Month: March 2023

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे
सादर करत आहे

कथामाला

सादरकर्ते : म. ए.सो.भावे प्राथमिक शाळा, पुणे

🪔🪔🪔🪔🪔🪔

📣कथा- नवनिर्मिती विज्ञानक्षेत्रातील डॉ.महेंद्रलाल सरकार यांचे योगदान

🖌️लेखन-जयंत सहस्त्रबुद्धे

🎤वाचक स्वर- रेणुका महाजन

लष्करी वेशात शिस्तबद्ध संचलन करत मान्यवरांना दिलेली मानवंदना, रिदम योगाद्वारे झालेले एकाग्रतेचे दर्शन, कराटे आणि अश्वारोहणातून दिसलेले धाडस, धनुर्विद्या आणि रायफल शूटिंगमुळे दिसून आलेली अचूकता, रोप मल्लखांबामुळे साधलेली लवचिकता, लेझमीच्या खेळातून साधलेली सांघिक भावना, मार्शल आर्टसच्या प्रशिक्षणातून झालेली स्वसंरक्षणाची तयारी बघून अचंबित झालेले प्रेक्षक असे दृश्य आज बघायला मिळाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिना’च्या कार्यक्रमात. विद्या आणि बळाच्या आधारे आपण जग जिंकू शकतो, जगात वंदनीय ठरू शकतो हा संदेशच मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या साहसी प्रात्यक्षिकांमधून या वेळी दिला आणि स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला समर्थ भारत निर्माण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हे दाखवून दिले.
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या विविध शाखांमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करतात. यावर्षी मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचीच मने जिंकली.
मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी २०२३) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक हे होते. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर या प्रमुख अतिथी म्हणून तर समर्थ भारत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुहास क्षीरसागर या वेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. संस्थेचे मा. उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे सर्व निर्बंधांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत व बंदिस्त जागेत मैदानी प्रात्यक्षिकांशिवाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांसह अतिशय उत्साहात पार पडला.
प्रमुख वक्ते श्री. सुहास क्षीरसागर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या कार्याची महती विशद केली. ते म्हणाले की, महापुरूषांचे आयुष्य दीपस्तंभासारखे असते. एखाद्या विचाराचा ध्यास घेणे म्हणजे काय हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून शिकायला मिळते. भारतीय जीवन पद्धती ही वेदांतावर आधारित आहे हे त्यांनी जगाला सांगितले. त्याग हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे, आपली संपत्ती इतरांना उपयोगी पडली तरच जीवनात सुख आणि शांतता लाभू शकते, स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विचार करण्याची शिकवण भारतीय संस्कृती देते, हे स्वामीजींनी जगाला पटवून दिले. आपल्या देशातील जनता स्वत्व विसरली आहे, भारताची जगभर कुचेष्टा सुरू आहे, त्यामुळे आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी स्वामीजींनी देशभर प्रवास केला. मन, बुद्धी आणि मनगट बळकट असेल तरच जग जिंकता येते हे त्यांनी समजावून सांगितले. आजच्या पिढीने देखील आपल्या क्षमता ओळखण्याची गरज आहे कारण तीच यशाची गुरुकिल्ली आहे.
श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर विद्यार्थ्यांना मर्गदर्शन करताना म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले कुटूंब, गुरूजन आणि शाळा-महाविद्यालय यांचा पाठिंबा असणे अनिवार्य असते. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मला टेबल टेनिस खेळाच्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता आले. त्याचबरोबर खेळामुळे मला काही महत्वाचे गुण शिकायला मिळाले ते म्हणजे ध्येय निश्चिती, सांघिक भावना, कठोर परिश्रम आणि अपयश पचवण्याची क्षमता. त्यामुळे सातत्याने कठोर परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी युवा चेतना दिनाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. तर श्री. विजय भालेराव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
या वेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांचा परिचय प्रा. शैलेश आपटे यांनी करून दिला.
मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतील शिक्षिका श्रीमती शिरीषा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

ज्ञानाची निर्मिती, त्याची जपणूक, हस्तांतर आणि संपत्तीची निर्मिती ही उच्च शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे आहेत. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी या ज्ञानप्रकियेत योगदान देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समाजातील जीवनमूल्ये देखील महत्वाची ठरतात, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरू मा. डॉ. संजीव सोनावणे यांनी आज (सोमवार, दि. २० मार्च २०२३) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला समृद्ध शैक्षणिक परंपरा आहे. संस्थेने भविष्यात विद्यापीठ स्थापन केले तर ही संस्था शिक्षणाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयांतील पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि पीएच.डी. व एम.फिल. प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांच्या गौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनावणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष श्रीमती आनंदीताई पाटील आणि श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ७० गुणवंतांचा गौरव करण्यात आला.

डॉ. सोनावणे पुढे म्हणाले की, “जास्तीत जास्त शिक्षण घेणे आणि पदवी प्राप्त करणे ही व्यक्तिमत्व विकासाची साधने आहेत. उच्च शिक्षणातून ज्ञाननिर्मिती होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्ञानाची निर्मिती होत नसलेल्या शिक्षण संस्थांना उच्च शिक्षण संस्था म्हणायचे का? असा विचार करावा लागतो. ज्ञान जपून ठेवण्याची, त्याची साठवणूक करण्याची साधने काळाप्रमाणे ठरतात. प्राचीन काळी मौखिक स्वरुपात ज्ञान साठवले जात होते, नंतरच्या काळात ते मुद्रित स्वरुपात साठवले जाऊ लागले. तंत्र बदलत गेली परंतू ज्ञानाची साठवणूक होत राहिली आणि ते पुढील पिढीला उपलब्ध होत राहिले. शिकवण्याची प्रक्रिया देखील तितकीच महत्वाची आहे. सध्याच्या काळात अनेक साधने आणि माध्यमे उपलब्ध आहेत, त्यामुळे महाविद्यालयातील वर्ग हाच फक्त शिकण्याचे केंद्र राहिलेला नाही. विविध माध्यमातून मिळालेल्या या ज्ञानातून संपत्तीची निर्मिती झाली पाहिजे. आपण समाजाचे  देणे लागतो, त्यामुळे उच्च शिक्षणात गुणवत्ता प्राप्त केलेल्या आपल्या विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत नेमके कोणते योगदान दिले हे उच्च शिक्षण संस्थांनी जाणून घेतले पाहिजे. ज्ञान मिळवणे जितके महत्वाचे आहे तितकेच आपले वर्तनदेखील महत्वाचे असते, आपली जीवनमूल्ये काय आहेत यावर आपले वर्तन अवलंबून असते. त्याकडे देखील सजगपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.”

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांनी जे कष्ट घेतले, ते सार्थकी लागल्याने आजचा हा क्षण अनुभवाला येत आहे. राष्ट्रीय स्तरावर आणि सामाजिक क्षेत्रात सर्वत्र महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आजचे गुणवंत हेच संस्थेच्या भविष्यातील विद्यापीठाचे आधार ठरणार आहेत. आपला देश प्रगती करतो आहे, आत्मनिर्भरतेकडे देशाची वाटचाल सुरू आहे. त्यात संस्थेच्या गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचे योगदान अपेक्षित आहे.

डॉ. सुनीता भागवत यांनी गुणवंतांचा परिचय करून दिला.

गौरवप्राप्त गुणवंतांच्या वतीने डॉ. अजिंक्य देशपांडे, मनिषा तगारे आणि डॉ. शुभंकर पाल यांनी मनोगत व्यक्त केले.

संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलेल्या प्रस्ताविकात संस्थेच्या १६२ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच संस्थेचे विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. वर्षा तोडमल यांनी केले.

डॉ. भरत व्हनकटे यांनी आभारप्रदर्शन केले.

मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता शाळेच्या शताद्बी पूर्तीनिमित्त आयोजन

चावडीवर दोघा भावांचा तंटा सोडवणारे पंच, गावाला जागे करणारे ‘वासुदेव’, विहीर व हातपंपावर पाणी भरणाऱ्या महिला, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, बारा बलुतेदार, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा अन् बैलगाडी हे सारे अवतरले ‘बाशिम’ गावात!

ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारे हे ‘बाशिम’ गाव डेक्कन जिमखाना परिसरात भांडारकर रस्त्यावरील मएसो बाल शिक्षण मंदिरच्या प्रांगणात साकारण्यात आले आहे. शिशुनिकेतन व चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे.

मराठी भाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेच्या शताब्दी पूर्ती वर्षानिमित्त हे गाव साकारण्यात आले असून दि. २७ आणि २८ फेब्रुवारी २०२३ असे दोन सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन बघता येणार आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, प्रसिद्ध गायिका आसावरी गाडगीळ यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या ‘बाशिम’ गावातील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, पाटलांचा वाडा, कौलारू घरे, मंदिरे, चावडी, शेती व त्यासाठी अवजारे, बाजारहाट, जत्रा, बैलगाडी, गोठा, न्हावी-सुतार-कुंभार-लोहार यासारखे बारा बलुतेदारी करणारे ग्राम व्यवसाय, विविध प्रकारचा रानमेवा आहे. गावातील भजन-कीर्तन, पालखी सोहळा, लोककला व संस्कृती यांचे सादरीकरण लक्षवेधी आहे. बैलगाडीची मनसोक्त रपेट मारून झाल्यावर लहानग्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य आणि त्यांना होणारा आनंद आपल्या ग्रामीण संस्कृतीचे महत्व अधोरेखित करणारे होते.

‘बाशिम’ गाव या उपक्रमाबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता चव्हाण म्हणाल्या, “शाळेने १०१ व्या वर्षात पदार्पण केले असून, त्यानिमित्ताने वर्षभर मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्याचे एकत्रित सादरीकरण या दोन दिवसात झाले आहे. दुरून दिसणारे आणि गावाच्या अंतरंगात काय काय सामावले आहे, याचे दर्शन यातून घडते. मुलांना गाव, तेथील संस्कृती, रचना, विविध घटक यासह रानमेव्याची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमात इ. १ ली ते ४ थी या वर्गातील सर्व मुले, त्यांचे शिक्षक व पालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.”