Year: 2017

आपल्या प्रशालेतील १९७७-७८ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रशालेला वर्गातील फलक देण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन शाळेस मदत करण्यासाठी शाळेचा माजी विद्यार्थी संघ नेहमीच तत्पर असतो. ज्या शाळेने आपल्याला शिकवले, घडवले, शाळेच्या बाहेरील जगात वावरण्यासाठी तयार केले, त्या शाळेच्या ऋणात राहूनच दातृत्वाचा आदर्श पुढील पिढीसमोर ठेवण्यासाठी माजी विद्यार्थी प्रतिनिधी श्री. राजेंद्र मराठे यांनी शाळेतील प्रत्येक वर्गासाठी हे फलक प्रदान केले. या फलक अर्पण सोहळ्याचे आणि शाला समिती अध्यक्ष श्री. भालचंद्र पुरंदरे यांनी प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांची आदर्श व अभिमानास्पद परंपरा सांगून कृतज्ञता व्यक्त केली. मुख्याध्यापक श्री. भारमळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका सौ. कांता ईष्टे, पर्यवेक्षिका सौ. भारती तांबे तसेच सकाळ आणि दुपार विभागाचे शिक्षक व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. अनेक माजी विद्यार्थी यावेळी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. योगिता चौकटे यांनी केले.

 

 

केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे (CSIR) देण्यात येणारा ‘शालेय विद्यार्थ्यांसाठीचा सीएसआयआर संशोधन पुरस्कार’ आपल्या शाळेतील विद्यार्थिनी कु. तन्मयी अप्पासाहेब कोकरे (इ. 5 वी) आणि कु. तनिष्का अप्पासाहेब कोकरे (इ.7 वी) या दोघींना मंगळवार, दि. 26 सप्टेंबर 2017 रोजी देशाचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याची वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी.

We are glad to announce that through a layer of selection process at National level our school has been selected for establishment of Atal Tinkering Laboratory. It is a project undertaken by NITI Ayog under the scheme of Atal Innovation Mission to offer a platform in order to nurture and enhance the technology innovations among the school children.

The selection procedure
NITI Ayog received around 13,005 applications. Out of which 809 were from Maharashtra. BSM is one of those first 25 schools in Maharashtra which are selected for this endeavor.

The screening criteria

 – Availability of qualified teaching staff.
– Availability of infrastructure facilities.
– Performance of the school in SSC exam.
– Performance of the school in National level competitive exams.
– Performance of the school in National level project competitions.
– Performance of the school in Olympiad exams.
– Performance of the alumni at National and International level.

 

The school is selected through the Atal Challenge round under the guidance of our principal Mrs Geetanjali Bodhankar. In the Atal Challenge round the students presented on the project ‘ Plastic Collection and Recycling’ based on the participation of the school in “SAGARMITRA “ project.

Salient features of the ATL activities
The school will be undertaking projects to involve students in creative activities to encourage innovative thinking among them.

The features of the activities
– Activities involving basic electronics and robotics
– To nurture innovative thinking among them.
– To offer a platform for breakthrough in technology innovations to solve the day today issues regarding:
– Environmental Pollution, Communication,Health,Recreation, Transport,Handicapped people.

Assistant Head Master of our school Mr. Anant Kulkarni Sir participated in Atal Tinkering Laboratory workshop conducted by Intel at Best High School,Ahmedabad.

Here are some glimpses of the workshop

 

 

 

सासवडमधील म.ए.सो. वाघीरे हायस्कूल या शाळेच्या ‘दुस-या मजल्याच्या पूर्ण झालेल्या बांधकामाचा उद्घाटन समारंभ’ आणि येथील तंत्रशिक्षण विभागाचे ‘स्व. डॉ. सीता कुलकर्णी तंत्र-शिक्षण विभाग’ असे नामकरण हे दोन्ही कार्यक्रम मंगळवार, दिनांक २२ ऑगस्ट २०१७ रोजी अतिशय उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात पार पडले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), स्व. डॉ. सीता कुलकर्णी यांचे चिरंजीव डॉ. श्यामकांत कुलकर्णी, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, वाघीरे हायस्कूलच्या शाला समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.बी. कुलकर्णी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाला समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर यांनी केले. ते म्हणाले, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही अग्रगण्य शिक्षण संस्था असून गेल्या 157 वर्षात संस्थेने असंख्य सुसंस्कृत आणि जबाबदार नागरीक घडविले आहेत. आज शिक्षणाचे बाजारीकरण झालेले असतानाही संस्थेचे हे ध्येय कायम आहे. ग्रामीण भागात चांगले आणि स्वस्त दरात शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने सासवडमध्ये शाळा सुरु केली. शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी मूलभूत सुविधा आवश्यक असतात. ‘मएसो’च्या सर्वच शाखांमध्ये अशा सुविधा उपलब्ध आहेत. सासवडमधील शाळेच्या प्रांगणात संस्थेने दुसऱ्या मजल्याचे वाढीव बांधकाम पूर्ण करून 7 वर्गखोल्यांची भर घातली आहे. त्यामुळे जागेची अडचण दूर होत आहे. संस्थेने सासवडच्या शाळेतील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे.”

डॉ. श्यामकांत कुलकर्णी हे शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आपल्या मातोश्री स्व. डॉ. सीता कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शाळेला देणगी दिली आहे. त्यामुळे शाळेच्या तंत्रशिक्षण विभागाचे ‘स्व. डॉ. सीता कुलकर्णी तंत्र-शिक्षण विभाग’ असे नामकरण करण्यात आले. विशेष म्हणजे हे दोघेही जण मएसो वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून आई आणि मुलाने एकाच वेळी म्हणजे सन 1953 मध्ये मॅट्रीकच्या परीक्षेत यश मिळविले होते. या परीक्षेत श्यामकांत कुलकर्णी यांनी शाळेत पहिल्या क्रमांक पटकाविला होता. 

आपल्या आठवणींना उजाळा देताना डॉ. श्यामकांत कुलकर्णी म्हणाले की, “माझ्या आईला शिक्षणाची आवड होती. ती याच शाळेत हिंदी विषयाची शिक्षिका होती. तिने आम्हा मुलांना केवळ अभ्यास करायला शिकवले नाही तर लिहीयाचे कसे हे देखील शिकवले. एवढेच नाही तर अगदी रागवायचे कसे आणि भांडायचे कसे हे देखील शिकविले. ती अतिशय स्वाभिमानी होती. शाळा-महाविद्यालयातील अभ्यासक्रम संपला तरी आयुष्यभर शिक्षण चालूच असते. त्यामुळे भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही जीवन-शिक्षणात गुरुच असते.”

स्व. डॉ. सीता कुलकर्णी यांचे जुने सहकारी श्री. रामकृष्ण कदम यांनी देखील आपल्या आठवणी यावेळी सांगितल्या. “पुण्यातील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असताना शाळेच्या मुख्याध्यापकांनी सीता कुलकर्णी यांना एम.ए.चा अभ्यास करण्यास मज्जाव केला आणि एम.ए. करावयाचे असेल तर राजीनामा देण्यास सांगितले. सीता कुलकर्णी यांनी दोन मिनिटांमध्ये आपला राजीनामा लिहून मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केला. त्यांचा तो स्वाभिमानी बाणा बघून मी अचंबित झालो. त्या क्षणापासून म्हणजे 1962 पासून त्यांचा आदर्श माझ्यासमोर आहे. सीता कुलकर्णी यांच्याकडून मी कायमच शिकत आलो आहे, म्हणूनच आज 80 व्या वर्षीदेखील मी पी.एचडी. चा अभ्यास करीत आहे.”

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “शिक्षण कधीच संपत नाही असे मानणारे विद्यार्थी हाच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वारसा आहे. अनेक आव्हानांना तोंड देत शिक्षण घेतलेल्या एका महिलेच्या स्मरणार्थ शाळेला मिळालेल्या देणगीमुळे भविष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांना तोंड देत पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली आहे. ‘मएसो’च्या शाखांमध्ये केवळ शिक्षण दिले जात नाही तर तिथे संस्कारही केले जातात. त्यामुळे वाघीरे शाळेतील शिक्षकवर्गावर मोठी जबाबदारी आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांवर केवळ लक्ष ठेवून चालणार नाही तर त्यांना जाणून घेणेदेखील खूपच आवश्यक झाले आहे.” डॉ. श्यामकांत कुलकर्णी यांनी केलेल्या सूचनांचे संस्था तंतोतंत पालन करेल अशी ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. 

संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. कुलकर्णी यांचे नातेवाईक, तसेच शिक्षक व अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.बी. कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. संगीता रिकामे यांनी केले.

पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे नवीन शिक्षणाधिकारी मा. श्री. मोरे यांनी आज मएसो मुलांचे विद्यालयाला भेट दिली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी (डावीकडून) मएसो कार्यालयातील मुख्य लिपिक श्री. विनायक लिमये, प्रबंधक श्री. नीलकंठ मांडके, उपशिक्षण अधिकारी सौ. संध्या गायकवाड, श्री. आंबर्डेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर.डी. भारमळ आणि शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. भारती तांबे उपस्थित होते.


म.ए.सो. ‘गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स’ला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘सुवर्ण आठवणींचा गोफ’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. सन १९६७ ते सन २०१७ हा एक कालपटच महाविद्यालयाने यानिमित्ताने उभा केला होता. नियतकालिके व छायाचित्रे यांच्यासमवेत माजी विद्यार्थी तसेच माजी शिक्षकांना जुन्या आठवणींत रमण्याची ही एक नामी संधी महाविद्यालयाने दिली होती.
प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे सल्लागार समितीचे अध्यक्ष C.A. अभय क्षीरसागर, प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी, संस्थेचे माजी सचिव र.वि. कुलकर्णी, संस्थेचे अन्य पदाधिकारी व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीत सुवर्णमहोत्सवचा हा ऐतिहासिक सोहळा उत्साहात पार पडला.

 

पुणे – अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, देशभरातील संशोधन संस्थांच्या कार्यासह देशातील पारंपरिक ज्ञानाची ओळख करून देणाऱ्या भारतीय विज्ञान संमेलनातील प्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे गुरुवारी (ता. ११) केले. ‘देशभरातील संशोधन संस्थांनी केलेले संशोधन कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून, विज्ञान भारतीच्या विज्ञान संमेलनाच्या माध्यमातून हे कार्य देशभर पोहोचत आहे. भारताला पारंपरिक ज्ञानाचा मोठा वारसा लाभलेला असून, आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाच्या संगमातून संशोधनाच्या नव्या संधी निर्माण होतील,’ असे विचार सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ संदेशातून मांडले. एक्स्पोच्या उदघाटनाला विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय भटकर, महासचिव ए. जयकुमार, संघटनमंत्री जयंत सहस्रबुद्धे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसचे संचालक डॉ. शेखर मांडे, डीआरडीओच्या एसीई विभागाचे महासंचालक डॉ. पी. के मेहता, संमेलनाचे संयोजक मुकुंद देशपांडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संमेलन आणि प्रदर्शनाची सहप्रायोजक आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र, पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर, भारत ५२ हॉवित्झर तोफ यांसह डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, तसेच भारतातील पारंपरिक व्यवसायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष सादरीकरण हे एक्स्पोचे मुख्य आकर्षण आहे. केंद्रीय विज्ञान- तंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय, कौन्सिल फॉर सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) या विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या संशोधन संस्थांचा सायन्स एक्स्पोमध्ये सहभाग आहे. सायन्स एक्स्पो येत्या रविवारपर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाचे उदघाटन शुक्रवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एम. एम. शर्मा यांचे बीजभाषण होईल. संमेलनामध्ये देशभरातून आलेले संशोधक इंग्रजीप्रमाणेच भारतीय भाषांमधून आपले संशोधन सादर करणार आहेत. विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या संस्थांचे दालनांना नागरिक आवर्जून भेट देत आहेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचीदेखील या संमेलनात B10 आणि B11 अशी दोन दालने आहेत. आज पहिल्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. स्वांतरंजन, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य मा. मधुभाई कुलकर्णी, संघाचे पुणे महानगराचे मा. संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी मएसोच्या दालनांना भेट दिली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे च्या नवीन पनवेल येथील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाकरिता श्रीनिधी संकलनासाठी आयोजित करण्यात आलेल्या “मिले सुर मेरा तुम्हारा” या सुरेल कार्यक्रमात शाळेला सढळ हस्ते मदत करणा-या उद्योजक व प्रायोजकांचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्त्रबुद्धे, संस्थेचे चिटणीस मा. डॉ. संतोष देशपांडे, विद्यालयाच्या शाला समितीचे अध्यक्ष ॲड. जयंत म्हाळगी, विद्यालयाचे महामात्र डॉ. आनंद लेले, मुख्याध्यापिका सौ. मानसी वैशंपायन, प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मा. निशा देवरे, पर्यवेक्षिका सौ. सोमण (मराठी माध्यम), सौ. सुषमा सप्रे (इंग्रजी माध्यमिक), सौ. तन्वी परुळेकर (इंग्रजी प्राथमिक) आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पनवेलमधील प्रसिद्ध सिनेनाट्य निर्मात्या मा. कल्पना कोठारी, इतिहास अभ्यासक मा. विश्वनाथ गोखले, योगाचार्य मा.पु. ल. भारद्वाज व जेष्ठ समाजसेविका मा. नीलाताई पटवर्धन यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेलचे आमदार मा. प्रशांत ठाकूर यांनाही यावेळी गौरविण्यात आले. हा कार्यक्रम पनवेलच्या फडके नाट्यगृहात पार पडला. यात सुवर्णा माटेगावकर, वैभव वशिष्ठ, सोनाली कर्णिक, संदीप शाह, निलेश निरगुडकर यांनी हिंदी गाणी सादर करुन रसिकांची वाहवा मिळवली. निवेदन संदीप कोकिळ यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयातील विद्यार्थिनींनी “मिले सूर मेरा तुम्हारा” या गीतावर नृत्य सादरीकरणही केले. अतिशय रंगलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.

 

“जीवनात दिशा निश्चित असेल तर कृतिशील व्यक्ती आपले ध्येय निश्चित गाठू शकतात पण त्यासाठी चांगले आणि सम्यक विचार असण्याची गरज असते. चांगले विचार, चांगले कार्य आणि चांगली माणसे आहेत म्हणूनच हे जग टिकून आहे. विचार कधीही नष्ट होत नाहीत. आपल्या ऋषिमुनींनी दिलेले विचार घेऊनच आज आपण पुढे जात आहोत. चांगला विचार मुळाशी नसेल तर चांगली कामे उभी राहात नाहीत. कार्य हे विचारांचे प्रकट रुप आहे. जेव्हा कार्य चांगले असते तेव्हाच समाजाची प्रगती होते. चांगले कार्य, चांगले विचार आणि चांगली माणसेच आपल्या संस्कृतिवरील आक्रमण रोखू शकतात. त्यासाठी समर्पणभाव खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आणि कार्य परिपूर्ण आहे. जे दुसऱ्यासाठी जगतात त्यांच्याच स्मृती आपण जपत असतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन ज्यांनी समाजासाठी समर्पित केले होते अशा स्व. दामुअण्णा दाते यांचे नांव रेणावीकर प्रशालेतील या सभागृहाला देणे हे चांगले काम आहे. स्व. दामुअण्णा कर्मठ, त्यागी होते. त्यांचे नांव असलेल्या या सभागृहात लहान मुलांना चांगले विचार मिळतील आणि त्यातून त्यांच्या जीवनाला आकार मिळेल त्याबद्दल संस्थाचालकांचे मी अभिनंदन करतो,” असे प्रतिपादन पू. आदर्शऋषिजी महाराज यांनी येथे केले.
नगरमधील सावेडी येथे असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणावीकर माध्यमिक विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या वाढीव बांधकामाचे उद्घाटन आणि नूतन सभागृहाचे ‘कै. दामोदर माधव तथा दामुअण्णा दाते सभागृह’ असे नामकरण पू. आदर्शऋषिजी महाराज यांच्या हस्ते रामनवमी, मंगळवार, दि. ४ एप्रिल २०१७ रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विमुक्त भटके जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी तथा दादा इदाते, नगरमधील उद्योजक दौलतराव शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक सुरेश तथा नाना जाधव, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’चे सचिव डॉ. संतोष देशपांडे, शाला समितीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, महामात्र प्रा. सुधीर भोसले, रेणावीकर शाळेतील पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रमुख मंजुषा कुलकर्णी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाऊ बडधे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजना गायकवाड तसेच मधुकर रेणावीकर आदी मान्यवर उपस्थित होते. नगर शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विमुक्त भटके जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकुजी तथा दादा इदाते आपल्या भाषणात म्हणाले की, “कै. दामुअण्णा दाते हे राष्ट्रवादाची परिभाषा करणारे समाजशिक्षक होते. आपल्या समाज जीवनाचे नियोजन करणारे ते आधुनिक राष्ट्रऋषि होते. आपल्या वाटचालीतील विविध टप्पे आणि पुढील मार्ग त्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट होता. अशा एका संन्यासाचे वर्णन आज एका ऋषिंनी आपल्यासमोर केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक या नात्याने कै. दामुअण्णांचा नगर जिल्ह्याशी दीर्घकाळ संबंध होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात अनेक विचारधारांचा संघर्ष चालू होता. साम्यवाद आणि समाजवादाचा पगडा असलेले नेतृत्व देशात होते. अशा परिस्थितीत हिंदुत्वाचा विचार मांडणे अतिशय कठीण होते. त्यातून सर्व विचारधारांना कार्यकर्ते पुरवणारा, विविध विचारधारांचा प्रयोग करणारा जिल्हा अशी नगर जिल्ह्याची ओळख होती. अशा या जिल्ह्यात संघविचारांचे सिंचन दामुअण्णांनी केले. समाजाबद्दल चिंतन, चिंता आणि कळकळ म्हणजे कै. दामुअण्णा! ते राष्ट्रीय चिंतन आणि माणूस याबाबतीत अतिशय संवेदनशील होते, या दोन्ही गोष्टी ते जिवापाड जपायचे. त्यामुळेच कार्यकर्ते उभे राहीले. त्यांच्यासारख्या समर्पित जीवनाचे, व्यक्तीचे नांव शाळेतील सभागृहाला देण्याने त्यांचा नाही तर शाळेचा आणि संस्थेचाच सन्मान झाला आहे. ज्या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी हे शिक्षक परायण असतात, शिक्षक शिक्षण परायण असते, शिक्षण ज्ञान परायण आणि ज्ञान हे कर्मपरायण असते, तिथे सर्व नव्या कल्पना राबवता येतील हे राज्याचे माजी शिक्षण संचालक वि.वि. चिपळूणकर यांचे सांगणे आपण लक्षात ठेवले पाहिजे.”
नगरमधील उद्योजक आणि शेती संशोधक दौलतराव शिंदे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. ते आपल्या भाषणात म्हणाले की, “ विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या शहरात स्थापन झालेल्या आणि १५० वर्षांचा इतिहास असलेल्या शिक्षण संस्थेचा परिसस्पर्श नगरच्या शिक्षण क्षेत्राला झाला आहे. हा परिसस्पर्श नगरच्या शैक्षणिक क्षेत्राला उंचीवर घेऊन जाईल याची खात्री वाटते. पुण्याशी संबंध असलेली रेणावीकर माध्यमिक विद्यालय ही नगरमधील एकमेव शाळा आहे. त्याचा फायदा शाळेला होणार आहे, त्यासाठी शाळेचे अभिनंदन आणि संस्थेची भरभराट होऊन नगरच्या शैक्षणिक उत्कर्षात हातभार लागावा यासाठी शुभेच्छा! ”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश तथा नाना जाधव प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी कै. दामुअण्णा दाते यांच्या कार्यशैलीची माहिती दिली. “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींच्या हत्येचा ठपका ठेवून १९४८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली. संघाला संपविण्याचा हेतू त्यामागे होता. त्यामुळे संघाचे काम करणे धारिष्ट्याचे होते. अशा परिस्थितीत ते नगरमध्ये प्रचारक म्हणून आले. संघाचे पूर्णवेळ काम करणे हे वेगळ्या पद्धतीने आव्हानात्मक होते कारण संघबंदीच्या पूर्वी संबंधात असलेली अनेक घरे संघासाठी बंद झाली होती. अशा घरांची दारे संघासाठी पुन्हा उघडण्याचे काम कै. दामुअण्णांनी केले. प्रत्येकाला ते आपले, आपल्या घरातीलच वाटायचे. त्यामुळे वेळप्रसंगी कार्यकर्त्यांच्या एखाद्या घरगुती प्रश्नांबाबतचा अंतिम निर्णय दामुअण्णांचाच असायचा. व्यक्तीतील गुण हेरून त्याला त्यादृष्टीने प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांचा अनेक विषयांचा अभ्यास होता. ते अभ्यासू वक्ते होते. सामाजिक समरसतेच्या विचारांचे प्रकटीकरण कसे करायचे यामागील चिंतन दामुअण्णांचेच होते. कै. दामुअण्णांच्या नगर जिल्ह्यातील योगदानाचे स्मरण ठेवून संस्थेने शाळेतील सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दामुअण्णा कोण होते? काय होते? हे सतत सर्वांसमोर येत राहील.”
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय समारोपाच्या भाषणात म्हणाले की, “आज आपण स्वतंत्र असलो तरी १९४७ सालापर्यंत कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा लागला असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. १५० वर्षांपूर्वी दूरदृष्टीने सुरू केलेल्या आपल्या शिक्षण संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी आज थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभले आहेत. यापुढे आता आपल्या संस्थेला कौशल्य विकासासाठी काम केले पाहिजे.”
“शाळेतील सभागृहाला कै. दामुअण्णा दाते यांच्यासारख्या कुशल संघटकाचे नांव आपण दिले आहे याचा सार्थ अभिमान वाटत आहे तर याप्रसंगी पू. आदर्शऋषिजी महाराज यांचे आशीर्वचन लाभले हे आपले भाग्य आहे,” अशा शद्बात शाला समितीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी केले. शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.

(छायाचित्रात डावीकडून) – राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, नाशिकच्या महापौर रंजनाताई भानसी, राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेचे उप-प्राचार्य अनंत कुलकर्णी, प्राचार्या पूजा जोग आणि शाळेच्या महामात्रा सौ. चित्रा नगरकर.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा ‘आदिवासी सेवा संस्था’ पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेला मिळाला आहे. रु. 50,001/- चा धनादेश, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आदिवासी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ सन 2015-16 आणि सन 2016-17 या वर्षांसाठी शाळेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
नाशिक येथील कालिदास कलामंदिरात सोमवार, दि.27 मार्च 2017 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री. विष्णु सवरा यांच्या हस्ते हा पुरस्कार शाळेला प्रदान करण्यात आला. शाळेच्या वतीने शाळेच्या महामात्रा सौ. चित्रा नगरकर, प्राचार्या पूजा जोग आणि उप-प्राचार्य श्री.अनंत कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री.विष्णु सवरा हे होते. राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री मा. श्री.दादाजी भुसे, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मा. मनिषा वर्मा तसेच नाशिकच्या महापौर मा. रंजनाताई भानसी आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील 16 व्यक्ती आणि 7 संस्थाना ‘आदिवासी सेवक’ आणि ‘आदिवासी सेवा संस्था’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

पुणे, दि. २६ – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाच्या विकास आणि विस्तारासाठी कोलकाता येथील उद्योजक कै. अण्णासाहेब कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कुलकर्णी परिवाराने भरघोस अर्थसहाय्य केले आहे. त्यामुळे या विभागाचे ‘अण्णासाहेब कुलकर्णी (कोलकाता) जैवविविधता विभाग’ असे नामकरण करण्यात येणार आहे. तसेच कै. अण्णासाहेब कुलकर्णी यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. सतीश कुलकर्णी महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाचे मानद वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करणार आहेत. ‘यमाई फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘ट्रायोट्रेंड एक्स्पोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्यांनी सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून हा निधी दिला आहे. उद्योगांनी अशाप्रकारे घेतलेल्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना विविधांगी संशोधन करता येणार असून संशोधनाच्या कार्याला चालना मिळणार आहे. आज सकाळी, रविवार, दि.२६ मार्च रोजी संस्थेच्या गुरुवर्य डॉ. प्र.ल. गावडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी डॉ. सतीश कुलकर्णी आणि श्री. मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून या निधीचा धनादेश स्वीकारला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधव भट तसेच कुलकर्णी परिवारातील सदस्य, आप्त-स्नेही, डॉ. मदन फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते. पाणी, पर्यावरण, हवामान बदल, देशीज वनस्पती आणि प्राणी यांचे अस्तित्व टिकवून ठेवणे, विकास कामांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि पश्चिम घाटाचे मूळ स्वरूप अबाधित राखण्यासमोरील आव्हाने यासंदर्भात मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागाची ध्येय, उद्दीष्टे आणि प्रत्यक्ष काम अत्यंत सुसंगत आहेत. त्यामुळेच या विभागाला हे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. डॉ. सतीश कुलकर्णी हे उच्च विद्याविभूषित असून त्यांनी अमेरिकेतील व्हर्जिनिया टेक विद्यापीठातून पी.एच.डी. प्राप्त केली आहे. कॅलिफोर्निया येथील लॉरेन्स लिव्हरमोर लॅबोरेटरीच्या न्यूक्लिअर टेस्ट इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख म्हणून २८ वर्षे, नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासात विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि आरोग्य विषयक काऊन्सिलर म्हणून ३ वर्षे ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर निरपेक्ष वृत्तीने विविध संस्थासाठी ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. श्री. मुकुंद कुलकर्णी यांनी खरगपूर येथील आय.आय.टी. मधून केमिकल इंजिनीअरींगमध्ये बी. टेक. केल्यानंतर कै. अण्णासाहेब कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या कातडी वस्तूंची निर्मिती आणि निर्यातीच्या व्यवसायात कार्यरत झाले. युरोप आणि अमेरिकेतील रॅडली, पिकागो यासारख्या जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडबरोबर त्यांचा व्यावसायिक संबंध आहे. कै. अण्णासाहेब कुलकर्णी हे कातडी वस्तूंच्या निर्यात व्यवसायाचे जनक मानले जातात. या क्षेत्रात त्यांच्या उद्योगाचे नाव अग्रेसर आहे.

आपल्या परिसरात झालेल्या सुधारणा आणि विकासामुळे परिसर बदलतो, त्यात सरकारचे योगदान असते पण माणसात बदल घडविण्यात शैक्षणिक संस्थांचे योगदान असते आणि अशा शैक्षणिक संस्थामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नांव महत्वाचे आहे, अशा शद्बात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पवार हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बारामती येथील शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांना ‘पद्मविभूषण’ हा मानाचा नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते. या वेळी ‘मएसो’च्या बारामती येथील शाळेचे माजी विद्यार्थी आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांचादेखील मानपत्र देऊन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साबळे यांनी आपल्या खासदार निधीतून मएसोच्या बारामतीतील शाळेसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी केली.

याप्रसंगी व्यासपीठावर ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, खा. अमर साबळे, ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, ‘मएसो’चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि ‘मएसो’चे सचिव डॉ. संतोष देशपांडे उपस्थित होते.या कार्यक्रमाला भारती साबळे, प्रतापराव पवार, बारामती शहरातील अनेक मान्यवर, स्नेही, मित्रमंडळी आणि बारामती येथील शाळेचे माजी मुख्याध्यापक डॉ. एस.बी. गोगटे तसेच शाळेशी संबंधित अनेक व्यक्ती आवर्जून उपस्थित होत्या.

आपल्या भाषणात पवार यांनी सत्कार केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. “एकेकाळी बारामती ही ‘केकावली’ आणि ‘आर्या’ यांची रचना करणाऱ्या कविवर्य मोरोपंतांमुळे ओळखली जात असे. पेशव्यांचे सावकार असलेल्या बाबूजी नाईक यांच्यामुळेही पेशवेकाळात ती ओळखली जायची. साखर कारखानदारीत महत्त्वाची कामगिरी करणारा भाग म्हणून बारामतीची ओळख झाली. आता बारामतीत सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असून शेती, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अशा सगळ्याचीच निर्मिती बारामतीच्या परिसरात होते. अशा पद्धतीने परिसर बदलण्यात सरकारचे योगदान असू शकते, मात्र माणूस बदलण्यात शैक्षणिक संस्थांचे योगदान असते आणि त्यात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नांव महत्वाचे आहे. अनेक शिक्षण संस्थांशी माझा संबंध असल्याने तिथे दिल्या जाणाऱ्या शिक्षणात गुणात्मक बदल करण्याचा विचार जेव्हा मी करतो तेव्हा डोळ्यासमोर जी काही ४ ते ५ नावे येतात, ती सर्व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील शिक्षकांचीच आहेत. शाळेचे मुख्याध्यापक एम.व्ही. भावे, बी.जी. घारे, एस.बी. गोगटे यांच्यासारख्या उत्तम शिक्षकांची ‘मएसो’ ला परंपरा आहे. आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकले पाहिजेत याची खबरदारी या शाळेतील शिक्षकांनी घेतली. शाळेतल्या शिक्षकांच्या कृतीतूनच संधी येईल तेव्हा साहस दाखवलेच पाहिजे हा संस्कार झाला. आपली मातृभाषा असलेल्या मराठीबद्दलची आस्था शाळेमुळेच निर्माण झाली.

अशा शाळेच्या तीन माजी विद्यार्थ्यांना आणि तेदेखील एकाच घरातल्या तिघांना पद्म पुरस्कार मिळणे ही अभिमानास्पद घटना आहे आणि मला त्याचा आनंद आहे. माझे थोरले बंधू अप्पासाहेब पवार यांनी देशांत पहिल्यांदा ठिबक सिंचनाचे तंत्र आणले. शेतीच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे होते, त्यामुळे त्यांना आणि माझे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांना उद्योग आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्यबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सार्वजनिक आणि व्यक्तीगत जीवनातही अनेक आव्हानात्मक प्रसंगांना सामोरे जावे लागते. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून लातूरमध्ये झालेला विनाशकारी भूकंप आणि मुंबईत झालेले बॉम्बस्फोट अशा आव्हानांला तोंड द्यावे लागले. आठ हजार जणांचा बळी घेणाऱ्या भूकंपानंतर लातूर परिसराचे दोन वर्षात पुनर्वसन करण्यात आणि बॉम्बस्फोटांनंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील जनजीवन अल्पावधीत पूर्वपदावर आणण्यात यशस्वी ठरलो. समाजात चर्चा होईल असा निर्णय काही वेळा राजकीय जीवनात घ्यावा लागतो. आपल्या देशाच्या सैन्यदलात महिलांना प्रवेश नव्हता. संरक्षण मंत्री असताना त्यासंदर्भात संबंधितांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर सोपस्कार दूर सारत एक जनप्रतिनिधी म्हणून मी तो निर्णय घेतला. या वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व एका महिला लष्करी अधिकाऱ्याने केले याचा मला खूप आनंद आहे. हवाई दलात महिलांना प्रवेश दिल्यानंतर होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची नियुक्ती करण्याची शिफारस देखील संरक्षण मंत्री असताना मीच केली होती. अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेला, देशातल्या तरुणांबद्दल प्रचंड असणारा, आपल्या वेतनापैकी ९० टक्के रक्कम आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देणारा माणूस मला भेटला. अशा अनेक जणांशी माझा संबंध आला. कामाविषयीची तळमळ, बांधिलकी, कष्ट करण्याची तयारी असे सर्व संस्कार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेताना, संस्कारक्षम वयातच ‘मएसो’च्या शाळेत झाले. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अजूनही खूप काम करण्याची गरज आहे. लोकशाहीचा संस्कार रुजवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ‘मएसो’च्या संस्कारातूनच हे शक्य होईल. आज शाळेने, संस्थेने केलेल्या सत्काराचे महत्व आगळे-वेगळे आहे. हा घरातील सत्कार आहे, जिथे शिकलो त्या शाळेने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.” असे पवार आपल्या भाषणात म्हणाले.

खा. अमर साबळे आपल्या भाषणात म्हणाले की, “ संस्थेने माझा आणि पवार साहेबांचा सत्कार केल्याबद्ल मी आभारी आहे. आपण जग जिंकल्यावर जितका आनंद होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपल्या विजयाचा असतो. जगभरचे आदर-सत्कार स्वीकारून जेव्हा गावच्या वेशीवर येतो आणि गावातले जेव्हा स्वागताला येतात तेव्हाचा आनंद जास्त असतो, तसाच आनंद आझ मला होतो आहे. पवार साहेबांपेक्षा दुप्पट आनंद आझ मला होतो आहे कारण त्यांच्याबरोबर माझा सत्कार होत आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. बारामतीत शंभर वर्षापूर्वी जेव्हा शाळा सुरू झाली, त्याने बारामतीतील शिक्षणाचा पोत, गुणवत्ता आणि पिढी सुधारली. मएसोची शाळा म्हणजे ब्राह्मणांची शाळा असाच समज बारामतीत होता. हा समज चुकीचा होता हे मी अनुभवाने सांगतो. संस्थेतील शिक्षक ब्राह्मण होते पण शिक्षणात आणि संस्कारात ब्राह्मण्यवाद कधीच दिसून आला नाही. आजच्या नवीन वातावरणात नवी शिक्षण निती देता येते का? याचा संस्थेने विचार करावा. चांगले, दर्जेदार, मूल्यशिक्षण, कौशल्य आणि संशोधनावर आधारित शिक्षण ही काळाची गरज आहे. पुढील शंभर वर्षांचे शिक्षण कसे असावे ही जबाबदारी आपली आहे.”

या कार्यक्रमात संस्थेच्या माजी विद्यार्थी संघाचे म्हणजेच ‘MAA’ चे सन्माननीय सदस्यत्व शरद पवार, खा. अमर साबळे,  प्रतापराव पवार यांना देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते या मान्यवरांना त्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

पवार आणि खा. साबळे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. श्यामा घोणसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी केले. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले तर सूत्रसंचालन डॉ. केतकी मोडक यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील विविध शाखांमधील गुणवंत शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा गौरव समारंभ आणि आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दि. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची दै. सकाळने दखल घेतली.

 

 प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांच्या ‘म.ए.सो. क्रीडा करंडक २०१६-१७’ चे उद्धाटन आद अतिशय उत्साहाच्या वातावरणात झाले. अर्जुन पुरस्कार विजेते क्रीडापटू मा. हेमंत टाकळकर हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीवजी सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष मा. विवेकजी शिंदे, मएसोचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, सहाय्यक सचिव डॉ. भरत व्हनकटे, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे अध्यक्ष मा. भालचंद्र पुरंदरे, मएसो क्रीडावर्धिनीचे महामात्र मा. सुधीर भोसले, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक मा. शैलेश आपटे, नियामक मंडळाचे सदस्य मा. आनंदराव कुलकर्णी, मा. जयंतराव म्हाळगी तसेच मा. राजीव देशपांडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. मएसो प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा जांगळे, मएसो इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका कु. ज्योति क्षिरसागर, मएसो कै. ग.भि. देशपांडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भ.ए. चव्हाण आणि मएसो सौ. नि.ह. देशपांडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. अनिल खिलारे हे देखील यावेळी उपस्थित होते. ‘म.ए.सो. क्रीडा करंडक २०१६-१७’ निमित्त आज सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती.