Year: 2016

महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १९ डिसेंबर २०१६ रोजी संध्याकाळी ७.०० वा. पुण्यात कर्वे रस्त्याच्या प्रारंभी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळीस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी मा. मुख्यमंत्री फडणवीस यांना मानवंदना दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले! शिवास्पदे शुभदे…’ ही रचना शाळेच्या घोष पथकाने सादर करून मुख्यमंत्र्याबरोबरच उपस्थितांची मने जिंकली. मानवंदना देताना जाणवणारा विद्यार्थिनींचा आत्मविश्वास आणि शिस्त पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी त्यांनी विद्यार्थिनींकडून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सैनिकी शाळेची माहिती घेतली आणि या कॅडेट्सबरोबर फोटोही काढला. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ मुळशी तालुक्यात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थिनी आणि शिक्षकांबरोबर झालेल्या संवादात मुख्यमंत्र्यांनी “सैनिकी शाळेत नक्की येऊ!” असे आश्वासन दिले. शाळेच्या विद्यार्थिनींसाठी एकूणच हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी व रोमांचकारी ठरला. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्नपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. गिरीश बापट, सामाजिक न्याय मंत्री मा. दिलीप कांबळे, पुण्याचे मा. महापौर प्रशांत जगताप, पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, आमदार सौ. मेधा कुलकर्णी, आमदार विजय काळे, आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक गणेश बिडकर, नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे व इतर मान्यवर उपस्थित होते. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या मानवंदनेचे नियोजन म.ए.सो.च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा.राजीव सहस्रबुद्धे, शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवीताई मेहेंदळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, उप-प्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, कॅप्टन बनसोडे, श्री. गुंड व श्री. जगधने सर यांनी विशेष प्रयत्न केले.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी सोमवार, दि. १२ डिसेंबर २०१६ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली आणि संस्थेच्या कार्याबद्दल माहिती घेतली. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे आणि नियामक मंडळाच्या सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे यावेळी उपस्थित होते

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे परशुराम रूग्णालय आणि संशोधन केंद्र तसेच आयुर्वेद महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालय रत्नागिरी जिह्यातील घाणेखुंट-लोटे येथे कार्यरत आहे. संस्थेच्या या शाखांना जोडून वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आणि केंद्र सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाच्या ‘सार्वजनिक आरोग्य पुढाकार’ (‘Public Health Initiative’) या योजनेचे उद्घाटन मा. श्री. श्रीपादजी नाईक, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय यांच्या शुभहस्ते शनिवार, दि. ३ डिसेंबर २०१६ रोजी दुपारी ४.०० वा. आयुर्वेद महाविद्यालयाच्या आवारात झाले. या कार्यक्रमाची दै. लोकमत, दै. सकाळ, दै. रत्नागिरी टाईम्स या वृत्तपत्रांनी दखल घेतली.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल या शाळेला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवार, दि. १९ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी ४.०० वाजता कला – क्रीडा संगम आयोजित करण्यात आला होता. दैनिक सकाळ व दैनिक लोकमत या वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाची दखल घेतली आणि छायाचित्रासह वृत्तांकन केले. …

देशाची मान उंचावण्यासाठी प्रयत्न
पुणे : दक्षिण आशियाई स्पर्धांसाठी २००४ मध्ये पाकिस्तानात गेले असताना भारतीय खेळाडूंना अतिशय तुच्छतेची वागणूक मिळाली. पण नेमबाजीतले सुवर्णपदक स्वीकारायच्या प्रसंगी राष्ट्रगीत चालू होताच आपल्या देशाच्या तिरंग्यासमोर पाकिस्तानातले सर्व खेळाडू आणि उपस्थित नागरिक शांतपणे उभे होते. त्याक्षणी मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. आपल्यामुळे देशाची मान उंचावली गेली पाहिजे, हीच जिद्द मनात होती. जेव्हा प्रयत्न कमी पडतात तेव्हा असे क्षण आठवण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर यांनी आज येथे दिला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल या शाळेला ८0 वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कला, क्रीडासंगम या कार्यक्रमाप्रसंगी सावंत यांनी विद्यार्थिनींना हा संदेश दिला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (नवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, राजीव सहस्रबुद्धे, डॉ. संतोष देशपांडे, मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, शाला समितीच्या डॉ. केतकी मोडक, अध्यक्ष डॉ. माधव भट उपस्थित होते.
तेजस्विनी म्हणाली, ”घरापासून नेमबाजी शिकण्यासाठी जाताना बसचे भाडेदेखील कसेबसे जमवावे लागत होते. अशा परिस्थितीत माझ्या आईने दिलेला पाठिंबा आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळेच मी यश मिळवू शकले. शाळेत असताना एनसीसीमध्ये होते. त्यामुळे शूटिंगशी संबंध आला आणि शूटिंग हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.”
शूटिंग हा प्रकार दिसतो तितका सोपा नाही, त्यात कमालीची एकाग्रता लागते. तेजस्विनी सावंत आज रोल मॉडेल बनल्या असल्याचे एअर मार्शल भूषण गोखले (नवृत्त) यांनी सांगितले.
कला, क्रीडासंगम या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या विविध प्रात्यक्षिकांमध्ये शाळेतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सूर्यनमस्कार आणि योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. सामूहिक नृत्य, साधन कवायत, कराटे, ८0 विद्यार्थिनींच्या घोषपथकाच्या विविध रचना सादर केल्या.

पुणे – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारा ‘सीएसआयआर इनोव्हेशन अॅवार्ड फॉर स्कूल चिल्ड्रेन’हा पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसासटीच्या सासवड येथील मएसो वाघीरे विद्यालयातील रोहित अनिल दीक्षित, वैष्णव सुखदेव बारावकर, प्रथमेश दिलीप कोल्हाळे आणि श्रेयस गजानन यादव या चार विद्यार्थ्यांना काल (सोमवार, दि. २६ सप्टेंबर २०१६) नवी दिल्लीत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते हे प्रदान करण्यात आला.

म. ए. सो. व्यक्तिमत्त्व विकास केंद्राच्या पुढाकाराने पुण्यातील विविध संस्थांमधील सुमारे शंभर समुपदेशकांचे पथक गणेश विसर्जनाच्या मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले होते. साम वाहिनीने त्याचे थेट प्रक्षेपण केले.

Saam Marathi – Presence of different organizations of counsellors in Ganesh immersion at Pune

 

पुणे – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालय दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्रातील रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह’ या ऑडिओ-व्हिज्युअल हॉलचे उद्धाटन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते बुधवार दि. १४ सप्टेंबर २०१६ रोजी करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगराचे मा. संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या रेकॉर्डिंग स्टुडिओमधील अत्याधुनिक उपकरणांची माहिती डॉ. गावडे आणि उपस्थित मान्यवरांनी उत्सुकतेने जाणून घेतली.
मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या इमारतीत तळ मजल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह नव्याने तयार करण्यात आले आहे. सभागृहात लावण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्ज्वलन करून या सभागृहाचे उद्धाटन प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांच्या हस्ते आणि रा. स्व. संघाचे पुणे महानगराचे मा. संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गायलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘ने मजसी ने परत मातृभूमीला …’ या ध्वनिचित्रमुद्रित गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रम सुरू झाला. मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष मा. संजय इनामदार आणि उपाध्यक्ष मा. विवेक शिंदे, चिटणीस मा. डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य मा. अभयराव क्षीरसागर, साहाय्यक चिटणीस व गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन. एस. उमराणी, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मुक्तजा मठकरी, संस्थेच्या नियामक मंडळाचे साहाय्यक चिटणीस डॉ. भरत व्हनकटे, नियामक मंडळ आणि आजीव सदस्य आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. गावडे म्हणाले, “पूर्वी ज्या गरवारे महाविद्यालयात प्राध्यापक होतो त्याच महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाच्या सभागृहाचे उद्घाटन करण्याचे भाग्य संस्थेमुळे मला मिळाले याबद्दल मी आभारी आहे. याच महाविद्यालयात सावरकरांवर व्याख्यान देण्याची संधी आपल्याला मिळेल असेही कधी वाटले नव्हते. सावरकर या विषयावर ३३ वर्ष व्याख्यानमाला चालली ही पुण्यात गौरव वाटावी अशी गोष्ट होती. या सभागृहात तशीच किंवा अन्य कोणती व्याख्यानमाला सुरू करता आली तर चांगली गोष्ट होईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटण्याची संधी १९६४ साली मला मिळाली. सावरकरांच्या साहित्यावरील प्रबंधाचे माझे काम सुरू होते. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी केसरीवाड्यात गेलो होतो. सावरकरांची शारिरीक स्थिती अतिशय कृश झालेली होती आणि ते पलंगाला खिळले होते. अशा स्थितीतही रँग्लर र.पु. परांजपे येताच सावरकरांनी वाकून त्यांच्या पायावर डोके ठेवले. असा शिष्य आणि असा गुरू पाहाण्याचे भाग्य तेव्हा मला मिळाले. त्याच भेटीत तात्यारावांनी महाराष्ट्रीय मंडळाचे शिवरामपंत दामले यांना पारंपारिक आणि जुन्या शस्त्रांपेक्षा नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी अणुबाँबचे भित्तीचित्र कोरण्याची सूचना केली होती. तात्या विज्ञाननिष्ठ होते. त्यांच्या साहित्यातला अभ्यासण्यासारखा विषय कोणता असेल तर तो त्यांची विज्ञाननिष्ठा! ‘यज्ञात भवति पर्यन्या:’ ऐवजी ‘विज्ञानात भवति पर्जन्या:’ हा मंत्र त्यांनी दिला. अभ्यासक्रमात विज्ञानकथा असल्या पाहिजेत असा त्यांचा विचार होता. त्याचप्रमाणे कोणती व्रते केली पाहिजेत याबाबतही त्यांची मते होती. मृत्यूनंतर आपला अंतिम संस्कार विद्युतदाहिनीत करायला सांगून त्यांनी आपली विज्ञाननिष्ठा आचरणात आणली होती. तत्कालिन परिस्थितीमुळे स्वा. सावरकरांच्या साहित्यावर पी. एचडी. करण्यासारखा प्रयत्न तडीला जाईल का याची शंका होती. मात्र, आपण नेटाने काम करीत गेलो की यश मिळते हे अनुभवातून मी सांगू शकतो.”
मा. वंजारवाडकर यांनी आपल्या भाषणात, स्वा. सावरकरांच्या चित्राचे अनावरण, त्यांचे नाव असलेल्या सभागृहाचे उद्धाटन आणि त्यांनीच लिहिलेल्या अजरामर गीताच्या शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींनी केलेल्या गायनाचा साक्षीदार होण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. ते म्हणाले, “मएसोचा अध्यक्ष असताना पाहिलेली स्वप्ने साकार होत असल्याचे बघायला मिळणे हा आनंद आणि अभिमानाचा भाग आहे. संस्थेचे व्हीजन डॉक्युमेंट आहे आणि ते केवळ कागदावर नाही तर इथल्या नेतृत्त्वाच्या मनात आहे म्हणूनच ‘नॅक’ च्या अपेक्षेप्रमाणे सर्व सुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळे ‘नॅक’ चा अपेक्षेपेक्षा अधिक चांगला दर्जा मिळेल. महाविद्यालयातल्या कोणत्याही सुविधेसाठी विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहावे लागणार नाही अशा प्रकारची येथील कार्यालयाची रचना करण्यात आली आहे कारण ही संस्था विद्यार्थीकेंद्रीत आहे. ज्या स्वा. सावरकरांचे नाव या सभागृहाला देण्यात आले आहे, त्या स्वा. सावरकरांचा आणि संस्थेचा संबंध आला होता. संस्था चालवत असलेल्या ‘महाराष्ट्र कॉलेज’चे प्राचार्य आणि ‘काळ’कर्ते शि.म. परांजपे यांनी वंगभंगाच्या आंदोलनात पुण्यात परदेशी कापडांच्या होळीच्या प्रसंगी भाषण केले होते. त्याचा परिणाम म्हणजे ब्रिटीश सरकारने ‘महाराष्ट्र कॉलेज’ बंद पाडले. पण कॉलेजच्या नावातील महाराष्ट्र हे नांव टिकवून ठेवण्यासाठी संस्थेचे ‘पूना नेटीव्ह इन्स्टिट्यूशन असोसिएशन’ हे तत्कालिन नांव बदलून ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’ असे करण्यात आले, त्यामागे स्वा. सावरकरांची प्रेरणा होती.”
डॉ. उमराणी यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात, ‘नॅक’च्या निमित्ताने महाविद्यालयात सुरू असलेल्या आधुनिकीकरणाच्या अनेक कामांचा आढावा घेताना शासन व्यवस्था, विद्यापीठ, संस्थेचे मान्यवर माजी विद्यार्थी, सभासद, हितचिंतकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “संस्थेनं ‘नॅक’ ला अपेक्षित असलेल्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत याचा खूप आनंद वाटतो कारण त्याचा सकारात्मक परिणाम प्रेरणेवर होतो. हे सभागृह हा देखील त्याचाच भाग आहे. पूर्वी दुसऱ्या मजल्यावर असलेले हे सभागृह आता तळ मजल्यावर आणण्यात आले असून त्याचे स्वरूप अत्याधुनिक आणि अत्यंत दर्जेदार असे आहे. त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव दिले असल्याने विद्यार्थ्यांच्यात देशभक्ती आणि विज्ञानभाव विकसित व्हावा अशी अपेक्षा आहे.”
प्रा. डॉ. आनंद लेले यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा परिचय करून दिला. या वेळी मा. राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते प्रा. डॉ. प्र. ल. गावडे आणि मा. रवींद्र वंजारवाडकर यांना ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मा. वंजारवाडकर, डॉ. गावडे आणि मा. राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या सभागृहाच्या बांधकामात सहयोग दिलेल्या व्यावसायिकांचा तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सहकारी कर्मचाऱ्यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
मा. अभयराव क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले.
मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गायलेल्या ध्वनिचित्रमुद्रित ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वेदांत कुलकर्णी यांनी केले.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील वाढीव बांधकामाचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शनिवार, दि. २० ऑगस्ट २०१६ रोजी करण्यात आले. या प्रसंगी बोलताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर. ((डावीकडून, बसलेले) संजय इनामदार, राजीव सहस्रबुद्धे, डॉ. प्र. ल. गावडे , एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), डॉ. यशवंत वाघमारे, डॉ. संतोष देशपांडे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय (भावे स्कूल) या शाळेच्या वतीने “सामाजिक रक्षाबंधन – संदेश पर्यावरणाचा” या उपक्रमाअंतर्गत “ई कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर” या अभियानाची सुरवात रविवार, दि. २१ ऑगस्ट २०१६ रोजी टिळक चौकात (अलका टॉकीज चौक) झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला जाहीर झाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरूवार, दि. १८ ऑगस्ट २०१६ रोजी देण्यात आला.
२०१५-१६ वर्षासाठीचा हा पुरस्कार असून शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तो देण्यात येतो.

“शाळेने दिलेले संस्कार भावनांच्या कोलाहलात विसरू नका” – डॉ. अनिरुद्ध देशपांडे
“आपल्या हेतूबद्दल स्वच्छ असलं पाहिजे त्यामुळे जीवनाचा उद्देश कळतो, योग्य-अयोग्य काय हे कळलं पाहिजे त्यामुळे शरीर सुदृढ राखता येतं, जीवनात प्रमाणबद्धता असली पाहिजे त्यामुळे काय बोलावं, कोणाकडे किती वेळ जावे आदी गोष्टी कळतात, विनोदबुद्धी जागृत असली पाहिजे त्यामुळे निर्व्याज्यपणे हसता येतं आणि आपल्या जीवनाचा अर्थ कळला पाहिजे ही चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिकल्याची लक्षणे आहेत. तुम्ही महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या फार मोठी परंपरा असलेल्या संस्थेचे विद्यार्थी आहात ही भाग्याची गोष्ट आहे. शाळेने दिलेले संस्कार भावनांच्या कोलाहलात विसरू नका,” असा आपुलकीचा सल्ला ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिला.
मार्च-एप्रिल २०१६ मध्ये माध्यमिक शालांत (इयत्ता १० वी) आणि उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १२ शाळांमधील ४४ विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ बुधवार, दि. ३ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी ४ वाजता पुण्यातील म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात (असेंब्ली हॉल) आयोजित करण्यात आला होता. डॉ. अनिरूद्ध देशपांडे या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला.
या कार्यक्रमाला मा. दिनकर टेमकर शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे – १ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, सचिव डॉ. संजय देशपांडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ बारामती येथील कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सादर केलेल्या ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या ईशस्तवनाने झाली.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांनी या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मान्यवरांचा परिचय, स्वागत तसेच प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
संस्थेने आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके निबंध स्पर्धा आयोजित करण्यास सुरूवात केली आहे. २०१५-१६ हे त्याचे पहिलेच वर्ष. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये आणि तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रत्येक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मा. टेमकर यांच्या हस्ते प्रातिनिधक स्वरूपात पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले. या मराठी भाषेतील निबंधासाठी कु. अनघा योगेश उबाळे, कु. प्रथमेश दिलीप कोल्हाळे आणि कु. श्रुतिका महेंद्र कुंडा या तिघांना तर कु. साक्षी सचिन घोलप, कु. सानिका गणेश मोरे आणि कु. सृष्टी तुषार करमळकर या तिघांना इंग्रजी भाषेतील निबंधासाठी पुरस्कार देणात आले. श्री. अजिंक्य देशपांडे यांनी यावेळी या स्पर्धेविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्तीची जोपासना करण्यासाठी आणि त्यांच्यात संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी भारत सरकारच्या वतीने सी.आय.ए.एस.सी. स्पर्धा घेण्यात येते. वाघीरे हायस्कूलचे महामात्र डॉ. अंकुर पटवर्धन यांनी ही स्पर्धा आणि स्पर्धेत शाळेला मिळालेल्या यशाबाबत यावेळी माहिती दिली. दोन स्तरावर घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत आपल्या संस्थेच्या सासवड येथील वाघीरे हायस्कूलची पहिल्या स्तरावर निवड झाली होती. २०१६-१७ वर्षासाठी देशभरातून निवडण्यात आलेल्या केवळ ३३ शाळांमध्ये वाघीरे हायस्कूलचा समावेश होता. “बौद्धिक स्वामित्त्व हक्क” या विषयावर दिल्ली येथे कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यानंतर शाळेने सादर केलेल्या सुधारित प्रकल्पाला दुसऱ्या स्तरावर देशभरातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या वैष्णव सुखदेव बारवकर, प्रथमेश दिलीप कोल्हाळे, श्रेयस गजानन यादव आणि रोहित अनिल दीक्षित या चार विद्यार्थ्यांचा सत्कार मा. टेमकर यांच्या हस्ते करण्यात आला. हे सर्व विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी दिल्ली येथे जाणार आहेत.
या विशेष पुरस्कार वितरणानंतर संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे संस्थेची उंची वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून ते म्हणाले, “आईवडिल आणि गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. आपली प्रतिमा आपल्यालाच निर्माण करावी लागते. विमान जसं वरती जातं तसंच ते परत खालीही येतं. त्यामुळे पाय जमिनीवर राहातील याचे भान ठेवा. आपल्या जीवनात समाजाचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामुळे समाजाला परत द्यायला शिका. जसे मोठे व्हाल तसे अमिषांपासून, व्यसनांपासून दूर राहा. शाळेबाहेरच्या टपऱ्यांवर जिथे अमली पदार्थ विकले जात असतील तिथे प्रयत्नपूर्वक ही विक्री रोखली पाहिजे, त्यासाठी एक कार्यक्रमच राबवण्याची गरज आहे. तुमचे वय स्वप्न बघण्याचे आहे, पण अशीच स्वप्न बघा जी झोपू देत नाहीत. आपले आरोग्यदेखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे तब्ब्येत कमवा. ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा. आम्हाला तुमचा अभिमान आहेच, पण आयुष्यात असे काही करा की आईवडिलांना आणि गुरुजनांनाही तुमचा अभिमान वाटेल.“
या नंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते १० वी आणि १२ वी च्या परिक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. मृण्मयी अभिजित चितळे, अथर्व विनय पारसवार, आशा लहू कानतोडे या पारितोषिक प्राप्त गुणवंतांनी या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.
या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिक्षण उपसंचालक मा. टेमकर म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे, भरपूर खेळलं पाहिजे. व्यसनांपासून दूर राहा. ज्ञान आणि व्यवहार ज्ञान यांची सांगड घालायला शिका. समाज आणि देशाला आपला काय उपयोग होईल याचा विचार करा. देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले? याचा विचार करा. चांगले नागरिक व्हा.”
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अनिरूद्ध देशपांडे विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना म्हणाले, “संपूर्ण आयुष्य तुमच्यासमोर आहे. ते कसे व्यतित करायचे, कोणकोणत्या गोष्टींचे भान राखायचे हे आता तुम्हालाच ठरवायचे आहे, तुमच्यासमोर संधींचे आकाश खुले आहे. जीवनात स्पर्धा महत्त्वाची आहे पण स्पर्धा हे जीवनाचे तत्वज्ञान बनता कामा नये. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही, तंत्रज्ञान हे माहिती जमा करण्याचे साधन आहे. माहिती म्हणजे ज्ञान नाही, तसे असते तर सर्वच ग्रंथालये महान ठरली असती आणि त्यातील ग्रंथ हे ऋषी झाले असते. ज्ञानाचे स्वरूप विस्तृत आहे. निसर्गात जाऊन आनंद लुटला पाहिजे तो आनंद कॉम्प्युटर देऊ शकणार नाही. कोणताच हुशार विद्यार्थी आता पुढे जाऊन शिक्षक व्हायचे आहे असे म्हणत नाही. कोणीच शिक्षक होण्यास तयार नसेल तर भविष्यात विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? शिक्षक होणे म्हणजे पिढी घडवणे आणि त्या महत्त्वाकांक्षेसारखा आनंद दुसऱ्या कशातच नाही. जीवनात तळमळ ही फार महत्त्वाची असते. कितीही मोठे झालात तरी नम्रता सोडू नका अंगी उद्दामपणा येऊ देऊ नका. कृतघ्नता हा सर्वात मोठा दुर्गुण आहे, कृतज्ञता बाळगता आली पाहिजे. नव्या संस्कारांना सामोरे जाताना कसोटी लागते पण पर्यावरणाचे रक्षण करणे, प्लॅस्टिकचा वापर टाळणे, पाण्याची आणि अन्नाची नासाडी होऊ न देणे यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टीतून जीवनाला दिशा मिळते. आपल्याकडे कौशल्य असणे आवश्यकच आहे पण दुसऱ्याकडे असलेल्या कौशल्याचा आदर करायला शिकले पाहिजे. समुहात राहिले म्हणजे अहंकार कमी होतो, निखळ आनंद घेता येतो. मूल्यसंपन्न जीवन जगणे ही आपण शाळेला दिलेली खरी भेट असते. श्रमाशिवाय एकही पैसा मिळवण्याची इच्छा करू नका आणि आपला देश, आपला समाज यांच्याबद्दल मनात कधीही तुच्छतेचा भाव निर्माण होऊ देऊ नका. आपला देश आणि समाज जसा आहे तसा स्वीकाराला पाहिजे आणि अपेक्षित आहे तसा घडवला पाहिजे,”
संस्थेचे सचिव डॉ. संजय देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
बारामती येथील कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी गायलेल्या पसायदानाने या आनंद सोहळ्याची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पनवेल येथील आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील शिक्षिका श्रीमती प्रिती धोपाटे यांनी केले.

MES Higher Secondary School, Pune (Self Finance)

(MES Vanijya Va Shastra Uchaa Madhyamik Vidyalay)
131, Mayur Colony, Kothrud, Pune - 411 038
Established in 2016

Balshikshan Mandir English Medium School is known for its development oriented outlook. The School aims at high quality education, developing scientific temperament, and creating a supportive environment for it, developing team spirit as also sensitiveness to lead a meaningful life. The School which has received an ISO ranking has been continuously reviewing its quality management system.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या विद्यार्थीनींनी संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रिकर यांना शनिवार,दि. ३० जुलै २०१६ रोजी मानवंदना दिली. श्री. पर्रिकर एका कार्यक्रमासाठी संस्थेच्या मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात आले होते. त्यावेळी त्यांना मानवंदना देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल(निवृत्त) श्री.भूषण गोखले, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश मालखरे, नियामक मंडळ सदस्या आणि शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. माधवीताई मेहेंदळे आदी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं या वेळी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन सैनिकी शाळेतील विद्यार्थीनींच्या भवितव्याच्या दृष्टीने मागण्यांचे एक निवेदन त्यांना दिले. सैनिकी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी लष्कराच्या चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत (OTA – Officer’s Training Academy) काही जागा राखीव ठेवण्याबाबत आपण विचार करू असं पर्रिकर यांनी या वेळी सांगितलं.
म.ए.सो. ची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही निवासी शाळा असून राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न आहे. सध्या या शाळेत ६५० विद्यार्थीनी इ. ५ वी ते इ. १२ वीचे शिक्षण घेत आहेत. शाळेच्या सध्याच्या मंजूर शुल्क रचनेत बदल करण्याची तसेच या विद्यार्थीनींना संरक्षण दलात प्रवेश मिळावा यासाठी संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. शाळेत कठोर लष्करी प्रशिक्षण घेऊनही या विद्यार्थीनींना संरक्षण दलात थेट प्रवेश मिळण्याची कोणतीही योग्य संधी उपलब्ध नाही. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी त्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागत आहे. परिणामी शाळेचा मूळ उद्देशच बाजूला पडत आहे. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती संस्थेनं दिलेल्या निवेदनात संरक्षण मंत्र्यांना केली आहे.
लष्करी प्रशिक्षणाबरोबरच यथोचित शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने इयत्ता १२ वी नंतर या विद्यार्थीनींच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात सातत्य राहात नाही. केंद्र आणि राज्य सरकारनं सहकार्य आणि मार्गदर्शन केल्यास या विद्यार्थ्यीनींना संरक्षण दलात प्रवेश मिळावा यासाठी आवश्यक असलेल्या पुढील अभ्यासक्रमांसाठी नवीन महाविद्यालय सुरू करण्याचे आव्हान स्वीकारण्यास महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी तयार आहे, असं संरक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. याशिवाय मुलांच्या सैनिकी शाळेप्रमाणेच मुलींच्या सैनिकी शाळेलाही केंद्र सरकारने विविध योजनांमधून वेतनेतर अनुदान द्यावे, विशेष बाब म्हणून शाऴेमधे एन.सी.सी. युनिटला मान्यता द्यावी, क्रीडा विषयक सोयी-सुविधांसाठी केंद्र सरकारनं आर्थिक सहाय्य द्यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

 

“शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, खोड्या, मारामाऱ्या मला आज आठवत आहेत. आज मला जे प्रेम, जिव्हाळा मिळाला तो अनमोल आहे, त्याबद्दल मी आभार मानणार नाही, तो मी ह्रदयात जपून ठेवत आहे. पुनर्जन्म मिळाला तर मी पुण्यातच जन्माला येईन आणि भावे हायस्कूलचाच विद्यार्थी होईन,” अशा शद्वात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.
निमित्त होतं बाबासाहेब पुरंदरे यांच्या 95 व्या वाढदिवसाचं. 29 जुलै 1922 हा बाबासाहेबांचा जन्मदिवस. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचं शिक्षण झालं. ते ज्या वर्गात शिकले त्याच वर्गात शाळेनं आपल्या या माजी विद्यार्थ्याचा आगळावेगळा सत्कार समारंभ आयोजित केला होता. शाळेतील यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, शाळेचे मुख्याध्यापक प्रा. के. एन. अरनाळे आणि सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश मालखरे उपस्थित होते.
शाळेतील राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी (एन.सी.सी.) मानवंदना देऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं शाळेच्या आवारात स्वागत केलं. त्यानंतर शाळेतील शिक्षिकांनी बाबासाहेबांचे औक्षण केले. शाळेच्या प्रवेशद्वारापासून बाबासाहेब ज्या वर्गात शिकले त्या वर्गापर्यंत पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. मुख्याध्यापकांच्या खोलीच्या शेजारच्याच खोलीत बाबासाहेबांचा वर्ग होता. तिथे वेदमंत्रांच्या उच्चारांनी बाबासाहेबांने अभिष्टचिंतन करण्यात आले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील जिवंत देखावा साकारून बाबासाहेबांना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या राष्ट्रपुरूषांच्या प्रसिद्ध घोषवाक्यांचा जयजयकार या विद्यार्थ्यांनी या वेळी केला. “शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीति …” हे स्फूर्तिगीत यावेळी या विद्यार्थ्यांनी सादर केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बाबासाहेबांनीच लिहीलेल्या ‘हिरकणी’ या कथेची समिक्षा सौ. रमा लोहोकरे यांनी सादर केली आणि त्यानंतर या कथेचे अभिवाचन शाळा समितीचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पुरंदरे, सौ. गौरी पुरंदरे, सौ. प्रमिला सातपुते, अतुल दळवी आणि सौ. सुनीता खरात यांनी केले. हा सर्व कार्यक्रम बाबासाहेब अत्यंत तन्मयतेने अनुभवत होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी संवाद साधताना ते म्हणाले की, “ही कथा ऐकत असताना मी मनाने रायगडावरच होतो. आजपर्यंत मी जे काही केलं आहे ते शाळेनं केलेल्या संस्कारामुळेच करू शकलो आहे. मी 95 वर्षांचा झालो असलो तरी शाळेनं आज दिलेलं प्रेम, जिव्हाळा पाहून मला लहानच राहावं असं वाटतं आहे. आजचा हा आगळावेगळा सोहळा पाहून मी थक्क झालो आहे. आज इतक्या वर्षांनी मी शाळेच्या या वेगळ्याच जगात आलो आहे. देवानं मला विचारलं तर मला पुन्हा या पुण्यातच जन्माला यायचं आहे आणि भावे हायस्कूलमध्येच शिकायचं आहे. शाळेतल्या अनेक घटना अजूनही मला आठवत आहेत. शाळेतल्या लेले सरांनी भूगोल शिकवताना हे विश्व किती मोठं आहे आणि आपण त्यात किती कणभर आहोत हे सांगतानाच आपल्यातही आकाशाएवढं होण्याची क्षमता आहे हे लक्षात आणून दिलं होतं. त्यामुळे खूप शिका, खूप दंगा करा, खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा आणि आज माझ्यावर केलंत तसंच शिवचरित्रावर प्रेम करा.”
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे आणि शाळेचे मुख्याध्यापक प्रा. के.एन. अरनाळे यांच्या हस्ते मानपत्र अर्पण करण्यात आलं. तसंच मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी शिक्षकांच्या वतीने श्री. पी. के. कुलकर्णी यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीनं सासवड येथे वाघीरे विद्यालयाच्या आवारात स्थापन केलेल्या इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड या इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि. १५ जुलै २०१६ रोजी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी या शाळेत प्रवेश घेतलेल्या छोट्या दोस्तांच्या समवेत केले.
सासवडमधील पालकांचा संस्थेशी दीर्घकाळापासून परिचय असल्याने संस्थेची ही शाळा, इंग्रजी माध्यमाची असली तरी या शाळेत भारतीय परंपरेनुसारच संस्कार होतील असा विश्वास पालकांनी या वेळी व्यक्त केला.
या आनंद सोहळ्याला संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष मा. विवेक शिंदे, संस्थेचे सचिव मा. डॉ. संतोष देशपांडे, नियामक मंडळाचे सदस्य मा. भालचंद्र पुरंदरे, मा. शामाताई घोणसे, संस्थेच्या आजीव मंडळाचे सदस्य आणि म.ए.सो. वाघीरे प्रशालेचे महामात्र मा. अंकुर पटवर्धन, मा. श्रीमती सविता काजरेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जगदीश मालखरे, माजी आजीव सदस्य मा. वि. ना. शुक्ल, मा. आर. व्ही. कुलकर्णी, आणि वाघीरे शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन इमारतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेला शुभेच्छा दिल्या आणि शाळेची सूत्रे समन्वयक श्रीमती शलाका गोळे यांच्याकडे सुपूर्द केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वप्राथमिक विभागाच्या प्रमुख श्रीमती मेघा जांभळे यांनी केले.

सोमवार दि.27/03/17 रोजी कालीदास कलामंदिर, नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदर पुरस्कार वर्ष 2015-16 व 2016-17 साठी एकत्रित देण्यात आले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची 156 वर्षांची उज्वल परम्परा  व आदिवासी मुली- मुलांसाठी संस्थेने दिलेले योगदान,त्याच बरोबर देशातील पहिल्या मुलींच्या सैनिकी प्रशालेमध्ये गिरिकन्याना मिळत असणारे सैन्य प्रशिक्षण  व त्यांचे सक्षमीकरण या सर्वाचा विचार करुन शासनाने सदर पुरस्कार सैनिकि प्रशालेस दिला.
सदर पुरस्कारामध्ये 50,001/- रु. धनादेश, प्रमाणपत्र व शाल श्रीफळ इत्यादीचा सामावेष होता.
सदर पुरस्कार देण्यासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना.श्री.विष्णु सवरा तसेच ग्रामविकास राज्यमंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे, मा.मनिषा वर्मा सचिव ,आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन तसेच नाशिकच्या प्रथम नागरिक व महिला महापौर मा.रंजनाताई भानसी  आदि मान्यवार उपस्थित होते.महराष्ट्रातील 16 व्यक्तीना व 7 संस्थाना आदिवासी सेवक व सेवा  संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आदिवासी सेवक संस्था कार्यकर्ते उपस्थित होते. म ए सोसायटी तर्फे श्रीमती चित्रा नगरकर तसेच सैनिकि प्रशालेतर्फे प्राचार्या पूजा जोग, उप-प्राचार्य श्री.अनंत कुलकर्णी यानी सदर पुरस्कार स्विकारला. या देखण्या व भव्य-दिव्य कार्यक्रमाचे नियोजन व कार्यवाही आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक श्री.राजीव जाधव यानी केली. सदर पुरस्कार सैनिकी प्रशालेस मिळाल्याने संस्था पदधिकारी व समाजातून प्रशालेच्या कामाचे कौतुक होत आहे.