चैतन्य जागवत साजरा झाला ‘युवा चेतना दिन’

कोणत्याही साधनांशिवाय केलेले सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार, संगीताच्या तालावर केलेल्या सामुहिक कृतींमधून नजरेत भरणारी लयबद्धता, परस्पर समन्वय आणि सांघिक भावनेचे होणारे दर्शन, गंभीर मंत्रोच्चारासह घातलेले सूर्यनमस्कार आणि केलेली योगासने, सळसळत्या वयाला साद घालणाऱ्या उडत्या लयीच्या गाण्यांवरील एरोबिक्सची, संयम आणि सांघिकतेची जाणीव करून देणारे मनोरे, एरोबिक्स पॉम्पॉमवर थिरकणारी अल्लड पावले, ढोल-ताशाच्या तालावर खेळली गेलेली लेझीम अन् झांजा आणि शिवकन्यांचा जोशपूर्ण अविष्कार दाखविणारी शिववंदना बघून उपस्थितांची मने भारावून गेली होती, मनात नवी पिढी आणि भविष्यातील भारताबद्दलचा अभिमान भरून पावला होता. निमित्त होते, ‘युवा चेतना दिन’कार्यक्रमाचे!
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध क्रीडा प्रात्यक्षिके बघून सर्वचजण भारावून गेले.
म.ए.सो. तर्फे दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘युवा चेतना दिन’ साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या कार्यक्रमाला म.ए.सो.च्या माजी विद्यार्थिनी व आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू स्नेहल शिंदे – साखरे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीपजी नाईक हे होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे सदस्य व म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव आणि संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
म. ए. सो. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (दि. १२ जानेवारी २०२४) हा कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्नेहल शिंदे – साखरे म्हणाल्या, “शालेय वयातच आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रयत्न सुरू करा. सातत्याने प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळते, कठोर परिश्रमांना पर्याय नसतो, अपयश आले तरी पाठ न फिरवता मेहनत केली तर त्याचे फळ मिळतेच. मला करावा लागलेला संघर्ष आणि मिळालेले यश यांची किंमत मला खेळामुळेच समजली. सोशल मिडियात अडकून पडलात तर आपले अनमोल जीवन व्यर्थ जाईल आणि विकतचे दुखणे मागे लागेल.”
आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. प्रदीप नाईक म्हणाले की, आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद या दोघांची जयंती आहे. संकल्पाची शक्ती या दोघांच्या जीवन चरित्रातून आपल्याला कळते. या दोघांचे जीवन सर्वांसाठी आदर्श आहे. त्याआधारे समाजजीवनात चेतना निर्माण केली पाहिजे.
ज्ञानोपासना आणि बलोपासना यांची आवश्यकता लक्षात घेऊन म.ए.सो. युवा चेतना दिन साजरा करत आली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि व्यायाम या दोन्ही गोष्टींना जीवनात महत्त्व द्यावे,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. विजय भालेराव यांनी केले. ते म्हणाले की, राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांप्रमाणे अनेक वीर घडवले, त्यांना सशक्त बनवले, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण केली. स्वामी विवेकानंदांनी स्तासमुद्रापार आपला देश आणि आपली संस्कृती यांचा झेंडा फडकावला अशा कर्त्वृत्ववान महापुरुषांच्या देशात आपला जन्म झाला आहे त्यामुळे आपण भाग्यवान आहोत. हेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेली १६३ वर्ष कार्य करणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आपण घटक आहोत. खेळाच्या माध्यमातून व्यायामाची आवड निर्माण व्हावी तसेच सशक्त आणि धैर्यवान विद्यार्थी घडावेत यासाठी म.ए.सो. क्रीडावर्धिनीची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसज्ज क्रीडांगण, खेळांची साधने आणि प्रशिक्षणांची व्यवस्था करण्यात आली आहे. पारंपारिक तसेच आधुनिक क्रीडा प्रकारातील उत्तम खेळाडू घडावेत यासाठी क्रीडा शिक्षकांप्रमाणेच क्रीडा तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मएसो क्रीडा करंडक स्पर्धा, शाळा व महाविद्यालयांमध्ये ओपन जिमची उभारणी असे विविध उपक्रम म.ए.सो. क्रीडावर्धिनी राबवत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नेहा कुलकर्णी यांनी तर प्रात्यक्षिकांचे सूत्रसंचालन सौ. अर्चना लडकत यांनी केले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.