Year: 2018

मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व उच्च माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परिक्षांमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लक्षणीय यश मिळविले आहे. 

इ. ५ वी च्या शिष्यवृत्ती परिक्षेत पुण्यातील मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, कोथरूड या शाळेची विद्यार्थिनी कु. श्रावणी पोरे २७२ गुण मिळवून जिल्ह्यात पहिली आणि राज्यात पाचवी आली आहे. सासवड येथील मएसो वाघीरे विद्यालयातील कु. प्रथमेश कडलग हा विद्यार्थी ९१.२७ टक्के गुण मिळवून जिल्हात २ रा तर राज्यात ७ वा आला आहे. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, कोथरूड शाळेतील कु. पारस गांधी हा विद्यार्थी २६० गुण (८८.४३%) मिळवून जिल्ह्यात ७ वा तर राज्यात १४ वा आला आहे. कु. ओंकार क्षीरसागर हा विद्यार्थी २५८ गुण (८७.७५%) मिळवून जिल्ह्यात ११ वा तर राज्यात १६ वा आला आहे. या शाळेतील एकूण २६ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जिल्हा यादीत स्थान मिळवले आहे. या शाळेचा निकाल ७०% लागला आहे. बारामती येथील मएसो कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयातील ८ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळाली असून शाळेचा निकाल ६३.१% लागला आहे. या शाळेतील कु. श्रीकांत प्रदीप वाळुंजकर या विद्यार्थ्याने जिल्ह्यात शहरी विभागात १६वा क्रमांक मिळवला आहे. त्याला ३०० पैकी २५६ गुण मिळाले आहेत. सासवड येथील मएसो वाघीरे विद्यालयातील एकूण ४ जणांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. 

इ. ८ वी च्या उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत पुण्यातील मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, कोथरूड या शाळेची विद्यार्थिनी कु. रुची दाते २५६ गुण मिळवून जिल्ह्यात ८ वी आली आहे. या शाळेतील २३ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जिल्हा यादीत स्थान मिळवले आहे. या शाळेचा निकाल ८२.५ % लागला आहे. बारामती येथील मएसो कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयातील दोन जणांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. या शाळेचा निकाल २४.५२% लागला आहे. 

म.ए.सो.सौ.विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थी शहरी सर्वसाधारण विभाग गुणवत्ता यादीत आले आहेत.

“जगभरातील सर्वोत्तम शिक्षण मराठी माध्यमातून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल आणि अशा शिक्षणाच्या बळावर तो खेड्यात किंवा जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी तो उत्तम काम करु शकेल,” अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी आज येथे दिली. सोळंकी हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील सर्व शाळांमधील माध्यमिक शालांत परीक्षा (इ. १०वी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (इ.१२वी) यामध्ये प्रथम आलेल्या ३५ गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या गौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, किशोर पंप्स प्रा. लि. चे कार्यकारी संचालक किशोर देसाई, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. कर्वे रस्त्यावरील म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. मएसो ज्ञानवर्धिनीतर्फे यावर्षीपासून इ. ६ वी तील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तिकेचे प्रकाशन विशाल सोळंकी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. “आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी ज्याप्रमाणे देशात क्रांतीची मशाल पेटवली, त्याचप्रमाणे देशात आता नव्या शैक्षणिक क्रांतीची सुरवात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करू शकेल,” असा विश्वास सोळंकी यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच संस्कार देण्याचे काम शाळा करते. आता मात्र तुम्हाला स्वतःचा प्रवास स्वतःच करायचा आहे. त्यामुळे स्वतःसा ओळखायला शिका. जीवनात आपल्याला काय करायचे आहे ते आत्ताच ठरवा, त्यातूनच समाधान मिळेल आणि कामाचा आनंद मिळवू शकाल. जिद्द असलेल्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाला नियती नेहमीच साथ देते. आपला प्रत्येक विद्यार्थी यशस्वी आणि चांगला नागरीक कसा होईल यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कायमच प्रयत्नशील राहिली आहे. संस्थेने तुम्हाला आत्तापर्यंत सर्वकाही दिले आहे आता संस्थेला तुमचा अभिमान वाटेल असे काम करून दाखवा.” किशोर देसाई आपल्या भाषणात म्हणाले, “ जगात आपली कोणत्यातरी एका कौशल्यासाठी ओळख असणे गरजेचे आहे, परंतू एका विषयात प्रावीण्य मिळाले म्हणून थांबणे योग्य ठरणार नाही. शालेय-महाविद्यालयीन जीवनात जास्तीत जास्त अनुभव घेतला पाहिजे, त्यातून संवेदनशीलता वाढते. संवेदनशीलता वाढण्यासाठी मातृभाषेतून शिकण्याचीही आवश्यकता आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आपल्या शिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षक घडवित आहे ही बाब कौतुकास्पद आहे कारण ज्या संस्थांना शिक्षकाचे महत्व कळते त्या संस्थेचे विद्यार्थी खूप मोठे होतात. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शिक्षमाबाबत निर्णय घेत असताना आपल्या देशात आता खूप संधी आहेत याचे भान बाळगणे आवश्यक आहे. सर्वच कंपन्या संशोधनाच्या कामासाठी फार मोठी गुंतवणूक करत असल्याने भविष्यात शास्त्रज्ञांची फार मोठी गरज लागणार आहे. आज आपल्या देशात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे, परंतू शारीरिक कष्ट करावे लागणाऱ्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे, ही गंभीर बाब आहे. जीवनात न्याय, निती आणि धर्माने वागून यश मिळवता येते त्यामुळे काहीही करून मोठे होण्याची मनोवृत्ती निर्माण होऊ देवू नका. समाजासाठी केलेले काम हे परमेश्वरासाठी केलेले काम असते त्यातून मनःशांती मिळते आणि समाजात चांगुलपणाही मिळतो.” गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने मानस गाडगीळ आणि आकांक्षा बुटाला या विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कार्याचा विस्तार आणि त्यामागील भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. गोविंद कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

 

 

“परिस्थिती आपल्याला शिकवत असते, पण आपण त्यातून काय शिकतो हे महत्वाचे आहे. केवळ अभ्यासातच हुशार असून चालणार नाही. अभ्यासात हुशार नसतानाही अनेकजण जीवनात यशस्वी होतात. सौ. विमलाबाई गरवारे यांनी कायम भविष्याचा वेध घेतला. महाराष्ट्रातील मुले-मुली हुशार आहेत, परंतू ती स्वतःला व्यक्त करण्यात आणि सादरीकरणात कमी पडत असल्याने त्यांची हुशारी दिसून येत नाही. त्यामुळे बोलायला शिका, त्यातूनच आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सापडत जातात. प्रत्येकाने अवांतर वाचन केले पाहिजे, मनःशांती, तणावमुक्ती आणि आनंद मिळवण्यासाठी कलागुण जोपासले पाहिजेत,” असा सल्ला गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील सुतावणे यांनी माध्यमिक शालांत परिक्षेतील गुणवंतांना दिला. 

सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जन्मदिनानिमित्त माध्यमिक शालांत परिक्षेत (इ. १० वी) उल्लेखनीय यश मिळवलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा शनिवार, दि. १४ जुलै २०१८ रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ. विमलाबाई गरवारे यांच्या शाळेतील अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, शाळेचे महामात्र सुधीर गाडे, मुख्याध्यापक अविनाश वाघमारे, उपमुख्याध्यापिका सुवर्णा गायकवाड व शाळेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

माध्यमिक शालांत परिक्षेत शाळेत प्रथम क्रमांक मिळवलेला चिन्मय उदय दामले (९५.६० टक्के), दुसरा क्रमांक मिळवलेली गौरी नंदकुमार कोंडे (९२.६० टक्के) तसेच विभागून तिसरा क्रमांक मिळवलेल्या नेहा विनोद बाफना आणि अंकिता दिनेश पाटील (प्रत्येकी ९२.४०टक्के) या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गरवारे ट्रस्टच्या वतीने प्रत्येकी पांच हजार रुपयांचे पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन कौतुक करण्यात आले. 

कु. नेहा विनोद बाफना या विद्यार्थिनीने प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत मांडले. 

अबोली साने आणि आर्या पळशीकर या विद्यार्थिनींनी सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. 

शाळेचे महामात्र सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “प्रत्येकाची परिस्थिती भिन्न असते. परंतू दुसऱ्यासाठी काहीतरी करण्याची, समाजाला देण्याची परंपरा आपल्या देशात आहे. सौ. विमलाबाई आणि आबासाहेब गरवारे हे दांपत्य त्याचेच उदाहरण आहे. नोकरीचा विचारही न करता व्यवसायात मानाने उभे राहण्यासाठी सौ. विमलाबाईंनी आबासाहेबांना पूर्णपणे पाठिंबा दिला. आपल्या मुलांना व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शाळेतच घातले. त्यासाठी मुलांना परदेशातही पाठवले. लग्न होऊन एकत्र कुटुंबात गेल्यानंतर त्यांनी कुटुंब उत्तम प्रकारे सांभाळले परंतु भविष्याचा विचार करून त्यांनी आपल्या मुलांमधील भावबंध घट्ट करत स्वतंत्र संसार थाटायला लावला. नरसेवा हीच नारायण सेवा ही शिकवण आचरणात आणून त्यांनी अनेकांना मदत केली. त्यांच्या जीवनातून मिळणारी ही शिकवण आजच्या विद्यार्थिनींनी आचरणात आणली पाहिजे आणि हीच सौ. विमलाबाई गरवारे यांना खरी आदरांजली ठरेल.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका अर्चना लडकत यांनी केले.

 

 

Career Counseling Group (CCG), ICAI jointly with Pune Branch of WIRC of ICAI in support with IQAC Savitaribai Phule Pune University and MES Garware College of Commerce organized 5 Days Workshop on ‘GST’- Girls Students Empowerment Through Skill Building on 01st July 2018 from 08.00 am to 01.00 pm at Savarkar Sabhagruha.

During the program Chief Guest Dr. Prafulla Pawar (Dean – Faculty of Commerce & Management, Savitribai Phule Pune University), Guest of Honour CA Uday Gujar (Member of Pune Branch of WIRC of ICAI), Speaker CA Shailesh Rathi, Dr. Anand Y. Lele (Officiating Principal), CA Sudam D Ghongatepatil (Vice Principal), CA Ruta Chitale were present. 

The main objective of this workshop is to Empowering Girls through Skills, Knowledge, and Leadership & increase access to decent employment and entrepreneurial opportunities. The seminar witnessed participation of over 75 Girls Students from GCC as well as from other colleges. 

A technical session was conducted which focused on various important issues related to Introduction to GST & Supply, Levy & Collection of GST and place of Supply, Time and Value of Supply, Input Tax Credit, Registration, Invoice and Records, Payment of tax, GST Return, and Miscellaneous provisions.

The seminar concluded with a session on ‘Questions and Answers’ in which clarifications were given to many queries particularly pertaining to sectors of exports, transport, real estate etc.

 

 

शिक्षणाच्या क्षेत्रात ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आता शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून सोलापूरसारख्या बहुसांस्कृतिक शहरात आपल्या शैक्षणिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. ‘मएसो’ने MES Public School, Solapur ही विनाअनुदानित पूर्वप्राथमिक शाळा सुरू केली आहे. त्याचे उद्घाटन रविवार, दि. १ जुलै २०१८ या दिवशी स्व. काका महाजनी स्मारक विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा. श्री. दामोदरजी दरगड यांच्या शुभ हस्ते आणि मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजीवजी सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शाळेची प्रथम विद्यार्थिनी उपस्थित होती. याप्रसंगी गणेश पूजन व सरस्वती वंदन करण्यात आले. मएसोच्या परिवारातील इंग्रजी माध्यमाची ही ८ वी शाळा आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील बाळे येथील नियोजित शैक्षणिक प्रकल्पाच्या जवळच ही शाळा सुरु करण्यात आली आहे. 

शाळेच्या उद्धाटनानंतर बाळे येथील नियोजित संकुलाच्या ठिकाणी “स्व. काका महाजनी शैक्षणिक संकुला”च्या नामफलकाचे अनावरण व वृक्षारोपण करण्यात आले.

या सर्व प्रसंगी शाला समितीचे अध्यक्ष व मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. श्री. आनंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, शाला समितीचे सदस्य व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य श्री. विनय चाटी व श्री. गोविंद कुलकर्णी तसेच स्व. काका महाजनी स्मारक विश्वस्त समितीचे कार्यवाह श्री. राजेंद्र काटवे, सदस्य श्री. रंगनाथ बंकापूर, श्री. अशोक संकलेचा, श्री. संतोष कुलकर्णी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर शहर कार्यवाह श्री. फडके, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. विनय चाटी, श्री. संतोष कुलकर्णी व संस्था कार्यालयातील श्री. मनोज साळी, श्री. राजेश दुसाने व श्री. मोरेश्वर पनवेलकर यांनी विशेष प्रयत्न केले.

या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे :

 

 

आपल्या संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीवजी सहस्त्रबुद्धे यांनी शुक्रवार, दि. २२ जून २०१८ रोजी सकाळी भारताचे संरक्षण राज्यमंत्री मा. डॉक्टर सुभाष भामरे यांची पुण्यात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. राजीवजींनी मंत्रिमहोदयांना आपल्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. सदस्य डॉ. माधव भट व अॕड. धनंजय खुर्जेकर या प्रसंगी उपस्थित होते.

आपल्या शाळेच्या (पूर्वीची मुलींची भावे स्कूल) १९६९ बॅचच्या माजी विद्यार्थिनी नीलिमा पटवर्धन (सौ. नीलिमा चिंतामण दीक्षित) यांनी शाळा आणि गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज म्हणजे शनिवार, दि. १६ जून २०१८ रोजी संस्थेला भरघोस देणगी दिली. या देणगीचा विनियोग आपल्या प्रशालेत पिण्याच्या पाण्याचा शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी करावा अशी सूचना त्यांनी केली आहे. एस.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे हे ५० वर्ष असल्याचे औचित्य साधून सौ. दीक्षित यांनी ही देणगी दिली आहे. 

त्यांनी दिलेल्या या देणगीबद्दल संस्था त्यांची आभारी आहे.

राष्ट्रीय शिक्षणाची गंगोत्री असलेली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नव्या उमेदीने हुतात्म्यांच्या बलिदानाने पुनीत झालेल्या सोलापूर सारख्या बहुसांस्कृतिक महानगरात पदार्पण करीत आहे. संस्थेची पूर्व प्राथमिक शाळा एक 

जूलैपासून सोलापुरात सुरू होत आहे. त्याची घोषणा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी, ता. १५ जून, पत्रकार परिषदेत केली. कै. काका महाजनी ट्रस्टचे अध्यक्ष दामोदरजी दरगड, ‘मएसो’चे सचिव डॅा. संतोष देशपांडे, संस्थेचे आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. विनय चाटी, प्रशासकीय अधिकारी जगदीश मालखरे, ट्रस्टचे ट्रस्टी संतोष कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.

आपल्या बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेला इ. १० वी च्या परीक्षेत मिळालेल्या यशाची दखल आज पुण्यातील वृत्तपत्रांनी घेतली आहे.

मएसो बालशिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत सर्व शिक्षकांनी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला. यावेळी पर्यावरणाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकांनी फुलझाडे लावली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश रुजविण्यासाठी शिक्षकांनीसुद्धा प्रत्यक्षात वृक्षारोपण केले पाहिजे अशी अपेक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात शैक्षणिक सहलींना गेल्यावर रस्त्याच्या दुतर्फा पेरण्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या झाडांच्या बिया देण्यात आल्या. यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यानी काढलेल्या वन्यजीव छायाचित्रांचे (Wildlife Photographs) प्रदर्शन भरवण्यात आले होते. जगभर फिरून जंगलातील फोटो काढताना आलेले अनुभव शाळेचे माजी विद्यार्थी प्रणव नाईक, कौस्तुभ कामत, मिहीर लिडबिडे यांनी यावेळी सांगितले. मानवी हस्तक्षेपामुळे झालेली पर्यावरणाची हानी आपणच भरून काढली पाहिजे व प्राण्यांच्या प्रजाती टिकवल्या पाहिजेत असे आवाहन या माजी विद्यार्थ्यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे हितचिंतक, बारामती येथील प्रगतीशील शेतकरी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ गजानन देशपांडे यांचे रविवार, दि. ३ जून २०१८ रोजी रात्री राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. संस्थेच्या बारामती येथील कै. गजानन भीवराव देशपांडे (पूर्वीचे एमईएस हायस्कूल) या शाळेच्या स्थानिक सल्लागार समितीचे ते दीर्घकाळ सदस्य आणि अनेक वर्ष अध्यक्ष होते. शाला समितीचे देखील अनेक वर्ष सदस्य होते. एमईएस हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेल्या हरिभाऊ देशपांडे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि शाळा यांच्याबद्दल असलेल्या आत्मीयतेपोटी मुक्तहस्ते देणगी दिली होती. त्यांनीच दिलेल्या भूखंडावर आज बारामतीमधील ‘एमईएस इंग्लिश मिडीयम स्कूल’ ही शाळा उभी आहे. 

कै. हरिभाऊ देशपांडे यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली.

दै. महाराष्ट्र टाईम्सने पुण्यात स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित केलेले मटा एज्युफेस्ट २०१८’ हे शैक्षणिक प्रदर्शन आज,दि. २ जून रोजी सकाळी सुरु झाले. दि. २ आणि ३ जून असे दोन दिवस चालणाऱ्या या शैक्षणिक प्रदर्शनात आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ५ आणि ६ क्रमांकाचे स्टॉल आहेत. या प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ७.०० अशी आहे. आपल्या संस्थेच्या शाखांपैकी आयएमसीसी, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स – बी.बी.ए., आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे बायोटेक्नॉलॉजी आणि बायोडायव्हर्सिटी हे विभाग तसेच दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्र या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. आपल्या संस्थेच्या स्टॉल्सना सर्वांनी अवश्य भेट द्यावी.

 

टाटा कॅपिटल लिमिटेडच्या कॉर्पोरेट सस्टॅनिबिलीटी विभागाच्या प्रमुख श्रीमती राधा सुळे आणि टाटा उद्योग समूहातील माजी उच्चाधिकारी श्री. मनोहर परळकर यांनी शुक्रवार, दि. २५ मे २०१८ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, नियामक मंडळाच्या सदस्य डॉ. केतकी मोडक आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी मूलभूत शिक्षणाबरोबरच आरोग्य विज्ञान, जैवविविधता, महिला सक्षमीकरण या आणि अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. टाटा उद्योग समूह सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून अशा उपक्रमांना कायमच पाठबळ देत आला आहे. दोन्ही संस्थांनी स्वातंत्रपूर्व काळापासून जपलेली सामाजिक बांधिलकी लक्षात घेता समान दृष्टीकोन आणि समान ध्येय डोळ्यासमोर ठेऊन भविष्यकाळात एकत्रितपणे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देण्याविषयी यावेळी उभय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली.

‘आय.एम.सी.सी.’ मध्ये मिळाली करिअरला दिशा

करिअर म्हणजे केवळ आर्टस्‌, कॉमर्स किंवा बी.ई, एम.बी.बी.एस. नव्हे तर व्यक्तिच्या जीवनात प्रगतीच्या संधी मिळवून देणारा व्यवसाय असतो. यशस्वी करिअर घडवण्यासाठी अनेक घटक महत्वाचे असतात. यात शिक्षण, आपला दृष्टीकोन, आपली अंगभूत कौशल्ये, सवयी, क्षमता हे सारे घटक महत्वाचे असतात. केवळ दहावी, बारावीच्या मार्कवर करिअरची दिशा न ठरवता आणि कोणत्या क्षेत्रात किंवा विषयात जास्त संधी आहेत याचा विचार न करता, आपली आवड व क्षमता यानुसार करिअर निवडले तर त्यात यशस्वी होता येते. हाच विचार घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि करिअर कोर्सेस म्हणजेच ‘आय.एम.सी.सी.’ या संस्थेने बुधवार, दिनांक २३ मे २०१८ रोजी मोफत ‘करिअर गाईडन्स सेमिनार’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. रवींद्र वैद्य यांनी संस्थेच्या वतीने उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचे स्वागत केले. त्यानंतर ‘आय.एम.सी.सी.’ चे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

प्राध्यापिका सौ. जयश्री पाटील यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे (वाय. सी. एम. ओ. यू.) तसेच ‘आय.एम.सी.सी.’तर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘डिजिटल मार्केटिंग’ सारख्या विविध स्वायत्त कोर्सेसची माहिती दिली. 

देशपी फाऊंडेशनचे वेदार्थ देशपांडे यांनी ‘डिजिटल मार्केटिंग : काळाची गरज’ या विषयी आणि सन्मित शहा यांनी ‘प्रॅक्टिकल बी. कॉम.’ या कोर्सबाबत माहिती दिली. 

या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील अनेक प्रश्नांविषयी तज्ञांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी मोरे यांनी केले.

 

शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थी/शिक्षक आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमध्ये काम करणाऱ्या सात शिक्षिका आणि समुपदेशक मंगळवार, दि. १५ मे २०१८ रोजी जम्मू-काश्मीरला जात आहेत. संस्थेच्या मुख्य कार्यालयात आज झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संस्थेचे चिटणीस डॉ. संतोष देशपांडे, या उपक्रमाचे संयोजक व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य विनय चाटी, या उपक्रमाचे अन्य एक संयोजक डॉ. रवींद्र वैद्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आणि विवेक व्यासपीठचे कार्यवाह महेश पोहनेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील ददवारा तालुक्यात पिंतर या गावी बाल गोविंद स्कूल आहे. सध्या या शाळेत ६५० विद्यार्थी शिक्षण घेतात. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि बाल गोविंद स्कूल यांच्यादरम्यान विद्याभारतीच्या माध्यमातून सन २०१३-१४ पासून शैक्षणिक सहकार्य आणि विद्यार्थी/शिक्षक आदान-प्रदान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या वर्षी ‘मएसो’च्या श्रीमती रेवा देशपांडे, श्रीमती ममता येरनूले, श्रीमती सुलभा घैसास, डॉ. गिरीजा लिखिते, श्रीमती मनिषा दोशी, श्रीमती वर्षा न्यायाधीश आणि श्रीमती वैशाली कामत अशा सात शिक्षिका व समुपदेशक या शाळेत जात आहेत. तेथील विद्यार्थ्यांना त्या इंग्रजी, विज्ञान, गणित या विषयांचे नावीन्यपूर्ण पद्धतीने आणि कार्यानुभवावर आधारित शिक्षण देणार आहेत. त्यासाठी या शिक्षकांनी बाल गोविंद स्कूलमधील अभ्यासक्रमाचा अभ्यास केला असून सोप्या पद्धतीने कसे शिकविता येईल? याचा विचार केला आहे. अभ्यासक्रमाशी निगडित कार्यानुभवांबरोबरच (Activity) विविध नावीन्यपूर्ण कार्यानुभव तयार केले आहेत. त्यामध्ये विज्ञान आणि गणित विषयांप्रमाणेच पाठ्यक्रम निरिक्षणाच्या आधारे काही कार्यानुभव तयार केले आहेत. त्यामध्ये वक्तृत्व, एखाद्या विषयावर मुद्देसूद चर्चा कशी करावी आदी कौशल्ये शिकवण्यात येणार आहेत. त्याशिवाय विद्यार्थी-पालक-शिक्षक यांना समुपदेशन करण्यात येणार आहे. या शाळेत ‘व्हर्चूअल क्लासरूम’ तयार करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येणार आहे. 

विद्यार्थी/शिक्षक आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत येत्या जून महिन्यात बाल गोविंद स्कूलमधील दहा विद्यार्थिनी ‘मएसो’च्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत येणार आहेत.

पुणे – ‘शौर्य’ शिबिरामुळे आत्मविश्वास वाढला आणि साहसी वृत्तीला प्रोत्साहन मिळाल्याचे मनोगत ‘शौर्य’ शिबिराच्या समारोपप्रसंगी शिबिरात सहभागी झालेली मुले-मुली व त्यांच्या पालकांनी व्यक्त केले. 

म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत शनिवार, दि. ५ मे २०१८ ते शनिवार, दि.१२ मे २०१८ या कालावधीत ‘शौर्य’ साहसी क्रीडा प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप शनिवार, दि.१२ मे २०१८ रोजी उत्साहात पार पडला. मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद लेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक शैलेश आपटे, शाळेच्या माजी विद्यार्थिनी मेजर अर्चिस सबनीस व स्क्वॉड्रन लीडर वैष्णवी टोकेकर यावेळी उपस्थित होते. 

‘शौर्य’ शिबिरातून फक्त साहसी वृत्ती वाढीस न लागता संस्काराची जोपासना केली जाते असे प्रमुख पाहुणे डॉ. आनंद लेले यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर या शिबिरातून विविध प्रकारच्या साहसाबरोबर कलांची तोंडओळख करून दिली, असे डॉ.माधवी मेहेंदळे यांनी सांगितले. 

शिबिरप्रमुख प्रशांत जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेचे कमांडंट कर्नल सारंग काशीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा जोग यांनी आभार मानले. उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आपल्या संंस्थेचे मा.अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात अबूधाबी येथे होणाऱ्या या संमेलनाचे हे आठवे वर्ष आहे.

जिद्द आणि उच्च ध्येय हाच यशाचा मार्ग – मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त)

पुणे, दि. ५ – “जीवनात यशस्वी होण्यासाठी लहानपणापासूनच परिश्रम, जिद्द, चिकाटी, स्वावलंबन या गुणांचा अबलंब करून उच्च ध्येय ठेवावे” असा सल्ला मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) यांनी आज येथे दिला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘शौर्य’ या साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मेजर जनरल महाजन (निवृत्त) यांच्या हस्ते झाले, त्यावेळी महाजन बोलत होते. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. सुधीर भोसले, डॉ. अतुल कुलकर्णी, शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे, शाळेच्या प्राचार्या सौ. पूजा जोग, कमांडट कर्नल सारंग काशीकर (निवृत्त) या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

आपल्या अध्यक्षीय भाषणात राजीव सहस्रबुद्धे यांनी, शिबिरार्थींनी या शिबिरातून उत्तम संस्कार, उत्तम सैनिकी गुण प्राप्त करावेत आणि शारीरिक तसेच मानसिक क्षमता विकसित करावी असे सांगितले.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेने सुट्टीच्या या काळात मुलांना केवळ गुंतवून न ठेवता त्यांच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने उपयोगी ठरेल असे क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. त्यामध्ये राज्यभरातून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. मानसिक पातळीवर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या योग, सूर्यनमस्कार, रोप मल्लखांब यासारख्या क्रीडाप्रकारांबरोबरच अश्वारोहण, रिव्हर क्रॉसिंग यासारख्या साहसी प्रकारांचीही योजना या शिबिरात करण्यात आली आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत जोशी यांनी केले. कर्नल सारंग काशीकर (निवृत्त) यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेच्या प्राचार्या सौ. पूजा जोग यांनी आभार मानले. 

शाळेचे उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मा. विशाल सोलंकी यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज मा. सोलंकी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मा. सोलंकी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील आसाम केडरचे अधिकारी असून गेली १४ वर्षे ते आसाममध्ये कार्यरत होते. आसाममधील दोन जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिल्यानंतर आसाम सरकारच्या अर्थखात्यात आणि त्यानंतर आसामच्या मुख्य सचिवांच्या कार्यालयात ते कार्यरत होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. 

सोलंकी यांची नुकतीच महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून शिक्षण विभागातील ८ संचलनालयांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

मा. विशाल सोलंकी हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे संस्थेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, प्रबंधक श्री. नीलकंठ मांडके, शैक्षणिक विकास अधिकारी श्री. अजित बागाईतकर उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना या मराठी माध्यमाच्या शाळेत शाळेचा शेवटचा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आज दै. महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे प्लस पुरवणीत पान क्र. २ वर या कार्यक्रमाची बातमी छापून आली आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ‘क्रीडावर्धिनी’ विद्यार्थ्यांची खेळाची आवड वृद्धिंगत व्हावी, त्यांच्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी या हेतूने संस्थेच्या सर्व शाखांमध्ये एप्रिल महिन्यात क्रीडा शिबीराचे आयोजन करते. त्यानुसार म.ए.सो.च्या बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना, पुणे ०४ या मराठी माध्यम शाळेतही क्रीडा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

शाळेचे महामात्र मा. डॉ. अंकूर पटवर्धन यांच्या हस्ते शुक्रवार, दि. १३/०४/२०१८ या दिवशी शाळेच्या क्रीडा शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम खेळासाठी शुभेच्छा दिल्या. या क्रीडा शिबीरातूनच भावी खेळाडून घडण्यास मदत होईल अशी आशा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा गायकवाड यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी फाळके यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच योग्य आहार कसा असावा याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. दत्तात्रय लखे यांनी केले तर सौ. प्रमिला कांबळे यांनी आभार मानले.

विशेष म्हणजे खो-खो या खेळात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले होते. त्यांच्या या खेळाद्वारेच क्रीडा शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना या मराठी माध्यमाच्या शाळेत शाळेचा शेवटचा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेत वर्षभर जास्तीत जास्त उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांनी स्लॅम बुकमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींबद्दलचे मत नोंदवले. काही विद्यार्थ्यांनी शाला मातेस पत्र लिहून शाळेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी हस्तव्यवसायाच्या वर्गात शिकवण्यात आलेल्या वस्तू तयार करून आपली आठवण म्हणून एकमेकांना दिल्या. काही विद्यार्थ्यांनी आभूषणांच्या प्रतिकावर शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश लिहून ती परिधान केली होती. त्याचबरोबर भेळ पार्टीचा आस्वाद घेत शाळेच्या शेवटच्या दिवसाची मजा विद्यार्थ्यांनी लूटली. या कार्यक्रमास शाळेच्या शाला समिती अध्यक्ष मा. आनंदी पाटील, महामात्र मा. डॉ. अंकूर पटवर्धन, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. प्रतिभा गायकवाड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील (पेरुगेट भावेस्कूल) नूतनीकृत संगणक प्रयोगशाळेचे ‘कै. प्रभाकर चानसरकर संगणक प्रयोगशाळा’ असे नामकरण आणि उद्धाटन सोमवार, दि. ९ एप्रिल २०१८ रोजी श्रीमती शिल्पा प्रभाकर चानसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाची बुधवार, दि. ११ एप्रिल २०१८ रोजी महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे प्लस पुरवणीत पान क्र. २ वर प्रसिद्ध झालेली बातमी

पुणे, दि. ९ – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील (पेरुगेट भावेस्कूल) नूतनीकृत संगणक प्रयोगशाळेचे ‘कै. प्रभाकर चानसरकर संगणक प्रयोगशाळा’ असे नामकरण आणि उद्घाटन सोमवार, दि. ९ एप्रिल २०१८ रोजी श्रीमती शिल्पा प्रभाकर चानसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान व तंत्रशिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्य सौ. आनंदी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक श्री. संग्राम खामकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, शाळेचे महामात्र व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. सुधीर गाडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ, तसेच खामकर कुटुंबिय आणि आप्तेष्ट यावेळी उपस्थित होते. 

श्रीमती शिल्पा चानसरकर यांच्या वतीने त्यांच्या भगिनी सौ. अपर्णा विनायक आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “कै. प्रभाकर चानसरकर यांचे व्यक्तिमत्व अतिशय चैतन्यमयी आणि प्रेरणादायी होते. त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख कायमच चढता होता. ते सर्वांना कायमच गरजेप्रमाणे मदत करत असत आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देत. जगाच्या पाठीवर कुठेही उपचार होणार नाहीत असा डोळ्यांचा विकार झाल्यावरदेखील ते खचले नाहीत, त्यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या शारिरीक व्याधींना तोंड दिले. कै. प्रभाकर चानसरकर यांचे संगणक या विषयात प्रावीण्य होते. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ शाळेतील संगणक प्रयोगशाळेसाठी देणगी दिली आहे.”

उद्योजक श्री. संग्राम खामकर हे देखील शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या भाषणात शाळेतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “१९८६ साली शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक दाखवण्यासाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा संगणक बघण्याची संधी मिळाली आणि आज शाळेतील संगणक प्रयोगशाळेच्या उद्धाटनाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा मोठा आनंद होतो आहे. श्रीमती शिल्पा चानसरकर यांनी अतिशय योग्य ठिकाणी देणगी दिली आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात संगणक शिकायला मिळाल्यामुळे पुढील जीवनात त्यांना त्याचा खूप उपयोग होईल.” 

संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान व तंत्रशिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्य सौ. आनंदी पाटील यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा परिचय करून दिला. त्या म्हणाल्या, “संस्थेने काळाची पावले ओळखून आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आव्हानात भावे स्कूलसारखी शाळा टिकून आहे. अनेक दिग्गज, नामवंत या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. शाळेबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेतूनच माजी विद्यार्थी शाळेला वेळोवेळी पाठबळ देत असतात. कै. प्रभाकर चानसरकर यांच्या स्मरणार्थ मिळालेली देणगी हे त्याचेच उदाहरण आहे.” 

कार्यक्रमाच्या सुरवातीला आपल्या प्रास्ताविकात श्री. गाडे यांनी, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून मिळत असलेल्या देणग्यांचा आढावा घेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील दानशूर व्यक्तींच्या पाठबळामुळेच आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत संस्था मराठी माध्यमाच्या शाळा चालवू शकत असल्याचे सांगितले. 

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर यांनी कै. प्रभाकर चानसरकर यांच्या कार्याची ओळख करून दिली तसेच प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. 

श्री. गाडे यांच्या हस्ते श्रीमती शिल्पा चानसरकर, श्री. खामकर आणि सौ. आनंदी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील पर्यावेक्षिका सौ. भारती तांबे यांच्या हस्ते चानसरकर कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ यांनी आभार प्रदर्शन केले.

 

म.ए.सो. क्रीडावर्धिनीने दिनांक २७ ते २९ मार्च २०१८ या कालावधीत संस्थेच्या विविध शाळा / महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांचे निवासी क्रीडा मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासारआंबोली येथे पार पडलेल्या या शिबिरात एकूण ५४ शिक्षकांनी भाग घेतला. त्यात १५ महिला व ३९ पुरुष शिक्षकांचा समावेश होता. शिबिराचे उद्घाटन मंगळवार, दि. २७ मार्च रोजी म.ए.सो.च्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा.सुधीर गाडे यांच्या हस्ते तर आजीव सदस्य मंडळाचे अन्य एक सदस्य प्रा.गोविंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे यांनी केले तर क्रीडावर्धिनीचे महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी आभार मानले. 

दि. २८ मार्च रोजी सकाळच्या सत्रात श्री.मनोजकुमार साळी, श्री.राजेंद्र लोखंडे व श्री. दादा शिंदे यांनी सूर्यनमस्कार, योगासनांविषयी मार्गदर्शन केले. 

श्री.शिरीष तिखे यांनी ओंकार व प्राणायाम यांची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. 

डॉ. निलेश मसुरकर यांनी अष्टांग योग याविषयी मार्गदर्शन केले.

श्री. मनोजकुमार साळी यांनी आवर्तन ध्यान घेतले.

श्री.मयुरेश डंके यांनी मानसशास्त्रीय तंत्रे याविषयी मार्गदर्शन केले.

भोजनानंतर दुपारच्या सत्रात प्रा. महेश देशपांडे व प्रा.शिरीष मोरे यांनी ‘मास अथलेटिक्स’ या विषयी प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले.

श्री. जयसिंग जगताप व श्री. दादा शिंदे यांनी सांघिक खेळ घेतले.

सायंकाळच्या सत्रात सैनिकी शाळेचे कमांडट कर्नल सारंग काशीकर (निवृत्त) यांनी प्रात्यक्षिकाद्वारे रायफल शूटिंगबाबत माहिती दिली.

रात्री भोजनानंतरच्या सत्रात नेतृत्वगुण व व्यक्तिमत्व विकास या विषयावर कर्नल काशीकर यांचे व्याख्यान झाले.

दि.२९ रोजी सकाळच्या सत्रात श्री. मनोज साळी यांनी ओंकार, सूर्यनमस्कार व योगासने घेतली. 

आगाशे महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. काळे या विद्यार्थिनीने एरोबिक्स या विषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

श्री.सुनील देसाई यांनी मानवी मनोरे (पिरॅमिड) ची माहिती प्रत्यक्षिकांद्वारे दिली.

श्री.दादा शिंदे यांनी हास्य योगाचे प्रशिक्षण दिले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव डॉ.भरत व्हनकटे यांच्या मार्गदर्शनाने व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सचिन आंबर्डेकर यांचे उपस्थितीत या शिबिराचा समारोप झाला. यावेळी प्रा. शैलेश आपटे शिबिरातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. समारोपप्रसंगी प्रा. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. 

या संपूर्ण शिबिराची धुरा प्रा.शैलेश आपटे, प्रा.सुधीर भोसले व श्री.मनोज साळी यांनी सांभाळली. 

शिबिराच्या यशस्वीतेसाठी सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व कर्मचारी वृंदाचे संपूर्ण सहकार्य लाभले.

 

 

म ए सो वाघीरे विद्यालयाचा ११२ वा वर्धापन दिन दि. २६ मार्च २०१८ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सर्वांना शाळेची माहिती सांगितली. कु. प्रणाली कापरे हीने स्वरचित कविता सादर केली. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. कारंडे यांनी विद्यार्थ्यांना शाळेचा इतिहास सांगितला.

आपल्या विद्यालयातील १९५६ सालचे माजी विद्यार्थी आणि सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री. बापूसाहेब नानासाहेब जगताप हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते स्वतः प्रगतशील शेतकरी असून बी.ए. एल.एल.बी. पर्यंत त्यांचे उच्च शिक्षण झाले आहे. आपल्या भाषणात श्री. जगताप यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. शाळेत आमच्यावर उत्तम संस्कार झाले, त्यामुळे आम्ही जीवन यशस्वीरीत्या जगू शकलो असे त्यांनी सांगितले. सासवडच्या कोर्टात काम करत असताना आयुष्यभर सायकलचा वापर केल्यामुळे आज ८५व्या वर्षीही आपण व्यवस्थित आहोत असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगतले. नगराध्यक्ष असताना त्यांनी विद्यालयाला पालिकेमार्फत देणगी दिली होती. श्री. जगताप यांचे वडीलही सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. 

यावेळी हिंदी कथाकथन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचे वाचन श्री. आप्पासाहेब कोकरे यांनी केले. 

श्री. सहारे सर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश पाठक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. एम. के. राऊत व श्री. रा. ब. जगताप यांनी सहकार्य केले.

 

विद्यार्थ्यांमध्ये ‘दातृत्व’ या गुणाची जोपासना व्हावी या हेतूने आपल्या विद्यालयात एकमुष्टी धान्य योजना राबविण्यात येते. या योजनेत जमा झालेले धान्य तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या संस्थेस प्रदान करण्याचा कार्यक्रम शनिवार, दि. १० मार्च २०१८ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील स्वरुपवर्धिनी या संस्थेचे कार्याध्यक्ष मा. रामभाऊ डिंबळे होते. तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासाचे सचिव मा. मंदार अत्रे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर तसेच तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहाचे व्यवस्थापक मा. रमेश आंबेकर हेदेखील या वेळी उपस्थित होते. 

मा. डिंबळे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडत तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे व अनुभव सांगत दातृत्व गुणाचे महत्व स्पष्ट केले. मा. अत्रे यांनी तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासाचे विविध उपक्रम आणि योजना यांची माहिती दिली. मा. आंबर्डेकर यांनी एकमुष्टी धान्य गोळा केल्याबद्दल विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक एस.बी. कुलकर्णी यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक रामदासी यांनी करून दिला. विद्यालयातील शिक्षक विनोद पारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री. जगताप सरांनी आभार प्रदर्शन केले. 

आपल्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी तसेच पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी एकमुष्टी धान्य योजनेअंतर्गत धान्य गोळा केले. संकलित केलेले हे धान्य तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासातर्फे वेल्हा येथे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहाला देण्यात आले.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयात ‘जागतिक महिला दिना’निमित्त आज सासवड नगर पालिकेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय कौटुंबिक परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना उच्चशिक्षण देणाऱ्या आपल्या शाळेतील सेविका श्रीमती शारदा सोपान सोळंके यांचा विशेष सत्कार देखील या वेळी करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधत शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थिनी प्रतिनिधींचाही सत्कार आज करण्यात आला. यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी महिला दिनाची माहिती सांगितली. 

सासवड शहर आणि विशेषतः शाळेच्या आसपासच्या परिसरात स्वच्छता राखण्याचे काम पालिकेच्या सेवेत असलेल्या महिला कर्मचारी करीत असतात. सासवड नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भाग घेतलेल्या आणि त्यात उत्तम गुण प्राप्त केलेल्या या महिला कर्मचाऱ्यांचा आजच्या कार्यक्रमात सत्कार करून शाळेने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मा. श्री. पी. एस. मेमाणे यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आले. 

आपल्या शाळेतील सेविका श्रीमती शारदा सोपान सोळंके यांचे पती आपल्याच शाळेच्या सेवेत होते. त्यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर श्रीमती सोळंके या गेली १८ वर्षांपासून शाळेच्या सेवेत आहेत. त्या मूळच्या जळगाव येथील आहेत. पतीच्या निधनावेळी २ आणि ४ वर्षे वय असलेल्या आपल्या मुलांना त्यांनी मोठ्या कष्टाने वाढविले. त्यांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यांच्या दोन्ही मुलांनी बी.ई. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. या कर्तृत्ववान मातेचा सत्कार करून आपल्यातीलच एका आदर्श महिलेचा परिचय शाळेने या निमित्ताने सर्वांना करून दिला. 

या कार्यक्रमाला पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. मनिषा बडधे उपस्थित होत्या. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक गणेश पाठक यांनी केले. 

शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.बी. कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन. के. राऊत, हि.बा. सहारे तसेच नगरसेवक आणि शाळेचे माजी विद्यार्थी श्री. अजित जगताप यांनी सहकार्य केले

म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम शाळेत नेहमीच अभिनव उपक्रम केले जातात. शिवजयंतीचे औचित्य साधून गेली ३ वर्षे शाळेत ‘स्पोर्ट्स एथलेटिक्स मीट’ आयोजित केली जाते. यावर्षी या स्पर्धेत पुणे शहरातील २३ नामवंत शाळा आणि विविध स्पोर्ट्स क्लबचे २८० स्पर्धक सहभागी झाले होते. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून एथलेटिक्स तज्ञ हर्षल निकम, ‘मएसो’चे सहसचिव व शाळेचे महामात्र डॉ. भरत व्हनकटे, क्रीडावर्धिनीचे महामात्र प्रा. सुधीर भोसले, क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर उपस्थित होते. स्पर्धेच्या बक्षीस समारंभास सुनील शिवले प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील लोककलांच्या माध्यमातून साहसी खेळ सादर करण्यात आले. १०,१२,१४ वर्षाखालील खेळाडूंच्या सांघिक, वैयक्तिक स्पर्धा झाल्या. गोळाफेक, लांब उडी, धावणे इ. स्पर्धा झाल्या. विद्यार्थ्यांचा उत्साह,चुरस पहाण्यासारखी होती. आनंद णि उत्साहाच्या वातावरणात या स्पर्धा पार पडल्या. सर्वसाधारण गटात मुले विभागाचे विजेतेपद डॉ. कलमाडी शामराव विद्यालयाला तर मुलींच्या विभागाचे विजेतेपद म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम शाळेला मिळाले. सर्वोत्तम विजेतेपददेखील म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम शाळेला मिळाले. साहसी खेळ व व्यायाम हे शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा अविभाज्य भाग आहे. आजच्या ‘व्हर्चुअल गेम’च्या जमान्यात मुले मैदानी खेळ खेळत नाहीत ही ज्वलंत समस्या आहे. त्यावर ‘स्पोर्ट्स एथलेटिक मीट’ हा एक खूप प्रभावी उपाय असून तो उपयुक्त आणि प्रोत्साहन देणारा ठरत आहे, असे इतर शाळांच्या क्रीडा शिक्षकांनी सांगितले.

 

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या प्रांगणातील नूतनीकृत डॉ. प्रभाकर पटवर्धन सभागृहाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते गुरुवार दि. ०१ फेब्रुवारी २०१८ रोजी झाले. 

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ.संतोष देशपांडे, पनवेलमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा. नीलाताई पटवर्धन, शाला समितीचे अध्यक्ष अॅड.जयंत म्हाळगी, शाळेचे महामात्र डॉ.अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

मा. नीलाताई पटवर्धन यांनी दिलेल्या भरघोस देणगीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या या सभागृहाची आसन क्षमता ३०० असून दोन ग्रीन रूम, मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणा, अद्ययावत ध्वनिक्षेपण यंत्रणा यांनी हे सभागृह सुसज्ज आहे. 

उद्घाटनाच्या कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन, सरस्वतीपूजन व संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमा पूजनाने झाली. नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर विद्यालयाचे महामात्र डॉ. अतुल कुलकर्णी यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला. 

मा. नीलाताई पटवर्धन मनोगतात म्हणाल्या, “आम्ही कुटुंबीय म.ए.सो.चे माजी विद्यार्थी असल्यामुळे संस्थेच्या कामाचे कौतुक आहे, संस्थेची ध्येय-उद्दिष्ट्ये आमच्या विचारांशी सुसंगत असल्याने शाळेला देणगी दिली आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. भूषणजी गोखले यांनी नूतनीकरण केलेल्या डॉ. पटवर्धन सभागृहाची कल्पना मांडणाऱ्या व साकारणाऱ्या सर्वांचे मनापासून कौतुक केले. नाटक, संगीत अशा कला तसेच खेळांमुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, त्या दृष्टीने या सभागृहाचा फायदा शाळेतील विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच नवीन पनवेल परिसरातील हे सभागृह छोटेखानी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमासाठी वरदानच ठरेल असे त्यांनी नमूद केले.

यावेळी शाळेच्या ‘संवाद’ या पाक्षिकाचे प्रकाशन मा. भूषणजी गोखले यांचे हस्ते झाले. कु.वैष्णवी कदम हिने या पाक्षिकाचे संपादन केले आहे. 

शाला समितीचे अध्यक्ष अॅड. जयंत म्हाळगी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका स्वप्ना अत्रे यांनी केले.

औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर किराणा घराण्याची विख्यात गायिका आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत व अभंग गायनाचा ‘सूरसंगत’ हा कार्यक्रम झाला. आपल्या बहारदार गायनाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

पुणे, दि. 19 – लहानग्या खेळाडूंमधला उत्साह, खेळाच्या स्पर्धा सुरू होण्यापूर्वीची वाढती उत्कंठा आणि क्रीडाज्योतिच्या आगमनाने भारलेल्या वातावरणात कौतुकास्पद समन्वयाचा अनुभव देणाऱ्या क्रीडा प्रात्यक्षिकांनी ‘मएसो क्रीडा करंडक स्पर्धे’ला आज सुरवात झाली. इयत्ता तिसरी आणि चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी सई पवारच्या नेतृत्वात सादर केलेल्या कॅलेस्थेनिस या ड्रील व्यायाम प्रकाराने सर्वच उपस्थित अचंबित झाले. एकसंघता, परस्पर समन्वय आणि सरावातून मिळवलेली कुशलता यांचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कॅलेस्थेनिसचे प्रात्यक्षिक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाच्या निनादात सुरू झालेल्या लेझमीच्या खेळाने वातावरणात वीरश्रीबरोबरच उत्सवी रंग भरून गेला. पुण्यातल्या रेणुका स्वरुप प्रशालेच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री शिर्के आणि संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते आज झाले. यावेळी भावे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गायकवाड, शाळेच्या महामात्र चित्रा नगरकर, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र प्रा. सुधीर भोसले, क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष भालचंद्र पुरंदरे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष विवेक शिंदे, स्पर्धेचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे सहाय्यक चिटणीस डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळ सदस्य आनंदी पाटील तसेच रेणुका स्वरुप प्रशालेच्या मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, पूर्वप्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा दाते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या 12 शाळांबरोबरच अन्य 3 शाळा सहभागी झाल्या असून लंगडी, गोल खो-खो, डॉजबॉल या खेळांचे सामने होणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर खेळाडूंच्या पथकाने क्रीडाज्योत मैदानात आणली आणि त्यानंतर मैदानात अवतरला, क्रीडा महोत्सवाचा यावर्षीचा शुभंकर असलेला बाहुबली! त्याला बघून लहानग्या स्पर्धकांमध्ये चैतन्य सळसळू लागले आणि अशा भारलेल्या वातावरणात हवेत सोडण्यात आलेल्या फुग्यांनी क्रीडामहोत्सव सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात, क्रीडा महोत्सवात दरवर्षी वाढत असलेला उत्साह आणि आनंद ही संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद केले. खेळांमुळे शारिरीक क्षमतेच्या विकासाबरोबरच व्यक्तिमत्वाचाही विकास होत असल्याने खेळातील यश-अपयशाकडे सकारात्मकतेने बघण्याची गरज असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री शिर्के या संस्थेच्या रेणुका स्वरुप प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. शाळेतच आपल्या क्रीडा जीवनाला सुरवात झाल्याचे लांगत त्यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा करंडक स्पर्धेसारखा एक चांगला मंच उपलब्ध करू दिल्याबद्दल संस्थेची स्तुती केली आणि विद्यार्थ्यांना या स्पर्धेचा चांगला फायदा करू घेण्याचे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी मएसो क्रीडावर्धिनीचा प्रत्येक क्रीडामहोत्सव अधिकाधिक दर्जेदार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. शालेय वयातच खेळाची गोडी लागली तर जीवनात प्रत्येक टप्प्यावर त्याचा फायदाच होतो आणि खेळाचा दररोज सराव केला तरच खेळण्याचा आनंद लुटता येतो याकडे लक्ष वेधले. भावे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला गायकवाड यांनी आभार प्रदर्शन तर शिक्षिका रेणुका महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

   

सगळ्याच शाळांमध्ये बाहुलीचे लग्न करण्यात येते. परंतु, आपल्या शाळेमध्ये “विद्या आणि विनय” या बहुला-बाहुलीचे लग्न खऱ्या लग्न सोहळ्यासारखे करण्यात आले. हा सोहळा दि. ११ जानेवारी २०१८ रोजी शाळेमध्ये पार पडला. त्यामध्ये परिसरातील इतर शाळांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये शैक्षणिक मंगलाष्टका म्हणण्यात आल्या. प्रथेप्रमाणे रुखवत देखील सजवला गेला होता. वरदाव्यामध्ये मनसोक्त नाचण्याचा आनंद बालचमूंनी घेतला. पालकांनी आणि आलेल्या पाहुणे मंडळींनी शाळेस शैक्षणिक व शालोपयोगी वस्तूंचा आहेर दिला. या लग्नासोहळ्याची सांगता रीतसर जेवणाच्या पंगतींनी झाली.