Month: January 2024

“संपूर्ण महाराष्ट्रात ८ ते १० लाख विद्यार्थी स्पर्धा परिक्षांची तयार करतात, त्यापैकी दीड ते दोन लाख विद्यार्थी पुण्यात स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यात येतात. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर अधिकारी तयार होतात. सरकारी व्यवस्थेतून परिवर्तन घडवता येते. त्यामागे सेवेची भावना असणे महत्वाचे असते. केवळ जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिने स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचा विचार विद्यार्थ्यांनी करू नये. सध्या या स्पर्धा परिक्षांबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झाली आहे, परंतू या परिक्षांच्या तयारीतून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनाचे व्यापारीकरण न करता चांगले अधिकारी घडवण्याच्या हेतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र चालवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशा शद्बात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे यांनी संस्थेची भूमिका मांडली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व ज्ञानदीप अॅकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे मार्गदर्शन केंद्र चालवण्यात येणार आहे. त्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मा. बाबासाहेब शिंदे बोलत होते.

या वेळी प्रमुख वक्ते मा. निहाल राजश्री प्रमोद कोरे, ज्ञानदीप अॅकॅडमीचे संचालक मा. महेश शिंदे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागातील माजी अधिकारी मा. चंद्रकांत निनाळे व्यासपीठावर उपस्थित होते. महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मएसो गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार, दि. १३ जानेवारी २०२४ रोजी हा कार्यक्रम झाला.

या प्रसंगी बोलताना मा. निहाल कोरे म्हणाले की, स्पर्धा परिक्षांसाठी दीर्घकाळ कराव्या लागणाऱ्या तयारीमुळे वय हातून निसटते असा भ्रम निर्माण केला जातो परंतू, स्पर्धा परिक्षांची तयारी ही आपण आपल्यामध्ये केलेली गुंतवणुक आहे, त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र परिवर्तन होते. इतरांच्या दृष्टीने जेव्हा यशाची किंवा ध्येय गाठण्याची आशा मावळते तेव्हा आपल्याकडे ठाम विश्वास असायला हवा. स्वतःशीच संघर्ष करायचा असतो, त्यामुळे आपण स्थितप्रज्ञ असायला हवे. ध्येयप्राप्तीसाठी प्रतिकूल परिस्थितीत देखील सोईसुविधांची फिकीर न करता कष्ट करण्याची मानसिकता आवश्यक आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी नाकारण्यातली ताकद खूप मोठी असते. तारूण्य, त्याग, तपश्चर्या आणि संघर्ष यातून भव्य-दिव्य घडेल याची खात्री बाळगा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मा. महेश शिंदे म्हणाले की, स्पर्धा परिक्षांची तयारी नेमकी कशी करावी? याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या केंद्रामध्ये मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट ध्येय नसते. अस्तित्वाच्या संघर्षातूनच जीवनमान सुधारण्याचे ध्येय नजरेसमोर येते. आपण नेमके काय करत आहोत हे कळणे आवश्यक असते. सातत्याने केलेल्या प्रयत्नातूनच यश मिळते. त्यादृष्टीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहयोगाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दर आठवड्याला एका तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महागड्या कोचिंग क्लासमध्ये केले जाणारे मार्गदर्शन येथे सवलतीत मिळणार आहे. त्यामध्ये क्षमता विस्तारावर भर दिला जाणार आहे.

डॉ. विलास उगले यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक केले. स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्राथमिक स्तरापासून अभ्यासाची मजबूत पायाभरणी होणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्थेची तपशीलात माहिती असावी लागते. या गोष्टी लक्षात घेऊन संस्थेने ज्ञानदीप अॅकॅडमीच्या सहकार्याने मार्गदर्शनाची व्यवस्था निर्माण केली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

डॉ. किशोर देसर्डा यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला.

डॉ. शोभा करेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्रा. किसन कुमरे यांनी आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत गौरव कार्यक्रमात बोलताना राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर. याप्रसंगी उपस्थित (डावीकडून) डॉ. अतुल कुलकर्णी, मा. बाबासाहेब शिंदे, मा. प्रदीप नाईक व मा. सौ. आनंदी पाटील
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पीएच्. डी. प्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांसमवेत संस्थेचे पदाधिकारी (छायाचित्रात डावीकडून बसलेले) डॉ. राजीव हजिरनीस, सी.ए. राहुल मिरासदार, डॉ. अतुल कुलकर्णी, मा. बाबासाहेब शिंदे, मा. प्रदीप नाईक, प्रमुख पाहुणे मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सौ. आनंदी पाटील, श्री. सुधीर भोसले, डॉ. आनंद लेले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीकडे वाटचाल करत असलेल्या आपल्या देशासाठी आगामी २५ वर्षे अत्यंत महत्वाची आहेत. विकसनशील देशाचे रुपांतर विकसित देशामध्ये करायची धुरा देशातील तरूण पिढीवर आहे. देशाच्या अमृतकाळात तरूण वर्गाला उद्यमी करण्यासाठी शिक्षण व्यवस्था त्यांच्यामध्ये शिक्षणाबरोबरच कौशल्यक्षमता कशी रुजवते यावर विकसित देश निर्माण होणे अवलंबून आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा बदल घडविणारे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण भविष्यातील भारतासाठी यशस्वी करणे आवश्यक आहे, ” असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी आज येथे व्यक्त केले.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व  पीएच्.डी. प्राप्त केलेल्या ४२  गुणवंत विद्यार्थी आणि    शिक्षकांचा गौरव समारंभ आज (सोमवार, दि. ८  जानेवारी २०२४) आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी डॉ. देवळाणकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत  होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा मा. सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी होते.

डॉ. देवळाणकर पुढे म्हणाले की, दरवर्षी १२ ते १३ लाख विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यामुळे सुमारे १२ अब्ज डॉलर इतका पैसा देशाबाहेर जातो. ही बाब आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. अतिशय बुद्धिमान विद्यार्थी देशाबाहेर जात असल्याने आपल्या देशातील शिक्षणात दर्जात्मक सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता होती. ती पूर्ण करण्यासाठी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२४ – २५ वर्षात देशात लागू करण्यात येणार असून ते सक्तीचे करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना विषय निवडीत लवचिकता आणि स्वातंत्र्य मिळणार आहे. मूळ विषयाचे शिक्षण ६० टक्के आणि आवडीच्या विषयांचे शिक्षण ४० टक्के असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे वर्गातील मिळणारे शिक्षण आणि बाजारातील गरज यातील तफावत दूर होणार आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या जीवनात फार मोठे परिवर्तन होणार आहे. शिक्षक व प्राध्यापकांना देखील या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र, त्यांनी भविष्यातील भारतासाठी हा त्रास सहन करावा असे आवाहन डॉ. देवळाणकर यांनी या वेळी केले.

मा. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलेल्या प्रास्ताविकात नव्या शैक्षणिक धोरणानुसार, मातृभाषेतून शिक्षण आणि कौशल्य विकसन याला संस्था प्राधान्य देत असून शाळा सक्षम करण्यात येत असल्याचे सांगितले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या वाढत्या प्रभावात देखील संस्थेच्या मराठी माध्यमाच्या शाळा उत्तम प्रकारे टिकून आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संस्था अनुदानित शाळांमध्ये देखील संस्था पगारावर चांगले शिक्षक नियुक्त करत आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी घडत असल्याचे दिसून येत आहे असे ते म्हणाले.

मा. प्रदीप नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, देशात होणाऱ्या विकासामुळे देशातील लोकसंख्येची गुणवत्ता वाढत आहे आणि महासत्तेच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीसाठी  ते आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. देवकी बुचे यांनी केले.

डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.