मएसोचे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र

“संपूर्ण महाराष्ट्रात ८ ते १० लाख विद्यार्थी स्पर्धा परिक्षांची तयार करतात, त्यापैकी दीड ते दोन लाख विद्यार्थी पुण्यात स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनासाठी पुण्यात येतात. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर अधिकारी तयार होतात. सरकारी व्यवस्थेतून परिवर्तन घडवता येते. त्यामागे सेवेची भावना असणे महत्वाचे असते. केवळ जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिने स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचा विचार विद्यार्थ्यांनी करू नये. सध्या या स्पर्धा परिक्षांबद्दल एक प्रकारची नकारात्मक भावना निर्माण झाली आहे, परंतू या परिक्षांच्या तयारीतून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शनाचे व्यापारीकरण न करता चांगले अधिकारी घडवण्याच्या हेतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र चालवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशा शद्बात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. बाबासाहेब शिंदे यांनी संस्थेची भूमिका मांडली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व ज्ञानदीप अॅकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे मार्गदर्शन केंद्र चालवण्यात येणार आहे. त्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मा. बाबासाहेब शिंदे बोलत होते.

या वेळी प्रमुख वक्ते मा. निहाल राजश्री प्रमोद कोरे, ज्ञानदीप अॅकॅडमीचे संचालक मा. महेश शिंदे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा, महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागातील माजी अधिकारी मा. चंद्रकांत निनाळे व्यासपीठावर उपस्थित होते. महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मएसो गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात शनिवार, दि. १३ जानेवारी २०२४ रोजी हा कार्यक्रम झाला.

या प्रसंगी बोलताना मा. निहाल कोरे म्हणाले की, स्पर्धा परिक्षांसाठी दीर्घकाळ कराव्या लागणाऱ्या तयारीमुळे वय हातून निसटते असा भ्रम निर्माण केला जातो परंतू, स्पर्धा परिक्षांची तयारी ही आपण आपल्यामध्ये केलेली गुंतवणुक आहे, त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र परिवर्तन होते. इतरांच्या दृष्टीने जेव्हा यशाची किंवा ध्येय गाठण्याची आशा मावळते तेव्हा आपल्याकडे ठाम विश्वास असायला हवा. स्वतःशीच संघर्ष करायचा असतो, त्यामुळे आपण स्थितप्रज्ञ असायला हवे. ध्येयप्राप्तीसाठी प्रतिकूल परिस्थितीत देखील सोईसुविधांची फिकीर न करता कष्ट करण्याची मानसिकता आवश्यक आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी नाकारण्यातली ताकद खूप मोठी असते. तारूण्य, त्याग, तपश्चर्या आणि संघर्ष यातून भव्य-दिव्य घडेल याची खात्री बाळगा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मा. महेश शिंदे म्हणाले की, स्पर्धा परिक्षांची तयारी नेमकी कशी करावी? याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना या केंद्रामध्ये मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर स्पष्ट ध्येय नसते. अस्तित्वाच्या संघर्षातूनच जीवनमान सुधारण्याचे ध्येय नजरेसमोर येते. आपण नेमके काय करत आहोत हे कळणे आवश्यक असते. सातत्याने केलेल्या प्रयत्नातूनच यश मिळते. त्यादृष्टीने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहयोगाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दर आठवड्याला एका तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महागड्या कोचिंग क्लासमध्ये केले जाणारे मार्गदर्शन येथे सवलतीत मिळणार आहे. त्यामध्ये क्षमता विस्तारावर भर दिला जाणार आहे.

डॉ. विलास उगले यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक केले. स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्राथमिक स्तरापासून अभ्यासाची मजबूत पायाभरणी होणे आवश्यक असते. त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्थेची तपशीलात माहिती असावी लागते. या गोष्टी लक्षात घेऊन संस्थेने ज्ञानदीप अॅकॅडमीच्या सहकार्याने मार्गदर्शनाची व्यवस्था निर्माण केली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

डॉ. किशोर देसर्डा यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला.

डॉ. शोभा करेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर प्रा. किसन कुमरे यांनी आभार प्रदर्शन केले.