events

“नाटकाच्या माध्यमातून विविध विषय, प्रश्न हाताळले जात असतात, त्यातून त्या विषयाचे विविध पैलू समोर येतात आणि विचारांना चालना मिळते. नाट्यमहोत्सवात सादर होणाऱ्या विविध नाटकांमुळे विचारांच्या आदान-प्रदानाची संधी मिळते. ‘मएसो’चा हा नाट्यमहोत्सव महाविद्यालयांमधील सर्वच घटकांसाठी उपयुक्त ठरेल. नाटकाचा संबंध व्यक्तिमत्वाच्या विकासाशी आहे. रंगभूमीवर केलेल्या कामामुळेच आज मला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून व्यासपीठावर दिग्गज व्यक्तींच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली,” अशा शद्बात ‘मएसो’चे माजी विद्यार्थी आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीचे लेखक -दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी नाट्यकलेचे महत्व अधोरेखित केले. ‘मएसो नाट्यमहोत्सवा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६३ व्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या वतीने प्रथमच ‘मएसो नाट्यमहोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. त्याचे उद्घाटन लांजेकर यांच्या हस्ते नाट्यप्रयोगाची घंटा वाजवून करण्यात आले. संस्थेच्या पाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध नाट्य स्पर्धांमध्ये सादर केलेल्या पाच एकांकिका या महोत्सवात सादर करण्यात आल्या.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळाचे सदस्य या महोत्सवाला आवर्जून उपस्थित होते.
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व मएसो भावे प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी उमेश कुलकर्णी यांनी शाळेतच नाटकाची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. “शाळेतील भावे बाई दरवर्षी नाटक बसवण्यासाठी प्रेरित करायच्या. दरवेळेला नव्याने काहीतरी शिकायला मिळायचे, तो प्रवास अजूनही सुरू आहे. कला ही चांगलं जगायला शिकवते. नाटकातून स्वतःचा आणि जगाचा शोध घेण्याची वृत्ती तयार होते, त्याचबरोबर पडणारे प्रश्न आणि येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे बळ मिळते. सध्याचा काळ हा असंख्य घडामोडींचा काळ आहे. इतिहास, वर्तमान आणि भविष्याची सरमिसळ केली जात आहे. ते समजून घेण्यासाठी नाटक हे सर्वात साधे व सोपे माध्यम आहे. कला ही माणसाला मुक्तपणे व्यक्त व्हायला शिकवते, नाटकाच्या माध्यमातून आपण आपले मत अधिक ठोसपणे मांडू या आणि सगळ्यांना तसे करण्यास शिकवू या,” असे ते यावेळी म्हणाले.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, जीवनात प्रत्येकालाच अभिनय करावा लागतो. सैन्यदलातील अधिकारी म्हणून आम्हाला देखील अभिनय करावा लागतो. आनंद किंवा दुःख व्यक्त करता येत नाही, भावनांना बांध घालावा लागतो. मनावर संयम ठेवून नाटक बघणे हा देखील तसाच प्रकार आहे.
मएसो ऑडिटोरियममध्ये दि. २४ व २५ नोव्हेंबर असे दोन दिवस हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनप्रसंगी सर्व एकांकिकांचे लेखक व दिग्दर्शक तसेच ‘मएसो’चे माजी विद्यार्थी असलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नचिकेत पूर्णपात्रे व स्मिता शेवाळे या कलावंतानी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थित राहून नवोदित कलाकारांचा उत्साह वाढविला.
या नाट्य महोत्सवात मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ने योगेश सोमण लिखित व रश्मी देव दिग्दर्शित ‘कॅन्टीन’ ही एकांकिका, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सने सुधा देशपांडे व समृद्धी कुलकर्णी लिखित व दिग्दर्शित ‘रेडिओ’, मएसो सिनियर कॉलेजने समृद्धी पाटणकर लिखित व ओम चव्हाण दिग्दर्शित ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘उदगार, पुणे’ व मएसोच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रवीण विठ्ठल तरडे लिखित व अनिरुद्ध अनिल दिंडोरकर दिग्दर्शित ‘वंशावळ’ तर एमईएस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करियर कोर्सेसने अथर्व आनंद जोशी व ओम नितीन चव्हाण लिखित व दिग्दर्शित ‘जीना इसिका नाम है!’ या एकांकिका सादर केल्या.
नाट्य रसिकांनी विद्यार्थ्यांच्या या कलाकृतींना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“काळ आणि परिस्थिती बदलत राहते पण शिक्षण आणि संस्कार ही मूळ तत्वे कायम राहतात, त्यांची गरज कायम असते त्यामुळे ती विसरून चालणार नाही. संस्कारक्षम शिक्षक असल्याशिवाय सक्षम विद्यार्थी घडत नाहीत, चांगले शिक्षक निर्माण करणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. शिक्षण संस्थांनी आपली जबाबदारी ओळखून शिक्षणाशी संबंधित सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणे आवश्यक आहे. व्हीजन डॉक्युमेंट तयार करून त्यानुसार वाटचाल करणे आणि त्याचा कालबद्ध आढावा घेत राहणे हे संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी आवश्यक आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज (रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३) संस्थेच्या १६३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, कै. वामन प्रभाकर भावे आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली.

संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, मा. उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. देवदत्त भिशीकर, मा. विजय भालेराव, डॉ. विवेक कानडे, सीए राहुल मिरासदार, डॉ. राजीव हजिरनीस, मा. अजय पुरोहित, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे मा. अध्यक्ष डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व संस्थेचे माजी सचिव डॉ. भरत व्हनकटे, आजीव सदस्य मंडळाच्या सदस्या डॉ. मानसी भाटे व डॉ. नेहा देशपांडे, संस्थेचे माजी सचिव प्रा. र.वि. कुलकर्णी व प्रा. वि.ना. शुक्ल, मएसो क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे तसेच संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव मा. सुधीर भोसले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर उपस्थित होते. संस्थेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारीवृंद देखील यावेळी उपस्थित होता.

संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला केलेल्या प्रास्ताविकात शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले परंतू संस्थेच्या संस्थापकांनी ज्या उद्देशाने संस्था स्थापन केली, ते मूळ उद्देश कायम राखत गेल्या १६३ वर्षात संस्थेने यशस्वी वाटलाच केल्याचे सांगितले. हीच परंपरा यापुढील काळात देखील कायम राखली जाईल असा विश्वास व्यक्त केला.

संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे या वेळी बोलताना म्हणाले की, “ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला आज १६३ वर्ष पूर्ण होत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी व्यक्तीच्या जीवनात एक वर्ष कमी होते, परंतू संस्थेच्या वाटचालीत एक वर्ष वाढणे ही चांगली घटना असते. संस्थेचे कार्य वाढणे, त्याचा विस्तार होणे, संस्था बहरणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असते. संस्थेच्या वाटचालीत अनेकांचे योगदान आहे. संस्थेच्या नव्या नियामक मंडळ आणि आजीव सदस्य मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने संस्थेच्या कार्याला अधिक गती देता येईल. दूरगामी विचार करून संस्थेच्या १७५ व्या वर्षी संस्थेच्या शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७५ हजारांवर पोहोचेल यादृष्टीने प्रयत्न करू या. त्यासाठी सर्वांनीच झोकून देऊन काम केले तर संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान दिल्याचे समाधान सर्वांनाच मिळेल.”

संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक यांनी आपल्या भाषणात, विद्यार्थ्यांना घडवणारे संस्कारक्षम आणि सक्षम शिक्षक मिळणे हे फार मोठे आव्हान असून असे शिक्षक घडवणे हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या प्रदीर्घ परंपरा असलेल्या संस्थेचे कर्तव्य आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करू या. विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे डॉक्टर, इंजिनिअर व्हावे असे वाटते, त्याचप्रमाणे शिक्षक व्हावे असे वाटले पाहिजे असे संस्कार करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले.

संस्थेचे सचिव मा. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. संस्थेच्या प्रत्येक घटकाचे संस्थेच्या कार्यात योगदान, संस्थेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न, आगामी पाच वर्षांचे नियोजन त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी संघ अर्थात ‘MAA’ च्या कार्याला गती देण्यासाठीचे नियोजन यादृष्टीने काम सुरू असल्याचे सांगितले. संस्थेच्या आजीव सदस्य मंडळातील ५० टक्के सदस्य संस्थेचेच माजी विद्यार्थी आहेत आणि ही आनंदाची बाब असल्याचे या वेळी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या संस्थेच्या संस्थापकांच्या भित्तीचित्रावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

“शिक्षणामुळे चरितार्थाची सोय होते पण संगीतामुळे मिळणारा आनंद जीवन समृद्ध करतो. संगीतामुळे चित्तवृत्ती एकवटल्या जात असल्याने चित्तशुद्धी होते. परिणामी  गुन्हेगारी वृत्तीला आळा बसतो, संगीताचा समाजमनावर होणारा हा फार मोठा परिणाम आहे, ” असे प्रतिपादन तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेच्या नूतनीकृत सभागृहाचे उद्धाटन आज (गुरूवार, दि. ९ नोव्हेंबर २०२३) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पं. तळवलकर बोलत होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक  यांची विशेष उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे आणि संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “नमन नटवरा विस्मयकारा…” या नांदीनंतर पं. तळवलकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

“सभागृहामध्ये सादर केलेल्या कार्यक्रमामुळे कलाकाराला अनुभवाची शिदोरी मिळते, त्या आठवणी त्याला प्रेरणा देणाऱ्या असतात, त्यातून कलाकार घडत असतो. मएसो भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहाशी माझे ऋणानुबंध आहेत. माझे गुरू पं. पंढरीनाथ नागेशकर यांचे कार्यक्रम देखील या सभागृहात झाले आहेत. त्यामुळे नूतनीकरण झालेल्या या सभागृहाचे उद्धाटन माझ्या हस्ते होत आहे याचे मला अप्रूप आणि अभिमान वाटतो आहे,” असे तालयोगी पं. सुरेश तळवलकर यावेळी म्हणाले.

मा. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी केलेल्या प्रास्ताविकात शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या सभागृहाच्या नूतनीकरणामागील भूमिका मांडली.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “सैन्यदलांच्या परेडमध्ये देखील एक संगीत असते, त्यातील बीट बिघडले तर परेडची शान कमी होते. संगीतामुळे गुन्हेगारी कमी होते हा पंडितजींनी मांडलेला विचार अतिशय महत्वाचा आहे. शांतता मिळविण्यासाठी सगळेचजण संगीताकडे वळतात.”

या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् च्या आजी व माजी विद्यार्थिनींनी कथक नृत्यशैलीत गणेश वंदना सादर केली. त्यानंतर कॉलेजमधील प्रा. रश्मी देव, प्रा. अरुंधती कामठे व ऋषिकेश कर्दोडे यांनी दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या निवडक लेखांचे अभिवाचन केले. प्रा. केदार केळकर आणि ऐश्वर्या कडेकर यांनी रागमाला सादर केली. तसेच मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षिकांनी भावगीते सादर केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी आणि आय.आय.टी., कानपूरमध्ये केमिकल इंजिनिअरींग विभागात प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ. योगेश जोशी यांना विज्ञान क्षेत्रात अतिशय मानाची समजली जाणारी जे. सी. बोस राष्ट्रीय पाठ्यवृत्ती मिळाली आहे. केमिकल इंजिनिअरींगच्या क्षेत्रात प्रा. योगेश जोशी यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव या पाठ्यवृत्तीमुळे झाला आहे.

भारत सरकारच्या काऊन्सिल ऑफ सायंटिफीक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या शांती स्वरुप भटनागर पारितोषिकाने सन्मानित असलेल्या, वैज्ञानिक शिक्षण संस्थेच्या सभासद असलेल्या आणि विज्ञान क्षेत्रात असामान्य कर्तृत्व सिद्ध केलेल्या कार्यरत शास्त्रज्ञाला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेल्या सायन्स अँड इंजिनिअरींग रिसर्च बोर्ड या संस्थेतर्फे ही पाठ्यवृत्ती दिली जाते.

व्यक्तिगत पाठ्यवृत्ती म्हणून प्रति महिना २५ हजार रुपये, संशोधन अनुदान म्हणून पाच वर्षांपर्यंत प्रतिवर्ष १५ लाख रुपये पाठ्यवृत्तीधारकाला तसेच अतिरिक्त खर्चासाठी यजमान संस्थेला एक लाख रूपये देण्यात येतात. पाठ्यवृत्ती काळातील संशोधन कार्याचे कठोर मूल्यमापन करून पाठ्यवृत्तीचा कालावधी दर पाच वर्षांसाठी वाढविण्यात येऊ शकतो. तसेच पाठ्यवृत्तीधारकाच्या ६८ व्या वर्षापर्यंत यजमान संस्था त्याला पाठ्यवृत्ती देऊ शकते.

डॉ. योगेश जोशी अनेक पुरस्कारांचे मानकरी असून २०१५ मध्ये त्यांना ‘सीएसआयआर’तर्फे शांती स्वरुप भटनागर पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. २०१८ साली त्यांना आय.आय. टी., कानपूरतर्फे डिस्टिन्क्विश टिचर्स अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

शांती स्वरुप भटनागर पारितोषिक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दि. २२ मार्च २०१६ रोजी ‘मएसो’चे माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री डॉ. अरुण फिरोदिया यांच्या हस्ते प्रा. योगेश जोशी यांच्या सत्कार करण्यात आला होता.

डॉ. योगेश जोशी हे मएसो बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता आणि मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला या शाखांचे माजी विद्यार्थी आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डॉ. योगेश जोशी यांचे हार्दिक अभिनंदन!

 

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी मा. बाबासाहेब शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी मा. सौ. आनंदी पाटील यांची आज ( मंगळवार, दि. १२ सप्टेंबर २०२३) निवड करण्यात आली. तसेच संस्थेच्या सचिवपदी मा. डॉ. अतुल कुलकर्णी यांची तर सहाय्यक सचिवपदी मा. सुधीर भोसले यांची निवड करण्यात आली.

मा. बाबासाहेब शिंदे हे व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते असून सौ. आनंदी पाटील या उद्योजिका आहेत. मा. डॉ. अतुल कुलकर्णी आणि मा. सुधीर भोसले मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कार्यरत असून अनुक्रमे शिक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स हे त्यांचे विषय आहेत.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष म्हणून एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची तर उपाध्यक्ष म्हणून मा. प्रदीप नाईक यांची संस्थेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फेरनिवड करण्यात आली आहे.

 

संस्थेच्या नियामक मंडळावर सदस्य म्हणून मा. देवदत्त भिशीकर, मा. विजय भालेराव, मा. अॅड. सागर नेवसे, मा. डॉ. विवेक कानडे, सीए मा. राहुल मिरासदार, मा. डॉ. राजीव हजरनीस, मा. अजय पुरोहित यांची निवड झाली आहे.

वर्ष २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी ही निवड आहे.

डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय धनगर हा ‘नंदू मराठे श्री २०१९’ पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या आंतरमहाविद्यालयीन ‘कै. नंदू मराठे शरीरसौष्ठव स्पर्धे’त त्याने हे यश मिळविले आहे. महाविद्यालयाच्या सभागृहात आज (शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०१९) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात पुणे शहर आणि जिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांमधील ४२ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे रिजनचे महाव्यवस्थापक सुधीर कुलकर्णी यांच्या हस्ते अक्षय धनगर याला पारितोषिक प्रदान करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रमधील व्यवस्थापक संगीता देसाई यांच्या हस्ते अन्य पुरस्कारप्राप्त स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी. बुचडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रा. ए.टी. साठे, प्रा. पी.बी. कामठे, डॉ. अरुण दातार, प्रा. शैलेश आपटे, उल्हास त्रिमल, जयप्रकाश भट, भगवान परदेशी, डॉ. आशा बेंगळे, प्रा. उमेश बिबवे, विशाल भोसले, रोहित इंगवले उपस्थित होते. प्राचार्य डॉ. बुचडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे स्पर्धेच्या आयोजन समितीचे सदस्य प्रा. पी.बी. कामठे, सुधीर भोसले व सुनिता चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हा आज शिक्षणक्षेत्रातील ब्रँड’

पुणे, दि. २६ : “माणूस हा सजीव असतो तर संस्था ही निर्जिव असते, पण निर्जिव संस्थेच्या कामात प्राण फुंकण्यासाठी पूर्वसुरींनी घेतलेल्या कष्टांमुळे आणि त्यागामुळेच आज शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि तिचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय हे ‘ब्रँड’ निर्माण झाले आहेत. या महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि इथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल असे आज या महाविद्यालयाचे कार्य आहे. गेल्या ७५ वर्षात महाविद्यालयाने केलेल्या यशस्वी वाटचालीची कमान यापुढील काळातदेखील चढती राहावी यासाठी या अमृत महोत्सवी वर्षात सर्वांनीच विचार केला पाहिजे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उद्धाटन समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.  महाविद्यालयाच्या अॅसेंब्ली हॉलमध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मएसो’च्या मुख्य कार्यालयातून आणलेल्या मशालीचे स्वागत यावेळी मा. गोखले यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव मा. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी.बुचडे आणि संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व समारंभाचे समन्वयक डॉ. अतुल कुलकर्णी उपस्थित होते.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाळेतून महाविद्यालयात जाणे हा एक पार महत्त्वाचा बदल असतो. शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकांचे लक्ष असते. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला कल्पना आणि आशा-आकांक्षाचे घुमारे फुटलेले असतात. तो शाळेत शिकलेली शिस्त विसरतो आणि मजा लुटण्याची ओढ त्याला लागते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घेतला पाहिजे पण आपले लक्ष शिक्षणावरच केंद्रीत केले पाहिजे. आपले ध्येय न सोडणारे विद्यार्थीच पुढे जाऊन जीवनात यशस्वी होतात हे लक्षात घेतले पाहिजे.”

राज्यातील पूरग्रस्तांसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या निधीचा, १ लाख ५१ हजार रुपयांचा पहिला हप्ता यावेळी मा. गोखले यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह श्री. विनायक डंबीर यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला.

महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या माहितीपटाचे प्रकाशन मा. गोखले यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. तसेच हा माहितीपट तयार करणारे विद्यार्थी आणि अमृत महोत्सवी वर्षाचे बोधचिन्ह तयार करणारा विद्यार्थी प्रसाद किसन चोपडे या सर्वांचा सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बुचडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात, महाविद्यालयाच्या गेल्या ७५ वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला. तसेच यापुढील काळात महाविद्यालयात नवनवीन अभ्यासक्रम आणि प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

‘मएसो’ येत्या १९ नोव्हेंबरला १६० व्या वर्षात पदार्पण करत आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा शतकोत्तर हीरक महोत्सव आणि संस्थेच्याच आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा अमृत महोत्सव एकाच वर्षात साजरा करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. महाविद्यालय आणि त्याची मातृसंस्था या दोन्हींसाठी ही विशेष घटना आहे, असे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आज (शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट २०१९) महाविद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली.

या वेळी ‘मएसो’चे नियामक मंडळ सदस्य मा. विजय भालेराव, साहाय्यक सचिव सुधीर गाडे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) पी.बी. बुचडे, उपप्राचार्य डॉ. अंकूर पटवर्धन, उपप्राचार्य डॉ.सुनीता भागवत, उपप्राचार्य श्रीमती शैला त्रिभुवन,पर्यवेक्षक श्रीमती स्मिता कुलकर्णी, डॉ. अतुल कुलकर्णी, श्री. सुधीर भोसले, श्री. गोविंद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे, दि. ३ – “आपला देश विविधतेने नटलेला असून देशात अनेकविध कलाप्रकार अस्तित्वात आहेत. या सर्व कलांचे एकात्मिक शिक्षण देण्याची गरज असून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स त्यादृष्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडेल. संस्थेने लावलेल्या या रोपट्याचा भविष्यात निश्चितच वटवृक्ष होईल आणि देशाबरोबरच जगासाठी कार्य करणारे विद्यार्थी येथे घडतील,” असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि मएसो सिनिअर कॉलेज या दोन महाविद्यालयांचे उद्धाटन कुलगुरुंच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोथरुडमधील मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरिअममध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, ‘मएसो’चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष अभय क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. करमळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “पं. भीमसेन जोशी यांच्या प्रेरणेतून विद्यापीठात गुरुकुल पद्धतीने विविध कलांचे शिक्षण देणाऱ्या ललित कला केंद्राची सुरुवात झाली. आता गोव्याच्या धर्तीवर अनुभवजन्य शिक्षण देणारी कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची गरज असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी संधी उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. नव्या शैक्षणिक धोरणात स्वैच्छिक शिक्षणाचा (Liberal Education) समावेश करण्यात येणार असून त्यात ललित कलांचा (Performing Arts) अंतर्भाव करण्यात आला आहे. पुणे शहर हे विद्येबरोबरच कलांचे माहेरघर असून कलांच्या शिक्षणासाठी पुण्यातल्या प्रतिभावंतांना सहभागी करून घेतले पाहिजे. कलेच्या शिक्षणामुळे चारित्र्यसंपन्न पिढी घडण्यास मदत होते आणि त्यांचा उपयोग देश संपन्न होण्यासाठी होतो. आता केवळ नोकरी देणारे शिक्षण न देता विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशाला कला, संस्कृती, योग, आयुर्वेद याची फार मोठी परंपरा आहे. या परंपरेचे केवळ गुणगान करत न बसता त्याचा एकत्रितपणे विचार करून जगभर त्याचे मार्केटिंग केले पाहिजे. रोजगार निर्मितीबरोबरच आनंददेखील मिळेल अशा दृष्टीने या सर्व विषयाकडे बघण्याची गरज आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करत असतानाच नावीन्याचाही पुरस्कार केला पाहिजे. विज्ञान, सामाजिक विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून भौतिक शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षण देण्याचीदेखील आवश्यकता आहे.”

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने सुरू केलेल्या नव्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध कलांचे शिक्षण मिळेल आणि त्यांना नवी दिशा मिळेल. पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे, शहरात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटसारख्या संस्थांबरोबरच आय.सी.सी.आर. चे क्षेत्रीय कार्यालयदेखील आहे. अशा संस्थाबरोबर सहकार्य करण्याची शक्यता पडताळून बघितली पाहिजे. हवाई वाहतूक, पर्यटन अशा विषयांसाठी एम.बी.ए. चे अभ्यासक्रम चालविले पाहिजेत. शिक्षण व्यवस्थेत क्रेडिट सिस्टीम आणण्याचा विचार स्तुत्य आहे. आपल्याकडे आता प्रत्येक कामाकडे आदराने बघितले जाते, हा बदल खूप चांगला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला शाबासकी ही दिलीच पाहिजे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी केले तर संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

डॉ. मानसी भाटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाची सुरवात अबोली थत्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नृत्याद्वारे केलेल्या गणेश वंदनेने झाली. सुखदा दीक्षित यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’च्या वतीने ‘संगीतातील घराणी आणि सादरीकरण’ या विषयावर ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. विकास कशाळकर यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. म.ए.सो. मुलांचे विद्यालयातील (पेरुगेट भावे हायस्कूल) डॉ. प्र.ल. गावडे सभागृहात शनिवार, दि. २७ जुलै २०१९ रोजी दोन सत्रांमध्ये ही कार्यशाळा पार पडली.

कार्यशाळेपूर्वी शास्त्रीय संगीतातील घराणी, मूळपुरुष आणि गुरु-शिष्य परंपरा, वेगवेगळी वाद्ये आणि वादक, जेष्ठ नृत्यांगना, याबरोबरच जेष्ठ नाट्यकर्मी अशा वेगवेगळ्या आशयानुसार तयार केलेल्या ‘फोटो आर्ट गॅलरी’चे उद्घाटन पं. कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.भरत व्हनकटे व साहाय्यक सचिव श्री. सुधीर गाडे. महाविद्यालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य श्री. गोविंद कुलकर्णी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर आणि महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. दीपाली काटे उपस्थित होते.

या कार्यशाळेत शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेर, आग्रा, जयपुर आणि किराणा या घराण्यांचा इतिहास, प्रत्येक घराण्यानुसार सादरीकरणातील वैविध्य, सौंदर्यमूल्यांविषयी सप्रयोग व्याख्यानातून जिज्ञासू रसिकांना घरंदाज बंदिशी, स्वरलगाव, रागबढतीतील विविध टप्पे या विषयांवर यथासांग माहिती मिळाली.

पुणे शहराबरोबरच विविध गावातील संगीत अभ्यासक या कार्यशाळेला उपस्थित होते.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अबोली थत्ते यांनी तर महाविद्यालयाच्या समन्वयक डॉ. दीपाली काटे यांनी आभारप्रदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी प्रा. सुखदा दीक्षित, प्रा. अबोली थत्ते, छाया ढेकणे व श्री. विक्रम खाटपे यांनी परिश्रम घेतले.

आज रात्री झी २४ तास वृत्तवाहिनीवर ८ वाजताचे बातमीपत्रामध्ये बघायला विसरू नका …

“धागा शौर्याचा, राखी अभिमानाची”

सैनिकांसाठी झी २४ तास या वृत्तवाहिनीने “धागा शौर्याचा, राखी अभिमानाची” हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. सैनिकांना पत्र पाठवून त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेली आपुलकी, आदराची भावना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. म.ए.सो.बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम शाळेत आज (बुधवार, दि. २४ जुलै २०१९) या उपक्रमाचा शुभारंभ झाला. शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ही एक लाखमोलाची संधी होती. ह्या उपक्रमाचा महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. उद्याच्या भारतासाठी आणि उज्ज्वल भविष्य असणाऱ्या या मुलांना समाजाभिमुख बनविण्यासाठी असे उपक्रम फारच उपयुक्त ठरत असतात.

“जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान
तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केव्हढीशी शान”

इंदिरा संतांच्या या ओळी सैनिकांप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतिशय समर्पक आहेत. स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन असा दुग्धशर्करा योग जुळून आल्यामुळे यावर्षी स्वातंत्र्यदिनी सैनिकांना राखीसोबत कृतज्ञता पत्र पाठवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीवजी सहस्रबुद्धे, झी २४ तासचे मुख्य संपादक श्री.विजयजी कुवळेकर व संस्थेचे सचिव डॉ.भरत व्हनकटे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड देण्यात आली आणि त्यांनी त्यावर सैनिकांना उत्स्फुर्तपणे पत्र लिहिले. जमा करण्यात आलेल्या या सर्व पत्रांची पेटी सैनिकांना देण्यासाठी सुपूर्द करण्यात आली.

अतिशय प्रेरणादायी वातावरणात आणि प्रचंड उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

आज रात्री झी २४ तास वृत्तवाहिनीवर ८ वाजताच्या बातमीपत्रामध्ये या कार्यक्रमाची सविस्तर बातमी दाखविण्यात येणार आहे.

पुणे, दि. १९ – “आजच्या विद्यार्थ्यांसमोर निश्चित ध्येय आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्या आजूबाजूला बरेच काही नवीन घडते आहे. आता चाकोरीबद्ध विचार करण्याचे दिवस संपले आहेत, त्यामुळे जीवनात प्रस्थापित क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्राचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी नवीन क्षेत्र विकसित करण्याचादेखील विचार केला पाहिजे, आपल्या क्षमता आजमावून बघितल्या पाहिजेत. आपल्याला मनापासून जे आवडते तेच करा, ते करत असताना कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडू नका,” असा सल्ला कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे क्षेत्रिय आयुक्त अतुल कोतकर यांनी आज विद्यार्थ्यांना दिला.

मार्च २०१९ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्चमाध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राज्यभरातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. इ. १० वी, इ. १२ वी आणि ज्ञानवर्धिनी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या ‘मएसो’च्या ४० विद्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तिपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात हा समारंभ पार पडला.
यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे सदस्य ॲड. धनंजय खुर्जेकर, संस्थेचे साहाय्यक सचिव सुधीर गाडे, सचिव डॉ. भरत व्हनकटे व्यासपीठावर उपस्थित होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे तसेच आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर या समारंभाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजीव सहस्रबुद्धे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी काय शिकायचे आहे हे ठरवत असताना जीवनाचा सर्वांगीण विचार केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनात आपल्या पालकांप्रमाणेच, शाळेचे आणि संस्थेचे नाव मोठे करावे अशी संस्थेची अपेक्षा असते, शिक्षक व प्राध्यापक त्यादृष्टीने कष्ट घेत असतात आणि संस्था आवश्यक असलेल्या विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देत असते. संस्थेच्या उज्ज्वल कार्याचा परिचय सर्वांना व्हावा हादेखील हेतू गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभामागे असतो.

डॉ. भरत व्हनकटे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या वतीने पायल संतोष पिसे, साक्षी संभाजी जाधव, अरबाज रियाज शेख, वैष्णवी गिरीश जोशी, जान्हवी शिरीष पानसे या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपले मनोगत व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “स्वतःचे वेगळेपण सिद्ध करता येईल असा मार्ग विद्यार्थ्यांनी निवडला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय स्पष्ट आहे, त्यामुळे ते स्वप्न राहणार नाही यासाठी सर्वजण नक्कीच प्रयत्न करतील यात शंका नाही. जीवनात गुरुंचे महत्व खूप आहे कारण त्यांच्याकडून कायमच प्रेरणा आणि आशीर्वाद मिळतात. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा कारण त्यात काम केले तर प्रगतीच होते. आपल्या शारिरीक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या. स्वतःची प्रतिमा निर्माण करा आणि आपले पालक, शाळा, संस्था यांचे नाव मोठे करा, त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा! ”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीलिमा व्यवहारे यांनी तर आभार प्रदर्शन सुधीर गाडे यांनी केले.

‘शिक्षणाचा पाया पक्का करण्याची गरज’

“माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आज सर्व माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध होत आहे, शिकण्यासाठी पूर्वी कष्ट घ्यावे लागत होते. आता मात्र शिकण्यासाठी कष्ट करण्याची भावना कमी होत चालली आहे, हे योग्य नाही. शालेय जीवनातच शिक्षणाचा पाया पक्का करण्याची गरज असते कारण त्याच्याच जोरावर आयुष्यात यशस्वी होता येते,” असे प्रतिपादन गरवारे पॉलिस्टर लिमिटेडच्या मनुष्यबळ आणि प्रशासन विभागाचे अध्यक्ष डॉ. विहार राखुंडे यांनी आज (रविवार, दि. 14 जुलै 2019) येथे केले. सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. 10 व इ. 12 वी च्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव आणि गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या साहाय्यातून करण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा शुभारंभ डॉ. राखुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वाघमारे, शाळेचे महामात्र आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव सुधीर गाडे, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते. गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी आणि मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य सुनील सुतवणे, मएसोच्या नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळातील सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ. राखुंडे म्हणाले की, “परदेशांप्रमाणेच आपल्या देशातही दर्जेदार शिक्षण मिळावे अशी आबासाहेब गरवारे यांची इच्छा होती. त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविले होते. परंतु, समाजातील सर्वांना हे शक्य होणार नाही याची त्यांना जाणीव होती. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतूनच त्यांनी गरवारे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आबासाहेब गरवारे यांच्या विचारांना अनुसरून गरवारे पॉलिस्टर लिमिटेडचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर शशिकांत गरवारे मएसो आणि विविध शैक्षणिक संस्थांना गरवारे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने पाठबळ देत आहेत. त्यांच्याच पाठिंब्यामुळे ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेल्या ‘मएसो’ सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाला आज सुरुवात होत आहे.”

इ.12 वी च्या परिक्षेत विज्ञान शाखेत 80 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावलेली मयुरी सुनील बजबळकर, इ.12 वी च्या परिक्षेत वाणिज्य शाखेत 91 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आलेला विशाल विठ्ठल ढाकणे आणि इ. 10 वी च्या परिक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आलेली साक्षी कालिदास सातव या गुणवंतांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात, सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्थापनेला लवकरच 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या भाषणात, शाळा हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया असल्याने तो मजबूत व्हावा यासाठी शिक्षकांनीही कष्ट घेण्याची गरज असल्याचे सांगितले. शिक्षकांकडे असलेले सर्व ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. मातृभाषेतून शिकल्याने शिक्षणाचा पाया मजबूत होतो. मराठी शाळेत शिकत असल्याचा न्यूनगंड विद्यार्थ्यांनी अजिबात बाळगू नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आबासाहेब गरवारे व सौ. विमलाबाई गरवारे यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनी श्रेया कुलकर्णी हीने सौ. विमलाबाई गरवारे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.

शाळेचे मुख्याध्यापक अविनाश वाघमारे यांनी आभारप्रदर्शन तर शिक्षिका अर्चना लडकत यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने नव्याने सुरू केलेल्या ‘मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्टस’च्या कार्यालयाचे उद्घाटन ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते गुरुवार, दि. ४ जुलै २०१९ रोजी करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या नियमक मंडळाचे सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, अडव्होकेट धनंजय खुर्जेकर, बाबासाहेब शिंदे, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. आनंद लेले, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. अतुल कुलकर्णी, सुधीर भोसले, विनय चाटी, गोविंद कुलकर्णी,संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, संस्थेच्या कार्यालयाचे प्रबंधक नीलकंठ मांडके, सहाय्यक प्रबंधक अजित बागाईतकर आदी उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नाव अग्रणी आहे. समाजात असलेली विविध कलांची आवड लक्षात घेऊन संस्थेने ‘मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्टस’ची स्थापना केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, नाट्य या पैकी कोणत्याही एका कला प्रकाराची निवड करून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे.

महाविद्यालयाच्या सुसज्ज अशा वास्तूमध्ये विदयार्थ्यांसाठी स्वतंत्र रियाज खोली, प्रात्यक्षिक वर्ग, साउण्ड लायब्ररी, प्रोजेक्टर खोली, कार्यक्रमासाठी स्वतंत्र सभागृह अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असून येत्या काही काळात संगीत, नृत्य आणि नाटयाशी निगडीत अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत.