Month: January 2023

पुणे, दि. २८ : “ आत्मनिर्भर, आत्मविश्वासपूर्ण, देशासमोरच्या सर्व समस्यांवर मात करणारा, विकासशील देशांची भूमिका जागतिक पटलावर मांडणारा, राष्ट्रीय विचारांचा जागर करणारा आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन मांडणारा भारत मार्गच आपल्या देशाला जगातील अग्रगण्य शक्ती बनवेल, गेल्या दहा वर्षात देशात झालेले परिवर्तन विस्मयकारक आहे,” असे प्रतिपादन देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज येथे केले. त्यांनी लिहीलेल्या ‘द इंडिया वे’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेल्या ‘भारत मार्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या विदेश विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले यांची या वेळी सन्माननीय उपस्थिती होती.
या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे आणि भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे उपस्थित होते.
‘द इंडिया वे’ या पुस्तकाचे मराठी भाषांतर सरिता आठवले यांनी केले असून भारतीय विचार साधनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि भारतीय विचार साधना यांनी संयुक्तपणे या समारंभाचे आयोजन केले होते.
“परराष्ट्र सचिव असताना देशाची परराष्ट्र नीति सर्वांपर्यंत पोहोचावी असा आपला प्रयत्न होता. परराष्ट्र नीति ही दिल्लीत बसून ठरवता येणार नाही. आपल्या देशातील प्रत्येक राज्यांचे अनुभव वेगवेगळे आहेत, कारण प्रत्येक राज्याची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे, भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे परराष्ट्र नीति ठरवताना या सर्व राज्यांचा सहभाग असेल तरच संपूर्ण देशाचे सारतत्व त्यात उमटते. परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ‘द इंडिया वे’ हे पुस्तक लिहायला सुरवात केली. कार्यक्रमांमध्ये गेल्यावर विविध विषयांवरील आठ लेखांवर नागरिकांशी स्वतंत्रपणे चर्चा होत असे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादांचे सार या लेखनात समाविष्ट केल्याने या पुस्तकाची भाषा सर्वसामान्यांची आहे,” अशी माहिती जयशंकर यांनी या वेळी दिली. इतिहासातून आपण धडा घेतला पाहिजे याचे भान करून देणारा जागतिकीकरणातील त्रुटी व त्यामुळे निर्माण झालेली आव्हाने, दुराग्रहापोटी जगाबरोबर न बदलल्याने होणारे नुकसान, परराष्ट्र नीतितील जनभागीदारी, जागतिक महासत्ता असलेल्या चीनसारख्या शेजारी देशामुळे निर्माण होणारी आव्हाने, जपानशी असलेल्या संबंधांचा उपयोग, प्रशांत महासागरात निर्माण झालेला भारताचा प्रभाव, महाभारतातील कृष्णनीतिच्या माध्यमातून देशात कूटनीतिची संस्कृतीची वाढ अशा विविध विषयांवरील लेख या पुस्तकात आहेत. त्याचा उपापोह जयशंकर यांनी आपल्या भाषणात केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, ‘भारत मार्ग’ या पुस्तकात आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण सोप्या आणि सुंदर भाषेत मांडत असताना दिलेले वेगवेगळे संदर्भ महत्वाचे आहेत. या लिखाणाचा उद्देश भारताचा विचार, भारताची भूमिका विविध समुहांना स्पष्टपणे कळावा हा आहे. परराष्ट्र धोरणाचा परिणाम आता प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो आहे. त्यामुळे परराष्ट्र धोरणाची माहिती सर्व नागरिकांना होणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण आपल्या देशाचा विचार करून तयार केलेले आणि जगातील कोणत्याही शक्तीच्या दबावाला बळी न पडलेले परराष्ट्र धोरण ठरवले.
विजय चौथाईवाले आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या आठ वर्षात देशाच्या परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण झाले आहे हे फार मोठे यश आहे. देशातील सर्वसामान्यांचे एकमत निर्माण होणे हे परराष्ट्र नीतिचे यश आहे. तटस्थ न राहता जागतिक घडमोडींमध्ये आपल्याला भाग घ्यावा लागेल हे लक्षात घेऊन भारताने आपली स्थिती मजबूत केली. युक्रेनमधील युद्धस्थितीतून २० हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणणे त्यामुळेच शक्य झाले. भारताने सर्व बाजूंनी केलेल्या सज्जतेमुळेच भारत मार्ग आकाराला आला आहे आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर हे त्याचे पुरस्कर्ते आहेत.
भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांनी समारंभाच्या सुरवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आणि भारतीय विचार साधनाच्या वाटचालीचा आढावा घेतला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी मान्यवरांचे आभार मानले.
सौ. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
पुणे, दि. २७ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ डॉ. यशवंत रामचंद्र वाघमारे यांचे आज पहाटे ३.०० वाजता निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, दोन नातवंडे तसेच दोन बंधू आणि एक बहिण असा परिवार आहे.
डॉ. वाघमारे यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ. वाघमारे हे अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी नोबेल पारितोषिकप्राप्त शास्त्रज्ञ दिवंगत मारिया जी. मायर यांच्या समवेत असिस्टंट रिसर्च फिजिसिस्ट म्हणून १९६३ ते १९६५ या काळात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात काम केले. त्यानंतर आय.आय.टी. कानपूरमध्ये १९६६ ते १९९७ असे प्रदीर्घ काळ त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. या कार्यकाळात त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवले.
डॉ. वाघमारे सन २००० पासून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष होते. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि मएसो इन्स्टिट्यटूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान, विज्ञान आणि व्यवस्थापन विषयक आंतरराष्ट्रीय परिषदांमागे डॉ. वाघमारे यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन राहिले आहे. या परिषदांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यात्यांना निमंत्रित करण्यात त्यांचा सक्रीय सहभाग असे. अगदी अलीकडेच मएसो इन्स्टिट्यटूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसतर्फे ‘क्वान्टम फिजिक्स’ या विषयीची व्याख्यानमाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
संस्थेच्या विविध सभांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन ते आपुलकीने मार्गदर्शन करत. संस्थेच्या विविध शाखांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांशी सहजपणे संवाद साधून त्यांना प्रेरणा देत. संस्थेच्या प्रगतीसाठी ते वेळोवेळी उपयुक्त सूचना करत असत. संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी यांच्याशी ते मोकळेपणाने संवाद साधत असत.
डॉ. वाघमारे १९६५-६६ मध्ये अमेरिकेतील केंब्रिजमधील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून ते कार्यरत होते.
डॉ. वाघमारे यांनी ८० पेक्षा अधिक शोधनिबंध तसेच न्यूक्लिअर फिजिक्स, न्यूक्लिअर सायन्स अँड इंजिनिअरींग, क्वाँटम मेकॅनिक्स, रीलेटिव्हीटी आदी विषयांवर ७ पुस्तकांचे लिखाण केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. प्राप्त केली आहे.
डॉ. वाघमारे यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी जीवनात प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. त्यामध्ये आय.आय.टी. गांधीनगरचे डायरेक्टर डॉ. रजत मूना, गुगल-पे चे उपाध्यक्ष अमरिष केंघे, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव डॉ. आशुतोष शर्मा, ‘मोजो नेटवर्क’चे संस्थापक डॉ. प्रवीण भागवत यांचा त्यामध्ये समावेश आहे.
आय.आय.टी. कानपूरचे माजी डायरेक्टर डॉ. संजय धांडे यांचा डॉ. वाघमारे यांच्याशी दीर्घकाळ संबंध होता. आयआयटी कानपूरमधील विद्यार्थी आणि नंतरच्या काळात सहकारी म्हणून डॉ. वाघमारे यांच्या स्मृतींना त्यांनी उजाळा दिला.
डॉ. वाघमारे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. एम.एस्सी. आणि पीएच.डी. प्रमाणेच ‘जेईई’च्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. उत्तम शिक्षक म्हणून ख्यातनाम असलेले प्रो. हरिश्चंद्र वर्मा हे त्यांचेच विद्यार्थी. आय.आय.टी. कानपूरमध्ये प्रा. रमेश सिंगरू आणि प्रा. गिरीजेश मेहता हे डॉ. वाघमारे यांचे अतिशय निकटचे साहाय्यक सहकारी होते.
डॉ. वाघमारे सगळ्यांबरोबर मिळूनमिसळून रहात आणि अनेकांना वेळोवेळी मदत करत. आपल्या घरी आलेल्या व्यक्तींचे ते अतिशय आपुलकीने आणि आनंदाने आदरातिथ्य करत असत. आपल्या सहकाऱ्यांशी त्यांचे वर्तन मित्रत्वाचे असायचे. विशेष म्हणजे डॉ. वाघमारे क्रिकेट अतिशय उत्तम खेळायचे. आय.आय.टी. कानपूरमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात होणाऱ्या सामन्यांमध्ये ते आवर्जून खेळत असत. निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाल्यानंतर देखील डॉ. वाघमारे यांच्याशी विद्यार्थी आणि सहकारी प्राध्यापकांचा ऋणानुबंध कायम होता. पुण्यात स्थायिक झालेल्या अनेक सहकाऱ्यांशी त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे घनिष्ठ संबंध होते, अशी आठवण डॉ. संजय धांडे यांनी सांगितली.
आय. आय. टी. कानपूरमध्ये डॉ. वाघमारे यांनी फिजिक्स विभागाचे प्रमुख, विद्यार्थी कल्याण व विकास विभागाचे अधिष्ठाता आणि अनेकदा कार्यवाहक डायरेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले.
देश-विदेशातील अनेक विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ते मानद व्याख्याते म्हणून जात असत.
डॉ. वाघमारे यांनी इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्सचे अध्यक्ष आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या विश्वस्त मंडळाचे सदस्य, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम बघितले.
पुण्यातील ‘आयुका’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स विभागाशी ते निगडित होते.

म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्वप्राथमिक विभागाच्या नवीन इमारतीचे आणि सध्याच्या माध्यमिक शाळेच्या इमारतीवरील तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाचे भूमीपूजन श्री गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर आज (बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३) संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे पूर्वप्राथमिक विभागाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन मा. भूषणजी गोखले यांच्या समवेत शाळेत सिनीअर केजीमध्ये शिकणाऱ्या अनघा दुसाने, शुभम अवचिते आणि सान्वी शिरोडे या विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक यांची सन्मननीय उपस्थिती होती.

या प्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील, नियामक मंडळाचे सदस्य देवदत्त भिशीकर, शाला समितीचे अध्यक्ष आ.वा. कुलकर्णी, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य सुधीर भोसले, डॉ. गोविंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

सलग सहाव्या वर्षी जिंकला म. ए. सो. क्रीडा करंडक
सासवड, दि. २१ : बारामतीच्या म.ए.सो. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेने सलग सहाव्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद पटकावत म.ए.सो. क्रीडा करंडकावर आपली मोहोर उमटवली. सासवड येथील म.ए.सो. बाल विकास मंदिर या शाळेने द्वितीय तर कळंबोली येथील म.ए.सो. ज्ञान मंदिर (मराठी माध्यम) या शाळेने तृतीय क्रमांक मिळवला.
येथील म.ए.सो. वाघीरे विद्यालयाच्या मैदानावर गेले तीन दिवस ही स्पर्धा पार पडली. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो आणि सूर्यनमस्कार या खेळांचे मुले आणि मुली अशा दोन गटात एकूण ८५ सामने खेळवले गेले. त्यातून २४ सांघिक आणि आक्रमक, संरक्षक व अष्टपैलू अशी १८ वैयक्तिक पारितोषिक देण्यात आली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. म.ए.सो. बाल विकास मंदिर शाळेकडे या स्पर्धेचे यजमानपद होते.
या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आज (रविवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सायली केरिपले य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष व शाला समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाचे सदस्य अड. धनंजय खुर्जेकर, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, म.ए.सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, म.ए.सो. बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर, म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी म.ए.सो. क्रीडा करंडक ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष होते.
या वेळी बोलताना सायली केरिपले म्हणाल्या की, इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेली ही पहिलीच स्पर्धा असून या स्पर्धेतून भविष्यात देशाचे प्रतिनिधीत्व करणारे यशस्वी खेळाडू निश्चितच घडतील. आपले आई-वडिल आणि आपले शिक्षक हेच आपल्याला घडवत असतात, सर्व प्रसंगात तेच आपल्या पाठीशी उभे राहतात, त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका असा सल्ला त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना दिला. या स्पर्धेच्या निमित्ताने तीन दिवस एकत्र राहण्यातून तुम्हाला स्वावलंबन, वक्तशीरपणा अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या असतील, त्या कोणत्याही पुस्तकात शिकायला मिळणार नाही असेही त्या म्हणाल्या.
प्रदीप नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांवर उत्तमोतम संस्कार करण्याची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची परंपरा आहे. खेळण्यातून मन आणि मनगट मजबूत होते, त्याचबरोबर आयुष्यदेखील समृद्ध होते. खेळताना अंगाला लागणारी माती देखील आपल्याला काही शिकवत असते, त्यामुळे खेळण्याची सवय कायम ठेवा. खेळताना पडा, रडा पण कायम हसत राहा. म.ए.सो. करडंक स्पर्धेतील विजेत्यांचे आणि त्याचबरोबर ज्यांना यश न मिळालेल्या दोघांचेही मी अभिनंदन आणि कौतुक करतो.
म.ए.सो. करडंक स्पर्धेचे सुरवातीपासून काम पाहणारे म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे यांचा प्रदीप नाईक यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बाबासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळाचे सामने बघण्यात एक वेगळाच आनंद असतो. संध्याकाळच्या वेळेत प्रकाशझोतात झालेले सामने खूपच चित्तवेधक होते. लहान खेळाडूंचा एकत्र निवास असणारी ही राज्यातील एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक व अन्य सहकाऱ्यांनी अविश्रांत मेहनत घेतली.
सुधीर भोसले यांनी प्रमुख अतिथी सायली केरिपले यांचा परिचय करून दिला.
विजय भालेराव यांनी पुढील वर्षी म.ए.सो. क्रीडा करंडक स्पर्धा बारामती येथील म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी केली.
या स्पर्धेच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या म.ए.सो. क्रीडाविश्व या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र महाजन यांनी केले.

सासवड, दि. २० –  लंगडीच्या सामन्यात एकाच दमात जास्तीत जास्त प्रतिस्पर्ध्यांना बाद करण्याची जिद्द आणि नजरेतली भेदकता, हातात न मावणारा बॉल सांभाळत नेमका वेध घेताना लावलेला जोर, पाठलाग करणाऱ्या खेळाडूला चपळाईने चकवा देत दिलेला खोs आणि क्षणोक्षणी वाढत जाणारी उत्सुकता अशा चैतन्यमयी वातावरणात लहानग्यांनी मएसो क्रीडा करंडक स्पर्धेतील मैदाने दणाणून गेली. लहानग्या खेळाडूंच्या आवेशपूर्ण चढायांनी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सत्रातील सामने आज रंगले. निमित्त होते,  म.ए.सो. क्रीडा करंडक स्पर्धेच्या उद्घाटनाचे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या म.ए.सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून इ. १ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी म.ए.सो. क्रीडा करंडक ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो, सूर्यनमस्कार या खेळांचा समावेश असतो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष असून या वर्षी ही स्पर्धा सासवड येथील म.ए.सो. वाघीरे विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. आज (शुक्रवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी) या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरवातीला यशराज लांडगे या राष्ट्रीय खेळाडूच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या पथकाने धावत आणलेली क्रीडा ज्योत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्य हस्ते क्रीडांगणावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेच्या ध्वजाचे अवतरण करण्यात आले. तसेच तन्मयी कोकरे या विद्यार्थिनीने उपस्थितांना क्रीडा शपथ दिली.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील व नियामक मंडळाचे उपाध्यक्ष व शाला समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, म. ए. सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे, म.ए.सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, म.ए.सो. बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर, म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, लंगडी, खो-खो, डॉजबॉल या सारख्या सांघिक खेळांमधून संघभावना वाढीस लागते, त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची वृत्ती विकसित होत असल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. खेळांमुळे शारीरिक क्षमता विकसित होत असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मैदानाचा जास्तीतजास्त उपयोग करून घेतला पाहिजे. देश-विदेशातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.

बाबासाहेब शिंदे यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म.ए.सो. च्या १६२ वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीचा आढावा घेताना म.ए.सो. क्रीडा करंडक ही स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

दि. २२ जानेवारी २०२३ पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

विजय भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला आहेरकर यांनी केले.

 

.

 

प्रकाशझोतात पार पडणार स्पर्धा

सासवड, दि. १८ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी म. ए. सो. क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षी ही स्पर्धा सासवड येथील  म. ए. सो. वाघीरे हायस्कूलच्या मैदानावर शुक्रवार, दि. २० जानेवारी ते रविवार, दि. २२ जानेवारी २०२३ या काळात होणार आहे. त्यामध्ये लंगडी, डॉजबॉल, गोल खो-खो, सूर्यनमस्कार या खेळांचा समावेश आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व अन्य शिक्षण संस्थांच्या १८ शाळांमधील सुमारे १२०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रकाशझोतात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेचे हे ११ वे वर्ष आहे.

ही माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष विजय भालेराव यांनी आज (बुधवार, दि. १८ जानेवारी २०२३ रोजी) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले, म.ए.सो. वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, म.ए.सो. बाल विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड, म.ए.सो. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर, म.ए.सो. पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे उपस्थित होते.

या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महादेव कसगावडे यांच्या हस्ते होणार असून के. जे. इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष श्री. कल्याण जाधव हे या याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रीय कबड्डी खेळाडू  सायली केरीपले यांच्या हस्ते होणार असून  बांधकाम व्यवसायिक शिरीष जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या स्पर्धेचे यजमानपद सासवड येथील म. ए. सो. बाल विकास मंदिर या शाळेकडे आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था शाळेमध्ये करण्यात आली आहे.

शासन स्तरावर १४ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र, प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कोणतीच स्पर्धा आयोजित केली जात नाही हे लक्षात घेऊन संस्थेने सन २०११ पासून म. ए. सो. क्रीडा करंडक स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली.

 

लष्करी वेशात शिस्तबद्ध संचलन करत मान्यवरांना दिलेली मानवंदना, रिदम योगाद्वारे झालेले एकाग्रतेचे दर्शन, कराटे आणि अश्वारोहणातून दिसलेले धाडस, धनुर्विद्या आणि रायफल शूटिंगमुळे दिसून आलेली अचूकता, रोप मल्लखांबामुळे साधलेली लवचिकता, लेझमीच्या खेळातून साधलेली सांघिक भावना, मार्शल आर्टसच्या प्रशिक्षणातून झालेली स्वसंरक्षणाची तयारी बघून अचंबित झालेले प्रेक्षक असे दृश्य आज बघायला मिळाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिना’च्या कार्यक्रमात. विद्या आणि बळाच्या आधारे आपण जग जिंकू शकतो, जगात वंदनीय ठरू शकतो हा संदेशच मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या साहसी प्रात्यक्षिकांमधून या वेळी दिला आणि स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला समर्थ भारत निर्माण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हे दाखवून दिले.
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या विविध शाखांमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करतात. यावर्षी मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचीच मने जिंकली.
मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी २०२३) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक हे होते. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर या प्रमुख अतिथी म्हणून तर समर्थ भारत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुहास क्षीरसागर या वेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. संस्थेचे मा. उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे सर्व निर्बंधांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत व बंदिस्त जागेत मैदानी प्रात्यक्षिकांशिवाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांसह अतिशय उत्साहात पार पडला.
प्रमुख वक्ते श्री. सुहास क्षीरसागर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या कार्याची महती विशद केली. ते म्हणाले की, महापुरूषांचे आयुष्य दीपस्तंभासारखे असते. एखाद्या विचाराचा ध्यास घेणे म्हणजे काय हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून शिकायला मिळते. भारतीय जीवन पद्धती ही वेदांतावर आधारित आहे हे त्यांनी जगाला सांगितले. त्याग हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे, आपली संपत्ती इतरांना उपयोगी पडली तरच जीवनात सुख आणि शांतता लाभू शकते, स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विचार करण्याची शिकवण भारतीय संस्कृती देते, हे स्वामीजींनी जगाला पटवून दिले. आपल्या देशातील जनता स्वत्व विसरली आहे, भारताची जगभर कुचेष्टा सुरू आहे, त्यामुळे आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी स्वामीजींनी देशभर प्रवास केला. मन, बुद्धी आणि मनगट बळकट असेल तरच जग जिंकता येते हे त्यांनी समजावून सांगितले. आजच्या पिढीने देखील आपल्या क्षमता ओळखण्याची गरज आहे कारण तीच यशाची गुरुकिल्ली आहे.
श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर विद्यार्थ्यांना मर्गदर्शन करताना म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले कुटूंब, गुरूजन आणि शाळा-महाविद्यालय यांचा पाठिंबा असणे अनिवार्य असते. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मला टेबल टेनिस खेळाच्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता आले. त्याचबरोबर खेळामुळे मला काही महत्वाचे गुण शिकायला मिळाले ते म्हणजे ध्येय निश्चिती, सांघिक भावना, कठोर परिश्रम आणि अपयश पचवण्याची क्षमता. त्यामुळे सातत्याने कठोर परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी युवा चेतना दिनाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. तर श्री. विजय भालेराव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
या वेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांचा परिचय प्रा. शैलेश आपटे यांनी करून दिला.
मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतील शिक्षिका श्रीमती शिरीषा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

“नरेंद्र जन्माला येतो, स्वामी विवेकानंद घडवावे लागतात. स्वामी विवेकानंदांचे जीवन निर्भयतेचे स्मरण करून देते. कुशाग्र बुद्धी, बुद्धिप्रामाण्यवाद, जगाच्या कल्याणाचा विचार, सहसंवेदना, अमोघ वक्तृत्व अशा अनेक गुणांमुळे नरेंद्र पुढे जाऊन स्वामी विवेकानंद झाले,” असे प्रतिपादन मुंबईतील सोमय्या कॉलेजचे प्राध्यापक मा. सागर म्हात्रे यांनी आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी२०२३) येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय कबड्डीपटू मा. शक्तीसिंग यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. देवदत्त भिशीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य डॉ, संतोष देशपांडे, ॲड. सागर नेवसे, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र श्री. सुधीर भोसले, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.

नवी मुंबईतील म.ए.सो.चे हितचिंतक, निमंत्रित, पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन ‘युवा चेतना दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी यावेळी मैदानी खेळ व शारिरीक प्रात्यक्षिके सादर करतात.या वर्षी पहिल्यांदाच पुणे येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘युवा चेतना दिन’ कार्यक्रमाबरोबरच नवीन पनवेल येथील मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या क्रीडांगणावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये नवीन पनवेल येथील मएसो आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, मएसो पब्लिक स्कूल, कळंबोली मएसो ज्ञान मंदिर आणि मएसो विद्या मंदिर बेलापूर या शाखांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी लेझीम, लाठीकाठी, ढोल पथक, ध्वज पथक, डंबेल्स, बटरफ्लाय ड्रील, फ्लॉवर ड्रील, रिंग ड्रील, ॲरोबिक्स असे विविध क्रीडाप्रकार व शारीरिक कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

स्वामीजींच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी गोष्टी सांगून प्रा. म्हात्रे यांनी स्वामीजींचे तेजस्वी जीवन उलगडले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, “स्वामीजींमधील गुण आत्मसात केले तर भविष्यातील स्वामी विवेकानंद घडतील. महान विभूतींच्या चरित्राचा अभ्यास करा. त्यांच्या विचारांतूनच तुमचाही सामान्यापासून असामान्यत्वाकडे प्रवास सुरू होईल.”

मा. शक्तीसिंग यादव यावेळी बोलताना म्हणाले, “स्वतःच्या स्वप्नांचा ध्यास घ्या. ती पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करा. खेळ, अभ्यास किंवा जे काही कराल त्यात एकाग्रता वाढवा. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोठे व्हा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा आजचा हा दिवस युवा चेतना दिन तुम्हा सर्वांबरोबर साजरा करताना मला विशेष आनंद होत आहे.”

मा. देवदत्त भिशीकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “स्वामी विवेकानंदांच्या विचारात व्यक्ती नव्हे तर समष्टीचा विचार होता.‌ ते एक योद्धा संन्यासी, युगनायक होते.” स्वामीजींचे विचार आजच्या युवांपर्यंत

पोहोचण्यासाठी सर्व शाळांनी वर्षभरात स्वामीजींचे एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा असे आवाहनही मा. भिशीकर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ वर्षांच्या देदीप्यमान कामगिरीचा आढावा घेतला व युवा चेतना दिन साजरा करण्यामागील म. ए. सो. ची भूमिका विषद केली. आपल्या देशातील विविध क्रीडाप्रकार विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी क्रीडा प्रात्यक्षिके व शारीरिक कवायती दरवर्षी सादर केली जातात. त्यात मांडल्या जाणाऱ्या विचारांमुळे विद्यार्थ्यांमधील चेतना जागृत ठेवण्याचा हेतू पूर्ण होत आहे, असे त्यांनी सांगितले.

रायफल शूटिंग क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या फडके विद्यालयातील चि. वेदांत पाटील याने उपस्थित युवांना प्रतिज्ञा दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक विभाग-मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती निशा देवरे यांनी केले.

डॉ. संतोष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

म. ए. सो. पब्लिक स्कूल कळंबोली या शाळेतील विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् सादर केले.