Month: February 2023

श्री श्री रविशंकर प्रणित आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि पुण्यातील अन्य शिक्षण संस्था तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ, राष्ट्रीय मनुष्यबळ विकास नेटवर्क (पुणे) व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने शनिवार, दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यात ‘एड्यू यूथ मीट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कोथरूडमधील सूर्यकांत काकडे मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या छात्रांनी आणि लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या विशेष घोष पथकाने गुरूदेव श्री श्री रविशंकर यांना मानवंदना दिली. श्री श्री रविशंकर यांनी या मुलींचे कौतुक केले.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष मा. डॉ. विनय सहस्रबुद्धे, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद अर्थात ‘नॅक’चे अध्यक्ष मा. डॉ. भूषण पटवर्धन, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे तसेच विविध शिक्षण संस्थांच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची उंची वाढवली.

गुरूदेव श्री श्री रविशंकर यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या १ लाख ५० हजार युवक, शिक्षक आणि शिक्षण संस्थांचे चालक यांना  मानवी मूल्यांची जोपासना आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीचा संकल्प करण्याची शपथ दिली.

एवढ्या प्रचंड संख्येने झालेला देशाच्या इतिहासातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याने लंडन, आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद झाली.

नवीन शैक्षणिक धोरणाबरोबरच आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध कोर्सेस सुरू करण्यासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि अन्य शिक्षण संस्थांशी या वेळी सहमतीचा करार करण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्वयंसेवकांसह एक हजारपेक्षा अधिक विद्यार्थी प्रतिनिधी आणि त्यांच्या गटातील शेकडो सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे यश उंचावण्यासाठी अथक परिश्रम केले.

‘एड्यू यूथ मीट’ या कार्यक्रमातील गुरूदेव श्री श्री रविशंकर यांची उपस्थिती आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सकारात्मकतेचा अनुभव आला व मानवी मूल्यांची जोपासना आणि व्यसनमुक्त भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणा मिळाली अशी प्रतिक्रिया शेकडो विद्यार्थी आणि सहभागी झालेल्या मान्यवरांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केली.

विद्यार्थ्यांचा विकास आणि प्रगती या दिशेने टाकलेले हे एक लहानसे पाऊल असून देशभरातील शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन ‘एड्यू यूथ मीट’चे आयोजन करावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान’ देताना एस. गुरुमूर्ती. यावेळी व्यासपीठावर (डावीकडून) इंजि. सुधीर गाडे, सौ. आनंदी पाटील, आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), प्रदीप नाईक आणि बाबासाहेब शिंदे.

पुणे, दि. १७ : “ शिक्षण संस्थांनी क्रमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना भारतीय जीवनमूल्ये शिकवण्याची आवश्यकता आहे, भारत म्हणजे काय? हे विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे. भारताकडून जगाला अपेक्षा असताना जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीयतेबाबत विचार केला जात नाही ही परिस्थिती चिंताजनक आहे,” असे प्रतिपादन चेन्नईस्थित ज्येष्ठ विचारवंत, अर्थतज्ञ व सीए एस. गुरूमूर्ती यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १४२ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान’ या उपक्रमाचा शुभारंभ एस. गुरूमूर्ती यांच्या व्याख्यानाने आज (शुक्रवार, दि. १७ फेब्रुवारी २०२३) झाला. ‘भारत विश्वगुरू होण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.
कोथरूडमधील मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरीयम झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते तर संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील आणि बाबासाहेब शिंदे, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
“आज जगाने भारतावर प्रभाव टाकावा की, भारताने जगावर जगावर प्रभाव टाकावा हा चर्चेचा मुद्दा राहिला नसून भारताने भारताच्या पद्धतीने जगाला प्रभावित केले पाहिजे. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना केवळ जगातील अन्य देश, तेथील समाज या पुरती मर्यादित नाही तर पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांचा विचार त्यामध्ये आहे. पर्यावरणीय दृष्टीकोनातून ही संकल्पना अतिशय महत्वाची आहे. ती जगावर थोपवण्यासाठीची व्यवस्था नाही तर जगाने समजून घेऊन स्वीकारण्यासारखी जीवन पद्धती आहे. आपल्या देशातील सांस्कृतिक विविधता ही जगाला स्तिमीत करून टाकणारी आहे. संपूर्ण जगभरात जेवढी सांस्कृतिक विविधता आहे तेवढी सांस्कृतिक विविधता आपल्या एकाच देशात आहे. या विविधतेत परस्परांबद्दल असलेला आदरभाव समजून घ्यायला हवा, हेच आपल्या देशाचे सामाजिक भांडवल आहे. राष्ट्र निर्माण होतात आणि लयाला जातात. पण भारताचा पाया हा राजकीय, आर्थिक, सामरिक नसून सांस्कृतिक आहे, त्यामुळेच आपला देश चीरकाल टिकून आहे. देशाची ही संस्कृती आपल्या शिक्षण संस्थांमधून शिकवली जाण्याची गरज आहे. देशातील समाजाच्या मनात आज अनुभवास येणारा आत्मविश्वास हे केवळ सरकारचे कर्तृत्व नाही तर समाजाच्या मनातील राष्ट्रप्रेमाचा तो अविष्कार आहे. रामजन्मभूमीच्या सांस्कृतिक आंदोलनामुळे आपल्या समाजात आत्मभान निर्माण झाले, त्यातून हा आत्मविश्वास उदयाला आला. त्याचा प्रत्यय आज सर्वत्र येतो आहे. बँकिंग व्यवस्थेतील सुधारणा, ३७० कलम रद्द करणे, राष्ट्रविरोधी शक्तींच्या विरोधातील कारवाई अशा निर्णयांना समाजाचा मिळालेला पाठिंबा हे बदललेल्या जनमानसाचे प्रतिबिंब आहे. सीमेवर सातत्याने कागाळ्या करणाऱ्या चीनला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्यानंतर संघर्षाची भूमिका सोडून चीनने केलेल्या चर्चेच्या विनंतीमुळे भारताबद्दल जगभरात एक सशक्त संदेश गेला. आपल्या देशाच्या हितासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय भारत घेत आहे. जगातील प्रत्येक प्रभावी देशाशी आपले मजबूत संबंध निर्माण झाले आहेत, हे चित्र दहा वर्षांपूर्वी नव्हते. आज जग भारताकडे मोठ्या अपेक्षेने बघत असताना अमेरिका, रशिया यासारख्या बलाढ्य देशांना पर्याय असलेला भारत आपल्याला घडवायचा नसून जगाने अनुकरण करावे असा संपूर्ण सृष्टीचा विचार करणारा आदर्श भारत निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे,” असे गुरुमूर्ती या वेळी म्हणाले.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पाश्चिमात्य देशांकडून हेतूपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या मतप्रवाहाकडे लक्ष वेधले. माध्यमांमधून नकारात्मकता मांडली जात असताना विद्यार्थ्यांसमोर सकारात्मक गोष्टी आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातील आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले.
इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

‘मएसो’चे उपाध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांची श्रद्धांजली

पुणे, दि. ३१ : हाडाचे शिक्षक असलेल्या, शिक्षण आणि विद्यार्थ्यांबद्दल प्रचंड आत्मीयता असलेल्या, आपल्या मार्गदर्शनाने अनेकांना यशाचा मार्ग दाखवणाऱ्या एका ज्ञान तपस्व्याला आपण मुकलो आहोत अशी भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज (मंगळवार, दि. ३१ जानेवारी २०२३) डॉ. यशवंत वाघमारे यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे यांचे शुक्रवार, दि. २७ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंड अँड करियर कोर्सेस (आयएमसीसी) मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत), उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, डॉ. वाघमारे यांची पत्नी श्रीमती अंजली व कन्या श्रीमती ऋता वाघमारे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. वाघमारे यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी तसेच शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, मएसोचे आजी-माजी पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत) या प्रसंगी म्हणाले की, डॉ. वाघमारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या परिवारातील एक महत्वाचा दुवा निखळला आहे. प्रत्येकाला प्रोत्साहित करणारे, बहुआयामी, मनमिळावू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. डॉ. वाघमारे यांनी असंख्य विद्यार्थी घडवले. त्यामुळेच संस्थेच्या महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञान विषयक विविध परिषदांसाठी अनेक तज्ञांना निमंत्रित करता आले. क्वांटम फिजिक्स सारख्या विषयातील तत्वज्ञान ते सांगत असत. त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मकता होती आणि जीवनाच्या सर्वच क्षेत्रात त्यांना रुची होती.

श्रीमती ऋता वाघमारे आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाल्या की, ते अतिशय सहृदयी आणि सहनशील होते. त्यांच्याबरोबर फिरायला जाणे, खरेदी करणे, बॅडमिंटन-पत्ते खेळणे, बाहेर खाणे हे सर्व काही आनंददायी असे. शिक्षण, ज्ञान हा त्यांचा ध्यास होता त्यांनी कोणतीच गोष्ट आर्थिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केली नाही. ते कायमच सकारात्मक होते. अंधाराला दोष न देता प्रकाश निर्माण केला पाहिजे अशी त्यांची शिकवण होती.

श्रीमती ऋता वाघमारे यांनी आपली कन्या उमा हिने आजोबांना वाहिलेली श्रद्धांजली यावेळी वाचून दाखवली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर याप्रसंगी बोलताना म्हणाले की, ‘मएसो’च्या निमित्ताने १२-१३ वर्षांच्या सहप्रवासात डॉ. वाघमारे संस्थेच्या वाटचालीबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त करत आणि त्याचे श्रेय ते आम्हा सहकार्यांना देत असत. ते कायमच मुक्त कंठाने स्तुती करत. संस्थेच्या विविध शाखांमध्ये जात असत आणि तिथल्या शिक्षक व विद्यार्थ्यांशी त्यांचे आत्मीयतेचे संबंध असत. ते उच्चविद्याविभूषित होते, आय.आय.टी. कानपूर सारख्या प्रतिष्ठित, थोर शिक्षक व शास्त्रज्ञ घडवणाऱ्या संस्थेत काम करूनही त्यांच्यात साधेपणा होता, जगातील नामवंत व महत्वाच्या शिक्षण संस्थांमध्ये शिकवणारे डॉ. वाघमारे नेहमीच प्रेमाने व आत्मीयतेने वागत असत. अतिशय क्लिष्ट विषय साधेपणा शिकवणारे ते ज्ञानयोगी होते. आपल्यावरील प्रत्येक जबाबदारी त्यांनी तन-मन-धनपूर्वक पार पाडली त्यामुळे ते कर्मयोगी होते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियासारख्या ख्यातनाम विद्यापीठात काम करण्याची सुवर्णसंधी असताना त्यांनी देशात परत येऊन अनेक उच्चविद्याविभूषित विद्यार्थी घडवले, त्यातून त्यांची देशाबद्दलची भक्ती दिसून येते, त्यामुळे ते भक्तीयोगी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात हा एक त्रिवेणी संगमच होता. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे हीच डॉ. वाघमारे यांना श्रद्धांजली ठरेल.

आय.आय.टी. कानपूरचे माजी डायरेक्टर डॉ. संजय धांडे यांनी डॉ. वाघमारे यांना आय.आय.टी. कानपूरच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञ दिवंगत मारिया जी. मायर यांच्या समवेत असिस्टंट रिसर्च फिजिसिस्ट म्हणून १९६३ ते १९६५ या काळात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात डॉ. वाघमारे यांनी काम केले. त्यानंतर १९६६ मध्ये ते आय.आय.टी. कानपूरमध्ये रुजू झाले. डॉ. वाघमारे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. एम.एस्सी. आणि पीएच.डी. प्रमाणेच ‘जेईई’च्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. उत्तम शिक्षक म्हणून ख्यातनाम असलेले प्रो. हरिश्चंद्र वर्मा हे त्यांचेच विद्यार्थी. आय.आय.टी. कानपूरमध्ये प्रा. रमेश सिंगरू आणि प्रा. गिरीजेश मेहता हे डॉ. वाघमारे यांचे अतिशय निकटचे साहाय्यक सहकारी होते. डॉ. वाघमारे सगळ्यांबरोबर मिळूनमिसळून रहात आणि अनेकांना वेळोवेळी मदत करत. आपल्या घरी आलेल्या व्यक्तींचे ते अतिशय आपुलकीने आणि आनंदाने आदरातिथ्य करत असत. आपल्या सहकाऱ्यांशी त्यांचे वर्तन मित्रत्वाचे असायचे. विशेष म्हणजे डॉ. वाघमारे क्रिकेट अतिशय उत्तम खेळायचे.

हाडाच्या शिक्षकाला जरी आपण पारखे झालो असलो तरी त्यांची शिकवण त्यांनी मागे ठेवली आहे, त्यांच्यासारख्या ज्ञान तपस्व्याला जरी आपण मुकलो असलो तरी त्यांचे तप सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे, अशा शद्बात ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय इनामदार यांनी डॉ. वाघमारे यांना आदरांजली वाहिली.

डॉ. यशवंत वाघमारे यांचे बंधू प्रकाश वाघमारे व मेहुणे कुमार भोगले, मएसो चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक व इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्सचे जे. पी. गद्रे, मएसो चे माजी सचिव प्रा. र.वि. कुलकर्णी, सुनीलराव खेडकर, डॉ. गोविंद कुलकर्णी आदींनी डॉ. वाघमारे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

इंजि. सुधीर गाडे यांनी सूत्रसंचालन केले.