सावधानता आणि प्रतिबंधात्मक योजना हेच दोन उपाय

पुणे, दि. २७ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावधानता आणि प्रतिबंधात्मक योजना हेच दोन उपाय आहेत. सूर्यप्रकाशात कोरोनाचा विषाणू थोडा क्षीण होतो. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे सकाळी फिरायला जाणे शक्य नाही. त्यामुळे ‘डी’ जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्याची गरज आहे. कोरोना बंदिस्त वातावरणात सहजपणे पसरतो, पण जिथे खेळती हवा आहे अशा ठिकाणी त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत नाही. चंडीगडसारख्या शहरांमध्ये हे दिसून आले आहे. प्रत्येकाने हलकासा किंवा झेपेल इतका व्यायाम केला पाहिजे कारण त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याचा फायदा होत असल्याचे सिद्ध झाले आहे. प्राणायामाबरोबरच विशिष्ट पद्धतीने केलेली जलनेती असे उपाय आपण सहजपणे करु शकतो असे प्रतिपादन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी आज केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांनी आयोजित केलेल्या ‘विनिंग स्ट्रॅटेजिज इन कोविड वॉर’ या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात डॉ. केळकर बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले(निवृत्त), मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट हे सहभागी झाले होते. ‘मएसो’ च्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर बुकलेट’चे प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील (पूर्वीचे जिमखाना भावे स्कूल) इतिहास विषयाचे निवृत्त शिक्षक ना.वा. अत्रे यांचे कालच निधन झाले. त्यांना कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली.

डॉ. केळकर आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, कोरोना हा अतिशय सूक्ष्म विषाणू असल्याने तो दिसत नाही. त्याच्या प्रसारचा अंदाज बांधता येत नसल्याने तो रोखता येत नाही. डोळे, नाक आणि तोंडातूनच कोरोनाचा शरीरात प्रवेश होतो. शरीरात गेल्यावर त्याच्या अनेक प्रतिकृती निर्माण होतात आणि धोका निर्माण होते. त्यामुळे तोंडावर मास्क लावणे अनिमार्य आहे. सुती कापडाचा मास्क वापरणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. सर्जिकल मास्क किंवा एन ९५ मास्क वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे.

कोरोनाच्या प्रसाराचा केंद्रबिंदू सातत्याने बदलत आहे. सुरवातीला तो चीनमधील वुहान हे शहर होते. इटली या देशातील मिलान या शहरांचे शहरात मोठ्या प्रमाणात वुहानमधील नागरिक राहात असल्याने कोरोनाचा केंद्रबिंदू मिलान शहर झाले. त्यानंतर इटली- अमेरिका-इंग्लंड असा त्याचा प्रसार झाला. गेल्या मार्च महिन्यात संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीची जाणीव झाली. त्यानंतर कोरोना महामारी ब्राझिल या देशात पोहोचली आणि आता भारतात फार मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण समोर येत असल्याचे आपण अनुभवत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक देशाने परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या क्षमतेप्रमाणे रणनीती आखली. त्यामुळे प्रत्येक देशात कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली स्थिती वेगवेगळी आहे. आपल्या देशातील नागरिकांमध्ये असलेला शिक्षण आणि शिस्तीचा अभाव लक्षात घेता भारताने स्वीकारलेला लॉकडाऊनचा मार्ग अतिशय चपखल ठरला. या काळात आपण देशातील आरोग्य यंत्रणेत मोठी सुधारणा करु शकलो. कोरोनाच्या विषाणूबाबत अद्याप जगाला संपूर्ण आणि नेमके ज्ञान मिळालेले नाही. त्यामुळे त्यावरचा नेमका उपायदेखील अद्याप मिळू शकलेला नाही.

डॉ. केळकर यांनी यावेळी जिज्ञासूंनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन देखील केले.

डॉ. माधव भट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि वक्त्यांचा परिचय करून दिला.