“देशाला स्वातंत्र्य मिळतानाच निर्माण झालेल्या पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात कधीच एकात्मभाव निर्माण झाला नाही. १६०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम पाकिस्तानची संस्कृती पूर्व पाकिस्तानातील बंगाली जनतेने स्वीकारली नाही. उर्दू ही देशाची राष्ट्रभाषा म्हणून देखील बंगाली जनतेला मान्य नव्हती कारण त्यांना फक्त बंगाली भाषाच येत होती. त्यामुळे फार मोठी हिंसक निदर्शने झाली आणि अखेर बंगाली भाषेलादेखील राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा लागला. अशा अनेक घटना घडल्याने बांगलादेश स्वातंत्र्य युद्धाची बीजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना झालेल्या फाळणीत रोवली गेली असे म्हणता येईल,” असे प्रतिपादन ‘कॅस’चे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) यांनी आज (सोमवार, दि. १५ मार्च २०२१) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘विजय दिवस ७१ – एक दृष्टीक्षेप’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल बी.टी. पंडित (निवृत्त) होते. मएसो ऑडिटोरीअममध्ये मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि सेंटर फॉर अडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) चे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ब्रिगेडिअर अजित आपटे (निवृत्त) आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

महाजन पुढे म्हणाले की, “श्रीनगरजवळील हजरतबल येथील मशिदीमधून प्रेषित महमंद यांचे पवित्र अवशेष डिसेंबर १९६३ मध्ये चोरी झाले. त्यावेळी पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान पूर्व पाकिस्तानात ढाका येथे होते. त्यांनी या घटनेसाठी भारताला दोषी ठरवले. परिणामी जानेवारी १९६४ मध्ये पूर्व पाकिस्तानात फार मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला, बंगाली हिंदूंना लक्ष्य केले गेले आणि त्यामध्ये प्रामुख्याने उच्चशिक्षित बंगाली हिंदू होते. १९६९ मध्ये पाकिस्तानातील आर्थिक, सामाजिक स्थिती कमालीची खालावली. ती परिस्थिती हाताळता न आल्यामुळे अयुब खान यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख याह्या खान यांच्याकडे सचत्ता सोपवली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मुजीब-उर-रहमान यांच्या अवामी लीग या पक्षाला प्रांतिक आणि राष्ट्रीय स्तरावर बहुमत मिळाले. मुजीब-उर-रहमान यांनी पूर्व पाकिस्तानला स्वायत्तता आणि बंगाली लोकांच्या हाती सत्ता देण्याची मागणी केली. मात्र लष्करी सत्तेने त्यांच्या सर्व मागण्या फेटाळून लावल्या. बंगाली मुस्लिमांनी मार्च १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानातील पश्चिम पाकिस्ताने समर्थक असलेल्या बिहारी मुस्लिमांचे हत्याकांड केले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल टिका खान यांनी पूर्व पाकिस्तानात कारवाई केली. मुजीब-उर-रहमान यांना अटक करण्यात आली आणि त्यांना पश्चिम पाकिस्तानात तुरूंगात डांबण्यात आले. याविरोधात तेथे मुक्तीवाहिनीची स्थापना झाली. भारताने त्याला पाठबळ दिले. दरम्यानच्या काळात पूर्व पाकिस्तानातून सुमारे 1 कोटी शरणार्थी भारताच्या सीमावर्ती राज्यांमध्ये आश्रयाला आले होते. त्यामुळे या राज्यांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. या संबंधात भारत सरकारने आंतरराष्ट्रीय संस्थांकडे हा प्रश्न उपस्थित केला मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अखेर भारताने प्रत्यक्ष युद्धाचा निर्णय घेतला. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून एक नवा देश निर्माण झाला. या युद्धामुळे पूर्व पाकिस्तानचे संरक्षण हे पश्चिम पाकिस्तानच्या हातात आहे ही समजूत खोटी ठरली. भारतीय फौजांच्या अतुलनीय पराक्रमामुळे ९३ हजार युद्धकैदी बनले. त्यांना माणुसकीची बागणूक दिली, कारण ती आपली संस्कृती आहे. त्यांना भारताने नंतरच्या काळात मुक्त केले परंतु त्याबदल्यात भारताच्या पदरात काहीच पडले नाही. पाकिस्तानच्या ताब्यात आजदेखील भारतीय युद्धकैदी आहेत मात्र पाकिस्तान ते मान्य करत नाही. बांगलादेशच्या या स्वातंत्र्य युद्धात रशियाने भारताला पाठिंबा दिला, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आपला नकाराधिकार वापरला. रशियाच्या या भूमिकेमुळे चीनला शह बसला आणि तो पाकिस्तानच्या मदतीला आला नाही.”

ब्रिगेडिअर अजित आपटे (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात सांगितले, “ बांगला देशचे स्वातंत्र्य युद्ध १४ दिवस सुरू होते असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात ते ९० दिवस सुरू होते. १९७१ सालच्या डिसेंबर महिन्यात अधिकृतपणे ते सुरू झाले परंतु सप्टेंबर महिन्यातच खऱ्या अर्थाने त्याची सुरवात झाली होती. भारतीय लष्कराने बांगलादेश मुक्ती वाहिनीला मदत करून युद्धाची पूर्वतयारी केली होती. पाकिस्तानी लष्कराची गुप्तहेर यंत्रणा आणि मुक्ती वाहिनीतील हस्तकांकडून भारतीय लष्कराच्या ठाण्यांची माहिती मिळत होती. त्याआधारे त्यांचे हवाईदल या ठाण्यांवर हल्ला करत होते. मात्र, आमच्या तुकडीने अतिशय कौशल्याने पाकिस्तानची दोन विमाने पाडली आणि त्यांच्या वैमानिकांना ताब्यात घेतले. भारताच्या  लष्कर, हवाईदल आणि नौदल या तिन्ही अंगांचा उत्तम समन्वय या युद्धात होता. तसेच आक्रमणाची व्यूहरचना बिनचूक होती आणि त्याची अमलबजावणीदेखील तितकीच अचूक पद्धतीने झाली.”

आपल्या अध्यक्षीय भाषणात लेफ्टनंट जनरल बी.टी. पंडित (निवृत्त) म्हणाले, संपूर्ण देशाने एकत्रितपणे हे युद्ध लढाल्याचे सांगितले. राजकीय नेतृत्वाचा कणखरपणा, जगभरातून मिळवलेला पाठिंबा, सैन्यदलांना नोकरशाहीने केलेले सहकार्य हे त्याचे महत्वाचे पैलू आहेत. हे युद्ध पाकिस्तानच्या भूमीवरच लढायचे, त्यांना आपल्या सीमेच्या आत येण्याची संधी द्यायची नाही आणि जम्मू-काश्मीरशी संपर्क अखंड राहील याची पूर्णपणे खबरदारी घ्यायची ही ध्येय त्यावेळी डोळ्यासमोर होती. मुक्तीवाहिनीची फार मोठी मदत झाली, पण भारतीय जनतेने दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे सैन्यदलांचे आत्मिक बळ प्रचंड वाढले होते. पाकिस्तानला संपवण्याची भावना प्रत्येक सैनिकात निर्माण झाली होती, त्यामुळेच फार मोठा, निर्णायक आणि ऐतिहासिक विजय भारताला मिळाला.”

कार्यक्रमाच्या सुरवातील एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, युद्धात मिळालेल्या विजयातूनही शिकायला मिळते, ते कळावे म्हणून विजयी योद्ध्यांप्रमाणेच तेव्हा युद्धकैदी झालेल्यांनाही या व्याख्यानमालेसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

सौ. लीना चांदोरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

 

 

Scroll to Top
Skip to content