घोडेस्वारी, धनुर्विद्या, रोप मल्लखांब, स्केटिंग ऑबस्टॅकल्स, वॉल क्लाइंबिंग, योगा याच बरोबर रांगोळी, वारली पेंटिंग, विविध तज्ञांची व्याख्याने, किल्ल्यावर सहल यासारख्या कार्यक्रमांची योजना केलेली असते.

सुट्टीच्या कालावधीत आपल्या पाल्याच्या जीवनाला आकार देण्याच्या व व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने ‘शौर्य शिबिर’ हा एक उत्तम पर्याय आपल्याला उपलब्ध आहे.

आजच आपला प्रवेश निश्चित करून आपण या शिबिराचा अनुभव घ्या… !!!

‘शौर्य शिबिरा’त सहभागी होण्यासाठी खालील लिंकवरील फॉर्म भरावा…
https://forms.gle/5ecXCDWmWsPqZyX89

स्वरावर्तन फाउंडेशन, म.ए.सो.च्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे सांगीतिक सत्कार सोहळा
पुणे : आई-वडिल, गुरूंचे आशिर्वाद, रसिकांचे प्रेम-साथ लाभल्यानंतर एका कलाकाराला या पेक्षा काय आवश्यक आहे? माझ्या पुढील वाटचालीसाठी ही शिदोरी खूप आहे; मी भाग्यवान आहे, अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या. माझ्या शिष्यांनी संगीताचा वारसा समर्थपणे पुढे न्यावा, ही एकच इच्छा आहे. आजच्या झगमगत्या दुनियेत कलाकारीपेक्षा कारागिरीला जास्त महत्त्व आले आहे. कलाकाराने या दीपवून टाकणाऱ्या वाटेकडे न जाता त्यांनी साधनेची वाट धरावी आणि स्वत:बरोबरच श्रोत्यांनाही दिव्य आनंदाची अनुभूती द्यावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार आणि त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त आज (रविवार, दि. 11 सप्टेंबर 2022) स्वरावर्तन फाउंडेशनच्या संचालिका, डॉ. अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या प्रसिद्ध गायिका आरती ठाकूर-कुंडलकर आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌ यांच्यातर्फे विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन म. ए. सो. ऑडिटोरिअम, मयूर कॉलनी येथे करण्यात आले होते. सत्कार सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. अत्रे यांचा पुण्यात झालेला हा पहिलाच सांगीतिक सत्कार सोहळा होता. डॉ. प्रभा अत्रे यांचा सत्कार विख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते करण्यात आला. पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्त्रबुद्धे, डॉ. अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर, प्रसिद्ध हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर मंचावर होते. सुरुवातीस आरती ठाकूर-कुंडलकर यांच्यासह पाच सुवासिनींनी डॉ. अत्रे यांचे औक्षण केले.
डॉ. अत्रे पुढे म्हणाल्या, कलेने माणसातील माणूसपण जपले आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे. संगीताने माझ्या आयुष्याचे सोने केले आहे. संगीत प्रेमींच्या शुभेच्छा आणि प्रेमाने माझे मन तुडुंब भरले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मला पद्मविभूषण सन्मान मिळाला याचा आनंद आहे.
‘या मार्गावर खुणावतो आहे एकच सूर दूरच्या क्षितीजावरचा, साऱ्या साऱ्या नादविश्वाला सामावून घेणारा आणि भावबंधाने दरवळणारा, तिथवरची वाट अडचणीची एकाकी, वाटेवरचे दिवे फसवे-मायावी वाट रोखणारे, पुढच्या मार्गाचा विसर पाडणारे मात्र या झगमगाटात पाऊल उचलणारा स्वत:चा होता एक सूर दूरच्या क्षितीजावरचा हे’ स्वरचित काव्य सादर करून डॉ. अत्रे यांनी मनोगताचा समारोप केला.
पंडित हरिप्रसाद चौरासिया म्हणाले, मी प्रभाजींच्या गायनाचा खूप जुना प्रेमी आहे. त्यांच्याप्रती माझ्या मनात खूप श्रद्धा आहे. संगीत क्षेत्रातील त्यांची मेहनत, तपस्या मी खूप जवळून पाहिली आहे. भारतीय संगीत देश-विदेशात पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. रसिकांचे प्रेम त्यांना कायम मिळत राहो. त्यांचा गौरव करण्याची जर मला संधी मिळाली तर मी त्यांना ‘भारत नवरत्न’ असा पुरस्कार देईन, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
पंडित व्यंकटेशकुमार म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे, पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले कलाकार बघायला मिळणे माझे सौभाग्य आहे, त्यांच्या दर्शनाने माझ्या जन्माचे सार्थक झाले आहे. संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरा अखंडितपणे सुरू राहावी, पुढील पिढीला शास्त्रीय संगीत अनुभवायला मिळावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ‘तारे जमीन पर’ असा योग जुळून आला आहे. डॉ. अत्रे यांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा मान संस्थेला मिळाला हा संस्थेच्या दृष्टीने भाग्ययोग आहे.
सुरुवातीस आरती ठाकूर-कुंडलकर यांनी गुरुंविषयी आदरभाव व्यक्त करीत कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.
मान्यवरांचा सत्कार सुयोग कुंडलकर, आरती ठाकूर-कुंडलकर, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), राजीव सहस्त्रबुद्धे यांनी केला. डॉ. प्रभा अत्रे यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.
म. ए. सो.चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, म. ए. सो.च्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील, बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, म. ए. सो.चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, महाविद्यालयाचे महामात्र डॉ. गोविंद कुलकणी आदी उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यानंतर किराणा घरण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगली. प्रसिद्ध तबलावादक भरत कामत आणि सुप्रसिद्ध संवादिनीवादक सुयोग कुंडलकर समर्पक साथसंगत केली.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात बोलताना पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त मा. श्री. सु. मु. बुक्के. या वेळी व्यासपीठावर (डावीकडून) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे.

पुणे : “ सातत्याने यश मिळत गेल्यास माणसामध्ये अहंकार निर्माण होतो पण ते टाळून आपल्यात विनम्रता निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत राहा” असा सल्ला पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त मा. श्री. सु. मु. बुक्के यांनी आज (गुरुवार, दि. २५ ऑगस्ट २०२२) येथे यशस्वी विद्यार्थ्यांना दिला.

मार्च २०२२ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्चमाध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मएसो ज्ञानवर्धिनी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा श्री. बुक्के यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.

या वेळी संस्थेच्या ६ जिल्ह्यांमधील २३ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ४३ विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील आणि श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे,  सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. बुक्के आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे म्हणाले की, परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांवरील जबाबदारी वाढली आहे. या यशात आता उणीव निर्माण होऊन चालणार नाही. त्यासाठी यापुढे तुम्हाला तुमच्या स्वतःशीच स्पर्धा करावी लागणार आहे. कोरोना महामारीच्या काळात जग चिंताक्रांत असताना, आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अतुलनीय आहे. या विद्यार्थ्यांकडे ‘कोविड बॅच’ म्हणून नकारात्मक दृष्टिकोनातून बघणे योग्य नाही. कोरोना आपत्तीच्या काळात अनेक समस्यांना तोंड देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. “मोठेपणी मला शिक्षक व्हायचे आहे” असा निर्धार व्यक्त करणारे विद्यार्थी शिक्षकांनी घडविले आहेत. त्याचबरोबर आपल्या पाल्याला समर्थपणे साथ देणारी, पहिली शिक्षिका, न्यायाधीश असलेल्या प्रत्येक आईचा विद्यार्थ्यांच्या यशात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन करायला हवे.

समारंभाच्या प्रारंभी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढाव घेतला. व्यक्तीच्या विकासामुळे समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होत असतो, त्यामुळे संस्था विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

संस्थेच्या नियमक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील यांनी श्री. बुक्के यांचा परिचय करून दिला.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “यशस्वी विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे असते. त्यांना मिळालेले यश दिसते मात्र, त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते दिसत नाही. त्यामुळे भविष्यात कठोर परिश्रमांची तयारी ठेवा आणि आपल्या कर्तृत्वाने जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न बघा. आपली शाळा आणि संस्था यांचे नाव उज्ज्वल होईल असे काम करा.”

संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

समारंभाचे सूत्रसंचालन वर्षदा पांढरकर यांनी केले.

पुणे, दि. १३ : संगीतातील रागरागिण्यांनी एका सूत्रात गुंफलेल्या देशाच्या सांस्कृतिक विविधतेतील एकात्मतेचे दर्शन ‘गुंजे बनकर देश राग’ या कार्यक्रमातून आज झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि मएसो कलावर्धिनी यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक आणि ज्येष्ठ गायिका सौ. अंजली मालकर यांचे गायन,   पन्नास विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम गायन आणि नृत्याविष्कारातून उत्तरोत्तर रंगत गेला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, मा. आनंद कुलकर्णी, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कोथरूडमधील मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरिअममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकावून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

राजस्थान, गुजराथ, सौराष्ट्र या भागात सौराष्ट्री या नावाने प्रचलित असलेला राग कालांतराने सोरट आणि नंतर देश या नावाने ओळखला जाऊ लागला. ‘भारती सृष्टीचे सौंदर्य दाविती सकल रुप’ हे वर्षभरातल्या ऋतूंचे वर्णन करणारे काव्य असो, प्रत्येक भारतीयाच्या मनात रुंजी घालणारे आणि विविध भाषांचा समावेश असलेले ‘गुंजे बन कर देश राग’ हे गाणे असो, संत कबीरांची रचना ‘चदरिया झिनी रे झिनी’ असो, प्रार्थना म्हणून गायले जाणारे ‘गगन सदन तेजोमय’ हे गीत असो किंवा होरीच्या नृत्यातून आणि ख्याल गायनातून देश राग विविध भावना आणि संस्कार घेऊन आपल्या भेटीला येतो. त्याचा अनुभव या कार्यक्रमात सादर झालेल्या गायन आणि नृत्याविष्कारातून मिळाला.

सौ. अंजली मालकर यांनी सादर केलेली बड्या ख्यालातील ‘रे मोरा मन हर लिनो’ ही रचना तसेच विरह आणि शृंगाराचा मिलाफ असलेली ‘घन गगन घन घुमड की नो’ ही छोटा ख्यालातील बंदिश देश रागाची चंचलता सांगणारी होती.

देश रागात संगीतबद्ध केलेला ‘चतरंग को गावे रसरंगत सो’ हा नारायणी कुलकर्णी या विद्यार्थिनीने गायलेला तराणा, ईशान मोडक या विद्यार्थ्याने सादर केलेले ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘मन मंदिरा तेजाने’ हे गीत आणि कृष्णचैतन्य सराफ याने गायलेले ‘आवोनी पधारे म्हारे देस’ हे राजस्थानी लोकगीत तसेच सौ.श्रुती जोशी आणि विद्यार्थिनीनी गायलेले बैजुबावरा चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले ‘दूर कोई गाए धून ये सुनाए’ या गाण्याला उपस्थितांची विशेष दाद मिळाली.

पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांनी होरी नृत्यासाठीच्या बांधलेल्या बंदिशीवर प्रा. सुखदा दीक्षित तसेच प्रा. अबोली थत्ते आणि विद्यार्थिनींनी केलेले सादरीकरण गायन, वादन आणि नृत्य यांचा प्रभावी अविष्कार होता.

या कार्यक्रमात प्रा. आदित्य देशमुख यांनी तबला, हेमंत पोटफोडे यांनी तालवाद्य, श्रीमती निवेदिता मेहेंदळे यांनी पखवाज, ओंकार पाटणकर यांनी सिंथेसायझर आणि देवेंद्र देशपांडे यांनी हार्मोनिअमवर साथसंगत केली.

‘वंदे मातरम्’च्या सामुहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे निवेदन प्रा. रश्मी देव आणि ऋषिकेश करदोडे यांनी केले.

हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाला मानवंदना देताना सैनिकी शाळेतील विद्यार्थिनी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे क्रांतीदिनानिमित्त आज (मंगळवार, दि. ९ ऑगस्ट २०२२) सकाळी हुतात्मा चौकातील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी सैनिकी वेशात हुतात्म्यांना मानवंदना दिली. इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी यावेळी हुतात्मा कर्णिक यांच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली.

या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य मा. प्रल्हाद राठी, सैनिकी शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे आणि सौ. चित्रा नगरकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कमांडंट विंग कमांडर यज्ञरमण  आदी मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

हुतात्मा कर्णिक स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतानाआर्कि. राजीव सहस्रबुद्धे. या वेळी उपस्थित (डावीकडून) सौ. सुवर्णा कांबळे, सचिन आंबर्डेकर, इंजि. सुधीर गाडे, डॉ. भरत व्हनकटे, मा. प्रल्हाद राठी, संदीप पवार आणि मोहन शेटे.
‘हर घर तिरंगा’ अभियानाला अनुलक्षून संस्थेने तयार केलेल्या पत्रकाच्या प्रकाशनावेळी (डावीकडून) संदीप पवार, आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, मोहन शेटे, इंजि. सुधीर गाडे, डॉ. भरत व्हनकटे, सौ. चित्रा नगरकर, मा. प्रल्हाद राठी

 

 

 

 

या प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला अनुलक्षून संस्थेने तयार केलेल्या पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींच्या मानवंदनेने वातावरण भारावून गेले होते. वर्दळीच्या ठिकाणी आणि कामाच्या गडबडीत असतानादेखील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्या कार्याची सविस्तर माहिती देताना इतिहास अभ्यासक मोहन शेटे.

इतिहास अभ्यासक मोहन शेटे यावेळी बोलताना म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्यासारख्या असंख्य क्रांतिकारकांप्रती आजच्या क्रांतीदिनी कृतज्ञता व्यक्त करतानाच या स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करण्याची प्रतिज्ञा करू या! देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात निकराचा संघर्ष करण्यासाठी महात्मा गांधीजींनी १९४२ साली मुंबईत गवालिया टँक येथील सभेत ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा केली आणि “करेंगे या मरेंगे” चा नारा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध मार्गांनी आंदोलने केल्यानंतर आता जुलमी ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकण्यासाठी जोरदार धमाका केला पाहिजे या भावनेतून भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या साथीदारांनी पुण्यातील कँप परिसरात असलेल्या कॅपिटॉल आणि वेस्ट एन्ड या दोन चित्रपटगृहात दि. २४ जानेवारी १९४३ रोजी चित्रपटाचा खेळ चालू असताना रात्री ९.३० वाजता भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या पाच साथीदारांनी ६  बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ३ ब्रिटिश अधिकारी ठार झाले तर १८ जण जखमी झाले. या घटनेने ब्रिटिश सरकारला मोठा हादरा बसला. स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब देहूरोड येथील दारुगोळा कारखान्यात तयार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि पोलीसांनी भास्कर कर्णिक व त्यांच्या काही साथीदारांना अटक करून फरासखाना पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यावेळी लघुशंकेचे निमित्त करून भास्कर कर्णिक बाजूला गेले आणि तेथे खिशातली सायनाईडची पूड खाऊन आत्मार्पण केले, तो दिवस होता ३१ जानेवारी १९४३. अशाप्रकारे कॅपिटॉल बॉम्ब खटल्यातील मुख्य दुवा नाहीसा झाल्यामुळे इतर क्रांतिकारकांची नावे पोलीसांना समजू शकली नाहीत. हुतात्मा भास्कर कर्णिक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण देशाशी प्रतारणा केली नाही.”

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकात स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याची महती विशद केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘आयएमसीसी’च्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पुणे, २१ जुलै : भारत हा प्राचीन काळापासून ज्ञानाचे देवालय राहिले आहे. आता युवकांनी पुन्हा शिक्षक बनून जगभरात जावे आणि संपूर्ण जगाला सुसंस्कृत बनवावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांनी बुधवार, दि. २० जुलै २०२२ रोजी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस (आएमसीसी) या शाखेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होसबाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

म. ए. सो. चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील व उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, आयएमसीसीच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड. धनंजय खुर्जेकर, आयएमसीसीचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, उपसंचालिका डॉ. मानसी भाटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहायक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच रा. स्व. संघाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

श्री. होसबाळे म्हणाले की, शिक्षण संस्थांमधून देशाला नवे नेतृत्व देणारे युवक – युवती पुढे येतात. त्यामुळे अशा शिक्षण संस्थांना भेटी देण्यामध्ये विशेष आनंद होतो. जगाच्या शैक्षणिक नकाशामध्ये पुण्याला एक वेगळे स्थान आहे. पुणे हे शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून पुढे आले आहे. पुण्याचे सांस्कृतिक वातावरण समृद्ध असून येथे युवक-युवती केवळ शिक्षण घेतात असे नाही तर त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगाने परिपूर्ण होते.

भारतातील शिक्षणाबद्दल ते म्हणाले की, भारतात शिक्षणाची प्राचीन परंपरा आहे. जगभरातून येथे लोक येत असत. भारत हा ज्ञानाचे देवालय राहिले आहे. भारतात शिक्षण हे केवळ काही लोकांपुरते मर्यादित होते, असे म्हणणे हे विकृत इतिहासाचे उदाहरण आहे. आता नवीन शिक्षण धोरणाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत ही सुवर्णसंधी आहे.

व्यवस्थापनाच्या क्षेत्राबद्दल ते म्हणाले की, भारतीय शिक्षण संस्थांमधून फक्त नोकरी मागणारे विद्यार्थी घडता कामा नयेत. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला शिक्षक होऊन जावे लागेल. त्या लोकांनाही संस्कृती शिकवावी लागेल. आपल्या देशात दरवर्षी साडेतीन लाख विद्यार्थी व्यवस्थापनाची पदवी प्राप्त करतात. दुर्दैवाने त्यातील केवळ १५ टक्के विद्यार्थ्यांकडे नोकरी मिळवण्याची पात्रता असते. व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना याचा विचार करावा लागेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच भारत हा व्यवस्थापन क्षेत्रातही विशेष स्थान मिळवू शकतो. तसे सामाजिक वातावरण व विविधता आपल्याकडे आहे. आपल्या व्यवस्थापन कौशल्याने आपण एक अद्भुत विश्व निर्माण करू शकतो.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविकपर भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ वर्षांच्या देदिप्यमान वाटचालीचा आढावा घेतला. तसेच ए. आय. सी. टी. ई. ने म. ए. सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस (आयएमसीसी) मधील एम. सी. ए. अभ्यासक्रमाच्या एका जादा तुकडीला व एम. बी. ए. अभ्यासक्रमाच्या दोन जादा तुकड्यांना मान्यता दिल्यामुळे आय. एम. सी. सी. मध्ये आता ७२० विद्यार्थी संख्या झाली असल्याची माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. हा नुसताच तरुण नाही तर आकांक्षा असलेला तरुण देश आहे. त्या तरुणांच्या स्वप्नांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सर्व ते बळ देईल.

शुभदा पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचा इ. १० वी चा एकत्रित निकाल ९४.९१ % लागला आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांमधील विद्यार्थ्यांनी इ. १२ वी च्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

म.ए.सो. रेणुका स्वरुप कौशल्य विकास केंद्र, सदाशिव पेठ, पुणे

‘शासनमान्य’ कोर्सेससाठी प्रवेश सुरु… त्वरा करा, प्रवेश मर्यादित.

1. सर्टिफिकेट कोर्स इन बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण (मराठी माध्यम)

2. सर्टिफिकेट कोर्स इन प्री स्कूल टीचर ट्रेनिंग कोर्स (इंग्रजी माध्यम)

3. सर्टिफिकेट कोर्स इन ड्रेस मेकिंग

4. सर्टिफिकेट कोर्स इन स्पेशलायझेशन इन ब्लाऊज

5. सर्टिफिकेट कोर्स इन बेसिक ब्युटी कल्चर

6. सर्टिफिकेट कोर्स इन प्रोफेशनल ब्युटी कल्चर आणि हेअर ड्रेसिंग

7. सर्टिफिकेट कोर्स इन कम्पुटराइज्ड अकाउंटिंग युजिंग टॅली

माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क – 9011059064, 9762035828, 9850064316,

Maharashtra Education Society, Pune, is organizing a Webinar Series on Career Opportunities for 10th and 12th pass students from 6th June to 11th June 2022 to apprise them about the different career opportunities after crossing the much important milestone i.e. SSC & HSC. This Webinar Series will help the students to select the right path with better understanding of conventional and nonconventional career opportunities.

The Webinar is free and open to all the 10th and 12th passed students of any stream.

Registration is compulsory. Registration form :Click Here

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,

‘मएसो भवन’, १२१४-१२१५, सदाशिव पेठ, पुणे ३०.

 

: होर्डिंगविषयी निविदा :

              तपशील:

  • पुण्यातील कर्वे रोड, पौड रोड, सदाशिव पेठ येथील संस्थेच्या विविध शाखांच्या आवारातील होर्डिंग्ज भाडेतत्वावर द्यावयाचे संस्थेच्या विचाराधीन आहे. संबंधित ठिकाणच्या होर्डिंग्जसाठी कंत्राटदारांकडून तीन वर्षे कालावधीकरिता निविदा मागविण्यात येत आहेत. संस्थेकडे प्राप्त झालेल्या सर्व कंत्राटदारांचे किंवा कोणा एका कंत्राटदाराचा प्रस्ताव नाकारण्याचा, होर्डिंग्जची ठिकाणे रद्द करण्याचा किंवा सदर निविदा प्रक्रिया थांबविण्याचा हक्क संस्थेने राखून ठेवला आहे.
  • होर्डिंग्जची ठिकाणे, आकार व संख्या पुढीलप्रमाणे :
अनु क्र.

होर्डिंगचे ठिकाण

होर्डिंग संख्या

आकार

स्क्वे.फूट

(W x H)

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, आयुर्वेद रसशाळा चौक.

२०x २०

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, महाविद्यालयाची पॅरापीट वॉल, आयुर्वेद रसशाळा चौक.

२० x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, सेन्ट्रल मॉल समोरील जागा.

२०x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, दाराजवळ, नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वे रोडकडे येताना.

२०x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, जुन्या इमारतीवरील पॅरापीटवॉल नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वे रोडकडे येताना.

४० x २०

मएसो सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कन जिमखाना, कर्वे रोड बाजू.

२०x २०

मएसो मुलांचे विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे ३०, हत्ती गणपती बाजूकडील शाळेचे आवार.

२०x २०

  • होर्डिंग कालावधी : ना हरकत कालावधी ३ वर्षासाठी, होर्डिंगसाठी ३ वर्ष कालावधीचा करार.
  • अटी व शर्ती:
  • होर्डिंग मंजूर झाल्यास जाहिरात फलकाच्या भाड्याची एक वर्षाची रक्कम संस्थेमध्ये आगाऊ भरावी लागेल. पहिल्या वर्षाच्या समाप्तीला दुसऱ्या वर्षाची व दुसऱ्या वर्षाच्या समाप्तीला तिसऱ्या वर्षाची भाड्याची रक्कम आगाऊ भरावी लागेल. होर्डिंग उभारण्यासाठी संस्थेकडून देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे. तसे करावे लागल्यास संस्थेकडून एक महिन्याची नोटीस दिली जाईल.
  • संस्था व होर्डिंग मंजूर झालेल्या जाहिरातदाराबरोबर योग्य तो करारनामा केला जाईल. करारनाम्यातील कलम अथवा कलमांचा भंग झाल्यास संस्थेला करार रद्द करण्याचा अधिकार राहील.
  • होर्डिंगसाठीचे स्ट्रक्चर अर्जदारानी स्वतःच्या खर्चाने उभारावयाचे आहे. त्यासाठी संस्थेच्या स्ट्रक्चरल इंजिनियरचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आपल्या खर्चाने संस्थेकडे सादर करावयाची जबाबदारी आपली राहील. स्ट्रक्चरल इंजिनियरचे प्रमाणपत्र संस्था कार्यालयाकडे प्राप्त झाल्यावरच होर्डिंगचा वापर सुरु करावयाचा आहे. होर्डिंग मजबूत असणे ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे जीवितहानी, अपघात किंवा काही अनुचित घटना घडल्यास त्या घटनेची संपूर्ण जबाबदारी आपली राहील.
  • होर्डिंग उभारताना संस्थेच्या शाखेच्या इमारतीस नुकसान पोहोचू नये याची दक्षता घ्यावी. होर्डिंग उभारताना इमारतीस नुकसान पोहोचल्यास इमारत कंत्राटदाराला स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून द्यावी लागेल. तसेच होर्डिंग उभारताना, होर्डिंग कराराच्या कालावधीत आणि होर्डिंग पूर्णतः काढेपर्यंत दुर्घटना घडून व्यक्तीस इजा इत्यादी झाल्यास आर्थिक, दिवाणी, फौजदारी स्वरुपाची किंवा अन्य कोणतीही जबाबदारी संस्थेची राहणार नाही. होर्डिंग उभारणी ते होर्डिंग काढणे या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने आवश्यक त्या सर्व प्रकारचा अपघात विमा काढावा व त्याची एक प्रत संस्थेकडे माहिती म्हणून द्यावी.
  • होर्डिंगसाठीचा वीज पुरवठा संस्थेच्या शाखेमार्फत दिला जाणार नाही, त्यासाठी आपण स्वतंत्र व्यवस्था करावयाची आहे. गरजेनुसार वीज पुरवठ्यासाठी संस्थेकडून ना हरकत देता येऊ शकेल मात्र त्याचे दरमहाचे देयक भरण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील.
  • होर्डिंग ज्या कालावधीसाठी मंजूर झालेले आहे तो कालावधी संपल्यावर कंत्राटदाराने संस्थेच्या संबंधित शाखेच्या आवारातून लगेच होर्डिंग व साहित्य काढून घ्यावयाचे आहे याची नोंद घ्यावी.
  • आवश्यक त्या सर्व शासकीय आस्थापनांकडून आवश्यक परवानग्यांची पूर्तता आपण करावयाची आहे. होर्डिंगबाबत लागू असणाऱ्या सर्व कायद्यांनुसारच्या कायदेशीर बाबी व कार्यवाही पूर्ण करणे, आणि सर्व प्रकारच्या परवानग्या कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चाने प्राप्त करून घेऊन संबंधित सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती संस्था कार्यालयामध्ये दाखल करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे. या अनुषंगाने येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अथवा इतर जबाबदारीस संस्था जबाबदार नाही.
  • होर्डिंग मंजूर झाल्यास वर्षातून १५ दिवस संस्था सांगेल त्या दिवसांना संस्था किंवा संस्थेच्या शाखेचे जाहिरात फलक लावणे बंधनकारक राहील.
  • ‘मएसो’ ही शैक्षणिक संस्था असल्याने होर्डिंगवर जाहिरात लावताना कोणती जाहिरात दिली जाणार आहे व त्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक वातावरण बिघडवणारी किंवा आक्षेपार्ह चित्रे व मजकूर नाही इत्यादीबाबतीत कंत्राटदारास खात्री करावी लागेल व मगच होर्डिंग प्रदर्शित करावे लागेल. आक्षेपार्ह जाहिरात प्रदर्शित झाली आहे असे आढळून आल्यास जाहिरात तात्काळ काढून घ्यावी लागेल याची कंत्राटदाराने जाणीवपूर्वक नोंद घ्यावी.
  • उपरोक्त  सर्व अटीं व शर्तींमध्ये बदल करण्याचा, ऐेनवेळी नव्या अटी व शर्तीं समाविष्ट करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे.
  • संस्थेकडे प्रस्ताव देण्याची अंतिम तारीख :  बुधवार, दिनांक १५ जून २०२२ रोजी सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत संस्था कार्यालयामध्ये सीलबंद लखोट्यात (‘लखोट्यावर ‘होर्डिंगबाबत निविदा’ असे मोठ्या अक्षरात लिहून) सोबत दिलेल्या विहित नमुन्यातच संबंधितांनी प्रस्ताव सादर करावेत.

 

आपला विश्वासू,

(सचिन आंबर्डेकर)

मुख्य कार्यकारी अधिकारी,

 मएसो, पुणे ३०.

——————————————————————————

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांच्या आवारात होर्डिंग लावण्यासाठी प्रस्ताव

प्रति,                                                                                                                             दिनांक:     /    /२०२२

मुख्य कार्यकारी अधिकारी,

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,

‘मएसो भवन’, १२१४ – १२१५ सदाशिव पेठ, पुणे ३०.

विषय : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांच्या आवारात होर्डिंग लावण्यासाठी प्रस्ताव

विहित अर्ज

प्रस्ताव देणा-या व्यक्ती अथवा संस्थेचे नाव व पूर्ण पत्ता

(अर्जासोबत पॅन कार्ड, आधार कार्ड जोडावे)

संपर्क क्रमांक –(लँडलाईन व भ्रमणध्वनी क्रमांक द्यावेत)
संस्था किंवा फर्म इत्यादी असल्यास नोंदणीकृत असल्याबाबतची कागदपत्रे जोडली आहेत का ? जोडली आहेत / जोडली नाहीत
पुणे महानगरपालिकेकडे नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक, नोंदणीचा दिनांक (नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची छायाप्रत सोबत जोडावी. नोंदणी केली आहे / नोंदणीकेलेली नाही
या क्षेत्रात आपणास किती वर्षाचा अनुभव आहे. अनुभव असल्यास आपल्याद्वारा शहरामध्ये सध्या चालू असलेल्या ३-४ साईटचे फोटो जोडावेत जोडली आहेत / जोडली नाहीत

होर्डिंगसाठी  कंत्राटदाराकडून प्रस्तावित करण्यात येत असलेली भाडे रक्कम :

अनु क्र.

ठिकाण

होर्डिंग संख्या आकार

(Wx H)

भाड्याची प्रती स्क्वे.फू. प्रस्तावित वार्षिक रक्कम

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, आयुर्वेद रसशाळा चौक.

२० x २०

 

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, महाविद्यालयाची पॅरापीटवॉल, आयुर्वेद रसशाळा चौक.

२० x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, सेन्ट्रल मॉल समोरील जागा.

२० x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, दाराजवळ, नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वे रोड कडे येताना.

२० x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, जुन्या इमारतीवरील पॅरापीटवॉल नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वेरोड दिशेने येताना.

४० x २०

मएसो सौ विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कनजिमखाना, कर्वे रोड.

२० x २०

मएसो मुलांचे विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे ३०, हत्ती गणपती बाजूकडील शाळेचे आवार.

२० x २०

मी निविदा तपशील पूर्णपणे वाचला असून मला समजला आहे तसेच निविदा तपशीलामध्ये दिलेल्या सर्व अटी व शर्ती मी वाचल्या आहेत व मला मान्य आहेत.

अर्जदाराचे नाव

स्वाक्षरी व शिक्का

दिनांक:    /    / २०२२

डॉ. एन.एस. उमराणी यांचे स्वागत करताना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे  मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे. छायाचित्रात (डावीकडून) डॉ. भरत व्हनकटे, सचिन आंबर्डेकर, डॉ. गीता आचार्य, इंजि. सुधीर गाडे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. एन.एस. उमराणी यांनी आज (गुरुवार, दि. १९ मे २०२२) पुन्हा पदभार स्वीकारला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी त्यांचे स्वागत केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून निवड झाल्यामुळे डॉ. उमराणी यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा दिला होता. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी प्र-कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. काल प्र-कुलगुरू पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉ. उमराणी यांनी आज महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून पुन्हा पदभार स्वीकारला.

यापूर्वी २ मे २००८ ते १७ नोव्हेंबर २०१७ या काळात डॉ. उमराणी यांनी मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे.

महाविद्यालयात आज त्यांच्या स्वागतावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. केतकी मोडक, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी सौ. आनंदी पाटील आणि बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सौ. पाटील या मेकॅनिकल इंजिनिअर असून व्यवसायाने उद्योजिका आहेत. मार्च २०१७ पासून त्या मएसोच्या नियामक मंडळाच्या सदस्य आहेत. मएसो बाल शिक्षण मंदिर व शिशु मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या महाविद्यालय सल्लागार समितीच्या सदस्य तसेच मएसो रेणुका स्वरुप करिअर कोर्सेसच्या सल्लागार समिती सदस्य अशी त्यांच्याकडे सध्या जबाबदारी आहे.

यापूर्वी त्यांनी पुण्यातील औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलांची), औंध, पुणे (Government ITI – Boy’s) या संस्थेच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या उपाध्यक्ष आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची), औंध, पुणे (Government ITI – Girl’s) या संस्थेच्या संस्था व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

बाबासाहेब शिंदे हे स्वतंत्र व्यावसायिक असून पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या पिंगोरी या गावात ते ग्रामविकासाचे कार्य करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगर ग्रामविकास गतीविधीची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

ऑक्टोबर २०१८ पासून ते मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. मएसो वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेच्या शाला समितीचे अध्यक्ष तसेच मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आणि मएसोच्या बारामतीमधील शाळांच्या शाला समितीचे सदस्य अशी त्यांच्याकडे सध्या जबाबदारी आहे.

डॉ. माधव भट आणि सीए अभय क्षीरसागर यांनी संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांवर सौ. आनंदी पाटील व बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सध्याच्या काळात खूप कष्ट घेतात, ते बघून शिक्षण क्षेत्रासाठी काही करावे अशी कल्पना मनात आली. त्यासंबंधात विचार करत असताना सामाजिक भान जपणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नाव समोर आले आणि शैक्षणिक कार्यासाठी याच संस्थेला देणगी देण्याचे निश्चित केले. मी दिलेल्या देणगीतून संस्थेने अतिशय उत्तम इमारत बांधून पूर्ण केली याचा मला आनंद वाटतो. सामाजिक जबाबदारी म्हणून चांगली संस्था निवडून अनेकदा आर्थिक मदत केली. आजपर्यंत मतिमंद, वृद्ध व्यक्तिंसाठी चांगली संस्था निवडून कार्य केले. शिक्षणामुळे समाजात प्रबोधन होईल आणि समाजातील गरजू व्यक्तींचे जीवन अधिक सुसह्य होईल तसेच पत्नीची आठवण कायम राहिल अशी इच्छा मनात होती, ती आता पूर्ण झाली आहे अशा शद्बात संस्थेचे हितचिंतक व देणगीदार मा. वसंत ठकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन तीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन आणि मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस या शाखेच्या नवीन इमारतीतील प्रवेशानिमित्त गणेशपूजन असा कार्यक्रम अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज (मंगळवार, दि. ३ मे २०२२) आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते हे दोन्ही कार्यक्रम झाले. या वेळी मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसच्या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या प्रेक्षागृहात झालेल्या औपचारिक कार्यक्रमात मा. वसंत ठकार बोलत होते.

यावेळी संस्थेचे मा. उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, मा. उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या शाला समितीचे अध्यक्ष आ.वा. कुलकर्णी, मएसो आयएमसीसीचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे व आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, ठकार कुटुंबिय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मएसो आयएमसीसीच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. १९८३ साली २० ते ३० विद्यार्थी संख्येने सुरू झालेल्या आयएमसीसीत आज १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या इमारतीमुळे व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व गरजा पूर्ण झाल्या असून असून येत्या २-३ वर्षात आयएमसीसीतील विद्यार्थ्यांची संख्या २००० पर्यंत पोहोचेल, अशी माहिती दिली. या वाढीत सर्वांचेच मोठे योगदान असून ही अक्षय्य ऊर्जा अशीच टिकून राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यी संघाच्या https://maa.mespune.in या संकेतस्थळावर विनाशुल्क अधिकृत सदस्यत्वासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेचे https://maa.mespune.in/https-forms-gle-fovurzd5vhgf1ai98 उद्घाटन एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. त्यांनी स्वतः या लिंकवरील  https://forms.gle/FovuRZD5VhGf1Ai98 गुगल फॉर्म भरून आपली सदस्यत्व नोंदणी केली.

नव्या इमारतीच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, शिक्षण संस्था जितके काम करतील, तितके ते कमीच असते. ‘मएसो’ संस्थापकांचे उद्दीष्ट शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्कार देणे हे देखील होते. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे, आम्ही मात्र सोन्यासारखी माणसे जोडतो. मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेऊन या संस्थेतून बाहेर पडतील. श्री. वसंत ठकार यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी योग्य वाटली.  मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील वातावरण कायमच आनंदी असते. अशा वातावरणात शिकलेले विद्यार्थी नावलौकीक मिळवतील. नवी पिढी सक्षम झाली तरच देश सक्षम होईल आणि देशाचा विकास होईल, त्यात जुन्या पिढीचे हितदेखील आहे.

मएसो आयएमसीसीचे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. बांधकाम क्षेत्रातील तज्ञांच्या योगदानाने नवी वास्तू उभी राहिली आहे, या वास्तुमध्ये सक्षम विद्यार्थी घडतील याची खात्री आहे असे ते या वेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मएसो आयएमसीसीतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अश्विनी पाटील यांनी केले.

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील भूमिपूजनानिमित्त करण्यात आलेली पूजा शाळेच्या उच्च माध्यमिक विभागातील शिक्षिका सौ. कांचन मापारी व त्यांचे यजमान श्री. श्रीकांत मापारी यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस या शाखेच्या नवीन इमारतीतील प्रवेशानिमित्त मएसो आयएमसीसीमधील सहयोगी प्राध्यापक आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ. मानसी भाटे व त्यांचे यजमान श्री. समीर भाटे यांनी गणेशपूजन  केले.

 

मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रोड शाळेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थिनी व प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना मा. मनीषा साठे यांनी प्रस्तुत केलेल्या ‘नृत्यार्पण’ या कलाविष्काराची एक छलक …

कॉमनवेल्थ सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड रिसर्च या संस्थेतर्फे दिला जाणारा ‘पुण्यातील सर्वोत्तम शिक्षण संस्था’ पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसला (‘एमईएस आयएमसीसी’) प्राप्त झाला आहे. ‘एमईएस आयएमसीसी’चे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी रविवार, दि. १७ एप्रिल २०२२ रोजी पुण्यात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात हिंदी चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या हस्ते तो स्वीकारला.

उद्योग, शिक्षण, व्यवसाय आणि सेवा क्षेत्राशी निगडीत विविध गटांत काम करणाऱ्या भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय औद्योगिक संस्था, शिक्षण संस्था, शिक्षणतज्ञ आणि व्यक्ती यांचा ‘कॉमनवेल्थ एक्सलन्स अवॉर्ड’ या पुरस्कारासाठी विचार केला जातो.

कठोर परिश्रमातून प्राप्त केलेल्या श्रेष्ठतेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देणारा हा मानाचा पुरस्कार प्रभावी आणि संवेदनशील व्यावसायिकतेची दिशा देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या सृजनात्मक कामगिरी आणि योगदानाला पोचपावती मिळवून देणारा पुरस्कार आहे.

व्यक्ती आणि संस्थांची भूमिका, त्यांची क्षमता आणि कार्य यांना प्रोत्साहन देऊन नावीन्यपूर्ण कार्यपद्धती आणि प्रतिभाशाली उपाययोजना यांच्या आदान-प्रदानाद्वारे युवा पिढीला शाश्वत विकासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी या पुरस्कारच्या माध्यमातून प्रोत्साहित केले जाते.

घाणेखुंट – लोटे परिसरातील नागरिकांना एम. इ. एस. ए. एम. परशुराम रुग्णालयातर्फे दिल्या जात असलेल्या उत्तम आरोग्यसेवेची दखल घेत डाऊ अॅग्रो सायन्सेस कंपनीने रुग्णालयाला दिलेल्या देणगीतून रुग्णालयात अद्ययावत डिजिटल एक्स-रे मशिन उपलब्ध झाले आहे. त्याचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते बुधवार, दि. १३ एप्रल २०२२ रोजी करण्यात आले. डाऊ अॅग्रो सायन्सेस कंपनीचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी श्री. जयंतराव शेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. विवेक कानडे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव इंजिनिअर  सुधीर गाडे, डाऊ अॅग्रो सायन्सेस कंपनीचे प्रतिनिधी श्री. जयंतराव  शेठ, रुणालयाचे अधिक्षक डॉ. शाम भाकरे, उपअधिक्षक डॉ. अनुपम अलमान, एम. इ. एस. आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन उत्पात, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री. मिलिंद काळे, इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परशुराम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी उपस्थित होते.

मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीवजी सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या इतिहासाचा मागोवा घेतला. ८०० स्क्वेअर फूट जागेत सुरु झालेल्या  परशुराम रुग्णालयाची प्रगती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आजवर दुर्लक्षित व उपेक्षित राहिलेल्या भागात शिक्षण तसेच वैद्यकीय सुविधा पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न संस्था करीत आहे. त्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती मदत करीत आहेत. डाऊ अॅग्रो व इतर कंपन्यांनी दिलेल्या मदतीचा विनियोग त्यांना अपेक्षित असलेल्या रुग्णसेवेच्या कामाकरिताच केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

डाऊ अॅग्रो आणि एम. आय. डी. सी. मधील कर्मचारी वर्गास इ. एस. आय. योजनेअंतर्गत या रुग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी अशी इच्छा प्रदर्शित करून त्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन प्रमुख पाहुणे श्री. जयंतराव शेठ यांनी दिले.

सी. एस. आर. फंडातून समाजोपयोगी विविध उपक्रमांना डाऊ अॅग्रो कंपनी व परिसरातील इतर कंपन्यादेखील वेळोवेळी मदत करतात. कोविड प्रदुर्भावाच्या काळात डाऊ अग्रो, सुप्रिया केमिकल्स, घरडा, गोदरेज इ. विविध कंपन्यांनी रुग्णालयास आर्थिक व वस्तुरूप सहाय्य केले. त्याबद्दल संचालक डॉ.शाम भाकरे यांनी या वेळी कृतज्ञता व्यक्त केली.

वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे डॉ. विवेक कानडे यांनी या प्रसंगी सांगितले.

१६१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने २००७ साली घाणेखुंट – लोटे येथे परशुराम रुग्णालयाची स्थापना केली. पंचक्रोशीतील रुग्णांना सवलतीच्या दारात उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून रुग्णालय व संस्था सतत प्रयत्नशील आहे.

In collaboration with Maharashtra University of Health Sciences, Nashik M. E. S. College of Nursing has conducted a workshop on Health Science Education Technology from 11th April 2022 to 13th April 2022.

The valedictory function was conducted on 13th April 2022. Architect Rajeev ji Sahasrabudhe, Chairman, Governing Body, Maharashtra Education Society, Pune was presiding over the function. Dr. Vivek Kanade, Chairman, College Advisory Committee, M. E. S. College of Nursing & Member, Governing Body and Engineer Sudhir Gade, Asst. Secretary, Maharashtra Education Society, Pune were present for this function.

The objective of workshop was to provide skilful education to New teachers in health science sectors.

Total 4 Resource Persons were appointed from various colleges.

Dr. Anjali Upadhye, Anna Saheb Dange Medical College, Ashta, Sangli.

Dr. Santosh Patil, Bharati Vidyapeeth Medical College, Sangli.

Dr. Vaishali Patil, Dr. D.Y. Patil Medical College, Kolhapur.

Dr. Yugandara Kadam, Krinshna Institute of Medical Sciences, Karad.

Total 30 candidates were selected from M.E.S. College of Nursing and M.E.S. Ayurved Mahavidyalaya to attend this workshop.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या १८ व्या तुकडीचा दीक्षांत समारोह गुरुवार, दि. ७ मार्च २०२२ रोजी अतिशय उत्साहात पार पडला. या वेळी शाळेतील छात्रांनी सादर केलेली चित्तथरारक सैनिकी प्रात्यक्षिके उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरली.  मुळशी तालुक्यात कासार आंबोली येथे असलेल्या शाळेच्या प्रांगणात झालेल्या या ‘पासिंग आऊट परेड’चे नेतृत्त्व स्कूल कॅप्टन तेजस्वी लांबा या विद्यार्थिनीने केले. शाळेतील इ. ६ ते १२ वी च्या ४५० विद्यार्थिनींनी या वेळी संचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सी.ए. श्री. योगेश दीक्षित यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट श्री. राजीव सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्या व शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, शाला समितीच्या महामात्रा प्रा. चित्रा नगरकर, सदस्य मा. श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. अॅड. सागर नेवसे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य मा. सुधीर भोसले, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्यार्थिनींच्या शानदार संचलनानंतर इयत्ता १२ वी च्या छात्रांची पासिंग आऊट परेड झाली. त्यानंतर शाळेच्या छात्रांनी रायफल शुटिंग, अश्वारोहण, धनुर्विद्या, कराटे, मर्दानी खेळ, रोप मल्लखांब, लेझीम आणि योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.

पासिंग आऊट परेड व छात्रांची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून आपण भारावून गेल्याचे प्रमुख पाहुणे डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी कोरोना महामारीच्या आपत्तीनंतर प्रात्यक्षिकांचे सुंदर सादरीकरण केल्याबद्दल सर्व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे कौतुक केले.

याप्रसंगी ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेनुसार शाळेच्या आवारातील भरारी विमानाचे शिल्प, एन.सी.सी. कक्ष व आर्ट वॉल यांचे उद्घघाटन प्रमुख पाहुणे डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले.

‘Sword of Honour’ हा पुरस्कार कु. वृंदा पवार हिला तर ‘उत्कृष्ट विद्यार्थिनी’ हा पुरस्कार कु. साक्षी टेकवडे यांना देण्यात आला. ‘उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादरीकरणा’चा पुरस्कार रायफल शुटिंगला मिळाला.  ऑनररी कॅप्टन (निवृत्त) श्री.चंद्रकांत बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी कु. देवयानी चव्हाण, कु. गीता धनवडे व  कु. गिरीजा जोगळेकर यांना तर शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, सौ. मंजिरी पाटील, श्री. रविंद्र उराडे, सौ. वैशाली शिंदे या शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल या वेळी सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधवी मेहेंदळे यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अद्वैत जगधने यांनी तर उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

सैनिकी शाळेतील एन. सी. सी. कक्षाचे उदघाटन

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आणि म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते शाळेतील एन. सी. सी.  कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी एन. सी. सी. ची माहिती देणारे फलक तसेच एन. सी. सी. च्या छात्रांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती ए. एन.ओ. (Associate NCC Officer – ANO) थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी छायाचित्रांच्या आधारे करून दिली.

याप्रसंगी ए. एन. ओ. प्रशिक्षणामध्ये ‘ग्राऊंड स्किल टेस्ट’ तसेच सर्वोत्तम गुणांसह प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल शाळेतील ए. एन. ओ. थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांना सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसचे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च अँड रेकिग्नेशन कमिटीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

‘आरआरसी’ या संक्षिप्त नावाने ओळखली जाणारी ही समिती संशोधन आणि मान्यता या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावते. त्यापैकी एक महत्वाची भूमिका म्हणजे संशोधनाच्या विषयाला मान्यता देण्याबाबत विचार करणे आणि आवश्यक वाटल्यास त्यासाठी सहनिरीक्षक नियुक्त करणे. हे सहनिरीक्षक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अन्य विभागामधील किंवा संलग्न महाविद्यालयांमधील मान्यताप्राप्त संशोधन केंद्रातील किंवा मान्यताप्राप्त संस्था किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था किंवा संबंधित अन्य संस्था वा विद्यापीठ यामधील असतात आणि संशोधन सल्लागार समितीच्या मान्यतेने त्यांची नियुक्ती केली जाते.

डॉ. संतोष देशपांडे यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसमधील संशोधन कार्याला प्रेरणा आणि अधिक गती मिळणार आहे.

देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी आज (रविवार, दि. ६ मार्च २०२२) पुण्यातील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गिकेचे उद्घाटन केले. गरवारे कॉलेज ते आनंदनगर या स्थानकांदरम्यान स्वतः मा. पंतप्रधानांनी मेट्रो रेल्वेतून प्रवास केला.

या वेळी त्यांच्यासमवेत प्रवास करण्याची संधी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील विद्यार्थ्यांना मिळाली. अंजली हळदे, सायली देवरूखकर, रसिका शिखरे, रिद्धी शेलोत, सिद्धी वाणेकर, आदित्य काळे, अनिकेत भट्टाचार्य, ओंकार अलिसे, सनी आरोळे, प्रवीण जलदे या विद्यार्थ्यांना हे सुवर्ण क्षण अनुभवता आले.

https://www.youtube.com/watch?v=OdQyHMUOi1U

प्रवासादरम्यान या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मा. पंतप्रधानांनी विद्यार्थ्याचे नाव, शाळा, संस्था याबाबत माहिती विचारली. मराठी भाषा आपल्याला खूप आवडते असे सांगितले. घरून शाळेत कसे येता? आता मेट्रो रेल्वेचा उपयोग करणार का? अशी विचारपूस केली. त्यावर विद्यार्थिनींनी मेट्रो रेल्वेमुळे सुरक्षितपणे प्रवास करता येईल आणि शहर देखील प्रदुषणमुक्त होईल असे उत्तर दिले. मेट्रो रेल्वेचा आग्रहपूर्वक उपयोग करा असे मा. पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. तसेच भविष्यात कोण व्हायचे आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर रसिका शिखरे या विद्यार्थिनीने पोलीस होणार असल्याचे सांगितल्यावर मा. पंतप्रधानांनी रसिकाचे कौतुक केले.

मा. पंतप्रधानांची झालेली भेट आणि त्यांच्या समवेत मेट्रो रेल्वेने पहिला प्रवास करण्याची मिळेलेली संधी यामुळे झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

 

पुणे, दि. २८ : “ जगाच्या इतिहासात आपल्या देशाची ओळख ज्ञान देणारा देश म्हणून आहे. त्यामुळे आक्रमकांनी देशातील महाविद्यालये, नालंदासारखी विद्यापीठ नष्ट केले. ब्रिटिशांनी विज्ञानाच्या आधारे आपल्या देशातील नागरिकांची मति भ्रमित केली. आपल्या देशातील ज्ञान आणि ते देणारे ग्रंथ निकृष्ट दर्जाचे ठरवले. भारतातील ज्ञान तर्कसंगत नाही, ते भ्रामक समजुती आणि अंधश्रद्धेवर आधारित आहे, हे समाजमनावर बिंबवले. हे ज्ञान देणारी भाषा संस्कृत असल्याने त्यांनी ती भाषा मृत भाषा ठरवली. सुशिक्षितांनी हे सर्व सत्य मानले. भारतीय ज्ञान परंपरेतील विषय आजही आपल्या देशात शिकवले जात नाहीत आणि गेल्या ७५ वर्षात आपण ते पुर्स्थापित करू शकलो नाही, इतका आपल्यावर ब्रिटिशांचा प्रभाव आहे”, असे प्रतिपादन विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव मा. जयंतराव सहस्रबुद्धे यांनी आज येथे केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘स्वराज्य – ७५: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दुसरे पुष्प गुंफताना मा. जयंतराव सहस्रबुद्धे बोलत होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाचा विषय होता, ‘भारताचा स्वातंत्र्य लढा व विज्ञान’. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक होते.

म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस आणि म.ए.सो. सिनीअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक होते. या वेळी व्यासपीठावर म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’ च्या अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील, म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसचे संचालक डॉ. संतोष कुलकर्णी, म.ए.सो. सिनीअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे उपस्थित होते.

कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरिअममध्ये हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

या वेळी बोलताना मा. जयंतराव सहस्रबुद्धे यांनी पुढे सांगितले की, भारतातील थोर वैज्ञानिक चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी आपले शोधकार्य २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रसिद्ध केले म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या संशोधनाला नोबेल पुरस्कार मिळणार असा त्यांना आत्मविश्वास होता, त्यामुळे त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्विडनमध्ये जाण्याकरिता जहाजाचे टिकट देखील काढले होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे १९३० साली त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला. तो स्वीकारताना रमण यांनी हा पुरस्कार स्वतंत्र देशाच्या ध्वजाखाली स्वीकारू शकत नसल्याचे शल्य व्यक्त केले. तसेच तो पुरस्कार देशाच्या स्वातंत्र्य योद्ध्यांना समर्पित केला.  चंद्रशेखर व्यंकटरमण हे केवळ वैज्ञानिक नव्हते तर ते स्वातंत्र्य योद्धेदेखील होते, याकडे दुर्लक्ष होते. भारतीय विज्ञानाची किर्तीपताका जगासमोर नेणाऱ्यांची नावे, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी योगदान दिलेल्या विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींची नावे जगासमोर येत नाहीत. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करताना ५ सूत्रे समोर ठेवली आहेत… १. स्वातंत्र्य चळवळ, २. नवनवीन कल्पना, ३. उपलब्धी किंवा यश, ४. वर्तमान व भविष्याची योग्य दिशेने वाटचाल आणि ५. समृद्ध भविष्य घडविण्याचा संकल्प. यातील पहिल्या सूत्राचे योग्यप्रकारे आकलन करून घेतल्याशिवाय अन्य सूत्रांची निश्चित दिशा समजणार नाही. देशाच्या स्वातंत्र चळवळीचे आकलन करून घेताना हे लक्षात येते की, आक्रमकांचा उद्देश हा नेहमीच प्रदेश जिंकणे आणि तेथील संस्कृती नष्ट करणे होता. त्यातून आत्मगौरव आणि आत्मविश्वास नाहीसा होतो आणि ज्येत्याचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. देशाची अस्मिता आणि ‘स्व’ संपवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने केला गेला. ब्रिटिशांनी केलेले आक्रमण वेगळ्या स्वरुपाचे होते. ते का यशस्वी झाले? देशाची ओळख नष्ट करण्यासाठी त्यांच्याकडे कोणते साधन होते?  याचा विचार केला तर लक्षात येते की ब्रिटिशांनी विज्ञानाच्या सहाय्याने आपली मति भ्रमित केली. रेल्वे, तार खाते, ॲलोपॅथी याबरोबरच त्यांनी पहिल्या औद्योगिक क्रांतीमुळे उभ्या राहिलेल्या कारखान्यांच्या भांडवलाची आणि कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी, आपल्या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियासारख्या विविध सर्वेक्षण संस्था निर्माण केल्या, जंगलात राहणाऱ्या लोकांना जंगलापासून दूर करण्यासाठी जंगल कायदा निर्माण केला. आज आपण आपल्या देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत,  पण ब्रिटिशांनी १९० वर्षांच्या राजवटीत त्याच्या ९ पट म्हणजे ४५ ट्रिलियन डॉलर इतकी भारताची लूट केली. होमिओपॅथी ही तर्कशुद्ध उपचार पद्धती शत्रूराष्ट्र असलेल्या जर्मनीमध्ये विकसित झाली असल्याने ब्रिटिशांनी ते छद्मविज्ञान ठरवले. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेले महेंद्रलाल सरकार यांनी जेव्हा होमिओपॅथीचा पुरस्कार केला तेव्हा त्यांच्यावर सरकारी बहिष्कार घालण्यात आला. त्यानंतर महेंद्रलाल सरकार यांनी भारतीय विज्ञानाचे पुनर्रुज्जीवन करण्यासाठी कलकत्ता मेडिकल जर्नल सुरू केले. स्वदेशी भावनेचा अविष्कार करण्यासाठी समाजाच्या सहयोगाने इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेची स्थापना केली. पूर्णपणे स्वदेशी आणि निव्वळ राष्ट्रीय ध्येयाने सुरू झालेल्या या संस्थेमुळे विज्ञान क्षेत्रात स्वदेशी चळवळीचा उदय झाला आणि या संस्थेतून देशभक्त शास्त्रज्ञ तयार झाले. चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी देखील याच संस्थेत संशोधन कार्य केले. देशाच्या स्वातंत्र्याला लढा हा केवळ राजकीय नव्हता तर विज्ञानाच्या क्षेत्रातदेखील तो तितक्याच प्रखरतेने लढला गेला. स्वतंत्र भारत हा संशोधन करून ज्ञान निर्माण करेल त्यासाठी शास्त्रज्ञांनी दिलेली दिशा समजून घेतली पाहिजे.

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाची मानसिकता, परंपरा, आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याची गरज आहे. भूतकाळातील न्यायावर मात करून भविष्यात कोणी आपल्या देशाची लूट करू शकणार नाही असे सामर्थ्य निर्माण करण्याची आवश्यकता आहे.  आत्मनिर्भर, जगाला दिशा दाखविणारा भारत निर्माण करण्याचा संकल्प युवा पिढीने करावा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन म. ए. सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसमधील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पूनम वाठारकर यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे सादर करत आहे

कथामाला

सादरकर्ते : म. ए.सो.भावे प्राथमिक शाळा, पुणे

🪔🪔🪔🪔🪔🪔

📣 कथा- नवनिर्मिती विज्ञानक्षेत्रातील ! – डॉ. महेंद्रलाल सरकार यांचे योगदान

🖌️लेखन-जयंत सहस्त्रबुद्धे

🎤वाचक स्वर- रेणुका महाजन

https://youtu.be/WP3xRatF4rQ 

म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला मिळाली स्वायत्तता

छायाचित्रात (डावीकडून) : संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी.बुचडे, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीवजी सहस्रबुद्धे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव आणि संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि समाज यांच्यातील ऋणानुबंध अधिक बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, जागतिक आव्हान ठरलेल्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत केलेली सेवाभावी उपक्रमांचे आयोजन, संस्थेची १६० वर्षांची दैदिप्यमान वाटचाल मांडणाऱ्या ‘ध्यास पंथे चालता…’ या इतिहास ग्रंथाचे मा. उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालेले प्रकाशन आणि या ग्रंथाची पहिली प्रत मा. राष्ट्रपतींना सादर करण्याचा अभिमानास्पद क्षण अशा विविध आनंददायी आणि प्रेरणादायी प्रसंगांनी संस्थेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे झाले. इतिहास ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाने संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाची सांगता करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आज (सोमवार, दि. १४ फेब्रुवारी २०२२) पत्रकार परिषदेत दिली. म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला नुकतीच मिळालेली स्वायत्तता हा संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील एक मैलाचा दगड आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षांची सांगता आणि म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला मिळालेली स्वायत्तता या निमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी.बुचडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, पदाधिकारी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

दि. १९ नोव्हेंबर २०१९ ते १९ नोव्हेंबर २०२० हे संस्थेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष होते. देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी,  मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला होता.

संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी (१६० व्या) वर्षातील पदार्पणाचे औचित्य साधून संस्थापकांच्या मूळ छायाचित्रांवरून काढलेली तैलचित्रे तयार करून घेण्यात आली आणि संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी चित्रशिल्प बसविण्यात आले. संस्थेच्या लोगोमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. संस्थेच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहोचावी यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील माहितीपट आणि माहिती पुस्तिका तयार करण्यात आली, अशी माहिती मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी यावेळी दिली.

१६० व्या वर्षाचा प्रारंभ अभिवादन यात्रेने करण्यात आला. संस्थेच्या पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी असे सुमारे २५०० जण त्यात सहभागी झाले होते. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर संस्थेच्या माजी विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि हितचिंतकांच्या स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.

गरवारे महाविद्यालयाच्या आवारातील वर्तुळाकार इमारतीचे वाढीव बांधकाम पूर्ण करण्यात आले. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी इमारतीचे भूमीपूजन करून तिचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. संस्थेच्या मयूर कॉलनीतील आवारात म.ए.सो. आय.एम.सी.सी. या शाखेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले. तसेच याच आवारात  बांधण्यात येणाऱ्या एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठीच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. या इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डेक्कन जिमखाना येथील म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून ही ऐतिहासिक वास्तू आता अधिक दिमाखदार दिसत आहे.

संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘व्यक्तिमत्व आणि करियर यातून देशसेवा’ या विषयावर माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांचे, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांचे तर ‘माझे ईशान्य भारतातील अनुभव आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव श्री. सुनील देवधर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

इ. १० वी आणि इ. १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी या विषयावर ‘वेबिनार सिरीज’ची सुरवात करण्यात आली.

कोविड महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून संस्थेने निधी संकलन, रक्तदान शिबिरे, गरजू व्यक्तींना धान्य वाटप, रुग्णांच्या विलगीकरणासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उभारण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिले विलगीकरण केंद्र, लसीकरणासाठी जागा उपलब्ध करून देणे, रुग्णालयात विशेष कोविड कक्षाची उभारणी, प्रबोधनपर ध्वनिचित्रफितीची निर्मिती इत्यादी अनेक उपक्रम राबविण्यात आले.  सर्वसामान्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विनिंग स्ट्रॅटेजिज इन कोविड वॉर’ या विषयावर डॉ. धनंजय केळकर यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी यांचे व्याख्यान मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री मा. श्री. रमेश जी पोखरियाल ‘निशंक’ यांचे व्याख्यान बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आले होते. कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन ही दोन्ही व्याख्याने ऑनलाईन माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली होती.

“भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” अशा शद्बात मा. नितीनजी गडकरी यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. डॉ. रमेशजी पोखरियाल ‘निशंक’ आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील.

‘ध्यास पंथे चालता…’ या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाने संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाची सांगता करण्यात आली, अशी माहिती मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली.

म.ए.सो.च्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. म.ए.सो. अंतर्गत स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेले हे दुसरे महाविद्यालय आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे यावेळी बोलताना म्हणाले की, १९४५ साली स्थापन झालेल्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये आता २५ पदवीधर शिक्षण विभाग आहेत ज्यामध्ये  १८ पदव्युत्तर आणि सावित्रीबाई  फुले  पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त विज्ञान आणि कला विद्याशाखेतील ०७ संशोधन केंद्रे आहेत. महाविद्यालयात ५० पेक्षा जास्त अभ्यासक्रम शिकवले जातात. महाविद्यालयाला तीन वेळा NAAC द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. चालू वर्षात  वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात  अद्ययावत वर्ग आणि  प्रयोगशाळा  आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय  आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. महाविद्यालयात अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रमही राबवले जातात.

ऑगस्ट २०२० मध्ये महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा मिळवण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर केला होता. कोविडच्या परिस्थितीमुळे सप्टेंबर २०२१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला भेट दिली. प्रत्यक्ष पाहणीनंतर, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा देण्याची शिफारस केली.

नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन स्वायत्ततेत कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याची महाविद्यालयाची इच्छा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक अभ्यासक्रमांद्वारे ज्ञान मिळू शकेल तसेच त्यांची रोजगारक्षमताही वाढेल. स्वायत्ततेअंतर्गत, भविष्यात व्यापक संधी असणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचा महाविद्यालयाचा प्रस्ताव आहे. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच नॅनोसायन्सेस आणि नॅनोटेक्नॉलॉजी यासारख्या विषयांमध्ये नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. नवीन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज आणि सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स सुरू करण्याचीही महाविद्यालयाची इच्छा आहे. चांगले नेते आणि प्रशासक विकसित करण्यासाठी आणि जागतिक समस्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून हे अभ्यासक्रम विकसित करण्याची योजना आहे.

या वेळी मान्यवरांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले आणि मान्यवरांचा परिचय करून दिला.

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

भारताचे मा. राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास ग्रंथ ‘ध्यास पंथे चालता … ‘ सादर भेट देताना संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे. या वेळी छायाचित्रात (डावीकडून) ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे

भारताचे मा. राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास ग्रंथ ‘ध्यास पंथे चालता … ‘ आज (गुरूवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी) राष्ट्रपती भवनामध्ये सादर भेट देण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी मा. राष्ट्रपतींचा याप्रसंगी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मा. राष्ट्रपतींनी त्यांच्या पुणे भेटीत प्रकाशनानंतर हा ग्रंथ वाचण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज ही भेट झाली. याप्रसंगी मा. राष्ट्रपतींनी ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. हा ग्रंथ हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांत अनुवादित व्हावा जेणेकरून ‘मएसो’च्या वाटचालीची माहिती अखिल भारतीय स्तरावर पोहचेल आणि सर्वांना प्रेरणा मिळेल अशी सूचना केली. याप्रसंगी त्यांनी ग्रंथारंभीच्या पृष्ठावरील काव्यपंक्तीचा अर्थ समजून घेतला. ध्येयनिष्ठा व्यक्त करणाऱ्या या पंक्ती प्रेरणादायक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील ‘मएसो’सारख्या संस्थांनी देशाला मार्ग दाखवला आहे, असे ते म्हणाले.

ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक यांनी यावेळी मा. राष्ट्रपतींना ग्रंथाबद्दल माहिती दिली. संपूर्णपणे भारतीयांनी स्थापन केलेली आणि आजही वर्धिष्णू असलेली अशी संस्थेची वाटचाल ग्रंथातून उलगडली आहे, असे डॉ. मोडक यांनी सांगितले. संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेने वंचित घटकांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. सुरवातीच्या काळात अनेक भाषांचे शिक्षण, आधुनिक शिक्षण ही संस्थेची वैशिष्ट्ये इतिहासात दिसून येतात असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. संस्थेने १८९६ मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र कॉलेजची गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी इंग्लंडच्या संसदेत दखल घेतली गेली. पण स्वातंत्र्याच्या मागणीसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्रोही भाषणे केल्याने हे महाविद्यालय ब्रिटिशांच्या रोषाला पात्र झाले. त्यामुळे हे महाविद्यालय बंद पडले.‌ महाराष्ट्र नावाची स्मृती ठेवण्यासाठी संस्थेचे नाव बदलून १९२२ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करण्यात आले.

स्वतःच्या पत्नीला सैनिकी शिक्षण देणारे संस्थापक वासुदेव बळवंत फडके यांचा महिला सक्षमीकरणाचा वारसा संस्थेच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या माध्यमातून पुढे चालवला जात असून शाळेच्या १५ विद्यार्थिनी सैन्यदलात अधिकारपदावर कर्तव्य बजावत आहेत, ही माहिती श्री. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी मा. राष्ट्रपतींना दिली.

याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहसचिव इंजि. सुधीर गाडे उपस्थित होते.

संस्थापक वामन प्रभाकर भावे यांना ब्रिटिश सत्तेने नाकारलेले अनुदान मिळविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. त्यांचा गौरव भारताचे प्रथम नागरिक असलेल्या मा. राष्ट्रपतींनी संस्थेच्या इतिहासाची दखल घेतल्याने झाला असे मत सुधीर गाडे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मा. राष्ट्रपतींनी आपुलकीने सर्वांची विचारपूस केली. तसेच अगत्याने राष्ट्रपती भवन दाखवण्याची व्यवस्था केली.

संस्थेच्या वाटचालीची दखल मा. राष्ट्रपतींनी घेतल्याचा हा प्रसंग संस्थेच्या दृष्टीने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा प्रसंग संस्थेच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

छायाचित्रात (डावीकडून) : ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, मा. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’चे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची १६० वर्षांची ऐतिहासिक वाटचाल मांडणाऱ्या ‘ध्यास पंथे चालता …’ या इतिहास ग्रंथाचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा ग्रंथ सिद्ध केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासूनची वाटचाल जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ संदर्भ म्हणून वाचकांना अतिशय उपयोगी ठरणार आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या महान व्यक्तीने अन्य सहकाऱ्यांबरोबर १८६० मध्ये स्थापन केलेली पुण्यातील ही पहिली खासगी शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या स्थापनेमागे युवावर्गाला शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन चारित्र्य निर्माणाबरोबरच त्यांच्यासमोर आदर्श ठेवण्याचे उदात्त ध्येय होते. जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीप्रमाणेच परमहंस मंडळी, पुणे सार्वजनिक सभा, सत्यशोधक समाज अशा संस्थादेखील कार्यरत होत्या. अशा सर्व संस्थांमुळे राष्ट्रीयत्वाची भावना वाढीला लागली आणि देशातील स्वातंत्र्य सैनिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रबळ झाली. भारतीय पुनरुस्थानाच्या कालखंडात असे नेतृत्व आणि संस्था निर्माण करण्यात आणि स्वातंत्र्य संग्रामाची वैचारिक बैठक तयार करण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महादेव गोविंद रानडे, वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या देशभक्तांचा विसर पडून चालणार नाही,” असे प्रतिपादन देशाचे मा. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत बोलताना केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आणि ‘ध्यास पंथे चालता…’ या संस्थेच्या इतिहास ग्रंथाचा प्रकाशन समारंभ देशाचे माननीय उपराष्ट्रपती श्री.  एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज (मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी) राजधानी दिल्ली येथे उपराष्ट्रपती निवासात संपन्न झाला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे तसेच ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपती निवासात उपस्थित होते.

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे पुण्यातून सहभागी झाले होते. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित संख्येने निमंत्रित पुण्यातील मएसो ऑडिटोरीअममध्ये उपस्थित होते.

दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.

ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक यांनी संस्थेच्या इतिहास लेखनामागील प्रेरणा, भूमिका आणि लेखनासाठी केलेले संशोधन कार्य याबद्दल माहिती दिली.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

“देशाने मला काय दिले? असा विचार न करता मी देशासाठी काय करू शकतो? हा भाव मनात बाळगून निरपेक्षपणे देशसेवा करणे हीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या अनामवीरांना खरी श्रद्धांजली ठरेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वयंप्रेरणेतून काम करणाऱ्या या स्वातंत्र्य योद्ध्यांची कोणतीच वैयक्तिक आकांक्षा नव्हती, आपल्या नावाची कोणी दखल घ्यावी असा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. त्यांच्या बलिदानात त्यांच्या परिजनांचे योगदान देखील खूप मोठे आणि न विसरता येण्यासारखे आहे. आपण आजपर्यंत त्यांची दखल घेतली नाही ही खंत या अनामवीरांचे स्मरण करताना आपण लक्षात घेतली पाहिजे, त्यांचे मोठेपण सांगत असताना या अनामवीरांबाबत असलेल्या कर्तव्यबोधाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे आणि त्यातून आपण देशसेवेसाठी सक्रीय झाले पाहिजे, ही खरी आवश्यकता आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या या वीरांना कायमच अनाम ठेवण्यासाठी नियोजनपूर्वक कोणी काम करत आहे का? याचाही विचार आपण केला पाहिजे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचे प्रचार प्रमुख मा. प्रमोद बापट यांनी आज येथे केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘स्वराज्य – ७५: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील पहिले पुष्प गुंफताना मा. प्रमोद बापट बोलत होते. ‘अनामवीरा …!’ हा आजच्या व्याख्यानाचा विषय होता.

म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक होते. म.ए.सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’च्या अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील आणि म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर हे ऑनलाईन माध्यमातून या व्याख्यानाला उपस्थित होते. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आरंभीचा काळ हा विविध क्षेत्रातील उभारणीचा होता, काही क्षेत्रात आपण अपेक्षित उंची देखील गाठली. परंतू त्याचबरोबर श्रेयवादाची स्पर्धा सुरू झाली. त्यातूनच देशासाठी आहुती देणाऱ्या वीरांची नावे पुसण्याचा प्रयत्न झाला. पारतंत्र्याच्या काळात परदेशात राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत असलेले अनेक देशभक्त स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकातील देशामधील वातावरण बघून भयापोटी मायदेशी परत आले नाहीत. कलुषित दृष्टीने बघण्याचा वारसा ब्रिटीश मागे ठेवून गेले आहेत. त्यामुळे अनामवीरांची नावे दडपण्याचा प्रयत्न हेतूतः होत असेल तर त्यांची चरित्रे वाचून, त्यांच्याबद्दल श्रद्धा बाळगून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुरेसे होणार नाही, हे अस्वाभाविक प्रयत्न आणि त्यामागील योजना समजून घेऊन ते उद्ध्वस्त केले पाहिजेत. त्याचे माध्यम शिक्षण हेच आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या अशा अनामवीरांनी स्वातंत्र्यासाठी आहुती दिली. मात्र, त्यांच्या परिजनांची जी परवड झाली त्याची दखल घेतली जात नाही, त्यांचे दुष्टचक्र थांबत नाही. स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशासाठी आपण काय करू शकतो? ही भावना होती, परंतू स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता देशाने आमच्यासाठी सर्व काही करायचे आहे असा विचार रूढ झाला. असे कशामुळे घडते? तर, अनामवीरांच्या बलिदानाचे स्मरण न ठेवल्याने हे होते. ते समाजाच्या हिताचे नाही. देशासाठी मी काय करू शकतो? हा कर्तव्यबोधाचा संस्कार या भूमीतला आहे. त्यातूनच डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी यवतमाळ येथे जंगल सत्याग्रह केला होता. पण आजदेखील त्याबाबत शंका उपस्थित केली जाते. अनामवीरांना प्रमाणपत्रांची गरज आहे का? हे आपण चालू देणार आहोत का? देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने याकडे लक्ष वेधले पाहिजे. देशाच्या विविध भागात राहणाऱ्या विविध समाज घटकांनी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या भाषेतून आपल्या लोककथा, लोकगीतांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा जागृत  ठेवली. स्वातंत्र्यानंतर या समाज घटकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रविरोधी शक्तींनी त्यांना आपलेसे केले आहे, हा देशासमोरील फार मोठा धोका आहे,” असे मा. प्रमोद बापट यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’चे सदस्य डॉ. आनंद लेले यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका मांडली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा वारसा संस्थेला लाभला आहे. कालानुरूप आणि अत्याधुनिक शिक्षण उपलब्ध करून देत असतानाच हा वारसा पुढे नेण्यासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात देशबांधवांनी जी किंमत मोजली त्याची माहिती युवा वर्गाला करून देण्यासाठी संस्थेने व्याख्यानमालेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय संस्थेच्या शाखांमधून पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य यांनी केले. ‘अनामवीरा …!’ हे व्याख्यान राष्ट्रप्रेम, राष्ट्रचिंतन आणि राष्ट्रप्रेरणा निर्माण करणारे ठरेल. राष्ट्राच्या पुर्ननिर्माणात प्रत्येकाने योगदान द्यावे यासाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त म.ए.सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील प्रत्येक विभागाने स्वतंत्र कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि आता अमृत महोत्सव साजरा करण्याचे भाग्य मला आणि माझ्या पिढीला लाभले. परंतू स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवाच्या वेळी जो विचार मांडला गेला तोच आज पन्नास वर्षांनंतर देखील मांडला जातो आहे. याचे कारण स्वातंत्र्यानंतरच्या काळात अपेक्षित दिशेने आपल्या देशाची प्रगती झाली नाही. आपला हजारो वर्षांचा इतिहास लक्षात न घेता आपला देश ७५ वर्षांचाच आहे हे समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न होतो आहे. देशात भौतिक प्रगती होत राहिल. मात्र, स्वातंत्र्याच्या शताद्बी वर्षाकडे वाटचाल करताना आत्मिक प्रगती आणि संस्कारांच्या बाबतीत आपण कुठे आहोत? देशातील नागरिकांना मानसिक आणि वैचारिक स्वातंत्र्य मिळाले आहे का? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या भवितव्याची जबाबदारी केवळ सरकारची आहे ही धारणा योग्य नाही. शिक्षण क्षेत्राला यापुढील काळात समाजाचे नेतृत्व करावे लागेल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रणव कुलकर्णी यांनी केले.

प्रा. राधिका गंधे यांनी राष्ट्रगीत गायन केले.

ज्येष्ठ रंगकर्मी, प्रसिद्ध गायिका किर्ती शिलेदार यांचे आज (शनिवार, दि. २२ जानेवारी २०२२) सकाळी पुण्यात निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना तसेच सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थिनी होत्या.
आपले आई-वडिल जयराम व जयमाला शिलेदार यांच्याकडून त्यांना संगीत आणि नाट्य कलेचा वारसा त्यांना लाभला होता. वयाच्या दहाव्या वर्षी किर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवलं आणि आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आणि गायनाने रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. तब्बल ६० वर्षे त्यांनी रंगभूमीची सेवा केली. एकच प्याला, कान्होपात्रा, द्रौपदी, मानापमान, ययाति आणि देवयानी, शाकुंतल, संशयकल्लोळ, सौभद्र अशा संगीत नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
२०१८ साली झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने संगीत, नाट्य आणि नृत्य या कलांच्या शिक्षणासाठी मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हे स्वतंत्र महाविद्यालय सुरू केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला होता. https://fb.watch/aHokpJTKtz/
तसेच विद्यार्थी दशेत शाळा आणि महाविद्यालयाने आपल्या कलेला कायमच प्रोत्साहन दिल्याबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली होती.

इ. ११ वी मध्ये शिकत असताना प्रशालेच्या १९७० सालच्या नियतकालिकात त्यांनी लिहिलेल्या ‘माझी आवडती भूमिका’ या लेखातून आपल्या कलेप्रती असलेला त्यांचा समर्पित भाव लक्षात येतो.

संस्थेतर्फे किर्ती शिलेदार यांनी भावपूर्ण आदरांजली!