Year: 2018

आपल्या विद्यालयाचा २० वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा गुरुवार, दि.२७ डिसेंबर २०१८ रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ‘जागर जाणिवांचा ‘ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम विद्यालयाच्या वातानुकूलित सभागृहात सादर करण्यात आला. 

भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलांनी सुंदर सादरीकरण केले. 

या वेळी शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादिका डॉ. सौ. अर्चना कुडतरकर आणि शाळेचे महामात्र डॉ.अतुल कुलकर्णी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होते. हे स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले. 

र्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मानसी वैशंपायन यांनी केले.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या पाच छात्रांची यावर्षी राजधानी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी निवड झाली आहे. ऐश्वर्या खैरनार, आसावरी तानवडे, रितीका जाधव, मंगेश गोळे आणि आकाश थोपटे हे ते छात्र आहेत. एन.सी.सी. च्या पुणेस्थित २ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.पी.एस. मौर्य तसेच कर्नल एस. नारायनील आणि कॅप्टन संदीप नवले यांचे या छात्रांना विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. गेल्या सलग सात वर्षांपासून या महाविद्यालयातील छात्रांची राजधानीतील संचलनासाठी निवड होत असून २०१३ पासून १६ छात्रांनी राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
या वर्षी निवड झालेली ऐश्वर्या खैरनार ही छात्रा मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेची माजी विद्यार्थिनी आहे.

 

पद्मभूषण आबासाहेब गरवारे यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त मएसो आबासाहेब गरवारे कॉलेज आणि मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या दोन्ही महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शुक्रवार, दि. २१ डिसेंबर २०१८ रोजी मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. या कार्यक्रमास यशस्वी मराठी उद्योगिनी व ‘पूर्णब्रह्म’ या सर्वात मोठ्या मराठमोळ्या हॉटेल शृंखलेच्या संचालिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्याबरोबर ‘पूर्णब्रह्म’ च्या जागतिक प्रमुख वृषाली शिरसाव या देखील उपस्थित होत्या. याप्रसंगी दोन्ही महाविद्यालयातील वर्ष २०१७-२०१८ मध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांचा सौ. कठाळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. “कशालाही न घाबरता सचोटीने आणि आत्मविश्वासाने आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने सुनिश्चित वाटचाल” हा यशाचा मूलमंत्र सौ. कठाळे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी अतिशय रंजक शैलीत, प्रभावीपणे केलेले अनुभवकथनाने सर्व श्रोते भारावून गेले. 

मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे दरवर्षी कै. आबासाहेब गरवारे यांचा जयंतीदिन ‘उद्योजकता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या वर्षी त्यानिमित्त दोन दिवसीय राज्यस्तरीय बिझनेस फेयर (उद्योग मेळावा) आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन सौ. कठाळे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात, महाविद्यालयांत गेल्या १६ वर्षांपासून उद्योजकता विकासाचा ध्यास घेतलेल्या डॉ. गीता आचार्य यांच्या प्रयत्नांचा गौरव केला तसेच मूल्याधिष्ठित शिक्षणातून सकस समाज निर्मितीसाठी म.ए. सो. सारख्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.बी. बुचडे यांनी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थचे सचिव व मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे उपप्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी तसेच गरवारे ट्रस्टतर्फे मा. श्री. सुनील सुतावणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजकता विकास केंद्रप्रमुख डॉ. अर्चना जोशी यांनी तर आभार प्रदर्शन कॉमर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. भूषण राठोड यांनी केले.


 

मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीयर कोर्सेसचे (आयएमसीसी) संचालक म्हणून डॉ. संतोष देशपांडे यांची पुणे विद्यापीठाच्या निवड समितीने निवड केली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे यांनी आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात डॉ. देशपांडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. 

डॉ. देशपांडे हे आत्तापर्यंत आयएमसीसीचे प्रभारी संचालक म्हणून काम पहात होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ते संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत.

किर्लोस्कर फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरुप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलला प्रादेशिक भाषा माध्यमाच्या शाळांच्या गटात प्रथम क्रमांक तर इंग्रजी भाषा माध्यम शाळा गटात बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलला द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन समितीच्या सदस्यपदी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकाशन समितीच्या सदस्यपदी आणि महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य-सचिवपदी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. श्यामाताई घोणसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने नुकत्याच या समित्या पुनर्गठित केल्या असून पुढील तीन वर्षांसाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले आणि राजर्षि शाहू या महापुरुषांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी स्वतंत्र समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांच्या माध्यमातून या महापुरुषांशी संबंधित सर्व अप्रकाशित साहित्य, लेखन आणि संशोधनाचे काम तसेच अनुवाद, संपादन आणि प्रकाशन अशी कामे करण्यात येतात. या ग्रथांना महाराष्ट्राबरोबरच देशात आणि परदेशात मोठी मागणी आहे. 

या नियुक्तीबद्दल प्रा. सुधीर गाडे व डॉ. श्यामाताई घोणसे यांचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

बारामतीमधील म. ए. सो. कै. ग. भि. देशपांडे विद्यालयातील विद्यार्थिनी कु. राधिका संजय दराडे हीने विभागीय स्तरावर १७ वर्षे वयोगटासाठीच्या सायक्लिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी कु. राधिकाची निवड झाली आहे. शाळेच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन!

पुणे जिल्हा परिषदेच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुशू स्पर्धेमध्ये म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या खेळाडूंनी विभाग स्तरावर उज्वल कामगिरी बजावली आहे. शाळेतील सात विद्यार्थिनींनी पदके पटकावली आहेत. 

१) धनश्री सुतार – इ. १० ब – सुवर्ण पदक – राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झाली. 

२) श्वेता डोईफोडे – इ. १० ब – रौप्य पदक 

३) तनया कोऱ्हाळे – इ. ११ अ – रौप्य पदक 

४) दिव्या निखाडे – इ. १२ अ – रौप्य पदक 

५) इशा दलभंजन – इ. १० ब – कांस्य पदक 

६) ऋतुजा घाडगे – इ. १२ अ – कांस्य पदक 

७) रूतिका गोळे – इ. १२ अ – कांस्य पदक 

सर्व खेळाडू तसेच मार्गदर्शक श्री.विक्रम मराठे सर आणि रोहिणी ताई यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन!

क्रीडाभारती पुणे महानगर आयोजित १४ वर्षे वयोगटातील आंतरशालेय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो. कै. ग. भि. देशपांडे विद्यालय बारामती मुलींच्या संघाने अहिल्यादेवी मुलींच्या शाळेस 38- 23 च्या फरकाने अंतिम फेरीत मात करून प्रथम क्रमांक पटकावला.

 

म.ए.सो. रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूलमध्ये कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गुरुवार, दि. ६ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ‘परिक्रमा’ नृत्यमहोत्सव आयोजित करण्यात आला होता. 

सुप्रसिद्ध नृत्यांगना सुचेता भिडे – चाफेकर यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्याने त्यांच्या सर्व शिष्यांनी मिळून त्यांना दिलेली गुरुदक्षिणा म्हणजे ‘परिक्रमा’ नृत्यमहोत्सव!

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर होते. म.ए.सो. तर्फे नृत्यांगना सुचेता भिडे-चाफेकर यांचा सत्कार एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा या कार्यकमात सहभाग होता. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे , उपाध्यक्ष डॉ. माधवजी भट व आजीव मंडळाच्या सदस्या डॉ. मानसी भाटे हे उपस्थित होते.

 

“ज्या शाळेत घडलो, वाढलो त्या शाळेसाठी खासदार निधी उपलब्ध करून देणे हे मी माझे कर्तव्य समजतो” अशा शब्दात शाळेचे माजी विद्यार्थी आणि राज्यसभेतील खासदार अमरजी साबळे यांनी शाळेबद्दलची कृतजता व्यक्त केली. महाराष्ट् एज्युकेशन सोसायटीच्या कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अद्ययावत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन राज्यसभेतील खासदार मा. श्री. अमर साबळे यांच्या हस्ते सोमवार, दि. ३ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत खा. साबळे यांनी दिलेल्या निधीतून शाळेमध्ये ६० संगणक व ७ प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, शाला समितीचे अध्यक्ष व संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य अॅड. धनंजय खुर्जेकर, शाळेचे महामात्र प्रा. गोविंद कुलकर्णी, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. राजकुमार छाजेड, राजीवजी देशपांडे, समितीचे समन्वयक पी.बी. कुलकर्णी, मुख्याध्यापक विजय सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. “मानवी जीवन अधिक सुखी व समृद्ध करण्यासाठी संगणकाचा उपयोग करता येऊ शकतो. देशातील खेडी स्वयंपूर्ण व्हावीत असे म्हटले जाते. त्यामुऴे, तिथे प्राथमिक व मूलभूत गरजा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एक उपक्रम आपण हाती घेतला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसल्ला आणि सुविधा त्यांच्या गावांत मिळाव्यात यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे. ही व्यवस्था उभी राहिली तर ती एक क्रांती घडेल. सामाजिक जाणीवेचा हा संस्कार मला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत मिळाला. पारंपारिक शिक्षण पद्धती आणि जगातील उत्तमोत्तम शिक्षण पद्धतीचा मेळ घालून संगणकाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना कालानुरूप शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. समाजातील विविध समस्या, विसंवाद, ताणतणाव दूर करण्यासाठी शिक्षण संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे,” अशी अपेक्षा खा. साबळे यांनी या प्रसंगी व्यक्त केली. खा. साबळे १९७८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी असून त्यांचे सहाध्यायी तसेच त्यांचे शिक्षक एम.डब्ल्यू. जोशी सर, चावरे सर व झाडबुके सर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. धनंजय खुर्जेकर यांनी केले. ते म्हणाले, “ दृकश्राव्य माध्यमामुळे शिक्षण मनावर ठसते, शिकवण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे त्याचे महत्त्व आहे. खा. साबळे यांनी दिलेल्या निधीमुळे शाळेत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूमची निर्मिती शक्य झाली आहे. मात्र शाळेतील १९७८ सालच्या बॅचनी दिलेली ही देणगी आहे अशीच खा. साबळे यांची भावना आहे, ही विशेष बाब आहे. संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षात ते संस्थेसाठी अधिक योगदान देतील अशी आपण आशा करूया.” आपल्या भाषणात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे म्हणाले की खा. साबळे यांनी स्वखुशीने दिलेल्या निधीतून शाळेत संगणक प्रयोगशाळा व डिजिटल क्लासरूम उभी राहिली आहे. त्यांच्या निर्मितीसाठी ते केवळ निधी न देता अतिशय आत्मीयतेने त्यासंबंधात सातत्याने पाठपुरावा करत होते. ‘मएसो’च्या शाळेत होणाऱ्या संस्कारांमुळे घडणाऱ्या व्यक्तिमत्वाचे उदाहरण म्हणजे मा. अमर साबळे हे आहेत. संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवात ते आजपेक्षा अधिक मोठ्या पदावरून सहभागी होतील अशी आशा आपण करूयात. संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “सामाजिक जाणीव असलेला नेता कशा पद्धतीने विचार करतो हे खा. साबळे यांच्या भाषणातून दिसून आले. शिक्षणाच्या क्षेत्रात आज सर्व जागतिक दर्जाच्या आणि आधुनिक सुविधा असल्या पाहिजेत. खा. साबळे यांनी आपल्या शाळेसाठी त्या उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!” १९७८ च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सौ. माधवी लिमये (शाळेतील श्री. पावसकर सरांची कन्या) यांनी भावना व्यक्त केल्या. धनंजय मेळकुंदे यांनी सूत्रसंचालन तर मुख्याध्यापक विजय सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

 

म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी भारत विकास परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हैदराबाद येथे रविवार, दि. २ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या अंतिम फेरीत शाळेच्या संघाने हे यश मिळविले आहे. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री मा.आर. के. सिंह, पी. गोपीचंद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

या स्पर्धेत शाळेच्या संघाने हिंदी विभागात “फिर आज भुजाएँ फडक उँठी, हम पर प्रहार करनेवाले चिंता करें अपने प्राणों की…” हे गीत सादर केले. संस्कृत विभागात भारतभूमीची महती सांगणारे “जयतु जननी जन्मभूमी पुण्यभुवनं भारतं…” हे गीत तर लोकगीत विभागात महाराष्ट्रातील कोळी-धनगर गीते व भारुड, गोंधळ यांची शृंखला सादर केली. शाळेच्या विद्यार्थ्यांचे सूर आणि तालबद्ध सांघिक गायन ऐकून सभागृहातील श्रोते भारावून गेले आणि त्यांनी नकळत तालदेखील धरला. 

राष्ट्रीय भारत विकास परिषद या संस्थेतर्फे संस्कृत, हिंदी आणि लोकगीत अशा तीन विभागात जिल्हा, राज्य, प्रांत आणि त्यानंतर राष्ट्रीय अशा चार स्तरांवर ही स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक स्तरावरप्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघाचीच पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. संपूर्ण भारतातून पाच हजार शाळांमधील संघ या स्पर्धेत सहभागी होतात. त्यातून केवळ ७ शाळांच्या संघाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. 

अतिशय स्पर्धात्मक कसोट्यांवर झालेल्या या स्पर्धेत मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विजेतेपद मिळवून स्पर्धेवर शाळेची आणि महाराष्ट्राची मोहोर उमटविली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर व शिक्षिका सौ. श्रुती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळविले आहे.

Click Here For the Video

शाळेतल्या बाईंना आणि सरांना भेटण्याची उत्सुकता, आपल्या सवंगड्यांना शोधणाऱ्या नजरा, कॉलेजमधल्या मंतरलेल्या दिवसांचा आठव, वडाच्या पाराच्या साक्षीनं अनुभवलेले संवेदनशील क्षण, कट्ट्यावर केलेला कल्ला, हॉस्टेलवर जमलेलं मैत्र, उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा धांडोळा घेताना मनात दाटून येणाऱ्या आठवणी, जीवनाच्या प्रवासात स्थिरावल्यानंतर ‘बॅचमेट’ना भेटण्याची उत्सुकता अशा ह्द्य वातावरणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आज मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर रंगला! निमित्त होतं, संस्थेच्या १५८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याचं!
यात कोण नव्हतं? शिक्षण, क्रीडा, आरोग्यसेवा, व्यावसायिक, उद्योजक, राजकारण, पत्रकारिता, प्रशासन, संरक्षण अशा विविध क्षेत्रातल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्नेहमेळाव्यात सहभागी होऊन आपल्या शालेय-महाविद्यालयीन जीवनातल्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या शिक्षक, शिक्षिकांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
संस्थेचे अध्यक्ष भूषण गोखले यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून या स्नेहमेळाव्याला सुरवात झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एन.व्ही.अत्रे, सी.पी.चिंचोरे, श्री.वा. कुलकर्णी, माजी प्राचार्य डॉ. अरविंद इनामदार, माजी मुख्याध्यापिका लीला कुलकर्णी, मा.तु. रोमण-जाधव, माजी मुख्याध्यापक एस.व्ही. मारणे यासारखे माजी शिक्षक-प्राध्यापक-प्राचार्य या वेळी आवर्जून उपस्थित
होते. शिक्षक-विद्यार्थ्यांमधल्या स्नेहसंवादाने प्रत्येकाच्या मनातल्या जुन्या आठवणींचा कोपरा आपोआप उघडला गेला.
संस्थेच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. न. म. जोशी, प्रा. अ. ल. देखमुख, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया आणि त्यांचे कुटंबीय, अँड. दादासाहेब बेंद्रे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, नेत्रतज्ञ डॉ. श्रीकांत केळकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख, खा. अनिल शिरोळे, आ. विजय काळे, आ. मेधाताई कुलकर्णी, डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक, सुनील माळी, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शकुंतला खटावकर, ज्येष्ठ खो-खोपटू हेमंत टाकळकर, विजय अभ्यंकर, कर्नल अनंत गोखले, डॉ. माधवी कश्यप, किरण जोशी, संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार, बद्रीनाथ मूर्ती, माजी प्रबंधक अनिल ढेकणे असे अनेक मान्यवर या स्नेहमेळाव्यात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला इ.स. 2020 मध्ये 160 वर्ष पूर्ण होणार आहेत. शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या ‘मएसो’नं मूलभूत शिक्षणाबरोबरच व्यावसायिक आणि कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांनाही तितकंच महत्व दिलं आहे. 1990 सालपर्यंत 7 शाळा आणि 2 महाविद्यालयांच्या माध्यमातून शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या ‘मएसो’चा विस्तार आता 71 शाखांद्वारे 7 जिल्ह्यात झाला आहे. याची माहिती देणारी विविध दालनं या स्नेहमेळाव्याच्या ठिकाणी उभारण्यात आली होती. आपल्या संस्थेचं हे कार्य बघून उपस्थित भारावून जात होते. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी संस्थेच्या प्रयत्नांमध्ये आपलाही सहभाग असावा यासाठी अनेक माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी उत्सफूर्तपणे ‘विद्यादान निधी’देखील दिला.
आपल्या जीवनाला दिशा देणारे शिक्षक, शाळा, संस्था यांच्याबद्दल ऋतज्ञता व्यक्त करत प्रत्येक जण या स्नेहमेळाव्याच्या आठवणी मनात साठवत होता.

 

 

 

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी इ.स. २०२० मध्ये १६० वर्षे पूर्ण करीत आहे आणि त्याचवेळी देशात तरुणांची संख्या सर्वाधिक असेल. या ‘तरुण भारता’ला संस्कारांबरोबरच कौशल्य शिकविण्याची जबाबदारी ‘मएसो’वरच आहे,” असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी ज केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १५८ व्या वर्धापनदिनानिमित्त आज संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे, कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. “आज आपण प्रकाशित केलेल्या संस्थेच्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये बुद्धी, शक्ती आणि युक्तीचा विकास करण्यासाठी संस्था करत असलेल्या विविध उपक्रमांचा संगम दिसून येतो आहे. संस्थेने आता स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळविण्याचा विचार करायला हवा. त्यामुळे संस्थेच्या कार्याचा चांगल्याप्रकारे विस्तार होईल. संस्थेच्या सर्व शाखांच्या विचारांचा आधार हा संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट असले पाहिजे. आपण करीत असलेल्या कामाचे सिंहावलोकन करण्याची ही योग्य वेळ आहे. ‘मएसो’चा परिवार झोकून देऊन काम करीत आहे. त्यामुळे संस्था भविष्यकाळात मोठी वाटचाल करेल. संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेची – MAA- ची वाटचालदेखील जोमाने सुरू आहे. MAA च्या उपक्रमांसाठी ‘क्राऊड फंडिंग’ होणे आवश्यक आहे. विविध माध्यमातून मिळणारा निधी संस्थेकडे जमा झाल्यास त्याचा उपयोग गरज असलेल्या शाखांमद्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी करता येऊ शकेल. संस्थेचे कार्य समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ब्रँड प्रमोशन आणि सोशल मिडियाचा वापर वाढविला पाहिजे,” असेही भूषणजी गोखले म्हणाले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, संस्थेचे माजी सचिव मा. आर.व्ही. कुलकर्णी व प्रा. वि.ना शुक्ल आदी मान्यवर तसेच संस्था कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सरस्वती पूजनानंतर संस्थापकांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सरस्वती वंदना झाल्यानंतर संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “दरवर्षी आपण आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमातून संस्थेच्या कार्याचा वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करीत असतो. भविष्यकाळाच्या दृष्टीने महत्वाची ठरतील अशी तीन प्रकाशने आजच्या कार्यक्रमात आपण करणार आहोत. विविध अभ्यासविषयांची महाविद्यालये सुरु करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्था वृद्धिंगत व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया!” आजच्या कार्यक्रमात संस्थेचे इ.स. २०३०पर्यंतचे व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन मा. गोखले यांच्या हस्ते तर ‘म.ए.सो. २०१८ स्मरणिका’चे प्रकाशन मा. नाईक यांच्या हस्ते आणि संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मराठी भाषेतील माहितीपटाचे मान्यवरांच्या हस्ते सामुहिक प्रकाशन करण्यात आले. आज प्रकाशित झालेल्या या तीनही साहित्याच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या प्राध्यापकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात योगदान देणारे विशेष निमंत्रित गरवारे वाणिज्य महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्राध्यापक शेखर पाठक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. “सन २००८मध्ये गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले होते. त्यावेळचे सहकारी यावेळीही बरोबर असल्याने संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करणे सुकर झाले. महाविद्यालयाच्या व्हिजन डॉक्युमेंटचे स्वरुप तुलनेने मर्यादित होते परंतु संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट व्यापक स्वरुपाचे असल्याने मांडणीच्या दृष्टीने नेमकी निवड करणे आवश्यक होते. त्यासाठी संस्थेचा इतिहास आणि घटना इत्यादींचा विचार करावा लागला, विविध शाखांना भेटी दिल्या. व्हिजन डॉक्युमेंटचा प्रथम आराखडा कसा असावा याबाबत मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी या कामासाठी खूप वेळ तर दिलाच पण त्यांनी केलेल्या मौलिक सूचनांमुळे व्हिजन डॉक्युमेंट आवश्यक उंची गाठू शकले. मा. भूषणजी गोखले यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या. डॉ. आनंद लेले, डॉ. भरत व्हनकटे, डॉ. केतकी मोडक आणि डॉ. संतोष दशपांडे यांचे सहकार्य लाभले. व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो, कारण मी ‘मएसो’ला गुरु मानतो, १९८० साली गरवारे वाणिज्य महाविद्यालयात रुजू झालो तेव्हा मा. चिरमुले आणि गोखले सरांचे मार्गदर्शन मिळाले आणि संस्थेचे काम कसे करायचे हे शिकायला मिळाले. ते ऋण फेडण्याची संधी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या निमित्ताने मला मिळाली.” संस्थेचे माजी सचिव आर. व्ही. कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाले, “१९९० सालपर्यंत २ महाविद्यालये आणि ७ शाखा असा विस्तार असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने १९९० सालपासून वेगाने केलेली प्रगती बघून आनंद वाटतो. संस्थेचे कार्य अशाच गतीने पुढे जात राहील आणि भव्य स्वरुप प्राप्त होईल. या संस्थेशी निगडित असल्याचा आनंद वाटतो. संस्थेला पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा!” मा. राजीव सहस्रबुद्धे आपल्या भाषणात म्हणाले की, “संस्थेच्या नियामक मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना गेल्या तीन वर्षात काही गोष्टी प्रकर्षाने जाणविल्या, त्या म्हणजे सरकार दरबारी आणि प्रसिद्धी माध्यमात संस्थेबाबत फारशी माहिती नाही तसेच विविध शाखांमधील माजी विद्यार्थ्यांनादेखील मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीबद्दल अज्ञान आहे. त्यादृष्टीने विविध उपक्रम, प्रयत्न करण्याची आवश्यकता लक्षात आली. शालेय तसेच महाविद्यालयीन व व्यावसायिक शिक्षणामध्ये समतोल साधण्याची गरज आहे, संस्थेच्या विस्तारात हा समतोल साधण्यात आपण यशस्वी होऊ. यापुढील काळात सरकारवर अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याची गरज आहे. गरजू आणि गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण विद्यादान निधी योजना सुरू केली असून अल्पावधीतच त्याला भरघोस यश मिळाले आहे. २०२० हे वर्ष अतिशय महत्वाचे आहे कारण त्यावर्षी आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची १७५ वी जयंती, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व मएसो मुलांचे विद्यालय (पेरुगेट भावे स्कूल) या शाळेचा शतकोत्तर हीरक महोत्सव व मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा अमृत महोत्सव आहे.” संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीपजी नाईक यांनी आपल्या मनोगतात, अधिकाधिक स्वावलंबी होण्याचे संस्थेचे ध्येय अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले. तर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. वाघमारे यांनी संस्थेच्या वेगवान प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ई-वार्तापत्र आणि स्मरणिकेबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठ लिपीक सुधीर दाते यांनी ‘मएसो’वरील स्वरचित कविता उपस्थितासमोर सादर केली. संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमानंतर म.ए.सो. मुलांचे विद्यालय येथे मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या मल्लखांब व रोलबॉल स्केटिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मा. भूषणजी गोखले आणि मा. प्रदीपजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. खेळाडूंनी यावेळी रोलबॉल स्केटिंगचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यानंतर मा. भूषणजी गोखले यांनी या खेळाडूंशी संवाद साधला.

 

 

 

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘शौर्य’ या साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिराला आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कर्नल दिनार दिघे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र प्रा. सुधीर भोसले, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे उपस्थित होते. “शौर्य शिबिरामुळे स्वावलंबन, संघटन कौशल्य व आत्मविश्वास हे गुण वाढण्यास निश्चितच उपयोग होईल,” असे सांगून पाल्यांना साहसी क्रीडा प्रशिक्षणासाठी पाठवल्याबद्दल कर्नल दिघे यांनी पालकांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांमधून चालणाऱ्या शैक्षणिक कार्याबरोबरच विविध उपक्रमांची माहिती प्रा. आपटे यांनी दिली. ‘मएसो’ येत्या १९ नोव्हेंबर रोजी १५९ व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्याचे निमंत्रण प्रा. भोसले यांनी उपस्थितांना दिले. सैनिकी शाळेतर्फे दि. १२ ते १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ‘शौर्य’ शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये रिव्हर क्रॉसिंग, राफ्टिंग, हॉर्स रायडींग, रायफल शूटिंग, आर्चरी, वॉल क्लायंबिंग इ. साहसी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुटीत ‘शौर्य’ शिबिर आयोजित करण्यात येते. अशा स्वरुपाचे हे ७ वे शिबिर आहे. यावेळच्या शिबिराचे एक वैशिष्टय म्हणजे महाराष्ट्रातील विविध भागांबरोबरच राजस्थानमधील प्रशिक्षणार्थीदेखील त्यात सहभागी झाले आहेत. सैनिकी शाळेची शाला समिती, शौर्य शिबिराची संयोजन समिती व म.ए.सो चे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात येते.

त्रिदल पुणे (पुण्यभूषण फाऊंडेशन) च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘पक्के पुणेकर’ सन्मानाने यावर्षी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा गौरव करण्यात आला. पुण्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात मोलाचे कार्य करून शंभर वर्षे पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून पुणेकरांच्या वतीने ‘मएसो’ला सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाचे सदस्य अॅड. धनंजय खुर्जेकर आणि संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी संस्थेच्या वतीने रमेश शहा (लायन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या या गौरव सोहळ्याला ज्येष्ठ उद्योगपती कृष्णकुमार गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ सतीश देसाई, युवराज शहा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामतीमधील इंग्लिश मिडियम स्कूलचे म.ए.सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडियम स्कूल असे नामकरण माजी केंद्रीय मंत्री आणि मएसोचे माजी विद्यार्थी मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते सोमवार, दि. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार, म.ए.सो.चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. राजीव सहस्त्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, कै. हरिभाऊ देशपांडे यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. अजितराव देशपांडे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व शाला समितीचे अध्यक्ष अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, शाळेचे महामात्र प्रा.गोविंद कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सौ. प्रतिभाताई पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, डॉ. रजनीताई इंदुलकर, म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, शाळा समितीचे सदस्य प्रा. सुधीर भोसले व श्री. बाबासाहेब शिंदे, स्थानिक सल्लागार समितीचे सर्व सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर तसेच सर्व पवार व देशपांडे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मा. शरद पवार म्हणाले की, “ शाळेत उत्तम शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची योजना करण्याबरोबरच शिक्षक व पालक यांच्यातील सुसंवाद ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची परंपरा आहे. बारामतीतील अनेक पिढ्या घडवण्याचे काम संस्था अविरतपणे करत आहे. हरिभाऊ देशपांडे देखील याच मुशीत घडले. शिक्षणाच्या विस्तारासाठी त्यांनी मुक्तहस्ते दानदेखील दिले. बारामतीमधील सामाजिक, शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आपली संपत्ती समाजासाठी देण्याची इच्छा त्यांनी प्रत्यक्षात उतरवून दाखवली. अशा हरिभाऊ देशपांडे यांचे नाव या शाळेला देण्यात आले याचा मला आनंद आहे. म.ए.सो.च्या शाळेत मला देखील उत्तम संस्कार आणि शिस्तीचे धडे मिळाले. मी जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी झालो, याचे श्रेय माझी शाळा व माझी आई यांना आहे. आम्हा तीन भावडांना ‘पद्म’ पुरस्कार मिळाले आहेत. एकाच आईच्या तीन मुलांना आणि ‘मएसो’च्या एकाच शाळेतील तीन माजी विद्यार्थ्यांना ‘पद्म’ पुरस्काराने गौरवण्यात आले याचा अभिमान वाटतो.” कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा समितीचे अध्यक्ष मा. धनंजय खुर्जेकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “वाढती विद्यार्थी संख्या आणि कालानुरुप शिक्षण पद्धती यांचा मेळ घालण्यासाठी शाळेच्या वास्तुचा विस्तार करण्यात आला आहे. स्वावलंबी आणि कौशल्ययुक्त पिढी घडवण्यासाठी शाळेत सातत्याने विविध उपक्रम सुरु असतात. कै. हरिभाऊ देशपांडे यांच्या दातृत्वामुळेच हे शक्य झाले आहे, त्यामुळे त्यांचे ऋण कधीही फेडता येणार नाहीत.” अजित देशपांडे आपल्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, “ देशपांडे कुटुंबीय आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्यातील संबंध घनिष्ट आहेत. शाळेतील गुरुजनांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले त्यामुळेच आम्ही सर्व भावंडे आणि शाळेतील विद्यार्थी घडलो. माझे वडील हरिभाऊंचे वर्णन ‘पाण्या तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा’ असे करता येईल. त्यांना कलाकारांबद्ल अतिशय जिव्हाळा होता. भाऊंच्या सामाजिक कार्यात मा. शरद पवार यांचे सहकार्य असायचे, त्या दोघांचे संबंध अत्यंत स्नेहपूर्ण होते. वडिलांकडून मला आवाजाची देणगी मिळाली, त्यामुळेच मी आकाशवाणी आणि दूरदर्शन सारख्या माध्यमांमध्ये यशस्वी होऊ शकलो.” कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “बारामतीकरांचे म.ए.सो. वर खूप प्रेम आहे, त्यामुळेच येथील संस्थेच्या शाळा प्रगती करत आहेत. हरिभाऊ देशपांडे यांच्या दातृत्वातूनच ही शाळा उभी राहिली आहे. त्यांनी आईची भूमिका पार पाडली आहे, त्यांचे आशीर्वाद शाळेच्या पाठीशी आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना देशाचे सक्षम नागरिक बनवण्याची जबाबदारी आता शाळेवर आहे आणि अशाप्रकारे सक्षम झाल्यावरच शाळेतील विद्यार्थ्यांना मा. हरिभाऊ देशपांडे यांच्या कार्याची महती कळेल. पुढील पिढी घडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.” शाळेचे महामात्र प्रा. गोविंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले. शाळेतील विद्यार्थिनींनी कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘मएसो गीत’ व शेवटी पसायदान सादर केले. 

 

व्हाईस अॅडमिरल मनोहर प्रल्हाद उर्फ एम.पी. आवटी (निवृत्त) यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले. ते आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली!

maharashtratimes.indiatimes.com

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीची साहित्यक्षेत्रात उत्तुंग भरारी

यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत. याचा संस्थेला सार्थ अभिमान असून संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन!

डॉ. ढेरे यांच्या रूपाने संमेलनाध्यक्षपदी पाचव्यांदा महिला विराजमान होत आहे. १९६१ साली ग्वाल्हेर येथील संमेलनाचे अध्यक्षपद कुसुमावती देशपांडे, १९७५ साली कराड येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद दुर्गा भागवत, १९९६ साली आळंदी येथील संमेलनाचे अध्यक्षपद शांता शेळके आणि २००१ साली इंदूर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद विजया राजाध्यक्ष यांनी भुषवले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी यवतमाळ येथे होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिकेची निवड झाली आहे.

हे संमेलन दि. ११ ते १३ जानेवारी २०१९ या कालावधीत होणार आहे. 

अरुणा ढेरे यांचा जन्म दि. २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. तेथेच त्यांचे एम.ए.तसेच पीएच.डी. पर्यंतचे सर्व शिक्षण झाले. त्या पुणे विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट आहेत. इ.स.१९८३ ते ८८ या काळात त्यांनी प्राध्यापिका म्हणून पुणे विद्यापीठात काम केलेले आहे. 

प्राचीन वाङ्मय, लोकसाहित्य तसेच संतसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक कै. डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि हितचिंतकांनी केरळमधील आपत्तीग्रस्तांसाठी जमा केलेला १४ लाख ११ हजार रुपये निधी आज (शुक्रवार, दि. २८ सप्टेंबर २०१८) रा.स्व. संघ जनकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आला. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते हा निधी जनकल्याण समितीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा अँड. अलकाताई पेठकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

या वेळी जनकल्याण समितीचे सहकार्यवाह विनायकराव डंबीर, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी, विनय चाटी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर तसेच पुण्यातील संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापक उपस्थित होते. 

विशेष म्हणजे मयूर कॉलनीतील मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इ. ९ वीत शिकणाऱ्या अनिश सांगवीकर या विद्यार्थ्याने त्याला मिळालेली शिष्यवृत्तीची सर्व रक्कम केरळ आपत्तीग्रस्त निधीसाठी दिली आहे. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने याशिवाय ३.५० लाख रुपयांचा मदतनिधी महाराष्ट्र शासनाकडे जमा केला आहे. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने आत्तापर्यंत विविध प्रसंगी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून अशा प्रकारचा निधी संकलित केला असून जनकल्याण समितीच्या माध्यमातून हा निधी केरळमधील बांधवापर्यंत पोहोचवण्याची संधी संस्थेला मिळाल्याबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आनंद व्यक्त केला. 

केरळमध्ये सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती विनायकराव डंबीर यांनी यावेळी उपस्थितांना दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुधीर गाडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन आंबर्डेकर यांनी केले.

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे रोप मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थिनींनी सादर केलेली नेत्रदीपक प्रात्यक्षिके पहाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. या प्रात्यक्षिकांचे नेतृत्व दिव्या निखाडे, पलक मिठारी, वैष्णवी जोशी या विद्यार्थिनींनी केले. शनिवार पेठेतील मेहुणपुरा मित्रमंडळाच्या केळकर रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुकीत शाळेने सहभाग घेतला होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच रविवार, दि. २३सप्टेंबर २०१८ रोजी दु. ३.३० वाजता ही मिरवणूक निघाली होती. त्यामध्ये शाळेच्या १२ विद्यार्थिनींनी रोप मल्लखांब आणि योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांसाठी एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर आवश्यक रचना उभी करण्यात आली होती. त्याआधारे विद्यार्थिनींनी रोप मल्लखांबाची क्रॉस, पतंगी, गौराई, शवासन, साधी आढी, निद्रासन, वादी, पश्चिमोतासन इत्यादी प्रात्यक्षिके सादर केली. योगासन प्रकारात चक्रासन, वृक्षासन, गरुडासन, नटराजासन आणि एकपादशिरासन अशी अनेक आसने दाद मिळवून गेली. गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रचंड गर्दी आणि ढोल-ताशांचा गजर , डीजेंचा दणदणाट अशा वातावरणात विद्यार्थिनींची एकाग्रता, आत्मविश्वास आणि लवचिकता सर्वांनाच अचंबित करणारी होती. विद्यार्थिनींची प्रात्यक्षिके पाहून मुख्य चौकामध्ये उपस्थित असलेल्या पुण्याच्या पोलीस उपायुक्त श्रीमती भानुप्रिया सिंग (आयपीएस अधिकारी) यांनी व्यासपीठावर बोलावून फूल देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले आणि आस्थेने विचारपूस करून शाळेला आवर्जून भेट देण्याचे आश्वासन दिले. 

पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत प्रात्याक्षिकांचे सादरीकरण व्हावे ही संकल्पना प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे यांनी मांडली. त्यानुसार लागणाऱ्या साहित्याची जमवाजमाव व सराव करण्यात आला. अफाट जनसमुदायासमोर जाताना विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि चालत्या ट्रॅक्टरवर उभारण्यात आलेल्या रचनेवर करावे लागणारे सादरीकरण ही आव्हाने समोर होतीच, परंतु विद्यार्थिनींचा आत्मविश्वास आणि सर्व टीमचा पाठिंबा यामुळे ही सर्व आव्हाने लीलया पेलता आली. प्रशालेच्या दोनही महामात्र डॉ. मानसी भाटे आणि श्रीमती चित्रा नगरकर यांनी दिलेली प्रत्यक्ष भेट टीमचा उत्साह वाढविणारी ठरली. 

या प्रात्यक्षिकांसाठी प्रशालेचे कमांडट कर्नल सारंग काशीकर (निवृत्त), उपप्राचार्य अनंत कुलकर्णी यांनी बहुमोल योगदान दिले. तसेच प्राचार्या श्रीमती पूजा जोग, शाम नांगरे, संदीप पवार, गुणेश पुरंदरे, माळी सर, थोरात सर, जगदाळे सर, अद्वैत जगधने, श्रीमती महाले यांचाही सक्रिय सहभाग होता.

 

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव सहस्रबुद्धे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नियामक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. माधव भट यांची तसेच संस्थेचे सचिव म्हणून डॉ. भरत व्हनकटे यांची आणि सहाय्यक सचिव म्हणून श्री. सुधीर गाडे यांची निवड करण्यात आली. आज (दि. १९ सप्टेंबर) झालेल्या संस्थेच्या नियामक मंडळाच्या सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. 

संस्थेची वार्षिक साधारण सभा शनिवार, दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी झाली. या सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. यशवंत वाघमारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच श्री. प्रदीप नाईक यांची नव्याने उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याशिवाय संस्थेच्या नवीन नियामक मंडळामध्ये सर्वश्री राजीव सहस्रबुद्धे, अभय क्षीरसागर, डॉ. माधव भट, डॉ. माधवी मेहेंदळे, आनंद कुलकर्णी, देवदत्त भिशीकर, सौ. आनंदी पाटील, धनंजय खुर्जेकर व विजय भालेराव यांची निवड करण्यात आली. 

२०१८ ते २०२३ या कालावधीसाठी या सर्वांची निवड करण्यात आली आहे.

पर्यावरण रक्षणाच्या हेतूने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कर्वे रस्त्यावरील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या इमारतीवर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जेवर आधारित १५.६० किलोवॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवार, दि. ११ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे महानगर पालिकेचे शहर अभियंत मा. प्रशांत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महापालिकेच्या पथदिवे विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधव भट, डॉ. केतकी मोडक, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. पी.बी. बुचडे, डॉ. अंकूर पटवर्धन, चित्रा नगरकर, डॉ. मानसी भाटे, सुधीर भोसले, गोविंद कुलकर्णी, विनय चाटी, सुधीर गाडे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, सहायक सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

गरवारे महाविद्यालयाच्या आवारातील पाच इमारतींसाठी सौरऊर्जेवर आधारित एकूण ९६.१५ किलोवॅट क्षमतेचे ५ वेगवेगळे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. 

कोथरूडमधील मयूर कॉलनीतील ‘मएसो’ बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सुमारे २० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या ५० किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवार, दि. ६ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे विभागाचे धर्मादाय सह-आय़ुक्त दिलीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

संस्थेच्या चार आवारांमध्ये उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे एकूण २४२.९८ किलोवॅट वीजेची निर्मिती करणार आहे. त्यासाठी एकूण १ कोटी ८७ हजार ७७६ रुपये खर्च येणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे १५ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. संस्थेची वीजेची गरज भागवून अतिरिक्त वीज ‘नेट मीटरींग’च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला विकण्यात येणार आहे. 

खासगी कंपन्यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांना भारतीय सौरऊर्जा महामंडळ मर्यादित (SECI) या संस्थेकडून ३० टक्के अनुदान (Subsidy) मिळाले आहे. तसेच मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील एक प्रकल्प, आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील असेंब्ली हॉल आणि मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसमधील प्रकल्पाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अनुदान (Grant) मिळाले आहे

म.ए.सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत अतिशय उत्साहात आणि देशभक्तीने  भारलेल्या वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण ९३.५ बीग एफएम या खासगी वाहिनीने केले. त्याचा आनंद आपणही घेऊया…

 

“व्यक्तीकडे ज्ञान असेल तर भौतिक सुखे सहज उपलब्ध होऊ शकतात पण ज्ञानाशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही. व्यक्तीकडे असलेले ज्ञान कोणीही चोरू शकत नाही, त्यामुळे ज्ञान हेच सर्वात श्रेष्ठ धन आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी त्यांना मिळालेल्या यशाबाबत समाधानी न राहता अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हावा यासाठी त्यांचे शोधनिबंध पुस्तक रुपाने प्रकाशित झाले पाहिजेत,” असे प्रतिपादन पुणे विभागाचे धर्मादाय सह-आय़ुक्त दिलीप देशमुख यांनी आज येथे केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील विविध शाळा-महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गुणवंत शिक्षक आणि प्राध्यापक यांचा गौरव समारंभ आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

मयूर कॉलनीतील म.ए.सो. सभागृहात झालेल्या या समारंभापूर्वी ‘मएसो’ बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सुमारे २० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सौरऊर्जेवर आधारित ५० किलोवॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 

राज्यातील विविध विद्यापीठांनी घेतलेल्या परिक्षांमध्ये ‘मएसो’च्या शाळा-महाविद्यालयातून विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले ४० आणि पीएच. डी. प्राप्त केलेले १८ विद्यार्थी-विद्यार्थिनी, एम.फील्. पूर्ण केलेले २ सहाय्यक शिक्षक तसेच पीएच. डी. प्राप्त केलेले ९ प्राध्यापक अशा ६९ गुणवंतांचा गौरव या समारंभात करण्यात आला. 

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष विवेक शिंदे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), पुणे विभागाचे धर्मादाय सह-आय़ुक्त दिलीप देशमुख, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, आणि सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.

गुणगौरव समारंभाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी केले. 

मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र, पुस्तक आणि स्मृतिचिन्ह भेट देऊन गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गुणवंत शिक्षक आणि प्राध्यापक यांचा गौरव करण्यात आला. गुणवंतांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात साची ओसवाल या विद्यार्थिनीने इंग्रजी कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या तर पदवी शिक्षणानंतर २३ वर्षांच्या खंडानंतर PGDBM हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रज्ञा भागवत यांनी कुटुंबाबरोबरच महाविद्यालयाकडून मिळालेल्या पाठिंब्याबाबत ऋतज्ञता व्यक्त केली. 

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “यश मिळणे हा जीवनाच्या प्रवासातील एक टप्पा आहे ते ध्येय नाही हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळा-महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण आणि संस्कार केले जातात, संस्कृती जपली जाते, शिक्षणाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले जात नाही. त्यामुळेच आकाशाला गवसणी कशी घालावी हे मएसोच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कॅमेरातून आपली छबी टिपण्यापेक्षा आपली प्रतिमा निर्माण करा, त्यामुळे ‘मएसो’ने तुम्हाला काय दिले आहे हे जगाला कळेल. सामाजिक जाणीवेतूनच संस्थेने सौर उर्जेवर आधारित वीज प्रकल्प उभारला आहे, त्याचे आज उद्धाटन झाले आणि असे आणखी चार प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. जागतिक तापमान वाढीसारख्या जागतिक समस्यांवर संस्थेने केलेला हा एक छोटासा पण महत्वपूर्ण उपाय आहे.”

संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील प्रा. रसिका रहाळकर यांनी केले.

 

AGC-Nandu-Marathe-Sri-Spardha-1st-Sep-2018

आपल्या संस्थेच्या पौड रस्त्यावरील सरस्वती निवास वसतिगृहातील सभागृहाचे आज कै. चिंतामण विष्णू कुलकर्णी व कै. सरस्वती चिंतामण कुलकर्णी यांच्या स्मृत्यर्थ ‘स्वरमणी सभागृह’ असे नामकरण करण्यात आले. संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. 

या प्रसंगी कै. चिंतामण विष्णू कुलकर्णी व कै. सरस्वती चिंतामण कुलकर्णी यांच्या कन्या सौ. वीणा दिवाणजी, सौ. दीपा पानसे, सौ. अनघा राहतेकर आणि त्यांचे कुटुंबिय तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधव भट, मा. अभय क्षीरसागर, मा. आनंद कुलकर्णी व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य मा. सुधीर भोसले, डॉ. अतुल कुलकर्णी आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कै. श्री. व सौ. कुलकर्णी तसेच ‘मएसो’च्या संस्थापक त्रयीच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी इ. ५ वी व इ. ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत लक्षणीय यश मिळविले. त्याची दखल दै. महाराष्ट्र टाईम्सने आजच्या अंकात घेतली आहे.